Friday, May 24, 2019

अटल जि

*एक सुफळ संपूर्ण प्रेमकहाणी…*

*विजय चोरमारे*
वरिष्ठ सहाय्यक संपादक
महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
…...........
राजधानी दिल्लीतल्या वरिष्ठ राजकीय वर्तुळात राजकुमारी कौल यांना सगळे ओळखत होते. त्यांचं निधन चार मे २०१४ रोजी झालं. त्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं पहिल्या पानावर सविस्तर प्रसिद्ध केली. त्यानंतर सर्वसामान्यांना राजकुमारी कौल यांच्याबद्दल कळलं. एका अज्ञात प्रेमकहानीच्या पुस्तकाची काही पानं उलगडली गेली. राजकुमारी कौल यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं, तेव्हा त्यासंदर्भात जी प्रेसनोट काढण्यात आली होती त्यामध्ये, ‘वाजपेयी यांच्या कुटुंबातील सदस्य’ असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता.

खरोखर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाचा त्या अविभाज्य भाग होत्या. चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांची वाजपेयी यांच्यासोबत मैत्री होती. पती प्रा. बी. एन. कौल हयात असताना वाजपेयी यांनी त्या दोघांसोबत खूप काळ व्यतीत केला. प्रा. कौल यांच्या निधनानंतर वाजपेयी यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्या वाजपेयी यांच्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्ति बनल्या. अशी व्यक्ती सत्तेच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींमध्ये ढवळाढवळ करीत असते आणि त्यामुळे वादग्रस्त ठरते. परंत राजकुमारी कौल यांनी राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवले आणि संबंध केवळ व्यक्तिगत पातळीवरच जपले. त्याला छान कौटुंबिक उबदारपणाचे आवरण दिले.

अटलबिहारी वाजपेयींसाठी येणारे फोन राजकुमारी कौल याच घेत होत्या. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आगत-स्वागतही त्याच करायच्या. त्यांचं निधन झालं तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धामधुमीचा काळ होता. त्यावेळच्या व्यस्ततेतूनही वेळ काढून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वाजपेयींच्या घरी  जाऊन त्यांना आदरांजली वाहिली होती. यावरून राजकुमारी कौल यांचं वाजपेयींच्या कुटुंबातलं स्थान किती महत्त्वाचं आणि सन्मानाचं होतं, हे लक्षात येतं.

राजकुमारी कौल आणि अटलबिहारी वाजपेयी यांची ही कहाणी एखाद्या चित्रपटाची कथा बनावी अशी  तरल होती. त्यातली तरलता आणि त्या कहानीचा खानदानी आब अखेरपर्यंत टिकून राहिला. सोशल मीडियाच्या सवंग कालखंडातही त्याला गॉसिपचे स्वरुप आले नाही, तसे कुणी देण्याचा प्रयत्नही केला नाही. अटलजींचं आदरणीय आणि निर्मळ व्यक्तिमत्त्वच त्याला कारणीभूत होतं.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेमुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी राजकुमारी कौल यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. बाकी भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. ‘बहुत ममता से भरी हुयी थी’ ही सुषमा स्वराज यांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांचं नेमकं वर्णन करणारी होती.

वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. बाकीच्याही कुणी त्या फंदात पडले नाही. ‘मिसेस कौल’ म्हणूनच त्या स्वत:ची ओळख करून द्यायच्या आणि आपण वाजपेयींच्या मित्र असल्याचं सांगायच्या. वाजपेयी पंतप्रधान असताना ७, रेसकोर्स येथेही मिसेस कौल म्हणूनच त्या राहिल्या.

ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये (सध्याचे लक्ष्मीबाई कॉलेज) शिकत असल्यापासून अटलबिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची ओळख होती. ग्वाल्हेरच्या मोरार परिसरात कौल यांचे कुटुंबीय राहात होते. नंतर त्यांनी शहर सोडले. कॉलेजमध्ये असताना वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांच्यात अनोखे भावबंध निर्माण झाले होते. परंतु काही कारणांनी ती प्रेमकहाणी अधुरीच राहिली. वाजपेयींनी राजकुमारींना प्रेमपत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या, परंतु त्यांना त्या पत्राचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळं ते मनातून दुखावले होते. पुढं दोघांचे रस्ते वेगळे झाले.

राजकुमारी यांचा विवाह प्रा. बी. एन. कौल यांच्याशी झाला. ते दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि कॉलेजच्या होस्टेलचेही वॉर्डन होते. पतीसोबत राजकुमारी कौल दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर वाजपेयी यांच्याशी त्यांचा पुन्हा संपर्क सुरू झाला.

अलिकडेच दिवंगत झालेले ज्येष्ठ पत्रकार गिरीश निकम यांनी राजकुमारी कौल यांच्या निधनानंतर त्यांच्यासंदर्भातील काही आठवणींना उजाळा दिला होता.

