Friday, July 12, 2019

प्राण जयंत विद्वान्स

*जयंत विद्वांस यांच्या FB Page वरून साभार!*

जीव की प्राण... १२ ०७ १३

प्राण सिकंद, कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता धडकी भरवणारा खलनायक. प्रेमनाथ, शक्ती कपूर, कादरखान सारखा त्याचा खलनायक आचरट, विकृत, ओंगळ कधीच नव्हता. जो काय हलकटपणा दाखवायचाय त्यासाठी चेहरा, डोळे, एखादी लकब, छद्मी हसण पुरायचं त्याला. उपकारच्या मलंगचाचा नंतर तो पालटला आणि चरित्रं भूमिकांमध्ये स्थिरावला. गुलशन ग्रोवर आत्ता आला, प्राणने गेटप आणि वेगवेगळे हावभाव खूप आधी आणले. खलनायकी ज्या जोशात करायचा तशाच सहृदय भूनिका पण तेवढ्याच ताकदीने करायचा.

काही चित्रपट प्राण करता लक्षात राहिलेत माझ्या, मजबूर मधला घायाळ मायकेल, मधुमती मधला दिलीपकुमार आणि जयंत पुढे तेवढ्याच ठामपणे उभा रहाणारा उग्रनारायण, अमर अकबर अंथोनी मधला किशनलाल, उपकार मधला मलंग चाचा, डॉन मधला दोरीवर चालणारा लंगडा सर्कसपटू, ब्रम्हचारीत तर तो मला शम्मी पेक्षा पण जास्तं आवडला होता. जंजीरचा उल्लेख वेगळा करावा लागेल, अमिताभचं नवखेपण जाणवत त्यात, पण प्राणनी कुठेही कुरघोडी केलेली नाही. त्याचा दिलेर शेरखान केवळ अविस्मरणीय. जॉनी मेरा नाम मधे देव आनंदचा बिछ्डलेला भाऊ होता तो. शेवटच्या मारामारीच्या देव आनंद बरोबरच्या अत्यंत हास्यास्पद प्रसंगात प्राण भाव खावून गेलाय. अशोकुमार बरोबरचे नर्म विनोदी विक्टोरिया नं.२०३, राजा और राणा, जंगल मे मंगल मधला रिटायर्ड कर्नल, परिचय मधला कडक आजोबा, अंधा कानून मधला अंथोनी, लाखो मे एक मधला मेहमूदला सांभाळून घेणारा शेरसिंग, शराबी मधला हताश श्रीमंत बाप, बॉबी मधला पैशाची मस्ती असलेला बाप.

धर्माच्या कव्वालीनंतर त्यालाही गाणी मिळू लागली. मुळात तो एक अत्यंत सहृदयी, सज्जन माणूस पण मिळेल ती भूमिका तो उत्तम वठवायचा, तो गरीब वाटायचा, श्रीमंत पण, क्रूर, मग्रूर वाटायचा तसाच दयाळू पण, खुनशी, घातकी वाटायचा तेवढाच दिलदार पण, हेच त्याचं वैशिष्ठ्य म्हणाव लागेल, समोर दिग्गज असो नाहीतर नवखा, आपलं काम करताना कुरघोड्या वगैरे करण्याच्या फंदात पडायची त्याला जरूरच नव्हती, त्यासाठी त्याचा सशक्त अभिनय पुरेसा होता. खलनायकी प्रभावी होण्यासाठी वास्तवात पण तसच वागायला हवं असला उच्च गैरसमज त्याच्याकडे नव्हता. पडद्यावरच्या प्रतिमेची भरपाई केल्यासारखा तो वास्तवात सज्जन होता. दुसरं खणखणीत उदाहरण म्हणजे स्व.अमरिश पुरी. पडद्यावर आणि वास्तवात दोन्हीकडे त्यानं स्वत:चा आब शेवट पर्यंत राखला हे मात्रं मानायलाच हवं.

प्राणनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, कुठल्याही आई बापानी आपल्या मुलाचं नाव कौतुकानी प्राण ठेवल्याचं ऐकिवात नाही इतका त्याचा खलनायक जबरदस्त होता. मुलगा सुनील सिकंदला हिरो करण्यासाठी त्यानी एक पिक्चरही काढला होता पण तो चालला नाही. खलनायकाचा मुलगा ना, बापाची दुष्कीर्ती आड आली असावी. दादासाहेब फाळके पुरस्कार बहुतेक ती व्यक्ती मरायला टेकल्याशिवाय द्यायचा नाही असा कदाचित नियम असावा. त्या मानानी प्राणला लवकर दिला असच म्हणावं लागेल.

लोकांना सिनेमा पहाताना टायटल मोठ्यांदा वाचायची फार हौस असते, सगळी नावं संपली की AND PRAN असं वाचायची सवय झाली होती, आता ती ही कन्फर्म संपली.

