Tuesday, December 24, 2019

नौशाद। मानसी पटवर्धन

तू कहे अगर जीवनभर मैं गीत सुनाता जाऊँ .....
                                       मन-बीन बजाता जाऊँ...!

"सप्तसुर"  त्याच्यावर प्रसन्न होते...."संगीत" हाच त्याचा "श्वास"...त्याच्या मनवीणेवर नित्य नव्या गीतांचे सृजन साकारत असे... कोणताही  अनुवंशिक सांगितिक वारसा त्याला लाभला नव्हता..."अल्लाताला" मेहरबान झाला आणि "मौसिकी ची सौगात" त्याला बहाल करून गेला...!!! तिसऱ्या वर्षी आजारपणात त्याचा श्वास अचानक बंद पडला ...पण रहमदिल खुदाची कृपा झाली आणि  तो बचावला...कुटुंबावरील मृत्यूचे सावट टळले....अल्लाच्या मर्जीनेच श्वासाचे आरोह अवरोह पुन्हा पूर्ववत झाले ...कुटुंब आनंदले .. ..पुढे याच मुलाने आपल्या सदाबहार ,अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित सुरावटीनी अनेकांच्या  मनात सुरांचे नंदनवन फुलविले....!!!! त्याची जिद्द,भगीरथ प्रयत्न, संगीतावरील नितांत प्रेम सारेच अलौकिक होते..."सैगल ते हरिहरन" आणि "अमिरबाई ते अनुराधा" पर्यंत सगळ्याच गायकांचे स्वर संगीतरुपी धाग्यात गुंफून त्यांनी  संगीताचा सुवर्णकाळ अजरामर केला...हा मुलगाच पुढे नामवंत संगीतकार बनला... "संगीतकार नौशाद"...!!!  आज त्यांची जयंती...!!!त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन....!!!!

त्यांचा जन्म लखनौ चा...कर्मठ मुस्लिम कुटुंबात जन्मल्याने तिथे गाणे निषिद्ध होते...लहानपणी आपल्या मामूजान बरोबर ते "देवा शरीफ" मध्ये "हजरत वारीस अली शाह"च्या उरुसाला जात...दहा दिवस उरुसात चाललेल्या  मैफलीतील गझल,नात,कव्वाली यांनी त्यांचे कान आणि मन दोन्ही तृप्त होई...!!!"उस्ताद नसरुद्दीन" यांची गझल त्यांना विशेष आवडत असे...

छुटे असीर तो बदला हुआ जमाना था
न फूल थे,न चमन था,न आशियाना था...

या शब्दसुरांनी ते जणू भारले जात...तसेच  तिथे येणाऱ्या एका बासरीवाल्याच्या वादनाने ते मंत्रमुग्ध होत ..त्या मधुर सुरांत स्थळकाळाचा  विसर पाडण्याचे सामर्थ्य होते... तो सूर,त्यातील राग त्यांच्या मन मंदिरात रुजत असे...!!!पुढे  त्यांच्या संगीतात बासरीचे सूर घुमू लागले त्याची हीच नांदी होती का..?? आठवा "दूर कोई गाये"(बैजू बावरा), मुरलीवाले मुरली बजा(दिल्लगी),आज मेरे मन में सखी (आन)सारखी गोड गीते...!!!

लखनौ च्या "रॉयल सिनेमा" मध्ये तेव्हा मूक चित्रपट दाखवले जात..हा चित्रपट साथीच्या वाद्यवृंदाबरोबर पुढे सरकत असे..दृश्याला अनुरूप संगीत असे..गंभीर वातावरणनिर्मिती साठी गझल,नृत्याच्या वेळी तसे संगीत वाजवले जाई. "नवाब लड्डन साहेब" वाद्यवृंदाचे प्रमुख असायचे..."उस्ताद कल्लन" तबला तर "बाबुलाल "क्लेरोनेट वाजवत असे...!!हे सारे नौशादजींना खूप आवडे...आपणही वाद्य वाजवावे.. संगीत द्यावे असे त्यांना वाटे.पुढे त्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताची सुरवात इथूनच झाली असावी...!!!

लखनौ च्या "लाटुश रोड" वरील "गुरबत अली" यांच्या वाद्यांच्या दुकानाचे त्यांना खूप कुतूहल वाटे..धीर करून त्यांनी त्या दुकानाची सफाई करण्याचे काम मिळविले आणि दुकानाच्या सफाई बरोबर वाद्यांवरही त्यांचा हात अलगद फिरत असे.."रॉयल थिएटर "मध्ये ऐकलेली धून इथे हार्मोनियम वर प्रकट होई आणि मग अलौकिक नाद ब्रह्म साकारत असे...गुरबत अलींच्या हे लक्ष्यात आल्यावर त्यांच्या हातातील जादूने तेही अचंबित झाले आणि  त्यांना हार्मोनियम भेट देते झाले...पुढे "लड्डन मियाची" हार्मोनियम,"उस्ताद बब्बन खान "यांचे शास्त्रीय संगीत आणि "युसुफ अलिखान" यांची सतार शिकण्याचा योग नौशादजींना आला आणि संगीतातील हुनर हळूहळू त्यांनी काबीज केले...!!!!

"मॉडेल हाऊस" मधील सुलतान साहेबांच्या ड्रामा क्लब मधील गाण्यांना नव्याने रचण्याचे काम त्यांनी सुरू केले...त्यात त्यांचे मन रमले...जणू याच साठी त्यांचा जन्म झाला होता..पुढे न्यू ड्रामा कंपनीबरोबर त्यांनी दौरा केला..दुर्दैवाने कंपनीचे दिवाळे निघाले आणि त्यांना घरी परतावे लागले...वडिलांनी "घर किंवा संगीत" यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले...त्यांना नौशाद यांचे गाणे मुळीच पसंत नव्हते...बाजाची पेटी भिरकावून त्यांनी आपला निषेध नोंदविलाच होता...अल्लातालाने दिलेला हा जन्म केवळ संगीताचीच सेवा करण्यासाठीच असा दृढ विश्वास असलेल्या नौशाद यांनी घर सोडले आणि मुंबई गाठली...!!!

