मेरा नाम राजू घराना अनाम
बहती है गंगा जहाँ मेरा धाम....!!!
तो प्रतिभेचा वरदहस्त घेऊन जन्मला होता. कोणताही वारसा नसताना उत्तम काव्य करत असे... प्रतिकूल परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नाही...मुंबईत आला तो उदरभरणासाठी...माटुंगा येथे रेल्वे यार्डातील एक छोटी खोली ही त्याची कर्मभूमी...!!!रेल्वेत वेल्डर म्हणून काम करत असता यंत्ररुपी तानपुऱ्यावरही त्याला लय सापडत असे..त्याच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलले की त्याच्या नव्या गीताची चाहूल लागत असे... बालपणी आईच्या मुखी असलेल्या ओव्या आणि वडिलांची कृष्ण भजने ऐकून आणि मंदिरातील डफाच्या साथीने रंगून जाऊन म्हटलेल्या भजनांनी त्याचे जीवन घडविले होते...!!!काळाच्या ओघात सारे विरले मात्र डफ त्याचा सच्चा साथी होता...माटुंग्याच्या वास्तव्यात कितीतरी रात्री या मित्राने सुरेल केल्या होत्या....!!!!"मेरा नाम राजू" ची हीच नांदी होती का...कोण होता हा कलंदर....??होय "शैलेंद्र"....शंकरदास केसरीलाल शैलेंद्र.....!!!!सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला प्रतिभावंत...याने इप्टा मध्ये म्हटलेल्या "जलता है पंजाब" या कवितेने राज कपूर यांनाही भुरळ घातली होती...पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच....!!!शैलेंद्र यांची आज पुण्यतिथी....!!!!त्यांचे स्मरण रसिकमनात आहेच , त्यांच्या स्मृतीला लक्ष प्रणाम करून त्यांच्या आठवणी जगविण्याचा हा छोटासा प्रयत्न...!!!!
कवी हा उपजतच संवेदनशील असतो...रंग,रूप,स्पर्श ,रस,गंध या संवेदनांनी तो अनेक अनुभूती मनाच्या टिपकागदावर टिपत असतो...शैलेन्द्रजीनी सुद्धा विविध विषयांवर गीते लिहिली....त्यांची गीते तर अमोज आहेत....अगदी सागरलाटांप्रमाणेच...आणि सागराची गहनता त्यात आहे...!!!जशा शोभादर्शकात अनेक प्रतिमा क्षणाक्षणाला बहरतात ,तशीच अनेक मूड्स प्रमाणे लिहिलेली गीते आज माझ्या मनात रुंजी घालत आहेत...!!!!असे काय होते त्यांच्या प्रतिभेत ,त्यांच्या गीतात...की त्यांचा मनावर गहिरा रंग चढावा....??
त्यांची भाषा अगदी सरळ ,सोपी...वाचणार्याला वाटावे की हे आपल्याच मनीचे गुज आहे....!!!खर तर कठीण लिहिणे सोपे ,पण सोपे लिहिणे फार कठीण...आणि त्यातही गहन तत्व सांगण सोपे आहे का बघा ना...
मेरा जूता है जापानी,ये पतलून इंग्लिस्तानी
सर पे लाल टोपी रुसी ,फिर भी दिल है हिंदुस्थानी...
जूता जापानी असू दे,पतलून इंग्लिस्तानी असू दे...रुसी टोपी असू दे...पण दिल मात्र "हिंदुस्तानी" आहे...भारतीय संस्कृती,भारतीय संस्कार यांचा विलक्षण अभिमान येथे प्रकटतो....अभिमानी मन परक्यांकडे गहाण टाकलेले नाही ,हाच त्यातील गर्भितार्थ....!!!!भारतीय पौराणिक संदर्भ तर त्यांच्या गीतातून सहज प्रगटत...
