Tuesday, January 15, 2019

जब भी कोई कंगना बोले। चारुदत्त

[08/01, 6:41 pm] Charudatta:

जेंव्हा बांगडयांची किणकिण ,पैजाणाचे छनछन ऐकु येते
हृदयातील निद्रित ईच्छा जाग्या व्हायला लागतात
लाख प्रयत्न केले तरी मन अस्वस्थ होते

चमकणारे रंग दिसले की डोळे लखलखतात
बंजारा मनाला चैन पडत नाही
माझ्या मनाच्या अतृप्त इच्छा मला भटकवत ठेवतात

भ्रमर कळ्यामध्ये झुमतो, पतंग आगीत जळतात
चकोर  पक्षी चांद्रकोरीला न्याहाळत बसतो
आणि त्यातच सुख मानतो!
जीवनातील ह्या रसाचे बंधन  मात्र तोडता येत नाही !
[08/01, 6:41 pm] Charudatta:
जब भी कोई कंगना बोले पायल छनक जाये
सोयी सोयी दिल की धड़कन सुलग सुलग जाये
करूँ जतन लाख मगर मन मचल मचल जाये मचल मचल जाये, जब भी कोई कंगना बोले छलक गये

रंग जहाँ पर उलझ गये नैना रे नैना उलझ गये नैना
पाये नहीं मन बंजारा कहीं भी ये चैना रे चैना कहीं भी ये चैना
मेरे मन की प्यास अधूरी मुझे भटकाये, जब भी कोई कंगना बोले

कली कली झूमे रे भंवरा
अगन पे जल जाये पतंगा अगन पे जल जाये
चंदा को चकोर निहारे
इसी में सुख पाये रे पाये इसी में सुख पाये
जीवन से ये रस का बंधन तोड़ा नहीं जाये,
जब भी कोई कंगना बोले