मुंबईत आल्यावर अथक परिश्रमाची मालिका सुरू झाली.महत्प्रयासाने "पियानो वादक" म्हणून एका कंपनीत  त्यांना ४० रुपये पगाराची नोकरी मिळाली....कामासाठी वणवण,अपार कष्ट,मनातील जिद्द यामुळे मार्ग मिळत गेले आणि  अगदी अर्जुनाप्रमाणे ते आपल्या ध्येयाप्रत ते वाटचाल करत राहिले...दादरमधील अख्तर साहेबांच्या दुकानात रात्री पथारी पसरल्यावर त्यांना समोरच्या  ब्रॉडवे टॉकीजमधील लुकलुकणारे दिवे खुणावत....हा रस्ता ओलांडायला त्यांना तब्बल "१५ वर्षे" लागली..."बैजू बावरा" च्या रौप्यमहोत्सवी त्यांना सन्मानाने आमंत्रित केले होते...गत स्मृती जाग्या झाल्या... तेव्हा त्यांच्या एका डोळ्यात  "हसू "आणि एकात "आसू" दाटले होते...अखेर  त्यांनी यशश्री मिळविली होती...!!!!
तसा "प्रेमनगर " हा नौशाद यांचा प्रथम चित्रपट...त्यानंतर "माला"(क्यू नैना भर आये...श्रीमती घोष),"दर्शन"(ज्यात दुरानी यांनी  पार्श्वगायनात पदार्पण केले आणि "पीहर में पिया छेडे "हे गीत मीरा बरोबर म्हटले),"स्टेशनमास्तर"(राजकुमारी,सुरैय्या,अमिरबाई,प्रेम अदिब अभिनित "चलो चलो री सखी मधुबन में" हे गीत गाजले),"नई दुनिया"(ज्यात सुरैय्या चे पहिले  गीत होते..."बूट करू मैं पॉलिश बाबू"),"शारदा"(पंछी जा ..सुरैय्या हे गीत खूप गाजले)या गीतात नौशादजींनी मटका रिदम प्रथम वापरला...!!!मधोक यांच्याबरोबर घोडा गाडीतून सैर करताना   दोघांच्या डोळ्यावर पेंग आली आणि गाडीवान गाडी थांबवून निघून गेला..पण जाग आली तेव्हा "पंछी जा" ही सुंदर धून मिळाली होती...!!!

पण नौशादना कीर्तीच्या शिखरावर नेणारा चित्रपट होता "रतन."...!!!त्यातील सर्व सामान्यांना गुणगुणता येणाऱ्या  रचनांनी रसिकांवर भुरळ घातली .. लोकप्रियतेचे सारे उच्चांक मोडले....!!!अवघा भारत  "रतन"च्या गाण्यांनी वेडा झाला ..."मिलके बिछड गयी अखियां"(अमिरबाई),"रुमझुम बरसे बदरवा"(हे सावन गीत असून कोरस चा उत्तम वापर दिसतो..."पिया घर आजाss मधील अजीजी मनाला भिडते..),अँखियां मिलाके(जोहरा बाई),जब तुम ही चले परदेस( शाम कुमार आणि अमिरबाई यांचे हे गीत) , हे गीत त्यावेळी संगीतकार सचिन देव बर्मन यांचा  नोकर गुणगुणत होता...त्यांना आश्चर्य वाटले ,नोकर माझा आणि गाणे म्हणतोय नौशाद यांचे... "सुलभ गेयता"...म्हणजेच सामान्यांना सहज म्हणता येईल असे गीत असावे याचा वस्तुपाठ नकळत नौशादजींनी दिला होता.) "सावन के बादलो"(जोहराबाई आणि करण दिवाण) यातील विरह भाव हृदयस्पर्शी होते... एकंदरीतच "रतन" मधील  "उत्तर भारतीय संगीताचा लहेजा" रसिकांना भावला होता...!!

नौशाद यांनी "रतन" मधील गीतात प्रथमच बासरी आणि सतारीचा एकत्रित वापर केला."ढोलक" त्यांचेच सहायक गुलाम मुहम्मद वाजवत...तसेच "एको इफेक्ट्स" साधण्यासाठी एक माईक  स्टुडिओ च्या बाथरूम मध्ये ठेवला जाई..आश्चर्य म्हणजे जेव्हा नौशाद यांचे "रतन" चे संगीत गाजत होते ,तेव्हा त्यांच्या लग्नाच्या वरातीतही बँड वाले "अँखियां मिलाके "आणि "रुमझुम बरसे बदरवा" वाजवत होते...रतन चे संगीत इतके गाजले की जेमिनी दिवाण यांना पहिल्या वर्षीच्या  नुसत्या  रॉयल्टी चे साडेतीन लाख मिळाले होते...

१९४६ मध्ये आलेल्या "अनमोल घडी" या चित्रपटानेही अशीच लोकप्रियता मिळविली...यात नौशादजींनी  "नूरजहाँ "  यांच्या अविस्मरणीय स्वरास आपल्या मधुर  संगीताचे कोंदण दिले ...संगीत मलिका "नूरजहाँ "यांचे "आवाज दे कहा है" (सुरेंन्द्र बरोबर)आणि मिश्र पहाडीवर आधारित "जवा है मोहोब्बत" हे सदाबहार गीत म्हणजे या चित्रपटाचे वैभव होते..."आवाज देss" या गीताची धून मनाप्रमाणे जमेना, थकून झोपल्यानंतर स्वप्नात हार्मोनियम वाजवत असताना एक धून अंतरी ठसली ,त्यानंतर "तिला आवाज दे कहा है "असे मूर्त रूप प्राप्त झाले...!!जाणकार या गीतास अलौकिक कलाकृती मानतात...याचप्रमाणे "धरती को आकाश पुकारे"(मेला),"लेने को आये कहार"(बाबुल)या गाण्याच्या चालीही त्यांना स्वप्नात सुचल्या असा मोहोळकरांच्या "मोहोळ" पुस्तकात उल्लेख आहे.
"अनमोल घडी" या चित्रपटात "सोचा था क्या ,क्या हो गया," मन लेता है अंगडाई","मैं दिल में दर्द बसा लाई" ही "सुरैय्या" यांची तर "आजा मेरी बरबाद मोहोब्बत के सहारे" , विशेष ओढीने गायलेले "मेरे बचपन के साथी मुझे भूल ना जाना" ही नूरजहाँ यांची गीते होते...याशिवाय "उडन खटोले पे उड जाऊ"(जोहरा,शमशाद),"क्यू याद आ रहे है"(सुरेंद्र),"तेरा खिलौना टूटा बालक (हे रफी यांचे "पहिले" नौशादजींबरोबरचे स्वतंत्र गीत होते)."आजा मेरी बरबाद" या गीताच्या संगीतात दिग्दर्शक मेहबूब खान सूचना देऊ लागले...दुसऱ्या दिवशी गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी नौशादजींनी लाईटमन ना सूचना देण्यास सुरुवात केली ,तेव्हा मेहबूब यांनी त्यांना संगीतावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले...नौशाद हसून म्हणाले की काल मी हेच सांगत होतो....!!!आपल्या कृतीतून नौशाद यांनी आपले म्हणणे चलाखीने पटवून दिले.

१९४७ मधील "शाहजहान" चित्रपटात दस्तुरखुद्द "कुंदन लाल सैगल "यांच्या स्वरास नौशाद यांच्या संगीताची महिरप लाभली आणि जन्मली अवीट गोडीची गीते..."जब दिल ही टूट गया" ही  अजरामर भैरवी याच चित्रपटातील...जी सैगल यांनी भाव विभोर होऊन गायली आहे ,हेच गीत आपल्या अंत्यसमयी गायले जावे अशी सैगल यांची इच्छा होती...!! गीतकार मजरुह यांचा हा  पदार्पणातील चित्रपट..त्यांची "गम दिये मुस्तकील "(झिंझोटी राग, दिप चंदी ताल)ही गझल आजही एक "नायाब नगीना" मानतात...!!!"चाह बरबाद करेगी"(बागेश्री),"ए दिले बेकरार झूम"(बिहाग),"कर लिजीए चलकर", "मेरे सपनों की रानी रुही रुही "(यात रफिंनी त्यांची साथ दिली होती)...नौशाद यांनी सैगल ना ते "काली पांच"(शराब)शिवाय ही गाऊ शकतात हे सिद्ध करुन दाखविले...!!!खरच नौशाद आणि सैगल या दिग्गजांची भेट थोडी आधी झाली असती तर....!!!