बन के पत्थर हम खडे थे सुनी सुनी राह में
जी उठे हम जब से तेरी बाह आई बाह में
या "ओ बसंती पावन पागल" मधील गीतातील "अहिल्येचा" संदर्भ पाहून मन थक्क होते ,तसेच "आवारा" मधील "पतिव्रता सीतामाई को तुने दिया बनवास"हा संदर्भ ही अतिशय चपखल वाटतो...!!!!संगम मधील "मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं..." या गीतातील राधेचा संदर्भ पहिला की त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानाची महती कळते...!!!
शैलेन्द्रजींची भाषा शैली अतिशय ओघवती,चित्रमय वर्णन करणारी आणि त्यातूनही समाज प्रबोधन करणारी...!!!पहा ना...
तू प्यार का सागर है मधील एक अंतरा...
घायल मन का पागल पंछी उड़ने को बेक़रार
पंख हैं कोमल, आँख है धुँधली, जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम
तू प्यार का सागर...
पहा तो घायाळ पक्षी डोळ्यासमोर येतो ना...!!!
तसेच "मेरा नाम राजू ,घराना अनाम
बहती है गंगा जहाँ मेरा धाम..."
या गीतातही होडी वल्हवणारा राजू डोळ्यासमोर येतोच ना...आपल्या गदिमांसारखे चित्रदर्शी वर्णन करणे ही त्यांची खासीयत होती....!!!!
त्यांची हिंदी भाषा इतकी समृद्ध आणि ओघवती...त्यात "शहद की मिठास" होती...एकही शब्द कानाला खटकत नसे...आणि एकदा लिहिल्यावर पुन्हा त्यात फेर बदल करण्यास ते मुळीच तयार नसत...!!!!
ओ सजना, बरखा बहार आई
रस की फुहार लाई, अँखियों में प्यार लाई
तुम को पुकारे मेरे मन का पपीहरा
मीठी मीठी अगनी में जले मोरा जियरा
शब्दांचे वैभव जणू त्यांच्या प्रतिभा साम्राज्यात दिमाखाने बहरत असे...एक एक शब्द सुगंधी,बहरलेला,आनंद देणारा....!!!शंकर जयकिशन प्रमाणेच सलील चौधरी यांच्याशीही त्यांची जोडी छान जमायची...!!!आठवा ना...
धरती कहे पुकार के
बीज बिछा ले प्यार के
मौसम बीता जाय, मौसम बीता जाय
अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा
कौन कहे इस ओर तू फिर आये न आये
मौसम बीता जाय, मौसम बीता जाय
किंवा सुहाना सफर और ये मौसम हसी
हमे डर है हम खो न जाये कही...
ये गोरी नदियों का चलना उछलकर
के जैसे अल्हड़ चले पी से मिलकर
प्यारे प्यारे ये नज़ारे, निखार है हर कहीं
वरील अंतऱ्यातील दुसरी ओळ त्यांना सुचत नव्हती, पण अचानक एक अल्लड मुलगी त्यांनी जाताना पाहिली आणि "जैसे अल्हड चले पी से मिलकर" हे शब्द स्फुरले...!!!!
त्यांच्या गीतातील हे चित्रदर्शी सुंदर वर्णन मन मोहवून टाकी आणि हे वसंत वैभव पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटे....त्यांचे उपमा कौशल्य लाजवाब होते....!!!!
धुनवर शब्द असोत किंवा शब्दांवर रचलेली धून असो,शैलेन्द्रजींच्या शब्दांच्या परिसाने सर्वच गीतांचे सोने होई...!!!!पण गीतातील शब्द बदलण्याच्या बाबतीत ते फार हट्टी असत..."प्यार हुआ" या गीतात "राते दसो दिशाओ से कहेगी अपनी कहानिया"या ओळीतील "दसो दिशाओ" हे शब्द बदलावेत असे शंकरजींचे म्हणणे होते...पण मुख्य चार दिशा ,उपदिशा आणि ऊर्ध्व ,अधर अशा दोन अशा दहा दिशांचे वर्णन आहे असे ठासून सांगून त्यांनी आपले म्हणणे बिंबवले होते..तसेच "आह" मधील "मेहंदी से पिले होंगे हाथ "या ओळीत बदल करता येणार नाही का असे खुद्द राज यांनी विचारले ,पण शैलेंद्रजी आपल्या शब्दांवर ठाम राहिले...!!!
