Thursday, September 20, 2018

देशपांडे ऑन देशपांडे । पु ल देशपांडे

देशपांडे ऑन देशपांडे

*नॉन-कन्फर्मिस्ट*

पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्यही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले -

_“अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजवाहीर असे दण-दण दण-दण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील!”_

वसंताच्या स्वभावातच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऐकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा _'मिजाज'_ आहे.

निखारे असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! म्हणूनच की काय कोण जाने _‘शतजन्म शोधितांना’, ‘असे जीत पहा’_ यासारख्या किंवा _‘रवी मी भाळी चंद्र असे धारिया’_ ह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रीक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे.

पण कलावंताला म्युनिसिपालिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे? त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता!

वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. _‘कट्यार काळजात घुसली’_ मध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारातली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे!

पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हणासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही.

नागर आणि ग्रामीण हिंदीचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतरावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट!

कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला, अध्यात्म, अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती- त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही.

आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्या तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे _'कारकुनी'_ ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा.

पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही.

मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिले आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी!

पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमाला पाठ असाव्यात त्याला! _'जिनमध्ये लाइम कॉर्डियलचे प्रमाण काय',_ इथपासून ते _'अवकहडा चक्र'_ म्हणजे काय इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य!

वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चंपूताईचा घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे.

कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदार मामला आहे.

भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी. पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी.

परवाचीची गोष्ट... _'कट्यार'_ मध्ये तबल्याची साथ करणारा नाना मुळे. भीमसेनने मंगळुरात गाणे संपल्यावर मुळ्याला आपल्या गाडीत घातला आणि स्वत: ड्राईव्ह करीत सोलापुरात वसंताच्या साथीला आणून हजर केला. _“वश्याबुवा, हा तुझा तबलजी!”_

जमलेली साथ नसली तरी वश्याबुवाचे गाणे बिघडेल म्हणून रात्रभर बैठक करुन थकलेला हा भारतीय किर्तीचा गायक मंगळूर ते सोलापूर गाडी हाकीत तबलजी आणून हजर करतो! ही प्रेमाची कोडी उलगडायला माणसाला जीवनात भान हरपायची स्थाने गवसावी लागतात.

एवढ्याने काय झाले आहे... हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे एक मडके, तिळकुटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन _“ए बुवा, येता येता ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. तुझ्या आवडिच्या - हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा. रात्री हे चेपा पोटात आणि बोंबला.”_ अशा प्रेमसंवादानंतर भीमसेनबुवा पुण्याला रवाना. 

तीन वर्षापूर्वी प्रथम ऐकलेल्या वसंताच्या गळ्यातल्या _‘सुलतान षरके यार’_ या गाण्यापासून अगदी परवा ऐकलेल्या बाला जोशीच्या घरच्या जनसंमोहिनी असंख्य मैफलींची आज डोक्यात गर्दी आहे.

आज आमच्या दोघांचीही वयाने पन्नाशी गाठली. पण हा वसंता पहिल्या भेटीतच रविंद्राच्या शब्दात सांगायचे म्हणजे _“माझ्या प्राणांना सुरांची आग लावून गेला.”_ त्यानंतरच्या त्याच्या सुरांप्रमाणे त्याच्या स्नेहाने ही मशाल पेटती ठेवली. वाटेल त्यावेळी घातलेल्या हाकेला ओ देणारा मित्र लाभायला भाग्य लागते हे भाग्य माझे.

वसंता आज माझ्या कुटुंबियातलाच एक आहे. माझ्या आणि त्याच्या पत्नीच्या कौतुकाइतकीच तो दमदाटीही ऐकून घेतो. विशेषत: दमदाटीचा कार्यक्रम आमचे कुटुंब करते. नव्या पिढीतली जवान मंडळी वसंताच्या गाण्याला गर्दी करताना पाहून धन्यता वाटते.

वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपंणाने मिरवीत जाणारी नाही. दर्‍याखोर्‍यातुन बेफाम दौडत जाणार्‍या जवान घोडेस्वारासरखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.