"दर्द" या चित्रपटापासून "शकील बदायुनी" या गुणी गीतकाराची साथ नौशादजींना लाभली ती थेट शकील यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत .."शकील आणि नौशाद" यांचे मैत्र दृष्ट लागण्यासारखे होते,त्यांनी २५० च्या हून अधिक गाणी रसिकांना दिली.खरं तर "दर्द" हा सुरैय्या यांचा चित्रपट ...पण यातील नवी गायिका "उमादेवी" म्हणजेच "टुनटुन" यांच्या दर्दभऱ्या "अफसाना लिख रही हूँ "या गीताची लोकप्रियता आजही तशीच  आहे...आजही जणू आनंद लहरींवर तरंगत लहरणारे हे गीत मनास आनंद देते...

१९४८-४९मध्ये "मुकेश" यांच्या स्वरास नौशाद यांनी प्राधान्य दिलेले दिसते.."मेला","अंदाज","अनोखी अदा" या चित्रपटात त्यांनी "मुकेश" यांचा स्वर वापरला.तर "दिल्लगी","दुलारी","चांदनी रात" यासाठी त्यांनी "रफी" यांचा स्वर वापरला...!!"अनोखी अदा" मधे "सुरेंद्र आणि मुकेश" यांची जणू जुगलबंदीच आढळते.."बडे भोले भाले है" ,"जले न क्यू परवाना","क्यू उन्हे दिल दिया" (शमशाद बरोबर...यात व्हायोलिनचा हमिंग सारखा वापर केला होता)ही सुरेंद्रची तर मुकेश यांना "मंझील की धून में"( भैरवी),गंभीर प्रकृतीचे "कभी दिल दिल से टकराता तो होगा","दर्दभरे भूल गये क्यू दे के सहारा"(शमशाद सह)अशी गीते दिली.

"मेला" मध्ये नौशादनी मुकेश यांना अविस्मरणीय गीते दिली."आई सावन ऋत आई"(मुकेश,शमशाद),"मैं भवरा तू फूल"(शमशाद सह..सुंदर प्रेमगीत),"मेरा दिल तोडने वाले" (शमशाद सह म्हटलेले "आसावरी" थाटातील गीत), "गाये जा गीत मिलन के"(मुकेश)ही गीते तर लोकप्रिय झालीच ,पण "शिववरंजनी" तील "धरती को आकाश पुकारे"मधील "आना ही होगा"मधील विलक्षण ओढ,गीतातील स्वरांचा ठेहराव,मुकेशजींच्या स्वरातील दर्द  सारेच सुंदर होते...!!!!

"अंदाज "हा मेहबूब खान यांचा संगीतमय चित्रपट...यात "लता" नामक स्वर्गीय सुरांची साथ नौशादजींच्या संगीताला लाभली आणि त्यांच्या संगीताच्या कक्षा रुंदावल्या...."sky is the limit "अशी स्थिती झाली..नौशाद फोन वर बोलत असता एक तरुणी मंजुळ स्वरात गुण गुणत गेली ,तो स्वर नौशादजींच्या कानात घुमू लागला...हाच लताजींचा स्वर होता..."उठाये जा उनके सितम" हे "केदार"च्या सुरावटीने बहरलेले गीत , ज्याच्या अनेक रिहर्सल झाल्या,"राजू भारतन "यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे हे २०ते३०वेळा नौशादजींनी त्यांच्याकडून वाचून घेतले...शब्दांचे वजन,उच्चार या साऱ्यांचा सूक्ष्म विचार त्यांना सांगितला...आजही हे गीत रसिकांना मोहित करते ,तसेच "तोड दिया दिल मेरा"(लता)...हे गीत पहाडीच्या सुरांनी नटलेले ,काळीज दुभंगून टाकणारे,काहीसे नूरजहाँ स्टाईलने गायलेले..."कोई मेरे दिल में खुशी बन के आया(लता)" हे आनंद तरंग निर्मिणारे तर "ना दीर दारा "असे सुरवातीचे  तराण्याचे शब्द वापरून रचलेले "मेरी लाडली  री बनी है"(लता)...हे ही शब्द, नाद ,सुरांची आगळी सैर घडविणारे...!!!!"डर ना मोहोब्बत कर ले" हे शमशाद आणि लता यांच्या स्वरातील सुंदर गीत...!!
"अंदाज" मुळे लताजींचे नौशादांच्या संगीतातील स्थान बळकट झाले......लताजींच्या यशाच्या मालिकेत नौशाद यांच्या "अंदाज","दुलारी "यांचाही सिंहाचा वाटा आहे..("अंदाज" मध्ये मेहबूब खान यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दिदींकडून नायिकेची सर्व गाणी गाऊन घेतली. )लतादीदी नौशादजींच्याकडे गायला लागल्यावर  अमिरबाई,जोहराबाई,राजकुमारी या  गायिका त्यांच्या संगीतातून बाद झाल्या...शमशाद सुद्धा सहनायिकांपुरत्याच राहिल्या..

"अंदाज" मध्ये मुकेश यांची  "हम आज कहीं दिल खो बैठे"(झिंझोटी),"झूम झूम के नाचो आज","टुटे ना दिल टुटे ना"(भैरवी),आणि यावर कडी म्हणजे पियानो च्या साथीने बेहोष होऊन म्हटलेले भैरवीच्या सुरावटीतील "तू कहे अगर जीवन भर"हे पहिले पियानो गीत अशी सुंदर गीते होती...तसेच रफी आणि लता यांच्या स्वरातील "यु तो आपस में बिघडते है खफा होते है"...हे गीतही श्रवणीय होते..
दुलारी,बाबूल,चांदनी रात,दीदार,आन,बैजू बावरा ,मुघल-ए-आझम ,शबाब,अमर,उडन खटोला,मदर इंडिया,गंगा जमना,मेरे मेहबूब,पालकी,सन ऑफ इंडिया अशी कितीतरी देखणी स्वरदालने नौशादजींच्या संगीतमहालात दिमाखाने लखलखतात..५०वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द...काय काय लिहावे हा प्रश्न....नौशादजींची अवघी कारकीर्द एवढ्या  छोट्याशा लेखाच्या चिमटीतून  रेखाटणे हे अति कठीण...!!!
नौशाद यांची काही रेशमी युगलगीते...जी आजही रसिकांना भुरळ घालतात...
१.मिल मिल के गाएंगे...लता -रफी -दुलारी
२.नदी किनारे,साथ हमारे...लता-रफी-तलत-बाबुल
३.मिलतेही आँखे दिल हुआ दिवाना..तलत-शमशाद
४.झुले में पवन के आई बहार.. लता-रफी-बैजू बावरा
५.दो सितारोंका जमी पर है मीलन..लता-रफी-कोहिनूर
६.मन की बीन मतवारी.. लता-रफी-शबाब
७.चंदन का पलना..हेमंतकुमार-लता-शबाब
८.दिल-ए-बेताब को सिने से..सुमन-रफी-पालकी
९.मतवाला जिया..लता-रफी-मदर इंडिया
१०.तू मेरा चांद मैं तेरी चांदनी..सुरैय्या-श्याम-दिल्लगी
११.तारारीरारी ये सावन ऋत..रफी-सुरैय्या-दास्तान
१२.आए जवानी जाये जवानी..सुरैय्या-श्याम-कानून
नौशाद यांच्या काही गीतांच्या आधी असलेला "शेर "हे त्यांचे सौंदर्य होते,बहुधा बुजुर्ग संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्याकडे  अल्पकाळ सहायक म्हणून कार्यरत असल्याचे ते द्योतक असावे...!!!त्यांच्या "आयेगा आनेवाला" या गीताच्या आधी  असाच शेर आहे..)