त्यांची गीते उत्कट प्रेमाची अनुभूती देत पण त्यात सवंगपणा नव्हता....!!!!त्या प्रणय रंगात रंगलेल्या शब्दांनी मनावर मोरपीस फिरत असे....!!!!
"राजहठ" या चित्रपटातील "मेरे सपने में आना रे सजना" हे असेच एक रेशीम गीत...!!!!प्रणयाची कल्पना कित्ती सुंदर रेखाटली आहे पहा...!!
चोरी चोरी आके पिया बैठना सरहाने
जान के मैं चुप रहूँगी नींद के बहाने
मुझे छेड़ के जगाना रे साजना
मेरे सपने में आना रे
प्रियकराच्या मधुर आठवणीत रंगलेली ही मधुबाला म्हणते की माझ्या उशाशी हळूच येऊन बैस , झोपेचे सोंग घेऊन मी झोपून राहीन...तू मात्र मला छेड आणि जागे कर...!!!कित्ती सुंदर रोमान्स आहे हा...तरीही शालीनता आहे त्यात...!!!!
"ये रात भिगी भिगी" काय किंवा "प्यार हुआ इकरार हुआ" काय...अवीट गोडीची युगलगीते आहेत ही...केवळ अविस्मरणीय....!!!!कधी शब्दांची द्विरुक्ती साधून त्यांनी त्यातील अर्थ अधिक गडद केला आहे तर कधी सुंदर रूपके वापरून....!!!त्यांच्या पहिल्याच बरसात चित्रपटातील "ताक धी ना धिं"ने राज कपूर यांना प्रेमात पाडले होते....!!!!आजही वर्षा या गीताशिवाय बरसत नाही...
सामाजिक विषमता,अमिरी गरिबी यातील दरी,सामाजिक शोषण,वशिलेबाजी यावरही त्यांची लेखणी कडाडत असे...आणि तेही अगदी लीलया... सहज पणे....!!!!आता "दिल का हाल सुने दिलवाला" या गीतात पहा ना...!!!!
बूढ़े दरोगा ने चश्मे से देखा
आगे से देखा, पीछे से देखा
ऊपर से देखा, नीचे से देखा
बोला ये क्या कर बैठे घोटाला
हाय ये क्या कर बैठे घोटाला
ये तो है थानेदार का साला
दिल का हाल...
"ठाणेदार "असल्यामुळे त्याच्या मेव्हण्याला सगळे माफ...असे का ??हा प्रश्न त्यांनी ठाम पणे,खुलेआम विचारला आहे...तसेच या गीताचा आणखी एक अंतराही सुंदर ...!!!!
ग़म से अभी आज़ाद नहीं मैं
ख़ुश हूँ मगर आबाद नहीं मैं
मंज़िल मेरे पास खड़ी है
पाँव में लेकिन बेड़ी पड़ी है
टांग अड़ाता है दौलतवाला
दिल का हाल...
"टांग अडाता है दौलतवाला"...यातून गरिबी श्रीमंती यातील दरी...त्यातील संघर्ष सूचित केला आहे....!!!हातात डफ घेऊन राज कपूर यांनी हे गीत आपल्या अभिनय सामर्थ्याने सुंदर फुलविले आहे....!!!!
रेल्वेत काम करत असताना शैलेन्द्रजींनी गरिबी फार जवळून पाहिली होती...पगाराच्या दिवशी जसा आनंद होत असे तसेच पैसे वसूल करण्यासाठी उभे ठाकलेले पठाणही असत..!!!!कसायांप्रमाणे ते गरीब मजुरांवर तुटून पडत....भुकेने तळमळणारे गरीब त्यांनी पाहिले होते...त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या पूर्णपणे व्यावसायिक असलेल्या ,आणि शम्मीकपूर सारख्या रोमँटिक इमेज असलेल्या नायकाच्या तोंडी "उजाला" चित्रपटातील एक गीतात उमटले...!!!
सूरज ज़रा आ पास आ, आज सपनों की रोटी पकायेंगे हम
ऐ आसमां तू बड़ा मेहरबां, आज तुझको भी दावत खिलायेंगे हम
सूरज ज़रा पास आ
चूल्हा है ठंडा बड़ा और पेट में आग है
गरमा-गरम रोटीयाँ, कितना हसीं ख्वाब है
सूरज ज़रा आ पास आ...
आलू टमाटर का साग, इमली की चटनी बने
रोटी करारी सिके, घी उसपे असली लगे
सूरज ज़रा आ पास आ...
पुन्हा कित्ती सुंदर ,चपखल ,चित्रदर्शी वर्णन....!!! सपनों की रोटी,आसमा को दावत ...काय सुंदर उपमा आणि कल्पनाविलास...!!!!डोळ्यात पाणी येते हे सारे वाचून...!!!इतके वास्तव वादी चित्र रेखाटणे हे अत्यंत संवेदनशील कवी असल्याचेच लक्षण नव्हे का? "गरमा गरम रोटी" हे खरंच गरिबांचे स्वप्न असते...नव्हे आपले फ मु शिंदे म्हणतात,"भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली..."!!कित्ती हृदयद्रावक असले तरी हेच विदारक सत्य आहे...!!!!हीच गरिबांची वेदना तितक्याच तळमळीने मांडणारा शैलेंद्र खरच संवेदनशील कवी होता...
शैलेन्द्रजीनी त्यांच्या काही गीतात अनोखे शब्द वापरून गीताचे सौंदर्य खुलविले .त्यांचे "आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये "हे गीत आठवा...
आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए
आई रात सुहानी देखो प्रीत लिए
मीत मेरे सुनो ज़रा हवा कहे क्या, सुनो तो ज़रा
झींगर बोले चिकीमीकी, चिकीमीकी
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए
यातील "झिंगर बोले चिकी मिकी ,चिकी मिकी" या अनोख्या शब्दोच्चारांनी गीताचे सौंदर्य वाढविले आहे..तसेच त्यांच्या "सच हुए सपने मेरे ,झूम ले ओ मन मेरे ,चिकी चिकी चीक चाक चा छई...चिकी चीकी चीक चाक...."या शब्दातील वहिदाजींचा सुंदर अभिनय त्या शब्दांचे सार्थक करतो....!!!राहुल देव बर्मन यांच्या पदर्पणातील "छोटे नवाब "या चित्रपटातही "घर आजा घिर आई या गीतात "टप ,टीप सुनत मैं तो हुई रे बावरीया"यातील "टप टीप "या शब्दातील नाद कित्ती सुंदर....!!!!
शैलेन्द्रजींच्या काही गीतात लोकसंगीताचा सुंदर वापर केला आहे,तसेच बिहारी असल्याने भोजपुरी भाषा त्यांनी वापरली आहे...त्यांची ती सहज सुंदर भाषा आणि त्यातील रूपके पाहून कबिराच्या दोह्यांची आठवण येते...मधुमती मधील "दैय्या रे दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ... किंवा त्यांच्याच "तिसरी कसम" मधील"चलत मुसाफिर "ऐकून पहा...बंदिनी मधील "अब के बरस भेजो"तर लाजवाब....!!!
शैलेन्द्रजीनी आपल्याला गीतात काय सांगायचे आहे याची मनाशी पक्की खूण गाठ बांधलेली असे...आणि ते इतक्या चपखलपणे सांगत की आपल्या तोंडून सहजपणे "क्या बात है"निघून जाई... पहा गाईड मधील हे गीत...!!!