*जयंत विद्वांस*

'७० एमएमचे आप्त'मधून...

Thursday, July 11, 2019

दो नयना एक कहानी। समीर गायकवाड

दो नैना एक कहानी ....

१९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. मी तेंव्हा किशोरवयीन होतो. माझ्या आईवडिलांसमवेत सोलापुरातील भागवत छायामंदिरात हा सिनेमा पाहिला होता. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखेच.....
हा सिनेमा पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय..त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की...

बदलत्या काळानुसार अनेक गाणी आली आणि गेली, काही विस्मृतीत गेली. पुर्वी रेडिओ नित्य ऐकायचो तेंव्हा अनेक चांगली गाणी सतत कानी येत राहायची..काळ पुढे जात राहिला, मनोरंजनाची साधने बदलली आणि रेडीओ लुप्त झाला...मायेची माणसे दूर देशी देवाघरी गेली आणि जगणे अधिक कृत्रिम होत गेले. यांत्रिक जीवनाचा भाग म्हणून मनोरंजन राहिले, त्यातला जिवंत रसरशीतपणा कधी संपला काही कळालेच नाही...

मागच्या वर्षी शाळेतल्या मित्रांचे एक छोटेसे संमेलन माझ्या जिवलग मित्राने Rajeshने भरवले होते, त्यावेळी पिरंगुटला जाताना कारमध्ये हे गाणे खूप वर्षाच्या अंतराने कानावर पडले आणि स्मृतींचे एकच मोहोळ उठले.... डोळे कधी ओले झाले काही कळलेच नाही...तेंव्हापासून यावर लिहायचे डोक्यात घोळत होते मात्र गुलजारजींनी लिहिलेल्या या गाण्याबद्दल काही लिहावे इतकी माझी योग्यता नाही हे डोक्यात पक्के होते... पण या अवीट गोडीच्या गाण्यावरील प्रेमापोटी यावर लिहिण्याचा मोह अनावर झाला म्हणून लिहितोय.

'मासूम' गाजला, त्यातल्या कथेमुळे, नसिरुद्दीन, शबाना, उर्मिला आणि जुगलच्या अभिनयामुळे ! यातील गीतांनी ह्या चित्रपटाचे सोने केले. एकापेक्षा एक सुरेल अन अर्थपूर्ण गाणी यात होती. आरडीचे संगीत, गुलजारजींची गाणी अन एकापेक्षा एक महान गायकांची गायकी असा अमृतसंगीताचा योग यात होता. यातले 'तुझसे नाराज नही' हे गाणे जास्त लोकप्रिय झाले पण मला भावते ते 'दो नैना एक कहानी' हे गाणे !

नसिरुद्दीन आणि शबानाचा दृष्ट लागण्यासारखा सुखी संसार. त्यात नसिरुद्दीन आणि सुप्रिया पाठकचे प्रेमप्रकरण! आणि मग जुगलचे आगमन. सुप्रिया पाठकचा दुर्दैवी मृत्यू. आणि मग आपलं पित्याचं कर्तव्य निभावण्यासाठी नसीरने जुगलला घरी आणल्यामुळे निर्माण झालेलं वादळ. आकाशपाताळ एक करण्याचा शबानाला पूर्णपणे हक्क! तिची प्रतिक्रिया संयमी! मनात विचारांचे आणि दुःखाचे वादळ असूनसुद्धा! आपली कुटुंबातील दैनंदिन कर्तव्य यांत्रिकपणे पार पाडण्याचे काम ती पार पाडत असते. नसीरची तर अजूनही जास्त कुचंबणा. शबाना आपल्या दोन मुलींवर प्रेमाचा वर्षाव करीत असताना जुगल एका कोपऱ्यात राहून बाह्यस्वरूपी अलिप्तपणे आपलं जीवन जगत असतो. दिवसा खेळण्यात बागडण्यात त्याचा वेळ जातो परंतु त्याची रात्र मोठी कठीण असते. कारण सांज भल्या भल्या माणसांना आठवणीच्या सयीत विरघळवते. सांजेला जोडून येणारी रात्र माणसाला भावुक बनविते आणि आठवणींचा कल्लोळ माणसाच्या मनात निर्माण करते. एके रात्री शबाना आपल्या मुलींसाठी अंगाईगीत गात पुढे गायलेलं 'दो नैंना ..' हे गीत जुगलच्या कानी पडते. तो आपल्या अभ्यासिकेतून बाहेर येतो. हे गाणे अर्थातच त्याच्या मनात त्याच्या आईच्या आठवणी सचेत करते. चित्रपटात हे गीत गातेय शबाना पण ते जुगलच्या मनातील भावनांच्या तरंगांशी अधिक मिळते जुळते आहे.
गुलजारजींनी कोणत्या अर्थाने व प्रयोजनाने हे गाणे लिहिले हे कळणे बुद्धीपलीकडचे आहे मात्र हे गाणे खूप काही सांगून जाते, सतत कानात रुंजी घालत राहते हे खरे.