वसंताचे गाणे ऐकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधता येते. सूरांचा हा झणझणीत कोल्हापूरी मटनाचा रस्सा आहे. नाजूक प्रकृतीच्या चाकोरीतून सारेच काही सांभाळीत जाणार्‍यांना सोसणारा हा खुराक नाही. त्यांना घराण्याच्या रुळलेल्या निर्धास्त चाकोर्‍या बर्‍या !

वसंताने कारकून म्हणून चाकोरी सांभाळली. आणि कलावंत म्हणून मात्र झुगारली. दोन्ही भुमिकांविषयी तो तद्रुप होता. कारकुनाला चाकोरी हाच आधार तर चाकोरी मोडण्यातूनच कलावंत उभा राहतो.

– पु. ल. देशपांडे

Sunday, September 9, 2018

आशा भोसले

अक्षय कुमारची माणुसकी। मोहन कदम

अक्षयकुमारची माणुसकी
‘अक्षय’ संघर्ष..!

बाॅलिवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार जेव्हा अक्षयकुमार नव्हता आणि फक्त राजीव भाटीया होता, तेव्हाची ही गोष्ट. हा माणूस माझ्या आयुष्यात एका ठराविक काळासाठी आला आणि लोखंडाला परीसाचा स्पर्श होऊन त्याचं जसं सोनं बनतं, तसंच माझ्या आयुष्याचं झालं. अगदी बावन्नकशी सोनं. आम्ही दोघं जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा दोघंही आपापल्या क्षेत्रात संघर्ष करत होतो. त्या काळात बाॅलिवुडमधल्या आघाडीच्या नायकांना टक्कर देणारा हा खिलाडी अभिनयाच्या क्षेत्रात हटके करण्यासाठी झगडत होता; तर, मी पोलिसांचा खाकी गणवेश अंगावर चढवता यावा, पोलिस बनून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर अंकूश घालण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न करत होतो.

सन  १९८७. माझा दहावीचा निकाल लागला. मी दोन विषयांत नापास. मुलगा वायाला जाईल म्हणून माझ्या बाबांनी मला त्यांच्या मित्राच्या दहिसर येथील कंपनीत स्क्रु बनविणा-या खिळयांच्या कंपनीत कामाला लावले आणि सुरू झाला माझा ‘कमवा व शिका’ असा प्रवास.

साधारण तीन महिने कांदिवली पोलीस वसाहत ते दहीसर सायकलने प्रवास करायचो. काम करून दिवसाकाठी  १० रूपये पगार मिळायचा.

रोज सायकल ने ये जा करण्यातच वेळ जायचा म्हणून आईने काम सोडायला लावलं.

घरात शिलाई मशीन होती. मग छोट्या शिशूच्या मुलांचे कपडे शिवायचे काम घेतले. मालाडच्या ‘ओवरलेम’ मधून कच्चा माल सायकलवर घरी घेऊन यायचं आणि कपडे शिवून द्यायचे, असं काम सुरू झालं. आई सुद्धा कामात मदत करायची.
मला जिमची फार आवड. त्यामुळे कांदिवलीच्या डहाणूकरवाडीत असलेली ‘विकी जिम’ जाॅईन केली.
जिम, काम आणि अभ्यास असं सूत्र जमलं आणि मी दहावी पास झालो.

माझा स्वत:चा व्यायाम करता करता मी इतरांचा व्यायाम सुद्धा करून घेत होतो. त्यामुळे जिमचे मालक विकी गोरक्ष सरांचे भाऊ भूषण आणि इतर मित्रांनी मी जिम इन्स्ट्रक्टरचे काम करावे असा आग्रह धरला.
त्यांचा आग्रह हाच प्रस्ताव समजून मी होकार दिला आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून माझं जिम इन्स्ट्रक्टरचं काम सुरू झालं.

पुढे याच विकी गोरक्ष सरांनी माझ्या नावाची शिफारस तळवळकर जिमच्या तळवलकर सरांकडे केली. दादर ला असलेल्या कार्यालयात तळवळकर सरांनी माझी इंटरव्युव्ह घेतली आणि मी सांताक्रुझच्या तळवळकर जीम मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून लागलो.

या जिममध्ये मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर १९९१ मध्ये मला अंधेरी लोखंडवाला काॅम्प्लेक्स मध्ये असलेल्या स्वेट आऊट जिमची आॅफर आली आणि मी तिथे रुजू झालो.

या जिममध्ये कामाचा पहिला दिवस आजही आठवतो. तिथल्या मॅनेजरने जिमच्या सर्व स्टाफ आणि इतर सदस्यांसोबत ओळख करून दिली आणि मी माझे काम सुरू केले. संध्याकाळी ७.०० वाचल्यानंतर एक एक ओळखीचे चेहरे त्यांचं त्यांच वर्कआऊट करायला येऊ लागले. हे सर्व चेहरे मी टीव्हीत सिरीयल्समध्ये किंवा थिएटरमध्ये चित्रपटात पाहिले होते.

अशाच या नट नट्यांच्या गर्दीत एक सहा फुट उंचीचा गोरा आणि देखणा नट समोर आला. तो मिस्टर बाॅन्ड चित्रपटाचा हिरो राजीव भाटीया असल्याचं एव्हाना कळालं होतं.

व्यायाम करता करता त्याची जिम मधल्या इतर सदस्यांसोबत थट्टा मस्करी करणे आणि फिरकी घेणे सुरू होतं. त्याचवेळी जिमचे मॅनेजर आत आले.  ‘‘बाहेर कुणाची बाईक पडली आहे”’ असं त्यांनी विचारलं.

ती बाईक राजीव भाटीयांनी आणली होती. डबल सायलेन्सरची येझडी बाईक. कराटे क्लास साठी येणा-या मुलांकडून चुकून पडली होती.

“आपको ध्यान देना चाहिये”, असं मला ते म्हणाले. वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात यावी म्हणून मीच त्यांना विचारलं, “मी आत पाहू की बाहेर”.
माझ्या आणि त्यांच्याच झालेलं हे पहिलंवहिलं संभाषण. नंतर पुलअप्स मारताना त्यांनी मला मदतीसाठी बोलावलं आणि आमचं बोलणं सुरू झालं. एकदम जिंदादिल आणि सतत हसतमुख असणारा हा माणूस नेहमी वेगवेगळ्या विषयांवर भरपूर बोलायचा. मला त्यांचं बोलणं आवडायचं. अनेकदा काही विषयांवर दोघांचं एकमत व्हायचं. आम्हा दोघांचीही वेव्हलेन्थ जुळली होती. व्यायाम करताना ते नेहमी माझ्याकडून मदत मागायचे. एक अभिनेता म्हूणन कधीच ‘अॅटीटयूड’ दाखवला नाही. नेहमी पाय जमीनीवर, सर्वांसोबत आदराने बोलणे मग तो कोणीही जीमचा स्वीपर का असेना. त्यांच्या स्वभावातील बारकावे पहात पहात त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण होवू लागला.

या काळात त्यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट बाॅक्स आॅफीसवर पडत होते. पण, त्यांनी ते कधीही चेह-यावर जाणवू दिले नाही. नेहमी हसत, मजा मस्ती सुरू असायची. कधी-कधी पंजा लढवयाची किंवा १०० डिप्स मारायची शर्यत लावत. जो हरेल त्याने लस्सी द्यायची. त्यांच्यासमोर कोणी जिंकलं नाहीच. पण ते स्वत:च सगळ्यांच्या लस्सीचं बील भरायचे. मी मनातल्या मनात म्हणायचो, हा माणूस पडद्यावर हिरो आणि ख-या आयुष्यातही हिरोच.काळ पुढे सरकत होता..तसं, राजीव भाटीया ‘अक्षय कुमार’ नावाने हिन्दी चित्रपट सृष्टीत हळूहळू रूढ होत होतं.

माझा ही संघर्ष सुरूच होता. १० वी पास झालो होतो. बाबा मुंबई पोलीस दलात. मग मी सुद्धा पोलीस होण्यासाठी प्रयत्न करु लागलो. सलग ५-६ वेळा भरतीला उतरलो. सगळ्या परिक्षांत फेल. मी नर्व्हस होतोय हे राजीव सरांना तसेच जीममधील माझ्या मेंबर्सना माहीत व्हायचे. सर्व दिलासा द्यायचे. होशील तु मोहन..प्रयत्न सुरू ठेव... मग मनाशी पक्क केलं. आता हा शेवटचा प्रयत्न आणि सातव्यांदा पुन्हा परिक्षा दिली. व्हायचे तेच झाले. पुन्हा नापास. मग, मी प्रयत्न सुरू केला मिलीटरीत जाण्याचा. आई बाबांना काहीएक न सांगता मिलिटरी भरतीसाठी कुलाब्याला गेलो. छाती-उंची सर्व गणित बरोबर जुळले. भरतीच्या पुढच्या टप्प्याची तारीख मिळाली होती. मिलिटरी भरतीबद्दल आईला सांगितलं. तिला बहुधा ते पसंत नसावं. त्यामुळे तिने बोलणं बंद केलं. बाबांचा पाठिंबा होता. पण,  आईमुळे मी पाय पाठी घेतला.

जिममध्ये असाच विचार करत बसलो होतो. तेव्हा राजीव सर आले. माझा चेहरा पाहूनच ते म्हटले, ‘‘मोहन कुछ प्राॅब्लेम’’.  मी नाही म्हणालो. पण, माझी बाॅडी लॅन्गवेज पाहून त्यांनी ओळखलं मला आणि म्हणाले, “ मोहन मन हलका कर”.
मी घडलेलं सगळं त्यांना सांगितलं... त्यानंतरचे त्यांचे शब्द...तु तर आताच हार मानली. मला बघ माझे पाच-सहा पिक्चर तर असेच पडले. मी नाराज झालो का; संघर्ष आहे तो तर सर्वांच्या आयुष्यात येत असतो. कोणाला लवकर यश मिळतं. कदाचित, आपल्याला ते उशिरा मिळेल. ते बोलतच होते. मग त्यांनी मला तु कशात कमी पडतोस, हे विचारलं.
मैदानी चाचणीत स्टॅमिना कमी पडतो, मी उत्तरलो.
सर म्हटले, चल उद्या पासुन माझ्याबरोबर सुरुवात करू. “उद्या पहाटे तु माझ्या घरी (बेनजर अपार्टमेंट) बरेाबर सकाळी 5 ला यायचं, यावेळी आपण पुन्हा प्रयत्न करू.

सरांनी माझ्याबाबत एवढा विचार करणं माझ्या कल्पनेपलिकडचं होतं. मी खुपच भावनिक झालो. रात्रभर झोपलोच नाही. आईला हे सर्व सांगितलं. सकाळी पहीली ट्रेन पकडून अंधेरी गाठली. रिक्षा पकडून सरांच्या घरी गेलो. बेल वाजवली सरांच्या वडीलांनी दरवाजा उघडला. विचारले,  “हा बेटा कोण”, मी माझा परीचय दिला. ते म्हणाले की, “बेटा आप की राह देखके वो तो निकल गया’’ वेळेचं महत्व  हे त्या वेळी  लक्षात आलं.

नंतर सरांना स्वत:लाच लक्षात आलं, माझं घर खूपच दूर असल्याने मला त्यांची वेळ गाठण्यात अडचण होतेय ते.
मग, त्यांनी जिमच्या मागील बाजूला असलेल्या गार्डन मध्ये माझी प्रॅक्टीस घ्यायला सुरू केली. त्यांनी दिलेल्या टीप्स मला पोलिस परीक्षेत खूपच महत्त्वाच्या ठरल्या.

१९९३ च्या भरतीला मुंबई आणि ठाणे अशा दोन्हीकडे उभा राहिलो आणि विशेष म्हणजे माझी दोन्हीकडे निवड झाली. दोन्ही काॅल लेटर माझ्या घरी आले.