वहां कौन है तेरा
मुसाफिर जाएगा कहाँ
दम ले ले घड़ी भर
ये छइयां पाएगा कहाँ
तुने तो सबको राह बताई
तू अपनी मंझील क्यू भुला
सुलझा के राजा,औरों की उलझन
क्यूँ कच्चे धागो में झूला
क्यूँ नाचे सपेरा
मुसाफिर जायेगा कहा ...
वरील गीतात "क्यूँ नाचे सपेरा"हे कित्ती समर्पक शब्द त्यांनी वापरले आहेत पहा..."सपेरा" हा नाग नागिणीना नाचविणारा...मग येथे जो दुसऱ्यांचे प्रश्न लीलया सोडवितो तोच कच्च्या धाग्यात का गुंतलाय....सपेरा कधी नाचतो का....!!!हेच तर शैलेन्द्रजींच्या वैशिष्ट्य होते...मोजक्या शब्दात आपले म्हणणे ते मांडत...म्हणूनच "मेरा नाम जोकर" या चित्रपटाचे सार त्यांनी "जीना यहां मरना यहां,इसके सीवा जाना कहा"या एकाच ओळीत मांडले आहे...राज कपूर यांच्याबरोबर "आवारा"चित्रपटाची कथा ऐकण्यासाठी गेले असता "गर्दीश में था लेकीन आसमान का तारा था"अशा समर्पक शब्दात कथेचे सार व्यक्त केल्यावर अब्बास यांनी राज ना त्यांच्याशी पुन्हा एकदा ओळख करून देण्यास सांगितली...!!!!
चित्रपटातील गीते ही संवाद साधून कथानक पुढे नेण्यासाठी सहाय्यभूत होतात हे त्यांचे ठाम मत...त्यांची प्रतिभा इतकी विलक्षण होती की काही चित्रपटात त्यांनी "सवाल जवाब" ढंगात गीते लिहिली...ससुराल चित्रपटातील "एक सवाल मैं करू "या गीतात त्यांच्या प्रश्नातून उत्तर मिळत असे...!!!हाही त्यांच्या लेखणीचा अनोखा ढंग होता..."पतिता" चित्रपटातील एक गीतात त्यांनी म्हटले आहे..."है सबसे मधुर वो गीत ,जिन्हे हम दर्द के सूर में गाते है"...जणू गीताची परिभाषाच त्यांनी मांडली आहे..."Sweetest songs tell us the sadest thought..."असे आंग्ल कवी "शेले" यांनी म्हटलेच आहे ,त्याचीच येथे आठवण होते....!!!त्यांची ही सुंदर गीताची परिभाषा मनाला भिडते...!!!!
सचिन देव बर्मन यांच्याबरोबरही त्यांची जोडी छान जमली होती..."गाईड" हा या दोघांचा गाजलेला ,अत्यंत लोकप्रिय चित्रपट....पण आनंद बंधू त्यांना नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर ठेवत, ही खंत त्यांच्या मनी होती,म्हणूनच "गाईड" च्या गाण्यासाठी त्यांनी भरपूर मोबदला मागितला...आनंद बंधूनी तो मान्य केला आणि "गाईड" च्या गीतांनी मात्र लोकप्रियतेचे एव्हरेस्ट गाठले...आपल्या नामर्द पतीची साथ सोडल्याच्या आनंदात बेहोष झालेली वहिदा मुक्तपणे जे गीत गाते ते "काटो से खिच के ये आँचल"...यातील "आज फिर जीने की तमन्ना है ,आज फिर मरने का इरादा है"....हा मुखडा "ओथेल्लो" मधील डेस्टीमोना च्या संवादांची आठवण करून देतो...If it were not to die,it were now to be most happy ..."यावरून शैलेन्द्रजींच्या प्रतिभेचा आवाका किती विशाल होता हेच समजते...!!!!
शैलेन्द्रजीनी गीतकाराची परिभाषा वर्णन करताना म्हटले आहे...जसा चित्रकार,संगीतकार तसाच गीतकार...!!!दिलेल्या विषयानुसार तो गीत लिहिण्याचे कार्य उत्तम पार पाडत असतो...पण ज्या गीतकाराला आपल्या गीताने स्वानंद मिळतो,एक समाधान मिळते तीच त्याची खरी कलाकृती...!!!आपण गीतही "स्वान्त:सुखाय" लिहितो असे सांगून आपले मनोगत ,गीतकाराची परिभाषा जणू त्यांनी दिली आहे...!!!!
काम नये नित गीत बनाना
गीत बनाके जहाँ को सुनाना
कोई ना मिले तो अकेले में गाना
कविराज कहे, न ये ताज रहे,न ये राज रहे,न ये राज घराना
प्रीत और प्रीत का गीत रहे,कभी लूट सका न कोई ये खजाना...
साहित्याच्या इतिहासात नाव येवो न येवो,पण अगदी सामान्य हातगाडीवाला ते उच्चभ्रू प्राध्यापक याना माझी गीते आवडतात ,हेच माझे साहित्यिक यश...!!!
शैलेंद्र सर्वसामान्यांचे कवी होते..."आम आदमी" किंवा "कॉमन मॅन" चे दु:ख त्यांच्या गीतातून पाझरत असे...!!!!"नज्म" आणि "नगमा" यातील फरक ते जाणत होते...!!!अगदी सोप्या शब्दात सामान्यजनांच्या हृदयाला त्यांचे शब्द भिडत असत....!!!!"सीधीसी बात न मिर्च मसाला "असे त्यांचे शब्द होते....म्हणूनच ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते...!!!!राजकपूरने म्हणूनच "बरसात ते मेरा नाम जोकर" पर्यंत सगळी थीम सोंग्स त्यांच्यात कडून लिहून घेतली...राजकपूरचा निरागसपणा शैलेंद्रच्या शब्दात झळाळून उठला..एक होता जनसमान्यांचा कवी आणि दुसरा जनसमान्यांचा कलावंत....!!!!दोघांच्या मनीच्या तारा जुळल्या होत्या...!!!!
होंगे राजे राजकुंवर, हम बिगडे दिल शहज़ादे
हम सिंघासन पर जा बैठें जब जब करें इरादे
सूरत है जानी पहचानी दुनियावालों को हैरानी..
१९६१ मध्ये शैलेंद्र यांना "फणीश्वर नाथ रेणू" यांच्या "मारे गये गुलफाम" या कादंबरीने भुरळ घातली...यावर "तिसरी कसम"नावाचा चित्रपट निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले..."राज "आणि "वहिदा' नायक ,नायिका आणि बासू भट्टाचार्य यांच्यावर दिग्दर्शक म्हणून शिक्कामोर्तब झाले...!!!वर्षादोन वर्षात चित्रपट पूर्ण होईल असे वाटले होते ,त्याला तब्बल 6 वर्षे लागली...कथेच्या बाबतीत कोणताही समझौता करण्यास शैलेंद्र तयार नव्हते...पण कलाकारांच्या सलग तारखा मिळत नव्हत्या...पण त्यांनी हार मानली नाही... त्यांच्या या चित्रपटातील गीते सर्वोत्तम होती..."सजन रे झूट मत बोलो",पान खाए सैय्या हमार","सजनवा बैरी हो गये हमार,चिठीयां हो तो हर कोई बाचे ,भाग न वाचे कोय....." ही त्यातील काही गीते....तसा हा त्यांच्या गीतलेखनाचा हा उत्तुंग काळ होता...!!!!पैशांचा ओघ वाहता होता...!!!पण काही तांत्रिक बाबीत आणि जवळच्या मित्रांनी,आपल्याच माणसांनी दगाफटका केला होता... संवेदनशील शैलेंद्र हा धक्का पचवू शकले नाहीत...बजेट वाढले..चित्रपट चालला नाही...आज ज्याच्याकडे आपण "क्लासिक फिल्म" म्हणून पाहतो,ज्याला "राष्ट्रीय पुरस्कार" लाभला आहे...त्याच चित्रपटाच्या बाबतीत शैलेंद्र "अनाडी" ठरले....!!!!