भाजपचे बीट कव्हर करीत असताना निकम यांना वारंवार वाजपेयींच्या निवासस्थानी फोन करावा लागायचा. तो लँडलाइनचा जमाना होता. रात्री कधीही फोन केला तरी एक महिला फोन उचलायची. अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आवाज होता. निकम लिहितात, ‘मी त्यांना वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या फोन होल्डवर ठेवायला सांगायच्या आणि नंतर वाजपेयी फोनवर यायचे. हे वारंवार घडायचं. अतिशय सभ्य, सुसंस्कृत आवाजात पलीकडून आपली ओळख करून दिली जायची, ‘मी मिसेस कौल बोलते.’ असं बऱ्याचवेळा घडलं. म्हणजे फोन मिसेस कौल उचलायच्या आणि थोड्या वेळानं वाजपेयी फोनवर यायचे.’

एके दिवशी निकम यांनी फोन केल्यावर ‘मिसेस कौल बोलते’, असा नेहमीचा आवाज आला. वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या पुन्हा म्हणाल्या, ‘मी मिसेस कौल बोलतेय’. त्यावर कोणतंही कुतूहल न दाखवता निकम म्हणाले, ‘होय मॅडम, मला ठाऊक आहे.’ हे असं झाल्यावर नेहमीच्या आदबशीरपणे आणि आश्चर्यानं त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला माहीत नसावं मी कोण आहे ते!’

‘नाही मॅडम’, निकम यांनी थोडं अपराधीपणानं उत्तर दिलं.

‘मी मिसेस कौल, राजकुमारी कौल. वाजपेयीजी आणि मी खूप वर्षांपासून म्हणजे चाळीस वर्षांपासून मित्र आहोत. तुम्हाला ठाऊक नाही?’ त्यांनी आश्चर्ययुक्त कुतूहलानं विचारलं.

‘ओह, सॉरी मॅडम, मला ठाऊक नव्हतं.’ निकम यांनी उत्तर दिलं. त्या हसल्या आणि त्यांनी वाजपेयी आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगितलं. त्या आणि त्यांच्या पतीसोबत वाजपेयी राहात असल्याच्या आठवणीही सांगितल्या.

वाजपेयींनी आपल्या कॉलेजच्या काळातील या मैत्रिणीबद्दल कधी सार्वजनिकरित्या काही सांगितलं नाही. एका मुलाखतीमध्ये राजकुमारी कौल म्हणाल्या होत्या की, ‘मला आणि अटलजींनाही कधी आपल्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली नाही.’

राजकीय, सामाजिक जीवनात अटलजींच्याबद्दल एवढा आदर होता, की या नात्याबद्दल कधी माध्यमांनी बातम्या रंगवल्या नाहीत किंवा राजकीय वर्तुळात कधी गॉसिपिंग झालं नाही. वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान झाले, त्या तिन्ही वेळेला त्यांचं घर मिसेस कौल आणि वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य याच सांभाळत होत्या. वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांचं हे नातं वाजपेयींच्या कौटुंबिक आणि राजकीय वर्तुळातल्या नेत्यांनी सहज स्वीकारलं होतं.

कोणत्याही प्रेमकहाणीचा शेवट दोन प्रकारे होत असतो. एकतर ताटातूट होते. किंवा दोघं लग्न करतात. वाजपेयी आणि राजकुमारी यांची प्रेमकहाणी वेगळी आहे. दोघांची ताटातूट झाली. पैकी एकाचं लग्न झालं. त्यानंतर दोघं भेटले. अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले. त्याअर्थानं विचार केला, तर ही प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण ठरली, असं म्हणता येईल.
111111111111

