Monday, September 3, 2018

मेरे रशकं कमर

काही गाणी सदैव मनात रेंगाळत असतात..मनाचा ठाव घेणारी..अशाच एका अनवट गझलेचे श्रुतीताई देसाई राजे  यांनी केलेले हे अप्रतिम रसग्रहण..एका वेगळ्याच अन्वयाचा आनंदानुभव देणारे..अवश्य वाचा...

*मेरे रश्क ए कमर*

काल कलर्स मराठी वाहिनीवर सक्षम सोनावणे ह्या छोट्या सूरवीराने मेरे रशके कमर हे गीत उत्तम सादर केलं आणि ते मनात घोळत राहिलं. हे गीत बादशाहो चित्रपटात असलं तरी मूळ रचना फार वेगळी आहे. कमर जलालवी यांच्या फ़ना बुलंदशहरी  ह्या शिष्याने ही गझल लिहिली होती आणि नुसरत फतेह अली खान यांनी ती कव्वाली पद्धतीने स्वरबद्ध करून गायली होती.

माझ्या मनात घोळतेय ती ही मूळ रचना.
ही सूफी  गझल आहे. सूफी परंपरा आपल्या मधुरा भक्तीची उर्दू बहीण आहे. यात अध्यात्मावर लिहिताना शृंगाराचा रूपकात्मक वापर केला जातो.

सुरुवातीला शायर म्हणतो,
मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र
जब नज़र से मिलाई मज़ा आ गया
रश्क म्हणजे मत्सर आणि कमर म्हणजे चंद्र. रश्क ए कमर म्हणजे चंद्रालाही जिच्या सौंदर्याचा हेवा वाटेल अशी व्यक्ती. अर्थातच ह्या आपल्या प्रेमपात्राला उद्देशून शायर म्हणतोय, तुझ्याशी पहिल्यांदा नजरानजर झाली तो क्षण अत्यानंदाचा होता. ( 'हरी पाहिला रे' मधली भावना हीच.)
"बर्क सी गिर गयी काम ही कर गयी
आग ऐसी लगायी मज़ा आ गया"
अचानक वीज कोसळावी आणि आग लागावी, तशी त्याची गत झाली. ही आगही साधी नव्हे, तर इष्काची! गोविंदाग्रजांच्या कवितेतला लखलखत्या विजेच्या प्रेमात पडलेला वृक्ष आठवतो? वीज कोसळून दुभंगला, मात्र हर्षाच्या लहरी येऊन हसला. तशीच वीज कोसळल्यावर लागलेली (भक्तीची) आग या शायरालाही आनंद देऊन गेली.

पुढे ह्या सूफी गझलेत हाला वादही मिसळतो नि शायर म्हणतो,
"जाम में घौल कर हुस्न की मस्तियाँ
चांदनी मुस्कुराई मज़ा आ गया
चाँद के साए में ऐ मेरे साकिया
तू ने ऐसी पिलाई मज़ा आ गया"

इथे चांदनी आहे ती अध्यात्माची. सौंदर्याची मस्ती आहे ती मधुराभक्तीच्या. ही भक्तीची नशा चढत जाते , चंद्राला साक्षी ठेवून.

"नशा शीशे में अंगड़ाई लेने लगा
बज़्म रिन्दान में सागर खनकने लगा
मैकदे पे बरसने लगी मस्तियाँ
जब घटा गिर के छाई मज़ा आ गया"

काचेच्या प्याल्यासारखंच नश्वर जीवन असतं मानवाचं. त्या प्याल्यात सुरा फेसाळत जाते तशी भक्ती आयुष्यात भिनत जाते. मद्यपींच्या मैफलीत जसे चषक किणकिणत असतात, तशी ईश्वरनिष्ठांच्या  मांदियाळीत भक्ती रुणझुणत असते. त्या भक्तीची नशा चढलेले भक्तगण पाहून आभाळाचंही मन भरून येतं. इथे आकाशतत्त्व भक्ताला ईश्वराच्या आणखी जवळ घेऊन जातं. ईश्वरी कृपेचा वर्षाव अधिकच बेभान करतो.

" बे हिजाबाना वो सामने आ गए
और जवानी जवानी से टकरा गयी
आँख उनकी लड़ी यूँ मेरी आँख से
देख कर ये लड़ाई मज़ा आ गया"

या संतसमागमातून आत्मारामु प्रकटतो. एका क्षणी अज्ञानाच्या अंधाराचे जाळे फिटते आणि आकाश मोकळं होऊन प्रत्यक्ष ईश्वर समोर येतो. दिठीला दिठी मिळते आणि आयुष्याचं सार्थक होतं.