'दो नैना और एक कहानीथोडा सा बादल, थोडा सा पानी और एक कहानी' या ओळी ऐकून जुगल बाहेर येतो आणि शबानाला तिच्या मुलींसाठी हे गाणे अंगाई म्हणून गाताना पाहतो. त्याचा जीव कासावीस होतो. 'थोडासा पानी' तर त्याच्या डोळ्यात केंव्हाच आलेय पण यातील जी 'एक कहानी' आहे, ती तिघांचीही वेगवेगळी आहे. शबानाचे दुःख वेगळे, नासिरची व्यथा अबोल शब्दातली तर जुगलचे वयच लहान अन दुखाचा डोंगर मोठा....

'छोटी सी दो झिलों में, वोह बहती रहती है
कोई सुने या ना सुने कहती रहती है,
कुछ लिख के और कुछ जुबानी.....'
ह्या पंक्ती ऐकताना जुगलला त्याची आई आठवते, तिचे प्रेम आणि सहवासातले क्षण त्याच्या काळजातून डोळ्याच्या पारयात उतरतात. नसीर त्याच्या मागे येऊन उभा राहतो पण थिजलेल्या अपराधी माणसासारखा ! ही कहाणी 'दो झिलोमे बहती रहती है' अशीच आहे, तिला उसंत नाही ती कोणी ऐकण्या न ऐकण्याचा प्रश्नच नाही. ती फक्त ज्याच्या त्याच्या आठवणीत राहणार हेच त्याना सुचवायचे असेल...
'थोड़ी से हैं जानी हुई, थोड़ी सी नयी
जहा रुके आंसू, वही पुरी हो गयी
है तो नयी फीर भी हैं पुरानी...'

खरे तर अशा प्रसंगात अश्रू कधीच थाबत नाहीत म्हणूनच 'जहा रुके आसू, वही पुरी हो गयी !' असं अगदी जाणीवपुर्वक लिहिलंय. म्हटलं तर नवं म्हटलं तर जुनं थोडं ओळखीचे वाटणारं असं हे वेदनेचं, अश्रुंचं जगणं ! या वेळी पडद्यावर सुप

्रिया आणि जुगल फ्लॅशबॅक मध्ये दिसतात. आईची चिता जळताना पाहिलेल्या जुगलचे अनाथ असणं इथं प्रेक्षकांच्या मनावर खोल बिंबतं....त्यामुळे जुगलची वेदना अधिक गहिरी होते.
'एक ख़त्म हो तो, दूसरी याद आ जाती है
होठों पे फिर भूली हुई, बात आ जाती है
दो नैनो की हैं यह कहानी ....'
शेवटच्या ओळी गाताना शबानाचे डोळे डबडबून गेलेले असतात. ती गात गात खिडकीपाशी येते तर आईच्या आठवणीने विव्हळ झालेला जुगल घराबाहेर लॉन मध्ये येतो आणि त्याच्या पाठीमागे चालत आलेला नसीर अधांतरी असल्यागत घराच्या दरवाजातच थबकतो. अंधारात उभा असलेला जुगल रडवेल्या चेहऱ्याने पाठमोरा होऊन शबानाकडे वळून बघतो, तर वरच्या मजल्याच्या खिडकीतली शबाना आता डोळ्यातून आलेले अश्रू ओघळतील इतक्यात मागे सरकते. आणि हतबध्द होऊन उभ्या असलेल्या नसीरवर छोटासा क्लोजअप घेऊन गाणे संपते...

हे गाणे एकाच वेळेस तिघांचे दुःख शब्दबद्ध करते. आईच्या आठवणीने भावविभोर झालेला निरागस मुलगा, पतीने प्रतारणा केल्याचे दुःख न बोलता सहन करणारी एक स्त्री जी एक हळवी आईही आहे. तर एका बाजूला दुहेरी अपराधीपणाचे सल अनुभवणारा संयमी शांत पण हतबद्ध नवरा जो कर्तव्यसन्मुख पिताही आहे...

भावनांचे अनेक कंगोरे, तिन्ही पात्रांची घुसमट आणि वेदनेचे अचूक प्रकटन हा या गाण्याचा आत्मा आहे. हे गाणे ऐकताना 'गेले द्यायचे राहून' ही भावना अन कर्तव्य जे करायचे राहून गेले याचे एकत्रित स्मरण करून देते....काळाच्या पटलावर मोहरे होऊन जगताना आलेली यांत्रिकता अन वास्तविक जीवनात स्वीकाराव्या लागणारया तडजोडी सतत डोळ्यापुढे येत राहतात. अन अस्वस्थता वाढत जाते... 'एक ख़त्म हो तो, दूसरी याद आ जाती है, होठों पे फिर भूली हुई, बात आ जाती है, दो नैनो की हैं यह कहानी ....' या ओळीचे अर्थ फार खोलात घेऊन जातात, अगदी अंतर्मुख करतात..

