Sunday, June 24, 2018

देव आनंद सानिका वाडेकर

मित्र मैत्रिणींनो,

या वर्षी चार दिवाळी अंक आणि एका शतक महोत्सवी अंकात माझे लेख, कथा आणि कविता प्रसिद्ध झाले. त्यापैकी एक अंक हातात आला आहे.

'मोहनगरी' हा दिवाळी अंक राज कपूर, दिलिप कुमार आणि देव आनंद या बाॅलीवूड सुपरस्टार्स वरचा विशेषांक आहे.

'राज, दिलिप आणि देव यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण?' यावरील परिसंवादामध्ये दिलेला माझा लेख तुमच्यासाठी शेयर करत आहे.

देव आनंद, राज कपूर आणि दिलिप कुमार या हिन्दी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार्सनी एकाच काळात पडद्यावर अक्षरशः राज्य केले. तिघांच्या वयात केवळ एका वर्षाचे अंतर आहे. देव आनंद 26 सप्टेंबर 1923, आर.के. 14 डिसेंबर 1924 तर दिलीप कुमार 11डिसेंबर 1922. या तिघांपैकी तुमचा आवडता सुपर स्टार कोण? याचे उत्तर मी असेच देईन की नुसता आवडता नाही तर माझा लाडका सुपर स्टार आहे, "देव आनंद" उर्फ धरम देव पिशोरीमल आनंद.

देव आनंद प्रत्येकाला आपलासा वाटतो कारण जरी आताच्या पाकिस्तानातील पंजाबात त्यांचा जन्म झाला असला तरीही ते व्यक्तिमत्वच असे आहे की तो कोणत्याही प्रांताचे प्रतिनिधीत्व करत नाही. त्यामुळेच हा पंजाबी मुंडा भारतातल्या प्रत्येकाला आपलाच वाटतो. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले हे बडे प्रस्थ नाही की चित्रपट सृष्टीत जम बसवलेले घराणे नाही. आपला देव, आपल्यासारखाच एका सामान्य कुटूंबातून आला आहे. एका वकीलाच्या घरच्या चार मुलांपैकी हे तिसरे पुत्ररत्न.

इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर अगदी आपल्यातुपल्या सारखीच या पोराने स्वप्ननगरी मुंबई गाठली आहे. अकाऊंटंटची नोकरी करत असतानाच भाऊ चेतन आनंद याच्याबरोबर Indian People's Theatre Association च्या वार्या सुरू केल्या आहेत. याचवेळी या टप्पोरे डोळे असलेल्या आणि आकर्षक हास्य करणार्या ऊंच शिडशीडीत तरुणाकडे एका सुप्रसिद्ध व्यक्तीचे लक्ष गेले. प्रभात सिनेमाचे बाबूराव पै यांचे. ज्यांनी पहिला सिनेमासुद्धा दिला, 'हम एक है'.

इतर सुपर स्टार्स सारखी देव आनंदची सतराशे साठ लफडी नाहीत. वैयक्तिक आयुष्यात देखिल तो पडद्यावर दिसतो तसाच हळवा, मृदू आहे. सुरेय्यावर प्रेम केले ते लग्न करण्यासाठीच. पण तिच्या आजीने विरोध केला. इतकेच नाही तर देव आनंदवर तिचे इतके प्रेम होते की ती नंतरही अविवाहीतच राहीली. दरम्यान कल्पना कार्तिकशी लग्न करून आपल्या हिरोची हम दो हमारे दो चौकट पूर्ण झाली होती.

अगदी एखाद्या मध्यमवर्गिय तरुणाला संधी मिळाल्यावर तो जसे जगेल अगदी तसेच आयुष्य तो जगला. राहणीमान सुधारले तरी पावलं जमिनीवरच ठाम रोवलेली होती.

