Friday, November 6, 2020

संजीव कुमार

**रुपेरी प्रासंगिक-अभिनेता संजीव कुमार स्मृतिदिन** 
-----------------------

'संजीव कुमार' ...अभिनय सम्राटाचे पुरस्कार प्राप्त/नामांकित चित्रपट

-----------------------

 
त्याने अभिनयाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली तेंव्हा ४८ वर्षांचा होता... त्याच्या अभिनय कारकिर्दीचे वय अवघे २५ वर्षांचे होते आणि छोटे-मोठे मिळालेले सन्मान ३० च्या वर! यावरून सिद्ध होते की 'हरीहर जेठालाल जरीवाला' ... पक्का गुजराती होता. कसे? अल्पावधीतच ज्यादा मुनाफा कसा कमवावा हे टिपिकल गुज्जू व्यापारी धोरण त्यालाही जमलेच की ! भलेही ते अभिनयाच्या क्षेत्रात का असेना आणि त्यात त्याच्या चतुरस्त्र अभिनयाची गुंतवणूक का असेना! हिंदी सिनेमाच्या इतिहासात इतक्या कमी वर्षांमध्ये इतक्या वैविध्यपूर्ण व दर्जेदार भूमिका करणारा आणि त्यासाठी इतके सन्मान मिळविणारा दुसरा अभिनेता असल्याची नोंद नाही. मग झालाच कि 'कम समय में बडा मुनाफा!!' शिवाय हे जग सोडून ३५ वर्षे झाली तरी त्याच्या चाहत्यांच्या हृदयात त्याची जागा घेणारा अजूनही कोणी 'माय का लाल' अभिनेता होऊ शकला नाही. याला म्हणतात पक्का गुज्जू!! संजीव कुमार. १९६० ते १९८५.. केवळ २५ वर्षांसाठी का होईना पण हिंदी सिनेमाला मिळालेले एक अनमोल रत्न. आज त्यांचा स्मृतिदिन. तसे तर त्याचा प्रत्येक चित्रपट अविस्मरणीय होता परंतु आज या लेखात केवळ त्याला नामांकन अथवा पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचा आढावा आपण घेणार आहोत.
-----------------------

 
१९६० साली 'हम हिंदुस्तानी' द्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या 'हरिभाई जरीवाला' उर्फ 'संजीव कुमार' यांना आपला पहिला पुरस्कार मिळविण्यासाठी ८ वर्षे वाट पाहावी लागली. 'परदे में रहने दो, परदा ना उठाओ' या गाण्यासाठी गाजलेला रहस्यपट 'शिकार' (१९६८) हा तो चित्रपट. यात संजीव कुमार यांनी खुनाचा शोध घेणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर राय ची भूमिका साकारली ज्यासाठी त्यांना त्यांच्या करिअरचे पहिले उत्कृष्ट सहनायकाचे फिल्मफेअर मिळाले. 'शिकार' ही निर्माता-दिग्दर्शक आत्मा राम पदुकोण (गुरु दत्त यांचे लहान भाऊ) यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेली कलाकृती होती.

