अक्षयकुमारची माणुसकी
‘अक्षय’ संघर्ष..!
बाॅलिवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार जेव्हा अक्षयकुमार नव्हता आणि फक्त राजीव भाटीया होता, तेव्हाची ही गोष्ट. हा माणूस माझ्या आयुष्यात एका ठराविक काळासाठी आला आणि लोखंडाला परीसाचा स्पर्श होऊन त्याचं जसं सोनं बनतं, तसंच माझ्या आयुष्याचं झालं. अगदी बावन्नकशी सोनं. आम्ही दोघं जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा दोघंही आपापल्या क्षेत्रात संघर्ष करत होतो. त्या काळात बाॅलिवुडमधल्या आघाडीच्या नायकांना टक्कर देणारा हा खिलाडी अभिनयाच्या क्षेत्रात हटके करण्यासाठी झगडत होता; तर, मी पोलिसांचा खाकी गणवेश अंगावर चढवता यावा, पोलिस बनून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर अंकूश घालण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न करत होतो.
सन १९८७. माझा दहावीचा निकाल लागला. मी दोन विषयांत नापास. मुलगा वायाला जाईल म्हणून माझ्या बाबांनी मला त्यांच्या मित्राच्या दहिसर येथील कंपनीत स्क्रु बनविणा-या खिळयांच्या कंपनीत कामाला लावले आणि सुरू झाला माझा ‘कमवा व शिका’ असा प्रवास.
साधारण तीन महिने कांदिवली पोलीस वसाहत ते दहीसर सायकलने प्रवास करायचो. काम करून दिवसाकाठी १० रूपये पगार मिळायचा.
रोज सायकल ने ये जा करण्यातच वेळ जायचा म्हणून आईने काम सोडायला लावलं.
घरात शिलाई मशीन होती. मग छोट्या शिशूच्या मुलांचे कपडे शिवायचे काम घेतले. मालाडच्या ‘ओवरलेम’ मधून कच्चा माल सायकलवर घरी घेऊन यायचं आणि कपडे शिवून द्यायचे, असं काम सुरू झालं. आई सुद्धा कामात मदत करायची.
मला जिमची फार आवड. त्यामुळे कांदिवलीच्या डहाणूकरवाडीत असलेली ‘विकी जिम’ जाॅईन केली.
जिम, काम आणि अभ्यास असं सूत्र जमलं आणि मी दहावी पास झालो.
माझा स्वत:चा व्यायाम करता करता मी इतरांचा व्यायाम सुद्धा करून घेत होतो. त्यामुळे जिमचे मालक विकी गोरक्ष सरांचे भाऊ भूषण आणि इतर मित्रांनी मी जिम इन्स्ट्रक्टरचे काम करावे असा आग्रह धरला.
त्यांचा आग्रह हाच प्रस्ताव समजून मी होकार दिला आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून माझं जिम इन्स्ट्रक्टरचं काम सुरू झालं.
पुढे याच विकी गोरक्ष सरांनी माझ्या नावाची शिफारस तळवळकर जिमच्या तळवलकर सरांकडे केली. दादर ला असलेल्या कार्यालयात तळवळकर सरांनी माझी इंटरव्युव्ह घेतली आणि मी सांताक्रुझच्या तळवळकर जीम मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून लागलो.
या जिममध्ये मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर १९९१ मध्ये मला अंधेरी लोखंडवाला काॅम्प्लेक्स मध्ये असलेल्या स्वेट आऊट जिमची आॅफर आली आणि मी तिथे रुजू झालो.
या जिममध्ये कामाचा पहिला दिवस आजही आठवतो. तिथल्या मॅनेजरने जिमच्या सर्व स्टाफ आणि इतर सदस्यांसोबत ओळख करून दिली आणि मी माझे काम सुरू केले. संध्याकाळी ७.०० वाचल्यानंतर एक एक ओळखीचे चेहरे त्यांचं त्यांच वर्कआऊट करायला येऊ लागले. हे सर्व चेहरे मी टीव्हीत सिरीयल्समध्ये किंवा थिएटरमध्ये चित्रपटात पाहिले होते.