"आँख में थी हया हर मुलाक़ात पर
सुर्ख आरिज़ हुए वसल की बात पर
उसने शर्मा के मेरे सवालात पे
ऐसे गर्दन झुकाई मज़ा आ गया"

एकदा भेट झाली की पुन्हा पुन्हा होत राहणारच. अशा प्रत्येक भेटीची खुमारी काही औरच असते. हळूहळू अंतिम मीलन नजरेच्या टप्प्यात येऊ लागतं, प्रीतीला प्रीत मिळू लागते. अध्यात्मात हा सूफी इतका पुढे जातो, की प्रत्यक्ष ईश्वर त्याला भेट देतो.
आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की मूळ सूफी पंथ जरी इस्लाम चा एक अविभाज्य घटक असला, तरी तो थोडा गूढवादाकडे झुकणारा आहे. शिवाय सूफी पंथियांच्या मधुराभक्तीला कट्टर इस्लामचा विरोध आहे. कारण उघड आहे, मधुराभक्ती ही जशी ईश्वराच्या सगुण उपासनेच्या मार्गाने जाते, तशी सूफी भक्तीही काफराना समजली जाते. त्यामुळे मुल्ला, मौलवी, शेख हे कट्टर मुसलमान सूफी लोकांशी कायम फटकून वागत आले आहेत. मात्र पैठण च्या ब्राह्मवृंदाने संन्याशाच्या मुलांचा धिक्कार केला, तरी हरी पाहण्याचं भाग्य त्या सच्च्या भक्ताच्याच वाट्याला येतं, तसं मुल्ला-मौलवी कितीदा नमाज पढले, तरी या सूफी संताच्या भक्तीशी त्यांची बरोबरी होऊ शकत नाही.

तुकोबांच्या भक्तीची टर उडवणारे कर्मठ जसे वैकुंठीचं विमान पाहून नतमस्तक झाले, तसेच हे कट्टर मुसलमान या सूफी संतांची ईश्वराशी जवळीक पाहून समूळ बदलले, नतमस्तक झाले. आपली पवित्रता गमावून बसले. (हा उल्लेख औपरोधिक आहे, इथे पवित्रता ही 'पवित्रा' किंवा कर्मठपणा या अर्थी घेता येईल) त्यांची पारसाई, अर्थात (तथाकथित) पावित्र्य विरघळून जाताना पाहून या सूफीला आनंदच मिळणार! पुढील कडव्यात हेच वर्णन येतं-

"शेख साहिब का ईमान बिक ही गया
देख कर हुस्न-ए-साक़ी पिघल ही गया
आज से पहले ये कितने मगरुर थे
लुट गयी पारसाई मज़ा आ गया"

आता शायर पुन्हा मघाच्या अंतिम मिलनाची वाट चालू लागतो. हे क्षणभंगुर आयुष्य नष्ट झालं आणि त्यानंतर ही त्याच्या प्रेमपात्राने त्याचा खास सन्मान केला. त्याच्या कबरीवर फुलांची चादर चढवून आपलं प्रेम व्यक्त केलं.

"ऐ फ़ना शुकर है आज बाद-ए-फ़ना
उसने रख ली मेरे प्यार की आबरू
अपने हाथों से उसने मेरी क़ब्र पर
चादर-ए-गुल चढ़ाई मज़ा आ गया"

आयुष्यभर ज्याचा ध्यास घेतला, त्याने शेवटी या जगातून त्या जगात गेल्यावरही आपल्या मायेचं पांघरूण घातलं आणि भक्ताची तपश्चर्या फळाला आली.
सूफी परंपरेप्रमाणे भक्ताचं अस्तित्व नष्ट होऊन तो भगवंताशी एकरूप झाला. 'ऐ फ़ना ...' हे शायराचं नाव (तखल्लुस) आणि 'बाद ए फ़ना ' (मरणोत्तर) या शब्दांनी शेवटच्या कडव्यात आणखी मजा आली आहे.
नुसरत फतेह अली खान यांनी ही गझल कव्वाली च्या फॉर्म मध्ये बांधून तिला चार चांद लावले आहेत.
हा पुन:प्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल सक्षम सोनावणे ह्या सूरवीरास धन्यवाद!

No comments:

Post a Comment