भाई व्यक्ती आणि वल्ली

आहे मनोहर तरी...
"भाई' हा चित्रपट बघून मी बाहेर येतो. खरं तर कोणताही चांगला चित्रपट बघितला, की मी ट्रान्समध्ये जातो. हा चित्रपट बघितल्यावर मात्र उत्तम चित्रपट बघितल्याचं समाधान असलं, तरी ट्रान्समध्ये जाणं का होत नाही बरं? चित्रपट चांगला आहे का?-शंभर टक्के चांगला आहे. लेखन, दिग्दर्शन उत्तम आहे का?-हजार टक्के चांगलं आहे. अभिनय उत्तम आहेत का?-अगदीच उत्तम आहेत. तांत्रिक गोष्टी चांगल्या आहेत, संगीत चांगलं आहे, बारीकसारीक गोष्टीही जमून आल्या आहेत.... पण तरीही चित्तवृत्ती प्रफुल्लीत का न व्हाव्यात बरं? एक गोष्ट नक्की आहे, की फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर चित्रपट पूर्ण "गाजल्या' आणि "वाजल्या'नंतर मी बघितलाय, त्यामुळं त्यातले जे उत्तम भाग आहेत त्यांच्याबाबत मी मानसिकदृष्ट्या आधीच तयार होतो. त्यामुळं पहिलेपणाचा सुखद धक्का बसतो तेव्हा इतर काही किरकोळ त्रुटींकडं आपोआपच दुर्लक्ष होतं, तसं झालेलं नाही, हे मान्य आहे. मी चित्रपटाचा आस्वाद घेण्यापेक्षा त्या उत्तम गोष्टी ताडून घ्यायला बसलो हेही मान्यच आहे. दुसरं असं, की कुणाचा अभिनय चांगला आहे, वाईट आहे याबाबत मी थोडं आधीपासून मतं तयार करून किंवा ऐकून घेऊन तयार गेलो असणार तोही एक अडसर आहेच. हे सगळं मान्यच, पण तरीही एक सल कशाची जाणवते आहे बरं?
पहिल्यांदा "मनोहर' का वाटलं हे सांगतो. हा चित्रपट जमणार नाही असं मला आणि अनेकांना खरं तर आधीपासून वाटत होतं हेही सांगायला पाहिजे. पुलंच्या जीवनात "चित्रपटीय' नाट्य काही नाही, जगावेगळा प्रवास नाही, किंवा काथ्याकूट करावा-वेगळी बाजू मांडावी असा खास कुठला प्रसंग नाही. दुसरं या चित्रपटाच्या कास्टिंगबाबतही साशंक होती. सागर देशमुख, इरावती हर्षे यांच्या बाबतीत. अर्थात मनात हीही भावना होती, की चित्रपटावर मोहर उमटणं म्हणजे एक प्रकारे पुलंच्या जीवनावर मोहर उमटणं असं मानलं जाईल-फेसबुकीय काथ्याकूट होईल-थोडं चर्वितचर्वण होईल. त्यामुळं हा चित्रपट चांगला असायला हवा. खरं सांगतो, पहिल्या दिवशी जेव्हा चांगल्या प्रतिक्रिया आल्या, तेव्हा मी आणि खरं तर सगळेच पुलंप्रेमी थोडे सैलावले. जणू आपल्यावरच हा ताण होता असं वाटत होतं- तो ताण हलका झाला. पण खूप कौतुकही झालं आणि मग अपेक्षाही वाढल्या हेही सांगायला हरकत नाही. "भाई' चित्रपट संपल्यावर माझ्या मनात जो कल्लोळ तयार झाला, त्याच्यामागं ही पार्श्‍वभूमी नक्कीच होती. या पार्श्‍वभूमीवर हा चित्रपट मनोहर वाटला.
चित्रपटात मांडलेला जो सुवर्णकाळ त्यात जायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल. तो सुवर्णकाळ पडद्यावर जिवंत झालाय. त्यामुळं चित्रपट प्रसन्न वाटतो. मुळात हा चित्रपट म्हणजे गुलबकावलीच्या किंवा उंबराच्या फुलांचा बुके तयार करण्यासारखं होतं. अतिशय अमूर्त कल्पना प्रत्यक्षात आणण्यासारखं. ते अगदी थाटात साकार झालंय हे नक्कीच. पुलंच्या साहित्यावर, नाटकांवर इतर मुशाफिरीवर प्रचंड लिहून आलं असलं, तरी वैयक्तिक जीवनावर फार काही लिहून आलेलं नसताना असा चित्रपट साकारणं म्हणजे प्रचंड अवघड काम होतं. महेश मांजरेकर, गणेश मतकरी, रत्नाकर मतकरी, अमोल परचुरे आणि इतर टीमनं ते शिवधनुष्य नक्कीच पेललंय. तुकड्यातुकड्यांतून दिसणारं पुलंचं आयुष्य त्यांनी नेमकेपणानं, कल्पकपणे आणि रंजक पद्धतीनं जोडलंय, मांडलंय. सागर देशमुख हा खरा सुखद धक्का आहे. सागरनं पुलंचं पात्र अतिशय लव्हेबल केलंय. एक असंही वाटतं, की पुलंमध्ये जो मूलतंः निरागसपणा आणि बालसुलभ वृत्ती होती. ती थोडी सागरमध्येही असणार. त्यामुळं सागर परफेक्‍ट जमून जातो. सागरनं कुठंही नक्कल केलेली नाही हे मला सर्वांत महत्त्वाचं वाटतं. समोरचे दोन दात किंचित दाखवत हसणं, सॉफ्टली भाव व्यक्त करणं, नितळपणानं व्यक्तिरेखेला सामोरं जाणं हे त्यानं केल्यामुळं त्यानं साकारलेली ही व्यक्तिरेखा अगदी भावते. वडील जाताना "आनंदाचं काही ऐकवतो ना' हे त्यानं म्हटलेलं वाक्‍य, किंवा मुलाची चाहूल लागलेली असताना "वडील देशपांडे' असं म्हणतानाचा त्याचा चेहऱ्यांवरचा भाव ही दोन उदाहरणं त्याची निवड सार्थ करायला पुरेशी आहेत. इरावती हर्षे ही अभिनेत्री जबरदस्त आहे. "सेंट-परसेंट सुनीताबाई' असं वाटावं इतकी तिनं ती सुरेख साकारली आहे. सुनीताबाईंमधला करारीपणा, पुलंवरचं सतत लक्ष, आणि एकीकडं कलासक्त असतानाही बाह्य दिसणारा कोरडेपणा तिनं छान दाखवलंय. मोठ्या सुनीताबाई झालेल्या शुभांगी दामले यांचाही खास उल्लेख करायला हवा. प्रयागमधल्या काळात सुनीताबाईंच्या मनातला कल्लोळ त्यांच्या चेहऱ्यावर पुरेपूर दिसतो.
अश्‍विनी गिरी या अभिनेत्रीला खूप चांगली व्यक्तिरेखा मिळाली आहे. मुळात पुलंच्या आईबद्दल कुठंही काही फार लिहून आलेलं नसताना या अभिनेत्रीनं अतिशय कन्व्हिक्‍शननं ही भूमिका साकारली आहे. तिच्या वाट्याला नाट्यमय प्रसंग नाहीत, मोठे संवाद नाहीत, तरीही ती साधेपणानं भूमिका साकारत मनात घर करते हे महत्त्वाचं वाटतं. मला सगळ्यांत सुखद धक्का दिला तो पद्मनाथ बिंडनं. त्यानं साकारलेले वसंतराव देशपांडे! क्‍या बात है! त्याचे डोळे, बसणं, त्यानं लावलेला किंचित अनुनासिक स्वर हे सगळं फार लव्हेबल आहे. असाच धक्का कुमारगंधर्व साकारलेल्या स्वानंद किरकिरे यांनी दिला. किती छान, सार्थ निवड! भीमसेन जोशी, जब्बार पटेल, राम गबाले आणि बा. सी. मर्ढेकर यांच्या व्यक्तिरेखांमधल्या कलाकारांनी मात्र निराश केलं, हेही सांगावं वाटतं. कर्वे झालेले विद्याधर जोशी आणि मधूनच डोकावणारे रावसाहेब साकारणारा हृषिकेश जोशी छान.
मांजरेकर यांनी मुळातला अमूर्त पसारा योग्य चौकटीत मांडला, त्याबद्दल अभिनंदन. पुलंचं बालपण, वडिलांचं निधन, पुलं-सुनीताबाई यांचं लग्न ठरण्यापर्यंतचे हृद्य प्रसंग, ऍबॉर्शननंतरचा प्रसंग आणि शेवटची मैफल उत्तम. खरं तर इतके तुकडे तयार करणं, कलाकारांच्या फौजेकडून त्या तुकड्यांना मूर्तरूप देणं आणि पुन्हा ते तांत्रिक सज्जता आणि कल्पकता दाखवत जुळवणं हे अवघड काम त्यांनी उत्तम प्रकारे साधलं आहे. गणेश मतकरी यांच्या पटकथालेखनालाही दाद द्यावी वाटते. विशेषतः नाथा कामत, रावसाहेब आणि अंतू बर्वा या व्यक्ती आणि वल्लीमधल्या व्यक्तिरेखांचा वापर उत्तम.
शेवटची मैफल लोकांना आवडते. याचं कारण असं आहे, की मुळात हा चित्रपट बघायला जाणाऱ्यांनाही अशा मैफलींना जाणं, पुस्तकं वाचणं, कलाकारांना दाद देणं आवडतं. त्यांच्यासाठी ही मैफल म्हणजे नॉस्टॅल्जियात जाणं आहे. कानडा राजा पंढरीचा, उजेडी राहून, सांवरे या रचना त्यांनी इतर ठिकाणीही ऐकल्या, बघितल्या असत्या तरी त्यांना आवडल्याच असत्या. ही मैफल म्हणजे चित्रपटीय दृष्टीनं फार काही विशेष नाही हेही तितकंच खरं. अंतू बर्वा म्हणजे कर्वे ही व्यक्तिरेखा उत्तरार्धात इतकी करुण केली नसतील तरी "भाई'च्या प्रवासात काही फरक पडला नसला. पुलं या काळात माणसं बघत होते, निरीक्षणं करत होते आणि आत डोक्‍यात साठवत होते एवढं प्रोजेक्‍ट झालं तरी पुरेसं होतं. कर्वेंच्या व्यक्तिरेखेचा ग्राफ काही तपशिलांमध्ये नसता तरी चाललं असतं.
पण मुळात अनेक चांगल्या गोष्टी असल्या तरी, सगळं मनोहर बघूनही चित्तवृत्ती प्रफुल्लीत का न व्हाव्यात बरं? त्याचं एक अगदी महत्त्वाचं कारण असं वाटतं, की या चित्रपटातून पुलंचे गुणविशेष तितके ठसत नाहीत. दारू-सिगारेट आवडणारे, मित्रांमध्ये रमणारे, थोडे वेंधळे असे पुलं नव्हते का? होतेच की! पण ते तेवढेच नव्हते ना! अवगुण दाखवायचे नाहीत का? दाखवायचे. "संजू'सारख्या चित्रपटामध्ये तसं होतंच की. पण त्यात त्याची त्याच्याबाबतची एक बाजूही दाखवली जात होती. इथं मात्र तसं होत नाही. आयुष्याच्या पूर्वार्धात पुलंना सूर सापडला नव्हता असं असेल कदाचित. पण त्याच पूर्वार्धात त्यांच्या पुढच्या आयुष्याची पायाभरणीही होत होती की! ती तशी चित्रपटात वाटत नाही. हा चित्रपट सारखा सुनीताबाईंच्या दृष्टिकोनातून साकारल्या सारखा वाटतो. या चित्रपटात सगळ्यात हायलाइट आहेत ते दोन, तीन प्रसंग. एक लग्नाचा. त्यात ठसठशीत पात्र उभं राहतं ते सुनीताबाईंचं. म्हणजे अगदी त्यांचा कर्मकांडाला असलेला विरोध वगैरे. पुलं मात्र सासुरवाडीला आल्याआल्या सिगारेट ओढायला पळणारे वगैरे. ऍबॉर्शनचा प्रसंग तर पूर्णपणे सुनीताबाईंच्या दृष्टिकोनातून. ज्या व्यक्तिरेखेवर हा चित्रपट आधारित आहे ते भाई या प्रसंगात साइडी वाटतात आणि पत्नीच जास्त ठसते. ठसायलाही हरकत नाही. पण "भाई' या व्यक्तिरेखेचाही काही व्ह्यूपॉइंट असेल की नाही? "वडील देशपांडे' म्हणत आनंदी होणारे पुलं ते त्या धक्‍क्‍यानंतर एकदम "सॉरी' म्हणणारे पुलं यात केवढा मोठा कल्लोळ त्यांच्या मनात असेल? आपल्याला कल्लोळ दिसतो तो त्यांच्या पत्नीचा. शेवटच्या मैफलीतही पुन्हा वसंतराव देशपांडे, कुमारगंधर्व आणि भीमसेन जोशी हे दिग्गज मनात ठसतात. आपला "प्रोटॅगनिस्ट' पुन्हा साइडीच वाटतो.