१.इन्सान किसीसे दुनिया में एक बार मोहोब्बत करता है.इस दर्द को लेकर जीता है,इस दर्द को लेकर मरता है
प्यार किया तो डरना क्या...लता मुघल-ए-आझम
२.खुशी के साथ दुनिया में हजारो गम भी होते है ।
   जहाँ बजती है शहनाई वहां मातम भी होते है।
    मेरा जीवन साथी बिछड गया...तलत...बाबुल
          
३.अकेली मत जईयो राधे जमुना के तीर..ओ जी ओss
   तू गंगा की मौज मैं जमुना की धारा..रफी..बैजू बावरा
४.लागा गोरी गुजरिया से नेहा हमार
   हुई गवा सारा चौपट मोरा रोजगार
    नैन लड गयी है...रफी -गंगा जमुना
"दुलारी" हा संगीतमय चित्रपट होता."मिल मिल गाएंगे दो दिल यहां..एक तेरा एक मेरा" ...यानंतर चे "हुहू...हाहा" हे किती गोड होते."मोरे सैय्याजी उतरेंगे पार" (पिलू)आणि "ओ दूर के मुसाफिर" (पहाडी)या गीतात त्यांनी "कोरल व्हॉइस" चा वापर केला आहे..लहानपणी उस्ताद युसुफ कडून ऐकलेल्या "झम झमा झम पानी भरेरी"या दादऱ्यावरून "हमारे दिल पे ना जाना" हे गीत त्यांनी रचले.."मदर इंडिया "आणि" गंगा जमुना" मध्ये त्यांनी पुरबी ढंगाच्या लोकसंगीताचा वापर केला.."दुख भरे दिन"(मन्नाडे ,शमशाद,रफी,साथी)ही "मेघ मल्हारा"तील उत्तम समूह गीत प्रस्तुती म्हणता येईल तर त्यातीलच  "गाडीवाले गाडी धीरे हाक रे ss"मधील कोरस अप्रतिम..
खट खुट करती, छम छुम करती गाडी हमारी जाये
फर फर भागत, सब से आगे कोई पकड ना पायें
या कोरस मध्ये आपणही रंगून जातो.. त्यांनी"तन रंग लो"(कोहिनूर),"होली आई रे कन्हाई "(मदर इंडिया)सारखी होळी गीते,"छोड बाबुल का घर,आज पी के नगर"(बाबुल),"पिलू "मधील "पी के घर आज प्यारी"(मदर इंडिया )ही पारंपरिक बिदाई गीते,"इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के"(गंगा जमुना),"नन्हा मुन्हा राही हूँ"(शांती माथुर-सॅन ऑफ इंडिया),"अपनी आझादी को हम हरगीज "(रफी-लीडर)यासारखी देशभक्तीपर गीते दिली.मुघल-ए - आझम मध्ये "'तेरी मेहफिल में किस्मत आजमाकर हम भी देखेंगे"(लता-शमशाद)  ही सुंदर कव्वाली सुद्धा दिली.१९५१मधील "जादू" या चित्रपटातील त्यांची गीते "जिप्सी स्पॅनिश लोकशैली" वर आधारित होती."जब नैन मिले नैनों से" या गीतात त्यांनी "ला रा लू रा रा" हा स्पॅनिश रिदम मोठ्या कौशल्याने वापरला.."बैजू बावरा" या संगीतमय चित्रपटातील "तू गंगा की मौज में मधील "ओ जी ओsss" ही रफीनी घातलेली साद हृदयाला भिडते...पुरबी शैलीचा सुंदर वापर,भैरवीची सुरावट आणि रफीजींचा गगन भेदी काळजाला भिडणारा स्वर यांचा सुंदर संगम म्हणजे हे गीत...!!!!
"बैजू बावरा","शबाब" आणि "मुघल-ए-आझम" ही त्यांच्या संगीत कारकिर्दीतील लखलखती झुंबरे...!!!नौशादजी वर्षात फक्त एक चित्रपट करत...(केवळ वीस दिवसाची मुदत असल्याने त्यांनी "आझाद" चित्रपट सोडला होता)एक लाखाची बिदागी घेत असले तरी प्रत्येक गीताला ,त्यातील शब्द सुरांना पटकथेनुसार   पारखून त्याप्रमाणे ते  संगीत रचना करत ..म्हणूनच लताजी त्यांना "स्लोएस्ट संगीतकार" म्हणत. "मन तडपत हरी दरसन को आज"ही मालकंस रागावर आधारलेली अजरामर रचना ...!!! त्यातील कृष्ण दर्शनाची लागलेलीआस, व्याकुळ मनाची ओढ  सारेच सुंदर...! तिन्ही सप्तकात  लीलया फिरणारा स्वर ही तर रफीजींची खासियत,अफाट रेंज असलेला हा सोनेरी स्वर नौशादजींना खूप भावत असे ...  "ओ दुनिया के रखवाले ही  दरबारी रागातील रचना...!!!हा  "अकबराचा" आवडता राग मानला जातो म्हणून त्यात त्यांनी ह्या गीताची  बांधणी केली.हे गीत लिहिण्यास शकिलजींना ८ते१०दिवस लागले होते.गीताचा शेवटचा अंतरा "तार "स्वरात घेऊन जणू दु:खाची परिसीमा सूचित केली आहे.  रफी यांनी गायलेल्या या  दोन्ही भजनांनी इतिहास रचला आहे ,ती रसिकांच्या  मनावर कोरली गेली आहेत..."मेरे मेहबूब तुझे" हे मुशायऱ्यात गायलेले मोजक्या ५-६ वाद्यांच्या साथीने बहरलेले गीत(शकिलजींच्या काव्याला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.)  ,"नैन लड गयी" चा अप्रतिम ठेका ,"आज पुरानी राहो में" मधील निराशा,"सुहानी रात ढल चुकी" या पहाडीवर आधारित रचनेतील इंतजार,"मधु बन  में राधिका नाचे रे "मधील स्वर फिरत पाहिली की मन थक्क होते,ही ठेवणीतील सोलो गीते रफिजींच्याच  स्वरस्पर्शाने अमर  झाली आहेत. "मोहे भूल गये सावरीया" मधील लताजींच्या स्वरातील विरह वेदना डोळे ओलावून टाकते... "अमर" मधील "तेरे सदके बलम" हे असेच अवीट गोडीचे गीत ...यातील एका मुरकीने लतादीदींना हैराण केले होते...अखेरीस नौशादजींच्या मनाप्रमाणे ती मुरकी दिदींच्या गळ्यातून उतरली , गीत खूप गाजले...नौशाद-लता ह्या द्वयीने अनेक अवीट गोडीची गीते दिली आहेत...तेव्हाचा दिदींचा स्वर ऐकणे हाही स्वर्गीय आनंद होता..."शबाब" मधील "मन की बीन मतवारी बाजे"हे "बसंत बहार" मधील तीन तालात बांधलेले गीत म्हणजे सुरांची मेजवानीच होय...!!"जोगन बन जाऊंगी" ही "वृंदावन सारंग "मधील मिठी वेदना तर मरना 'तेरी गली में ही पहाडीतील कैफियत कशी विसरावी...??