 १९७० हे साल संजीव यांच्यासाठी डबल बोनान्झा घेऊन आले. एक 'खिलोना' आणि दुसरा 'दस्तक'. 'खिलोना' हे एल.व्ही प्रसाद या दाक्षिणात्य बॅनरची निर्मिती व त्यांच्याच 'पुनर्जन्म' या तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. आपल्या प्रेयसीच्या आत्महत्येने वेडा झालेला, श्रीमंत ठाकूर चा मुलगा विजय .. ही ती भूमिका ज्यामुळे संजीव कुमार या  सिनेसृष्टीत सर्वप्रथम मानाचे स्थान मिळवून दिले. संजीव यांनी या भूमिकेत अशी काही जान ओतली कि बस्स! संजीव कुमार कडून बेस्ट परफॉर्मन्स काढून घेण्याचे श्रेय दिग्दर्शक चंदर वोहरा यांना सुद्धा तितकेच जाते. संजीव यांना या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे फिल्मफेअर नामांकन मिळाले. अवॉर्ड मिळाले राजेश खन्ना यांना 'सच्चा झूठा' साठी! याच साली आलेला राजेंदर सिंग बेदी यांचा 'दस्तक' हा त्याकाळातील समांतर सिनेमा सारखा प्रयोग होता. मदन मोहन यांनी दिलेले सुश्राव्य संगीत ही दस्तकची आणखी एक जमेची बाजू होय. 'बैयाँ ना धरो ओ बलमा', 'माई री मैं कासे कहूँ', 'हम है मता-ओ-कुचा ओ बाजार की तरह' यासारख्या अजरामर गीतांसोबतच संजीव कुमार व रेहाना सुल्तान या जोडीचा अभिनय सुद्धा अगदी जमून आला होता. एक सुसंस्कृत व नवविवाहित मुस्लिम जोडपे, मजबुरीने म्हणा, मुंबईत एक अशा घरात राहायला येते जिथे आधी एक प्रसिद्ध मुजरेवाली राहत होती. यातून सातत्याने त्यांच्या दारावर नाही त्या आशिकांची 'दस्तक' व त्यामुळे होणारी या जोडप्याची कुचंबणा राजेंदर सिंग बेदींनी दाखविली होती. 'दस्तक' मधील सरकारी ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा 'हामीद' या भूमिकेने संजीव यांना त्यांच्या करिअरचा पहिला राष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. 'दस्तक' ला एकूण चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यात संजीव सोबत अभिनेत्री रेहाना सुलतान, संगीतकार मदन मोहन व उत्कृष्ट छायाचित्रणासाठी कमल बोस हे इतर तिघे. 

सतत आपल्या हटके प्रयोगांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक गुलजार यांनी १९७२ साली मूक-बधिरांच्या आयुष्यावर व्यावसायिक सिनेमा बनविण्याची मोठी जोखीम घेण्याचे जेंव्हा ठरविले, तेंव्हा कथेच्या नायकाच्या भूमिकेसाठी संजीव कुमार शिवाय इतर कोणताही अभिनेता त्यांच्या डोक्यात नव्हता. चित्रपट 'कोशीश'. असला सिनेमा बनविण्याची 'कोशीश' अथवा हिम्मत याआधी कुठल्या दिग्दर्शकाने दाखविली नव्हती. कारण नायक-नायिका दोघेही बोलत नाहीत याला व्यावसायिक सिनेमात आत्महत्या म्हणतात. १९६१ सालच्या एका जापानी चित्रपटावरून प्रेरित होऊन गुलजार यांनी 'कोशीश' बनवला ... प्रदर्शित केला ... आणि यशस्वीसुद्धा करून दाखविला. गुलजार यांना उत्कृष्ट पटकथेसाठी तर संजीव यांना हरिचरण या मुक्या-बहिऱ्या नायकाच्या भूमिकेसाठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व फिल्मफेअर नामांकनही. योगायोग असा कि ज्या दोन चित्रपटांसाठी संजीव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, म्हणजे 'दस्तक' व 'कोशीश', या दोन्हीचे संगीतकार मदन मोहन होते. 

'खिलोना' आणि 'कोशीश' या दोन्हीच्या वेळी नामांकन मिळवूनही फिल्मफेअर पुरस्काराची संधी हुकलेल्या संजीव यांनी अखेर १९७५ साली उत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पटकावलाच. यासाठी त्यांना स्पर्धा द्यावी लागली होती आणखी एका संजीव कुमारशी म्हणजे स्वतःशीच! स्पर्धेतला दुसरा संजीव होता 'शोले' मधील ठाकूर बलदेव सिंग ... आणि त्याला हरवून जिंकलेला संजीव होता 'आंधी' मधील हॉटेल मॅनेजर जे.के. या वर्षी फिल्मफेअरसाठी या दोन संजीव शिवाय अमिताभ बच्चन चा 'दिवार' मधील विजय, 'संन्यासी' मनोज कुमार व 'अमानुष' उत्तम कुमार हे इतर स्पर्धक होते. एका साध्या, सुसंस्कृत, सुस्वभावी, हळव्या अशा हॉटेल मॅनेजरने या पुरस्काराच्या स्पर्धेत, चक्क खुंखार डाकू गब्बर सिंगला हरविणाऱ्या रामगढच्या ठाकूरला हरवले होते. 'आंधी' मधील संजीव यांनी साकारलेला संयमी जे.के. आजही रसिकांच्या हृदयाजवळ आहे तर नामांकन मिळविणाऱ्या 'शोले' च्या ठाकूरने हिंदी सिनेसृष्टीत काय इतिहास घडविला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