खरं तर पुलंच्या आयुष्याच्या या सगळ्या पूर्वार्धात अनेक अचिव्हमेंट्‌स होत्याच. त्या मात्र अगदी जाताजाता नुसता रेफरन्स म्हणून येतात. म्हणजे "रांगणेकरांनी मला बोलावलंय बरंका', "मी हा चित्रपट करतोय बरंका' असं सांगण्याच्या स्वरूपात. सहा महिने पेंडिंग असलेल्या अंमलदारचा एक अंक एका रात्रीत लिहून काढणं ही अचिव्हमेंट जाताजाता येते. सुनीताबाई बाहेर आहेत आणि पुलं आतून येऊन सांगत आहेत अशी. हाच कॅमेरा थोडा पलीकडच्या बाजूला गेला असता तर? रात्रीत अंमलदारचा अंक लिहून काढणारे पुलं दिसले असते तर? "दूधभात'ची प्रक्रिया छान दिसली आहे. तसाच भाग थोडा आणखी असता तर पुलंच्या सर्जनाचा प्रवासही थोडा छान पद्धतीनं दिसला असता.
अर्थात या सगळ्या भावना मांडत असताना चित्रपटाची, लेखकांची एक खूप मोठी अडचण झालेली असणार, ती मी नक्कीच समजू शकतो. पुलंनी विपुल लिहिलं असलं, तरी स्वतःविषयी मात्र फार कमी लिहिलं आहे. म्हणजे स्वतःच्या मुशाफिरीविषयी, मैत्राविषयी, कलाकृतींविषयी लिहिलं असलं, तरी स्वतःच्या वैयक्तिक जीवनावर मात्र खूप कमी लिहिलं आहे. मुलाखतींमध्ये वगैरेही असे प्रश्‍न कुणी त्यांना विचारायला धजावलेलं नाही. त्यामुळं त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी "फर्स्ट हॅंड इन्फर्मेशन' फार कमी आहे. जी आहे ती सुनीताबाईंच्या "आहे मनोहर तरी'मधली किंवा तुकड्यातुकड्यांमधून दिसणारी. हा चित्रपट सुनीताबाईंचा जास्त वाटतो, त्याचं कारण तेच असावं. कारण पुलंच्या व्यक्तिमत्त्वाच्या उण्या बाजू आहेत त्या नेमक्‍या या पुस्तकात तपशीलानं आहेत आणि पुलं प्रोटॅगनिस्ट म्हणून जो तपशील हवा आहे तो मात्र फार उपलब्धच नाही. म्हणजे "अंमलदार'चं मी म्हटलं तशी ती प्रक्रिया या लेखक-दिग्दर्शकांना दाखवायला आवडली असतीच, पण त्याचे तपशीलच नाहीत त्याला ते तरी काय करणार? दुसरं असं की पुलंच्या कुटुंबातलं, किंवा त्यांच्या खूप जवळचं असं तरी आता राहिलंय कोण? सुनीताबाईंचे बंधू वगैरे माहिती सांगतील- पण तरी ती चित्रपटासाठी लागणाऱ्या तपशिलांइतकी असेल का? नक्कीच नाही. म्हणजे उद्या माझा मेव्हणा माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कितपत तपशिलानं सांगू शकेल नाही का? त्यामुळं या चित्रकर्मींच्या मर्यादाही मान्यच कराव्या लागतील. म्हणजे पुलं थोडक्‍यात काही गोष्टींबद्दल न बोलता रसिकतेबद्दल भरभरून बोलत राहिले, लिहीत राहिले ही गोष्ट त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणून चांगली, कौतुकास्पद; पण चित्रपट तयार करण्याच्या दृष्टीनं मात्र ती अडसरच.
एवढं सगळं असूनसुद्धा या सगळ्या लोकांनी या गुलबकावलीच्या किंवा उंबराच्या फुलाचा बुके तयार केलाय त्याबद्दल अभिनंदन करायला हवं. दोन-अडीच तासांचा चित्रपट बघून अशी फेसबुकवर किंवा समाजमाध्यमांवर मतं टाकणं हे खूप सोपं आहे याची मला कल्पना आहे. प्रत्यक्ष चित्रपट बघताना हे सगळे चित्रकर्मी केवढ्या वाचनातून, चर्चांमधून आणि प्रक्रियांमधून तावूनसुलाखून गेले असतील याची कल्पनाच फक्त आपण करू शकतो. त्यामुळं त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतोय, वाटत राहील हे शंभर टक्के. एक अवघड काम त्यांनी मूर्त स्वरूपात साकार केलं आहे. अनेक मर्यादा असून, अडचणी असून हा एक वेगळा चित्रपट तयार झाला आहे आणि तो भविष्यातल्या काही प्रोजेक्‍ट्‌सनाही प्रेरणा देणार आहेच. असे चित्रपट तयार करणं हे आधीच्या आणि मधल्या पिढ्यांसाठी जितकं नॉस्टॅल्जिक आणि रसदायी असतं तितकंच पुढच्या पिढ्यांसाठी महत्त्वाचं असतं. पुढच्या पिढीला पुलं कोण हे सांगावं लागतंय हाही भाग महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनंही हे एक डॉक्‍युमेंटेशन तयार झालं आहे. "याच थोड्या किंचित वेंधळ्या, बावळ्या, निरागस, सर्जनशील, कलासक्त माणसानं एके काळी उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं, अजूनही त्याचं नाव घेतलं की दोन-तीन पिढ्यांच्या डोळ्यांत पाणी येतं,' हे पुढच्या पिढीला शब्दांनी सांगायची गरज पडणार नाही. हा चित्रपट बघताना आणि हा चित्रपट बघणारे बघताना त्यांना हे कळणार आहे. साहित्य, संगीत, कलांच्या सहवासात माणसं वेडी होत होती हे त्यांना दिसू द्या. बाकीचे "भाई' त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांतून, नेटफ्लिक्‍सवर दिसत आहेतच...हा "भाई' मात्र त्यांना आपणच दाखवला पाहिजे!
- मंदार कुलकर्णी