हे गाणे मनावर अजब गारुड करून जाते, अशा एका हव्याहव्याशा वाटणारया दुःखाचा पुनर्प्रत्यय देत राहते. 'मासूम' पाहताना नकळत डोळ्याच्या कडा दरवेळेस ओले करून जाते...

या गाण्याला त्या वर्षीच्या उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.त्याला कारण म्हणजे गायिका आरती मुखर्जी ! विलक्षण आर्त व काहीसा कातर असा, पण मोकळा वाटणारा तलम आवाज हे या गायिकेचे वैशिष्ट्य गाण्याच्या प्रत्येक शब्दात जाणवत राहते. ह्या आवाजाची एक दर्दभरी मिठास या गाण्याला अजरामर करून गेलीय यात शंकाच नाही...पंचमजींच्या संगीतासाठी अन चालीसाठी तर शब्द नाहीत. शेखरकपूरने गाणे सजीव केलेय तर शबाना, जुगल अन नसीर हे तिघेही आपआपले पात्र जगलेत...

आजही कधीही कोठेही हे गाणे ऐकले की मन तल्लीनही होते अन वेदनेच्या स्मृतीवर आठवणींची हळुवार झुळूक अलगद फुंकर मारून जाते.

- समीर गायकवाड

Saturday, July 6, 2019

चौदहवी का चाँद हो या आफताब हो  पद्माकर पाठकजी

या प्रियकर-प्रेयसीच्या प्रीतिकथेत शकील बदायुनी यांचे काव्य तर विविध रंगांची, विविध भावनांची उधळण करते. एकेक शब्द, एकेक उपमा लाजवाब असतात. असेच शकील यांनी ‘चौदहवी का चाँद’करिता लिहिलेले लाजवाब गीत मोहम्मद रफी यांच्या गोड आवाजात आणि सं. रवी यांच्या संगीतात श्रवणाचा अद्भुत आनंद तर देतेच; पण पडद्यावर पाहतानाही शकीलच्या उपमा अलंकारानुसार सौंदर्य लाभलेली वहिदा रेहमान पाहून ती मनाच्या हिंदोळ्यांवर झुलत राहते. गुरुदत्त यांचा अभिनयही प्रभावी ठरला आहे. ‘तिच्या’ सौंदर्याने पागल झालेला प्रियकर तिला म्हणतो, 

चौदहवी का चाँद हो या आफताब हो 

जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो

(हे प्रिये तू) चतुर्दशीचा चंद्रमा आहेस (की उदयाचली दिसणाऱ्या मोहक) सूर्यासारखी (दिसत) आहेस, (हे मला नेमके सांगता येत नाही; पण एवढे निश्चितच खरे, की) तू जी कोणी आहेस ती देवाशपथ सांगतो, की अप्रतिम लावण्यवती आहेस. तुझे सौंदर्य लाजवाब आहे. 

आपल्या या सुंदर प्रेयसीचे सौंदर्य वर्णन करताना ‘तो’ प्रियकर पुढे म्हणतो -

जुल्फे है जैसे कंधोंपर बादल झुके हुए 

आँखेट है जैसे मय के प्याले भरे हुए

मस्ती है जिस में प्यार की तुम वो शराब हो

(हे प्रिये तुझे) हे काळे केस म्हणजे (तुझ्या मुखचंद्राच्या बाजूला) खांद्यावर झुकलेले मेघच होत! (तुझे सुंदर चमकदार) नेत्र म्हणजे जणू काही मदिरेने भरलेले प्यालेच आहेत. ज्यात प्रेमाची मस्ती (कणाकणाने भरलेली आहे) असे तुझे सौंदर्य म्हणजे (एक प्रकारची नशा आणणारे) मद्यच आहे. 

उपमा अलंकाराने अशा प्रकारे हे काव्य नटवत शायर पुढे ‘तिला’ म्हणतो -

चेहरा है जैसे झील में हँसता हुआ कमल

या जिंदगी के साजपे छेडी हुई गज़ल 

जानेबहार! तुम किसी शायर का ख्वाब हो

(हे प्रिये तुझा) चेहरा म्हणजे जणू काही सरोवरात उमललेले हसरे/ मोहक कमळ आहे. अथवा जीवनाच्या वाद्यांवर छेडलेली (भावपूर्ण) गज़ल आहे. जानेबहार प्रिये, तू कोणा महाकवीचे विलोभनीय स्वप्नच आहेस. 

असे आपल्या प्रेयसीचे वर्णन करताना हा प्रियकर या गीताच्या अखेरच्या कडव्यात म्हणतो -

होठों पें खेलती है तबस्सुम की बिजलियाँ 

सज्दे तुम्हारी राह में करती है कहकशाँ

दुनिया-ए-हुस्न इश्क का तुम ही शबाब हो

(हे प्रिये) मधुर हास्याच्या विद्युलल्ता तुझ्या अधरांवर/ओठांवर खेळतात. तुझ्या मार्गावर आकाशगंगा नतमस्तक होते. सौंदर्य व प्रणयाच्या दुनियेतील अप्रतिम लावण्य म्हणजे तूच आहेस! 

असे हे सौंदर्यवर्णन करणारे गीत लिहिताना शकील बदयुनींनी ‘तबस्सुम’ (मधुर हास्य), सज्दे (नतमस्तक होणे), कहकशाँ (आकाशगंगा), आफताब (सूर्य), मय के प्याले (मद्याचे चषक) असे भारदस्त उर्दू शब्द वापरून या काव्याचे सौंदर्य एकदम खानदानी बनवले आहे. ते संगीतात बांधताना संगीतकार रवींनी जी आकर्षक व हळुवार चाल बांधली आहे, तिचे सौंदर्य गीताच्या सुरुवातीच्या ‘हुं हुंऽऽहुं’ अशा गुणगुणण्यामुळे आणखीच प्रभावी बनते. मोहम्मद रफींचा स्वर त्याला साजेसा न्याय देतो. आणि पडद्यावरची वहीदा व गुरुदत्त म्हणजे तर अप्रतिम दर्शनीय!

अशी गीते असणारे एम. सादिक यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक भाग! अशा या उत्कृष्ट दिग्दर्शकाला त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन!

- पद्माकर पाठकजी

मोबाइल : ८८८८८ ०१४४३

शिशा हो या दिल हो। पद्माकर पाठकजी

...........

१९५७ ते २००० या ४३ वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत ६०० हिंदी चित्रपटांकरिता चार हजार गीते लिहिणारे, हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक गीते लिहिण्याचा विक्रम करणारे, कारकिर्दीत चार वेळा उत्कृष्ट गीतकार म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळवणारे, एकदा सिने अॅवॉर्ड आणि दोन वेळा स्क्रीन अॅवॉर्ड मिळवणारे, दोन चित्रपटांत स्वतःच्या स्वरात गाणे गाणारे गीतकार, अशी ज्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगितली जाते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे गीतकार आनंद बक्षी होय!

‘आदमी मुसाफिर है, आता है जाता है’ या स्वतः लिहिलेल्या काव्याच्या ओळीतील सत्यता सिद्ध करत हा ‘मुसाफिर’ ३० मार्च २००२ रोजी या दुनियेतून जाता झाला! आणि मागे ठेवून गेला अनेक अर्थपूर्ण गीते!

‘आनंद बक्षी आणि अर्थपूर्ण गीते’ हा शब्दप्रयोग अनेक चित्रपटप्रेमींना भावत नाही; पण जरा निरीक्षण केले तर हे लक्षात येते, की एखादा चित्रपटप्रेमी (साधारण १९७०पासून पुढील काळातील) त्याच्या निवांत क्षणी जे एखादे गीत गुणगुणत असतो, अगर शिळेवर धून म्हणत असतो, त्या गीतांपैकी बहुतांश गीते ही आनंद बक्षी यांचीच असतात.

२१ जुलै १९३० रोजी रावळपिंडी येथे जन्मलेल्या आनंद बक्षींना तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कविता लिहिण्याचा छंद लागला. भारतीय सेनेच्या सिग्नल विभागात स्विच बोर्ड ऑपरेटर म्हणून काम करणारे आनंद बक्षी चित्रपट गीतकार बनण्याचे स्वप्न बघत होते. त्यासाठी सैन्यातील नोकरी सोडून ते मुंबईत आले; पण तेथे गीतकार म्हणून नावारूपास येण्याकरिता त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईतून निराश होऊन ते परत गेले आणि १९५७मध्ये पुन्हा मुंबईला आले.

त्या वेळी भगवानदादांनी त्यांना ‘भला आदमी’ या भगवानदादांच्या चित्रपटासाठी गीतकार म्हणून काम दिले. त्या चित्रपटामधील १० गीतांपैकी पाच गीते लिहिण्याचे त्यांना त्या वेळी म्हणजे १९५८मध्ये दीडशे रुपये मिळाले होते. त्या काळात ती रक्कम तशी मोठी होती; पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या वेळी त्यांना आणखी चार चित्रपटांची कामे मिळाली. १९६१पर्यंत त्यांनी जवळजवळ बारा चित्रपटांसाठी गीते लिहिली; पण आनंद बक्षी हे नाव लोकप्रिय झाले नाही.

