Tuesday, June 25, 2019

चांदणे तुझ्या स्मरणाचे ग्रेस

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!!

, “ही कविता मला खूप आवडते, पण कळत नाही!” असं फक्त ग्रेसच्या कवितेच्या बाबतीतच म्हंटलं जाऊ शकतं. “कळली नाही मग आवडली कशी?” हा प्रश्नच उद्भवत नाही. याला कारण ग्रेसची विलक्षण अद्भुत प्रतिमासृष्टी. (याच कारणाने जीए आवडतात.)

‘भय इथले संपत नाही’ ही कविता तशीच आहे. अनेकांना ‘आवडते’ पण ‘कळत’ नाही. त्यात शब्दांची चमत्कृती नाही पण उपमांची भरपूर आहे. मला ती जशी ‘कळली’ आहे, तशी मी लिहिते. कुठलीही चांगली कविता ही प्रत्येक वाचकासमोर वेगळे विभ्रम घेऊन येत असते. प्रत्येकजण त्यातून वेगळे अर्थ काढत असतो. तो कवीच्या अर्थाशी जुळेल किंवा जुळावा असा काहीही नियम चांगल्या कवितेला लावता येत नाही. त्यात वाचकाची बुद्धी, त्याची आकलनशक्ती, त्याची संवेदनशीलता आणि त्याची त्या-त्या वेळची मनोवस्था, याचा खूप मोठा सहभाग असतो. मला लागलेला अर्थ जेव्हा मी ग्रेसना सांगितला होता तेव्हा ते फक्त हसले होते. पण त्यानंतर एका विद्वानांच्या बैठकीत त्यांनी मला तो अर्थ सांगण्याचा आग्रह केला होता.

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

“भय इथले संपत नाही” हे काही भित्र्या मनाचे कन्फेशन नाहीये. ते वैचारिक स्थित्यन्तराचे वळण आहे.. त्यातली संध्याकाळ हा आयुष्याचा संधिकाल आहे. तारुण्य पूर्ण गेलेलं नाही, वार्धक्यात काय वाढून ठेवलेले असेल हे नीटसं माहीत नाही, असा जीवाला रुखरुख लावणारा संधिकाल. देवाची याद यायला लागलेली असते, पण जवानीत केलेल्या मस्तीची सय मनामागे गेलेली नसते.. काही चुकांच्या सावल्या भेडसावत असतात.. अशी ही आयुष्याची संध्याकाळ..!! कातरवेळ..!!

या कवितेची सुरुवातच अनपेक्षित होते, हे आणखी एक सौंदर्यस्थळ.. एक, दोन, तीन, चार करत दहापर्यंत जात नाही ही कविता.. पाच, सहा, सात…. मग एक, दोन, तीन, चार आणि मग सफाईदारपणे आठ, नऊ, दहा असा प्रवास आहे तिचा… पुढच्या पंक्ती-

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
यातले ‘झरे’ हे लैंगिकतेचं प्रतिक आहे.. पृथ्वीचे भगवे सन्यस्तपण ही ‘माया’ म्हणजे खोटी वाटावी, असं वय.. आपल्यातून पुन्हा-पुन्हा काहीतरी, कोणीतरी ‘उगवत’ राहावे या ओढाळ असोशीपायी सततचा लैंगिक संग… उफ्फ….
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया…
(माणसाला तंत्र-विद्येत ‘झाड’ म्हणतात. ग्रेसना अशा गूढ गोष्टींचे आकर्षण होते. त्यांच्या-माझ्या मैत्रीचा समान दुवा होता तो. या गूढाच्या आकर्षणापाई त्यांच्या प्रतिमा खूपदा गूढ असत. तंत्रविद्येत सामान्य माणसाला शून्य किंमत असते. तो तांत्रिकाच्या हातातले बाहुले असतो, झाड असतो. संसारात असतांना आपली किंमत ही शून्य असते. आपण ‘त्या वरच्या तांत्रिका’च्या हातातले बाहुले असतो. झाड असतो.. आणि ही झाडं एकमेकांना भिडत असतात, जुगत असतात.. “झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया…!!” माणसाला असणाऱ्या ‘वंशसातत्या’च्या ओढीवर केलेला प्रहार आहे हा..!!)

त्या वेली नाजुक भोळ्या, वाऱ्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

या चारी ओळी म्हणजे तारुण्यातल्या आनंदाचा, शृंगाराचा काळ.. आणि त्या शृंगाराला आलेलं फूल.. आपलं अपत्य..!! त्याचे ते बोबडे बोल माणसाच्या पूर्ण आयुष्याचा ताबा घेतात. सीतेला हाकलून दिल्यानंतर तिच्याजवळ रामाचा एक शेला होता. त्याचा स्पर्श तिला आनंद द्यायचा, समाधान द्यायचा. पण ते खोटं होतं. अखेर तिला धरणीच्या पोटातच आधार घ्यावा लागला. आपली मुलं त्या शेल्यासारखी असतात/असू शकतात. अंत एकाकीच असतो.

