Monday, June 18, 2018

मनां डे। शिरीष कणेकर

ना खंत ना खेद
शिरीष कणेकर
‘न किसीकी आँखका नूर हूँ, न किसीके दिलका करार हूँ’ हे रफीच्या तोंडचं गाणं वास्तविक मन्ना डेची शोकांतिका सांगते. तसा तो सगळ्यांनाच आवडायचा, पण लाडका असा कोणाचाच नव्हता. पार्श्‍वगायनातील संजीवकुमार म्हणा ना. मन्ना डे व संजीवकुमार जर एवढे लोकप्रिय होते तर ते अनुक्रमे पार्श्‍वगायनाच्या व अभिनयाच्या प्रांतात नंबर वन पदावर का विराजमान होऊ शकले नाहीत? कारण एकच. ते सगळ्यांना पसंत होते, पण कोणाच्याच गळ्यातले ताईत नव्हते. असं का?
सगळ्याच ‘का’ना उत्तरे नसतात.
नौशाद व ओ. पी. नय्यर यांच्या संगीतात अनुक्रमे ‘मदर इंडिया’ व ‘कल्पना’ वगळता मन्नाला स्थान का नव्हतं? ज्यांच्याकडे मन्नाने तुफान लोकप्रिय गाणी म्हटली त्या शंकर-जयकिशननाही त्याला सातत्यानं गाणी द्यावीशी का वाटली नाहीत? ‘चोरी चोरी’मधली राज कपूरच्या तोंडची मन्नाची तिन्ही द्वंद्वगीते तुफान गाजल्यानंतर ‘नाइंटीन फिफ्टीसिक्स’ (अनाडी) व ‘ए भाई जरा देखके चलो’ (मेरा नाम जोकर) ही दोनच गाणी नंतरच्या काळात शंकर-जयकिशनने राज कपूरच्या तोंडी का टाकली? गाणी गाजली नसती तर आपण समजू शकतो, पण गाजल्यावरही ही उपेक्षा?
मन्नाला मात्र या गोष्टीचं जरासंही वैषम्य नव्हतं. ‘मी गायचो ते रफी आणि किशोरही गाऊ शकायचे.’ मन्ना त्याच्या जुहूच्या बंगल्यात बसून मला म्हणाला होता, ‘पण ते गायचे ते मी गाऊ शकायचो नाही.’
ना खंत ना खेद. ना अढी ना असूया!
‘पडोसन’मधल्या ‘एक चतुर नार’ या किशोरबरोबरच्या द्वंद्वगीताचा किस्सा सांगताना मन्ना खुलला होता.
‘‘गाण्याचा क्लासिकल ‘बेस’ असल्यानं मी मूडमध्ये होतो. माझी तयारी पण चांगली झाली होती. मनात म्हटलं, अब आ जाओ बच्चू! मी गाण्याला सुरुवातही झोकात केली. क्लासिकलमध्ये मला कोण हरवणार? पण सांगू महाराजा, मध्येच अत्यंत अनपेक्षितपणे ‘अरे घोडे’ असे म्हणत किशोर जो गाण्यात घुसला तो अख्खं गाणं खाऊन टाकूनच थांबला. व्हॉट टॅलंट!’’
मी अविश्‍वासानं ऐकतच राहिलो. किशोरच्या टॅलंटला दाद द्यावी की मन्नाच्या दिलदारपणाला हेच मला कळेना.
मन्ना आता रंगात आला होता, ‘लतानेही माझी एकदा अशीच छुट्टी करून टाकली होती’ तो म्हणाला, ‘‘आम्ही ‘मधुमती’मधलं ‘बिछुआ’ रेकॉर्ड करीत होतो. गाणं क्लासिकल स्वरूपाचं असल्यानं मी निर्धास्त होतो. समोर लता असली म्हणून काय झालं? ये मेरा फिल्ड था. पण ती लंबीचौडी तान भिंगरीसारखी घेत लता जी गाण्यात उतरली ती गाणं स्वत:चं करूनच गेली. मी बघतच राहिलो. अरे, हे गाणं माझं होतं ना?...’’
