कधीपासून मनात होतं आपण गाण्यांच्या जन्मकथांवर एखादा लेख लिहावा किंवा
गाण्यांच्या गमती जमतीं विषयी लिहावे.
ह्यातले बहुतेक सर्व किस्से शैलेंद्रजींचे सुपुत्र दिनेश शंकर यांनी मुलाखतीत, एखाद्या भाषणात सांगितले आहेत. खूप आधी पासून शैलेंद्रजींना रोज डायरी लिहायची सवय होती. ते सर्व अमूल्य टिपण दिनेशजी कडे आहे. त्यातून काही निवडक गाण्यां विषयी माहिती जमली आणि जे काही पुढे आलंय ते आपल्या समोर ठेवायला मला आनंद होतोय.
"मुडमुडके ना देख मुडमुडके" एकदा शंकर जयकिशन, एस जेंचे सहाय्यक दत्ताराम, गीतकार शैलेंद्र, हसरत जयपुरी गाडीतून चेंबूरला चालले होते. तेव्हा मुंबईत बैठी घरेच जास्त होती.रस्त्याच्या बाजूला नवीन बांधकामं चालली होती आणि दत्तारामजी सारखे मागे वळून पहात होते. ते पाहून शंकरजींनी विचारले," अरे दत्तू बार बार मुडमुडके क्या देख रहा है" पुन्हा थोड्या वेळाने तोच प्रसंग रिपीट झाल्यावर बाजूलाच बसलेले शैलैंद्र म्हणाले, अरे इसपर तो गाना बन सकता है..आणि शैलेंद्रजींनी लिहिले *मुडमुडके ना देख मुडमुडके*....
कालाबाजार* च्या गाण्यांच्या सिटींग्ज चालल्या होत्या. सचिनदांची ट्यून तयार होती. दोन दिवस शैलेंद्रजी लिहिण्याचा प्रयत्न होते पण मनासारखे गाणे होत नव्हते. शेवटी त्रासून सचिनदा शैलेंद्रजीं ना म्हटले आज कुठल्याही परिस्थितीत गाणे लिहून झाले पाहिजे आणि "पंचम" ना शैलेंद्रजींबरोबर पाठवून म्हणाले गाणं घेतल्याशिवाय याला सोडू नकोस. दिवसभर आरे कॉलनी, नॅशनल पार्क
अशी आवडीची ठिकाणे पालथी घातली
पण मनासारखं गाणं सुचलं नाही. शेवटी रात्री दोघे जुहूला आले आणि समुद्राच्या सान्निध्यात, नीरव शांततेत, वरती चंद्राकडे एकटक पहाताना शैलेंद्रजींना शब्द सुचले. जवळ कागद नसल्याने सिगरेटच्या पाकिटावर अप्रतीम गाणे अवतरले.....*खोया खोया चांद खुला आसमान, आंखोमें सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी...
"ओ सजना बरखा बहार आई" हे "परख"
चित्रपटातलं अप्रतिम गाणं जन्मालाच आलं नसतं! धक्का बसला ना? बिमल रॉय यांनी हा चित्रपट करायचा ठरवलं तेव्हा त्यात एकही गाणं नसेल असं ठरलेलं होतं. त्यांनी सलिल चौधरींना स्क्रीन प्ले लेखनाची आणि शैलेंद्रजींना संवाद लेखनाची जबाबदारी दिली होती. हा असा एकमेव चित्रपट आहे ज्याचे पूर्ण संवाद शैलेंद्रंनी लिहिले आहेत. पण गाण्याशिवाय चित्रपट ही कल्पनाच कोणाला रुचेना आणि ते ही समोर उत्तम गीतकार, संगीतकार असताना? नंतर पुढे बिमलदांची समजूत काढण्यात सगळे यशस्वी झाले आणि "ओ सजना, मिला है किसिका झूमका या सारखी सुंदर गाणी रसिकांना मिळाली.
"जिस देशमें गंगा बहती है" या चित्रपटा ची कथा ऐकवण्यासाठी राजकपूर यांनी
त्यांच्या टीमला राजकुटीर वर बोलावले
होते. कथा ऐकल्यावर शंकरजींनी हातातला चहाचा कप टेबलवर दाणकन
आदळला,एक कचकचीत शिवी हासडली आणि रागाने रुमबाहेर गेले. ते शीघ्रकोपी होतेच. राजजींनी पटकन, "अरे देख तो पहलवानको क्या हुआ" असे म्हणून कोणालातरी त्यांच्या मागे पाठवलं
झालं असं की डाकूंवर पूर्ण चित्रपट तिथे संगीताला काय स्थान म्हणून ते भडकले
होते. पण शेवटी ते "राजकपूर" होते. एक नाही, दोन नाही तब्बल नऊ गाणी त्यांनी अशी चपखल बसविली आहेत कि बस्स! त्यातले फक्त एक गाणे "हो मैंने प्यार किया हाय हाय क्या जुल्म किया हसरत
जयपुरींचे आहे बाकीची शैलेंद्रजींची! शेवटचे "आ अब लौट चले" च्या रेकॉर्डिंग ला स्टुडियोच्या रुमच्या बाहेर
ही खुर्च्या टाकून वादक बसलेले इतका मोठ्या संख्येने ऑर्केस्ट्रा आणि कोरस होता.