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ, फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

हाकेच्या अंतरावर देऊळ होतं.. पण मी, संध्येतील कमल फुलासम, नटलो शृंगाराने.. सगळे चोचले देहाचे.. दैहिक इच्छांचे रान माजलेले.. आणि मी याचक.. प्रेम द्या, सुख द्या.. माझ्या भुका भागातच नव्हत्या.. माझी प्यास शमतच नव्हती… आणि अशातच एक दिवस, मी पसरलेल्या माझ्या ओंजळीतच तो खांब फुटला… ज्या खांबातून नरसिंहाने उग्र दर्शन देऊन विलासात लिप्त असलेल्या माझ्या राक्षसरूपी मनाचे निर्दालन केले. (हे नरसिंह-हिरण्यकश्यपू कथेचे रूपक आहे.)
आणि मग…

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

आता मी इतका रूपांतरित झालोय की माझ्या इंद्रियांना आता तुझ्या स्तोत्राशिवाय काही सुचत नाही. त्यांना पूर्वीची ओढ आजही लागते. पण ते कुणातरी परक्याचे दु:ख आहे असंच वाटतं मला.. कारण.. आता माझ्या स्मरणात फक्त तू आहेस.. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

‘लागा चुनरी में दाग’ हे कळलं आणि ‘छुपाऊं कैसे’ हा घोर लागला..!! डोळ्यावर आलेले ते धुके म्हणजे डोळ्याचा भ्रम होता हे लक्षात आल्यावर देवा, आता मला तुझ्याकडे परतायची घाई झाली आहे.. सगळ्या इच्छा पूर्ण होऊन गळून पडल्या आहेत, (आता मला बोलावून घे तुझ्याकडे… कारण आता हे जग मला भीतीदायक वाटतं, ते मला तुझ्यापासून दूर नेतं..) भय इथले संपत नाही.. मज तुझी आठवण येते.. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते..

देवत्वाची प्रचिती आल्यावर प्रामाणिकपणे केलेली ही आर्त आळवणी आहे, प्रार्थना आहे..!!

Maithili Subhash

Tuesday, June 4, 2019

सोलकढी वैभव साटम

सोलकढी

   हल्लीच कधी मी एका दक्षिणात्य मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो, उन्हाळा हा हा म्हणत होता.एका बाजूला सनई- चौघडे वाजत होते ,दुसऱ्या बाजूला गजरे वाटणे सुरू होतं .सर्व पाहुणे मंडळी, माझ्या मित्राकडची मंडळी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत होती,मला त्यांची भाषा अवगत नव्हती.त्यांच्या संभाषणातला  एक शब्द कळेल तर शपथ !. तेवढ्यात केटरिंगवाल्यानी  "वेलकम  ड्रिंक " घेऊन आले . काचेच्या ग्लासमधून दिलेलं ते ड्रिंक मला प्रथमदर्शनी पेरू किंवा गुलाब सरबत असावं असे वाटले.माझ्या हातात वेटरने ते ग्लास दिलं ,आणि ते पिऊ लागलो .त्या पेयाची चव  चाखली आणि मी उडालोच ! . ते थंड पेय म्हणजे चक्क सोलकढी होती. आपल्या कोकणातील सोलकढी लग्नसमारंभात "वेलकम ड्रिंक " म्हणून मिरवतेय या पेक्षा आनंद तो कोणता ! .एका दाक्षिणात्य लग्नात लोक "सोलकढी" आवडीने पितात हे बघून आनंद होत होता. सोलकढीचे गुणधर्म त्या लोकांना माहीत असतील का ? किंवा जे लोक सोलकढी वाटत होते त्यांना तरी तिचे गुणधर्म माहीत असतील का ? ....सुतराम ही शक्यता नसेल . पण हल्ली उन्हाळ्यात जागोजागी थंडगार सोलकढी मिळेल असे बोर्ड लागलेले आढळतात.

  सोलकढी ही प्रादेशिक खाद्यसंस्कृती आहे ,याचे कारण सोलकढी बनवण्यासाठी लागणारी रातांबीची झाडे मुख्यतः कोकणात - त्याहीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात .त्यामुळे ही सोलकढी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जवळची वाटणं तशी स्वभावीक आहे. रातांबी " धरली " म्हणजे ते झाड फळांनी लगडून वाकलं आहे असं कोणी सांगताच , घरातले सर्वजण  हातात फाटी आणि मोठी काठी घेऊन  रातांबीच्या झाडाजवळ जातात.कोणतरी एकजण झाडावर चढून रातांबीची फळं खाली पाडतो आणि मग खालची मंडळी ती फळं निवडतात .रातांबीची लाल बुंद झालेली फळं अगदी डोळ्यात भरतात. डॉ महेश केळुसकर यांनी या रातांबी रंगाला मराठी कवितेत स्थान दिलं . त्यांच्या " मोर " या कवितेत.