के असिफ यांचा "मुघल-ए-आझम" हा नौशादजींच्या सांगीतिक  कारकिर्दीतील  रत्नजडित मानाचा तुरा....!!!अभिजात शास्त्रीय संगीतातील देखणेपणाची,मुघल राजवटीतील संगीताची अनुभूती त्यांच्या या अजरामर कलाकृतीतून मिळते....!!! एकेक गीत म्हणजे नौशादजींच्या संगीतातील अनमोल जड जवाहिर आहे...!!!चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक लच्छू महाराज  यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या सोहोळ्यासाठी "वाजिद अली शाह" च्या दरबारात व्हायची त्या बाजाची दादरा-ठुमरी अंगाची रचना पेश व्हावी अशी फर्माईश केली आणि नौशादजींनी १९व्या शतकातील लखनौ चे नवाब वाजीद अली यांच्या दरबारातील नर्तक "बिंदादिन महाराज" यांची प्रसिद्ध रचना "मोहे पनघट पे नंदलाल" ही "गारा" मधे  बांधली .लच्छू महाराज गहिवरले कारण ते बिंदादिन यांचे नातू होते...असिफ साहेबांच्या म्हणण्यानुसार गीतास कोरस ची साथ दिली गेली..चित्रीकरणाच्या वेळी  रोज हजेरी लावणारा एक उमदा तरुण मधुबालेच्या सौंदर्यावर मोहित झाला होता,त्याचे नाव होते "झुल्फिकार अली भुट्टो"...!!!!

मुघल वैभवाची पार्श्वभूमी असल्याने गीतेही तशीच  हवीत... सलीम अनरकलीच्या प्रेमगीतासाठी "बडे गुलाम अली खान" या संगीत सूर्याला पाचारण केले गेले आणि "मुहमांगी बिदागी"(२५०००,प्रत्येक गीतास) देऊन राजी केलेल्या बडे गुलाम अलींनी "सोहोनी" तील "प्रेम जोबन बनके सुंदरी" ही रचना अशा काही  नजाकतीने पेश केली की गीतातील रोमान्स त्यांच्या मृदू तानांनी बहरला...!!!!या गीताने खुश झालेल्या असिफ आणि नौशाद यांनी "शुभ दिन आयो राजदुलारा"(रागेश्री)हे तानसेनच्या तोंडी असलेले गीतही त्यांच्याकडून गाऊन घेतले.."मोहोब्बत की झूठी कहानी पे रोये" सारखे विरहगीत,"बेकस पे करम किजिये "सारखी अल्लाला साकडे घालणारी "नात(परमेश्वराला साकडे घालण्यासाठी म्हटलेले गीत,याला उर्दू भाषेत "नात" म्हणतात)"ए मोहोब्बत झिंदाबाद" हे रफीचे गीत अशी एकापेक्षा एक बहारदार गीते यात होती..
पण अनारकली भर दरबारात अकबरापुढे आपल्या प्रेमाची कबुली देते हा होता चित्रपटाचा उत्कर्ष बिंदू...आणि त्यासाठी नौशादजी आणि शकील मावळत्या सूर्याच्या साक्षीने बसले ,पण काही केल्या मनासारखे गीत जमेना.शेवटी नौशाद यांना बालपणी पुरबी भाषेत ऐकलेल्या एक गीताचा मुखडा आठवला.."प्रेम किया का चोरी चोरी" आणि शकिलजींना शब्द गवसले ,"प्यार किया तो डरना क्या..."उगवत्याने भास्कराने वरदान दिले होते... एक इतिहास प्रसिद्ध गीत साकारले होते ...शेवटचा अंतराही शकिलजींनी अकबर बादशहाचा आब राखत उत्तम रचला आहे...(आज कहेंगे दिल का फ़साना जान भी ले ले चाहे जमाना )..यातील एको इफेक्ट्स साठी एक माईक बाथरूम मध्ये ठेवला होता आणि या गाण्यात पुन्हा पुन्हा येणारे तुकडे त्यांनी दोन वेळा रेकॉर्ड केले,लताजींच्या आणि कोरसच्या आणि मग त्यांचे मिक्सिंग केले ...चित्रपट खूप गाजला ,याच्या रौप्यमहोत्सवी आणखी  एका गीताचा समावेश करण्यात आला ,"हमे काश तुमसे मोहोब्बत ना होती"आणि सुवर्ण महोत्सव झाल्यावर  असिफने "ये इष्क ये दुनियावाले,सब बेकार की बाते है" हे गीत घातले...

"भारतीयत्व" हे नौशादांच्या संगीताचे मर्म होते...गहन राग अवघ्या तीन मिनिटातील गीतात नावाजलेल्या शास्त्रीय गायकांकडून त्यांनी  सुलभ रित्या गाऊन घेतला...(बैजू आणि तानसेनसाठी डी व्ही पलुस्कर आणि अमीर खान)आपल्या संगीतातील हुनर ने त्यांनी संगीत दिग्दर्शकासही नायक ,दिग्दर्शक यांच्या तोडीची प्रतिष्ठामिळवूनदिली.खंजिरी,तबला,ढोलक,व्हायोलिन
क्लेरोनेट,अलगद बहरणारा पियानो,बासरी ,सतार या वाद्यांच्या साथीने त्यांनी अवघे संगीत फुलवले... शास्त्रीय संगीतांच्या पायावर लोकसंगीताचा सुगंध लेवून त्यांच्या रचना साकारत...पण कालांतराने हे त्यांचे  संगीत साचेबद्ध,एकसुरी वाटू लागले...लगन मोरे मन की(बाबुल),उलझ गया जिया मोरा(जादू),जोगन बन जाऊंगी (शबाब),घुंघट नहीं खोलुंगी(मदार इंडिया)यातील एकसुरीपणा नजरेत येऊ लागला"जादू" आणि "साथी "या चित्रपटाच्या संगीतात त्यांनी  शास्त्रीय संगीताची चाकोरी सोडली आणि पाश्चिमात्य ढंग घेतला ,पण ते त्यांना पटले नव्हते..."साथी"  चे  दिग्दर्शक श्रीधर यांच्या मागणीनुसार त्यांनी पाश्चिमात्य संगीत दिले खरे ,पण याबाबत त्यांचे मत विचारले असता ते म्हणाले..

