Friday, November 6, 2020

संजीव कुमार

**रुपेरी प्रासंगिक-अभिनेता संजीव कुमार स्मृतिदिन** 
-----------------------

'संजीव कुमार' ...अभिनय सम्राटाचे पुरस्कार प्राप्त/नामांकित चित्रपट

-----------------------

 
त्याने अभिनयाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली तेंव्हा ४८ वर्षांचा होता... त्याच्या अभिनय कारकिर्दीचे वय अवघे २५ वर्षांचे होते आणि छोटे-मोठे मिळालेले सन्मान ३० च्या वर! यावरून सिद्ध होते की 'हरीहर जेठालाल जरीवाला' ... पक्का गुजराती होता. कसे? अल्पावधीतच ज्यादा मुनाफा कसा कमवावा हे टिपिकल गुज्जू व्यापारी धोरण त्यालाही जमलेच की ! भलेही ते अभिनयाच्या क्षेत्रात का असेना आणि त्यात त्याच्या चतुरस्त्र अभिनयाची गुंतवणूक का असेना! हिंदी सिनेमाच्या इतिहासात इतक्या कमी वर्षांमध्ये इतक्या वैविध्यपूर्ण व दर्जेदार भूमिका करणारा आणि त्यासाठी इतके सन्मान मिळविणारा दुसरा अभिनेता असल्याची नोंद नाही. मग झालाच कि 'कम समय में बडा मुनाफा!!' शिवाय हे जग सोडून ३५ वर्षे झाली तरी त्याच्या चाहत्यांच्या हृदयात त्याची जागा घेणारा अजूनही कोणी 'माय का लाल' अभिनेता होऊ शकला नाही. याला म्हणतात पक्का गुज्जू!! संजीव कुमार. १९६० ते १९८५.. केवळ २५ वर्षांसाठी का होईना पण हिंदी सिनेमाला मिळालेले एक अनमोल रत्न. आज त्यांचा स्मृतिदिन. तसे तर त्याचा प्रत्येक चित्रपट अविस्मरणीय होता परंतु आज या लेखात केवळ त्याला नामांकन अथवा पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचा आढावा आपण घेणार आहोत.
-----------------------

 
१९६० साली 'हम हिंदुस्तानी' द्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या 'हरिभाई जरीवाला' उर्फ 'संजीव कुमार' यांना आपला पहिला पुरस्कार मिळविण्यासाठी ८ वर्षे वाट पाहावी लागली. 'परदे में रहने दो, परदा ना उठाओ' या गाण्यासाठी गाजलेला रहस्यपट 'शिकार' (१९६८) हा तो चित्रपट. यात संजीव कुमार यांनी खुनाचा शोध घेणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर राय ची भूमिका साकारली ज्यासाठी त्यांना त्यांच्या करिअरचे पहिले उत्कृष्ट सहनायकाचे फिल्मफेअर मिळाले. 'शिकार' ही निर्माता-दिग्दर्शक आत्मा राम पदुकोण (गुरु दत्त यांचे लहान भाऊ) यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेली कलाकृती होती.

 १९७० हे साल संजीव यांच्यासाठी डबल बोनान्झा घेऊन आले. एक 'खिलोना' आणि दुसरा 'दस्तक'. 'खिलोना' हे एल.व्ही प्रसाद या दाक्षिणात्य बॅनरची निर्मिती व त्यांच्याच 'पुनर्जन्म' या तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. आपल्या प्रेयसीच्या आत्महत्येने वेडा झालेला, श्रीमंत ठाकूर चा मुलगा विजय .. ही ती भूमिका ज्यामुळे संजीव कुमार या  सिनेसृष्टीत सर्वप्रथम मानाचे स्थान मिळवून दिले. संजीव यांनी या भूमिकेत अशी काही जान ओतली कि बस्स! संजीव कुमार कडून बेस्ट परफॉर्मन्स काढून घेण्याचे श्रेय दिग्दर्शक चंदर वोहरा यांना सुद्धा तितकेच जाते. संजीव यांना या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे फिल्मफेअर नामांकन मिळाले. अवॉर्ड मिळाले राजेश खन्ना यांना 'सच्चा झूठा' साठी! याच साली आलेला राजेंदर सिंग बेदी यांचा 'दस्तक' हा त्याकाळातील समांतर सिनेमा सारखा प्रयोग होता. मदन मोहन यांनी दिलेले सुश्राव्य संगीत ही दस्तकची आणखी एक जमेची बाजू होय. 'बैयाँ ना धरो ओ बलमा', 'माई री मैं कासे कहूँ', 'हम है मता-ओ-कुचा ओ बाजार की तरह' यासारख्या अजरामर गीतांसोबतच संजीव कुमार व रेहाना सुल्तान या जोडीचा अभिनय सुद्धा अगदी जमून आला होता. एक सुसंस्कृत व नवविवाहित मुस्लिम जोडपे, मजबुरीने म्हणा, मुंबईत एक अशा घरात राहायला येते जिथे आधी एक प्रसिद्ध मुजरेवाली राहत होती. यातून सातत्याने त्यांच्या दारावर नाही त्या आशिकांची 'दस्तक' व त्यामुळे होणारी या जोडप्याची कुचंबणा राजेंदर सिंग बेदींनी दाखविली होती. 'दस्तक' मधील सरकारी ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा 'हामीद' या भूमिकेने संजीव यांना त्यांच्या करिअरचा पहिला राष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. 'दस्तक' ला एकूण चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यात संजीव सोबत अभिनेत्री रेहाना सुलतान, संगीतकार मदन मोहन व उत्कृष्ट छायाचित्रणासाठी कमल बोस हे इतर तिघे. 

सतत आपल्या हटके प्रयोगांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक गुलजार यांनी १९७२ साली मूक-बधिरांच्या आयुष्यावर व्यावसायिक सिनेमा बनविण्याची मोठी जोखीम घेण्याचे जेंव्हा ठरविले, तेंव्हा कथेच्या नायकाच्या भूमिकेसाठी संजीव कुमार शिवाय इतर कोणताही अभिनेता त्यांच्या डोक्यात नव्हता. चित्रपट 'कोशीश'. असला सिनेमा बनविण्याची 'कोशीश' अथवा हिम्मत याआधी कुठल्या दिग्दर्शकाने दाखविली नव्हती. कारण नायक-नायिका दोघेही बोलत नाहीत याला व्यावसायिक सिनेमात आत्महत्या म्हणतात. १९६१ सालच्या एका जापानी चित्रपटावरून प्रेरित होऊन गुलजार यांनी 'कोशीश' बनवला ... प्रदर्शित केला ... आणि यशस्वीसुद्धा करून दाखविला. गुलजार यांना उत्कृष्ट पटकथेसाठी तर संजीव यांना हरिचरण या मुक्या-बहिऱ्या नायकाच्या भूमिकेसाठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व फिल्मफेअर नामांकनही. योगायोग असा कि ज्या दोन चित्रपटांसाठी संजीव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, म्हणजे 'दस्तक' व 'कोशीश', या दोन्हीचे संगीतकार मदन मोहन होते. 

'खिलोना' आणि 'कोशीश' या दोन्हीच्या वेळी नामांकन मिळवूनही फिल्मफेअर पुरस्काराची संधी हुकलेल्या संजीव यांनी अखेर १९७५ साली उत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पटकावलाच. यासाठी त्यांना स्पर्धा द्यावी लागली होती आणखी एका संजीव कुमारशी म्हणजे स्वतःशीच! स्पर्धेतला दुसरा संजीव होता 'शोले' मधील ठाकूर बलदेव सिंग ... आणि त्याला हरवून जिंकलेला संजीव होता 'आंधी' मधील हॉटेल मॅनेजर जे.के. या वर्षी फिल्मफेअरसाठी या दोन संजीव शिवाय अमिताभ बच्चन चा 'दिवार' मधील विजय, 'संन्यासी' मनोज कुमार व 'अमानुष' उत्तम कुमार हे इतर स्पर्धक होते. एका साध्या, सुसंस्कृत, सुस्वभावी, हळव्या अशा हॉटेल मॅनेजरने या पुरस्काराच्या स्पर्धेत, चक्क खुंखार डाकू गब्बर सिंगला हरविणाऱ्या रामगढच्या ठाकूरला हरवले होते. 'आंधी' मधील संजीव यांनी साकारलेला संयमी जे.के. आजही रसिकांच्या हृदयाजवळ आहे तर नामांकन मिळविणाऱ्या 'शोले' च्या ठाकूरने हिंदी सिनेसृष्टीत काय इतिहास घडविला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

'कोशीश' आणि 'आंधी' नंतर 'गुलजार-संजीव कुमार' या जोडीने तिसऱ्यांदा फिल्मफेअर नामांकन मिळविले ते 'मौसम' साठी. पुन्हा एकदा संगीतकार मदन मोहन यांच्या संगीतावर 'दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन...' गात आपल्या प्रेयसीच्या शोधात असलेल्या डॉक्टर अमरनाथ या भूमिकेने संजीव यांना फिल्मफेअर नामांकन तर मिळवून दिले पण त्यावर्षी बाजी मारली 'अर्जुन पंडित' मधील संजीव कुमारने!! म्हणजे १९७५ नंतर सलग दुसऱ्या वर्षी, १९७६ साली, असे घडले कि एका संजीव कुमारने, दुसऱ्या संजीव कुमारला हरवत फिल्मफेअर पटकावले. मनुष्याने नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी या सुविचाराला तंतोतंत खरे ठरविणारा महान अभिनेता. 'अर्जुन पंडित' ही ह्रिषीकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेली सुंदर कलाकृती होती व त्यात संजीव यांनी जबरदस्त अभिनय केला होता.

 
एका संजीव कुमारने दुसऱ्या संजीव कुमार ला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये टक्कर देण्याची १९७५ मध्ये सुरुवात झाली. १९७६ नंतर, ७७ व ७८ मध्येही हेच सुरु राहिले. १९७७ ला सुद्धा संजीव यांना दोन भूमिकांसाठी नामांकन मिळालं. उत्कृष्ट अभिनेत्याच्या बाजी जरी 'अमर अकबर अंथोनी'च्या अमिताभने मारली होती परंतु त्याला दोन संजीव कुमारांना पार करून जावे लागले होते. 'जिंदगी' व 'यही है जिंदगी' हे ते दोन चित्रपट. २००३ सालचा अमिताभ यांचा 'बागबान' म्हणजेच संजीव यांचा १९७६ चा 'जिंदगी'. 'मेक वे फॉर टुमारो' या हॉलीवूडपटावरून घेतलेली कथा. स्वतःचा व पत्नीचा आत्मसन्मान जपून स्वाभिमानाने राहणाऱ्या पित्याच्या भूमिकेत संजीव यांनी नेहमीप्रमाणेच जान ओतली होती. रवी टंडन यांचे दिग्दर्शनही प्रभावी होते. 'यही है जिंदगी'  हा 'कलियुग कन्नन' या तामिळ सिनेमाचा के.एस. सेथुमाधवन दिग्दर्शित चित्रपट होता ज्यात आनंद नारायण हे पात्र संजीव यांनी रंगविले होते. कथेत या पात्राचा थेट भगवान श्रीकृष्णाशी संवाद होत असतो. दाक्षिणात्य स्टाईलची निर्मिती होती. योगायोगाने 'जिंदगी' व 'यही है जिंदगी' दोन्हीला राजेश रोशन यांचे संगीत होते. संजीव यांनी या दोन्ही भूमिकांचे सोने केले होते. 

१९७८ साली आलेल्या 'देवता' व 'पती पत्नी और वह' या दोन्ही सिनेमांनी पुन्हा एकदा संजीव यांना फिल्मफेअरची दोन नामांकनं मिळवून दिली. परत एकवार स्पर्धा अँग्री यंग मॅन अमिताभशी होती. एक नाही तर तीन अमिताभ यांच्याशी. मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल व डॉन मधील अमिताभ विरुद्ध वरील दोन संजीव कुमार यात 'डॉन' मधल्या अमिताभने बाजी मारली. 'देवता' मध्ये संजीव हे आपल्या मुलीसाठी जीवन जगणाऱ्या प्रेमळ पित्याच्या भूमिकेत होते. बी.आर. चोप्रा यांच्या 'पती पत्नी और वह' मधील त्यांनी साकारलेला विवाहित रणजीत चड्ढा हा आपल्या ऑफिसमधील सेक्रेटरीच्या मागे लागलेला असतो. याचवर्षी यश चोप्रा यांच्या 'त्रिशूल' मधील आर.के. गुप्ता या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर नामांकन मिळालं होतं. मात्र ते अवॉर्ड नेले सईद जाफरी यांनी .. 'शतरंज के खिलाडी' साठी. 

१९८२ साली 'गुलजार-संजीव कुमार' या दिग्दर्शक-अभिनेता जोडीने परत एकवार आपली जादू चालवली. त्या जादूचे नाव होते 'अंगूर'. यातील संजीव (व देवेन वर्मा) यांची दुहेरी भूमिका आणि त्यांचा अभिनय हा त्यांच्या करिअरमधील 'वन ऑफ दि बेस्ट' मध्ये गणला जातो. असे असूनही फिल्मफेअर नामांकन मिळालं पण दमदार दावेदार असूनही पुरस्कार नाही मिळाला. का? कारण स्पर्धा खूपच तगडी होती. स्पर्धेत तीन अमिताभ (बेमिसाल, नमक हलाल व शक्ती), एक नासिरुद्दीन शाह (बाजार), एक ऋषी कपूर (प्रेम रोग) व एक होता अभिनय सम्राट दिलीप कुमार ... ज्याने पुरस्कार मिळवत बाजी मारली 'शक्ती' साठी! याच वर्षी साठी संजीव यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी पण फिल्मफेअर नामांकन मिळालं होतं. चित्रपट होता सुभाष घई यांचा 'विधाता'. हे अवॉर्ड 'विधाता' लाच गेले पण अभिनेता होता शम्मी कपूर.

 
तर असा होता संजीव कुमार यांना मिळालेल्या राष्ट्रीय व फिल्मफेअर पुरस्कारांचा प्रवास. नामांकनं अथवा पुरस्कार मिळाला या व्यतिरिक्तही अनेक अजरामर भूमिका या महान अभिनेत्याने साकारल्या आहेत. त्यातील बऱ्याच अशा आहेत ज्यांचा विचार नामांकन अथवा पुरस्कारासाठी का झाला नाही हा एक गूढ प्रश्न आहे. आजच्या दिवशी १९८५ साली आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने या महान अभिनेत्याने अचानकपणे एक्झिट घेतली. पण सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे या गुजराती हरिभाई जरीवालाने केलेली आपल्या अविस्मरणीय अभिनयाची गुंतवणूक त्याला रसिकांच्या हृदयात कायमचा विराजमान करीत 'घनो फायदा' देऊन गेली. 

पुरस्कारही जिथे तोकडे पडावेत ... शुल्लक वाटावेत असा महान अभिनेता पुन्हा होणे नाही. 

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

- अजिंक्य उजळंबकर 

#RememberingSanjeevKumar #SanjeevKumar 
#DeathAnniversary #TributeToSanjeevKumar

#Actor #HindiCinema #Bollywood

Thursday, November 5, 2020

"SSC बॅच

"SSC ची बॅच"ही कविता कोणी लिहिलीय माहीत नाही , पण ती प्रत्येकाची 'मनकी बात' तर नाही ना?

"SSC बॅच" 

प्रत्येकाची SSC ची बॅच असते 
 कोण कुठे आहे माहिती नसलं 
 कधीच भेटणं होत नसलं तरी 
 ती प्रत्येकाच्या मनात असते 

SSCच्या बॅचची एक गंमत असते 
 पन्नाशी पार केलेला तो 
 सासरा झालेला असतो, 
पन्नाशी पार झालेली ती 
 सासू झालेली असते, 
तरी सुद्धा SSC च्या बॅचमध्ये 
 अजुनही तो मुलगा असतो 
 आणि ती मुलगी असते 

 SSCच्या बॅचमधल्या आठवणी 
 सुखद असते त्यांची उजळणी 
 तीने त्याच्याकडे पाहिलेलं असतं 
 त्याने तीच्याकडे पाहिलेलं असतं 
 बस्स इतकच, 
बघण्या बघण्यातच 
 वर्ष सरलेलं असतं 

 SSC चा निकाल लागतो, 
नवीन प्रभा घेऊन सूर्य उगवतो 
 प्रत्येकाचं विश्व वेगळं होतं, 
त्याचे मित्र बदलतात 
 तीचेही मित्र बदलतात 
 एका गोष्टीची सुरूवात होण्यापुर्वीच 
 तिला विराम येतो 

 नवीन वयात, नवीन विश्वात, 
नवीन मित्रांत, गप्पांच्या ओघात, 
पुसटशा स्पर्शात, 
प्रेम म्हणजे काय 
 समजू लागलेलं असतं 

 आता ओढही असते 
 आणि सहवासही असतो 
 त्याला कुणीतरी आवडते 
 तीला कुणीतरी आवडतो , 
कुणी सहजीवनाची 
 शिडी एकत्र चढतो, 
कुणी पडतो, कुणी धडपडतो 

 पुढच्या आयुष्यात प्रत्येकाची 
 आपली बाग असते 
 त्याच्या बागेत 
 तो झाड होऊन जगतो, 
तीच्या बागेत 
 ती वेल होऊन जगते 

 वेलीवर कळ्या येतात 
 त्यांची फुले होतात 
 झाडाचा वृक्ष होतो 
 सावली देत ताठ उभा असतो 
 पण त्या उभं रहाण्यातही खरं तर 
 वेलीचाच त्याला आधार असतो 

 वर्ष सरत असतात, 
कळ्यांची फुले होतात 
 वाऱ्यावर डुलत असतात 
 बहरत असतात 

 कधी वाऱ्याचं वादळही होतं 
 सगळ्या बागेला हलऊन जातं 
 झाड मात्र ताठ असतं, 
कसं हलल पण नाही 
 म्हणून ताठरपणे पहात असतं 
 पण तीच ती वेल असते 
 स्वतः वाकते 
 म्हणून झाडाला 
 मोडण्यापासुन वाचवते 

 आता आयुष्याच्या सायंकाळी 
 फेसबुक व्हाट्सॲप् 
 हाच विरंगुळा असतो ! 
फेसबुकवर शोध घेता घेता 
 व्हाट्सॲपवर 
 SSC च्या बॅचचा ग्रुप तयार होतो 
 इतकी वर्षे बंद असलेला 
 कोनाडा हळूच उघडतो 
 हृदयाच्या कुपीत बंद ठेवलेल्या 
 अत्तराचा सुगंध 
 अजुनही तसाच असतो 

 आता मात्र गप्पांच्या मैफिलीत 
 जुन्या मित्र मैत्रीणींच्या 
 आठवणींना उजाळा येतो 
 कारण त्या अत्तराच्या 
 कुपितला सुगंध 
 पुन्हा हवाहवासा वाटतो 

 मनोमन मन म्हणत असतं 
 अशी वेळ यावी 
 केव्हातरी कुठेतरी ती 
 ओझरती तरी दिसावी 
 तेव्हाची ती नजरानजर 
 एकदा तरी व्हावी, 
ती एकच नजर 
 पुढील जीवनाची 
 शिदोरी बनुन जावी 

 त्यातच एक आशेचा किरण दिसतो 
 SSC बॕचचा 
 भेटण्याचा दिवस ठरतो 
 त्या दिवशी प्रत्येकजण नव्यानं 
 जुनंच दिसण्याचा प्रयत्न करतो 
 प्रत्येक मुलगा मुलगी 
 मला ओळखेल 
 हा भाबडा विश्वास असतो 

 त्याच वर्गात, त्याच बेंचवर 
 प्रत्येकजण पुन्हा एकदा 
 बसणार असतो 
 आणि आठवणींच्या झऱ्यांचा 
 महासागर होणार असतो 

 भेटीगाठी होत असतात 
 जुन्या आठवणी निघत असतात 
 त्यातच तीची त्याची 
 नजरानजर होते आणि 
 एका क्षणात सर्व काही सांगून जाते 
 त्याला आणि तीलाही 
 नवीन भेटीत 
 खुप काही बोलायचं असतं 
 पण उजाळा देण्यासारख 
 SSC या वर्षात 
 काही घडलेलच नसतं 

 तो तीला तिच्या 
 टोपण नावाने हाक मारतो, 
ती अवघडते पण आक्षेपही नसतो 
 कारण एकच दिवसाचा सहवासही 
 पुढच्या संपूर्ण प्रवासाचा 
 साथी होणार असतो 

 निरोप घ्यायची वेळ येते 
 दोन समांतर रेषा 
 काही क्षणांकरता एकत्र होऊन 
 पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात 
 पुढील जन्मी नक्की भेटण्याची 
 नजरेनेच ग्वाही देतात 

 हीच ती SSC ची बॅच 
 कायमचं घर करून रहाते 
 आयुष्याच्या भैरवीला 
 साथीला गात रहाते ...
SSC ची बैच............