सुरुवातीच्या काळात मन्नाची गायकी आवडल्यामुळे म्हणा किंवा ‘बंगाली तितुका मेळवावा’ या वृत्तीतून म्हणा, अनिल विश्‍वास (‘तेरा हाथ हाथ में आ गया’- ‘हमदर्द’), एस. डी. बर्मन (‘सोचके ये गगन झुमे - ज्योती), सलील चौधरी (एक समयपर ‘दो बरसाते’ - ‘झुला’) यांनी अधूनमधून त्याला गाणी दिली. त्याचा जास्त उपयोग शंकर-जयकिशननी केला. त्यांच्याकडे चित्रपटांची रेलचेल असल्यानं रफी, मुकेश, किशोर, तलत व मन्ना डे सगळ्यांनाच गाणी देणं त्यांना शक्य झालं. तरीदेखील मन्नाच्या कारकीर्दीत शंकर-जयकिशनचा मोठा वाटा आहे हे मान्य करावंच लागेल. त्यांनी रफीला १९६ ‘सोलो’ गाणी दिली यात आश्‍चर्य नाही, तर मन्नाला आठवणीनं २७ गाणी दिली हे विशेष. ‘तू प्यार का सागर है’ (सीमा), ‘भय भंजना’ (बसंत बहार), ‘अब कहॉं जाये हम’ (उजाला), ‘चलत मुसाफिर’ (तिसरी कसम), ‘कालका पहिया’ (चंदा और बिजली), या ‘सोलो’ गाण्यांत व ‘तेरे बिना आग’ (आवारा), ‘प्यार हुवा इकरार हुवा’ (श्री ४२०), ‘नैन मिले चैन कहॉं’ (बसंत बहार) या द्वंद्वगीतात मन्ना शंकर-जयकिशनकडे बहारदार गायलाय. ‘चोरी चोरी’मधील तिन्ही द्वंद्वगीतांत - ‘ये रात भीगी भीगी’, ‘जहॉं में जाती हूँ’, ‘आजा सनम’ मन्नानं अशी काही धमाल केल्येय की इथे मुकेश हवा होता हा विचारही मनात येत नाही. 
रागदारीतील गाणी आली की संगीतकारांना हटकून मन्ना डेची आठवण व्हायची. रोशन (‘लागा चुनरी में दाग’ - ‘दिलही तो है’), मदन मोहन (‘कौन आया मेरे मनके द्वारे’ - ‘देख कबीरा रोया’), अनिल विश्‍वास (‘आसने कितने दीप जलाए’ - ‘मेहमान’), एस. डी. बर्मन (‘पुछो न कैसे मैने’ - ‘तेरी सूरत मेरी आँखे’), एस. एन. त्रिपाठी (‘सप्त सुरन तीन ग्राम’ - ‘संगीतसम्राट तानसेन’), शंकर-जयकिशन (‘तू प्यार का सागर है’ - ‘सीमा’), लक्ष्मीकांत - प्यारेलाल (‘तुम गगन के चंद्रमा’ - ‘सती सावित्री’), डी. दिलीप (‘जा रे बेइमान तुझे’ - ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’), जयदेव (‘चले जा रहे है’ - ‘किनारे किनारे’) यांनी मन्नाला शास्त्रोक्त बैठक असलेली गाणी दिली. अनिल विश्‍वासनं ‘हमदर्द’मधील चार रागांवर आधारित ‘ऋतू आये ऋतू जाये सखी रे’ हे अप्रतिम द्वंद्वगीत लता व मन्नाला दिलं. त्यानंतर तेरा वर्षांनी सहासष्ट साली ‘सौ साल बाद’ या चित्रपटातील ‘एक ऋतू आये इक ऋतू जाये’ या चार रागांतील गाण्यासाठी लक्ष्मीकांत -प्यारेलाल लता-मन्ना यांच्याकडेच धावले. लताला पर्याय नव्हता तसा मन्नालाही नव्हता.
विदूषकी घाटणीची विनोदी अंगाने जाणारी रागदारीतील गाणी हीदेखील मन्नाची ‘स्पेशॅलिटी’ होती. उदाहरणार्थ - ‘बनाओ बतिया हटो काहेको झूटी’ - ‘मंझिल’ - एस. डी. बर्मन), ‘प्यार की आग मे तनबदन’ (‘जिद्दी’ - एस. डी. बर्मन), ‘किसने चिलमनसे मारा’ (‘बात एक रात की’ - एस. डी. बर्मन), ‘फूल गेंदवा न मारो’ (‘दूज का चांद’ - रोशन), ‘हाय रे मैं तो प्रेमदिवाना’ (‘बेदाग’ - रोशन), ‘लपकझपक तू आरे’ (‘बूटपॉलीश’ शंकर-जयकिशन) या मार्गाने का होईना, रागदारी सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचत असेल तर वाईट, असे मन्ना डे म्हणत असे.