‘आनंद बक्षी आणि अर्थपूर्ण गीते’ हा शब्दप्रयोग वापरू नये म्हणून ‘सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन...’, ‘वन टू का फोर...,’ ‘आज मोहब्बत बंद है...’ अशी ढीगभर गाणी सांगता येतील, हे जितके खरे आहे, तितकेच हे पण खरे आहे, की १९६१च्या ‘रज़िया सुलतान’पासून जे आनंद बक्षी पुढे येत गेले, त्या आनंद बक्षींच्या अर्थपूर्ण गीतांची ही झलक जरा बघा!

‘ढलती जाए रात...’(रजिया सुलतान), ‘चाँद आहें भरेगा...’ (फूल बने अंगारे), ‘मेरे मेहबूब कयामत होगी...’ (मिस्टर एक्स इन बॉम्बे), ‘चाँद सी मेहबूबा हो...’ (हिमालय की गोदमें), ‘एक था गुल...’ (जब जब फूल खिले), ‘बहारों ने मेरा चमन लूटकर...’ आणि ‘आया है मुझे फिर याद वो जालीम...’ (देवर), ‘हम तुम युग युग’ आणि ‘मुबारक हो सब को...’ (१९६७चा ‘मिलन’) ही अशी अनेक गीते आहेत. ‘अमर प्रेम,’ ‘हरे राम हरे कृष्ण,’ ‘तकदीर,’ ‘आए दिन बहार के’, ‘आप की कसम,’ ‘शालीमार,’ १९७९चा ‘सरगम,’ ‘कटी पतंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील सर्वच्या सर्व नसली, तरी दोन-तीन गीते का होईनात, पण मनाला भावणारी व आशयपूर्ण असायची!

१९६० ते १९७०पासूनची पुढील तीन/चार दशके सतत चर्चेत असणाऱ्या आनंद बक्षींनी अक्षरशः ढीगभर गाणी लिहिली. बंदुकीतून सटासट गोळ्या सुटाव्यात, तशी त्यांच्या लेखणीतून गाणी कागदावर उतरवली जात होती. त्यामध्ये अनेक वेळा संगीतकाराच्या चालीत बसणारे अचूक शब्द निवडण्यात आनंद बक्षींचे कौशल्य दाद देण्याजोगे होते.

...पण चित्रपटाचे कथानक, प्रसंग यास अनुषंगून गीत लिहिण्याची प्रतिभाही त्यांच्या ठायी होती. म्हणूनच सुभाष घई, यश चोप्रा, प्रसाद प्रॉडक्शन, राजश्री प्रॉडक्शन, राज खोसला, शक्ती सामंता अशा दिग्गजांनी त्यांनाच प्राधान्य दिले आणि ‘बॉबी’च्या वेळी खुद्द राज कपूर यांनी त्यांचा हक्काचा गीतकार हसरत जयपुरी असतानाही आनंद बक्षींना आमंत्रित केले. हिंदी, उर्दू आणि पंजाबी भाषेतील शब्दांचे प्रचंड भांडार आनंद बक्षींजवळ होते व त्या आधारे ते साजेसे गीत लिहीत असत.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन या संगीतकारांच्या धूनवर गीते लिहिणाऱ्या आनंद बक्षींनी नंतरच्या पिढीतील शिव-हरी, जतिन-ललित, तसेच ए. आर. रेहमान या संगीतकारांच्या धूनवरही गाणी लिहिली.

आनंद बक्षींच्या प्रतिभेची साक्ष देणारी अनेक गीते सांगता येतील. एखादी गोष्ट काव्यातून सांगावी, तर ती आनंद बक्षींनीच. उदाहरणार्थ ‘जब जब फूल खिले’ चित्रपटातील ‘एक था गुल...’ हे गीत! १९८२च्या ‘जीवनधारा’ चित्रपटातील ‘गंगाराम कुंवारा रह गया...’ हे गीत! याखेरीज प्रश्नोत्तर पद्धतीने लिहिलेली गीते - उदाहरणार्थ - ‘अच्छा तो हम चलते हैं...’ (आन मिलो सजना), ‘वो कौन है, वो कौन है...’ (अंजाना), ‘वो क्या है...’ (अनुराग), ‘मैंने देखा...’ (दुश्मन) 

‘एक दुजे के लिए’ चित्रपटात तर त्यांनी वेगळाच प्रकार केला. चक्क हिंदी सिनेमांची नावे एकापुढे एक ठेवली - ‘मेरे जीवन साथी, प्यार किए जा...’ अशी नावे एकत्र करून त्यांनी एक गीत तयार केले. (अर्थात चित्रपटाच्या कथानकाची ती गरज होती.)