Wednesday, October 28, 2020

*भा.रा.तांबे*

*भा.रा.तांबे*


मधुघट!

आधुनिक मराठीतील गीतकाव्य या साहित्य प्रकाराचे प्रवर्तक असे ज्यांचे उचीत वर्णन केले जाते, त्या राजकवी भास्कर रामचंद्र उर्फ भा. रा. तांबे यांचा आज १४६ वा जन्मदिन.

शब्द व गेयता यांचे निसर्गदत्त लेणे लाभलेल्या तांबेंनी बालगीते, प्रणयगीते, निसर्गगीते, विराणी अशा गीतकाव्याच्या सर्वच क्षेत्रांत मुक्त मुशाफिरी केली व आपल्या शब्दप्रतिभेचा कायमचा ठसा मराठी मनावर उमटवला.

तांबेंचा जन्म व सारी हयात महाराष्ट्राबाहेर हिंदीभाषी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी गेली. त्यांचे शिक्षणही अलाहाबाद येथे झाले. पण १९ व्या शतकात उत्तरेत अनेक मराठी भाषक संस्थाने होती. त्यामुळे त्यांना राजाश्रय मिळाला. ते ग्वाल्हेर संस्थानचे 'राजकवी' बनले.

*झांशीच्या राणी लक्ष्मीबाई या तांबेंच्या आत्या.* ते वीररक्त तांबेंच्या धमन्यांमधून वाहात होते. त्यांनी विरश्रीयुक्त कविता लिहिली:

हे हिंद बांधवा थांब या स्थळी
दोन अश्रू ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मालवे
इथे झाँसीवाली ।।

'हे दूध तुझ्या त्या घटातले', 'डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका', या सारख्या त्यांच्या कवितांनी प्रणयरस फुलवला, तर 'तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा'त  भावा-बहिणीचे प्रेम दाखवले.

वार्धक्य, मृत्यू व वियोग या संज्ञांबद्दल तांबेंना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता,  असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. 

कळा ज्या लागल्या जीवा
मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे
कुणाला काय सांगाव्या

अशा त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा! 

कशी काळनागिणी
सखी गं वैरिण झाली नदी
प्राण विसावा पैलतीरावर
अफाट वाहे मधी

ही तांबेंची विरह कविता अंतर्मुख व्हायला लावणारी आहे.

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या', 'मावळत्या दिनकरा' 'जन पळभर म्हणतील हाय हाय', अशा कवितांतून त्यांना त्यांच्या अखेराची स्पष्ट जाणीव झाल्याचे जाणवते.

मृत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले.

तांबे १९४१ साली गेले. त्याच्या थोडाच काळ आधी त्यांना एका दिवाळी अंकात कविता लिहिण्याविषयी विनंतीचे पत्र आले. त्यावेळेस उत्तरादाखल त्यांनी कविताच पाठवली. ती बहुधा त्यांची अखेरचीच कविता असावी, असे म्हटले जाते.

तीच ही 'मधुघट' कविता :

मधु मागशि माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं न रोष सख्या, दया करीं.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगीं अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचें मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचें नांव का सया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.

- *भारतकुमार राऊत*

Tuesday, October 13, 2020

नवऱ्याशी वागावं कसं! लेखिका नीता गोडबोले

नवऱ्याशी वागावं कसं!              लेखिका नीता गोडबोले 

थंड पाणी प्यावं म्हणून मैत्रिणीकडे (आशाकडे )गेल्या गेल्या मी फ्रीज उघडला अगदी दर्शनीच दोन मऊ अन सुरकुतलेले चिक्कू दिसले मी पाणी घेतलं अन् आशाला म्हटलं ,”हे चिक्कू अगदी खराब झालेले दिसतात चिरून बघते म्हणजे टाकून तरी देता येतील “
“राहू दे “आशा म्हणाली.
“अगं अगदी खराब झाल्यासारखे दिसताहेत.”
“ अगं शोधलं तर तर बरंच काही सापडेल,उद्या फ्रीझ डिफ्रॉस्ट करायचाच आहे.”
“पण ते चिकू ..........”
माझं वाक्य अर्धवट तोडत आशा म्हणाली ,”राहू दे ग,नाही तरी ऑफिसमधून आल्याआल्या पाणी प्यायच्या निमित्ताने हे फ्रीज उघडतात अन मग समोरच असं काही दिसलं की तत्परतेने फेकून देतात .”
“अग मग आताच दे की टाकून.”
“तुला माहित नाही ,आशा म्हणाली,”यांना असं चटकन बोलायला निमित्त मिळालं की बर असतं ,नाही तर आल्या आल्या तासभर फ्रिजमध्ये उचकपाचक करून ‘दोन वाट्या शिळं ताक ,परवाची उरलेली गवारीची भाजी ,काल रात्रीची आमटी ,आठवड्यांपूर्वीचं इडलीचं थोडंसं पीठ, गुलाबजामचा उरलेला पाक ,पंधरा दिवसांपूर्वीचा चीजचा बोटभर तुकडा ‘असं काढून दाखवतात.”
माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून  आशाच पुढे म्हणाली ,
“माझ्या नवऱ्याला स्वच्छतेची भारी आवड , मला त्याच्यासारखा घर स्वच्छ ठेवता येत नाही ही त्याची ठाम समजूत ! मी अगदी आटापिटा करून सर्वच्लं कोट्यातही तो दोष काढतोच त्यामुळे आजकाल मीच वागण्याचं तंत्र बदलले बाहेरची खोली पूर्ण आवरली तरी मी  आदल्या दिवशीचा पेपर टीपॉयवर तर ताजा पेपर बेडरूममध्ये डायनिंग टेबलवर ,एक दोन डिव्हीडी ची कव्हर  एकीकडे डिव्हिडी  दुसरीकडे असे ठेवते ,आल्या आल्या बराच पसारा आवरायला मिळाला की त्याला मला बोलायला निमित्त मिळतं आणि मुद्दामच ते ठेवलं असल्याने मलाही त्याचं काही वाटत नाही.ऑफिसमधून आल्या आल्या आशाच्या नवऱ्याने फ्रीज उघडला अन् “काय हे चिक्कू किती खराब झालेत”म्हणत तत्परतेनं फेकून दिलेत.चेहऱ्यावर बायका या अशाच आम्हा पुरुषांचं लक्ष असतं म्हणून निभतं बरं असा भाव !
                  
        “काय हे एक वस्तू नीट ठेवलेली नसते म्हणत सगळं आवरलं ,एका दगडात दोन पक्षी ! 
“माझं घरात कसं लक्ष असतं,अन काहीही म्हटलं तरी बायको कसं उलट उत्तर करत नाही “या दोन्ही गोष्टी इतरांपुढे मिरवायला नवरे उत्सुक असतात. 

     बायकोला बोलायचं निमित्त बहुतेक नवरे शोधात असतात अशा वेळी आपणच निमित्त पुरवायचं अन् प्रेक्षक बनायचं हे मैत्रिणीचं तंत्र मला फारच आवडलं . 

    बहुतांशी एखाद्या रविवारी नवऱ्याला घर आवरायची हुक्की येते मग निवडून मोक्याच्या जागा शोधल्या जातात उदाहरणार्थ दिव्याच्या शेड्स ,डायनिंग टेबल किंवा सोफिया खालची जळमट, स्टोअर रूम, काहीच नाही मिळालं तर बायकोची पर्स तर असतेच!!!  एकच सुट्टीचा दिवस तरीही मलाच घराची स्वच्छता करावी (बघावी ?)लागते आहे ! मी आहे म्हणून संसार निभतोय  चा आव आणत आवराआवरीला सुरुवात होते .
“किती घाण झाली होती लॅम्पशेड आता कशी नवी दिसतेय, कुठलीही वस्तू मेंटेन करावी लागते ! किंवा तो जुना पतंग कशाला ठेवलाय जपून? अन ह्या औषधाच्या  रिकाम्या बाटल्या ?अन् हा गॅसचा कार्डबोर्डचा खोका?  दे फेकून असं विजयी स्वरात म्हणत नवरा सैनिकांच्या आवेशात घरातल्या वस्तूंवर वार करत असतो आपण गप्प बसून एक एक वार  झेलायचे कारण अश्या वेळी मी आवरणारच होते ,फेकणार होते, ही समर्थान नवऱ्याला मुळीच पटत नाहीत .उलट दोन दिवसांनंतर “माझा पतंग कुठे?” म्हणून मुलाने भोकाड पसरले की आपण त्याला बाबांकडे समजूत घालायला पाठवायचे असते तेव्हा त्याला तो जुना पतंग का जपून ठेवावा लागतो ते कळतं.
       इतर बाबतीत मात्र परवा यांनी लैंप शेड धुतली किंवा टेबल खुर्च्यांना पॉलीश केलं असं कौतुकानं चार चौघात विशेषत: नवऱ्याच्या मित्रात किंवा नातेवाईकांत सांगितलं की नवर्याची खुशी काय वर्णावी!!! आता ही तंत्र जरा मुरल्या खेरीत जमत नाहीत.
       लग्न झाल्यानंतर चे नवे नवलाईचे दिवस सहाजिकच तांदूळ किती आहेत ? भाजी आणली की नाही ?कणिक संपली का ? वगैरे तपशील कसे लक्षात राहणार ?त्यामुळे नेहमीच कणकेचा डबा पार रिकामा होईपर्यंत लक्षातच यायचे नाही . त्यानंतर गहू आणून ते निवडून दळायला देणे म्हणजे दोन तीन दिवस बिन पोळीचे अन् असं तर नेहमीच व्हायचं ,दर दहा पंधरा दिवसांनी आमटी भात किंवा ब्रेड आम्लेट!  एकदा केव्हा तरी नवर्याच्या  लक्षात आलं . लक्षात आल्याबरोबर तमाम नवरे जातीशी इमान राखून त्याने “नो प्रॉपर मॅनेजमेंट “असा कुजकट शेरा दिला . राग आला  खूप कारण अशा वेळी बायकोची अपेक्षा असते की नवऱ्याने कौतुकाने म्हणावं की “आता तर संसारात पडली आहेस येईल  हळूहळू .” 
   नवं लग्न नवी स्कूटर त्यामुळे रोज भटकणं  ठरलेलं एकदा पेट्रोलपंपाशी ,एकदा  घराजवळ स्कूटर ठप्प!  रिझर्वला  आल्यानंतरही पेट्रोल न भरल्याने ही अवस्था ! तिसऱ्यांदा हॉटेलमधून जेवून बाहेर पडलो होतो ,डोळ्यावर गुंगी आलेली अन् धड ना पेट्रोल पंपाजवळ ना घर जवळ अशी स्कूटर ठप्प ! पेट्रोल  पूर्ण संपलेलं ,आधीचा राग मनात होताच त्यामुळे तोंडून पटकन निघालं “नो प्रॉपर मॅनेजमेंट” तेव्हा अभावितपणे निघून गेलेल्या शब्दांनी काम केलं . 

   आता काय बिशाद आहे “नो  प्रॉपर मॅनेजमेंट “म्हणायची  ? (कणिक संपली तरी .)

     पण प्रत्येक वेळी असं जशास तसं चालत नाही . आता हेच बघा बदली झाल्याने सामानाची आवराआवर सुरू आहे नवरा बाहेरच्या खोलीत सामानाच्या गराड्यात भांबावून बसला आहे , अशा वेळी आपल्या मनात येतं बाबा किती चटकन पॅकिंग करायचे बदली झाली की , आईचं आपलं निवांत स्वयंपाक वगैरे सुरू असायचं ,पण तसं बोलून दाखवलं तर तोबा तोबा कारण सासू सुने प्रमाणे जावई सासऱ्याचं नातं असतं.  मुलाला आई आदर्श तर मुलीला बाबा ! 

    पण या उलट घडतं ते स्वयंपाक घरात आपली तारांबळ उडते तेव्हा . भाजीपोळी एका वेळी करायची म्हणजे कसरतच. अर्थात स्वयंपाकाची सवय नसलेल्या काळात पोळ्या करू म्हटलं तर भाजीकडे दुर्लक्ष अन् भाजी बघू म्हटलं तर पोळी जळून खाक ! आपली धांदल बघून नवरा मध्ये एक बाण सोडतो ,”माझी आई एकीकडे पुरणाच्या पोळ्या अन् दुसरीकडे भजी गरमगरम करून वाढायची” असं ऐकल्यावर,” हो करत असतील त्या ,इतकी  वर्षे संसार झालाय त्यांचा “ असं पटकन मनात येतं पण ते ओठावर ठेवून म्हणायचं,”  जमतं  एकेकाला , मलाही शिकून घ्यायला हवं त्यांच्याकडून . चेहऱ्यावर जितके बाळबोध भाव आणता येतील तितकं चांगलं ,कारण मग तेवढ्या एका वाक्याने काम होतं ,अन् त्यानंतरचे  काही दिवस तरी नवरा कच्ची भाजी आणि करपलेल्या पोळ्या निमूट खातो .

       लग्नाची नवलाई जशी कमी होत जाते तसतसं नवऱ्यांना इतरांच्या बायकांची स्तुती करायला स्फुरण येतं . “दिलीपच्या बायकोनं  काय फॉर्म राखला आहे , वाटत नाही दोन मुलांची आई म्हणून! “  किंवा  “हेमंतची बायको फारच अॅक्टिव्ह हं सतत काही तरी करत असते, नोकरी तर आहेच शिवाय तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करते, पेंटिंग करते ,योगाच्या क्लासला जाते “ किंवा “राम नाथनची बायको खरी सुगरण हं ,काय सांबार बनवलं होतं परवा ?”  असल्या कुठल्याही वाक्यावर आपला फक्त हूं असतो. त्याच्या वाढत्या स्तुती गणित ‘घरकी मुर्गी ‘ वगैरे वगैरे आपल्याला सुचायला लागतं अन् तिथेच घात होतो . मग नवऱ्याचं मत बनतं की  तुला इतर कुणाचे चांगले गुण वाखाणलेले पण आवडत  नाहीत . “जेलसी दाय नेम इज वूमन” वगैरे वगैरे .
 
        आता समजा नवऱ्यानं कुणाच्या पदार्थाची स्तुती केली की आपण म्हणायचं ,परवा आले होते नं ते आपल्याकडे , भेळ केली होती मी त्यादिवशी, तेव्हाच मी तिला म्हटलं ,”  मला सांबार  शिकायचंय म्हणून “ आता अर्थात” भेळ” केली होती मी हे वाक्य जरा ठासून म्हटलं की झालं . भेळ खाल्ल्यावर ,” छान झालीय भेळ ,तू पण शिकून घे “ असं रामनाथन ने आपल्या बायकोला म्हटलेलं नवऱ्याला आठवतं अन् “भेळ  तुला छान जमते”  असं गुळमुळीतपणे का होईना म्हणावंच लागतं . अर्थात काही जण “पण तू सांबार शिकून घे “ असं म्हणून बायकोने कितीही प्रश्नाला बगल देता द्यायचा प्रयत्न केला तरी मूळ मुद्दा डावलत नाहीत ते वेगळं !  

   एखादे वेळी आपली एखादी मैत्रीण आपल्या बरोबर एक वीस पंचवीस इडल्या होतील असा इडली कुकर आणि दोन डोशांचे  तवे “जातेच आहेस तू  पुण्याला तर एवढं घेऊन जा , नणंदेला हवं होतं माझ्या “ म्हणत माथी मारते . अर्थात आपणही ते स्वीकारलेलं असतं कारण  पुढल्या वेळी हीच मैत्रिण आपल्याला दिल्लीहून संगमरवरी पोळपाट आणून देणार असते . पण गावाला जायचं तेही नवर्याबरोबर,  अन् असल्या वस्तू घेऊन झालंच , आधीच आपल्या साड्यांनीच  निम्म्यापेक्षा जास्त बॅग भरली म्हणून नवर्याची  तक्रार असतेच .
    
        अशा वेळी मुलं खेळायला गेल्याची संधी साधून म्हणायचं ,”अहो ,तुमची ती मैत्रीण ,”(कधी काळी नवरा अन् तुमची जास्त असलेली मैत्रीण एकाच गावी होते चा फायदा घेऊन) “ तुमची ती मैत्रीण “ असं  म्हटलं की बाण वर्मी बसतो .
“कोण ग कोण ?” इति नवरा .
(“हुं जणू काही शेकड्यांनी मैत्रिणी आहेत “ ) असं मनात म्हणत मोठ्यांना म्हणायचं ,”तीच ती तुमच्याबरोबर हैदराबादला होती ती छाया राजमाचीकर , परवा आली अन  म्हणाली ,”पुण्याला तिची नणंद असते ,तिला मोठा इडली कुकर अन् डोशांचे तवे  हवे आहेत , घेऊन जाशील का म्हणून? “ ( अन् मग जास्तीतजास्त त्रासिकपणे म्हणायचं ), ”लोक तरी कसले काय वाट्टेल त्या वस्तू द्यायला मागे पुढे बघत नाहीत. 

“ म्हटलं नाही ना तिला तसं ?” नवरा धास्तावून विचारतो .

“इश्श तोंडावर  कसं म्हणेन?” ( सापडला ना सापळ्यात ) 

  “ आता दिले ना तर घेऊन जाऊ ,नाही तरी आपलं रिझर्व्हेशन आहे ,हमाल पण करावाच लागेल . चालायचंच शेजार धर्म!” आता इडली कुकर बरोबर दोन कॉफी फिल्टर आपल्या वाहिन्यांसाठी ,एक डोशाचा तवा मैत्रिणीसाठी ,काही मदुरै कॉटनच्या  साड्या बहिणीसाठी ,मद्रासच्या चादरी अजून कोणासाठी तरी असतात . चालायचंच नातेवाईक धर्म असतोच नं!

    नवऱ्याची मैत्रीण म्हणजे अवघड जागेचं दुखणं . अर्थात खरीखुरी मैत्रिण की जीचं नाव काढताच आपली तळपायाची आग मस्तकात जाते किंवा अंगाचा तिळपापड होतो अशी ! योगायोगाने अश्या मैत्रिणीशी आपली गाठ पडते , नुसती गाठच  नाही तर एका गावात राहण्याचा योग येतो नवऱ्याला इतर तमाम बायकांमधले  गुणच दिसत असतात ,मग ही तर खरी खुरी मैत्रीण. 