मी घरी गेलो तेव्हा आईने बाहेरच उभं केलं. मला काहीच कळत नव्हतं. मी बाहेर थांबलो, आणि आई आरतीचे ताट घेवून आली. तिने ओवाळले पेढा तोंडात घातला आणि मला घरात घेतलं. आरतीचे ताट बाजुला ठेवून तिने मला जी मिठी मारली, ते पाहून काही तरी खुषखबर आहे हे लक्षात आलं. बाबा घरात नाईट करुन झोपले होते. ते सुद्धा जागे झाले. आईच्या डोळयात आलेले पाणी खुप काही सांगून गेले. देवाच्या आणि आई-बाबांच्या पाया पडलो. आई म्हटली,  सरांना पेढे द्यायला कधी जाणार ? माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्याच वेळी राजीव सरांनी माझ्यावर घेतलेली मेहनत सुद्धा नजरेसमोर येत होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नेहमी फेल होणारा मोहन आज पास झाला होता. पेढयाचा बाॅक्स जिममध्ये नेला. सर होतेच. त्यांच्या पाया पडलो. पेढे दिले. मी बोलण्या अगोदर सरांनी सगळं ओळखलं होतं. ते म्हणाले ‘‘ये तो होना ही था”, आणि जोरात गळ्याला मिठी मारुन म्हणाले, ‘‘मेरा पांडू”.

त्यांनी अर्धा तास विचारपुस केली. ‘‘तु आता ट्रेनिंगला जाशील, मग कधी भेट होईल सांगू शकत नाही.” असं ते म्हणाले.

सरांचा निरोप घेवून मी जालन्याला ट्रेनिंगला गेलो. सोबत आई-बाबा, भावंडाचे तसेच संघर्ष काळातील गुरु अर्थात राजीव सरांचे फोटो सोबत होते.

ट्रेनिंग पुर्ण करुन पुन्हा सरांना भेटायला गेलो. खुप बारीक झालो होतो. त्याही वेळी मला पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी खुप चांगले मार्गदर्शन केले.

माझी नेमणूक १९९५ ला उरण पोलीस ठाण्यात झाली. योगायोगाने सरांच्या एका चित्रपटाचे न्हावा शेवा कन्टेनर यार्डमध्ये शुटींग होते. माझ्या मित्रांनी आग्रह धरला, तु एवढा सरांची तारीफ करतोस. तुझे सर आता आपल्याकडेच शुटींगला आले आहेत. आमची भेट करुन दे. आम्हाला त्यांचा आॅटोग्राफ घ्यायचा आहेत. मला ते खुपच चॅलेंजिंग वाटत होतं. शुटींगमध्ये व्यस्त असलेले सर आपल्याला भेटतील का , याबद्दल साशंक होतो. मग काय, सात-आठ सहकारी पोलीस मित्रांना घेऊन गेलो. भरपूर सिक्युरिटी होती. मी व्हॅन पर्यंत पोहचलो. सिक्युरिटी मधल्या एकाला बोललो, ‘‘अक्षय सर को सिर्फ इतना बोलना आपका पांडू आया है.” त्याने लगेच मेसेज दिला आणि आश्चर्य म्हणजे काही क्षणात व्हॅनमधून ते बाहेर आले आणि मला कडकडून मिठी मारली. ‘‘पांडू तू यहां.’’

तेव्हा त्यांनी फिल्मची माहिती दिली. ती ‘सपूत’ फिल्मची शुटींग होती. मला म्हणाले, आता माझा खूप रिस्की शाॅट आहे. तु थांब आणि बघ. माझ्या सर्व मित्रांना त्यांनी हात मिळविला आणि आॅटोग्राफ सुद्धा दिले. हा क्षण मी डोळ्यांत साठवून ठेवला. माझ्या जागी तुम्ही असतात तर काय विचार येईल याचाच विचार करा. हो ते खरंच ग्रेट आहेत.

वाशी खाडीपुलावर  तलाश सिनेमाचं शुटींग सुरू होतं.  नितिन बनकर याचा मला फोन आला (सध्या ते सरांसोबतच असतात. दे-दणादण चित्रपटात अक्षय सरांनी स्वत:ला नितीन बनकरांचे नाव दिले होते.) म्हटला अक्षय सर तुझी आठवण काढतात. तु ये फॅमीलीला घेवून. पण त्यावेळी माझी मुलगी प्राची हाॅस्पीटलला अॅडमीट होती. त्यांना याबाबत कल्पना दिली आणि म्हटलं, तु सरांना फक्त सांग, मी नंतर भेटतो.

