Friday, January 10, 2020

मॅटीनी

*मॅटीनी*                        

परवा एका फॅमिली गेट टूगेदरला 'मॅटिनी' शब्द ऐकला आणि पन्नास वर्षांपूर्वीच्या काळा (१९७०-७१) च्या सुमारास पोहचलो.                                    

मल्टिप्लेक्स हे नावही कोणी ऐकले नव्हते. पण नवीन चित्रपट एका पेक्षा जास्त थिएटर्स मधे लागत होते. पुण्यात कोणताही नवीन चित्रपट लागायचा तेव्हा एक मुख्य थिएटर असायचे आणि तेव्हा नुकत्याच विकसित झालेल्या उपनगरांमधील थिएटरमध्येही तो लागायचा. मुख्य थिएटरमध्ये दुपारी तीन, संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ असे तीन शो दाखवले जायचे. दुपारी बारा वाजताच्या शो ची वेळ - मॅटीनी शो साठी - मुद्दाम जुन्या सिनेमासाठी राखून ठेवली जायची. उपनगरांमधील थिएटरमध्ये मात्र दुपारी बारा वाजता मॅटीनी शो च्या वेळीही नवीनच सिनेमा दाखवीत असत.           
दुपारी बाराचा मॅटीनी शो हे जादूभरे शब्द होते. मॅटीनी शो ची मोहिनी जबरदस्त होती. त्या काळी ५ ते २५ वर्षे जुने असलेले चित्रपट म्हणजे साधारण १९४५ ते १९६५ या काळातील चित्रपट मॅटीनीला दाखवले जायचे. त्यामुळे या मॅटीनी शो ला अबाल वृद्धांची गर्दी असायची. तेव्हाची प्रौढ पिढी ५०/५५ वयाची अंदाज, बरसात, अनारकली,  बैजूबावरा, बाझी, नागिन वगैरे चित्रपटांना गर्दी करून आपल्या तेव्हाच्या आठवणी ताज्या करीत असे. साधारण ३०/४० वयोगटातील पिढी पेईंग गेस्ट. मधुमती. अनाडी. तुमसा नहीं देखा मधील गाण्यांवर ताल धरण्यासाठी, उजाला, शरारत मधील "मोरा नादान बालमा" "तेरा तीर ओ बे पीर" गाण्यांवरील कुमकुमच्या डान्स वर शिट्ट्या मारायला या चित्रपटांच्या वार्या करीत. नंतरची नवीन पिढी एक मुसाफिर एक हसीना, चायना टाऊन, जंगली, मेरे मेहेबूब, राजकुमार, हम दोनों या चित्रपटांवर फिदा होती. देव आनंद, शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार हे मॅटीनी आयडॉल होते. त्यांचे चित्रपट मॅटीनी शो ला गर्दी खेचत असत.                               

या मॅटीनीला आणखी एक प्रेक्षक वर्ग होता. तो म्हणजे वाड्यातील १४/१५ जणांचा निरनिराळ्या वयांच्या व्यक्तींचा पण एकत्र असलेला कंपू. वर्षातून पाच वेळा तरी हा कंपू एकत्र यायचा. एकदा नदीला पाणी आले की ते पहायला लकडी पुलावर (आताचा संभाजी पूल - तेव्हा पुण्यात नदीवर तीनच पूल होते लकडी पूल नवा पूल आणि संगम ब्रिज) हा कंपू जाणार. दुसरे म्हणजे वाड्यातील जो कोणी (अकरावी) मॅट्रिकला असेल त्याला बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी डबा घेऊन भेटायला हा कंपू जाणार. (तेव्हा एका दिवसात अकरा ते दोन आणि तीन ते सहा असे दोन पेपर असत. त्यामुळे या परीक्षार्थीला मधल्या वेळात डबा देत असत) तिसरे म्हणजे उन्हाळ्यात सुट्टीत दुपारी चार वाजता जाऊन भरपूर खेळणार आणि भेळ खाऊन रस पिऊन घरी येणार. चौथी वेळ म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत शनिवार /नारायण पेठेतून वाड्यातूनच डबे घेऊनच निघून अरण्येश्वर पद्मावती किंवा विठ्ठलवाडी पर्यंत पायी जाऊन दिवस भराची ट्रीप एन्जॉय करायचा. हाच कंपू वर्षातून एकदा मॅटीनीला जात असे. काका काकू मावशी दादा ताई मुले सर्व असल्याने जागृती. चलती का नाम गाडी. 'भाभी', 'छोटी बहन' यासारखे चित्रपट निवडले जात.                              