       दिल रोता है तो रोने दे
        गम सहता है तो सहने दो
        छिड जायेंगें फिर लाखो किस्से
        ये बात यही तक रहने दो

तरीही नौशादजींनी जो मधुर गीतांचा खजिना रसिकांना दिलाय ना ,तो अविस्मरणीयच आहे..लतादीदी आणि नौशादजी असा अल्बम केला तर काळीज दुभंगून टाकणाऱ्या कित्येक संगमरावरी रचना मिळतील...

१.ए दिल तुझे कसम है..दुलारी
२.दो हंसो का जोडा...गंगा जमना
३.जानेवाले से मुलाकात..अमर
४.बेकस पे करम..मुघल-ए-आझम
५.मरना तेरी गली में ..शबाब
६.उठाये जा उनके सितम..अंदाज
७.तोड दिया दिल मेरा... अंदाज(नूरजहाँ स्टाईल)
८.फिर 'तेरी कहानी याद आई..दिल दिया दर्द लिया
९.ना मिलता गम तो बरबादी... अमर
१०.ना शिकवा है ना कोई गिला..अमर

एस यु सनी यांच्या सहकार्याने नौशाद यांनी "उडनखटोला","पालकी" सारखे चित्रपट निर्मिले.शबाब,मेला,बाबुल,दीदार,पालकी ,साज और आवाज यांचे कथानक त्यांचे होते."हम तुझसे बिछडकर सावरीया" या "दिल दिया ,दर्द लिया" मधील गीतात सर्दी झाल्याने लताजींचा स्वर अधिक अनुनासिक येऊ लागला,तेव्हा त्यांनी गीताचा मुखडा लगेच बदलला आणि फिर 'तेरी कहानी याद आई या गीताचा जन्म झाला.(मुखडा त्यांचा होता ,बाकी गीत शकील यांनी लिहिले.)शास्त्रोक्त संगीताचा बाऊ करणाऱ्या रसिकांना त्यांनी ते सुलभ करून ऐकवले आणि विविध रागांची ओळख करून दिली.)आणि भारतीय अभिजात संगीताचा अनमोल ठेवा जतन केला. "आन" या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम १००वादकांचा ताफा वापरला... त्याचे बॅक ग्राउंड म्युझिक त्यांनी लंडन मधेच रेकॉर्ड केले.."आन" चा प्रीमियर मोठ्या धामधुमीत लंडनच्या रियालटो थिएटर मध्ये झाला होता."आन" मुळे प्रथमच भारतीय चित्रपटांना पाश्चात्य बाजारपेठेत स्थान मिळाले..
झुळझुळ वाहणारे झरे,सागर लहरींची गर्जना,वाऱ्याचा घोंघाट ,पक्षांची किलबिल या साऱ्यात नौशादजींना संगीत ऐकू येई...त्यांच्या संगीतात सुकून होता,मेलडी होती,ठेका होता...!!!"संगीत" ही त्यांची ईबादत होती...साधना होती...त्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले...आपल्या सूर साधनेने त्यांना यशाच्या अत्युच्च शिखरावर नेले पण  त्यांचे पाय मात्र नेहमीच जमिनीवर स्थिर राहिले...एक सच्चा संगीताचा पुजारी...आपल्या सृजनाचा मिडास टच त्याने संगीताला दिला आणि  "चालीस करोड में एक नौशाद" हे बिरुद खऱ्या अर्थाने सिद्ध केले...आजही "दूर कोई गाए" च्या सुरांनी मन हरखून जाते ...."जवा है मोहोब्बत" म्हणत आनंद  लहरींवर झुलते... एका संगीत सम्राटाने उभारलेला हा सुरांचा ताजमहाल थक्क करुन टाकतो...त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते...

गुंजते हैं तेरे संगीतसे अमिरों के महल
झोपडों में भी गरिबो के तेरा संगीत है
अपनी मौसिकी पे सब को फ़क्र होता है मगर
आज मौसिकी को तुझपर नाज है...!!!

*लेखिका-कै.मानसी पटवर्धन.*

Wednesday, December 11, 2019

दिलीप कुमार । खुशवंत सिंग कोहली

दिलीपसाब
कुलवंतसिंग कोहली

आपल्या महाविद्यालयीन जीवनाविषयी बोलता बोलता दिलीपसाब अचानक थांबले. आठवण होती बेचाळीसच्या लढय़ातल्या त्यांच्या सहभागाविषयीची. शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहून ते एका मोर्चात सहभागी झाले होते, लाठीमारही खाल्ला होता. पण त्याविषयी बोलता बोलता ते गप्प झाले. खोदून खोदून विचारल्यावर ते एवढंच म्हणाले, ‘‘आपल्या देशाकरता आणि आईकरता आपण काय केलं हे कधी सांगू नये.’’

आज १ एप्रिल. आजची तारीख जगभरात मस्तपकी ‘सेलिब्रेट’ केली जाते. कोणी ना कोणी, कोणाला ना कोणाला तरी गंडवत असतो, फिरकी घेत असतो आणि मजा लुटत असतो. वर्तमानपत्रांत विशेष सदरं असतात, टीव्ही वाहिन्यांवर मस्ती चालू असते. मीही ते मनसोक्त एन्जॉय करत असतो. फक्त कोणाची फिरकी कधी घेत नाही! दुसऱ्यांच्या आनंदात मी आनंद मानत राहतो. त्यांची मस्ती पाहात राहतो. धमाल चाललेली बघून बरं वाटतं.

तसा मी अंतर्मुख, कुटुंबवत्सल माणूस आहे. आम्ही सारे सण साजरे करतो- आम्हा पंजाबी मंडळींचे आणि आपल्या मुंबईतलेसुद्धा! काही दिवसांतच सुरू होणारी बसाखी आणि नुकताच झालेला गुढीपाडवासुद्धा! प्रत्येक सणाचं महत्त्व आपल्या घरातल्या लहानांना समजावून देणं हे मला आद्य कर्तव्य वाटतं. जी माणसं आपल्या परंपरा विसरतात ती उत्तम भविष्यापासून वंचित राहतात, अशी माझी धारणा आहे. जे आपल्या कुटुंबाला वेळ देत नाहीत, त्यांना कुटुंब करण्याचा हक्क नाही. तुमच्या दिवसभरातल्या काही क्षणांवर तुमच्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क असतो, तो त्यांना द्यायला हवा.

माझी टोनी, गोगी, डॉली ही मुलं लहान असताना त्यांना घेऊन मी शिवाजी पार्कवर, समुद्रावर जात असे. ती मुलं पुळणीवर खेळत असत. मी व पत्नी बाजूला बसून मुलांना खेळताना पाहात असू. त्या विशाल पश्चिम समुद्राकडे पाहताना कित्येकदा माझ्या मनात विचार येई- कुठे होतो अन् कुठे आलो? डोंगरदऱ्या, सकस जमीन, बारमाही नद्यांच्या प्रदेशातून आलेल्या माझ्यासारख्या लहानग्याचं रोपटं उद्योगक्षम मुंबईत लावलं गेलं आणि ते सहजपणे रुजलंही. त्याचं कारण सर्वसमावेशक महाराष्ट्रभूमी! या भूमीनं खूप काही दिलंय. जगायला तर दिलंच, परंतु त्याबरोबर ते जगणं समृद्ध करणारी माणसंही दिली.