   आपण सोयीस्करपणे नवरा गात असलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करायचं अन् म्हणायचं ,”परवा किनई त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला तिच्या नवर्याने  तिला अमेरिकन डायमंडचे कानातले घेऊन दिले ,की लगेच आपल्याला आपल्या लग्नाचा वाढदिवस नसतानाही ते मिळतात ,कारण तिच्या नवऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ असं नवऱ्याला दाखवून द्यायचं असतं .

    नवऱ्याने  जळमट झालीत किंवा धूळ साचली म्हटलं की तिनं  - सॉरी , तिच्या नवऱ्यानं  व्हॅक्यूम क्लीनर घेऊन दिला तिला म्हणायचं किंवा एखादे वेळी आपण होऊनच म्हणायचं ,”परवा किनई  तिच्या नवऱ्याने तिला सरप्राइज गिफ्ट म्हणून पटोला साडी आणली.”   

       थोडक्यात काय की नवऱ्याने आपली तिच्याशी तुलना करण्याआधी आपण च नवर्याची तिच्या  नवऱ्याशी तुलना केली की स्वतःचं श्रेष्ठत्व सांभाळण्यातच त्याची त्रेधा उडते .

          अर्थात केव्हा कसं अन् काय बोलायचं हे जिचं तिनंच ठरवायला हवं कारण “व्यक्ती तितक्या प्रकृती “
      
         नाही तर हा लेख वाचून तुम्ही पण म्हणाल बघा हो पमीच्या - पमी म्हणजे अर्थातच तुमच्या नवऱ्याची मैत्रीण !
  मैत्रिणीची नाव प्रमिला सुशीला अशी असली तरी त्याचं पमी , पम्मू किंवा  सुशी ,शिलू  असं करून आपले आपल्या मैत्रिणीशी फारच जिव्हाळ्याचे संबंध होते असं दर्शवायला बहुतेक नवऱ्यांना आवडते . (मग भले तुमच्या नावाचा शॉर्टफॉर्म उच्चारायला एखादा खास दिवस उजाडावा लागतो .) 
      बरे ते असो , तर तुम्ही म्हणाल बघा हो पमीच्या नवऱ्याने तिला किती सुरेख नारायणपेठ साडी आणून दिली, आणि काही दिवसांनी तुमचा नवरा म्हणेल ,”तुला फारच वाईट वाटत होतं ना पमीला  तिच्या नवऱ्याने नारायणपेठ साडी घेऊन दिली म्हणून!  
     बघ मी पण ................... इथे तुम्ही श्वास रोखून तुम्हाला कुठली साडी  मिळतेय चा अंदाज बांधाल अन् कानावर शब्द आदळतील,” बघ मी पण कांजीवरम साडी घेऊन दिली बरका तिला .”
———-———————————x———————————————x————————————- 

Sent from my iPad

Wednesday, September 30, 2020

पुणेरी नाव

🤒नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. 🤒

शनिवारवाडय़ासमोरच्या पटांगणात बटाटय़ाचा बाजार भरत असे. त्यामुळे तिथे असलेला मारुती झाला ‘बटाटय़ा मारुती’. तसेच सराफांची दुकाने असलेल्या ठिकाणचा झाला ‘सोन्या मारुती’. आजच्या केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे उंटांचा तळ असायचा. त्यामुळे तिथला मारुती झाला ‘उंटाडय़ा मारुती’, तर स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा खांदापालट करण्यासाठी जिथे थांबायची, त्या ठिकाणचा मारुती झाला ‘विसावा मारुती’. ‘डुल्या मारुतीची’ कथा काही औरच! पानिपत इथे मराठी सैन्याची कत्तल झाली म्हणून तो थरथर कापत होता, डुलत होता. तो झाला ‘डुल्या मारुती’. याबद्दल अजून एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. दुसऱया बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडावे का यासाठी म्हणे या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीने मान डोलवून त्याला मान्यता दिली. म्हणून हा झाला डुल्या मारुती ! भिकारदास शेठजींच्या जागेत आला म्हणून ‘भिकारदास मारुती’, तर गुरुवार पेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा होती म्हणून ‘रडय़ा मारुती’ आणि याचसोबत सुरू होते चमत्कारिक नावांची परंपरा. गवत्या मारुती, दंगल्या मारुती, धनगरांची वस्ती असलेल्या ठिकाणचा ‘लेंडय़ा मारुती’, भांग्या मारुती, बंदिवान मारुती, हलवायांची दुकाने असलेला भाग आणि त्यामुळे मारुतीच्या गळ्यात रोज जिलब्यांची माळ घातली जायची म्हणून तो झाला ‘जिलब्या मारुती’, तल्लीन मारुती, झेंडय़ा मारुती, पत्र्या मारुती. आजच्या फरासखाना इथे पूर्वी चापेकर बंधूंनी मारुतीच्या साक्षीने गोफण क्लब सुरू केला आणि तो मारुती झाला ‘गोफण्या मारुती’. दक्षिणमुखी मारुती आणि गावकोस मारुती असे अनेक मारुती आपल्या खास नावांनी प्रसिद्ध आहेत.

मारुतीबरोबरच इतरही देवस्थानांना असलेली चमत्कारिक नावे आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात. एक आहे ‘दाढीवाला दत्त’! खरे तर दत्ताचा आणि दाढीचा इथे काहीच संबंध नाही. नारायण पेठेत दत्तात्रय घाणेकर यांनी १९११ मध्ये बाळप्पा महाराजांच्या प्रेरणेने एक दत्तमंदिर बांधले. त्याचे मूळ नाव श्रीपाद मंदिर, पण दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती. त्यामुळे पुणेकरांनी या दत्ताचे नामकरण केले दाढीवाला दत्त. विजय टॉकीजजवळ आहे ‘सोटय़ा म्हसोबा’. म्हसोबा ही रक्षक देवता आहे. या देवाला नवस बोलत असत आणि तो पूर्ण झाला की, त्याला लाकडी सोटा वाहायची पद्धत होती. कदाचित रक्षक म्हणून त्याच्या हातात सोटा हवा ही भावना असू शकेल. या मंदिराच्या छताला हे भक्तांनी वाहिलेले सोटे टांगून ठेवत असत.

अजून एक वेगळे नाव असलेले मंदिर म्हणजे ‘उपाशी विठोबा’. इथे मात्र प्रथा काहीशी निराळी आणि भक्तिपूर्ण अशी आहे. जवळ जवळ तीन पिढय़ांच्या उपासाच्या व्रतामुळे या देवाला हे नाव पडले आहे. पेशवाईत गिरमे सराफांनी हे मंदिर बांधले. गिरमे उपास करताना लाह्यांचे पीठ आणि ताक असे एकत्र करून त्याचे सेवन करीत असत. त्यामुळे या विठोबाला ‘ताकपिठय़ा विठोबा’ असेही नाव पडले होते. पुढे गिरमे यांनी आपले उपासाचे व्रत नाना गोडबोले यांना सुपूर्त केले. नानांनी हे उपासाचे व्रत अंगिकारले आणि या विठ्ठलाची सेवा करू लागले. नाना गोडबोले हे उत्तम कीर्तनकार होते. पुढे त्यांनी आपल्या कीर्तन संचातील गंगाधरबुवा काळे यांच्याकडे आपले व्रत आणि हे मंदिर सुपूर्त केले. काळ्यांनी त्याच भक्तिभावाने हे व्रत अंगिकारले. सध्या साठे कुटुंबीयांकडे या मंदिराची व्यवस्था आहे. तीन पिढय़ांनी अंगिकारलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा मात्र ‘उपाशी विठोबा’ म्हणून प्रसिद्धीस पावला. असाच अजून एक विठोबा पुण्यात आहे तो म्हणजे ‘निवडुंग्या विठोबा’. नाना पेठेत असलेले मंदिर. वारीच्या वेळी संत तुकोबारायांची पालखी या मंदिरात उतरते. एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाली. पुढे गोसावींनी इथे मंदिर बांधले आणि तो झाला ‘निवडुंग्या विठोबा’. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते तो आहे ‘पालखी विठोबा’. तद्वत पासोडय़ांचा बाजार जिथे भरायचा, तिथे आधी मंदिर झाले पासोडय़ा मारुतीचे आणि त्याच्या नंतर त्याच्या जवळ मंदिर झाले ते ‘पासोडय़ा विठोबाचे’. याशिवाय चोळखण आळीत असलेला ‘खणाळ्या म्हसोबा, नागाचे स्वतंत्र मंदिर आणि त्यात विराजमान असलेली दगडात कोरलेली नागाची जोडी म्हणून तो झाला ‘दगडी नागोबा’.

यांच्यात भर घालायला आलेली देवळे म्हणजे ‘गुडघेमोडी माता’, ‘शितळादेवी’, ‘भाजीराम मंदिर’, मातीपासून केलेला ‘माती गणपती’, ‘गुपचूप गणपती’, पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड याच्या घराजवळ असलेला गणपती झाला ‘गुंडाचा गणपती’. अजून दोन नावे अशीच आगळीवेगळी आहेत. एक आहे ‘बीजवर विष्णू’. खरे तर विष्णूचे एकच लग्न झालेले आहे ते लक्ष्मीशी. मग पुण्यात बीजवर विष्णू कसा काय आला? तर झाले असे की, विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तींपैकी लक्ष्मीची मूर्ती भग्न झाली. तिच्या जागी दुसरी मूर्ती आणून वसवली म्हणून हा देव झाला बीजवर विष्णू ! आणखी एक देवस्थान म्हणजे ‘खुन्या मुरलीधर’. सन १७९७ मध्ये गद्रे सावकारांनी हे मंदिर बांधले आणि त्याच्या रक्षणासाठी अरब शिपाई ठेवले. त्यांच्यात आणि इंग्रजी सैन्यात इथे लढाई झाली. त्यात ६० लोक मारले गेले. दुसरे असे की, चापेकर बंधूंनी रँड या ब्रिटिश अधिकाऱयाचा खून केला. त्यांच्या कटात आधी सामील असलेले द्रविड बंधू नंतर फितूर झाले आणि त्यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली. हे द्रविड या मुरलीधर मंदिरासमोरच राहायचे. फितुरीची बातमी कळल्यावर या द्रविड बंधूंचा इथेच खून करण्यात आला. त्यामुळे हा मुरलीधर झाला ‘खुन्या मुरलीधर’.

अशी अजूनही अनेक नावे आणि देवळे पुण्यात पाहायला मिळतील. नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. तीन सोंडी असलेला म्हणून त्रिशुंड गणपती इथपर्यंत ठीक आहे, पण पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. खरे तर ही नावे अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. *‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!*

🙏🙏🙏

Sunday, September 27, 2020

देव आनंद आणि पुणे । शैलेश गुजर

देवानंद याचे पुण्याशी नाते-डॅा. शैलेश गुजर

आपण लहानपणापासुन मनात  चित्रपटाला एक विशेष स्थान दिलेले असते. आपले आवडते नट, नायिका, पात्रे, संगीतकार,डायलॅाग रायटर, फाइटस्,गायक,गायिका आणि इतर अनेक बाबींचा घट्ट पगडा मनावर असतो.
जेव्हा एखादी संधी मिळते ,त्यात आपला आवडता नट नायिका,संगीतकार यांना भेटण्याची संधी मिळाली तर आनंदच्!
१९९४ साली  अशीच संधी माझे मित्र माजी उपमहापौर अली सोमजी याने दिली.
देवानंद यांनी दिग्दर्शन केलेला, व स्वत: भूमिका केलेला “गॅगस्टर” सिनेमाचा प्रिमीयर शो पुण्यात अलंकार सिनेमा येथे केला. 
स्थानिक होस्ट अली सोमजी, प्रसिद्धी प्रमुख व आयोजक प्रेम अडवाणी होता. देवानंद यांचा नायर नावाचा पी ए ४०-४५ वर्षापासुन त्याचे बरोबर असे.पी ए नायर अतिशय शार्प तल्लख व घड्याळा प्रमाणे चालणारा होता , प्रसंगी देवानंद याना देखील कडक शब्दात बोलत असे , पण जशी नायर बरोबर मैत्री झाली तेव्हा कळाले की ते अतिशय प्रेमळ व कवी मनाचे आहेत,चित्रपटात हीरो बनण्यासाठी आले , आणि देवानंचे सर्वस्व होउन गेले.
त्यांनीच मला देव साहेबांबरोबर फिरण्याची संधी दिली. देवानंद याचे बरोबर काम करण्याची संधी नायर मुळेच मिळाली.
   १९९४ साली माझा नुकताच “पुणे वृत्त दर्शन न्यूज चॅनेल” सुरु झाला होता. 
अली सोमजी म्हणाला ३ दिवस मिळाले पण काय करता येइल? 
एक प्लॅन तयार केला गेला.
१) दिवस - पुणे शहरास देवानंद यांची सदिच्छा भेट- जीथे स्ट्रगल पिरीयड मध्ये ते राहतअसे - पुना गेस्ट हाउस भेट,सरपोतदार परिवारातर्फे स्वागत
२) जेवणा करिता डेक्कन वरील कॅफे गुडलक कासम शेठ भेट,
३) लकी रेस्टॅरंट- अत्ताचेआर डेक्कन मॅाल ची मागील बाजु गरवारे पुल येथे चहा करिता भेट!
४ ) प्रिमियर शो- बग्गीतुन ढोल ताशा लेझिम मिरवणुक
३५ ) प्रेस मिट
या करिता प्रविण वाळींबेनेही मदत केली.
ठरल्याप्रमाणे सर्व जुळले.
हॅाटेल ब्लु डायमंड (आता ताज) मधुन कार ने निघालो आणि लक्ष्मी रोड ला आलो.
————————
प्रसंग—- पुना गेस्ट हाउस चे दारात उतरलो,  -देवानंद  झरझर पाय-या  चढुन  सराईता सारखे वर गेले. सरपोतदार परिवाराने स्वागत केले. ते ज्या रुम मध्ये रहात होते तीला त्यानी भेट दिली.चहा घेतला व म्हणाले इनके यहॅा बहुतबार  मराठी खाना खाया है,मटार की सब्जी ब्रेड के साथ खाना यहीं से मैने  सिखा है.।
     पुना गेस्ट हाउस चे खाली 
फुटपाथवर एका भैयाचे पान बिडीचे छोटे दुकान होते. देवानंद पान बिडी दुकानाच्या बाहेर तेथील चौकोनी स्टुलावर बसुन  पनामा सिगारेटचे दोन तुकडे करुन, एक खिशात ठेवत व एक शिलगावत असे. देवानंद यांची ₹ १.२५ पैसे उधारी त्या भैयाकडे शिल्लक होती. 
  भैयान सांगितले आपने मेरे पैसे नही दिये मैने ७-८ बार पत्र लिखा, कोई जवाब नही? तेव्हा देवानंद म्हणाले आपके पत्र मेरे ॲाफीस मे आज भी मौजुद है, आपका तगादा मै सबको दाखले के तोर पे देता हू! 
“हक्क का पैसा” पानेके लीए आपने ३ रुपये खर्च कीये है! 
     यह सबक मार्केटीग के जमानेमे कीसी भी बुक मे नही लिखा है की वसुली कैसे करे!वसुली  मार्केटीग मे नही सिखाते।मै आपका शुक्रगुजार हॅू ,आपकी पैसे वसुली की शिक्षा , आपका  प्यार मेरे मन और दिल मे कायम है!
       दोघांची गळाभेट झाली, दोघांचे डोळे पाणावले. भैयाने सिगारेट तोडुन दिली देवानंद म्हणाले अभी सिगारेट पीना मुझे मना  है,फीर भी आपका प्यार और जुनुन से मै आज पी लेता हू, आणि त्यानी एक झुरका मारला व अर्धी सिगारेट खिशात ठेउन बायबाय करत पुन्हा गाडीत बसले.गाडी गुडलक हॅाटेल डेक्कन च्या दिशेने निघाली.
——————————
डेक्कन वर
कॅफे गुडलक वर कासम शेठ परिवार होता. त्याना भेटले व २-३ चमचे बिर्याणी खाल्ली गप्पा मारल्या . कासम भाईंनी नविन पीढीची ओळख करुन दिली.गुडलक मधील टेबल खुर्ची व फर्निचर पाहुन ते म्हणाले कासमजी आपके जैसा ही फर्निचर तगडा ओर मजबुत है।
         बाहेर कॅालेज मधील तरुण तरुणींना पाहुन देव आनंद मराठीत म्हणाले “कस काय ?” हात दाखवत पायीच  लकी रेस्टॅारंट गाठले.
      गर्दी झाल्यामुळे लकीचे शटरच लाउन टाक असे देवानंदन यांनी सांगितले.
नंतर लकी रेस्टॅारंटचे मालक आत 
भेटले. आत जाउन त्यांचा नेहमीचा बसायचा आवडता कोपरा त्यांनी पाहीला, लाकडी गोल आकाराच्या इराणी खुर्चीवर ते बसले  व मला म्हणाले “ यहॅा मै घंटो बैठकर भूमिका,कहानी,और काम की तलाश मे सोचता बैठता था!”बाहर साईकल स्टॅड पर साईकल लगाता था।
      शेठ नी इराणी चहा व पिळाची खारी दिली , अतिशय आनंदाने त्यानी लहान मुलां प्रमाणे त्याच अस्वाद घेतला,तावच मारला!
       अतिशय भावुक होउन मला म्हणाले आज, ये चाय के साथ, मेरे पुराने भागदौड के दिन और स्ट्रगल के दिन की याद आ रही है!
    तेथुन आम्ही निघालो, पोलीस सहकार्य घेतले  व गर्दीतुन वाट काढत कार मध्ये बसलो.
देवानंद यांचे पुण्यावर
फार प्रेम होते. त्याचे बरोबर जातांना ते पुण्यातल्या खानाखुणा सांगत.
त्यांना मी विचारले पुण्याविषयी तुमचे मत काय आहे? ते म्हणाले शिवाजीकी भूमी है, विद्वान पंडितोकी भूमी है, संगीत नृत्य,सिनेमा और संत ज्ञानेश्वर की भूमीहै। “सायकिल” इस शहर की शान है, “मलीका” है! । मै बहुत छोटा इंसान हू! फिर भी ये शहरने मुझे पन्हा दी, करियर के स्ट्रगल मे यही एक शहर है जीसने मेरा साथ निभाया है। मै इस शहर के प्रती मेरा प्यार,आदर और सम्मान  हमेशा व्यक्त करता हॅू।
           आम्ही ब्लू डायमंड कडे निघालो.
त्यानी मला सांगितले आपण कॅम्प मधुन जाऊ, तसे मी ड्रायव्हरला सांगितले, सरबतवला चौकात आलेवर म्हणाले यही दोराबजीकी हॅाटल है, आणि याच रस्त्यान् मी नेहमी लक्ष्मी रोड वरुन कॅम्प मध्ये फिरायला यायचो, त्या वेळी एका वेगळ्या, शिस्तीच्या एरियात आल्या सारखे वाटायचे, वेस्टेंन्ड ला इंग्रजी सिनेमा व ईराणी हॅाटेल नाझ चा सामोसा - चहा ही माझी रविवारची चैन असायची! 
       देवानंद यांचे बरोबर राहण्याचे भाग्य मला मिळाले . मी देवानंद यांना माझ्या लोकल केबल चॅनेलची माहीती दिली.मला स्वत:हुन म्हणाले आज दोपहर आपको  मै Interview 
देंताहू।पक्का प्रॅामिस्!
त्या प्रमाणे मुलाखात दिल्यावर  मी त्यांना म्हणालो मराठी मे २-४ लाइने कहो.
मला म्हणाले अंग्रेजीमे मराठी लाईने लिखकर दे दो, मै करेक्ट मराठी लाईने आपको देताहूं । खरोखर एकही वाक्य रिटेक न होता त्यानी  मराठीत सुंदर वाक्ये म्हटली. मी विचारले हे कसे काय जमले ? ते म्हणाले डायक्रीटीकल रचनेतुन मी ते केले. माझ्या बरोबर शुटींगला महेंद्र कोल्हे कॅमेरामन होता.
त्याला देवानंद म्हणाले मै जवान और स्मार्ट  दिखना चाहीये, ॲगल बराबर करो! कॅमेरामन जादुगर होता है जवान को बुढा और बुढे को जवान कर सकताहै!
तेव्हा M-9000 खांद्यावरचे जड व्हीडीयो कॅमेरा शुटींगला वापरला होता. 
  मुलाखात प्रसारण झाल्यानंतर त्याना एक व्हिडीओ कॅसेट  पाठवली, पुणे दौ-याचे संम्पुर्ण कव्हरेज दिले, त्यानी एक महीन्यानंतर फोन करुन कौतुक केले व मुंबईला नवकेतनला चहा करिता बोलावले, पण योग काही जमला नाही.
२६ सप्टेंबर १९२३- देवानंद याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा स्मृतिला समर्पित!
डॅा.शैलेश गुजर
संपादक
पुणे वृत्त दर्शन
सी न्यूज 
१९९४ पासुन प्रसारण सेवेत!
gujar999@gmail.com
किशोर सरपोतदार यांनी पाठवलेली पोस्ट

#Salgaonkar| साळगावकर कोल्हापूर

वासांसि जिर्णानि यथा विहाय... 