अशाच या नट नट्यांच्या गर्दीत एक सहा फुट उंचीचा गोरा आणि देखणा नट समोर आला. तो मिस्टर बाॅन्ड चित्रपटाचा हिरो राजीव भाटीया असल्याचं एव्हाना कळालं होतं.
व्यायाम करता करता त्याची जिम मधल्या इतर सदस्यांसोबत थट्टा मस्करी करणे आणि फिरकी घेणे सुरू होतं. त्याचवेळी जिमचे मॅनेजर आत आले. ‘‘बाहेर कुणाची बाईक पडली आहे”’ असं त्यांनी विचारलं.
ती बाईक राजीव भाटीयांनी आणली होती. डबल सायलेन्सरची येझडी बाईक. कराटे क्लास साठी येणा-या मुलांकडून चुकून पडली होती.
“आपको ध्यान देना चाहिये”, असं मला ते म्हणाले. वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात यावी म्हणून मीच त्यांना विचारलं, “मी आत पाहू की बाहेर”.
माझ्या आणि त्यांच्याच झालेलं हे पहिलंवहिलं संभाषण. नंतर पुलअप्स मारताना त्यांनी मला मदतीसाठी बोलावलं आणि आमचं बोलणं सुरू झालं. एकदम जिंदादिल आणि सतत हसतमुख असणारा हा माणूस नेहमी वेगवेगळ्या विषयांवर भरपूर बोलायचा. मला त्यांचं बोलणं आवडायचं. अनेकदा काही विषयांवर दोघांचं एकमत व्हायचं. आम्हा दोघांचीही वेव्हलेन्थ जुळली होती. व्यायाम करताना ते नेहमी माझ्याकडून मदत मागायचे. एक अभिनेता म्हूणन कधीच ‘अॅटीटयूड’ दाखवला नाही. नेहमी पाय जमीनीवर, सर्वांसोबत आदराने बोलणे मग तो कोणीही जीमचा स्वीपर का असेना. त्यांच्या स्वभावातील बारकावे पहात पहात त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण होवू लागला.
या काळात त्यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट बाॅक्स आॅफीसवर पडत होते. पण, त्यांनी ते कधीही चेह-यावर जाणवू दिले नाही. नेहमी हसत, मजा मस्ती सुरू असायची. कधी-कधी पंजा लढवयाची किंवा १०० डिप्स मारायची शर्यत लावत. जो हरेल त्याने लस्सी द्यायची. त्यांच्यासमोर कोणी जिंकलं नाहीच. पण ते स्वत:च सगळ्यांच्या लस्सीचं बील भरायचे. मी मनातल्या मनात म्हणायचो, हा माणूस पडद्यावर हिरो आणि ख-या आयुष्यातही हिरोच.काळ पुढे सरकत होता..तसं, राजीव भाटीया ‘अक्षय कुमार’ नावाने हिन्दी चित्रपट सृष्टीत हळूहळू रूढ होत होतं.
माझा ही संघर्ष सुरूच होता. १० वी पास झालो होतो. बाबा मुंबई पोलीस दलात. मग मी सुद्धा पोलीस होण्यासाठी प्रयत्न करु लागलो. सलग ५-६ वेळा भरतीला उतरलो. सगळ्या परिक्षांत फेल. मी नर्व्हस होतोय हे राजीव सरांना तसेच जीममधील माझ्या मेंबर्सना माहीत व्हायचे. सर्व दिलासा द्यायचे. होशील तु मोहन..प्रयत्न सुरू ठेव... मग मनाशी पक्क केलं. आता हा शेवटचा प्रयत्न आणि सातव्यांदा पुन्हा परिक्षा दिली. व्हायचे तेच झाले. पुन्हा नापास. मग, मी प्रयत्न सुरू केला मिलीटरीत जाण्याचा. आई बाबांना काहीएक न सांगता मिलिटरी भरतीसाठी कुलाब्याला गेलो. छाती-उंची सर्व गणित बरोबर जुळले. भरतीच्या पुढच्या टप्प्याची तारीख मिळाली होती. मिलिटरी भरतीबद्दल आईला सांगितलं. तिला बहुधा ते पसंत नसावं. त्यामुळे तिने बोलणं बंद केलं. बाबांचा पाठिंबा होता. पण, आईमुळे मी पाय पाठी घेतला.