प्रिय सुनिता,

पत्राचा मायना बघून तुझ्या नेहमीच्या शैलीत गालातल्या गालात हसलीस ना? समोर असतो तर म्हणालीही असतीस, "काय भाई, बरा आहेस ना?" पण तरीही तू मला प्रिय आहेस हे तू चांगलेच ओळखून आहेस.
आपले लग्न आठवतय? 12जून 1946. दुपारी चहाच्या वेळी तुझे वडील मॅरेज रजिस्टारला घरी घेऊन आले. मी तर घरच्या लेंगा बनियन वर आणि तू पण घरातलीच साडी नेसलेली होतीस. चहासाठी तापवत ठेवलेले दूध उतू जाण्याआधी आपण दोघांनी सह्या केल्या आणि तू सुनिता ठाकूरची सुनिता देशपांडे झालीस. इतक्या सहजपणे आपलं लग्न झालं आणि तो सहजपणा आपल्या नात्यातही होता. मी हा असा सुरात रमणारा पण बराचसा असूरासारखा दिसणारा, गबाळा आणि तू, विलक्षण देखणी, नीटनेटकी आणि शिस्तीचीही.
आपण असे दोन ध्रुवावरून आलेले असल्याप्रमाणे आणि तरीही आपल्यात एक मैत्र, एक विश्वासाचे नाते फुलले. अर्थात तुझ्या समजूतदारपणामुळेच!
माझ्यात एक लहान मुल दडलय तू नेहमी म्हणायचीस. एखाद्या वाया गेलेल्या मुलाला आईने शिस्त लावावी तशी तू मला, माझ्या लिखाणाला शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्न करायचीस. खरेतर तू ही प्रतिभासंपन्न आहेस. उत्तम कलाकार आहेस. मला वंदेमातरम, तुझी दीदीराजे आजही आठवतेय अगदी जशीच्या तशी. पण माझ्यासाठी, माझी प्रतिभा फुलावी म्हणून तू तुझी आवड, तुझ्यातले ते गुण बाजूला सारलेस. मी मला जे वाटेल ते किंवा सुचेल ते लिहून मोकळा व्हायचो पण त्यानंतरचे किचकट सोपस्कार तू तुझ्या अंगभूत शिस्तीने आणि निगुतीने करायचीस. तुझा प्रत्येक बाबतीतला अचूक परिपूर्णतेचा पराकोटीचा अट्टाहास आणि त्यासाठी तू घेत असलेले कष्ट मला अनेकवेळा थक्क करून सोडायचे. कधीकधी तर रागही यायचा मग आपले वाद होत. बहुतेक वेळा मीच हरत असे किंवा माघार घेत असे. तू करशील ते नेहमीच योग्य असेल यावर माझा गाढ विश्वास होता.
माझ्या साहित्याची मी आई होतो पण त्याला सांभाळून, त्याची काळजी घेणारा आणि त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवणारा बाप तू होतीस.
इतकेच नाही तर मिळवलेल्या पैशांची सुद्धा तू उत्तम काळजी घ्यायचीस. तुझ्याशिवाय मी हे कसं करणार होतो माहीत नाही. आम्हा आळशी माणसांच्या मांदियाळीत तुझी फार कुचंबणा होत असेल ना? अग पण मला आपण काही कामे करावीत हे सुचायचेच नाही आणि काही करायला गेलो आणि धडपडून गोंधळ घातला तर परत तुलाच त्रास झाला असता.
तुला आठवतय आपण दिल्लीला असताना धरणीकंप झाला होता. बाकी सगळे भितीने हातातले सामान तसेच टाकून घराबाहेर पळाले. अगदी मी सुद्धा चक्क धावलो पण तू शांतपणे नाटकाला जायच्या आधी जसे घर आवरून कुलूप लावून निघतात तशी अगदी कुलुप लावून बाहेर पडलीस. तुझा व्यवस्थितपणा पाहून जमीन देखील अचंबीत झाली आणि थरथरायचेच विसरून गेली आपल्यामुळे हिच्या  कामात व्यत्यय आला तर ही रागावेल असे त्या पृथ्वीला वाटले होते बहुतेक. तुझा दराराच तसा होता.
तुला सांगतो तू काहीही केलं असतेस तरी ते उत्तम नव्हे सर्वोत्तम केले असतेस तू उत्तम प्रशासक, शिक्षिका, अभिनेत्री, लेखिका आहेस पण यातले काहीही न निवडता तू पूर्णवेळ माझी पत्नी म्हणून वावरलीस. वेळप्रसंगी वाईटपणाही स्विकारलास पण आपली भूमिका तू अत्युत्तम पणे निभावलीस आणि मी सगळे कळून न कळल्यासारखा तुला उपदेशपांडे ही उपाधी बहाल करता झालो. ते ही तू बिरुद म्हणून स्विकारलेस