'कोशीश' आणि 'आंधी' नंतर 'गुलजार-संजीव कुमार' या जोडीने तिसऱ्यांदा फिल्मफेअर नामांकन मिळविले ते 'मौसम' साठी. पुन्हा एकदा संगीतकार मदन मोहन यांच्या संगीतावर 'दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन...' गात आपल्या प्रेयसीच्या शोधात असलेल्या डॉक्टर अमरनाथ या भूमिकेने संजीव यांना फिल्मफेअर नामांकन तर मिळवून दिले पण त्यावर्षी बाजी मारली 'अर्जुन पंडित' मधील संजीव कुमारने!! म्हणजे १९७५ नंतर सलग दुसऱ्या वर्षी, १९७६ साली, असे घडले कि एका संजीव कुमारने, दुसऱ्या संजीव कुमारला हरवत फिल्मफेअर पटकावले. मनुष्याने नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी या सुविचाराला तंतोतंत खरे ठरविणारा महान अभिनेता. 'अर्जुन पंडित' ही ह्रिषीकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेली सुंदर कलाकृती होती व त्यात संजीव यांनी जबरदस्त अभिनय केला होता.

 
एका संजीव कुमारने दुसऱ्या संजीव कुमार ला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये टक्कर देण्याची १९७५ मध्ये सुरुवात झाली. १९७६ नंतर, ७७ व ७८ मध्येही हेच सुरु राहिले. १९७७ ला सुद्धा संजीव यांना दोन भूमिकांसाठी नामांकन मिळालं. उत्कृष्ट अभिनेत्याच्या बाजी जरी 'अमर अकबर अंथोनी'च्या अमिताभने मारली होती परंतु त्याला दोन संजीव कुमारांना पार करून जावे लागले होते. 'जिंदगी' व 'यही है जिंदगी' हे ते दोन चित्रपट. २००३ सालचा अमिताभ यांचा 'बागबान' म्हणजेच संजीव यांचा १९७६ चा 'जिंदगी'. 'मेक वे फॉर टुमारो' या हॉलीवूडपटावरून घेतलेली कथा. स्वतःचा व पत्नीचा आत्मसन्मान जपून स्वाभिमानाने राहणाऱ्या पित्याच्या भूमिकेत संजीव यांनी नेहमीप्रमाणेच जान ओतली होती. रवी टंडन यांचे दिग्दर्शनही प्रभावी होते. 'यही है जिंदगी'  हा 'कलियुग कन्नन' या तामिळ सिनेमाचा के.एस. सेथुमाधवन दिग्दर्शित चित्रपट होता ज्यात आनंद नारायण हे पात्र संजीव यांनी रंगविले होते. कथेत या पात्राचा थेट भगवान श्रीकृष्णाशी संवाद होत असतो. दाक्षिणात्य स्टाईलची निर्मिती होती. योगायोगाने 'जिंदगी' व 'यही है जिंदगी' दोन्हीला राजेश रोशन यांचे संगीत होते. संजीव यांनी या दोन्ही भूमिकांचे सोने केले होते. 

१९७८ साली आलेल्या 'देवता' व 'पती पत्नी और वह' या दोन्ही सिनेमांनी पुन्हा एकदा संजीव यांना फिल्मफेअरची दोन नामांकनं मिळवून दिली. परत एकवार स्पर्धा अँग्री यंग मॅन अमिताभशी होती. एक नाही तर तीन अमिताभ यांच्याशी. मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल व डॉन मधील अमिताभ विरुद्ध वरील दोन संजीव कुमार यात 'डॉन' मधल्या अमिताभने बाजी मारली. 'देवता' मध्ये संजीव हे आपल्या मुलीसाठी जीवन जगणाऱ्या प्रेमळ पित्याच्या भूमिकेत होते. बी.आर. चोप्रा यांच्या 'पती पत्नी और वह' मधील त्यांनी साकारलेला विवाहित रणजीत चड्ढा हा आपल्या ऑफिसमधील सेक्रेटरीच्या मागे लागलेला असतो. याचवर्षी यश चोप्रा यांच्या 'त्रिशूल' मधील आर.के. गुप्ता या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर नामांकन मिळालं होतं. मात्र ते अवॉर्ड नेले सईद जाफरी यांनी .. 'शतरंज के खिलाडी' साठी. 