अगदी पडद्यावरही हिराॅईनवर कुरघोडी करून पूर्ण सिनेमा घशात घालण्याची वखवख नाही की स्वतःभोवती कथानक फिरते ठेवून आपलेच महत्त्व ठसवण्याची राजकारणी महत्त्वाकांक्षा नाही. आपण भोळसट आणि दुनिया लबाड माणसांनी भरलेली असला आचरटपणा नाही. की पावसात भिजलेल्या हीराॅईनला पहात स्वतःच्या गरिबीचं प्रदर्शन करत

प्रेक्षकांसमोर सहानुभूतीचे वाडगे फिरवणं नाही. आपला हा चाॅकलेट हिरो सुशिक्षित आहे. तो हिराॅईनला बरोबरीचे स्थान देणारा आहे. तिच्या विचारांचा, बुद्धीचा आदर करणारा आहे. 'अभी ना जाओ छोडकर' म्हणत आर्जव करणारा तरीही तिची अगतिकता समजून घेणारा आहे.

देव आनंद कधीच पुरुषी मानसिकतेचं प्रतिनिधीत्व करत नाही. तो कधीच सगळ्या संकटांचा तारणहार बनून हिराॅईन आणि गावाचं रक्षण करत नाही. ना कधी भोळसट बनून परदेशी नटांची नक्कल करत. इथे जे काही आहे ते अस्सल आहे... प्रांजळ... निखळ आहे. अगदी त्याचा एक तुटका दात दाखवत तो जसा लोभस हसतो ना... तस्सेच.

आमचा हा रोमॅन्टीक हिरो रुसतोही. 'अच्छा जी मै हारी' म्हणत आर्जवं करणार्या हिराॅईनला 'देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना' म्हणत काळजाला घरं पाडतो. पण शेवटी हिराॅईनच्या डोळ्यांतलं पाणी बघून विरघळतोही.

अशा या चाॅकलेट हिरोची अॅक्टींग अगदी सहज सुंदर नैसर्गिक होती. तीही त्या काळात, ज्या काळात एकाच पठडीतल्या थोड्या लाऊड अॅक्टींगची चलती होती. त्याचा 'जिद्दी' किंवा 'गाईड' पाहिला नाही असा भारतीय सापडणे मुश्कील आहे. त्यामुळे हे अगदी सोदाहरण स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही. आवाजाची देणगी नसली तरी बोलण्याच्या लहेजाने आणि आवाजातल्या आर्जवाने याने सगळ्यांची मने जिंकली. याचे सौंदर्य पण भारतीय धाटणीचे. उगाच निळे डोळे आणि गोरा रंग असला सोस नाही की पोट सुटलेले देवीचे वांग असलेले कामचलाऊ दिसणे नाही. ऊंच, सडसडीत देहयष्टी पण पहिलवानी खाक्या नाही. लोभस हास्याबरोबर त्याचे डोळे सुद्धा खट्याळ हसायचे.

त्याकाळात बाॅलीवूडमध्ये हाॅलीवूड स्टार्सची, त्यांच्या स्टाईलची सर्रास नक्कल चालायची. कोणीतरी एकदा देव आनंद यांना म्हटले की, "तुम्ही हाॅलीवूड स्टार ग्रेगरी पेक सारखे दिसता." तेव्हाचे देव आनंदचे उत्तर त्याच्या स्वभावाची ओळख करून देणारे आहे. तो म्हणाला आहे, "किशोर वयात तुम्ही एखाद्याला आदर्श वगैरे मानलत तर ठीक आहे. पण वयाने मोठे झाल्यावर मात्र हे आदर्शांचं जोखड भिरकावून स्वतःला सिद्ध करा. मला भारताचा 'ग्रेगरी पेक' म्हणवून घेणं बिलकूल आवडणार नाही. मी 'देव आनंद' आहे.