आपल्या लग्नानंतर आपण रत्नागिरीत होतो. तुमच्या ठाकूरांच्या वाड्यासमोर एक पारिजातकाचे झाड होते. एके दिवशी पहाटे न्हाऊन तू पारिजातकाची फुले वेचीत होतीस. मी मागून येऊन ते झाड हलकेच हलवले. तू पारिजातकाने डवरून निघाली होतीस.फुलात न्हाली पहाट ओली नंतर आपण अभिवाचन करायचो ती महानोरांची कविताच होतीस जणू तू! आपल्यात असे मोहरलेले क्षण कमीच. एरवी तू आई आणि मी तुझे मूल अशाच आपल्या भूमिका होत्या नाही. असाच होतो ग मी माझ्या माझ्यातच गुंतलेला. शब्दसुरांशी खेळणारा.. ... आपल्या लग्नापूर्वी तू भावांसाठी खानावळीतून डबे आणायचीस. ते जड डबे तू एकटीने उचलून चालत असायचीस. मी सोबत असायचो पण कधीही तुझ्या हातातले डबे आपण घ्यावे असे काही सुचले नाही बघ मला. माझ्या डोक्यात सतत काहीतरी घोळत असायचे. वाचलेले, अनुभवलेले इतके काही तुला सांगायचे असायचे त्यातच मी दंग असायचो. हळूहळू तुलाही मी असाच आहे याची सवय करून घ्यावी लागली. हो ना!
लग्नानंतर तुला अनेक धक्केच पचवावे लागले. आम्ही देशपांडे कमालीचे आळशी, बेशिस्त त्यात घरची परिस्थिती बेतास बात पण तू तुझ्या अंगीभूत करारीबाण्यामुळे आणि परिस्थितीला आपण वाकवू शकू या आत्मविश्वासाने आमच्यात रुळायचा प्रयत्न करत होतीस. आपण जवळपास बावीस बिऱ्हाडे बदलली. प्रत्येक वेळी त्यासाठी करावी लागणारी बांधाबांध, नियोजन तूच कर्तेपणाने करायचीस. मी फक्त पक्षाने एका झाडावरून उडून दुसऱ्या झाडावर बसावे तितक्या सहजतेने वावरायचो. आहे त्यात निगुतीने संसार कसा करावा हे तुझ्याकडून शिकावे. सुरुवातीला माझ्या सिगरेटच्या रिकाम्या डब्यात धान्य, डाळी भरून तू संसार मांडला होतास. माझ्या विश्रांतीच्या वेळा पाळणे, माझ्या लिखाणाच्या वेळी कोणतीही  अडचण येणार नाही याबद्दल तू आग्रही असायचीस.प्रत्येक गोष्टीतला तुझा काटेकोरपणा आणि सुत्रबद्धता वाखाणण्याजोगी होती पण मी गमतीने म्हणायचो की शाळेत असताना हिचे शास्त्र पक्के होते कोणतीही गोष्ट सुत्रात(साखळीत) बांधल्याशिवाय हिला चैनच पडत नाही!!
मी चित्रपटात त्याच्या चित्रीकरणात, त्यातल्या गाण्यात अगदी बारीकसारीक गोष्टीत रमायचो. आपला गुळाचा गणपती चित्रपट आठवतोय. त्यात संगीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि नटही मीच होतो. चित्रपट गाजला पण आपल्याला आर्थिक फायदा झाला नाहीच पण मनस्ताप खूप झाला.
तरीही मी चित्रपटात, गप्पांचे फड रंगवण्यात आणि गाण्याबजावण्यातच अडकून राहिलो असतो. अंगभूत आळशीपणामुळे माझाच "गुळाचा गणपती" झाला असता.
तुझ्यात एक व्यवहारी शहाणीव होती. तू मला प्रयत्नपूर्वक हलकेच लेखनाकडे वळवलेस.
त्यासाठी तू अनेक युक्त्या करायचीस आणि मी त्याला बळी पडायचो.
तुझ्या एका वाढदिवसाला मी तुला काय भेट देऊ असै विचारताच उद्याच्या दिवसात 'तुझे आहे तुजपाशीचा' तिसरा अंक लिहून पूर्ण कर हीच माझी भेट असे म्हणालीस. मी अनेक दिवस रेंगाळलेले तिसऱ्या अंकाचे लेखन तीन तासात पूर्ण केले.
माझ्या लेखनाची पहिली समिक्षकही तूच होतीस. मी व्यक्ती आणि वल्ली मधला नामू परीट लिहून तुला ऐकवला. तुझ्याबरोबर प्रफुल्लाही होती. माझे वाचन झाल्यावर प्रफुल्ला त्याची स्तुती करू लागली पण तू तिलाच फटकारलेस. भाई परिटाची भट्टी जमली नाही म्हणताच मी ते कागद तिथल्यातिथे फाडले आणि नव्याने नामू परिटाची घडी बसवायला लागलो. तुझ्यातला समिक्षकही तुझ्या इतकाच कर्तव्य कठोर होता. मी जे काही लिहीन ते सर्वोत्तमच असेल याच्याकडे तू डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवायचीस. तशीही तुझ्याकडे तैलबुद्धी होतीच डोळ्यात वेगळे तेल घालायची गरजच नव्हती. आणि तू डोळ्यात  काजळही घातले नसतेस. तेलबील घालण्याच्या फंदात पडणे तर दूरच. हा मुद्दा अलाहिदा!!
सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेऊन त्यांना फोन करणे त्यांना पत्र लिहिणे हा देखील तुझाच प्रांत होता. माझ्या असले तपशील लक्षातच रहात नसत. तू आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेऊन त्यांचा यथास्थित पाहुणचार करायचीस. आलेला कोणीही असाच पाहुणचाराशिवाय जाणार नाही हे तू बघायचीस. मी  त्या पाहुण्यांबरोबर गप्पा मारण्यात, शाब्दिक कोट्या करण्यात आणि माझी स्तुती ऐकण्यात दंग असायचो. तुला काही मदत करावी हे मात्र सुचले नाही कधी. आणि सुचले असेल तरी जागचे हलायचा प्रचंड आळस!
तू कोणतही काम मन ओतून करायचीस अगदी डाळिंबाचे दाणे सोलताना त्यात एकही पांढरा देठ किंवा पापुद्रा येऊ नये यासाठी दक्ष असायचीस. ते असे सोललेले दाणे काय सुंदर दिसायचे. आणि येणारे पाहुणे त्याचे बोकाणे भरायचे. आपली मेहनत कोणाच्या लक्षात येणार नाही हे माहित असूनही तू कधी कंटाळा केलाच नाहीस. एकदा तुझ्याजवळची डिक्शनरी उघडून त्यात आळस, अव्यवस्थितपणा, कंटाळा हे शब्द खरोखरच नाहीत की काय हे पडताळून पहायचे राहुनच गेले.
आपल्या बटाट्याची चाळचे प्रयोग खूपच छान रंगायचे. मी फक्त स्टेजवर अॅक्टिंग करायचो पण त्यामागची अगदी तिकिटविक्री ते ध्वनीसंयोजन ही सगळी कामे तू करायचीस. कार्यक्रम निर्दोष व्हावा यासाठी तू आग्रही होतीस. लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेला हा कार्यक्रम मी गावोगावी करत राहिलो असतो तरी आपले मस्त चालले असते. पण तू अशी अल्पसंतुष्ट नव्हतीस प्रत्येक एकपात्री प्रयोगाच्या पन्नासाव्या प्रयोगाला नवीन कार्यक्रमाचा जाहिर संकल्प करायचा हा तूच ठरवून दिलेला पायंडा होता. आणि नवीन प्रॉडक्शन रंगभूमीवर येई पर्यंत जुन्या कार्यक्रमाचे प्रयोग करायचे नाहीत हा ही तुझा अट्टाहास. माझ्यातल्या आळशी लेखकाला कामाला लावायची ही तुझी पद्धत होती. पण त्यामुळेच मी वाऱ्यावरची वरात, असामी असामी, वटवट वटवट लिहिले.पण मला दम लागतोय, मी थकतोय हे जाणवताच
हे सगळे कार्यक्रम धो धो चालू असताना, आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे हे प्रयोग तू तितक्याच कठोरपणे बंद करायला लावलेस. अनेकांनी प्रयत्न करूनही तू बधली नाहीस. पण त्यामुळेच माझा उतारवयात केविलवाणेपण देणारा बालगंधर्व झाला नाही.
लोकांकडून घेतलेले लोकांनाच परत करावे या विचाराने आपण (खरे म्हणजे तूच) पु ल देशपांडे प्रतिष्ठानची स्थापना केली. तुझ्या असंख्य व्यापात आणखी एका व्यापाची भर पडली. पण त्यामुळे अनेक मुक्तांगणे निर्माण झाली आणि फुललीही.
आपणच कमावलेले पैसे आपल्यासाठी न वापरता कोणतीही छानछौकी न करता एका व्रतस्थपणे तू सामाजिक कामांसाठी वापरलीस. तुझ्यामुळे हा आनंदाचा, समाधानाचा मळा फुलला!
हे करताना तुला कोठेही मोठेपणा मिळणार नाही किंबहुना तुझे नाव कुठेही येणार नाही याबाबत तू जागरुक असायचीस. स्टेजवर येणे, पुढेपुढे करणे, फोटोसाठी उभे राहाणे याचा तुला पराकोटीचा तिटकारा. त्यामुळे लोकांचे तुझ्याबद्दल गैरसमज झाले तरी तुला त्याची पर्वा नसायचीच.
कविता वाचणे, त्या जगात रमणे तुला प्राणाहून प्रिय. नाधोंच्या, मर्ढेकरांच्या, आरती प्रभूच्या कविता तुला मुखोद्गत होत्या. आपण दोघे काही वर्षे त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम करायचो. वाचिक अभिनय म्हणजे काय याचा वस्तुपाठ तुझ्या काव्यवाचनामुळे उभा रहायचा.
तरीही काही वर्षांनंतर आपण तेही प्रयोग थांबवले.