लेख टंडनजींचा चित्रपट "आम्रपाली"च्या एका सिटींगची गोष्ट! एक गाणं शैलेंद्रजीं नी ऐकवलं. तेवढ्यात राजजींचा फोन आला क्या हो रहा है ? लेखजी म्हणाले गाना लिखकर तैयार है! राजजी
म्हणाले फोन पर सुना तो! त्यांनी गाणे एकले आणि म्हणाले ये गाना तो मुझे चाहिये तू दूसरा लिखवा ले!लेख टंडनजी त्यांचे पहिल्यांदा असिस्टंट होते. ते नाही म्हणू शकले नाहीत. शेजारीच लताजी होत्या त्यांनी समजावले अरे गानेका क्या है हम दूसरा लिखवाएंगे! त्यांनी पेटीवर काही सुरावट वाजवली. शैलेंद्रजींनी
शब्द लिहिले,"जाओरे जोगी तुम जाओरे
........ पण काही केल्या अंतरे सुचेनात.
शेवटी रात्री ३ वाजता पुन्हा जमायचे ठरले. लता जी पण तयार झाल्या. दोन वाजून गेले तरी अंतरे तयार नव्हते. ठरल्या प्रमाणे लताजी आल्या. तिकडे कोणाचीही हिंमत होईना लताजींना हे सांगायची. लेखजींनी शैलेंद्रनाच आत पाठवले.ते आत गेले आणि लताजींशी संभाषण सुरु झाले. बाहेर सर्व हैराण परेशान! नेमकं काय चाललय? लताजी काय बोलताहेत? शेवटी न राहवून लेखजींनी आतला माईक सुरु केला तर लताजी हसून शैलेंद्रना म्हणत होत्या "अरे बास बास शैलेन्द्र जी ! और कितने अंतरे सुनाएंगे? कदाचित समोर साक्षात गान सरस्वतीला पाहून त्यांच्या प्रतिभे लाही ऊर्जा मिळाली असेल! होय ना?
शंकर जयकिशन ना एका साऊथच्या निर्मात्याचा चित्रपट या अटीवर मिळाला की गीतकार त्यांच्या पसंतीचा असेल. तो पर्यंत हा अलिखित नियम होता कि एस जेंचे संगीत असेल तर गीते हसरत किंवा शैलेंद्रजींची ! जेव्हा शैलेंद्रंना हे कळले तेव्हा ते रागाने हसरतजींना घेऊन
एस जेंच्या रेकार्डिंग रुमवर आले. दोघेही
न सापडल्यामुळे एका कागदावर त्यांनी खरडले,"छोटीसी ये दुनिया पहचाने रासते हैं, तुम कभी तो मिलोगे कहीं तो मिलोगे तो पूछेंगे हाल" ही गोष्ट राजजींना कळल्यावर त्यांनी चौघांनाही जुहूला बोलावले आणि समुद्राच्या साक्षीने दिलजमाई झाली. पुढे हे गाणे एस जेंनी शैलेंद्रजींकडून अंतरे लिहून घेऊन "नौकरी" या चित्रपटात वापरले.
एकदा अशीच राजजींची टिम खंडाळ्या ला चालली होती. वाटेत ढाब्यावर थांबले पाणी देणारा मुलगा आंध्र प्रदेशातला होता. शंकरजींचे बालपण तिथेच गेल्याने त्यांना ती भाषा येत होती. तिथे काही मागवताना ते म्हणत "रमैया वस्तावैया" म्हणजे रमैया इकडे ये. ते सारखं कानावर पडत होते. जेव्हा पुन्हा शंकरजींनी म्हटलं रमैया वस्तावैया तेव्हा शैलेंद्रजींनी म्हटले "मैंने दिल तुझको दिया..असं म्हणत म्हणत सगळे मुंबईला येईपर्यंत पूर्ण गाणं तयार झालं. लगेच राजजींना ऐकवण्यात आले. त्यांनाही ते आवडले. अशी या गाण्याची मजेशीर निर्मिती झाली.
"गाईड" चित्रपटात सचिनदांनी एक प्रयोग केलेला जो शंकर जयकिशननी या आधी केलेला. अंतर्यापासून गाण्याची सुरुवात! *कोणी शंकर जयकिशनचे गाणे ओळखू शकेल कां? मीओळखलंय! तुम्ही सांगा! सचिनदांनी "कांटोंसे खींचके ये आंचल" पासून गाणे सुरु केले पण मुखडा आहे "आज फिर जीनेकी तमन्ना है, आज फिर मरनेका इरादा हैं"...
"आवारा" चित्रपटाची लोकप्रियता तर साऊथ एशिया आणि सोव्हिएट युनियन, आफ्रिका, मध्यपूर्वेचे देश अशी सगळीकडे झाली. "शैलेंद्र"जींचे "आवारा हूं" हे गीत रशिया, टर्की, अफगाणिस्तान या सर्व देशात कमालीचे लोकप्रिय झाले. कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये The most successful film of the time या विभागात nominate झाला होता. "श्री ४२०" या चित्रपटाची लोकप्रियता पण इतकी की "बेल्जियम" मध्ये एका कंपनीने असा जग बनवला होता की त्यातून पाणी ओतताना "मेरा जूता है जापानी" ह्या गाण्याची ट्यून वाजायची.
जाता जाता "जीना यहां मरना यहां" या अप्रतीम गीताविषयी! शैलेंद्रजींनी याचा फक्त मुखडा लिहिला होता. अंतरे बाकी होते. दुर्दैवाने त्या दरम्यान त्यांचे निधन झाले ते राजजींच्या वाढदिवसाच्या दिवशीच! राजजींना त्यांच्या अजीज दोस्ताची आठवण अश्या रितीने राहिली कधीही न विसरता येण्यासाठी! त्या गाण्याचे अंतरे त्यांचे सुपुत्र शैली शैलेंद्र यांनी पूर्ण केले आहेत.
अजून खूप काही लिहायला आहे. तूर्तास एवढेच...
No comments:
Post a Comment