तयारीची गायची असलेला गळा असा लौकिक पसरल्यामुळे मन्नाला शास्त्रोक्त गाणी आपसूक मिळाली, पण अन्य प्रकारची अनेक गाणी त्याच्या वाट्याला आलीच नाहीत याची खंत वाटल्यावाचून राहत नाही. तो किती हरहुन्नरी गायक होता याची दखल घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही. ‘याल्ला याल्ला दिल ले गयी’ (‘उजाला’), ‘सांझ ढली दिल की कली’ (‘कालाबाजार’), ‘प्यार हुवा इकरार हुवा’ (‘श्री ४२०’), ‘मस्ती भरा है समा’ (‘परवरिश’), ‘मेरे दिल में है इक बात’ (‘पोस्ट बॉक्स नं. ९९९’), ‘नैन मिले चैन कहॉं’ (‘बसंत बहार’), ‘ऐ मेरी जोहराजबीन’ (‘वक्त’) यासारखी रोमंँटिक गाणी कमालीची यशस्वी झाल्यानंतरही रोमँटिक गाणी हा मन्ना डेचा प्रांत नव्हे हा अन्यायकारक प्रवाद कायम राहिला. आयुष्यभर हे ओढणं गळ्यात घेऊन तो गात फिरला. तो कोणा संगीतकाराचा लाडका गायक नव्हता (जसे नौशाद-रफी, शंकर-जयकिशन-मुकेश, एस. डी. बर्मन - किशोर कुमार) तसा कोणा नायकाच्याही गळ्यातला ताईत नव्हता. ‘माझ्यासाठी मन्नाच गाईल’ अशी ठाम आग्रही भूमिका घेणारा नायक मन्नाला लाभला नाही.
मन्नाच्या आवाजाची जातच अशी होती की सर्व प्रकारच्या नायकांसाठी ती सूट होण्यासारखी नव्हती असं मन्नाच्या अवमूल्यनाचं कारण सांगितलं जातं. खोटं आहे हे. तलत मेहमूदच्या र्‍हासाचं नेमकं हेच कारण सांगितलं गेलं होतं तेही खोटं होतं. व्ही. शांतारामपासून (‘परछाई’), शशी कपूरपर्यंत (‘प्रेमपत्र’) व दिलीपकुमारपासून (‘दाग’) मनोजकुमारपर्यंत (‘रेशमी रुमाल’) सर्वांना तलत मेहमूदचा रेशमी मुलायम आवाज कसा काय सूट होत होता? कोत्या, किरट्या आवाजाच्या आशा पारेख व सायरा बानू यांना काय लताचा आवाज शोभतो? ये सब बाते है, बातों का क्या! मन्नानेच हे गाऊन सांगितलंय.
कोणाकोणाच्या तोंडी मन्नाची गाणी गाजली आहेत यावर एक नजर टाकूया. राज कपूर (‘चोरी चोरी’), देव आनंद (‘कालाबाजार’), बलराज सहानी (‘काबुलीवाला’), अशोककुमार (‘मशाल’), अनुपकुमार (‘देख कबीरा रोया’), मेहमूद (‘पडोसन’), राजकुमार (‘मेरे हुजूर’), राजेश खन्ना (‘आनंद’), प्राण ‘(उपकार’), डेव्हिड (‘बूटपॉलीश’), शशी कपूर (प्यार किये जा), शम्मी कपूर (उजाला), शेखर (हमदर्द)..
मन्ना डे मुंबईत राहत होता तेव्हा फोनवरून त्याची भेटीची वेळ ठरविल्यावर मी विचारलं, ‘कसं यायचं?’
‘अमिताभ बच्चनचं घर माहीत आहे ना?’ मन्ना निर्विकारपणे म्हणाला, ‘तिथून समोर हाकेच्या अंतरावर आहे.’
मन्नानं आत्मचरित्राचं नाव ‘ना खंत ना खेद’! हे ठेवणं समर्पक झालं असतं.

Shireesh.kanekar@gmail.com

 

 

 

No comments:

Post a Comment