तुझ्यातल्या कितीतरी गुणविशेषांची मी नेहमीच खिल्ली उडवली किंवा त्याच्यावर शाब्दिक कोट्या केल्या. मला कोणी पुष्पगुच्छ दिला की त्यातली फुले सुटी करून तू फुलदाण्या सजवायचीस. पाणी बदलणे, सुकलेल्या पाकळ्या काढणे हे सगळे तू व्यवस्थित करायचीस. मी गमतीत जपानची इकेबाना आणि सुनिताची सुकेबाना असे म्हणायचो. पण कोणीही दिलेला पुष्पगुच्छ तुझ्यासाठी घरी आणायचो. इतके असले तरी तुझ्यासाठी स्वतः जाऊन फुले आणावीत हे काही तेव्हा कधी सुचले नाही. ते आत्ता सुचले बघ.
तू पिंडाने स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीजींच्या विचारांचा तुझ्यावर पगडा! त्यामुळे वक्तशीरपणा, सत्यवचन आणि अपरिग्रह हे गुण तुझ्या मध्ये होतेच. कमालीची काटकसर करून तू पैसे वाचवायचीस. त्या पैशांचा उपयोग सामाजिक कामांसाठी करायचा तुझा अट्टाहास असे.

माझ्यासाठी तू काय होतीस हे सांगायला माझेही शब्द थीटे पडतील म्हणूनच बहुदा मी चारलोकात तुझी फारशी स्तुती केली नाही.
तू एखाद्या नारळाचे कवच धारण केलेल्या काटेरी फणसासारखी आहेस. ती तुझी कवचकुंडले भेदून तुझ्यापर्यंत पोचणाऱ्यांना मग रसाळ गऱ्यांची मेजवानी मिळे.
कुठे थांबायचे हे तुला अचूक कळते. पण मला कळत नाही ग. मी आपला लिहितच गेलो. भाई आता पुरे हे म्हणायला तू आत्ता माझ्याजवळ नाहीस म्हणून इतका वाहावत गेलो.
तू लवकर ये असे तरी कसे म्हणू? पण तुझी वाट बघतोय असे तरी नक्कीच म्हणू शकतो.

कुसुमाग्रजांची एक कविता आहे बघ
समिधाच सख्या त्या
जात्याच रुक्ष त्या
त्यात कसा ओलावा.
तशी तू आहेस जात्याच रूक्ष नाहीस तरीही माझ्यातले लेखकाचे स्फुल्लिंग सतत चेतवत राहिलीस.
तुझ्यावर नेहमीच लोभ करणारा

                           तुझा भाई

समिधा गांधी