तिळफुलांच्या शेतात
तू हात घेतलेस हातात
तेव्हापासून साखरझोपेत माझे
रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात

हे रातांबी ओठ म्हणजे लालसर रंगाचे .  रातांबी रंग जसा कवितेत आला त्याचप्रमाणे सोलकढी देखील मराठी साहित्यात मान मिळवून आहे .कवी विजय चिंदरकर यांनी आपल्या कवितेत

  हा सारा अन थाट हवा
अन हवीत सारीअवतीभवती
  सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या त्या तानेवरती

अशी एक ओळ आहे. ही कविता १९५८ साली मालवण येथे झालेल्या साहित्यसंमेलनात सादर केली. त्यावेळी उपस्थितांपैकी आचार्य अत्रे यांना त्या कवितेतल्या सोलकढीचे इतकं भारावून टाकलं की ,या मालवणच्या साहित्य संमेलनाची सांगता "सोलकढीच्या भैरवीने " झाली असा आशय घेऊन  या संमेलनावर अग्रलेख आपल्या मराठा या वर्तमानपत्रात  लिहिला . ज्या आचार्य अत्र्यांना ह्या सोलकढीचे भुरळ घातली त्या सोलकढी बनवण्यासाठी जे कष्ट लागतात ते मात्र तोंडातून फेस आणणारे असतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

     झाडावरून पाडलेले रातांबीची  फळं  गोळा केली की ,ती खळ्यात पसरून ठेवायची. ती लालबुंद फळं  मधोमध फोडून त्याचे दोन-तीन भाग करून त्यातील बिया वेगळ्या करायच्या.आणि सालं बाजूला करायची ,ही फळं फोडताना हाताच्या बोटांची चामडी नरम होते.एखाद्याला जर  बोटाला जखम झाली असेल तर रातांबे फोडताना त्या जखमेला भगभग व्हायची ,रातांब्याच्या फळात असणाऱ्या रासायनिक आम्लचा तो परिणाम असतो. ही फळं फोडताना गावच्या गजाली मात्र रंगतात, इथल्या माणसाला ज्या गजालींचं वरदानच आहे .वर्षानुवर्षे ह्या गजाली मारण्यात काही विशेष फरक पडला नाही .
   ज्या फळांना झाल्यानंतर ती फोडलेल्या फळांना सुकवून,आतील बियांच्या पाण्यात टाकून ठेवतात ,ज्याला तळकोकणात "आगुळ" म्हणतात. ही आगुळ पिऊन तृप्त झालेली रातंबीची फळं मग आपला रंग बदलतात,काहीशी काळपट रंग धारण करतात .आणि मग कोकम किंवा सोलाच्या रूपाने आपल्या पुढे सादर होतात.ह्याच कोकमाची  किंवा सोलाची नारळाचा रस काढुन जी कढी बनवतात त्यालाच "सोलकढी" म्हणतात .

  आजकाल टीव्हीवर कॉफीची जाहिरात दाखवतात ,त्यात  अशी कॉफी माझ्या घरी पण बनवू शकतो का ?  हा प्रश्न  विचारल्यावर तो शेतकरी त्याला जे उत्तर देतो ते फार समर्पक आहे तो म्हणतो ,ही चांगली कॉफी बनवण्यासाठी कॉफीची फळं त्या दर्जाची असावी लागतात .हाच नियम सोलकढीला देखील चांगल्याप्रकारची चविष्ठ सोलकढी बनवण्यासाठी कोकमाचा दर्जा देखील त्या प्रतिचा असावा लागतो. ती कोकमं किंवा सोलं ही तळकोकणातच मिळतात .  सोलकढी ही संस्कृती जगभर रूढ होण्याआधी ती तळकोकणात रुजलेली आहे ,तिची पाळंमुळं ही इथल्या खाद्यसंस्कृतीशी आपले नातं सांगते .मांसाहारी विशेषतः मटण , चिकनच्या जेवणानंतर सोलकढी ही हवीच .  गावच्या घरात "भट " वाढला की,जेवणात भटजीकाकांना सोलकढी करा म्हणून सांगायला यजमानी विसरत नाही ,का तर  ती संस्कृती तिथे मुरली आहे.

    या सोलकढीचे आता केवळ कोकण किंवा महाराष्ट्र जोडला नसून ,संपूर्ण भारत जोडत आहे .जी सोलकढी सिंधुदुर्गाखेरीज बाकी जिल्ह्यात माहीत नव्हती ती आज जगमान्य झाली आहे ,यात त्या मुलूखतील मातीचे विशेष गुण आहेत हे मान्य करावे लागेल ..

प्रा वैभव साटम
आयनल ,कणकवली