मृत्यू हा ज्यांचा अगदी सहज विषय असे बाबा काल 27 ऑगस्ट 2020 रोजी त्याचे बोट धरून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. कोणाच्याही विरहाने मला वेदना व्हाव्या नि त्यांनी वासांसि जिर्णानि हे गीतावचन ऐकवावे असे कित्येकदा झालेले... मनुष्य जीर्ण कपडे बदलून नवे घेतो तसे देहाचे वस्त्र जीर्ण झाले की आत्म्याला ते फेकून नवे घेण्याची आस लागते, त्यात वाईट ते काय? हे तत्त्वज्ञान ऐकायला ठीक असले तरी मनुष्याच्या कपड्याशी एकतर सहसा त्याचा एकट्याचाच संबंध आणि तो ही तुलनेने कितीतरी कमी काळाचा असतो. इथे हे वस्त्र आत्म्याला तो नर जन्मल्याक्षणापासून चिकटलेले, त्याचे सगळे राग-लोभ त्या कपड्याशी निगडीत आणि त्यामुळे इतरांचाही त्या कपड्याशी घनिष्ठ संबंध आलेला असतो. नवे कपडे घातलेले शरीर पाहता येते तसा आत्मा भेटत नाही ना... ही ती तुटल्याची वेदना...

असो, पण जीव बोलला तसं वागला याबाबतीत... 14 ऑगस्टला फ़क्त आखडलेल्या गुडघ्यांना वाकतांना तोल संभाळता न आल्याने ते पडले आणि दंडाचे हाड मोडले. दुर्दैवाने पहिलीच नव्हे तर दुसरी सर्जरीही फ़ेल झाली आणि बहुतेक त्यामुळेच देहाचे हे वस्त्र जीर्ण झाले याची त्या आत्म्याला चाहूल लागली... नवे वस्त्र धारण करायला गेला तो आत्मा असे त्यांच्या शेवटच्या श्वासाची प्रत्यक्ष साक्षी असलेल्या त्यांच्या लाडक्या शैलाने आम्हाला सांगितले.  पण ते त्या माणसालाही नक्की अकल्पितच, म्हणजे केवळ चारच दिवसांपूर्वी त्यानी लवकरच म्हणजे शनिवारी 29 ऑगस्टला टाके निघाले की दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाऊन अनंतचतुर्दशीला लाडू करून खाण्याची स्वप्नं मला फोनवर सांगितली होती... 

सोडीयम कमी झालंय म्हणून मीठ, आणि त्यासाठी स्नॅक्स बिस्किट्स खायला घातल्याचे निमित्त, त्याने त्यांना खोकला यायला लागला तो बिस्किट्स बंद करून सलाईन लावल्यावर लगेच कमीही झाला. पण दवाखान्यात असलेल्या मिनिमम स्टाफ़ने खोकला हे कोव्हिडचे लक्षण आहे म्हणून आम्ही हात लावणार नाही असे बंड पुकारले आणि डॉक्टर, जे दोन दिवसांपूर्वी बरे वाटतेय त्यांना डिस्चार्ज द्या म्हणतांना शनिवारी टाके काढूनच सोडणार म्हणणारे, रातोरात पेशंटला कुठेही हलवा म्हणाले... 

लोकांना हवा असतो तोवर जीव त्या शरीरवस्त्राला धरूधरून ठेवतो, नकार त्याच्या कानावर पडला की जीवेच्छेचा अंत होतो. तसेच झाले, हलवा म्हणजे कुठे हलवा? अर्थोपेडीक झाले तरी दवाखान्यातून पेशंट घरी न्यायला राहो, दुसर्‍या दवाखान्यातही घ्यायला कोणी तयार नाही कोव्हिडकाळात... दुपारपर्यंत फ़क्त कुठे हलवता येईल याची शोधाशोध, मी सुचेल त्याला दवाखाना मिळवण्यात काही मदत करू शकता का असे मेसेजेस केले आणि प्रत्येकाने काही शक्यता सुचवल्या. शेवटी सीपीआरला कोव्हिड टेस्ट करून पुढे ते देतील ती दिशा असे ठरले. कोव्हिडयोद्धा वैशालीने अकल्पितपणे स्वत:हून पुढाकार घेऊन कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली तर रुग्णाला दाखल करून घेणारा मिळणे अवघड अशा सद्यपरिस्थितीत त्यासाठीही सोय केली. आमदार राजेश क्षीरसागर जुने शेजारी... स्वत:ला बरे नसताही केली धडपड त्यांनी, पण त्यांनी सांगूनही गणपती आणि अशाच कारणांनी ॲम्ब्युलन्स यायला चक्क संध्याकाळ झाली... क्षणाक्षणाने दुर्दैव ओढवत आहे हे दिसत असूनही काहीही करता येत नव्हते. वंदनाने तर मला, स्पष्टच दिसतंय परिस्थिती बिघडत चालल्याचं तरी काही वैद्यकिय हालचाल नाही तेव्हा बाबांनी तुला गीता वाचायला सांगितली आहे हे लक्षात ठेवायचं, असे दुपारनंतर सांगितले होते. सीपीआरमध्ये पोहोचायला रात्र झाली तेव्हा दगदगीने त्यांना धाप लागली होती. 

साधारणत: सर्वच वृद्धांची पोजिटिव्ह येते अशी कोव्हिड सस्पेक्टन्सी टेस्ट करून त्यांना सस्पेक्ट वार्डात दाखल करावं असा निर्णय झाला तेव्हा सकाळी उठून न खाता-पिता, कोव्हिडभयाने अगदी वॉशरुमलाही न जाता हॉस्पिटलसाठी दिवसभर वणवण करत आलेल्या वंदना नि शैला, भले भले पण आजार्‍यास दरवाज्यापर्यंतच सोडतात अशी स्थिती जिथे त्या सीपीआरमध्ये त्यांच्यासोबत होत्या. खूप कमी सामग्रीत खूप पेशंट्स हाताळणे चालू असल्याने अत्यवस्थ पेशंटबद्दल आशा बाळगण्यात अर्थ नव्हता. तरी तिथे त्यांची हिस्टरी नि स्थिती पाहून त्यांना तातडीच्या उपचारांसाठी कॅज्युॲलिटीमध्ये घेऊन खूप माणूसकीने वागवण्यात आले.

सगळे संपले काही एक तासांतच पण डॉक्टरांचे सौजन्य वादातीत! या माणसाचे सगळेच वेगळे, वाचवायला गेलो तर ॲम्ब्युलन्स मिळण्यास अक्षम्य उशीर झाला, गेले म्हटल्यावर शववाहिका लगेच तयार होती... कसोटी लागली ती त्यांच्या मापाचे रॅपर मिळवण्यात... तब्बल दोन तास गेले म्हणे सव्वासहा फूट लांबीचा देह बसेल असे रॅपर जमवण्यात. बाबानी जाता जाता धाकटीला एकदमच करेजिअस बनवण्याचा चंग बांधला होता बहुतेक. तिथल्या दोन मदतनीसांना तो लांब-रुंद देह झेपेना तेव्हा ती तिसरी मदतनीस म्हणून पुढे सरसावली तशी त्यानी थक्क होऊन विचारले, भीती नाही वाटत? ती म्हणते त्या क्षणी कसली हे ही मनात आले नाही. तिने मी करत आले आहे त्यांचे आठवडाभर, ॲम्ब्युलन्समधूनही आलो आम्ही त्यांच्यासोबत असे सांगितले. पण आज तिला वाटते बहुतेक त्यानी भीती अचेतनाला शिवण्याची... असे विचारले होते... तेव्हा रात्री एक वाजत आलेला,.. एकदाचे यांना त्यातून पाठवून आपण शक्य तितक्या लवकर घरी पोहोचायचे आहे हा एकच विचार होता डोक्यात त्यामुळे काय करतोयपेक्षा लागेल ते करायचं असंच झालं... 

डॉक्टर भला माणूस अशासाठी की दिवसभर दवाखाने नि ॲंब्युलन्सना फोन करून हिचा फोन डिस्चार्ज झाला तेव्हा त्यानी तिने सांगितलेल्या नंबरवर स्वत:च्या फोनवरून निरोप दिला. लक्षण ठीक नाही तर घरी जाऊन गणपतीविसर्जन करून येणे भाग आहे म्हटल्यावर त्यानी तिला थांबवले नाही, अर्धातास स्वत: पेशंटशेजारी थांबेन, क्रिटिकल वाटले की करतो फोन असे सांगितले आणि त्याप्रमाणे केलेही. शववाहिका गेल्यावर दोघींना समजावले, तुम्ही जाऊ शकता स्मशानात, तसे डिटेल्स मी तुम्हाला देईन. पण इतक्या रात्री साडेबारा एक वाजता तुम्ही तिथे जावे असे वाटत नाही, ते काम हे कर्मचारीबंधू रोजच करतात, नीट करतील असा विश्वास ठेवा नि घरी जा. दीडवाजता त्या घरी पोहोचल्या तोवर आईचाच काय माझाही धीर सुटायला आला होता... 

दारातूनच तिने तिचा मोबाईल पडून फ़ुटलाय हे आईला दाखवले नि गेली शुचिस्नानाला. मी म्हटलं, किती दुर्दैव, आम्हाला काय करावे सुचेना, एक मोबाईल नीट असला असता तर विचारून कोणीतरी मदतीला पाठवू शकलो असतो, टेन्शन कमी झाले असते. तिने सहज सांगितले, तसं कसं? बाबा हिशेब चुकता न करता बरे जातील? मोबाईल वाजला की तो घ्यायला हात सरसावतात नि सर्जरी झालेय तर हालचाल नको व्हायला हाताची म्हणून हट्टाने मी त्यांचा काढून घेऊन सोबतच्या माणसाकडे ठेवायचा नि कामापुरताच त्याना द्यायचा असे त्यांच्या मनाविरुद्ध केले ना... त्यांनी पडल्यापडल्या केली जादू, गेला माझाही मोबाईल कामाच्या वेळी संपावर...

बाबांच्या मुलींनी त्यांचे तत्त्वज्ञान जगले आहे असे मनात आल्यावाचून राहत नाही. माणूस धट्टाकट्टा, सरस्वती मेंदूमध्ये वास करत होती नि स्वकष्टाने जोडलेली लक्ष्मी हातात. त्यांच्या शिक्षकांसह हे अनेकांचे मत. त्यामुळे कालपासून फोन येताहेत त्यात बहुतेक जण काकांच्या बुद्धिमत्तेने दीपून गेलेले, त्यांच्या शिकवण्याने करिअर घडलेले असेच आहेत. बहुविध क्षेत्रातील त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेबद्दल दुमत नाहीच. जीवनाचे तत्वज्ञान मात्र विचित्र होते त्यांच्या. पण नियतीने मृत्यूनंतरही साथ द्यावी इतके त्यांचे संचित होते.

बिनलग्नाच्या मुलींचे काही करायचे नसते, मेल्यावर त्यांना भडाग्नी देऊन जाळून टाकायचे असेच शास्त्रात लिहिलेय असे म्हणायचे. अलिकडेच मी आणि आईने देहदानाचा फ़ॉर्म भरलाय त्यामुळे माझ्याबाबतीत तरी त्यांना तसे काही करता येणार नाही. मी शिक्षिका म्हणून जगले तर मरणोत्तरही मेडिकलचे विद्यार्थी, ती मुलेच करतील त्या देहाचे काय त्याना हवे ते, असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी हे सगळे देहविच्छेदनवगैरे शास्त्राप्रमाणे नाही आणि पर्यावरणपूरकही नाही म्हणून त्यांना तसले काहीही चालणार नाही असा त्रागा केला. बायकोला तर मीच मंत्राग्नी देणार असे त्या भरात बोलून गेले. आमच्याघरी आमच्या तुलनेत आईबाबा सशक्त नि त्यांच्यामध्ये बाबा तर मजबूत. त्यामुळे कोण कधी जाणार हे कुणाला माहित असा विचारही त्यांना शिवला नाही. मी फ़क्त आपल्या देहाचे काय करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असे म्हटले. 

ते इंजिनिअर होतेच, अल्टरनेटीव्ह मेडिसिनचेही उत्तम उपयोजन करत. वैदिक संस्कृतही शिकलेले. संतवाङ्मयाची अभ्यासक म्हणून नाव कमावलेली पंडित आवळेकरांची शिष्या प्रा डॉ विजया तेलंग, आमची विजुमावशी, काल सांगत होती की तिला जी ज्ञानेश्वरी येते ती बाबांनी तिला चिद्विलासवाद समजून सांगितल्याने... हा म्हणजे मलाही धक्का होता... गणिती म्हणजे हायर मॅथेमॅटीक्सचे ॲप्लिकेशन्स त्यांच्याकडून शिकावे. शिवणकाम म्हणजे कोट-पॅंट अशा प्रोफ़ेशनल चीजा शिवण्यापर्यंत, स्वयंपाक म्हणजे पुरणा-वरणाचा किंवा मनात येईल त्या क्षणाला लाडू-बर्फ़ी करून खाणे, तसेच गवंडीकाम, लोहारकाम, सुतारकाम, बागकाम असे जगण्याला जे जे लागते ते ते सगळे त्यांना उत्तम दर्जाचे येत होते, त्याबाबत त्यांची तुलना करायचीच झाली तर माझ्या मनात हेन्री डी थोरोचेच नाव येते. 

कोणत्याही कामावर नेमलेल्या माणसापेक्षा यांची अक्कल जास्त, मग गड्याचे चुकले म्हणून वाद अशामुळे सर्व गोष्टी ते आजही लागतील तशा स्वत:च करत होते. या सगळ्यांत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, तशी कोल्हापूरला प्रथाच आहे मृतदेहाला गती देण्यात पुढाकार घेण्याची... त्यात हे पुढे. नातवाईकासाठी तर जातीलच, पण ओळखीतले, गल्लीतले कोणीही गेले की घरी सांगावा असे, मग रात्र-दिवस, सणवार असे काही नाही. ते लगेच काशीयात्रेला जाऊन येतो म्हणून निघायचेच. त्यांच्या शारिरीक उंचीला मॅचिंग जोडीचे मिळाले नाही तर त्यावेळेस खांदा देणे त्यांच्याकडे यायचे नाही. आल्यावर हे स्मशानगप्पा ऐकवणार... मला आणि आईला कसेसेच वाटायचे... म्हणजे अंत्ययात्रा हा काही नंतर बोलण्याचा विषय नाही, ते आवश्यककर्म म्हणून केले नि संपला तो विषय असे हवे. पण त्यांच्यामते एवढं काय त्यात? मेल्यावर लाकूड ते, जाळून यायचं... मडकं धरणार्‍याचा हात धरून कसं सगळं नीट शास्त्राप्रमाणे पार पाडलं हे सांगण्यात फार रस... मी तो विषय दु:खद आहे म्हणून टाळायचा असे म्हटल्यावर तर त्यांनी पुन्हा एकदा गीतेमधले काय काय उद्धृत करून मेलेल्या कोणाहीसाठी रडा-बिडायचे नाही, शांतपणाने गीतापठण करायचे हे अनेकदा वदवून घेतले होते. कधीतरी माझ्या प्रिय शिक्षकांच्या प्रस्थानानंतर मी प्रयत्न केला होता तसा पण तो पूर्णत्वास गेला नव्हता. काल बाबांची वेळ झाली तेव्हा मला नक्की डिटेल्स कळले नव्हते तरी ज्या घाईघाईत वंदनाने गणपती विसर्जन केले असे आईने सांगितले त्यावरून मी तयारी केली. मध्यरात्रीपर्यंत अगदीच न रडता असे म्हणता येणार नाही तरी धीराने संपूर्णगीतापठण केले. त्यांनी ते का सांगितले होते हे थोडेफार कळले असे त्या अनुभवावरून म्हणता येईल. 

स्वत:चे और्ध्वदैहिक वैदिकपद्धतीने व्हायला हवे आणि मुलगाच त्यांना गती देणार अशी समजूत असल्याने मुली हा काही त्यांच्यालेखी मोक्षास उपयुक्त विषय नव्हे :) नियतीने वंदनाला पुढे करून थोडी झलक दाखवली. सध्या सीपीआरमधून देह आला तर विद्युतदाहिनीतच मुक्ती असे मला वाटत होते. त्यामुळे वंदनाने चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो, त्यासाठी तयारीत असायचे असे म्हणत बाबांना जगवण्यासाठी टोकाची खटपट केली याबद्दल तिला सलाम केला, जे कोणी त्यांच्या आजारपणात झटले त्या अगदी दाहिनीपर्यंत त्यांची सोबत करणार्‍यांसह सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली नि सगळे संपले असे ठरवले. गीतापठण नि हा नमस्कार यात और्ध्वदैहिक संपले असे मला वाटले पण...

नियतीने मलाही झलक दाखवायचे ठरवले होते, किरण, बाबांचा आवडता नात्यातला हुशार मुलगा, तो किंवा खरे तर त्यांच्या घरातील सगळेच मदतशील आणि गुणी आहेत. बांबांवर अग्निसंस्कार करण्याची त्याची कमिटमेंट कोव्हिडकाळातही होती हे आम्हाला सकाळी त्याच्या फोनवरून कळले. विद्युतदाहिनीत नेले असते तरी तो पीपीई किट घालून तिकडे जाण्यास सिद्ध होता पण पहाटेपर्यंत वाट बघूनही त्याला निरोप मिळाला नाही... खट्टू झालेला तो सकाळी स्मशानभूमीत निदान अस्थी घेऊन पुढचे तरी करणारच म्हणून गेला तर आश्चर्याची गोष्ट किरणच्या हस्ते जे व्हायचे होते ते करून घेण्यासाठी तो देह अजून राख व्हायचा राहिला होता... आता तर आम्ही त्यात नसलो तरी तो त्यांचे रक्षाविसर्जन आणि काय काय करण्यासाठी आहे... शेकडो लोकांना निस्पृहपणे घाटावर पोहोचवून आलेल्या या माणसाला पोहोचवायला घरचे कोणी नसावे अशी काय ही परिस्थिती असे मनात आलेले, तो सल संपला...