युवकांमध्ये मॅटीनीचे वेड जास्त होते. मधुबाला मीना कुमारी माला सिन्हा शकीला साधना यांच्या चित्रपटांना तर तोबा गर्दी होत असे. शिवाय मॅटीनीचे तिकीटाचे दरही कमी असत.
जुने सिनेमे पहायला भाग्य लागायचे. आज केव्हाही नेटवर हवा तो सिनेमा पाहता येतो. तेव्हा तसे नव्हते. "आहें ना भरी" ही हिंदी सिनेमातील पहिली कव्वाली ज्या मधे होती आणि नूर ए तरन्नुम नूरजहाँ नायिका होती (आंधियां गमकी यूं चली) तो "झीनत" नावाचा सिनेमा माझ्या आठवणीत फक्त एका रविवारी मॅटीनीला एका शो पुरता विजयानंद ला दाखवला होता. तोपर्यंत नूरजहाँचा एकही चित्रपट पाहिला नव्हता. अर्थातच ती संधी आम्ही सोडली नाही हे वेगळे सांगणे नलगे । पण सांगायची गोष्ट अशी की हे फक्त मॅटीनी मुळे  शक्य झाले.                                 

मॅटीनीला जायचे ठरवणे हा एक प्रोग्रामच असायचा. चार पाच जणांचे टोळके त्यावर चर्चा करीत. "परवा कुठला टाकायचा?"  कोणी तरी विषयाला तोंड फोडत असे. "असली नकली" ला जाऊ. कोणी तरी 'आपली आवड' सांगायचा. ('तेरा मेरा प्यार अमर' गाण्यातली साधना पुन्हा एकदा पाहण्याचा मोह त्याला झालेला असायचा. तेव्हा सिनेमा शिवाय गाणे पाहण्याची दुसरी काहीच सोय नव्हती). तिसरा म्हणायचा 'दिल देके देखो' ला चला यार शम्म्याला बरेच दिवसात पाहीले नाही. आता हा ठराव पास होणार तेवढ्यात एक जण म्हणायचा "हे सगळे नंतर बघता येतील." निशात "ला" बावरे नैन "लागला आहे तो बघू." बाकीचे सगळे प्रश्नार्थक चेहरे करतात. तो पुढे स्पष्टीकरण द्यायचा "अरे मुकेशचे तेरी दुनिया में, खयालों में किसी के, राजकुमारी चे सुन बैरी बलम गाणी आहेत त्यात. आणि राज कपूर हीरो आहे आणखी काय हवे?" मंडळींना त्याचे म्हणणे पटायला लागले असते पण थोडे साशंक असतातच. पण तो संशय  दूर करण्यासाठी "आणि पिक्चरमध्ये गीता बाली नऊवारी मध्ये आहे बरं का " असे तो शेवटचे अस्त्र काढतो. लगेच 'बावरे नैन' वर शिक्कामोर्तब होते आणि रविवारी अंमलबजावणी होते.        
दुसऱ्या ग्रुपला वेगळीच चिंता लागलेली असायची. फण्डस ची! पक्या म्हणायचा "विष्ण्या, (याचे खरे नाव सुधीर) च्यायला, खूप दिवसात लेका तू पिक्चरची सोय केली नाहीस. यावेळी काही तरी कर". (जुन्या नोटा चलनातून बाद होतात तसे च्यायला, लेका हे शब्द बाद होत आहेत.) तो देखील ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे स्वीकारून "बघतो. करतो काही तरी" असे आश्वासन द्यायचा. (ही वेळ प्रत्येकावर कधी तरी यायचीच). रविवारी सकाळी अकरा वाजता आळीच्या तोंडाशी पारावर ग्रुप त्याची वाट बघत बघायचा. खिशात हात घालून शिट्टी वाजवत येणारा विष्ण्या दिसला की काम फत्ते झाले हे कळायचे. "कुठून जुगाड लावलंस रे?" कोणाची तरी उत्सुकता बाहेर पडायचीच. "होती घरात तीन महिन्यांची रद्दी. आपलं काम झाले. ठरवा कुठे जायचं आहे ते." उत्तर मिळायचं "ठरवा काय? बंड्या गेलाय आधीच लायनीत नंबर लावायला " मग सर्व मंडळी आधीच ठरलेल्या "चौदहवीं का चांद" पहायला जायची.                                       

तेव्हाच्या तरूणीही मॅटीनीला जाण्यात मागे नव्हत्या. चार पाच मैत्रिणी प्रत्येकीच्या घरी जाऊन तिच्या आईला "काकू आम्ही सिनेमाला जातो ना. संध्या सुनंदा शैला सगळ्यांच्या आईनी परवानगी दिली आहे. तुम्ही पण रंजनाला पाठवा ना" असं सांगून सर्व आयांची परवानगी घेत. सिनेमाला जायचे ठरले, सिनेमा, थिएटर सर्व ठरले आता प्रश्न एकच. "एवढ्या गर्दीत तिकिटाच्या लायनीत तास भर उभे राहून तिकीट कोण काढणार? मग त्यातली रंजना - म्हणजे माझी ताई - मला म्हणायची, "आम्हाला तिकीटे काढून दे ना" मग मी - इयत्ता दहावी - पांढरा शर्ट खाकी हाफ पॅन्ट मधे खोचून ताईने दिलेले सहा रुपये संभाळत थिएटर मध्ये तिकीटांच्या लायनीत तास सव्वा तास आधीच जाऊन उभा रहायचो. त्यातून ग्लोब (श्रीनाथ) किंवा मंडईतले मिनर्ह्वा (आता वाहनतळ) थिएटर असले तर विचारूच नका. तिकीट खिडकी पर्यंत जाण्यासाठी संपूर्ण लायनीलाच लाकडी खुराड्यातून जावे लागे. पावणे बारा वाजता ताई आणि तिच्या मैत्रिणी आल्या आणि माझ्या कडून तिकीटे मिळाली की माझी रवानगी घरी व्हायची. "मैत्रिणींमधे तू कशाला?" म्हणून मला कन्नी दिली जायची.  तिच्या साठी मेरे सनम, तीसरी मंजिल ची तिकीटे काढलेली पक्की लक्षात आहेत. पण पुढे आणखी मोठे झाल्यावर याच ताईने मला मॅटीनीलाच नेऊन मिस मेरी, शबाब आणि नई दिल्ली हे सुंदर चित्रपट दाखवले हे ही तितकेच खरे!                           

'नव्या ओळखी' करण्यासाठी मॅटीनी तिकिटांची लाईन हे एक व्यासपीठ होते. एखाद्या मुलीला हेरून एखाद्या दिवशी थिएटर मध्ये तिला लायनीत उभे राहिलेले पाहून तेव्हाची सर्व कामे विसरून तो मॅटीनी शो पाहणारेही काही वीर होते. तसेच स्त्रियांच्या रांगेत उभे असलेल्या हव्या त्या मुलीला "मिस, एक्सक्यूज मी पण जेन्टस लाईन फारच मोठी आहे. तिकीट मिळेल असे वाटत नाही. प्लीज आमची दोन तिकीटे काढता का?" असं म्हणून तिच्या हातात पैसे देणारे वीरही होते. आणि त्यात जर पलीकडून प्रतिसाद मिळाला तर मग काय- बहार ही बहार!          

या नवीन झालेल्या ओळखी वाढवण्यासाठीही मॅटीनी फार उपयोगी पडत. 'कोहरा', 'आरती', 'बात एक रात की' वगैरे चित्रपट मॅटीनीला लागत, पण रविवार आणि सुटी सोडून इतर दिवशी त्यांना फारशी गर्दी नसे. त्यामुळे असे चित्रपट, झालेल्या ओळखी वाढवण्यासाठी सोईस्कर असत.                                          

मॅटीनी वरून एक गंमत आठवली. घरी पाहुणे आले होते. वडीलांना रात्रीच्या शो ची तिकीटे काढून आणायला सांगितले होते कारण थिएटर त्यांच्या अॉफीस जवळ होते. संध्याकाळी साडे पाच वाजता ते आले आणि मला तिकीटे दिली. तिकीटे पाहून मी चुकलो. "काका ही तर संध्याकाळी साडे सहाच्या शो ची तिकीटे आहेत. तेही गोंधळले, म्हणाले, "अरे पण मी तर सेकंड शो चीच तिकीटे मागितली होती." 
मग मी म्हणालो "काका दुपारी तीन चा शो पहिला, संध्याकाळी सहाचा शो दुसरा आणि रात्रीचा शो तिसरा असतो "ते म्हणाले" असं होय?  आमच्या वेळी संध्याकाळी पहिला आणि रात्रीचा शो दुसरा असायचा "मग सर्वांनी धावपळ करत संध्याकाळी साडे सहाचा शो गाठला आणि सुरूवाती पासून पूर्ण पाहीला. हेमा मालिनी चा "मीरा". पण उत्सुकता म्हणून मी काकांना विचारले" मग दुपारच्या शो ला तुमच्या वेळी काय म्हणायचे?"
त्यांचे उत्तर होते "अरे तो मॅटीनी शो असायचा".                                 

काळ कसा बदलत गेला. वडिलांच्या वेळी दुपारी मॅटीनी संध्याकाळी पहिला रात्री दुसरा शो होता. नंतरच्या काळात दुपारी बारा वाजता मॅटीनी तीन वाजता पहिला सहा वाजता दुसरा आणि नऊ वाजता तिसरा शो असे झाले. आज आता एका थिएटर मधे किती चित्रपट असतात आणि किती शो होतात त्याला गणतीच नाही. सकाळी साडे नऊ पासून रात्री साडे अकरा पर्यंत कोणत्याही वेळेला चित्रपट सुरू होतात आणि संपतात. आजच्या काळात ते सोईस्कर आहे. आजची पिढी त्यात रूळली आहे, खूष आहे. एन्जॉय करते.     
मॅटीनी या शब्दाचा खरा अर्थ काय असेल तो असो, पण आमच्या लेखी मॅटीनी म्हणजे दुपारी बारा वाजता पाहीलेला सिनेमा - कधी करमणूक प्रधान, कधी संगीत प्रधान, कधी कथा प्रधान तर कधी अभिनय प्रधान सिनेमा! तेव्हाची थिएटर्स, तेव्हाचे मित्र मैत्रिणी, तेव्हाचे दिवस आणि तेव्हाच्या असंख्य आठवणी!          

ही किमया आहे 'मॅटीनी' ची!          
*विलास करंबळेकर नवी मुंबई*

Wednesday, January 1, 2020

बाजे मुरलिया बाजे। प्रफुल कुलकर्णी

#Cinema_Gully

बाजे रे मुरलिया बाजे

काही कलाकृती अशा असतात की, त्यांना दैवी स्पर्श लाभलेला असतो. त्यांची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. आपल्याकडे चित्रपट, नाट्य, संगीत या क्षेत्रांत अशा अनेक कलाकृती झालेल्या आहेत. 'राम श्याम गुणगान' ही अशीच एक अद्वितीय कलाकृती. जिथे साक्षात दोन भारतरत्नं (स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर) एकत्र येतात, तिथे कोणताही भारतीय संगीतप्रेमी केवळ हात जोडून नतमस्तक होऊ शकतो. त्यात जर तो मराठी असेल, तर त्याला अजूनच आनंद होईल, कारण या दोन दिग्गजांना एकत्र आणणारा मणिकांचन योग साधलाय तो आपल्या श्रीनिवास खळे यांना. तसे तर त्यांनी या दोहोंसोबत स्वतंत्रपणे अभंगरचनांचे अल्बम्स ही केलेत, पण या अल्बमची गोष्टच निराळी. १९८५ मध्ये हा अल्बम रिलीज झाला होता. 