उत्कृष्ट राजनितिज्ञ, कवी ,पद्मविभुषण, भारतरत्न माजी पंतप्रधान मा.श्री अटल बिहारी वाजपेयी यांच निधन .
*अटल है ध्यास अटल है विश्वास*
देशाच्या राजकारणात जवळपास ६० वर्ष अविरत उत्साहाने आणि अतिशय सभ्यतेने वावरणा-या राजकारण्यांमध्ये अटलजींचे नाव आदराने घेतले जाते. एक हिंदी कवी म्हणून जीवनाची  सुरुवात करणारे अटलजी, हे शामाप्रसाद मुखर्जी यांच्या सहवासात आले. त्यांचे सचिव बनले आणि अटलजींच्या नेतृत्वाला परिसस्पर्श झाला. १९५७ मध्ये बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवणारे वाजपेयी, बलरामपूरला निवडणूक लढवायला जाताना कोणतेही रिझव्‍‌र्हेशन नसलेल्या तिस-या वर्गाच्या डब्यात, जिथे सामान ठेवतात त्या वरच्या बाकावर झोपून बलरामपूरला पोहोचले होते. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणात (अपनी अपनी बात) त्यांनी त्या प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. संसदेमध्ये पहिल्यांदा दाखल झाल्यानंतर तरुणपणातल्या त्यांच्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकाला आणि विषयांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सदस्याला, सत्ताधारी पक्षाच्या बाकावरचे सदस्य किती सन्मानाने वागवतात आणि त्याचा कसा आदर करतात, याचे उदाहरण वाजपेयीच आहेत. त्यावेळचे सर्वोच्च लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही वाजपेयी यांच्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषणाने प्रभावीत होत असत आणि याच पंडितजींनी तेवढय़ाच मोकळेपणाने १९५८ सालातच सांगून टाकले होते की, ‘प्रधानमंत्री पद के लिए अटलजी का एक दिन पक्का..’ पंडितजींचे ते शब्द २८ वर्र्षानी खरे ठरले. १९९६च्या लोकसभेत १६२ जागा मिळवणा-या भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि अवघ्या १३ दिवसांकरिता वाजपेयी पंतप्रधान झाले. लोकसभागृहात पुरेसे बहुमत मिळवता आले नाही म्हणून मतदान होण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रपतींकडे जाऊन राजीनामा सादर केला.
पंतप्रधान होण्यापूर्वी जनसंघाचे संस्थापक सदस्य, खासदार (१९५७, १९६२), जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), लोकसभेतल्या जनसंघ गटाचे नेते (१९५७ ते १९७७), जनता पक्षाच्या सरकारात परराष्ट्रमंत्री (१९७७ ते १९७९), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८० ते १९८६), भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८० ते १९९६),  भारताचे पंतप्रधान,  (१९९६ आणि १९९८ ते २००४) अशी त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द आहे. या कारकिर्दीप्रमाणेच सामान्य माणसाला वाजपेयी माहिती आहेत ते एक अमोघ वक्ते आणि सभा गाजवणारे नेते म्हणून. जुन्या जनसंघाने आणि नंतर भाजपाने ‘प्रधानमंत्री की अगली बारी-अटलबिहारी’ अशा अनेक वेळा घोषणा दिल्या होत्या. त्या घोषणा वाजपेयी यांच्या नेतृत्वामुळेच वास्तवात उतरू शकल्या. ते पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांचा चेहरा कधी ‘कट्टर’ वाटला नाही आणि त्यांची सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन जाण्याची सर्वव्यापक भूमिका कधीही लपून राहिली नाही.  राजकीय हिंसाचाराला वाजपेयींचा जसा विरोध होता तसाच जाती-धर्माच्या नावावर राजकारणात टोकाचे मतभेद करण्यालाही त्यांचा विरोध होता. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्या सगळ्या उन्मादात वाजपेयी कुठेही सामील झालेले नव्हते आणि ‘जे झाले ते योग्य झालेले नाही’, असे त्यांचे प्रांजळ मत त्यांनी अगदी स्पष्टपणे नोंदवलेले होते. ते काँग्रेसचे विरोधक होते; पण, देशाच्या उभारणीत काँग्रेसचा जो प्रचंड त्याग आहे, त्याबद्दल नेहमीच ते आदराने बोलत असत. विरोधी बाकावर असतानाही पंडितजींच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती करताना त्यांना कधी संकोच वाटला नाही आणि स्वत: परराष्ट्रमंत्री झाल्यावरही पंडितजींबद्दल गौरवाचे उद्गार काढताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही

वाजपेयींचे भाषण जेवढे मोहून टाकणारे असायचे, अगदी तेवढेच त्यांचे ललित लेखनही प्रासादिक आहे. काही काळ ते पत्रकारही होते. ‘पांचजन्य’ या साप्ताहिकात ते लेखन करीत असत. त्यांचा आणखी एक गुणविशेष म्हणजे व्यवसायाने राजकारणी असताना मनाने ते कवी होते आणि त्यामुळेच त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांच्या रसपूर्ण अशा साहित्याचा परिचय भारतीय रसिक वाचकांना झालेला आहे. त्यांचे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या काव्य गायनाचे कार्यक्रमही रंगू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची मने जुळली. याचे आणखी एक कारण म्हणजे राजकारणात राहूनही या दोघांची मने कवींची होती, हळूवार होती, संवेदनाक्षम होती. त्यामुळे लोकसभेत आक्रमक होणा-या या दोन्ही नेत्यांनी आपल्या हळूवार भावनांचे प्रदर्शन साहित्यामध्ये अतिशय लालित्यपूर्ण रितीने केलेले आहे.
आशा या महान ,तपस्वी ,थोर व्यक्तीचा जिवन प्रवास थांबला ,त्यांच्या आत्मास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹💐💐🌷

No comments:

Post a Comment