जिममध्ये असाच विचार करत बसलो होतो. तेव्हा राजीव सर आले. माझा चेहरा पाहूनच ते म्हटले, ‘‘मोहन कुछ प्राॅब्लेम’’. मी नाही म्हणालो. पण, माझी बाॅडी लॅन्गवेज पाहून त्यांनी ओळखलं मला आणि म्हणाले, “ मोहन मन हलका कर”.
मी घडलेलं सगळं त्यांना सांगितलं... त्यानंतरचे त्यांचे शब्द...तु तर आताच हार मानली. मला बघ माझे पाच-सहा पिक्चर तर असेच पडले. मी नाराज झालो का; संघर्ष आहे तो तर सर्वांच्या आयुष्यात येत असतो. कोणाला लवकर यश मिळतं. कदाचित, आपल्याला ते उशिरा मिळेल. ते बोलतच होते. मग त्यांनी मला तु कशात कमी पडतोस, हे विचारलं.
मैदानी चाचणीत स्टॅमिना कमी पडतो, मी उत्तरलो.
सर म्हटले, चल उद्या पासुन माझ्याबरोबर सुरुवात करू. “उद्या पहाटे तु माझ्या घरी (बेनजर अपार्टमेंट) बरेाबर सकाळी 5 ला यायचं, यावेळी आपण पुन्हा प्रयत्न करू.
सरांनी माझ्याबाबत एवढा विचार करणं माझ्या कल्पनेपलिकडचं होतं. मी खुपच भावनिक झालो. रात्रभर झोपलोच नाही. आईला हे सर्व सांगितलं. सकाळी पहीली ट्रेन पकडून अंधेरी गाठली. रिक्षा पकडून सरांच्या घरी गेलो. बेल वाजवली सरांच्या वडीलांनी दरवाजा उघडला. विचारले, “हा बेटा कोण”, मी माझा परीचय दिला. ते म्हणाले की, “बेटा आप की राह देखके वो तो निकल गया’’ वेळेचं महत्व हे त्या वेळी लक्षात आलं.
नंतर सरांना स्वत:लाच लक्षात आलं, माझं घर खूपच दूर असल्याने मला त्यांची वेळ गाठण्यात अडचण होतेय ते.
मग, त्यांनी जिमच्या मागील बाजूला असलेल्या गार्डन मध्ये माझी प्रॅक्टीस घ्यायला सुरू केली. त्यांनी दिलेल्या टीप्स मला पोलिस परीक्षेत खूपच महत्त्वाच्या ठरल्या.
१९९३ च्या भरतीला मुंबई आणि ठाणे अशा दोन्हीकडे उभा राहिलो आणि विशेष म्हणजे माझी दोन्हीकडे निवड झाली. दोन्ही काॅल लेटर माझ्या घरी आले.