आनंद बक्षी यांचा मोठेपणा म्हणजे त्यांनी स्वतः कबुली दिली होती, ‘काव्याचे व्याकरण मला कळत नाही. मोठमोठ्या उपमा, अलंकार वापरून गीत तयार करणे मला जमत नाही.!’ परंतु अशी कबुली देणारे बक्षी शब्दांचे वजन आणि संगीतकारांच्या चालीचा ठेका, मीटर पटकन जाणून घेऊन अशी काही रचना करून जात असत, की ते सहजासहजी आपल्या ओठात बसायचे. अशा एक-दोन ओळींतच गहन अर्थ असायचा. त्यासाठी ‘अमर प्रेम’चे गीत बघा- ‘तू कौन है तेरा नाम है क्या। सीता भी यहाँ बदनाम हुई।’ तसेच ‘दोस्ताना’ चित्रपटातील ‘वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की राते, जवाबों के दिन।’ 

‘मै शायर तो नहीं’ असे लिहिणाऱ्या बक्षींनी ‘जिक्र होता है जब कयामत का’, तसेच, ‘वो तेरे प्यार का गम...’ (माय लव्ह) यांसारख्या रचना करून अंतःकरणात बसणारी गाणी लिहिली. बदलत्या काळातही त्यांची ‘पल दो पल का ये सफर...’ आणि ‘ओय राजू, प्यार न करियो...’ (हद कर दी आपने) ही गीते वेगळेपण दाखवून गेली.

मानवी जीवनाविषयी विविध दृष्टिकोनांतून भाष्य करणारी त्यांची गीते हा एक स्वतंत्र विषय आहे. ‘ये जीवन है इस जीवन का...’, ‘कैसे जिते है भला...’, ‘बुरा मत सुनो बुरा मत देखो...’, ‘देखो ओ दिवानो तुम ये काम ना करो...’, ‘गाडी बुला रही है...’ ही गीते लक्षपूर्वक ऐकून समजून घेतली, तर पथदर्शक ठरतील यात संशय नाही. ‘एक बंजारा गाए...’सारखे गीत ऐकल्यावर तर आनंद बक्षी कामचलाऊ गीते लिहिणारे होते, हे विधान करवत नाही.

आनंद बक्षींच्या कारकिर्दीबद्दल सांगण्यासारखे असे बरेच काही आहे. विस्तारभयामुळे ते सांगत नाही. आता त्यांच्या अशा अनेक अर्थपूर्ण गीतांमधून एक ‘सुनहरे गीत’ निवडायचे ही तारेवरची कसरत आहे; तरीही मला भावलेले, माझ्या डोक्यातून न जाणारे आणि माझ्या जीवनाचीच हकीकत सांगणारे आनंद बक्षी यांनी लिहिलेले ‘सुनहरे गीत’ म्हणजे १९८०च्या ‘आशा’ चित्रपटातील लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले ‘शीशा हो या दिल हो...’ हे गीत....

काय आहे त्या गीतात? एका अपयशी जिवाची ही कहाणी आहे. जगातील कटू सत्य सांगणारे हे काव्य आहे आणि हे सर्व सांगत असताना तो विषाद हुंदक्यावर मांडला जात नाही, तर डोळ्यांतील पाणी पापणीच्या काठावर रोखून एक हास्य चेहऱ्यावर आणून हे दु:ख मांडले जाते. अहो, हे भावूक माणसाचे हृदय/मन म्हणजे काय असते हो? तेच या गाण्याच्या मुखड्यात सांगितले आहे. ‘ती’ गाते, ती सांगते - 

शीशा हो या दिल हो, आखिर टूट जाता है 

लब तक आते आते, हाथों से सागर छूट जाता है...

(माझे हे) हृदय काय अगर काच/आरसा काय, अखेर तुटणे, फुटणे हेच त्यांच्या भाळी असते, नाही का? (आणि सामान्यपणे हेच जीवनात दिसून येते, की) ओठांशी आलेला भरलेला पेला हातातून सुटून जात असतो. (सुख मिळाले मिळाले असे वाटत असतानाच त्याचा उपभोग न घेताच दूर निघून जाते.)

जीवनाची ही रीत आणि या बेभरवशी दुनियेबद्दल व आपल्या अपेक्षेप्रमाणे न घडणाऱ्या जीवनातील घटनांबद्दल भाष्य करताना, एक ‘जहरिले’ सत्य सांगण्यासाठी आनंद बक्षी पहिल्या अंतऱ्यात लिहितात...

साकी बस अरमान नहीं, कुछ मिलना आसान नहीं 

दुनिया की मजबुरी है, फिर तकदीर जरूरी है 

ये जो दुश्मन है ऐसे, दोनों राजी हो कैसे 

एक को मनाओ तो, दुजा रूठ जाता है

(आम्ही या जीवनात अपेक्षाभंगाचे एवढे धक्के सहन केले आहेत, एवढी स्वप्ने तुटून जाताना पाहिली आहेत, की) हे मित्रा, आता कोणती नवीन स्वप्ने पाहण्याची उमेदच आमच्यात राहिली नाही. (कोणतेही स्वप्न आता डोळ्यांपुढे नाही. कारण आम्हाला आतापर्यंतच्या या घटनांमुळे हे लक्षात आले आहे, की) कोणतीही गोष्ट प्राप्त होणे सोपे नाही.. (मग ते भले कोणाचे प्रेम असो, अगर अन्य काहीही) या जगाची (जगातील रीतीरिवाजांची) अडचण असते, नाईलाज असतो. (आणि महत्त्वाचे म्हणजे एखाद्याचे प्रेम मिळायलासुद्धा) शिवाय नशीब लागते. (हे नशीब आणि हे जग, त्यातील रीतीरिवाज) हे दोन असे शत्रू आहेत, की दोघेही एकाच वेळेस राजी होत नाहीत. एकाला काबूत आणावे, त्याची मनधरणी करून त्याला वळवावे, तर दुसरा नाराज होतो. (असे हे जीवनातील विक्षिप्त प्रकार आहेत.)

या अशा परिस्थितीत, या जगात आम्ही जन्माला आलो आणि तेंव्हा 

बैठे ये किनारों पे, मौजों के इशारों पे 

हम खेले तुफानों से, इस दिल के अरमानों से

हम को ये मालूम न था, कोई साथ नहीं देता 

माँझी छोड जाता है, साहिल छूट जाता है

(आमच्या त्या तारुण्याच्या दिवसात, उमेदीच्या काळात आम्ही स्वप्नांच्या समुद्राच्या) काठावर बसलो होतो. (विचारांच्या, भावनांच्या, स्वप्नांच्या) लाटांशी (तसेच कधी अडचणींच्या, संकटांच्या) तुफानांशी, या (आमच्या साध्याभोळ्या) हृदयातील स्वप्नांशी खेळत होतो, ती सत्यात उतरवण्यासाठी धडपडत होतो; पण आम्हाला हे माहीत नव्हते, की (आमच्या त्या प्रयत्नात) आपणाला कोणीच साथ देत नाही, (उलट त्या समुद्रात, अडचणींत) नावाडी सोडून जातो, किनारा दूरवर राहून जातो.

मुख्य गीताची ही दोन कडवी चित्रपटात आपण सलगपणे बघतो व काही वेळाने तिसरे कडवेही पुढे येते. आनंद बक्षींची शायरी येथे प्रतिभेचा आणखी उत्कृष्ट आविष्कार दाखवते. ते लिहितात -

दुनिया एक तमाशा है, आशा और निराशा है 

थोडे फूल हैं, काटे हैं, जो तकदीर ने बाँटे हैं 

अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है 

कोई लुट जाता है, कोई लूट जाता है...

ही दुनिया म्हणजे एक तमाशा/खेळ/नाटक आहे. येथे आशा आहे व निराशाही आहे. फुले थोडी आहेत, काटे मात्र (खूप) आहेत, जे नशिबाने (प्रत्येकाला) वाटले आहेत. प्रत्येकाचा हिस्सा (प्राक्तन) असतो, वेगळी कहाणी असते. कोणी लुटले जाते, तर कोणी लुटून घेऊन जात असते.

आनंद बक्षींचे हे गीत फार व्यापक अर्थाचे आहे, हे जाणूनच संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी स्वरसम्राज्ञींकडून तो सर्व अर्थ श्रोत्यांपर्यंत पोहोचावा, अशा पद्धतीने ते गाऊन घेतले आहे. ‘कोई लुट जाता है’ ही एकच ओळ, पुन्हा तीच ओळ लिहताना ‘लूट’ असा शब्द लिहिला जातो. अर्थात ऱ्हस्व-दीर्घाचा फरक आणि त्यामुळेच लतादीदींनी ती दोन प्रकारे गायली आहे; त्यामुळे त्या ओळीतील दोन्ही अर्थ लक्षात येतात. कडवे सुरू करतानाचा ओऽऽ ओऽऽ असा आलाप, तसेच ‘कोई साथ नहीं देता’ ही आळवलेली ओळ हे सारे गीताचा प्रभाव वाढवते.

हे गीत पडद्यावर सादर करणारी अभिनेत्री रीना रॉय! तिचा अभिनय - डोळ्यांतले पाणी पापणीवरच थांबवण्याचा भाग - एक हास्य जे दु:खाला हसते की दुःखावर हसते, नायक (जितेंद्र) सारे जाणतो, म्हणून अस्वस्थ होतो; पण बाकी सारे एक छान गीत ऐकण्याच्या आनंदात! 

हे असेही ‘सुनहरे’ गीत असते आणि अशाही रचना आनंद बक्षी यांच्या लेखणीतून झरल्या होत्या. त्या ऐकल्या, की लक्षात येते, की ‘आनंद बक्षी आणि अर्थपूर्ण गीते’ हा शब्दप्रयोग चुकीचा नाही.

- पद्माकर पाठकजी