Friday, May 25, 2018

लागा चुनरी पे दाग ----साहिर लुधियानवी

🌷

_'लागा चुनरी मे दाग, छुपाऊँ कैसे...'_ 

हे गाणे _'दिल ही तो है'_ या सिनेमातील आहे. गीतकार *साहीर लुधियानवी.*

हे गाणे ऐकल्यावर प्रथमदर्शनी गाण्याचा अर्थ साधा व सरळ वाटतो... पण प्रत्यक्षात हे एक आध्यात्मिक प्रकारचे गाणे आहे. 

साहिरने हे गीत *संत कबीर* यांच्या

_'मोरी चुनरीमे पड गयो दाग पिया...'_

या निर्गुण भजनावर आधारित लिहिले आहे. 

या गाण्यातील  व संत कबीर यांच्या भजनातील काही शब्दांचे अर्थ... 

_चुनरी = शरीर_ 
_दाग = पाप_
_पिया / साहिब / बाबुल  = भगवान_ 
_मायका = भगवान का घर_
_ससुराल = पृथ्वी_
_पांच तत्त्व = पंचमहाभूते_
_सोरा से बंध = सोळा संस्काराने बांधलेले_ 

_'चुनरी'_ हे शरीराचे रूपक म्हणून वापरले आहे. परमेश्वराचे घर हे आपले मूळ स्थान. ते आपले माहेर आणि पृथ्वी म्हणजे सासर.

खरं तर पृथ्वीवर आपण पर्यटकासारखे आहोत. जास्तीत जास्त शंभरएक वर्षे इथे काढायची, सुख-दु:ख उपभोगायची, जीवनाचा आनंद घ्यायचा, त्रास सहन करायचा आणि एक दिवस आपल्या मूळ स्थानी परत जायचे...!

या गाण्यात साहीर म्हणतो...

_'लागा चुनरी में दाग छुपाऊँ कैसे?'_

_("माझ्या उपरण्याला / ओढणीला डाग पडलेत... हे लपवू कसे?")_

हे शरीर पवित्र होते पण अनेक पापं करून मी ते भ्रष्ट करून टाकले आहे. आता परमेश्वराच्या दारी मी कसा जाऊ...? परमेश्वराच्या घरून पृथ्वीवर येताना मी वचन दिले होते की मी या शरीराचे पावित्र्य राखीन; पण पृथ्वीवर आल्यानंतर मी हे पार विसरून गेलो... आता परमेश्वराला तोंड कसं दाखवू! 

आत्मा पवित्र आहे पण त्यावर मायेचे आवरण पडले आहे.. _(मैल है मायाजाल)_ ते जग माझे माहेर आहे आणि हे पृथ्वीवरील जग हे सासर आहे. आता माहेरी जाऊन वडिलांना _(परमेश्वराला)_ काय सांगू...!

कबीराचे मूळ भजन असे आहे...

_'मेरी चुनरी में पर गयो दाग पिया_
_पांच तत्त्व की बनी चुनरिया_ 
_सोरह से बंध लागे पिया..._
_ये चुनरी मोरे मायके से आयी_
_ससुरे मे मनवा खोये दिया_ 
_मल मल धोये दाग ना छुटे_
_ग्यान का साबून लाये पिया_ 
_कहत कबीर, दाग तब छुटी है_
_जब साहिब अपनाये लिया_  

- संत कबीर 

कबीर म्हणतो..... 

_"परमेश्वराच्या घरून येताना मी हे पंचमहाभूतांनी बनलेली ओढणी / उपरणे (शरीर) घेऊन आलो... त्यावर सोळा संस्कारांचे विणकाम केले. मूलत: हे उपरणे पवित्र होते..._

_"पण मोहाला बळी पडून मी अनेक पापं केली आणि ते उपरणे पार मलीन करून टाकले. जेव्हा हे लक्षात आले तेव्हा मी रगडून रगडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. (पुण्य केले) पण काहीच उपयोग झाला नाही."_ 

म्हणून कबीर परमेश्वराकडे प्रार्थना करतो की _"हे पापाचे डाग धुवून काढण्यासाठी ज्ञानाचा साबण दे..."_

कबीराला माहित होते की याचा फारसा उपयोग होणार नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे परमेश्वराला शरण जाणे.

जेव्हा परमेश्वर आपल्याला स्वीकारेल तेव्हाच हे डाग जातील.

_'लागा चुनरी मे दाग, छुपाऊँ कैसे...'_ हे गाणे या अर्थानेच ऐकायला हवे. ते आनंददायी आहे!

*******🙏*******

No comments:

Post a Comment