मला नेहमी वाटतं, आपल्या देशाला तीन व्यसनं आहेत- चित्रपट, क्रिकेट आणि गाणी! त्यातल्या चित्रपटांनी तर भारतीय मनाला पार वेडं करून सोडलंय. चंदेरी दुनियेतले सितारे लोकांना नेहमीच दुष्प्राप्य असतात, ते सितारे माझ्या आयुष्यात सहजपणे आपल्या पायांनी चालत आले. ज्यांनी भारतीय चित्रपट कलेला घडवलं ते कपूर परिवार, व्ही. शांताराम परिवार, चोप्रा परिवार, कारदार परिवार.. या परिवारांतली माणसं माझ्या जगण्याचा एक भाग बनली. परंतु मुलांना घेऊन दादर चौपाटीवर गेलं, की मनातल्या मनात मी अरबी समुद्राला सांगायचो, ‘भई, ये सब तो अपने दोस्त बन गये लेकीन तो अजब कलाकार अजून आपल्यापासून दूरच राहिलाय..’ तो कलाकार म्हणजे- दिलीपकुमार! त्यांच्या संवेदनशील अभिनयानं साऱ्या भारतीय मनावर गारुड केलंय. त्यांनी त्यांचा खाली झुकलेला चेहरा जरासा वर केला, डोळे किलकिले करून पाहिलं, उजव्या हाताच्या अंगठय़ानं कपाळावर जरासं चाचपडलं की जगातलं सारं दु:ख, जगातली सारी वेदना तिथं पाझरायला लागते. असा हा प्रतिभावान अभिनेता चित्रपटांत भेटतो, परंतु आपल्याला अजून भेटायचा आहे, याची रुखरुख मनात होती.

आणि एके दिवशी अरबी समुद्राच्या साक्षीनं ते मला भेटले! १९५५ चा सुमार असेल. मरीन ड्राइव्हवर अनेक जिमखाने आहेत, त्यांपकी एका जिमखान्यावर कोणत्या तरी कौन्स्युलेटने एक पार्टी ठेवली होती. अनेक निमंत्रितांपकी मी एक होतो व दिलीपकुमारही. पार्टी संपता संपता मी निघालो आणि दिलीपकुमार समोरून आले- ‘‘अरे कुलवंत, कसा आहेस? तुझ्याबद्दल, ‘प्रीतम’बद्दल बरंच ऐकून होतो. ‘प्रीतम’चं जेवणही जेवलोय, पण ते बनवणारा आज पहिल्यांदा भेटतोय. वैसे तो अपना खाने का रिश्ता हैही!’’ असं म्हणत ते हसले, त्यांनी मला छानशी मिठी मारली, पाठीवर थोपटलं आणि म्हणाले, ‘‘चलो मेरे साथ.’’ मी त्यांच्या मर्सिडिजमध्ये बसलो. काही क्षणानंतर स्थिरावलो. ज्यांना भेटायची उत्सुकता होती ते दिलीपकुमार साक्षात समोर होते! आम्ही गप्पा मारत होतो. मला म्हणाले, ‘‘कुलवंत, सारखं दिलीपसाब दिलीपसाब काय करतोस? आपण एका भागातले आहोत. मला युसूफ म्हणून हाक मार!’’ मी कसाबसा म्हणालो, ‘‘दिलीपसाब, तुम्ही माझ्यासमोर सर्वार्थाने मोठे आहात. तुम्हाला युसूफ कसं म्हणू? दिलीपसाबच ठीक आहे.’’ त्यांनी ‘समजलं’ अशा अर्थानं मान हलवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एवढे बारीकसारीक तपशील इतक्या वर्षांनंतरही माझ्या लक्षात कसे राहतात? आपण आपलं जगणं भरभरून जगलो व महत्त्वाच्या क्षणी मन जागं ठेवलं, तर सारं काही लक्षात राहत. इथे तर खुद्द ‘दिलीपकुमार’ होते!

त्यानंतर मात्र दिलीपसाब व माझ्या दोस्तीचा सिलसिला सुरू झाला. मी अंतर्मुख व तेही अंतर्मुख. आम्ही दोघंही कमी बोलणारे. एकमेकांची पर्सनल स्पेस सोडून आम्ही आमचं नातं जपलं. दिलीपसाब हे टिपिकल फिल्मी नव्हते. त्यांना पाटर्य़ाना जाणं आवडत नसे. फार मोजक्या ठिकाणी ते जात. आमच्याकडच्या डिनर पार्टीनाही ते क्वचित येत. एकदा मी त्यांना याविषयी विचारलं तर ते म्हणाले, ‘‘रात्रीची अशी जागरणं तुमच्यातल्या अभिनेत्याला झोपवतात. पार्टी अ‍ॅनिमल बनण्यापेक्षा मला रुपेरी पडदा जास्त महत्त्वाचा वाटतो.’’ महान अभिनेता बनल्यावरही दिलीपसाब या पद्धतीनं विचार करतात, हे पाहून मला एक धडा मिळाला.

दिलीपसाब व आमच्या गप्पा वेगवेगळ्या विषयांवर चालत असत. अर्थात, तेव्हाच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आम्ही कधीच बोलत नसू. तसे ते गंभीर प्रकृतीचे होते. ते ज्या प्रकारच्या भूमिका करत असत, त्या भूमिका ते प्रत्यक्षात मनात वागवून जगत असत. अनेक ट्रॅजिक भूमिका केल्यानंतर ते एकदा मला म्हणाले, ‘‘यार, इन सब चीजोंने मुझे पुरी तरहसे थकाया है। अब मैं ब्रेक लेता हूँ।’’ दिलीपसाब फार कमी चित्रपट करायचे. वर्षांला एक किंवा दोन. मी त्यांना त्याविषयी विचारलं तर म्हणाले, ‘‘कुलवंत, काम थोडंच करा, पण असं करा की जग लक्षात ठेवेल. मी जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा ती शंभर टक्के नाही तर दीडशे टक्के देऊन करतो.’’ मला ते पटलं.

ते बालपणीच्या आठवणींत कधी कधी हरवून जात. ते त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. तिच्या अवतीभवती घुटमळायचे. अशीच एक आठवण त्यांनी सांगितलेली : ते एका जागी कधी स्थिर नसत. अनपेक्षित असं काही तरी करत. पेशावरला असताना एकदा थंडीच्या दिवसांत त्यांनी घराजवळ असलेल्या व गोठून गेलेल्या तळ्यातल्या बर्फाळ पाण्यानं तोंड धुतलं. त्यामुळे सारं तोंड रक्ताळलं. छोटा युसूफ आईकडे गेला. तिनं बदामाचं तेल लावलं. हळूहळू तो बरा झाला. दिलीपसाहेबांनी हळवेपणानं ही आठवण सांगितली होती.