नीट घर असावे, कपडे असावेत असे त्यांना वाटले नाही. पण लायब्ररी, टीव्ही, स्मार्ट फोन या चीजा ज्ञानार्जनासाठी गरजेच्या म्हणून होत्या. उत्तम पारंपरिक पदार्थ सणाला नि एरव्हीही करून खायची हौस असलेल्या या माणसाला शेवटच्या दिवशी उपाशी जावे लागले याचेच तेवढे दु:ख. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर ते गणपतीच्या आदले दिवशी दवाखान्यातून सुटले असते. दुसरी ठरली म्हटल्यावर, दवाखान्यात असलो तर काय झालं? डब्यातून मोदक पाठवा तीन-चार तरी, उगं नैवेद्य वाढल्यासारखं नको असे भाचेसुनेस म्हणालो आणि तिनं पाठवले, खाल्ले, दुसरी सूनपण संध्याकाळी पाठवू का म्हणाली तर दोन दिवसांनी पाठव म्हटलंय, इथंवर हौसेने फोन करून सांगितलेलं... मी म्हटलं त्यांना आवडतात तर लाडू वगैरे करवून घेूऊ म्हणजे दवाखान्यात खातील तर त्यावर मला कळलं की ऑलरेडी किरणच्या बायकोने आणि आईने डिंकाचे, रव्याचे लाडू, चिवडा, चकली असे सगळे पाठवले आहे आणि ते हौसेने त्यातून खातात. सुनांनी पण डब्यातून काय पाठवू ते सांगा म्हणून विचारलं, शेजारी बसून भरवलं, काही नाही म्हटलं नाही हे त्यांचं भाग्य. त्यांच्या घरातील अनेक ज्येष्ठांचा त्यानी कर्तव्यभावनेने प्रतिपाळ केला त्यात 102 वर्षे जगून अगदी दोनेक वर्षांपूर्वी गेलेले त्यांच्या मामीचे भाऊ ही होते. ती त्यांची पुण्याई फळली असावी...

किरणच्या सगळ्यात धाकट्या चुलतभावाचे नाव चारूदत्त हे त्यानी हौसेने ठेवलेले. त्याला तर ये म्हणून त्यानी दवाखान्यातून फोन केला तर गावाला गेलेला तो पाऊस म्हणूनसुद्धा न थांबता गाडीवरून दवाखान्यात हजर. अतिविद्वान आणि चार माणसांसारखे संसारात राहण्याची सवयच नसलेल्या या माणसाचे बोलणे अर्थातच आग्रही, तिरसट असे. तरी उत्तम चारित्र्य या एका गुणामुळे शेवटपर्यंत त्यांना माणसांची कमी पडली नाही. 

बाबांच्या मालकीची अनेक घरे आणि दुभत्याचा धंदा त्यांच्या आवडीचा असूनही आमच्या नशिबी आईच्या पगारात बसेल त्या भाड्याच्या घरात राहणे आणि दुकानातले दूध असेच होते. लौकिकार्थाने त्यांनी आम्हाला काय दिले? यावर, बाबांच्या ज्ञानाचा प्रकाश इतरांना आणि त्यांच्या दीप्तीची झळ आम्हाला असे तू कितीही म्हणालीस तरी सरासरीपेक्षा पुष्कळच चांगल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण आपल्या क्षेत्रात टिकून आहोत, पटले नाही तर पटत नाही हे सांगण्याची आपल्यात धमक आहे, भरपूर गोष्टी, कला, विद्या सहज आत्मसात होत असल्याने आणि त्याहीपेक्षा ऐहिकाचा सोसच नसल्याने अमूकच इतक्याच पगाराचीच नोकरीच टिकवलीच पाहिजेच असेच काहीच नाहीच. या आणि अशा अनेक चीजा रामचंद्र साळगांवकर जीन्समधून आपल्याला मिळालेल्या आहेत त्या त्यानी देऊ म्हणता दुसर्‍या कोणाला देता येणार नव्हत्या त्यांना... त्या चीजांसाठी आपण त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे, इति वंदना. 

अतिपारंपरिक विचार, घरच्यांचे ऐकून बायकोचा छळ किंवा मुलगाच हवा असा अट्टाहास, कोर्टप्रेम या नि अशा दोषांपायी त्यांच्यासारख्या बहुगुणसंपन्न मनुष्यास साधा संसार करता आला नाही. एका बुद्धिमान, सालस आणि खेळाडू स्त्रीच्या सर्व स्वप्नांना लग्नाने चूड लागली. तरी आईने त्यांना केव्हाच क्षमा केली आहे, त्यांच्या धाकट्या लेकीनेही... माझ्याकडे त्या दोघींइतका मोठेपणा नाही. आईने कैक वर्षे स्वत:चे आयुष्य पणाला लावले, वंदनाने बाबांच्या बहुतेक पहिल्या नि शेवटच्या ठरलेल्या दुखण्यात... त्या दोघींना सलाम म्हणून मला मोठे बनायचे आहे. मरणान्तानि वैराणि हे बाबांच्या लाडक्या गीतेतले वचन स्मरून त्यांच्या मला न आवडणार्‍या अतिरेकी गुणांशी असलेले माझे वैर मी आज मिटवून टाकले आहे. बाबांचे चांगले गुण घेऊन त्यात आपल्याकडचे चांगले मिसळून ते पुढे नेऊया...  

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि हे त्यांचे आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान मी चारूदत्तला सांगितले तसे ते माझ्यासह सर्व वाचकांसाठीही आहे.  बाबा याच जन्मी संसारातून मुक्त होते, त्यांच्या अढळ श्रद्धेनुसार ते त्यांच्या लाडक्या भगवंताकडे पोहोचले असतील... आत्म्याच्या अविनाशित्वावरच्या बाबांच्या श्रद्धेचा आदर म्हणून कोणीही त्यांच्यासाठी श्रद्धांजली, सहवेदना, सांत्वन अशासारख्या भावना प्रकट करू नयेत अशी नम्र विनंती. जगाचे मला माहिती नाही पण ते ज्यांच्या सहवासात आले त्यांना तरी सभोवतीचा सरासरी बुद्ध्यांक कमी झालाय हे नक्की जाणवणार आहे, ती कमी भरून काढण्यासाठी आपण ज्ञानाची साधना करूया. 

सर्वे भवन्तु सुखिन:। सर्वे सन्तु निरामया:।
-अंबुजा
28/09/2020

#देव आनन्द । DevAnandDevAnand l26.09.20

*आज २६ सप्टेंबर* 
*आज सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देव आनंद यांचा जन्मदिन.*
जन्म.२६ सप्टेंबर १९२३
देव आनंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख बलराज साहनी, बी. आर. चोपडा, आणि खुशवंत सिंह या भविष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींशी झाली.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून पदावर नोकरी सुरू केली. सैनिक आणि त्यांचे नातलग यांच्यातील पत्रव्यवहार तपासणे आणि पत्र योग्य पत्त्यावर लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे काम होते. अल्पावधीतच नोकरी सोडून त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. प्रभात कंपनीच्या हम एक है मधून चित्रपट सृष्टीतली कारकिर्द सुरू करणा-या देव आनंद यांना आधी मोठे अपयश पचवावे लागले. हम एक है आपटला. पुढे देव आनंद यांच्याच नवकेतन कंपनीचा अफसर हा चित्रपट देखील पडला. पण या अपयशाने न डगमगता चित्रपट सृष्टीत पाय रोवून उभ्या राहिलेल्या देव आनंद यांचा बाजी हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर उत्तरोत्तर देव आनंद यांनी अनेक छान चित्रपट दिले. हम एक है, अफसर, बाजी, मुनीम जी, दुश्मन, कालाबाजार, सी. आय. डी., पेइंग गेस्ट, गॅम्बलर, तेरे घर के सामने, काला पानी, जाल, गाइड, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम, हरे रामा हरे कृष्णा, हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर, हम दोनो आणि ज्वेल थीफ हे देव आनंद यांचे निवडक चित्रपट कायमच चर्चेचा विषय राहिले. देव आनंद यांची हम एक है चित्रपटाचे काम सुरू असतानाच गुरुदत्त यांच्याशी एक कॅमेरामन म्हणून ओळख झाली होती. पुढे ज्येष्ठ बंधू चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अफसर चित्रपट पडल्यावर देव आनंद यांनी गुरुदत्त यांनाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणले. नवकेतन कंपनीसाठी गुरुदत्त यांनी बाजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर गुरुदत्त यांनीच देव आनंदसाठी जाल चित्रपटाचे दिग्दर्शन केले. जाल चित्रपटानंतर मात्र गुरुदत्त यांनी फक्त स्वतःच्या कंपनीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि देव आनंद यांच्या नवकेतन कंपनीच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय आनंद यांच्याकडे आली. देव आनंद यांचे धाकटे बंधू विजय आनंद यांनी काला बाजार, तेरे घर के सामने, छुपा रुस्तम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याच काळात देव आनंद आणि सुरय्या विवाहाची चर्चा सुरू झाली. चित्रपट सृष्टीत वावरणा-या देव आनंद यांनी अभिनय आणि चित्रपट निर्मिती सोबतच पटकथा लेखन करण्याचाही प्रयोग केला. आंधिया, हरे रामा हरे कृष्णा , हम नौजवान, अव्वल नंबर, प्यार का तराना, गँगस्टर, मै सोलह बरस का, सेन्सॉर या चित्रपटांसाठी देव आनंद यांनीच पटकथालेखन केले. हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर अशा निवडक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. अफसरच्या निमित्ताने देव आनंद-सुरय्या जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसली होती. तेव्हापासूनच देव आनंद सुरय्याच्या प्रेमात होते. पुढे एका शूटिंगच्या वेळी नाव उलटली त्यावेळी देव आनंद यांनी बुडणा-या सुरय्या यांना वाचवले होते. त्यामुळे आता लवकरच विवाह सोहळा होणार असे वाटत होते. पण सुरय्या आजीने तीव्र विरोध केल्यामुळे हे लग्न झाले नाही. अखेर देव आनंद १९५४ मध्ये चित्रपट अभिनेत्री कल्पना कार्तिक हिच्याशी विवाहबद्ध झाले. देव आनंद यांनी अनेक नव्या अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत आणले. हरे रामा हरे कृष्णा मधून झीनत अमान चित्रपटसृष्टीत आली. टीना मुनीम, नताशा सिन्हा, एकता यांना देखील देव आनंद यांनी चित्रपटसृष्टीचे द्वार खुले करुन दिले. 
संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्या् त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दा ऑँचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली. देव आनंद यांना काला पाला सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर फिल्मफेअर पुरस्कार १९५० व गाइड सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर, फिल्मफेअर पुरस्कार १९६५ साली मिळाला. मा.देव आनंद यांना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार व पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. देव आनंद यांचे ३ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले. देव आनंद यांना आदरांजली
*सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
_________---___________

*असा होता देव आनंद - शिरीष कणेकर*

देव आनंदपेक्षा खूपच चांगले असलेले अभिनेते त्याही काळी होते व आजही
आहेत, पण इतका वक्तशीर, साधा, प्रामाणिक, जमिनीवर पाय असलेला व माणूसपण
जपणारा एवढा मोठा स्टार आपण पाहिलेला नाही. आयुष्यभर तो छोट्या फियाट
गाडीतून आणि तेही ड्रायव्हरच्या शेजारी बसून फिरला. घरचा टेलिफोन नंबर तो
बिनदिक्कत डिरेक्टरीत छापत होता व तो फिरवला की, तो चिरपरिचित आवाज ऐकू
यायचा ‘देव हिअर.’ सेक्रेटरी नावाची गोष्ट त्याच्या जीवनात नव्हती.
भक्तांना लांब ठेवणारा व दूर लोटणारा हा देव नव्हता. देव आनंदला गाठणं
इतकं सोपं असेल हे त्याच्या असंख्य चाहत्यांना कधी कळलंच नाही. देव
आनंदपर्यंत पोहोचणं अशक्यप्राय असणार अशा समजुतीतच ते राहिले.
असा होता देव आनंद!

‘देस परदेस’च्या ‘प्रेस शो’नंतर ताजमहाल हॉटेलात झालेल्या पार्टीत मी देव
आनंदला प्रथम भेटलो. मी आपणहून त्याच्या जवळ जायला धजावलो नाही. त्याच्या
देखणेपणाच्या सौम्य आगीत मी होरपळून जाईन अशी मला भीती वाटली. मी बुजुर्ग
पत्रकार राम औरंगाबादकर याला माझी देव आनंदशी ओळख करून द्यायला सांगितली.
औरंगाबादकर एक वल्ली होती. त्याच्या गळ्यातल्या बॅगेत त्याने एक हात
मधुबालाच्या व एक मीनाकुमारीच्या गळ्यात घातलेला फोटो कायम असायचा.
अधूनमधून तो फोटो काढून दाखवायचा व आमच्या डोळ्यांतील असूया पाहून आनंद
घ्यायचा.
‘‘अरे, देवला ओळखत नाहीस तू?’’ त्याने त्याच्या चिरकणार्‍या आवाजात विचारले.
‘‘मी ओळखतो हो त्याला.’’ मी वरमून म्हणालो, ‘‘तो मला ओळखत नाही.’’
‘‘अरे!’’ राम औरंगाबादकरला नक्की कशाचं आश्‍चर्य वाटत होतं कळत नाही.
त्यानंतर त्याने जे केलं ते तोच करू जाणे. ‘देव कम हिअर’ तो ओरडला.
माझ्या छातीत धस्स झालं. मी वॉचमनलाही असं बोलावू शकलो नसतो. अर्थात पं.
नेहरू देशाचे पंतप्रधान असताना ब्रॅबॉर्न स्टेडियमवरील कार्यक्रमात
त्यांना राम औरंगाबादकरने ‘नेहरू’ अशी हाक मारली होती. मग तिथे देव
आनंदचा काय पाड!
देव आनंद त्याच्या दुडक्या चालीने आज्ञाधारकपणे आला. मला काय बोलावं ते
सुचेना. स्वाक्षरी तर घ्यायचीच होती, पण माझ्याकडे कागदाचा कपटाही
नव्हता. देव आनंदला तिष्ठत ठेवून कागद शोधायला जाणं शक्य नव्हतं. माझ्या
बॅगेत राज कपूर व मधुबालाचे फोटो होते. त्यातला मधुबालाचा आकाशाच्या
पार्श्‍वभूमीवर ओढणी फडकवत हसणारा फोटो काढीत मी देवला आशाळभूतपणे
विचारले, ‘‘यावर स्वाक्षरी करणार?’’
त्याने फोटोकडे पाहिले व तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘‘क्या बात कर रहे हो
यार! एखाद फोटो और होगा तो मुझे दे दो.’’
झटक्यात पेन सरसावून त्याने मधुबालाच्या फोटोवर स्वाक्षरी केली व वर
लिहिले ‘मे हर सोल रेस्ट इन पीस.’
असा होता देव आनंद!

मी सकाळी नऊ वाजताची त्याची ‘अपॉइंटमेंट’ घेतली होती. तो वेळेच्या बाबतीत
किती काटेकोर आहे हे माहीत असल्यामुळे मी पावणेनऊ वाजता आनंद रेकॉर्डिंग
सेंटरला पोहोचलो. मी तळमजल्यावरच्या ‘फॉयर’मध्ये त्याची वाट बघत बसलो.
त्याचा कोणीतरी माणूस मला शोधत व माझं नाव पुकारत आला. त्याने देव आनंदचा
निरोप आणला होता, - ‘‘देवसाहेबांनी सांगितलंय की, त्यांना थोडा उशीर
होईल. तुम्ही थांबा.’’
त्या माणसापाठोपाठ पाचच मिनिटांनी देव आनंद आला. तो तोंडानं ‘सॉरी -
सॉरी’ म्हणत होता. कशाबद्दल? पाच मिनिटे उशीर झाल्याबद्दल? तेही आधी
माणूस पाठवून सांगितल्यावर?
या भरतभूमीत एक सुपरस्टार पाच मिनिटे उशिरा येण्याला उशीर म्हणतो हे
गोविंदा प्रभृतींना सांगा. त्यांची हसून हसून मुरकुंडी वळेल.
असा होता देव आनंद!

‘‘अपयशानंतर नैराश्य येत नाही का?’’ एका भेटीत मी देव आनंदला विचारलं होतं.
‘‘येतं तर!’’ देव म्हणाला, ‘‘शेवटी मीदेखील माणूसच आहे. अपयशानंतर जरूर
खचून जायला होतं, पण अल्पकाळ. मग नवीन कलाकृती तयार करण्याच्या कल्पनेनं
नखशिखांत थरारून जातो. कुस्तीत खाली पडलेला पहेलवान जसा त्वेषाने
तिरीमिरीत उठून प्रतिस्पर्ध्याला भिडतो तसं माझं वागणं असतं. यश आणि अपयश
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी यशानं कधी उन्मत्त झालो नाही आणि
अपयशाने खचून जाऊन बाटलीत दु:ख बुडवत बसलो नाही. गुरुदत्त माझा दोस्त
होता. मोठा कलावंत. पण त्याचं काळीज सशाचं होतं. तो अपयश पचवू शकला नाही.
या इंडस्ट्रीत तुम्हाला खूप खोटी माणसं सापडतील. ती नेहमी इंडस्ट्रीच्या
नावानं शंख करीत असतात. छाती पिटून गळे काढीत असतात. बेटे लोटे घेऊन या
मुंबईत, या फिल्म इंडस्ट्रीत आले. इथे गडगंज कमावलं व जिनं एवढं भरभरून
दिलं त्या इंडस्ट्रीच्या नावानं ठणाणा करतात. चित्रपट काढणं हा एक
रोमांचकारी खेळ आहे. हरण्याची ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी
खेळण्याच्या फंदात पडू नये. कुठेतरी दहा ते पाच नोकरी करून एक तारखेला
निमूटपणे पगार घ्यावा. मी खूप पैसा घालवला, पण मी काही गमावलं असं मला
वाटत नाही. पैसा - पैसा काय चीज आहे? मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या खिशात
अवघे तीस रुपये होते. आज माझी एवढी करीअर झाली. एवढ्या चित्रपटांत मी काम
केलं. एवढे चित्रपट निर्माण केले. एवढी माणसं जोडली. लाखो चाहते मला
मिळाले. मी गमावलं काय? काहीच नाही. आज माझ्याकडे स्वत:चा बंगला आहे,
स्वत:ची गाडी आहे, स्वत:चं ऑफिस आहे, स्वत:चा स्टाफ आहे. तीस रुपड्या
घेऊन मुंबईत आलेल्या एका फाटक्या माणसाला आणखी काय हवं...’
असा होता देव आनंद!