एकवचनी, एकपत्नी, मर्यादा पुरुषोत्तम इ. नावांनी विख्यात असलेला दशरथ-कौसल्यापुत्र राम आणि कृष्ण...त्याची ख्याती काय वेगळी सांगावी! बाल, किशोर, तरुण, प्रौढ या चारही रुपांमध्ये वंदनीय असलेला हा एकमेवच. फक्त हाच एक देवत्वाच्या पलीकडे जाऊन प्रियकराच्या रूपातही जनमानसात रुजला अन त्याचं ते रूपही आज सर्वत्र पुजलं जातं. सर्वोच्च प्रेमाचा मापदंड म्हणून राधेवरच्या त्याच्या प्रेमाला पाहिलं जातं. या दोन हरीरुपांची एकत्रितपणे स्तुती करणारा कदाचित हा एकमेव अल्बम असेल. या अल्बमची सगळी गाणी सुंदरच आहेत, पण त्यातलं एक गाणं जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे बाजे मुरलिया बाजे.

राधा-कृष्णाच्या प्रेमावर विविध प्रकारची गद्य-पद्य रचना विविध भाषांमध्ये आजवर झालेली आहे. अनेक कवींनी वेगवेगळ्या प्रकारे या दोघांच्या प्रेमाचं चित्रण केलं आहे. असंच हे एक गीत. कृष्णाच्या बासरीनं वेड लावलं नाही अशी एकही गोष्ट गोकुळात, वृंदावनात नव्हती. अगदी पशुपक्षी, वृक्षवेली, पानाफुलांनाही त्या सुरांची मोहिनी होती मग माणसं तर सोडाच. या गाण्यातही त्याच सुरांनी मोहित झालेली राधा बाकी सर्व विसरून श्यामरंगी रंगली आहे. 

पं. नरेंद्र शर्मा यांची शब्दरचना असलेल्या या गीताची सुरुवात भीमसेनजींच्या आवाजातील दोह्याने होते.

विमुख शिखर से धारा धाये
राधा हरि सम्मुख लाये
बाँसुरिया हरि साँवरिया की 
राधा गोरी सुनवा ले

आणि मग गाणं सुरु होतं. भजनी ठेक्यासह येणारी बासरीची सुरावट अपेक्षित वातावरणनिर्मिती करू लागते अन लतादीदींच्या अमृतमय गळ्यातून शब्दसुधेचे तुषार पाझरू लागतात. काय सुंदर वर्णन आहे पहा! 

बाजे रे मुरलिया बाजे
अधर धरे मोहन मुरली पर
होंठ पे माया बिराजे
बाजे मुरलिया बाजे

हरे-हरे बाँस की बनी मुरलिया
मरम मरम को छुए अंगुरिया
चंचल चतुर अंगुरिया जिसपर
कनक मुंदरिया साजे

इथे मुंदरिया म्हणजे मुद्रिका (अंगठी). वेळूपासून बनलेल्या बासरीवर हरीच्या कोमल ओठांचा स्पर्श व्हायचा अवकाश, की जे काही त्यानंतर घडतं, ते केवळ अद्वितीयच. बासरीच्या छिद्रांवर हरीची बोटं इतक्या सहजपणे फिरत आहेत की, त्यातून एक एक मधुर सुरावटी निघत आहेत. 