१९६१ ते ६६या काळात अनेक सुंदर गीते त्यांनी दिली...याद न जाये,"चाहे कोई मुझे जंगली कहे 'यातील "याssssहू ची "आरोळी,"जाने कैसे सपने में खो गयी अंखिया "सारखे सुंदर गीत,"खुली पलक में झूठा गुस्सा बंद पलक में प्यार" हे प्रोफेसर मधील सुंदर गीत,"ओ रे मांझी" हे बंदिनी मधील सुंदर गीत,आणि "संगम" मधील "दोस्त दोस्त ना रहा "हे गीत....खरच या गीतात त्यांनी अनुभवलेले सत्य सांगितले होते का....!!
अब कहाँ जाएँ हम, ये बता ऐ ज़मीं
इस जहां में तो कोई हमारा नहीं
अपने साये से भी लोग डरने लगे
अब किसी को किसी पर भरोसा नहीं
अब कहाँ जाएँ हम...
अशीच काहीशी मानसिक अवस्था त्यांची झाली होती...शेवटी ज्याची भीती होती तेच झाले,मदिरेच्या चषकात आपले दु:ख विसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि परिणाम विनाशात झाला...काळजाच्या तळापासून गीते लिहिणारा,जनसामान्यांची दु:खे गीतातून मांडणारा एक सृजनशील कवी,गीतकार आपण हरवून बसलो...एक पाणीदार मोती निखळला होता...ज्याने आपल्या गीतांची बरसात रसिकांवर केली ,अगदी मुक्त हस्ते गीतरुपी माणके उधळली...त्याचा अंत असा व्हावा ही अतीव दु:खाची गोष्ट होती....!!!!
उपजे ते नाशे..। नाशले पुनरपि दिसे ..।
या नियमानुसार प्रत्येक गोष्टीला अंत असतोच...शंकर-जयकिशन,शैलेंद्र,हसरत यांनी गुंफलेल्या या सुरील्या संगीतमालेला ही हा नियम लागू होता...!!!"तीसरी कसम" हे शैलेंद्रचे स्वप्न होते..त्याच्या पूर्ततेसाठी त्याने तन मन धन सारेच पणाला लावले होते...आपली कलाकृती कोणत्याही प्रकारची व्यावसायिक तडजोड करणार नाही हे कविराजांनी पक्के ठरवले...पण याच ध्यासाने त्यांना कर्जबाजारी केले आणि दुर्दैवाची परिसीमा म्हणजे जवळच्या मित्रांनी विश्वासघात केला...आणि चित्रपटाला व्यावसायिक यश लाभले नाही..!!
ये गम के और चार दिन,सितम के और चार दिन
ये दिन भी जायेंगें गुजर ,गुजर गये हजार दिन
कभी तो होगी इस चमन पर बहार की नजर...
ही शैलेंद्र यांचीच कविता....!!!!पण ती बहार आलीच नाही.जनतेने आपला चित्रपट नाकारला या धक्क्याने कविराज सावरलेच नाहीत आणि तीन महिन्यातच ,१४डिसेंबर १९६६ या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला...योगायोगाने तो दिवस त्यांच्या जिवलग मित्राचा राज चा जन्मदिन होता...टपोऱ्या पाणीदार मोत्याच्या सरातील एक मोती ओघळला होता....!!!
एका संगीतमय युगाची सांगता झाली असे म्हणावे का....नाही कारण आजही त्यांच्या गीतांची बरसात रसिक हृदयात होतच आहे....आजही मनामनात रोमान्स फुलतोच आहे....आजही त्यांच्या गीतांचे इंद्रधनुष्य मन मोहवून टाकतेच आहे.....!!!अशा दैवदत्त सृजनाला अंत नसतो...असतो तो फक्त बहर आणि बहरच.....!!!!!
मानसी पटवर्धन
No comments:
Post a Comment