Tuesday, June 4, 2019

सोलकढी वैभव साटम

सोलकढी

   हल्लीच कधी मी एका दक्षिणात्य मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो, उन्हाळा हा हा म्हणत होता.एका बाजूला सनई- चौघडे वाजत होते ,दुसऱ्या बाजूला गजरे वाटणे सुरू होतं .सर्व पाहुणे मंडळी, माझ्या मित्राकडची मंडळी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत होती,मला त्यांची भाषा अवगत नव्हती.त्यांच्या संभाषणातला  एक शब्द कळेल तर शपथ !. तेवढ्यात केटरिंगवाल्यानी  "वेलकम  ड्रिंक " घेऊन आले . काचेच्या ग्लासमधून दिलेलं ते ड्रिंक मला प्रथमदर्शनी पेरू किंवा गुलाब सरबत असावं असे वाटले.माझ्या हातात वेटरने ते ग्लास दिलं ,आणि ते पिऊ लागलो .त्या पेयाची चव  चाखली आणि मी उडालोच ! . ते थंड पेय म्हणजे चक्क सोलकढी होती. आपल्या कोकणातील सोलकढी लग्नसमारंभात "वेलकम ड्रिंक " म्हणून मिरवतेय या पेक्षा आनंद तो कोणता ! .एका दाक्षिणात्य लग्नात लोक "सोलकढी" आवडीने पितात हे बघून आनंद होत होता. सोलकढीचे गुणधर्म त्या लोकांना माहीत असतील का ? किंवा जे लोक सोलकढी वाटत होते त्यांना तरी तिचे गुणधर्म माहीत असतील का ? ....सुतराम ही शक्यता नसेल . पण हल्ली उन्हाळ्यात जागोजागी थंडगार सोलकढी मिळेल असे बोर्ड लागलेले आढळतात.

  सोलकढी ही प्रादेशिक खाद्यसंस्कृती आहे ,याचे कारण सोलकढी बनवण्यासाठी लागणारी रातांबीची झाडे मुख्यतः कोकणात - त्याहीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात .त्यामुळे ही सोलकढी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जवळची वाटणं तशी स्वभावीक आहे. रातांबी " धरली " म्हणजे ते झाड फळांनी लगडून वाकलं आहे असं कोणी सांगताच , घरातले सर्वजण  हातात फाटी आणि मोठी काठी घेऊन  रातांबीच्या झाडाजवळ जातात.कोणतरी एकजण झाडावर चढून रातांबीची फळं खाली पाडतो आणि मग खालची मंडळी ती फळं निवडतात .रातांबीची लाल बुंद झालेली फळं अगदी डोळ्यात भरतात. डॉ महेश केळुसकर यांनी या रातांबी रंगाला मराठी कवितेत स्थान दिलं . त्यांच्या " मोर " या कवितेत.

तिळफुलांच्या शेतात
तू हात घेतलेस हातात
तेव्हापासून साखरझोपेत माझे
रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात

हे रातांबी ओठ म्हणजे लालसर रंगाचे .  रातांबी रंग जसा कवितेत आला त्याचप्रमाणे सोलकढी देखील मराठी साहित्यात मान मिळवून आहे .कवी विजय चिंदरकर यांनी आपल्या कवितेत

  हा सारा अन थाट हवा
अन हवीत सारीअवतीभवती
  सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या त्या तानेवरती

अशी एक ओळ आहे. ही कविता १९५८ साली मालवण येथे झालेल्या साहित्यसंमेलनात सादर केली. त्यावेळी उपस्थितांपैकी आचार्य अत्रे यांना त्या कवितेतल्या सोलकढीचे इतकं भारावून टाकलं की ,या मालवणच्या साहित्य संमेलनाची सांगता "सोलकढीच्या भैरवीने " झाली असा आशय घेऊन  या संमेलनावर अग्रलेख आपल्या मराठा या वर्तमानपत्रात  लिहिला . ज्या आचार्य अत्र्यांना ह्या सोलकढीचे भुरळ घातली त्या सोलकढी बनवण्यासाठी जे कष्ट लागतात ते मात्र तोंडातून फेस आणणारे असतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

     झाडावरून पाडलेले रातांबीची  फळं  गोळा केली की ,ती खळ्यात पसरून ठेवायची. ती लालबुंद फळं  मधोमध फोडून त्याचे दोन-तीन भाग करून त्यातील बिया वेगळ्या करायच्या.आणि सालं बाजूला करायची ,ही फळं फोडताना हाताच्या बोटांची चामडी नरम होते.एखाद्याला जर  बोटाला जखम झाली असेल तर रातांबे फोडताना त्या जखमेला भगभग व्हायची ,रातांब्याच्या फळात असणाऱ्या रासायनिक आम्लचा तो परिणाम असतो. ही फळं फोडताना गावच्या गजाली मात्र रंगतात, इथल्या माणसाला ज्या गजालींचं वरदानच आहे .वर्षानुवर्षे ह्या गजाली मारण्यात काही विशेष फरक पडला नाही .
   ज्या फळांना झाल्यानंतर ती फोडलेल्या फळांना सुकवून,आतील बियांच्या पाण्यात टाकून ठेवतात ,ज्याला तळकोकणात "आगुळ" म्हणतात. ही आगुळ पिऊन तृप्त झालेली रातंबीची फळं मग आपला रंग बदलतात,काहीशी काळपट रंग धारण करतात .आणि मग कोकम किंवा सोलाच्या रूपाने आपल्या पुढे सादर होतात.ह्याच कोकमाची  किंवा सोलाची नारळाचा रस काढुन जी कढी बनवतात त्यालाच "सोलकढी" म्हणतात .

  आजकाल टीव्हीवर कॉफीची जाहिरात दाखवतात ,त्यात  अशी कॉफी माझ्या घरी पण बनवू शकतो का ?  हा प्रश्न  विचारल्यावर तो शेतकरी त्याला जे उत्तर देतो ते फार समर्पक आहे तो म्हणतो ,ही चांगली कॉफी बनवण्यासाठी कॉफीची फळं त्या दर्जाची असावी लागतात .हाच नियम सोलकढीला देखील चांगल्याप्रकारची चविष्ठ सोलकढी बनवण्यासाठी कोकमाचा दर्जा देखील त्या प्रतिचा असावा लागतो. ती कोकमं किंवा सोलं ही तळकोकणातच मिळतात .  सोलकढी ही संस्कृती जगभर रूढ होण्याआधी ती तळकोकणात रुजलेली आहे ,तिची पाळंमुळं ही इथल्या खाद्यसंस्कृतीशी आपले नातं सांगते .मांसाहारी विशेषतः मटण , चिकनच्या जेवणानंतर सोलकढी ही हवीच .  गावच्या घरात "भट " वाढला की,जेवणात भटजीकाकांना सोलकढी करा म्हणून सांगायला यजमानी विसरत नाही ,का तर  ती संस्कृती तिथे मुरली आहे.

    या सोलकढीचे आता केवळ कोकण किंवा महाराष्ट्र जोडला नसून ,संपूर्ण भारत जोडत आहे .जी सोलकढी सिंधुदुर्गाखेरीज बाकी जिल्ह्यात माहीत नव्हती ती आज जगमान्य झाली आहे ,यात त्या मुलूखतील मातीचे विशेष गुण आहेत हे मान्य करावे लागेल ..

प्रा वैभव साटम
आयनल ,कणकवली

No comments:

Post a Comment