त्यांच्या बालपणीचा काळ अतिशय धामधुमीचा होता. स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. पेशावरच्या बाजारात पोलिसांनी जमावावर अचानक गोळीबार केला. लहानगा युसूफ बाजारात फिरत होता. घाबरून तो रडायला लागला व जमिनीवर आडवा पडला. थोडय़ा वेळाने सर्व शांत झाल्यावर तो उठला. उठताना त्याच्या लक्षात आलं, की ज्याच्या अंगावर तो हात टाकून आडवा झाला होता ते गोळीबारात मृत्यू पावलेलं एक प्रेत होतं. त्यानंतर अनेक रात्री तो दचकून जागा होत असे.. एकदा लहानग्या युसूफला बाजारात दूध आणायला पाठवलं होतं. तिथं एक पिसाळलेला कुत्रा त्याच्या मागे लागला. कुत्र्याने त्याच्या पायाचे लचके तोडले. त्या लचक्यांचे व्रण कायम राहिले होते.

आपल्या महाविद्यालयीन जीवनाविषयी बोलता बोलता दिलीपसाब अचानक थांबले. ती आठवण होती बेचाळीसच्या लढय़ातल्या त्यांच्या सहभागाविषयीची. शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहून ते एका मोर्चात सहभागी झाले होते, लाठीमारही खाल्ला होता. पण त्याविषयी बोलता बोलता ते गप्प झाले. खोदून खोदून विचारल्यावर ते एवढंच म्हणाले, ‘‘आपल्या देशाकरता आणि आईकरता आपण काय केलं हे कधी सांगू नये.’’

एकदा दिलीपकुमार यांचा वाढदिवस होता. मी काही मित्रांना घेऊन त्यांच्याकडे गेलो. हातात सुंदर पुष्पगुच्छ होता. त्यांच्या खोलीत दिलीपसाब एकटेच होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सारी भावंडं घरात गोळा झालेली होती. आनंदी वातावरण होतं. पुष्पगुच्छ दिल्यावर काही वेळानं हसून म्हणाले, ‘‘मुझे और थोडा बुढा क्यूँ बनाते हो भाई?’’ ते त्यांच्याच विचारात मग्न होते. काही क्षण शांततेचे गेल्यावर, मग एकदम खळखळून हसून त्यांनी जोरात कोणाला तरी हाक मारली, ‘‘अरे, माझ्या मित्रांसाठी मिठाई आणा. आम्हाला मजा करू दे.’’ नंतरचे धमाल करणारे दिलीपसाब काही वेगळेच होते!

मी पंजाब असोसिएशनचं काम करायचो. प्राणसाहेब आमचे आधारस्तंभ होते. एकदा मी दिलीपसाबना पाहुणे म्हणून याल का, असं विचारलं. ते लगेच तयार झाले. त्यांनी त्या वर्षीच्या आमच्या संमेलनात अस्खलित पेशावरी पंजाबीमध्ये भाषण करून सगळ्यांना खूश करून टाकलं. सर्वाना भेटले, फोटो काढून दिले. आपल्या जन्मभूमीशी नाळ जोडण्याची ती संधी त्यांनी साधली.

एक गमतीदार आठवण. ‘प्रीतम’मध्ये एक नौजवान पंजाबी गायक उतरला होता. तो भारतीय नागरिक नव्हता. बर्मिगहॅमला राहत असे. त्याचं नाव मलकित सिंग. ‘तुतक तुतक तुतीया आय लव्ह यू’ या त्याच्या गाण्यानं तेव्हा सर्वत्र लोकप्रियता मिळवली होती. माझ्या एका कर्मचाऱ्यानं तो आपल्या इथं राहिलाय असं सांगितलं. मी त्याच्या रूममध्ये फोन करून, ‘‘मला तुम्हाला भेटायचंय,’’ असं म्हणालो. तर तोच मला म्हणाला, ‘‘तुम्ही येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो.’’ तो माझ्याकडे आला. मला वाटलं होतं, की तो चाळिशीचा असेल. परंतु तो जेमतेम सव्वीस वर्षांचा तरणाबांड जवान होता. मला परीपौना केलं. मग गप्पा मारत बसला. बोलता बोलता मला म्हणाला, ‘‘पापाजी, मी तीन दिवसांनी बर्मिगहॅमला जाणार आहे. मला दिलीपकुमार साहेबांना भेटायची इच्छा आहे.’’ मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. ही इच्छा पुरी करण्याचा आपण प्रयत्न करू या.’’ त्याचा विश्वास बसेना. मी लगेच दिलीपसाबना फोन केला. त्यांना मलकित सिंगबद्दल सांगितलं व त्याची इच्छाही सांगितली. त्याला घेऊन घरी येऊ का म्हणून विचारलं. दिलीपसाब म्हणाले, ‘‘क्यूँ भई, मंही आता हूँ उसे मिलने। मी त्याचं गाणं नेहमी ऐकतो. त्याला विचार, मला काही गाणी ऐकवशील का?’’ मलकित सिंग एका पायावर तयार झाला.

ज्या पहाटेच्या विमानानं मलकीत सिंग परत जाणार होता, त्या रात्री नऊ वाजता मी एक छोटीशी पार्टी आयोजित केली. प्राणसाहेब, कपूर परिवार, चोप्रा परिवार, रामानंद सागर परिवार अशा काही जवळच्यांना निमंत्रण दिलं. दिलीपसाब एकटेच येणार होते. रात्री साडेआठ वाजताच मलकित सिंग तयार होऊन खाली आला होता. पांढरे कपडे व पांढरंच जाकीट त्यानं घातलेलं. सारखं मला विचारत होता, ‘‘दिलीपसाब येणार आहेत ना नक्की?’’ साधारण पावणे दहाच्या सुमारास दिलीपसाब आले. त्यांना पाहून मलकित सिंगचा चेहराच बदलला. देव पाहिल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सुरुवातीला मी दोन नवोदित गायकांना गाण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. दिलीपसाब आल्यानंतर दहाच्या सुमारास मलकित सिंगनं गायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक सगळ्या थाटाची गाणी गात त्यानं सर्वाना धुंद करून सोडलं. मौजेची गोष्ट ही की, स्वत: दिलीपसाब त्याच्याबरोबर गात होते, नाचत होते. दिलीपसाबनी चित्रपटांत गाणी गायली आहेत हे मला माहिती होतं, परंतु त्यांची गाण्याची समज व माहिती पाहून आश्चर्य वाटलं. अखेरीस गीत-संगीतानं रंगलेली ती रात्र विमानाची आठवण झाल्यानं संपली. रात्री तब्बल दीड वाजता सर्वानी जेवण केलं. मलकित सिंगचं सामान मी आधीच एका कारने पुढे पाठवून त्याचं चेक इन करून ठेवलं होतं. पहाटे साडेचारची फ्लाइट पकडायला मलकित सिंग कसाबसा पोचला. त्यानंतर त्याचे व माझे ऋणानुबंध असे काही जुळले की जणू आमचं नातं देवानं घडवून पाठवलंय. परंतु आमच्यातला समान धागा म्हणजे- दिलीपसाब!

अलीकडे दिलीपसाहेबांची तब्येत बरी नसते. मी अनेक वर्षांत त्यांना भेटलो नाहीये. पण त्यानं काही बिघडत नाही. देवाला रोज थोडंच भेटायचं असतं, तो तर मनात असतो!

ksk@pritamhotels.com