मी घरी गेलो तेव्हा आईने बाहेरच उभं केलं. मला काहीच कळत नव्हतं. मी बाहेर थांबलो, आणि आई आरतीचे ताट घेवून आली. तिने ओवाळले पेढा तोंडात घातला आणि मला घरात घेतलं. आरतीचे ताट बाजुला ठेवून तिने मला जी मिठी मारली, ते पाहून काही तरी खुषखबर आहे हे लक्षात आलं. बाबा घरात नाईट करुन झोपले होते. ते सुद्धा जागे झाले. आईच्या डोळयात आलेले पाणी खुप काही सांगून गेले. देवाच्या आणि आई-बाबांच्या पाया पडलो. आई म्हटली, सरांना पेढे द्यायला कधी जाणार ? माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्याच वेळी राजीव सरांनी माझ्यावर घेतलेली मेहनत सुद्धा नजरेसमोर येत होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नेहमी फेल होणारा मोहन आज पास झाला होता. पेढयाचा बाॅक्स जिममध्ये नेला. सर होतेच. त्यांच्या पाया पडलो. पेढे दिले. मी बोलण्या अगोदर सरांनी सगळं ओळखलं होतं. ते म्हणाले ‘‘ये तो होना ही था”, आणि जोरात गळ्याला मिठी मारुन म्हणाले, ‘‘मेरा पांडू”.
त्यांनी अर्धा तास विचारपुस केली. ‘‘तु आता ट्रेनिंगला जाशील, मग कधी भेट होईल सांगू शकत नाही.” असं ते म्हणाले.
सरांचा निरोप घेवून मी जालन्याला ट्रेनिंगला गेलो. सोबत आई-बाबा, भावंडाचे तसेच संघर्ष काळातील गुरु अर्थात राजीव सरांचे फोटो सोबत होते.
ट्रेनिंग पुर्ण करुन पुन्हा सरांना भेटायला गेलो. खुप बारीक झालो होतो. त्याही वेळी मला पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी खुप चांगले मार्गदर्शन केले.
माझी नेमणूक १९९५ ला उरण पोलीस ठाण्यात झाली. योगायोगाने सरांच्या एका चित्रपटाचे न्हावा शेवा कन्टेनर यार्डमध्ये शुटींग होते. माझ्या मित्रांनी आग्रह धरला, तु एवढा सरांची तारीफ करतोस. तुझे सर आता आपल्याकडेच शुटींगला आले आहेत. आमची भेट करुन दे. आम्हाला त्यांचा आॅटोग्राफ घ्यायचा आहेत. मला ते खुपच चॅलेंजिंग वाटत होतं. शुटींगमध्ये व्यस्त असलेले सर आपल्याला भेटतील का , याबद्दल साशंक होतो. मग काय, सात-आठ सहकारी पोलीस मित्रांना घेऊन गेलो. भरपूर सिक्युरिटी होती. मी व्हॅन पर्यंत पोहचलो. सिक्युरिटी मधल्या एकाला बोललो, ‘‘अक्षय सर को सिर्फ इतना बोलना आपका पांडू आया है.” त्याने लगेच मेसेज दिला आणि आश्चर्य म्हणजे काही क्षणात व्हॅनमधून ते बाहेर आले आणि मला कडकडून मिठी मारली. ‘‘पांडू तू यहां.’’
तेव्हा त्यांनी फिल्मची माहिती दिली. ती ‘सपूत’ फिल्मची शुटींग होती. मला म्हणाले, आता माझा खूप रिस्की शाॅट आहे. तु थांब आणि बघ. माझ्या सर्व मित्रांना त्यांनी हात मिळविला आणि आॅटोग्राफ सुद्धा दिले. हा क्षण मी डोळ्यांत साठवून ठेवला. माझ्या जागी तुम्ही असतात तर काय विचार येईल याचाच विचार करा. हो ते खरंच ग्रेट आहेत.
वाशी खाडीपुलावर तलाश सिनेमाचं शुटींग सुरू होतं. नितिन बनकर याचा मला फोन आला (सध्या ते सरांसोबतच असतात. दे-दणादण चित्रपटात अक्षय सरांनी स्वत:ला नितीन बनकरांचे नाव दिले होते.) म्हटला अक्षय सर तुझी आठवण काढतात. तु ये फॅमीलीला घेवून. पण त्यावेळी माझी मुलगी प्राची हाॅस्पीटलला अॅडमीट होती. त्यांना याबाबत कल्पना दिली आणि म्हटलं, तु सरांना फक्त सांग, मी नंतर भेटतो.
सर मला प्रेमाने पांडू बोलतात याचा मला थोडाही खेद नाही. पण, न राहवून एकदा हे सांगितलं. बाबा म्हणाले, “अरे मी पण पोलीस हवालदार आहे. मला पण कधी कोणी बोलतं पांडू. तुला आवडत नसेल तर आॅफीसर बनून दाखव.
मग मनाशी निष्चय केला जोपर्यंत आॅफीसर होणार नाही, तोपर्यंत सरांना भेटणार नाही. मग पुन्हा अभ्यास सुरु केला. तिथे प्रत्येकवेळा अपयश येत होतं. यश नेहमी दोन पाऊले पुढे असायचं. पुढे २०१३ मध्ये आॅफीसरची परिक्षा पास झालो. वाटले सरांना आता भेटू शकतो.
माझ्या खांद्यावर स्टार माझे आई-बाबा लावतील. मग, सरांना कडकडीत सॅल्युट मारायला जावू. पण, काही कारणास्तव निकाल कोर्टात पेंडीग राहीला. त्या दरम्यान आई सोडून गेली. बाबा पण थकले होते. जाताना ते सुद्धा म्हणाले, की संघर्ष काळातील तुझा गुरुच तुझ्या खांद्यावर स्टार लावील. बाबांच्या जाण्याचा योगायोग पण बघा. सरांच्या ‘केसरी’ फिल्मची शुटींग पिंपवडे बुद्रुक -सातारा येथे सुरू होती आणि ते गांव माझ्या गावापासून साधारण १०-१५ किलोमिटर वर आहे.
माझी दोन्ही मुले सरांची खुप मोठी फॅन आहेत. सरांचा आर्मी आॅफीसरची भूमिका असलेला हाँलीडे चित्रपट पाहून मुलगा आर्य म्हणाला, मला पण आर्मीत जायचंय. मला मिलिटरी स्कुलमध्ये अॅडमिशन घ्या. मी त्याला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कुलमध्ये अॅडमिशन घेतलं.
माझाच मुलगा नाही तर कितीतरी मुलांत सरांचे चित्रपट पाहून देशभक्ती जागृत होते.
सरांच्या व्यक्तीमत्वातून प्रेरणा घेणारे कितीतरी मुले आज देशाचा विचार करू लागली आहेत. चित्रपट सृष्टीत त्यांना आज असलेले मानाचे स्थान पाहिल्यावर त्यांच्यासोबत व्यतित केलेले ते सोनेरी दिवस आजही एक चित्रपट बनून डोळ्यासमोरून जातात. डोळ्यांच्या कडाही ओलावतात. आनंद वाटतो, आपण एवढ्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात होतो याचा. आभाळाची उंची गाठलेला हा माणूस आपण समाजाचं देणं लागतो, हे अजिबात विसरलेला नाही. ज्या लोकांनी आपल्याला भरभरून दिलं त्यांच्या साठी काही तरी करण्याची उमेद त्यांच्या मनात नेहमीच असते. कुठल्याही प्रसिद्धीशिवाय ते करत असलेलं सामाजिक काम सुद्धा खूप मोठं आहे. देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक असोत, पोलीस असोत अथवा दुष्काळाने ग्रासलेला सर्वसामान्य शेतकरी.
सर या सगळ्यांसाठी देवदूत बनून मदतीला सदैव तयार असतात.
आज सरांचा वाढदिवस. सर्वसामान्यांच्या दु:खावर फुंकर घालून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण देणा-या या सुपरस्टार अक्षयकुमार यांना आणि माझ्या राजीव सरांना उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा.
- मोहन कदम,
*आज ९ सप्टेबर*
*आज खतरों के खिलाडी अक्षय कुमारचा आज वाढदिवस.*
जन्म. ९ सप्टेबर १९६७
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या अभिनेत्याबाबतच्या काही रंजक गोष्टी .
लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते. त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते.भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे. नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. आपल्या समूहातर्फे अक्षयकुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट