Wednesday, August 21, 2019

खय्याम

एका मुलाखतीमध्ये गीतकार जावेद अख्तर यांनी लतादीदींनी एक प्रश्न विचारला होता की, 'तुम्ही आजपर्यंत हजारो गाणी गायली. यामध्ये तुमचं सर्वात जवळच गाणं कोणतं?'
लतादीदींनी सांगितलं की,'मला खूप गाणी आवडतात. पण जेव्हा जेव्हा मी एकटी असते किंवा प्रवासात असते तेंव्हा मला 'रझिया सुलतान' मधील 'ए- दिल-ए- नादान' हे गाणं गुणगुणायला खूप आवडतं.'
जावेद अख्तर खुश. म्हणाले, ' बाप तो आखीर बाप ही होता हैं.'
म्हणजे हे गाणं त्यांच्या गीतकार वडिलांचं. 'जां निसार अख्तर' यांचं.
आणि या गाण्याला संगीतबद्ध केलंय ते 'खय्याम यांनी..........
............................................
एका अवॉर्ड कार्यक्रमात 'खय्याम' यांना 'Life time achievement award' मिळालं होतं. तेही रेखाच्या हस्ते.
रेखाच्या करियरच्या चार चांद लावले ते 'उमराव जान' या सिनेमाने. आजही हा सिनेमा फक्त रेखा आणि त्यातील गाणी यासाठी पटकन आठवतो.
रेखा म्हणाली की यातील सगळी गाणी  जशी की...
'दिल चीज क्या हैं'
'इन आंखो की मस्ती के'
'जिंदगी जब भी तेरी बज्म मे'
सगळी बेहतरीन आहेतच, पण एक गाणं गुणगुणल्याशिवाय तिलाही चैन पडली नाही.
' ये क्या जगह हैं दोस्तो, ये कौनसा दयार है...
बुला रहा कौन मुझको चिलमनों के उस तरफ़...
मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है
ये क्या जगह है दोस्तो....'
रूढार्थाने गायिका नसणाऱ्या रेखाचाही आवाज असा लागला की बास..
म्हणतात ना आपल्या वर्षानुवर्षे पोटात ठेवलेल्या वेदना जेंव्हा अश्या ओठावर जेंव्हा येतात ना तेंव्हा त्या वेदनेचे सूर लेवुनच येतात.
.....................................
मागच्या एक दोन वर्षांपूर्वी खय्याम आणि त्यांची आयुष्याची जोडीदार गायिका जगजीत कौर यांची मुलाखत ऐकली. निमित्त होतं ते खय्याम यांच्या नव्वदीचं..
या वयातही भविष्यात करावयाच्या कामाचे प्लांनिंग चालू होतं त्यांचं.
एकुलता एक मुलगा गेल्यामुळे आपल्या पैशांचं होतकरू संगीतकारांना फायदा व्हावा  म्हणून एक ट्रस्ट काढायचा विचार होता.
मुलाखतकाराने जगजीत कौर यांना एक प्रश्न विचारला, 'तुम्ही इतक्या मोठ्या गायिका पण त्यामानाने तुमचं काम कमी आहे.  असं का? आणि तुम्हाला याच कुठं वाईट वाटत नाही का?'
जगजीत कौर यांनी सांगितलं की , 'मला काम करू वाटायचं पण खय्याम यांच्या कामात मीही इतकी गुरफटून गेले की मला सवडचं मिळेना. त्यामुळं मोजकीच गाणी करता आली. पण मला त्याचं काही वाटत नाही. दिलमे कुछ मलाल नही हैं।'
त्यांना मुलाखतकाराने त्यांचं एक सुपरहिट गाणं गुणगुणायचा आग्रह केला तेंव्हा जरा लाजतच ही वयाची ऐंशी पार केलेली  ही पोरगी गुणगुणू लागली. 'शगुन' सिनेमातील खय्याम यांनीच संगीत दिलेली एक अवीट गझल..
"तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हें ग़म की क़सम, इस दिल की वीरानी मुझे दे दो"
मुखडा गुणगुणून त्या शांत झाल्या.तेंव्हा खय्यामसाब म्हणाले,' याचा एक अंतरा खूप बेहतरीन आहे. म्हण गं जरा'
जगजीत कौर नी पुन्हा गुणगुणायला सुरुवात केली...
"मैं देखूँ तो सही, दुनिया तुम्हें कैसे सताती है...
कोई दिन के लिये, अपनी निगहबानी मुझे दे दो..."
........................................
क्या कहू यारों..