देव आनंद यांनी एकोणीस सिनेमे दिग्दर्शित केले, पस्तीस सिनेमांची निर्मिती केली त्यापैकी अठरा सिनेमे घवघवीत यशस्वी ठरले. तेरा सिनेमांची कथा त्यांनी लिहली आहे. तज्ज्ञ सांगतात की त्यांचं दिग्दर्शन काळाच्या बरंच पुढचं होतं. हा माणूस जगन्मित्र होता. फील्म इंडस्ट्रीत असूनही याला कोणीही शत्रू नव्हता.

पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कारांनी देव आनंद यांना सन्मानित केले आहे.

झिनत अमान, टीना मुनिम, झरीना वहाब, जॅकी श्राॅफ, शत्रुघ्न सिन्हा, तब्बू, राजेश रोशन यांना सिनेसृष्टीत संधी देण्याचं काम देव आनंद यांनी केलं.

बाकी उत्तरार्धात निर्मिती क्षेत्रात देव आनंद अपयशी ठरला असेलही. पण त्याचे दुःख ना त्याला होते ना त्याच्या चाहत्यांना. अगदी त्याच्या गाण्याप्रमाणेच त्याचे जगणे होते, 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया... हर जिक्र को धुंएॅ में उडाता चला गया...'

या आपल्या चाॅकलेट हिरोचे त्याचा शेवटचा चित्रपट 'चार्जशीट' रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनी वयाच्या 88व्या वर्षी लंडन येथे ह्रदयविकाराने निधन झाले.

शेवटी आपल्या सर्वांच्या लाडक्या हिरोसाठी एकच म्हणेन, "झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच".
© सानिका वाडेकर

Tuesday, June 19, 2018

काका शिरीष कणेकर

काका
शिरीष कणेकर
गेले बरेच दिवस ती अशुभ, अभद्र बातमी हवेत होती. अखेर आज ती खरी ठरली. राजेश खन्ना युगाचा अंत मागेच झाला होता. आज या युगाचा जनकही काळाच्या पडद्याआड गेला. थोडी वर्षे असेल पण इतकी अफाट लोकप्रियता दुसर्‍या कुठल्याही नटानं पाहिलेली नाही. अगदी अमिताभ बच्चननेही नाही. हे स्वत: अमिताभ कसं बोलून दाखवतो हे तो शेवटच्या दिवसांत वारंवार बोलून दाखवायचा. ते सुपरस्टारगिरीचे इतिहासजमा झालेले दिवस पुन्हा जगण्याचा त्याचा हा प्रयत्न केविलवाणा वाटायचा. वर्तमानाविषयी उत्साहाने व उमेदीनं बोलण्यासारखं त्याच्याकडे काही नव्हतं. भविष्याकडे नजर लावण्यासारखं तर त्याच्याकडे अगदीच काही नव्हतं. सक्तीने लादली गेलेली निवृत्ती ही स्वेच्छानिवृत्ती असल्याचा आव तो आणायचा.

त्याचा सगळा आब मात्र पूर्वीसारखाच होता. बरोबर दोन वाजता जेवणाचा भलामोठा डबा भरून यायचा. मग रत्नागिरीचा बाळकृष्ण (म्हणताना‘बालकिशन’ म्हणायचं) गरमागरम फुलक्या करून वाढणार. जेवल्यावर कुल्फी यायची. मग एका इंपोर्टेड बशीत एकच दात कोरण्याची काडी यायची. मग आणखी एका इंपोर्टेड बशीत एकच पान यायचं. त्यानंतर तिसर्‍या इंपोर्टेड डीशमध्ये एकच इंपोर्टेड सिगारेट यायची. तिचे झुरके घेत‘काका’ मजेत खुर्चीत रेलायचा व डोळे मिटून घ्यायचा. त्याच्या बंद डोळ्यांना कदाचित ‘आराधना’, ‘आनंद’, ‘सच्चा झूठा’, ‘बंधन’, ‘रोटी, ‘आप की कसम’, ‘नमक हराम’, ‘कटी पतंग’, ‘अपना देश’, ‘दुश्मन’, ‘अमर प्रेम’, ‘दो रास्ते’, ‘इत्तेफाक’ दिसत असावेत. त्याला तंद्रीतून जागं करणं म्हणजे मधुर स्वप्नांतून त्याला खेचकटत बाहेर काढण्यासारखं होतं. त्याला कधी फोन केला की तो तुटकपणे एवढंच म्हणायचा, ‘दोन वाजता जेवायला ये. थोडं खाऊन ये म्हणजे दोनपर्यंत तुझा निभाव लागेल.’

त्याला माझा प्रॉब्लेम माहीत होता. बेफिकीरीचा तो केवळ आव आणायचा. एकदा मात्र मला जेवायला बोलावून तो खुशाल कुलूप लावून निघून गेला होता. तो असाच होता. रागावून काही उपयोग नव्हता. राजेश खन्ना म्हटल्यावर त्याच्याबरोबर हे सगळं येत होतं. टेक इट ऑर लीव्ह इट...

पुढल्या निमंत्रणाच्या वेळी मी त्याला म्हणालो, ‘त्या वेळेला तू कुलूप लावून निघून जाणार आहेस वाटतं?’
‘मेरी ये इमेज है तेरेपास?’ त्यानं दुखावलेल्या आवाजात विचारले.
‘इमेज नही, एक्स्पीरियन्स आहे.’ मी जोरात म्हणालो.

मी त्याच्याकडे गेलो. सोमवार होता. मी रगमगीत चिकन खात नाही याचं त्याला अतोनात आश्‍चर्य वाटलेलं दिसलं.
‘क्या हुआ?’ त्यानं विचारलं.
‘आज सोमवार है.’
‘तो?’
‘सोमवारी आम्ही नॉन-व्हेज खात नाही.’
‘वार बदल - वार बदल. मंगळवारी खाऊ नको. आज खा. मस्त झालंय.’

तो त्याला वाटणारी आपुलकी व जिव्हाळा लपवू शकत नव्हता.
माझ्या षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमात तो उशिरा आला. नेहमीप्रमाणे.
आल्या आल्या मंचावर माझ्या कानाशी लागून तो म्हणाला, ‘सी.एम. किधर है?’
‘सी.एम. आया, बैठा, भाषण दिया और चला गया.’ मी म्हणालो. ‘तुम्ही सुपरस्टार्स कधीच वेळेवर येत नाही. तुमच्यासाठी खोळंबून राहायला हे काही सिनेमाचं शूटिंग नाही.’

‘काका’ने तोंडातल्या तोंडात पंजाबी शिवी हासडली. या शिव्या त्याच्या प्रेमाच्या द्योतक असतात हे माझ्या लक्षात आलं होतं. आर. के. स्टुडिओत तो एकदा बी. आर. इशाराच्या चित्रपटाचं शूटिंग करीत होता. (चित्रपट आलाच नाही.)
मला बघताच म्हणाला, ‘बघ केवढे लांबलचक संवाद देतात. कसे लक्षात ठेवायचे माणसाने?’
‘डायलॉग कसे बोलायचे शिकवू का? एक विसरू नकोस. मी दिलीपकुमारचा भक्त आहे.’
त्याने शिव्यांची पुरचुंडी सोडली.

एकदा तो मला अभिमानाने म्हणाला, ‘तुला माहित्येय, डिलिव्हरीसाठी सलमानची आई म्हणजे सलीमची बायको माझ्या गाडीतून गेली होती.’
‘समजा तुझ्या गाडीऐवजी दुसर्‍या कोणाच्या गाडीतून गेली असती तर काय सलमान खानऐवजी कादरखान पैदा होणार होता?’
काका मनापासून हसला. आता तो हा विनोद जाईल तिथं सांगणार होता. फक्त त्यातून मला कसं कट करायचं एवढाच प्रश्‍न होता.
माझ्या अत्याग्रहाला बळी पडून त्याने माझ्या ‘पुन्हा यादों की बारात’ या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. त्यातील हा काही भाग बघा -
‘‘माझा मित्र शिरीष कणेकर याने त्याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला तेव्हा मला अतोनात आश्‍चर्य              वाटलं. डिंपलने मला लग्नाची मागणी घातली होती तेव्हाही मला इतके आश्‍चर्य वाटले नव्हते. तरुण, देखण्या पोरींनी माझ्यासाठी जीव टाकावा यात मला नवीन किंवा नवल नव्हतं. तो काळ तसा होता... मी पैशांसाठी सिनेमात आलो नाही. पैसेवाला मी आधीच होतो. गाडीवालाही होतो. माझा पहिला चित्रपट ‘राज’ याच्या प्रीमियरला जाण्यासाठी म्हणून मी माझ्या वडिलांना नवीन गाडी विकत घेऊन द्यायला लावली होती. त्या काळात मी आणि माझे दोस्त धमाल करायचो. आम्ही रात्री ‘टंपर’ मारून राजकमलला जायचो. तिथे माझी ओळख होती.आम्ही आमच्या आवडत्या चित्रपटांची रिळे चढवून बघत बसायचो. एकदा गुरुदत्तचा ‘प्यासा’ लावला.‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ म्हणत तो दरवाजाच्या चौकटीत पडदा व्यापून उभा राहतो. मला ते ‘कंपोझिशन’ एवढे आवडले की मी पडद्यासमोर जाऊन उभा राहिलो व गुरुदत्तला झाकून गाऊ लागलो. माझे मित्र ओरडले, ‘बैठ जा बे सुव्वर.’ पण मी न थांबता गातच राहिलो...
शेवटी माझ्या नाकावर ‘नॉक आऊट’ पंच मारीत त्याने लिहिले, ‘बाकी कशासाठी नाही तरी प्रस्तावनेसाठी लोक पुस्तक घेतील याची मला खात्री आहे.’
एकदा खासदार राजेश खन्नाचा मला दिल्लीहून फोन आला. आता बरा माझा नंबर मिळाला. मुंबईत असताना मिळत नाही असं तो सांगतो. टेलिफोन डिरेक्टरीत असतो, असं मी थंडपणे त्याला सांगतो.
‘काय एकदम फोन? तोही दिल्लीहून?’
‘मी मित्रांना फोन करू शकत नाही का?’
‘करू शकतोस, पण कधी केलेला नाहीस. ते जाऊ दे. बोलो.’
‘माझी तू स्टेजवरून मागे मुलाखत घेतली होतीस, याद है? मला ती प्रश्‍नोत्तरे हवीत.’
‘कशासाठी?’
‘तुला काय करायचंय? तू दे.’
‘असं कसं? मला कळायला नको?’
‘रजत शर्मा त्याच्या ‘आपकी अदालत’ कार्यक्रमात टी.व्ही.वर माझी मुलाखत घेतोय. त्याला मी आपली प्रश्‍नोत्तरे देईन. तो विचारेल, मी उत्तरे देईन. धमाल येईल.’
मी त्याला सगळी प्रश्‍नोत्तरे सांगितली. तो ज्याला ‘आपली प्रश्‍नोत्तरे’ म्हणत होता ते प्रश्‍नही माझे होते व उत्तरेही माझी होती. फोन ठेवण्यापूर्वी तो ‘थँक यू’ म्हणायला विसरला अशी मी मनाची समजूत घातली.
‘नमकहराम’चा किस्सा त्याच्या तोंडून ऐकताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता.
‘नमकहराम’मध्ये अमिताभने केलेली भूमिका वास्तविक राजेश खन्नाला करायची होती. हृषिकेश मुखर्जीने त्याची समजूत घातली. ‘माझ्यावर विश्‍वास ठेव. मी तुझी भूमिका कमी पडू देणार नाही.’
‘मी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.’ राजेश खन्ना सांगू लागला, ‘मी‘नमकहराम’चा ‘स्पेशल शो’ पाहायला गेलो. बाहेर पडताना मी मनाशी चरफडलो - ‘अरे यार, आज दुसरा सुपरस्टार पैदा हो गया.’
खुद्द ढासळलेल्या सुपरस्टारच्या तोंडून हा किस्सा ऐकणे हा आयुष्यभर न विसरता येण्यासारखा अनुभव होता. दुसरा सुपरस्टार पैदा झाला होता म्हणजेच पहिला सुपरस्टार पायउतार झाला होता.
राजेश खन्नाने गाठलेल्या उत्तुंग उंचीची आपण कल्पना करू शकत नाही. त्यामुळे तिथून खाली कोसळणं म्हणजे काय हेही आपल्याला कळू शकत नाही. आकाशातला निखळलेला तारा जणू. राजेश खन्नाचे दिवस फिरले. त्यापेक्षा त्याला खरं दु:ख असणार ते याचं की काळाच्या ओघात व विशेषकरून अमिताभपर्वात राजेशची अभिनयशैली कृत्रिम, बोजड व हास्यास्पद ठरली. त्याच्या नाचण्यावर व त्या पोपटासारख्या मान कलवण्यावर नवीन प्रेक्षक उपहासाने हसू लागले. त्याच्या अभिनयाचे अवमूल्यन झाले. दिलीपकुमारप्रमाणे तो काळाच्या लाटांवर आरूढ होऊन टिकून राहू शकला नाही ही ‘काका’ची शोकांतिका होती. तो किती लोकप्रिय होता हे सांगावं लागावं यात सगळं आलं. ‘अमिताभ ‘ऍक्शन हीरो’ आहे, मी‘इमोशनल हीरो’ आहे’ असं तो अखेरपर्यंत पोपटासारखं बोलत राहिला. फक्त ऐकून मुंडी हलवणारे आता कुणी राहिले नव्हते.
आत्मकेंद्रित, गर्विष्ठ, सुपरस्टारपदाची राजवस्त्रे तो सतत कवचकुंडलांसारखी अंगावर बाळगून असायचा. त्याआड दडलेल्या नटाला खरवडलं तर आत यारी करावी असा साधा, विनोदप्रिय भला माणूस होता. एकदा मी त्याला विचारलं,
‘एकदा सुपरस्टार म्हणून जगल्यानंतर पुन्हा नॉर्मल आयुष्य जगणं शक्य आहे का?’
‘या जन्मात तरी नाही.’ तो मनापासून म्हणाला, ‘अरे, मी सुपरस्टार झालो तेव्हा काय वय असेल माझं? अवघं चोवीस. माणसं पायावर अक्षरश: लोळण घ्यायची. राजेश खन्ना हे दोनच शब्द कानांना ऐकू यायचे. हे दोनच शब्द वातावरणात भरून राहिलेत असं वाटायचं. परमेश्‍वर - परमेश्‍वर म्हणतात तो मीच असे मला भास व्हायला लागले होते. नाही माणसाचं डोकं फिरणार तर काय होईल?...’ मग कधी नाही तो आत्मपरीक्षणाचा झटका येऊन तो म्हणाला, ‘माझं ते मान लचकवणं व डोळे मिचकावणे थोडं जास्तच झालं होतं नाही का?’
‘थोडं नाही बरंच जास्त झालं होतं.’ मी म्हणालो.
त्यानंतर त्यानं पंजाबी अपशब्दांची जी लडी वळली त्याचा कुठल्याही पंजाब्याला अभिमान वाटला असता.
मला शत्रुघ्न सिन्हाला माझ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायचं होतं. मी काकाजवळ एकेदिवशी बोलता बोलता बोललो. त्यानंतर एक दिवस तो मला म्हणाला, ‘शत्रूकडे रात्री पार्टी आहे. तू पण चल.’
‘मी कसा येऊ?’ मला निमंत्रण नाही.’
‘काका’ माझ्याकडे आश्‍चर्यातिरेकानं बघत राहिला. मध्यमवर्गीय मराठी माणसाकडे स्वाभिमान नावाची गोष्ट असू शकते हे त्याला नवीन होतं.
‘पण मला आहे ना निमंत्रण.’ तो ताडकन म्हणाला. ‘तुला माझ्याबरोबर यायला लाज वाटते का?’
माझा नाइलाज झाला. त्यातून शत्रुघ्न सिन्हाकडे काम माझंच होतं.
‘काका’ मला ‘रामायण’ या शत्रूच्या बंगल्यावर घेऊन गेला. तिथे शत्रूशी माजी ओळख करून देताना तो म्हणाला, ‘ये नॅशनल न्यूजपेपर में काम करता है और ‘वन-मॅन-शो’ करता है. तेरे बापने कभी ‘वन-मॅन-शो’ किया था क्या?’
डायरेक्ट बापच काढल्यावर शत्रूने माझ्या प्रयोगाला यायचं कबूल केलं नसतं तरच नवल!
पार्टीतून मी न जेवताच निघालो.
‘सब बोअरिंग है यहां’ ‘काका’ कंटाळून म्हणाला, ‘मी पण सटकतो तुझ्याबरोबर.’
रात्रीचे आम्ही दोघे जुहू-पार्ला स्कीममधील प्रशस्त फुटपाथवरून गप्पा मारीत पायीच निघालो. ‘काका’ची मर्सिडीज मागून हळूहळू येत होती.
एकदा त्याच्या (दरडावून) बोलावण्यामुळे मी त्याच्याकडे गेलो. समोर छोटेमोठे निर्माते, दिग्दर्शक बसवून त्याचा ‘वन-मॅन-शो’ चालला होता.
‘मेरी कोई भी फिल्म ले लो.’ तो आढ्यतेने म्हणत होता, ‘हीरॉईन ओरिएंटेड है. ‘कटी पतंग’ - आशा पारेख, ‘आराधना’ - शर्मिला टागोर, ‘खामोशी’ -वहिदा रहेमान, ‘दुश्मन’ - मीनाकुमारी. फिर भी मै पतली गली से फिल्म लेकर चला गया.’
समोरच्यानी माना डोलावल्या.
‘दुश्मन’मधला दुश्मन कोण होता? ‘आनंद’? ‘बंधन’?, ‘दो रास्ते’? ‘सच्चा झूठा’? और नाम लेलू ?’ मी म्हणालो.
मी असा विसंवादी सूर लावल्याचे त्याला रुचले की नाही कळले नाही पण त्याच्या चमच्यांना ते मुळीच रुचले नव्हते हे त्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होते.
‘सध्या तुझा फुलटाइम चमचा कोण आहे? मी?’
‘तू?’ तो किंचाळला. ‘तुझ्यासारखे चमचे असतील तर मेलोच मी.’ यावर आम्ही दोघंही हसलो. तो पंजाबीतून, मी मराठीतून.
याच आमच्यातील संवादावरून मला रंगमंचावरून घ्यायच्या त्याच्या मुलाखतीसाठी एक प्रश्‍न व त्याचं समर्पक उत्तर सुचलं होतं. ते असं -
प्रश्‍न : सुना है आपको तारीफ और चमचे बहुत पसंद है?
उत्तर : तारीफ तो भगवानको भी पसंद है. रही बात चमचोंकी तो आजकल मै हाथ से खानाही पसंद करता हूं.
शिवाजी मंदिरचा प्रेक्षकवर्ग राजेश खन्नाच्या उत्तरावर उसळला होता. उगीच नाही त्यानं मला दिल्लीहून फोन केला होता तो. या नटांना बाकी काही कळत नाही तरी टाळ्यांची वाक्ये बरोबर कळतात. ती आपल्याकडे वळवून घ्यायची हेही बरोबर कळतं. माझ्या षष्ट्यब्धीपूर्ती समारंभात एक वेगळा प्रकार म्हणून ‘काका’ने माझी मुलाखत घ्यायची असं ठरलं. प्रथेप्रमाणे मी प्रश्‍नोत्तरे तयार केली. मात्र यावेळी प्रश्‍न तो विचारणार होता,उत्तरे मी देणार होतो. हा एक नमुना पाहा.
प्रश्‍न : पुढल्या जन्मी तुला काय व्हायला आवडेल?
उत्तर : सलमान खान किंवा उर्मिला मातोंडकर. कपडे पहेननेकी नौबतही नही आयेगी.
उत्तर ऐकल्याक्षणी ‘काका’ उसळून म्हणाला, ‘ये-ये मै बोलूंगा.’ त्याची समजूत काढता काढता माझ्या नाकी नऊ आले. टाळ्यांची वाक्ये दुसरं कोणी बोललेलं त्याला सहन होत नव्हतं. इथं हीरो कोण आहे? तोही सुपरस्टार? हे छान-छान काय हा चिरगूट बोलणार?...
एकदा मात्र तो बोलून गेला, ‘आमच्या फिल्म इंडस्ट्रीत राज कपूर,दिलीपकुमार, शबाना आझमी व व्ही. शांताराम ही चार माणसं वरचा मजला शाबूत असलेली मी पाहिलीत. बाकी सगळे माझ्यासारखेच.’
मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका त्याला द्यायला गेलो.
‘कुछ पढालिखा है क्या तुम्हारा बेटा?’ पत्रिकेवरून नजर फिरवत त्याने विचारले.
मी सर्द झालो. मग माझ्या लक्षात आलं की त्याचा प्रश्‍न योग्य होता. तो ज्या जगात राहत होता तिथं आधी कॉलेजात जाणं व मग शिक्षण पूर्ण करणं अतिदुर्लभ होतं. किंबहुना शिक्षण हे ‘डिसक्वालिफिकेशन’ मानलं जात होतं. ‘राम और श्याम’मध्ये कन्हैयालाल जणू चित्रपटसृष्टीची भावना बोलून दाखवताना म्हणतो, ‘जब घर में लक्ष्मी मौजूद हो तो सरस्वतीपूजा काहे को?’
‘नक्की येतो’ सांगून तो माझ्या मुलाच्या लग्नाला आला नाही. जमणार नाही असं सांगणारा फोन करतात हेही त्यानं ऐकलेले नव्हते. म्हणून तर तो राजेश खन्ना होता. तो शब्द पाळायला लागला असता व वक्तशीर झाला असता तर तो अमिताभ बच्चन झाला असता. पण अमिताभ ‘ऍक्शन हीरो’होता; ‘काका’ ‘इमोशनल हीरो’ होता...
आता मागे भरपूर आठवणी राहिल्यात. ‘न भूतो न भविष्यति’ अशा पहिल्या सुपरस्टारशी आपली इतकी घसट होती हे मला खरंच वाटत नाही. माझा तिखटाचा प्रॉब्लेम लक्षात ठेवून त्यानं बाळकृष्णला खास माझ्यासाठी उकडलेल्या बटाट्याची नुसती मीठ टाकून भाजी करायला लावली होती हे मी कसं विसरू?
आपण सुपरस्टारची मस्करी करीत होतो व तो करू देत होता हे तरी मी कसं विसरू? तो दिल्लीत कॉंग्रेसवाल्यांचा गोतावळा जमवून बसलेला असताना मी त्याला म्हणालो, ‘काकाजी, एक अच्छा रोल है. आप करेंगे?’
‘क्या रोल है?’ त्यानं संशयानं विचारलं.
‘हीरॉइनकी मॉंका!’ मी म्हणालो.
कॉंग्रेसी चाहत्यांसमोर त्याला पंजाबी शिव्याही हासडता येत नव्हत्या. पाण्यात पडलेल्या उंदरासारखी त्याची अवस्था झाली होती.
‘ठैर, तेरेको बंबईमें दिखाता हूं’ तो कसंबसं म्हणाला.
मी हसत सुटलो. मग तोही हसू लागला.
माझा सुपरस्टार मित्र गेला.