दिलीपकुमार, राज कपूर व देव आनंद हे समकालीन सुपरस्टार होते, पण सैगलची
नायिका खुर्शीद हिच्याबेराबर काम करणारा (चित्रपट ‘आगे बढो’) हा देव आनंद
एकटाच. टीना मुनीमपर्यंत नायिकांचा तो नायक झाला.
‘रसरंग’ने एकदा देव आनंद विशेषांक काढला. एका मराठी चित्रपट
नियतकालिकाच्या या कृतीची देव आनंदने पत्र लिहून आवर्जून दखल घेतली. हा
विशेषांक पुन्हा छापावा लागला.
असा होता देव आनंद!

राज कपूरविषयी चांगलं बोलणारी किंवा नुसतं खुलून बोलणारी नायिका सापडणं
अवघड होतं. नर्गिसला तर त्याने चित्रपटांमागून चित्रपटात फुकट राबवून
घेतले. देव आनंदचे मात्र त्याच्या सर्व नायिकांशी जिव्हाळ्याचे संबंध
होते. त्या त्याच्याविषयी उमाळ्याने व भरभरून बोलतात. चित्रपटाची कथा
किंवा पटकथा न ऐकता देवच्या एका फोनवर जाणारी हेमा मालिनी होती.
‘‘तुझे तुझ्या सगळ्या नायिकांबरोबर इतके सलोख्याचे संबंध कसे?’’ मी
त्याला एकदा विचारले.
‘‘का नसावेत?’’ देव उसळून म्हणाला, ‘‘मी त्यांना फसवत नाही. त्यांचा
गैरफायदा घेत नाही, त्यांना सन्मानाने वागवतो, चित्रपट संपल्यावरही
त्यांच्या संपर्कात असतो. साहजिकच आमचे उत्तम संबंध आहेत.’’
असा होता देव आनंद!

एकदा मी त्याला त्याच्या तंदुरुस्तीचं रहस्य विचारलं. ‘‘रहस्य काही
नाही,’’ तो नेहमीच्या प्रसन्नपणे म्हणाला, ‘‘मी अतिरेकी वागत नाही.
प्यायलो तरी उगीच उष्टावल्यासारखा पितो. पार्ट्यांना सहसा जात नाही. खा
खा खात नाही. सकाळी ब्रेकफास्ट घेतल्यावर जेवण हवंच असा माझा आग्रह नसतो.
एखादं सफरचंद किंवा केकचा तुकडा यावर माझं भागतं. आमच्याकडे काही
मंडळींना चिकन लागतं. तेही ठराविक हॉटेलातलं. माझे असले काही चोचले
नसतात. तसा मी साधा माणूस आहे. माझ्या छोट्या फियाटमधून मी फिरतो.
मोटारीच्या आकारावर कलावंताचं मोठेपण ठरतं असं मी मानत नाही. माझ्या गरजा
फार कमी आहेत. मला काहीही चालतं. कुठंही बैठक मारून बसायची आणि आडवं
व्हायची माझी तयारी असते. नो हँग अप्स, यू सी!’’
‘‘थोडक्यात, चॉंदनी मिली तो हम चॉंदनी मे सो लिये’’ असंच ना?’’ त्याच्याच
तोंडच्या गाण्याची एक ओळ मी बोललो.
‘‘अगदी!’’ देव खुषीत म्हणाला, ‘‘लेकिन चॉंदनी नही मिली तो भी निंदिया
रानी हमसे दूर नही भागती जनाब! ‘दर्द भी हमें कबूल, चैन भी हमें कबूल.
हमने हर तरह के फूल हारमें पिरो लिये’’.
असा होता देव आनंद!

सकाळी फोन वाजला. माझ्या शाळकरी मुलाने घेतला.
‘‘पपा, तो म्हणतोय की तो देव आनंद बोलतोय.’’ तो भेदरलेल्या चेहर्‍याने म्हणाला.
तो देव आनंदच होता.
‘‘आपलं दुपारी अडीच वाजता भेटायचं ठरलं होतं. झालंय काय, माझे काही
दिल्लीचे वितरक आलेत. ते आजच्या आज परत जाणार आहेत. आपली भेट आपण अर्धा
तास पुढे ढकलली तर चालेल का? अडीचऐवजी तीन. नसेल जमत तर राहू दे. मी
त्यांना नंतर बोलवीन.’’
असा होता देव आनंद!

एका भेटीत तो मला म्हणाला, ‘‘कुठे आहेस तू? पत्ता काय तुझा? परवाच मी
तुझी ज्योती व्यंकटेशकडे आठवण काढली होती. कसे चाललेत तुझे एकपात्री
कार्यक्रम?’’
माझ्या गळ्यात आवंढा आला. मी कोण? त्याने कशासाठी माझी आठवण काढायला हवी?
कशासाठी माझ्या कार्यक्रमांची आठवण ठेवून चौकशी करायला हवी?...
असा होता देव आनंद
असा देव आनंद गेला!
शिरीष कणेकर
______________
.#cinemagully
देवानंद -आनंद घराण्यातला देव ..सिनेमातला.. देव पुरुष..
 गम और खुशी न महसूस हो जहां...मै दिल को ऊस मुकाम पे लाता  चला गया.. वाह आणि आह... किती उच्चं पातळी वरचे  शब्द आणि गाणे .. गीतकाराला सौ  सलाम.. आणि हे एवढ्या बेफिकिरीने गाणारा देव ..खरेच इतक्या उच्चं पातळी वर पोहोचला होता काय?? उत्तर आहे. हो आणि नाही..फिल्मी  कारकीर्द  जीवनात म्हणाल तर  होय तो या पातळी वर होता.. 
देवला माझ्या एका गुजराथी पत्रकाराने पत्रात लिहिले  होते. देवानंदजी.. तुम्ही म्हणता मी नेहमी वर्तमानात जगतो.. जो बित गया सो बित  गया  असे मै भुलता चला गया ..मै पिछे मूड  के नही देखता..बस आगे आगे  चला जाता  हुं......
 ठीक आहे .. पण एक संवेदन शील कलाकार म्हणून  आपल्या जीवनातले गोड...कटू.. आनंदचे प्रसंग  सफलतेचे घटना प्रसंगाची आठवण करणार नाही का?क्या अप अपने को जलकमल कि तरह स्थितप्रद्न्य समजोगे.... आपना बीता हुवा समय को भी याद न करोगे ? 
पण तो देवानंद  होता ..त्याने अखेर पर्यंत हा जो बित  गया उसको भुलाता चला गया .. बाणा जपला होता.  देव कधी हि जुन्या आठवणीत रमला नाही  कि त्याची खंत व्यक्त केलेली  समरणात नाही .बस .. जिंदगी का साथ निभावत तो पडद्या वरून आणि आपल्यातून हि   निघून गेला होता . 

आज त्या देवानंद च्या काही खास खासियत ( वैशिष्ट्ये )आणि आठवणी.. .
देव ला काळा  सूट शर्ट घालण्यास फिल्मी बंदी होती.. कारण त्यात तो इतका देखणा दिसायचा कि तरुण मुली त्याला त्यात पाहून इमारत वरून उडी  मारायचा  प्रयत्न करीत असायच्या..( टेक्सी ड्रॉयव्हर चित्रपटात तो काळ्या सूट मध्ये दिसला आहे )  देवानंदला चित्रपटात बहुतेक सर्व गायकांनी आपला आवाज दिला आहे . जी एम दुराणी  हेमंत कुमार पासून ते मण्णाडे..रफी सुबीरसेन पर्यंत .( ज्वेल थीफ मध्ये   भूपेंद्र यांनी तर रूप कि राणी चोरो का राजा.. मध्ये महेंद्र कपूर यांनी गाणी गायली आहेत... एक आस्चर्यची बाब  सांगतो..देवचा  'मंझिल'  चित्रपटात तर   हेमंत कुमार मन्नाडे आणि रफी या तिघांनी गाणी गायली आहेत.असे खूप कमी वेळा घडत असते पण देव च्या बाबतींत सर्व  अनाकलनीय.
देव ची स्टाईल..कपडे.. हेर स्टाईलआणि लोकप्रियता साठीच त्या काली खास दृश्य लिहिली जात असत. सी आय दि चित्रपट लंकेपहला पहला प्यार..गाणे बघा ..मुंबई मरीन लाईन्स  समुद्र किनाऱ्यावर  खास देवाची चाल ( चालण्याची स्टाईल )  दाखविण्या साठीच चित्रित करण्यात आले आहे.. तीन देविया तर खास देवाची तरुणी मधील क्रेझ  मॅनेरिज्म स्टाइल वटविण्या साठीच बनला होता होता.  देव स्त्रियांचा देव पुरुष म्हणून  दाखविला आहे.. आणि हा चित्रपट सफल हि होता ..कारण  दर्शक देवचा अभिनय नाही तर र्त्याची स्टाईल बघायला जात असायचे देव आनंद . इंग्रजीत याला नार्सिसिस्ट म्हणतात असा होता ( स्वतःच्या प्रेमात पडलेला माणूस)..
दुनियाभरच्या वेगवेगळ्या टोप्या,हेट घालण्याचा भलताच शौकीन होता. ( फक्त डोक्यावर मुकुट एकदाच घातला आहे..'इन्सानियत' चित्रपटात )
 एक मात्र खरे आहे.गोल्डी ( विजय आनंद ) असला कि देवाचे असले सर्व नखरे  स्टाईल चालायचे नाही.( विजय आनंदचे लहानपणी केस सोनेरी होते म्हणून त्याला गोल्डी म्हणत असत )  सरळ आणि अभिनय करणारा देव पाहायचा सेल तर गोल्डीच्या 'तेरे मेरे सपने ' बघा. गाईड मध्ये देवचे सर्व नखरे नव्हते कारण गोल्डी समोर होता.
 गाईड.. देवआनंद चे फिल्मी पून:रुज्जीवन. देवच हा पहिला रंगीत चित्रपट.पूर्ण चित्रपटभर देवचे बहुतेक शर्ट भडक रंगाचे आहेत. पण तमाम शर्टाची फिटिंग आणि शिलाई आवर्जून दृश्य फ्रीज करून बघावे अशी आहे.सगळेच शर्ट देवला खूप शोभून दिसले आहेत.देवाच्या प्रत्येक चित्रपटात नायिकेला बाहुपाशात घेतानाच दृश्य पाठीमागून आपले खांदे दिसतील असे घेण्याचा त्याचा आग्रह असायचा. आणि देवानंद चे खांदे होते ही सुंदर. कुठले कपडे आपल्याला शोभतील याचे भान त्याला होते . त्या काळी चेक्स असलेली कलर फुल पेंट घालणार एक मात्र देवच होता. शम्मीकपूर,राजकपूर सारखे  त्याने  आपला लोकप्रिय केश कोंबडा कधीही त्याने ढळू दिला नाही.
भडक रंगाचे शर्टाचे कॉलर उभे आणि फुल बाहीचे शर्ट ( अर्धी बाहीचे शर्ट  फार कमी घातले आहेत )   त्याचा केश कोंबडा उभा करायला त्याच्या हर ड्रेसरला फार वेळ लागत असायचा  खास शूटिंग मध्ये ते विस्कटले जाऊ नये म्हणून फार काळजी घेतली जात असे  j जेलीने केस चिकटवून वारंवार हेर स्प्रे करावा लागत असायचा. लक्ष्यात आले असेल तर .. देवचे कपाळा वर  केस पसरले आहेत असे शॉट तुम्हाला बघायला मिळणार नाही ( जॉनी मेरा नाम नंतर मात्र हेरस्टाईल बदलली होती.) 
देव ने नर्गिस बरोबर काम केलेले आठवत नाही.( कुणाला आठवत असेल तर लिहा ) पत्नी मोना सिंघा( सिंह किंवा सिंग नाही) कल्पना कार्तिक यांनीही देव शिवाय इतर  हिरो बरोबर  काम केलेले आठवत नाही..मात्र सुनील दत्त नर्गिस बरोबर   देव चे घरगुती i कसम्बन्ध होते. सुनील दत्त मित्र म्हणून मुलाचे नांव सुनील असे ठेवले होते. 
असे तर देव चा  पाली हिल येथील  स्टुडियो  आणि दिलीपकुमार यांच्या बंगल्यात अंतर करणारी  मात्र एक छोटीसी अरुंद गली आहे.. पण  दिलीप  बरोबर हाय हलो करण्याचे साधे संबंध देवानंद चे नसायचे अलबत दिलीप ने आपल्या आत्मकथेत देवचे खूप कौतुक केले आहे.कि आमच्या खान परिवारात  देव फार प्रिय होता.तो कधी घरी आला तर माझ्या सर्व बहिणी त्याला बघायला उतावळ्या होत असायच्या.वक्त वक्त कि बात है ..देव चित्रपटात आल्या पासून फक्त अशोक कुमार यांना खूप मान देता असायचा. अशोक कुमार पेक्षा जस्ट उत्तम अभिनेता तो कुणालाही मानीत नसे..स्वतालाही नाही...      
-ननावरे वामनराव
_____________----________

#cinemagully
आमचा देवानंद विदेशी चित्रपटात अभिनय करून राहिला...पण. अरेरे!.. आम्ही नाही पाहिला..
देव आनंद चैत्यन्याचा रुपेरी झरा अशा वैशिष्ट्याने पडद्यावर वावरलेल्या देव आनंद. त्यांनी आपल्या अजरामर भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले. देव आनंद यांची रुपेरी वाटचाल खूपच मोठी आहे. प्रभातच्या 'हम एक है' (१९४६) पासून नवकेतनच्या ‘जाना जा दिलसे दूर’ पर्यंत (२०१० हा चित्रपट अप्रदर्शित.) देव आनंद सतत दोन पिढी च्या मनावर राज्य करीत राहिला.
अर्थात १९८० नंतरच्या देवची आणि त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीची दखल घेण्याचं कारण नाही.कारण तो सगळा देव नावाच्या सिनेमावेड्या माणसाचा वेडा कारभार होता.'चार्जशीट' (२०११) हा त्याचा त्यानेच दिग्दर्शित केलेला व प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट..ह्याच देव आनंदने विदेशी हॉलिवूड च्या चित्रपटात प्रमुख नायकांची भूमिका केली होती..माहित आहे काय?
साल १९७०. नवीनच लंडन रिटर्न सिने क्षेत्रात आलेली झीनत अमानला देव ने त्याच्या नवीन एक हिप्पी संस्कृती विषय वर बेतलेला चित्रपट 'हरे राम हरे कृष्ण' साठी करारबद्ध केली होती.हा चित्रपट सुरु होण्या पूर्वीच योगायोगाने त्याच सुमारास हॉलिवूड चित्रपटाचा आकर्षक प्रस्ताव आणि प्रमुख नायक म्हणून देवला एक प्रस्ताव आला. देव आनंदने तो स्वीकारला. लगेच आपली नवीन नायिका हिला आणखी प्रसिद्धी मिळावी आणि आपला सिनेमा गाजावा.या दूरदर्शी विचाराने देव ने झीनत अमानला त्यात मुख्य नायिका म्हणून घेण्याची अट घातली आणि ती मान्यही झाली.
आणि मग..'हरे राम हरे कृष्ण '(१९७१) या चित्रपटा आधी देव आणि झीनत ही जोडी एकत्र हॉलिवूडचा प्रसिद्ध 20th Century Fox निर्मित 'ध ईवील वीथीन' (THE EVIL WITHIN ) नांव असलेल्या चित्रपटात पडद्या वर झळकले होते. 'केयू चिन्ह' नावाची' प्रसिद्ध व्हिएतनामी नायिका समोर झीनत अमान ची प्रमुख भूमिका होती.
चित्रपटाचे दिगदर्शक होते..Lamberto V. Avellana. मुळात हा एक अपराध कथा वस्तू ( Crime Thriller.माफिया ड्रग सप्लाय सम्गलर आधारित हा फिलिपाइन्स चित्रपट असला तर इंग्रजी भाषेत होता.नंतर तो फिलिपाइन्स भाषेत डब करण्यात आला होता.( “Passport To Danger” असे चित्रपटाचे एक अतिरिक्त नांवही रजिस्टर करण्यात आले होते ).
आशचर्य आणि कौतुकाची बाब म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरणा साठी देवचे आवडीचे आणि नेहमीचे सिनेमॅटोग्राफर 'फली मिस्त्री' यांची निवड झाली होती
दुर्दैवाने हॉलीवूडचा हा भारतीय- हॉलिवूड असा महत्वाचा प्रयोग यशस्वी झाला नाही.. आणि देव आनंदचे लाखो भारतीय चाहते तो चित्रपट बघण्या पासून वंचीत राहिले.चित्रपट 'फ्लॉप' झाला होता..कारणाने तो भारतात प्रदर्शित करण्यात आलाच नाही.
आणि अश्या प्रकारे भारतीय सिनेमाच्या दंतकथा समान अभिनेत्याच्या कारकीर्दला एक रुपेरी झालर किनार चकाकताना पाहायची थोडक्यात राहिली.
आजची स्पॉट लाईट = स्वतः देवने या चित्रपटाचा कधी कुठेच उल्लेख केलेला नाही..इतका तो बेकार दर्जाचा चित्रपट होता. भारतात न प्रदर्शित करण्याबाबत देव च पुढ होता.
================
आजची स्पॉट लाईट = देवआनंद चा ब्लॅक न व्हाईट शेवटचा चित्रपट 'कही और चल (१९६८)..आणि हो अमरीशपुरी यांना प्रथम ब्रेक दणारे हि आपला देवच ( प्रेम पुजारी)... देवआनंदच्या फिटनेश चे रहस्य काय ? तर आपल्या तिसऱ्या मजला वर ऑफिसात हा  माणूस कधीही लिफ्ट ने जात नाही..नेहमी जिने चढून जात असायचा..असे मला त्याच्या लिफ्टमेंन मराठी दादाने सांगतले होते 
-वामनराव ननावरे
_____-----______________

#Repost

देव. आनंद. कसलं भारी नाव घेऊन आला हा माणूस. आणि मेन म्हणजे त्या नावाला जागला. आनंदाचा देव. स्वामी दादा... पासून जाऊद्या 😀 हो पण लूटमार पर्यंत ठीक होता. देव साठी मी तरी बघेन. खरं म्हणजे *वॉरंट* पासून हा हिरो माहीत झाला मला नीटसा. त्याचा एक फोटो होता एका पेपरात. एक पाय मोडून, गुडघ्यावर बसून दोन्ही हात क्रॉसड. आणि दोन्ही हातात पिस्तुल. ती दिवाळी मी दोन पिस्तुलांनीच खेळली. आणि त्याचं ते गाणं *रुक जाना ओ जाना*...सॉलिड.

घरी तर त्याचे फॅन्स होतेच मग हळूहळू कळलं. बरेच फॅन्स आहेत. जिस किसी चेहरेको देखू उसपर इस देव की रहमत साफ झलक रही थी. (हे त्याच्यासारख म्हणायचं, देखू.. ला स्प्रिंग लावलेल्या बाहुलीसारखी मान हलवत) कुणी "तू कहा ये बता" म्हणत घरंगळायच, कुणी "है अपना दिलं तो आवारा" म्हणत फडफडत जायचं. गाणी तर त्याची जबरा असायची. आहेत! चिरतारुण्य भरून ठेवलेल्या कुप्या आहेत. ती गाणी त्याचीच आहेत फक्त. जशी शम्मी ची गाणी फक्त शम्मीची. "खोया खोया चांद" वर फक्त देवच हात लटकवत  हिरो वाटू शकतो. प्रचंड उमद देखणेपण. आणि त्याला शोभणारी ग्रेस. म्हणजे हा आणि मधुबाला त्या "अच्छा जी मै हारी" मध्ये एकत्र आल्यानंतर तर कहरच. मग मधुबालाला इतर कुणा हिरोबरोबर पाहू नये ना देवला इतर हिरोईनबरोबर. नाही म्हणायला *बंबई का बाबू* मध्ये एक गांजाची गोळी आहे सुचित्रा सेन बरोबर याची..."दिवाना मस्ताना हुवा दिल" ❤️... बरं ती भयानक विनोदी मिशी लावून, तो "दिल आज शायर है" सुद्धा रुबाबात म्हणतो. तो कशाला ही देखणं बनवू शकतो.

काहींचा आक्षेप होता देव अभिनय करत नाही. अरे?? पण कशाला? का करावा त्याने सो कॉल्ड अभिनय. युसूफ साब होते की. नाहीतर आपला देसी चॅप्लिन राज कपूर होता. सगळंच कसं देवने करायचं? त्याने फक्त पडद्यावर मस्त वावरायचं. छान गाणी म्हणायची. थोडं दुःखी व्हावं पण गाणी तेव्हाही छानच म्हणावीत. आणि लोकांना खुश ठेवावं. सर्वे सुखिन: संतु म्हणत. खूप कठीण असतय लोकांना दुःख विसरायला लावण. आणि कुठल्याही रोल मध्ये देव शोभूनच दिसायचा. मग तो काला बाजार मधला गरीब तरुण असो वा हम दोनो मधला फौजी. मग आला गाईड. ये उन तमाम साहिबान के लिए.... जो कहते हैं देव... (मान हलवायची) एक्टिंग नहीं करता. मला वाटतं भारतातल्या मुख्यधारेतला हा मैलाचा दगड आहे. थॅन्क्स टू गोल्डी. देवच्या प्रतिमा निर्माण कार्यात या त्याच्या लक्ष्मणाचा मोलाचा वाटा आहे. पण गाईड मधला राजू ते स्वामी हा हृदयस्पर्शी प्रवास देवने लीलया पार पाडला आहे. मग मात्र देवने विजयला सोडलं आणि त्याचा downfall सुरू झाला. देवाचं मार्केटिंग पुजारीच चांगलं करू शकतो देव नाही हे कदाचित त्याला पटलं नसावं.

खैर तो पर्यंत अभिनेता, निर्माता म्हणून या माणसानं अक्षरशः खजिना ठेवलाय मागे. प्रसन्नतेचा, उत्साहाचा, चिरंतन उल्हासाचा. त्याला काळाच कसलं ही बंधन नाही.

*ले के पहला पहला प्यार* या गाण्यात तो हिरोईन च्या मागे कसा चालतो ते पहायलाच अनेकांनी *सीआयडी* पिक्चर च्या वाऱ्या केल्या होत्या म्हणे.

असं म्हणायचे की देवला काळे कपडे घालायला मज्जाव होता. पोरी बेहोश व्हायच्या म्हणे.

तरी हा नम्रपणे साक्षात हेमा मालिनीला म्हणाला

"अपनी भी सुरत बुरी तो नही हैं"

देवत्व. दुसरं काय ...

#HappyBirthdayDevAnand

#CinemaGully
_________-_____________
मी असेन अकरा,बारा वर्षाची..घरी चित्रपट बघायला बंधन नव्हत पण घरातल्या महिला मराठी चित्रपट बघायला न्यायच्या तर बाबा डायरेक्ट इंग्रजी जो दुरुनही आणि जवळुनही समजण महा कठीण..हिंदी चित्रपट तसे आवडीने कुणी पहायचच नाही..एकदा बाबांचे मानलेले मोठे भाऊ दादा पाटेकर म्हणजे नाना पाटेकरचे वडील मला त्यांच्या घरी आठ दिवस रहायला घेऊन गेले..नाना असेल तेंव्हा सोळा,सतरा वर्षाचा..वहिनींनी ( नानाची आई ) एकदा नानाला माझ्यासाठी आणि घरी आलेल्या दुसर्या एका पाहुणीसाठी सिनेमाची तीकीट काढायला सांगीतली..नाना कुठल्याशा " काला बाजार " चित्रपटाची तीकीटं घेऊन आला आणि चित्रपट सुरु होताच मला तो दिसला..देव आनंद...चित्रपट संपताना तो माझ्या मेंदूवर आणि ह्रुदयावर कब्जा करुन बसला...अस असत प्रेम हे त्याने मला त्या पहिल्या चित्रपटात शीकवल आणि मी त्या प्रेमात वाहावत गेले त्या नंतर कीत्येक वर्ष..त्याच दिसणं, हसणं, गोड गाणी म्हणत नायीकेला छळत छळत पटवण हे सगळ माझ्या आयुष्यातही घडाव अस वाटे पर्यंत मी वयात येण्याचा उंबरठा ओलांडला होता..
             मग कधीतरी त्याच्या वाढदिवसा बद्दल वर्तमानपत्रात आलेला लेख वाचताना समजल " अरे, हा तर आपल्या बाबांच्या वयाचा आहे.." हुं मग काय झाल? पण मला आवडतो ना मग बास..हे आवडण पुढे चालतच राहील..वहिदा,साधना मागे पडल्या हेमा,मुमताजला तो छळु लागला तरी या देवावरची माझी भक्ती अचल राहीली..
          आणि एक दिवस मी चक्क माझ्या देवा बरोबर फोनवरुन बोलले..हो अगदी माझ्या घरात बसुन..आकाश ठेंगणं झालं..काय बोलले कसं बोलले हे मलाच समजल नाही..थंडगार पडले होते मी..जमीनीपासुन काही इंच वरच उडत चालत होते..पण देव देव्हार्यातच शोभतो त्याच्या जवळ फक्त मनाने जायच असत..मी जात राहीले..त्याच्या प्रेमाखातर " बनारसी बाबु " पर्यंत त्याला पाहाण्याची हिंम्मत करत राहीले आणि त्या नंतर मात्र माझे पेशन्स टिना मुनीम पर्यंत तो पोचेस्तोवर संपले..माझा देव मला हरवायचा नव्हता..मनातुन उतरुही द्यायचा नव्हता.. मी त्याचे चित्रपट पाहाण बंद केलं...त्याच्या जुन्या चित्रपटातलीच छबी ह्रुदयाशी कवटाळून मी त्याला आठवत राहीले..प्रेम करत राहीले..आजही करते.." देखो रुठा ना करो बात नजरोकी सुनो " म्हणत तो मला लोभात पाडत राहीला त्याच्या आणि मी आजही पडत राहीलेय..देव आनंद म्हणजे तारुण्य..ते मात्र आबाधीत आहे माझ्या मनात...कायमच....❤️
#CinemaGully
__________________

देव आनंद ©मुकुंद कुलकर्णी
#CinemaGully

26 सप्टेंबर 1923 - 3 डिसेंबर 2011

सदाबहार चॉकलेट हिरो देव आनंदचा जन्म दि.26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यातील शक्करगढ येथे झाला . धरमदेव पिशोरीमल आनंद हे त्याचं नाव . पण चित्रपटसृष्टी आणि चित्ररसिक त्याला ' देव आनंद ' म्हणूनच ओळखतात . त्याचे वडील पिशोरीलाल आनंद गुरुदासपूरच्या जिल्हा न्यायालयात नावाजलेले वकील होते . देव साहेबांचं बाळपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं . पाच भावंडांमधला देव आनंद तिसरा . मनमोहन आनंद आणि चेतन आनंद हे मोठे भाऊ . विजय आनंद हा लहान भाऊ तर शीलकांता कपूर ही लहान बहीण . सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर हा तिचा मुलगा . देव साहेबांचे शालेय शिक्षण सेक्रेड हार्ट स्कूल डलहौसी येथे झाले . पदवीच्या अभ्यासक्रमासाठी लाहोरला जाण्याआधी देवसाब काही दिवस धरमशाला येथे होते . इंग्रजी साहित्यात बीएची डिग्री त्यांनी ब्रिटिश इंडियातील गव्हर्मेंट कॉलेज लाहोर येथून प्राप्त केली . 

पदवी प्राप्त केल्यानंतर देवसाब चित्रपट क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी इ.स.1940 च्या दशकाच्या सुरूवातीला मायानगरी मुंबईत दाखल झाले . सुरूवातीला काही काळ चरितार्थासाठी देवसाब चर्चगेट येथील मिल्ट्री सेन्सर च्या कार्यालयात महिना 165 रुपयांच्या वेतनावर कामास होते . काही दिवस त्यांनी 85 रुपये पगारावर एका अकाऊंट फर्ममध्ये कारकूनीसुद्धा केली . देव आनंद यांचे प्रेरणास्थान होते  अशोक कुमार . अछूत कन्या , किस्मत चित्रपटातील अशोककुमार यांच्या भूमिकेने प्रभावित होऊन देव साहेबांनी एक चांगला अभिनेता , परफॉर्मर होण्याचा निश्चय केला . मोठे बंधू चेतन आनंद यांच्या समवेत त्यांनी ईप्टा जॉईन केलं . 

प्रभातचे बाबूराव पै यांनी देव आनंदला पहिली संधी दिली . इ.स.1946 च्या ' हम एक है ' या चित्रपटामधून . हिंदू मुस्लिम ऐक्यावर हा सिनेमा होता . त्यात कमला कोटणीस त्याची नायिका होती . देव आनंदने हिंदू मुलाचा रोल केला होता . या मिळालेल्या पहिल्या संधी बद्दल देवसाब एका ईंटरव्ह्यू मध्ये म्हणतात , " I remember when I gate crashed into the office of the man who gave me the first break , he kept looking at me . -- Baburao Pai of Prabhat film studios . At the time when he made up his mind that this boy deserves the break and later mentioned to his people that this boy struck me because of his smile and beautiful eyes and his tremendous confidence . " 
पुण्यात ह्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना देवसाब गुरुदत्त यांच्या संपर्कात आले . दोघांची गाढ मैत्री झाली . दोघेही होतकरू स्ट्रगलर होते . त्या दोघांमध्ये त्यांनी एक करार केला . चित्रपट क्षेत्रात ज्याला यश मिळेल त्याने दुसऱ्याला यशस्वी होण्यात मदत करायची . देव आनंद जेंव्हा निर्माता बनला तेंव्हा त्याने गुरुदत्तला दिग्दर्शनाची संधी दिली आणि गुरुदत्त दिग्दर्शनात स्थिरावल्यावर त्याने देव आनंदला नायकाची भूमिका दिली . इ.स.1949 साली देव आनंद यांनी आपले बंधू चेतन आनंद यांच्या समवेत ' नवकेतन फिल्म्स ' ची स्थापना केली . 

चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात गायिका अभिनेत्री सुरैया बरोबर देव आनंदला काही प्रमुख भूमिका मिळाल्या . या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान देवसाब आणि सुरैया यांची प्रेमकहाणी रंगायला लागली . दोघांनी मिळून एकूण सात चित्रपट केले . विद्या ( इ.स.1948 ) , जीत , शायर ( इ.स.1949 ) , अफसर , निली ( इ.स.1950 ) , दो सितारे आणि सनम ( इ.स.1951 ) हे ते चित्रपट . हे सर्व चित्रपट बॉक्स अॉफिसवर सुपर हिट ठरले . त्या काळात सुरैया एक स्थिरावलेली प्रख्यात अभिनेत्री , मोठी स्टार होती , तर देव आनंद एक होतकरू , उदयोन्मुख कलाकार होता . प्रेक्षकांना त्यांचा अॉन स्क्रीन रोमान्ससुद्धा खूप भावला होता . ' किनारे किनारे चले जायेंगे ' ह्या विद्या चित्रपटातील गाण्याच्या शूटिंग दरम्यान ज्या बोटीत त्यांचे चित्रीकरण चालू होते , ती बोट उलटली आणि देव आनंदने सुरैयाला बुडताना वाचवले . चित्रपटात शोभून दिसणाऱ्या या प्रसंगामुळे दोघे आणखीन जवळ आले . इ.स.1948 ते इ.स.1951 या दरम्यान देव सुरैया यांची प्रेमकहाणी बहरली होती . जीत चित्रपटाच्या सेटवर देव सुरैया यांच्या विवाहाची तयारी झाली होती . दुर्गा खोटे , कामिनी कौशल यांनी देव सुरैया जोडीची मदत केली . इ.स.1950 च्या अफसर या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान देव आनंदने सुरैयाला हिऱ्याची अंगठी देऊन मागणी घातली . सुरैयाच्या आजीने या गोष्टीला कडाडून विरोध केला . सुरैया तो विरोध मोडू शकली नाही . आणि या प्रेमकहाणीचा शेवट सुखांत झाला नाही . पण सुरैया शेवटपर्यंत अविवाहित राहिली . देव आनंद बरोबर चित्रपटात काम करण्याचीही तिच्यावर बंदी घालण्यात आली . ' दो सितारे ' ( इ.स.1951 ) हा या जोडीचा शेवटचा चित्रपट . दि.31 जानेवारी 2004 रोजी सुरैयाचे निधन झाले . तिच्या अंत्ययात्रेस देव आनंद उपस्थित होता . आपल्या ' रोमान्सिंग विथ लाईफ ' या मनमोकळ्या आत्मचरित्रात देव आनंदने सुरैया बरोबरच्या प्रेमकहाणीचा हळूवार उल्लेख केला आहे .

इ.स.1954 साली  देव आनंद सहअभिनेत्री कल्पना कार्तिक बरोबर विवाहबद्ध झाला . 
' टॕक्सी ड्रायव्हर ' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरच दोघे विवाहाच्या बंधनात बांधले गेले . सुनील आनंद हा मुलगा आणि मुलगी देवीना अशी दोन अपत्ये त्यांना झाली . लग्नानंतर कल्पना कार्तिकने चित्रपट संन्यास घेतला . 

देवसाब यांना पहिला मोठा ब्रेक अशोककुमार यांनी दिला . स्टुडिओबाहेर घुटमळणाऱ्या या राजबिंड्या युवकाला दादामुनींनी बरोबर पारखले . इ.स.1948 चा बाँबे टॉकीजचा 
' जिद्दी ' हा नायक म्हणून हिट झालेला देव आनंदचा पहिला चित्रपट . या चित्रपटात कामिनी कौशल त्याची नायिका होती . या चित्रपटातील किशोर लता यांनी गायलेले ' ये कौन आया करके ये सोला सिंगार ' हे किशोर लता यांचं पहिल युगलगीत . या गाण्यापासून किशोर , लता , देव ही भागीदारी पुढे जवळजवळ चाळीस वर्षे टिकली . याच सिनेमात किशोरकुमार ' मरनेकी दुवाए क्यूं मांगू ' हे आपले पहिले सोलो गीत गायला . 

नवकेतन फिल्म्सच्या बॕनरखाली इ.स.1951 च्या ' बाजी ' या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चित्रपटासाठी देव आनंदने गुरुदत्तला दिग्दर्शनाची संधी दिली . देव आनंद , गीता बाली व कल्पना कार्तिक हे कलाकार या चित्रपटात होते . नायिका म्हणून कल्पना कार्तिकचा आणि दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तचा हा पहिला चित्रपट . बॉक्स अॉफिसवर हा चित्रपट खूप यशस्वी ठरला . त्यानंतर या जोडीला बऱ्याच अॉफर्स मिळत गेल्या . आँधीया ( इ.स.1952 ) टॕक्सी ड्रायव्हर ( इ.स.1954 ) , मकान नं 44 ( इ.स. 1955 ) , नौ दो ग्यारह ( इ.स.1957 ) हे या जोडीचे तुफान गाजलेले चित्रपट . लग्नानंतर कल्पना कार्तिकने चित्रपट क्षेत्राला अलविदा केला . ' नौ दो ग्यारह' हा या जोडीचा अखेरचा चित्रपट . 

विशिष्ट लकबीत मान हलवत रॕपिड फायर स्टाईलची देवसाब यांची डायलॉग डिलिव्हरीची पद्धत , ही खास देव आनंद 
' स्टाईल ' होती . हाऊस नं 44 ( इ.स.1955 ) , पॉकेटमार ( इ.स.1956 ) , मुनीमजी ( इ.स.1955 ) , फंटूश , सीआयडी  ( इ.स.1956 ) , पेईंग गेस्ट ( इ.स.1957 ) हे त्याचे जबरदस्त गाजलेले चित्रपट . इ.स.1950 च्या दशकात थोडीशी रहस्याची झालर असलेले त्याचे लाईट कॉमैडी + लव्ह स्टोरी असे चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले . 

इ.स.1950 च्या दशकातल्या उत्तरार्धात देव आनंद ची जोडी पदार्पण करणाऱ्या वहिदा रेहमान बरोबर जमली . सीआयडी ( इ.स.1956 ) , सोलवा साल ( इ.स.1958 ) , काला बाजार ( इ.स.1960 ), बात एक रातकी ( इ.स. 1962 ) , रूप की रानी चोरोंका राजा (इ.स.1961 ) , गाईड ( इ.स. 1965 ) , प्रेमपुजारी ( इ.स.1970 ) हे या जोडीचे प्रचंड गाजलेले चित्रपट . आर.के.नारायण यांच्या गाईड या कथेवर आधारित गाईड हा चित्रपट देव आनंदची सर्वश्रेष्ठ कलाकृती . इ.स.1958 च्या 
' काला पानी ' या चित्रपटासाठी देव आनंदला फिल्म फेअरचा बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार सर्वप्रथम प्राप्त झाला . 

सुरैया , कल्पना कार्तिक याशिवाय नूतन आणि वहिदा रेहमान या नायिकांबरोबर देव आनंदची जोडी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली . पन्नास आणि साठचे दशक हिंदी चित्रपटसृष्टीवर दिलीप , राज , देव या त्रयीचे अधिराज्य होते . 

साठच्या दशकात रोमँटिक चॉकलेट हिरो अशी देवसाब यांची प्रतिमा प्रस्थापित झाली . नूतन बरोबर मंझील, तेरे घरके सामने , मीनाकुमारी सोबत किनारेकिनारे , माला सिन्हा बरोबर माया , लव्ह मॕरेज , साधना बरोबर असली नकली , साधना नंदा बरोबर हम दोनो , आशा पारेखसह जब प्यार किसीसे होता है , महल , तसेच कल्पना , सिमी व नंदा या तिघींबरोबर तीन देवियाँ हे त्याचे अत्यंत लोकप्रिय , लाईट मूडचे रोमँटिक चित्रपट . 

वहिदा रेहमान सोबत ' गाईड ' हा देवसाब यांचा पहिला रंगीत चित्रपट . मालगुडी डेज या अजरामर कथासंग्रहाचे लेखक आर.के.नारायण यांच्या ' द गाईड ' या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा ' द गाईड ' हा देव साहेबांचा महत्वाकांक्षी चित्रपट . या कादंबरीवर चित्रपट बनवण्याची प्रेरणा देव आनंद यांचीच . आर.के.नारायण यांना स्वतः भेटून त्यांनी या प्रकल्पासाठी संमती मिळवली . हॉलिवूडमधल्या आपल्या मित्रांना हाताशी धरून देव आनंद यांनी हा चित्रपट ' इंडो युएस् को प्रॉडक्शन असा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषात एकत्रितपणे चित्रित केला . इ.स.1965 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला . भाऊ विजय आनंद याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला जगभरातल्या रसिक प्रेक्षकांची दाद मिळाली . काळाच्या पुढचे कथानक असलेला हा चित्रपट निःसंशय देव आनंदच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी एक होता . 

