Sunday, March 31, 2019

प्रेम पिसे भरले अंगी। संत नामदेव

एक जुनं मराठी गाणं आहे 'प्रेम पिसे भरले अंगी', गायलंय वाणी जयराम, संगीत - वसंत देसाई, सन - माहित नाही साधारण १९७० असेल.
गाणं पुरुषांच्या कोरसमध्ये सुरु होतं, तेच ध्रुवपद आहे, मुख्य गायिकेने अनुनासिक आवाजात फक्त अंतरे गायलेय, ध्रुवपद कायम कोरस मध्येच आहे, सध्या भजनी ठेक्यावर, विशेष ताना मुरक्या नाहीत, चढ उतार नाहीत, थोडीशी सतार, टाळ.... बस्स. वाणी जयराम ह्या तामिळ, बालपणापासून प्रसिद्ध गायिका. त्यांना मराठीचा गंध नाही. संगीतकार त्यांना मराठी उच्चार शिकवत, घोटून घेत.
नामदेवांची साधी सिम्पल ३५० वर्षे जुनी रचना, कोणताही विशेष ज्ञानाचा बडेजाव न आणता केवळ निख्खळ अर्थपूर्ण रचना. कडव्यात मोजके तीन शब्द, त्याच्यापुढे परत तीन चार साधे सोपे मराठीतले शब्द. पण सगळ्याचा एकत्रित परिणाम अत्युच्च आनंद निर्मितीमध्ये होतो. गाण्याची चाल उत्साहपूर्ण आहे, ऐकताना मनामध्ये आनंदाचं नुसतं थुईथुई थुईथुई कारंजं उडत राहतं. सगळं कसं छान, स्वच्छ, निर्मळ झाल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा हे गाणं कानावर पडतो तेव्हा तेव्हा असाच आरस्पानी अनुभव येतो. गाण्याच्या शब्दांना अनुसरून खरंच प्रेम पिसे भरले अंगी अशी अवस्था होऊन जाते.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Prem_Pise_Bharale
प्रेमपिसें भरलें अंगीं ।
गीतसंगे नाचों रंगीं ॥१॥
कोणे वेळे काय गाणें ।
हें तों भगवंता मी नेंणे ॥२॥
वारा धावे भलतया ।
तैसी माझी रंग छाया ॥३॥
टाळमृदंग दक्षिणेकडे ।
आह्मी गातों पश्चिमेकडे ॥४॥
बोले बाळक बोबडें ।
तरी तें जननीये आवडे ॥५॥
नामा ह्मणे गा केशवा ।
जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥
https://www.youtube.com/watch?v=vjSzTiLiGR4
आणि अजून शोध घेताना जुन्या लोकसत्तातील एक सुंदर लेखही समोर आला.
"वाणी जयराम - बाळ कोल्हटकर यांच्या देव दीनाघरी धावला या नाटकातील कुमार गंधर्व यांच्यासोबतचे ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा पाहतोसी अंत’ ही वसंत देसाई यांची चार गाणी या सीडीत खुलून आली आहेत. पैकी ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग दक्षिणेकडे, आम्ही गातो पश्चिमेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. पश्चिम ही भोगाची दिशा आहे तर दक्षिण ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे."
वाचून मस्त वाटलं, म्हटलं कुणी लिहिलंय लेख - तर ' सतीश पटवर्धन'. सतीश माझा देवरुख पासूनचा शाळा-कॉलेज दोस्त, नंतर तो पुण्यात BMCC ला मी आबासाहेब गरवारेला, नंतर तो लोकसत्तामध्ये मी सामाजिक चळवळीमध्ये, आमच्या होणाऱ्या चर्चा, भेटी, सगळं कसं झर्रकन समोर आलं. सतीश दोन-तीन वर्षांपूर्वी वारला. माझा गेलेला मित्र आज मला परत एक दृष्टांत (Insight) देऊन गेला. लेख - http://www.loksatta.com/daily/20090310/mv09.htm