सर मला प्रेमाने  पांडू बोलतात याचा मला थोडाही खेद नाही. पण, न राहवून एकदा हे सांगितलं. बाबा म्हणाले, “अरे मी पण पोलीस हवालदार आहे. मला पण कधी कोणी बोलतं पांडू. तुला आवडत नसेल तर आॅफीसर बनून दाखव.

मग मनाशी निष्चय केला जोपर्यंत आॅफीसर होणार नाही, तोपर्यंत सरांना भेटणार नाही. मग पुन्हा अभ्यास सुरु केला. तिथे प्रत्येकवेळा अपयश येत होतं. यश नेहमी दोन पाऊले पुढे असायचं. पुढे २०१३ मध्ये आॅफीसरची परिक्षा पास झालो. वाटले सरांना आता भेटू शकतो.

माझ्या खांद्यावर स्टार माझे आई-बाबा लावतील. मग, सरांना कडकडीत सॅल्युट मारायला जावू. पण, काही कारणास्तव निकाल कोर्टात पेंडीग राहीला. त्या दरम्यान आई सोडून गेली. बाबा पण थकले होते. जाताना ते सुद्धा म्हणाले, की संघर्ष काळातील तुझा गुरुच तुझ्या खांद्यावर स्टार लावील. बाबांच्या जाण्याचा योगायोग पण बघा. सरांच्या ‘केसरी’ फिल्मची शुटींग पिंपवडे बुद्रुक -सातारा येथे सुरू होती आणि ते गांव माझ्या गावापासून साधारण १०-१५ किलोमिटर वर आहे.

माझी दोन्ही मुले सरांची खुप मोठी फॅन आहेत.  सरांचा आर्मी आॅफीसरची भूमिका असलेला हाँलीडे चित्रपट पाहून मुलगा आर्य म्हणाला, मला पण आर्मीत जायचंय. मला मिलिटरी स्कुलमध्ये अॅडमिशन घ्या. मी त्याला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कुलमध्ये अॅडमिशन घेतलं.

माझाच मुलगा नाही तर कितीतरी मुलांत सरांचे चित्रपट पाहून देशभक्ती जागृत होते.

सरांच्या व्यक्तीमत्वातून प्रेरणा घेणारे कितीतरी मुले आज देशाचा विचार करू लागली आहेत. चित्रपट सृष्टीत त्यांना आज असलेले मानाचे स्थान पाहिल्यावर त्यांच्यासोबत व्यतित केलेले ते सोनेरी दिवस आजही एक चित्रपट बनून डोळ्यासमोरून जातात. डोळ्यांच्या कडाही ओलावतात. आनंद वाटतो, आपण एवढ्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात होतो याचा. आभाळाची उंची गाठलेला हा माणूस आपण समाजाचं देणं लागतो, हे अजिबात विसरलेला नाही. ज्या लोकांनी आपल्याला भरभरून दिलं त्यांच्या साठी काही तरी करण्याची उमेद त्यांच्या मनात नेहमीच असते. कुठल्याही प्रसिद्धीशिवाय ते करत असलेलं सामाजिक काम सुद्धा खूप मोठं आहे. देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक असोत, पोलीस असोत अथवा दुष्काळाने ग्रासलेला सर्वसामान्य शेतकरी.

सर या सगळ्यांसाठी देवदूत बनून मदतीला सदैव तयार असतात.

आज सरांचा वाढदिवस. सर्वसामान्यांच्या दु:खावर फुंकर घालून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण देणा-या या सुपरस्टार अक्षयकुमार यांना आणि माझ्या राजीव सरांना उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा.

- मोहन कदम,
*आज ९ सप्टेबर*
*आज खतरों के खिलाडी  अक्षय कुमारचा आज वाढदिवस.*
जन्म. ९ सप्टेबर १९६७
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या अभिनेत्याबाबतच्या काही रंजक गोष्टी .
लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते. त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते.भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे. नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. आपल्या समूहातर्फे अक्षयकुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट