मित्र मैत्रिणींनो,
या वर्षी चार दिवाळी अंक आणि एका शतक महोत्सवी अंकात माझे लेख, कथा आणि कविता प्रसिद्ध झाले. त्यापैकी एक अंक हातात आला आहे.
'मोहनगरी' हा दिवाळी अंक राज कपूर, दिलिप कुमार आणि देव आनंद या बाॅलीवूड सुपरस्टार्स वरचा विशेषांक आहे.
'राज, दिलिप आणि देव यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण?' यावरील परिसंवादामध्ये दिलेला माझा लेख तुमच्यासाठी शेयर करत आहे.
देव आनंद, राज कपूर आणि दिलिप कुमार या हिन्दी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार्सनी एकाच काळात पडद्यावर अक्षरशः राज्य केले. तिघांच्या वयात केवळ एका वर्षाचे अंतर आहे. देव आनंद 26 सप्टेंबर 1923, आर.के. 14 डिसेंबर 1924 तर दिलीप कुमार 11डिसेंबर 1922. या तिघांपैकी तुमचा आवडता सुपर स्टार कोण? याचे उत्तर मी असेच देईन की नुसता आवडता नाही तर माझा लाडका सुपर स्टार आहे, "देव आनंद" उर्फ धरम देव पिशोरीमल आनंद.
देव आनंद प्रत्येकाला आपलासा वाटतो कारण जरी आताच्या पाकिस्तानातील पंजाबात त्यांचा जन्म झाला असला तरीही ते व्यक्तिमत्वच असे आहे की तो कोणत्याही प्रांताचे प्रतिनिधीत्व करत नाही. त्यामुळेच हा पंजाबी मुंडा भारतातल्या प्रत्येकाला आपलाच वाटतो. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले हे बडे प्रस्थ नाही की चित्रपट सृष्टीत जम बसवलेले घराणे नाही. आपला देव, आपल्यासारखाच एका सामान्य कुटूंबातून आला आहे. एका वकीलाच्या घरच्या चार मुलांपैकी हे तिसरे पुत्ररत्न.
इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर अगदी आपल्यातुपल्या सारखीच या पोराने स्वप्ननगरी मुंबई गाठली आहे. अकाऊंटंटची नोकरी करत असतानाच भाऊ चेतन आनंद याच्याबरोबर Indian People's Theatre Association च्या वार्या सुरू केल्या आहेत. याचवेळी या टप्पोरे डोळे असलेल्या आणि आकर्षक हास्य करणार्या ऊंच शिडशीडीत तरुणाकडे एका सुप्रसिद्ध व्यक्तीचे लक्ष गेले. प्रभात सिनेमाचे बाबूराव पै यांचे. ज्यांनी पहिला सिनेमासुद्धा दिला, 'हम एक है'.
इतर सुपर स्टार्स सारखी देव आनंदची सतराशे साठ लफडी नाहीत. वैयक्तिक आयुष्यात देखिल तो पडद्यावर दिसतो तसाच हळवा, मृदू आहे. सुरेय्यावर प्रेम केले ते लग्न करण्यासाठीच. पण तिच्या आजीने विरोध केला. इतकेच नाही तर देव आनंदवर तिचे इतके प्रेम होते की ती नंतरही अविवाहीतच राहीली. दरम्यान कल्पना कार्तिकशी लग्न करून आपल्या हिरोची हम दो हमारे दो चौकट पूर्ण झाली होती.
अगदी एखाद्या मध्यमवर्गिय तरुणाला संधी मिळाल्यावर तो जसे जगेल अगदी तसेच आयुष्य तो जगला. राहणीमान सुधारले तरी पावलं जमिनीवरच ठाम रोवलेली होती.
अगदी पडद्यावरही हिराॅईनवर कुरघोडी करून पूर्ण सिनेमा घशात घालण्याची वखवख नाही की स्वतःभोवती कथानक फिरते ठेवून आपलेच महत्त्व ठसवण्याची राजकारणी महत्त्वाकांक्षा नाही. आपण भोळसट आणि दुनिया लबाड माणसांनी भरलेली असला आचरटपणा नाही. की पावसात भिजलेल्या हीराॅईनला पहात स्वतःच्या गरिबीचं प्रदर्शन करत
प्रेक्षकांसमोर सहानुभूतीचे वाडगे फिरवणं नाही. आपला हा चाॅकलेट हिरो सुशिक्षित आहे. तो हिराॅईनला बरोबरीचे स्थान देणारा आहे. तिच्या विचारांचा, बुद्धीचा आदर करणारा आहे. 'अभी ना जाओ छोडकर' म्हणत आर्जव करणारा तरीही तिची अगतिकता समजून घेणारा आहे.
देव आनंद कधीच पुरुषी मानसिकतेचं प्रतिनिधीत्व करत नाही. तो कधीच सगळ्या संकटांचा तारणहार बनून हिराॅईन आणि गावाचं रक्षण करत नाही. ना कधी भोळसट बनून परदेशी नटांची नक्कल करत. इथे जे काही आहे ते अस्सल आहे... प्रांजळ... निखळ आहे. अगदी त्याचा एक तुटका दात दाखवत तो जसा लोभस हसतो ना... तस्सेच.
आमचा हा रोमॅन्टीक हिरो रुसतोही. 'अच्छा जी मै हारी' म्हणत आर्जवं करणार्या हिराॅईनला 'देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना' म्हणत काळजाला घरं पाडतो. पण शेवटी हिराॅईनच्या डोळ्यांतलं पाणी बघून विरघळतोही.
अशा या चाॅकलेट हिरोची अॅक्टींग अगदी सहज सुंदर नैसर्गिक होती. तीही त्या काळात, ज्या काळात एकाच पठडीतल्या थोड्या लाऊड अॅक्टींगची चलती होती. त्याचा 'जिद्दी' किंवा 'गाईड' पाहिला नाही असा भारतीय सापडणे मुश्कील आहे. त्यामुळे हे अगदी सोदाहरण स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही. आवाजाची देणगी नसली तरी बोलण्याच्या लहेजाने आणि आवाजातल्या आर्जवाने याने सगळ्यांची मने जिंकली. याचे सौंदर्य पण भारतीय धाटणीचे. उगाच निळे डोळे आणि गोरा रंग असला सोस नाही की पोट सुटलेले देवीचे वांग असलेले कामचलाऊ दिसणे नाही. ऊंच, सडसडीत देहयष्टी पण पहिलवानी खाक्या नाही. लोभस हास्याबरोबर त्याचे डोळे सुद्धा खट्याळ हसायचे.
त्याकाळात बाॅलीवूडमध्ये हाॅलीवूड स्टार्सची, त्यांच्या स्टाईलची सर्रास नक्कल चालायची. कोणीतरी एकदा देव आनंद यांना म्हटले की, "तुम्ही हाॅलीवूड स्टार ग्रेगरी पेक सारखे दिसता." तेव्हाचे देव आनंदचे उत्तर त्याच्या स्वभावाची ओळख करून देणारे आहे. तो म्हणाला आहे, "किशोर वयात तुम्ही एखाद्याला आदर्श वगैरे मानलत तर ठीक आहे. पण वयाने मोठे झाल्यावर मात्र हे आदर्शांचं जोखड भिरकावून स्वतःला सिद्ध करा. मला भारताचा 'ग्रेगरी पेक' म्हणवून घेणं बिलकूल आवडणार नाही. मी 'देव आनंद' आहे.
देव आनंद यांनी एकोणीस सिनेमे दिग्दर्शित केले, पस्तीस सिनेमांची निर्मिती केली त्यापैकी अठरा सिनेमे घवघवीत यशस्वी ठरले. तेरा सिनेमांची कथा त्यांनी लिहली आहे. तज्ज्ञ सांगतात की त्यांचं दिग्दर्शन काळाच्या बरंच पुढचं होतं. हा माणूस जगन्मित्र होता. फील्म इंडस्ट्रीत असूनही याला कोणीही शत्रू नव्हता.
पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कारांनी देव आनंद यांना सन्मानित केले आहे.
झिनत अमान, टीना मुनिम, झरीना वहाब, जॅकी श्राॅफ, शत्रुघ्न सिन्हा, तब्बू, राजेश रोशन यांना सिनेसृष्टीत संधी देण्याचं काम देव आनंद यांनी केलं.
बाकी उत्तरार्धात निर्मिती क्षेत्रात देव आनंद अपयशी ठरला असेलही. पण त्याचे दुःख ना त्याला होते ना त्याच्या चाहत्यांना. अगदी त्याच्या गाण्याप्रमाणेच त्याचे जगणे होते, 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया... हर जिक्र को धुंएॅ में उडाता चला गया...'
या आपल्या चाॅकलेट हिरोचे त्याचा शेवटचा चित्रपट 'चार्जशीट' रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनी वयाच्या 88व्या वर्षी लंडन येथे ह्रदयविकाराने निधन झाले.
शेवटी आपल्या सर्वांच्या लाडक्या हिरोसाठी एकच म्हणेन, "झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच".
© सानिका वाडेकर