१९८२ साली 'गुलजार-संजीव कुमार' या दिग्दर्शक-अभिनेता जोडीने परत एकवार आपली जादू चालवली. त्या जादूचे नाव होते 'अंगूर'. यातील संजीव (व देवेन वर्मा) यांची दुहेरी भूमिका आणि त्यांचा अभिनय हा त्यांच्या करिअरमधील 'वन ऑफ दि बेस्ट' मध्ये गणला जातो. असे असूनही फिल्मफेअर नामांकन मिळालं पण दमदार दावेदार असूनही पुरस्कार नाही मिळाला. का? कारण स्पर्धा खूपच तगडी होती. स्पर्धेत तीन अमिताभ (बेमिसाल, नमक हलाल व शक्ती), एक नासिरुद्दीन शाह (बाजार), एक ऋषी कपूर (प्रेम रोग) व एक होता अभिनय सम्राट दिलीप कुमार ... ज्याने पुरस्कार मिळवत बाजी मारली 'शक्ती' साठी! याच वर्षी साठी संजीव यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी पण फिल्मफेअर नामांकन मिळालं होतं. चित्रपट होता सुभाष घई यांचा 'विधाता'. हे अवॉर्ड 'विधाता' लाच गेले पण अभिनेता होता शम्मी कपूर.

 
तर असा होता संजीव कुमार यांना मिळालेल्या राष्ट्रीय व फिल्मफेअर पुरस्कारांचा प्रवास. नामांकनं अथवा पुरस्कार मिळाला या व्यतिरिक्तही अनेक अजरामर भूमिका या महान अभिनेत्याने साकारल्या आहेत. त्यातील बऱ्याच अशा आहेत ज्यांचा विचार नामांकन अथवा पुरस्कारासाठी का झाला नाही हा एक गूढ प्रश्न आहे. आजच्या दिवशी १९८५ साली आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने या महान अभिनेत्याने अचानकपणे एक्झिट घेतली. पण सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे या गुजराती हरिभाई जरीवालाने केलेली आपल्या अविस्मरणीय अभिनयाची गुंतवणूक त्याला रसिकांच्या हृदयात कायमचा विराजमान करीत 'घनो फायदा' देऊन गेली. 

पुरस्कारही जिथे तोकडे पडावेत ... शुल्लक वाटावेत असा महान अभिनेता पुन्हा होणे नाही. 

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

- अजिंक्य उजळंबकर 

#RememberingSanjeevKumar #SanjeevKumar 
#DeathAnniversary #TributeToSanjeevKumar

#Actor #HindiCinema #Bollywood

Thursday, November 5, 2020

"SSC बॅच

"SSC ची बॅच"ही कविता कोणी लिहिलीय माहीत नाही , पण ती प्रत्येकाची 'मनकी बात' तर नाही ना?

"SSC बॅच" 

प्रत्येकाची SSC ची बॅच असते 
 कोण कुठे आहे माहिती नसलं 
 कधीच भेटणं होत नसलं तरी 
 ती प्रत्येकाच्या मनात असते 

SSCच्या बॅचची एक गंमत असते 
 पन्नाशी पार केलेला तो 
 सासरा झालेला असतो, 
पन्नाशी पार झालेली ती 
 सासू झालेली असते, 
तरी सुद्धा SSC च्या बॅचमध्ये 
 अजुनही तो मुलगा असतो 
 आणि ती मुलगी असते 

 SSCच्या बॅचमधल्या आठवणी 
 सुखद असते त्यांची उजळणी 
 तीने त्याच्याकडे पाहिलेलं असतं 
 त्याने तीच्याकडे पाहिलेलं असतं 
 बस्स इतकच, 
बघण्या बघण्यातच 
 वर्ष सरलेलं असतं 

 SSC चा निकाल लागतो, 
नवीन प्रभा घेऊन सूर्य उगवतो 
 प्रत्येकाचं विश्व वेगळं होतं, 
त्याचे मित्र बदलतात 
 तीचेही मित्र बदलतात 
 एका गोष्टीची सुरूवात होण्यापुर्वीच 
 तिला विराम येतो 

 नवीन वयात, नवीन विश्वात, 
नवीन मित्रांत, गप्पांच्या ओघात, 
पुसटशा स्पर्शात, 
प्रेम म्हणजे काय 
 समजू लागलेलं असतं 