कुछ दिन की निगहबानी मागितलेल्या जगजीत कौर यांना खय्याम साहेबांनी पूर्ण आयुष्याचं 'निगहबान' बनवलं. तोच अंतरा का गायला लावला त्याचं उत्तर आपसूकच मिळालं...
आता हा निखारा पदरात पदरात बांधून घेतलाय म्हणल्यावर पदर जळू न देता निखारा तर धुमसता ठेवला पाहिजे ना.. त्यासाठी स्वतःच्या करियरवर पाणी सोडायचीही हिम्मत दाखवली त्यांनी. आणि या निखाऱ्याला थोडी न थोडकी 65 वर्ष साथ दिली.
या मुलाखतीत त्यांनी खय्याम साहेबांनी स्वतःहून मान्य केलं की जगजीत नसत्या तर ते काही करू शकले नसते.....
हा माणूस एकदम मनस्वी..
ऑफर्स भरपूर येत पण उगीच करायचे म्हणून काम करायचे नाही. चित्रपट स्वीकारायचे ते बॅनर किंवा स्टार कास्ट बघून नाही तर गाणी बघून..गीतकार बघून.. परिणामी काम मोजकंच हाती.. पण एकदम बावनकशी...
कित्येक चित्रपट बॉक्सऑफिस वर दणकून आपटले पण लक्षात राहिलं ते त्यातील संगीत..गाणी..
वानगीदाखल सांगायचं झालं तर....
राज कपूरच्या वो सुबह कभी तो आयेगी मधील शीर्षक गीत 'वो सुबह कभी तो आयेगी....
धर्मेंद्र आणि तरला मेहता च्या शोला और शबनम मधील जीत ही लेंगे बाजी हम तुम....
वहिदा रहमान आणि कमलजीत सिंग च्या शगुन मधील 'परबतोंके पेडोंपर शाम का बसेरा हैं... आणि तुम अपना रंजो गम...
राजेश खन्नाच्या आखरी खत मधील ' बहारो मेरा जीवन ही सवारो....
शंकर हुसैन मधील ' आप यूँ फ़ासलोसे गुजरते रहे...
चंबल की कसम मधील 'सिमटी हुई ये घड़ियां.. फिर से ना बिखर जाए...
नाखुदा मधील..तुम्हारी पलकोंके चिलमनोमे ये क्या छुपा है...
दर्द मधील 'प्यार का दर्द है मीठा मीठा...
असे अजून कितीतरी पडेल सिनेमे लक्षात राहिले ते गाण्यामुळे....
असं नाही की हिट सिनेमे आणि खय्याम यांचं वावडं होतं...
1976 ला आलेल्या 'कभी कभी' मधील गाण्यांनी त्यावेळची सगळी रेकॉर्डस् मोडली होती. अमिताभ चा हळवा प्रियकर लक्षात आहे अजूनही तो 'कभी कभी मेरे दिल मे खयाल आता हैं' मुळेच...
यानंतर आलेले 'त्रिशूल , खानदान, नुरी, थोडी सी बेवफाई, आहिस्ता आहिस्ता, रझिया सुलतान आणि बाजार सारख्या सिनेमातील गाणी गुणगुणला नाही असा विरळाच असेल...
स्मिता आणि नसरुद्दीनच्या बाजार सिनेमात खय्याम साहेबांच्या गाण्यांनी चार चांद लावले होते...एकापेक्षा एक सरस  गाण्याची लयलूट होती यात..
देख लो आज हमको जी भर के...
दिखाई दिये युं...
करोगे याद तो हर बात याद आयेगी....
फिर छिडी रात बात फुलोंकी..
अजूनही यातलं कोणतंही गाणं ऐका...दिल खुश हो जाता हैं यार...
...........................................
एरव्ही आपल्याकडे गल्लाभरू आणि चोरीच्या चाली उचलणाऱ्यांची काही कमी नाही.. पण हे बावनकशी सोनं त्यातून चमकतंच..
..........................................
परवा खय्याम साब गेल्यानंतर अंतिम दर्शनासाठी बोटावर मोजण्याइतके लोक आले होते. पण जो माणूस  जन्मभर मनस्वी जगला त्याला गेल्यानंतर कोणाच्या येण्या न येण्यानं काय फरक पडतो..
एरव्ही कोणत्याही अवॉर्ड फंक्शन किंवा तत्सम कार्यक्रमाला हजेरी न लावणारे गुलजारजी मात्र विशाल भारद्वाज सोबत आलेले दिसले.
......................................
हे पाहून खय्यामसाब मात्र एवढेच म्हणतील...
' कोई मुझको याद 
क्यो कोई मुझको याद करें..
मश्रूफ जमाना मेरे लिये क्यों ..
वक्त अपना बरबाद करें....'

No comments:

Post a Comment