पीली मुंदरी अंगुरी शाम
मुंदरी पर राधा का नाम
आकर देखे सुने मधुर स्वर
राधा गोरी लाजे

इथं कृष्णाच्या हातातल्या त्या अंगठीचं वर्णन आहे. त्याच्या बासरीच्या सुरांनी मुग्ध झालेली राधा त्या ठिकाणी येते. भावविभोर होऊन त्या सावळ्याला पाहत असतानाच अचानक तिचं लक्ष त्याच्या बोटातल्या त्या सोन्याच्या अंगठीकडे जातं, ज्यावर तिचंच नाव कोरलेलं असतं. ते पाहून ती लाजून चूर होते. 

भूल गई राधा भरी गगरिया
भूल गये गोधन को साँवरिया

माधवाच्या वेणूनादात राधा इतकी तल्लीन झालेली असते की, आपण येथे कशासाठी आलो होतो, याचेही स्मरण तिला राहत नाही. तिने पाणी नेण्यासाठी आणलेली घागर भरली, आणि तशीच ठेवली. इकडे या नंदकिशोरालाही विसरच पडलाय की आपण आपल्या सवंगड्यांबरोबर गाईवासरं चरायला घेऊन आलो होतो. तो आपला मुरलीतच रममाण. त्या दोघांची ही प्रेमलीला अशी रंगली आहे, की त्याची समाप्ती कधी होऊच नये असंच तिथल्या प्रत्येकाला वाटत आहे. 

हे गाणं पटदीप रागात बांधलेलं आहे. याच रागातली अजून काही गाणी म्हणजे लतादीदींचंच 'शर्मीली' मधलं 'मेघा छाये आधी रात' किंवा मग मराठीमधलं 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या'. 'मर्मबंधातली ठेव ही' हे मराठी नाट्यगीतही याच पटदीपमधलं.(ही गुगल गुरुजींची कृपा, हे मी नमूद करतो.) असो, आपली गाडी उगाच भरकटू नये. 

श्रीनिवास खळे यांच्यासारख्या प्रयोगशील संगीतकाराची चाल अन साक्षात स्वरभास्कर व स्वरसम्राज्ञी यांचा आवाज लाभलेल्या गीताचा परिणाम काय असेल, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तसा तो आहेदेखील. शब्दागणिक आपोआप चित्र डोळ्यासमोर साकारत जातं, ही गायनाची किमया. खरंतर हे गाणं म्हणे फक्त दीदींच्याच आवाजात होतं, पण अचानक खळे यांना वाटू लागलं की, आपण याचं ड्युएट करावं म्हणून मग ते पंडितजींच्या आवाजातही रेकॉर्ड करण्यात आलं. म्हणूनच हे गाणं ऐकताना आपल्या कानाला थोडा फरक जाणवतो, तो यामुळे. मला मूळ गाणं तर आवडतंच, पण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनीही एका कार्यक्रमात हे गाणं सादर केलं होतं, तेही माझं तितकंच प्रिय आहे. या दोन्ही लिंक मी खाली शेअर करतोय. 

जाता जाता अजून एक, शंकर महादेवन यांचं अजून एक नातं आहे या अल्बमसोबत. ज्यांनी हा संपूर्ण अल्बम ऐकलाय, त्यांना ते कळेल. यात जेवढे वीणेचे पीसेस ऐकू येतात (विशेषतः राम भजन कर मन मध्ये), ते सगळे शंकर महादेवन यांनी वाजवले आहेत, आणि तेसुद्धा वयाच्या १७-१८ व्या वर्षी. आहे की नाही कमाल! तुम्हांला माझं हे लिखाण कसं वाटलं, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगालच. अजून एक नम्र विनंती, जर काही चुका, कमी आढळल्यास ती शांतपणे वाद न घालता निदर्शनास आणून द्यावी. 

पुन्हा भेटू, एखाद्या नव्या गाण्यासह... तोपर्यंत सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!😊

Original song link -
https://youtu.be/GP6dt_qW5qE

Shankar Mahadevan version link - 
https://youtu.be/-TglJafPXYw