 आता ओढही असते 
 आणि सहवासही असतो 
 त्याला कुणीतरी आवडते 
 तीला कुणीतरी आवडतो , 
कुणी सहजीवनाची 
 शिडी एकत्र चढतो, 
कुणी पडतो, कुणी धडपडतो 

 पुढच्या आयुष्यात प्रत्येकाची 
 आपली बाग असते 
 त्याच्या बागेत 
 तो झाड होऊन जगतो, 
तीच्या बागेत 
 ती वेल होऊन जगते 

 वेलीवर कळ्या येतात 
 त्यांची फुले होतात 
 झाडाचा वृक्ष होतो 
 सावली देत ताठ उभा असतो 
 पण त्या उभं रहाण्यातही खरं तर 
 वेलीचाच त्याला आधार असतो 

 वर्ष सरत असतात, 
कळ्यांची फुले होतात 
 वाऱ्यावर डुलत असतात 
 बहरत असतात 

 कधी वाऱ्याचं वादळही होतं 
 सगळ्या बागेला हलऊन जातं 
 झाड मात्र ताठ असतं, 
कसं हलल पण नाही 
 म्हणून ताठरपणे पहात असतं 
 पण तीच ती वेल असते 
 स्वतः वाकते 
 म्हणून झाडाला 
 मोडण्यापासुन वाचवते 

 आता आयुष्याच्या सायंकाळी 
 फेसबुक व्हाट्सॲप् 
 हाच विरंगुळा असतो ! 
फेसबुकवर शोध घेता घेता 
 व्हाट्सॲपवर 
 SSC च्या बॅचचा ग्रुप तयार होतो 
 इतकी वर्षे बंद असलेला 
 कोनाडा हळूच उघडतो 
 हृदयाच्या कुपीत बंद ठेवलेल्या 
 अत्तराचा सुगंध 
 अजुनही तसाच असतो 

 आता मात्र गप्पांच्या मैफिलीत 
 जुन्या मित्र मैत्रीणींच्या 
 आठवणींना उजाळा येतो 
 कारण त्या अत्तराच्या 
 कुपितला सुगंध 
 पुन्हा हवाहवासा वाटतो 

 मनोमन मन म्हणत असतं 
 अशी वेळ यावी 
 केव्हातरी कुठेतरी ती 
 ओझरती तरी दिसावी 
 तेव्हाची ती नजरानजर 
 एकदा तरी व्हावी, 
ती एकच नजर 
 पुढील जीवनाची 
 शिदोरी बनुन जावी 

 त्यातच एक आशेचा किरण दिसतो 
 SSC बॕचचा 
 भेटण्याचा दिवस ठरतो 
 त्या दिवशी प्रत्येकजण नव्यानं 
 जुनंच दिसण्याचा प्रयत्न करतो 
 प्रत्येक मुलगा मुलगी 
 मला ओळखेल 
 हा भाबडा विश्वास असतो 

 त्याच वर्गात, त्याच बेंचवर 
 प्रत्येकजण पुन्हा एकदा 
 बसणार असतो 
 आणि आठवणींच्या झऱ्यांचा 
 महासागर होणार असतो 

 भेटीगाठी होत असतात 
 जुन्या आठवणी निघत असतात 
 त्यातच तीची त्याची 
 नजरानजर होते आणि 
 एका क्षणात सर्व काही सांगून जाते 
 त्याला आणि तीलाही 
 नवीन भेटीत 
 खुप काही बोलायचं असतं 
 पण उजाळा देण्यासारख 
 SSC या वर्षात 
 काही घडलेलच नसतं 

 तो तीला तिच्या 
 टोपण नावाने हाक मारतो, 
ती अवघडते पण आक्षेपही नसतो 
 कारण एकच दिवसाचा सहवासही 
 पुढच्या संपूर्ण प्रवासाचा 
 साथी होणार असतो 

 निरोप घ्यायची वेळ येते 
 दोन समांतर रेषा 
 काही क्षणांकरता एकत्र होऊन 
 पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात 
 पुढील जन्मी नक्की भेटण्याची 
 नजरेनेच ग्वाही देतात 

 हीच ती SSC ची बॅच 
 कायमचं घर करून रहाते 
 आयुष्याच्या भैरवीला 
 साथीला गात रहाते ...
SSC ची बैच............