विजय आनंद सोबत देव साहेबांनी ज्वेल थीफ आणि नंतर जॉनी मेरा नाम हे थ्रिलरकडे झुकणारे चित्रपट दिले . ज्वेल थीफमध्ये त्यांच्याबरोबर वैजयंतीमाला , तनुजा , अंजू महेंद्रू तर जॉनी मेरा नाम मध्ये त्याची नायिका होती हेमा मालिनी . या चित्रपटाने हेमा मालिनीला स्टार बनवले . 

दिग्दर्शक म्हणून त्याचा प्रेमपुजारी फारसा यशस्वी ठरला नाही . पण इ.स.1971 चा ' हरे रामा हरे कृष्णा ' हा चित्रपट प्रचंड गाजला . या चित्रपटातून झीनत अमान ही बोल्ड नटी हिंदी चित्रपटसृष्टीत अवतरली . त्याच वर्षी ए.जे.क्रॉनिन यांच्या ' The Citadel ' या कादंबरीवर आधारित ' तेरे मेरे सपने ' हा नितांत सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला . या चित्रपटात नायिका होती मुमताज . त्यानंतर देव साहेबांचा करिश्मा हळूहळू कमी होत गेला . 

इ.स.1970 च्या दशकात राज कपूर पडद्यावर बापाच्या भूमिकेत दिसायला लागला . दिलीपकुमारसुद्धा बॉक्स अॉफिसवर अयशस्वी होत होता . त्या काळात सदाबहार देव आनंद हेमा मालिनी , झीनत अमान , शर्मिला टागोर , राखी , परवीन बाबी अशा नव्या जमान्याच्या नायिकांबरोबर रुपेरी पडदा गाजवत होता . 

आणीबाणीच्या काळात देव आनंद राजकारणात सक्रिय होता . पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयाविरुद्ध तो रस्त्यावर उतरला . ' नॕशनल पार्टी अॉफ इंडिया ' या नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना देवसाबनी केली होती . 

हॉलीवूडचा जबरदस्त अभिनेता ग्रेगरी पेक याच्याबरोबर देव आनंदची नेहमी तुलना होत असे . ही तुलना देवसाबना फारशी आवडत नसे , " When you are at an  impressionable age you make idols , but when you grow out of the phase , you develope your own persona . I don't want to be known as India's Gregory Peck , I am Dev Anand . " देव आनंद आणि ग्रेगरी पेक यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते . 

इतर अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय  पुरस्कारांसोबत देवसाबना इ.स.2002 साली चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा ' दादासाहेब फाळके ' हा पुरस्कार मिळाला होता . भारत सरकारने इ.स.2001 साली ' पद्मभूषण ' या पुरस्काराने देव साहेबांना गौरवले होते . 

वयाच्या 88व्या वर्षी दि.3 डिसेंबर 2011 रोजी चिरतरुण देव आनंदने इहलोकीची यात्रा संपवली . लंडन येथे मेडिकल चेक अप साठी गेले असता वॉशिंग्टन मेफेअर हॉटेल लंडन मधील आपल्या रूममध्ये कार्डिॲक अरेस्टने त्यांचे निधन झाले . 

कॉलेज डेजमध्ये असताना आम्ही देव आनंदचे Die Hard Fans होतो .देव आनंद हा माझा प्रचंड आवडता नट होता . मला त्याचं काय आवडायचं तर  शिअर सॉफिस्टिकेशन , नेहेमी उच्च अभिरुची दर्शवणाऱ्या पोशाखात असायचा . बहुतेक सुटाबुटातच , शर्टाची कॉलर नेहमी गळाबंद शर्टाची वरची चार बटणं उघडी टाकून उघड्या छातीचं असभ्य आणि अजागळ प्रदर्शन कधीही नाही . स्मितहास्य तर मिलियन डॉलर स्माईल . इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांवर प्रभुत्व आणि विलक्षण देखणेपणा , रुबाबदार व्यक्तीमत्व ही देव आनंद मनापासून आवडण्याची कारणं . हिंदी चित्रपट पडद्यावर नायिके बरोबरचा लाईट रोमान्स देव आनंद एवढ्या नजाकतीने दाखवणारा दुसरा हिरो नाही . त्याच्या अभिनय क्षमतेच्या मर्यादा त्याच्याविषयी वाटणाऱ्या आत्मियतेच्या , आकर्षणाच्या आड कधीहीआल्या नाहीत . खऱ्या अर्थाने चॉकलेट हिरो या उपाधीला सार्थ होता देव आनंद !

पाच दशकांपेक्षा जास्त प्रदीर्घ कारकीर्द असणारा देखणा , सदाबहार , चिरतरुण नायक देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीत एकमेवाद्वितीय होता . आज त्यांच्या जन्मदिनी देवसाबना भावपूर्ण श्रद्धांजली !

मुकुंद कुलकर्णी©
____________
#CinemaGully

#HBDDevAnand

देव आनंद आणि त्यांच्या चित्रपटातील गाणी ऐकणे, पाहणे हा एक मस्त अनुभव असतो. 
ब्लॅक अँड व्हाईट मधील देवसाहेबांची गाणी ही तर पर्वणी! 
'तेरे घर के सामने' मधील 'तू कहां ये बता, इस नशिली रात मै..' ह्या गाण्यात देव, सिमल्यात नूतनला शोधत असतो. शेवटच्या ' प्यार का देखो असर, आये तुम थामे जिगर...' ह्या कडव्यातला ती त्याचा आवाज ओळखून गॅलरीत येते आणि मग त्यांची नजरानजर, एकमेकांना भेटून चेहऱ्यावर उफाळून आलेले प्रेम, काय मस्त वाटतं हे सर्व बघताना... 

' माया' मधील ' तसवीर 'तेरी दिल मै' चे दुसरे कडवे संपताना, सलीलदांच संगीत झऱ्याच्या पाण्यासारख अवखळ व्हायला लागत , तेंव्हा एक हात पुढे आणि नंतर वर घेत देवने ज्या हलक्या-फुलक्या नृत्यमुद्रा केल्या आहेत, त्या लक्षात राहतात....

'काला बाजार' मधील ' अपनी तो हर आह इक तुफान है...' मधील उपरवाल्या देवाच्या निमित्ताने वाहिदाला आळवणारा देव आणि त्याचा कावा लक्षात आल्यावर बदलणारे वहिदाचे भाव....गाणे संपूच नये असे वाटते..

' दिल का भवर ...' मधील गाण्यात तर कुतूबमिनार मध्ये देव आणि नूतन ह्या दोघांना बघताना खास मजा येते, ह्या गाण्यात दोघेही आपल्या चर्मिंग अदांचे जे रंग उधळतात त्यांचा जवाब नाही...देव तर नेहमी प्रमाणे देखणा दिसतोच पण नूतन काय दिसते, आणि ह्या कॉम्बिनेशन चे हे गाणे काय झाले आहे...👌

' असली नकली' च 'तुझे जीवन की डोर से बांध लिया है' ची सुरुवातीच्या बॅकग्राऊंड म्युझिक ला बस मधेच देव आणि साधना एकमेकांकडे बघून एवढे गोड हसतात तिथेच हे गाणे आपल्याला खिशात टाकते...
पुढे साधनाच्या सुरेख अदा पहायच्या की देवचा खेळकर चार्म बघायचा ह्यात आपण गाण्यात गुंतून जातो....

"केसं वाढवून देव आनंद बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा!" हे वाक्य मी पाचवी-सहावी पासून अनेकदा ऐकलं आहे, 
ह्या वाक्याचे जाऊ द्या पण देव साहेबाचा केसांचा कोंबडा अतिशय फेमस होता. इंग्रजीत त्याला 'पफ' म्हणतात म्हणे, पण केसांचा कोंबडाच म्हणायला छान वाटते.
 केसांचा तुर्रेबाज कोंबडा काढून फिरणारे जन मानसातले अनेक देव आनंद मी जुन्या फोटोत पाहिले आहेत.
१९६६ साली आलेल्या प्यार मोहब्बत नंतर देवसाहेबांनी ही स्टाईल बदलली, पण ह्या स्टाईलचा प्रभाव एवढा होता, की मी १९८७ साली सातवीत असताना केसांचा कोंबडा काढत होतो! असो!!
देव साहेबांच्या डोक्यावर केस बरेच वर्षे राहिले आणि त्यामुळे ते चिरतरूण दिसत राहिले.

देव प्रेम आमच्याघरी पिढीजात....
"हा रशीद खान, देव आनंदच्या प्रत्येक चित्रपटात असतो हा"
" लक्षात ठेव देव आनंदच्या बऱ्याच चित्रपटांना एस डी बर्मन म्युझिक देत"
वडील अजूनही जुनी गाणी बघताना मला हे देव प्रेम पास ऑन करत असतात, आणि मी ते तेवढ्याच आनंदाने ऐकत असतो..... पुढे पास ऑन करण्याबद्दल मी तेवढा सुदैवी नाही.…. असे अनेक आनंद देणाऱ्या देव आनंद साहेबांचा आज जन्मदिवस...infact वाढदिवस कारण ते इथेच आहेत, तुमच्या- आमच्या मनात ...चिरंतन आणि चिरतरूण...
हॅपी बर्थडे देव साब!!

©️ अजय गांधी

संकलित रिपोस्ट



लताबाई । शांता शेळके


लताबाई… एक हृद्गत!

प्रख्यात कवयित्री व लेखिका शान्ता ज. शेळके यांचा अप्रकाशित, रसाळ लेख.. लतादीदींच्या ( उद्या, २८ सप्टेंबर) वाढदिवसानिमित्ताने!

लता मंगेशकर. वय वर्षे अवघे ९१. भारतीय जनमानसावर गेली आठ दशके अधिराज्य गाजवणारा स्वर-चमत्कार!

लता मंगेशकर. वय वर्षे अवघे ९१. भारतीय जनमानसावर गेली आठ दशके अधिराज्य गाजवणारा स्वर-चमत्कार! त्यांच्या सहवासात वेचलेले विलक्षण क्षण उलगडणारा प्रख्यात कवयित्री व लेखिका शान्ता ज. शेळके यांचा अप्रकाशित, रसाळ लेख.. लतादीदींच्या ( उद्या, २८ सप्टेंबर) वाढदिवसानिमित्ताने!

ते पंचेचाळीस साल असावे. मी पुण्याहून मुंबईला आले होते आणि आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकात काम करत होते. एके दिवशी अत्रेसाहेब मला म्हणाले, ‘‘आज रात्री आपण विनायकरावांच्या घरी लताचे गाणे ऐकायला जाणार आहोत. तुला मी आमच्याबरोबर घेऊन जाईन.’’

मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघत राहिले तेव्हा ते हसून म्हणाले, ‘‘विनायकराव म्हणजे मास्टर विनायक. आणि लता ही मास्टर दीनानाथ यांची मुलगी.. फार गोड गाते ती!’’

मास्टर विनायक, मास्टर दीनानाथ.. दोन्ही नावे मला माहीत होती. दीनानाथांना कधी बघण्याचा योग आला नव्हता. लताचे नाव मात्र कानावरून गेले होते. माझ्या मनात कुतूहल, औत्सुक्य निर्माण झाले. रात्रीच्या कार्यक्रमाची मी वाट पाहू लागले.

विनायकराव तेव्हा शिवाजी पार्कला आचार्य अत्रे यांच्या निवासस्थानाजवळच राहत होते आणि लताबाई व मीनाताई या त्यांच्याकडे मुक्कामाला होत्या. त्यांची आई व इतर भावंडे खानदेशात थाळनेर इथल्या त्यांच्या आजोळी राहत असत. रात्री आम्ही तिथे गेलो. बाहेरचा छोटासा हॉल. जेमतेम २०-२५ माणसे बसतील एवढाच. आणि तेवढीच माणसे तिथे होती. तो एक घरगुती मेळावा होता. हॉलच्या मध्यभागी थोडय़ाशा उंच बैठकीवर लता बसली होती. पांढरीशुभ्र साडी, सडसडीत बांधा, कोवळा चेहरा, बुद्धिमत्तेचे निदर्शक असलेले अतिशय तीव्र, चमकदार डोळे आणि पाठीवर खूप जाड लांबसडक दोन वेण्या. लताला बघताच मनात आपुलकीचे भाव निर्माण झाले. त्या दिवशी ती काय गायली मला नीटसे आठवत नाही. प्रथम एखादी शास्त्रीय बंदिश तिने गायिली असावी. आणि नंतर एक-दोन नाटय़गीते. त्यात ‘शूरा मी वंदिले’ हे एक गाणे होते. लताचा पातळ, धारदार, विलक्षण गोड आणि सुरेल असा आवाज मात्र हृदयाला खोलवर स्पर्शून, विद्ध करून गेला. मला गाण्यातले फारसे काही कळत नाही. तरीही लताचे गाणे ऐकताना आपण फार अद्भुत, सुंदर असे काहीतरी ऐकत आहोत इतके मात्र खचितच वाटले. ही लहानशी, सडसडीत बांध्याची आणि अतिशय गोड आवाजाची मुलगी भविष्यकाळात एक अलौकिक गानसम्राज्ञी होणार आहे, चित्रपटसृष्टीत अत्युच्च मानाचे स्थान पटकावणार आहे आणि देशातच नव्हे, तर परदेशातही भारताचे नाव गाजवणार आहे, हे तिचे उज्ज्वल भविष्य मात्र त्या रात्री कुणालाही जाणवले नसेल!

त्यानंतर पाश्र्वगायिका म्हणून लताबाई काम करू लागल्या. त्यांनी गायिलेली गाणी प्रत्यही कानावर येऊ लागली. ‘महल’, ‘बरसात’ यासारख्या चित्रपटांतली त्यांची गाणी अतोनात गाजली आणि ‘लता मंगेशकर’ या नावाभोवती एक देदीप्यमान वलय निर्माण होऊ लागले. मी यावेळी माझ्या उद्योगात मग्न होते. लताबाईंचे कुटुंब, चित्रपटांचे क्षेत्र, त्यांची ध्वनिमुद्रणे, गाणी हे सारे माझ्यापासून शेकडो मैल दूर होते. त्यांची पुन्हा कधी भेट होईल असे मला वाटले नव्हते.

पण ती झाली. आणि तीही योगायोगाने. मध्यंतरी विनायकरावांचे निधन झाले होते आणि मंगेशकर मंडळी आता नाना चौकात नाना शंकरशेठ यांच्या वाडय़ात राहायला आली होती. लताबाईंचा कामाचा व्याप आता खूपच वाढला होता. याच सुमाराला विनायकरावांच्या कंपनीतले लताबाईंचे पूर्वीचे सहकारी दिनकर पाटील आणि माधव शिंदे या दोघांनी मिळून ‘रामराम पाव्हणं’ हा चित्रपट काढायचे ठरवले. कथा, संवाद दिनकरराव यांचे होते आणि गीतलेखन पी. सावळाराम आणि मी अशा अगदी नवशिक्या गीतकारांकडून त्यांनी करवून घेतले होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन लताबाई करणार होत्या. काही गाणीही त्याच गाणार होत्या. मला नंतर असे कळले, की पाटील आणि शिंदे यांनी जेमतेम पैशांची जमवाजमव करून चित्रपट काढायचे ठरवले होते. त्यांची ती अडचण जाणून लताबाई आपल्या या पूर्वीच्या सहकाऱ्यांच्या मदतीला पुढे आल्या होत्या आणि एक पैसाही न घेता आपल्या अत्यंत कार्यव्याप्त अशा वेळापत्रकातून सवड काढून ‘रामराम पाव्हणं’ला संगीत द्यायचे त्यांनी कबूल केले होते. गीतकार म्हणून त्यावेळी त्यांच्याबरोबर काही काम करता येईल असे मला वाटले. पण तशी संधी आली नाही. रिहर्सल्स, रेकॉर्डिग यांनाही मला हजर राहता आले नाही. लताबाई मात्र दिनकररावांच्या घरी एकदा भेटल्या. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा धीर मला झाला नाही. मी इतकेच म्हटले, ‘‘तुमची गाणी मी नेहमी ऐकते. ‘सखी री सुन बोले पपीहा उस पार’ हे गाणे मला फार आवडले.’’ माझे बोलणे ऐकून त्या इतकेच म्हणाल्या, ‘‘आवडले का?’’ आणि हसल्या.

‘रामराम पाव्हणं’ला लताबाईंनी गोड चाली दिल्या होत्या. त्यातले ‘मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले’ हे चित्रपटासाठी लिहिलेले माझे पहिलेच गीत. त्याची चाल लताबाईंनी दिलेली असावी, इतकेच नव्हे तर ते गायलेही त्यांनीच असावे.. हा माझ्या आयुष्यातला मला एक भाग्ययोग वाटतो. पुढच्या काळात मी त्यांच्याबरोबर भरपूर काम केले. माझ्या गाण्यांना त्यांनी चाली दिल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी गायलेली माझी कोळीगीते, गणपतीची गाणी अतिशय लोकप्रिय झाली. तरीदेखील ‘रामराम पाव्हणं’मधले त्यांनी गायलेले जे माझे पहिलेच गाणे- त्याचे अप्रूप मला आजही वाटते.

नंतर ६०-६२ सालचा काळ. आता मी ‘नवयुग’मधली नोकरी सोडून दादरच्या रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत होते आणि मराठी चित्रपटांमधून थोडे थोडे गीतलेखन करू लागले होते. एके दिवशी आशाबाई माझे गाणे गाणार होत्या व त्यासाठी मी बॉम्बे लॅबोरेटरीत गेले होते. पण काही कारणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. रेकॉर्डिग रहित झाल्यामुळे मी घरी जायला निघाले होते. तेवढय़ात तिथले प्रमुख रेकॉर्डिस्ट शर्माजी मला म्हणाले, ‘‘आप जा रही है? अब लताजी का रेकॉर्डिग होनेवाला है। इनका गाना नहीं सुनोगी?’’

लताबाईंचे रेकॉर्डिग होणार आहे म्हटल्यावर ते ऐकण्याचा मोह मला आवरेना. मी थांबले. तेवढय़ात लताबाई आल्या. मी पुढे होऊन त्यांना म्हटले, ‘‘तुम्हाला आठवत नसेल कदाचित, मी शान्ता शेळके.’’ त्या हसल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘मला आठवतं ना.. शान्ताबाई, ‘रामराम पाव्हणं’ची गाणी तुम्ही केली होती! आणि ते दिनकररावांचं पिक्चर होतं!’’

मी आश्चर्यचकित झाले. मधल्या काळात लताबाई कलाकार म्हणून कितीतरी मोठय़ा झाल्या होत्या. इंडस्ट्रीत त्यांचे नाव विलक्षण गाजत होते. त्यांनी नुकतीच गायिलेली ‘कोहिनूर’, ‘होनाजी बाळा’ या चित्रपटांतली गाणी सतत कानावर येत होती. आणि माझी त्यांची पूर्वीची ओळख अगदीच जुजबी होती, तरीही त्यांनी माझे नाव, पूर्वपरिचय ध्यानात ठेवला होता. मला नुसते ओळखूनच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी जिथून त्या गाणार होत्या त्या आतल्या रेकॉर्डिग रूममध्ये मला नेले. मला कॉफी दिली. उषाबरोबर माझी ओळख करून दिली आणि त्यांच्या अगदी जवळ बसून त्या दिवशीचे त्यांचे गाणे ध्वनिमुद्रित होताना मी ऐकले! माझ्या दृष्टीने तो अतिशय रोमांचक, चित्तथरारक असा अनुभव होता. ते गाणे संगीत दिग्दर्शक चित्रगुप्त यांचे होते आणि त्याचे शब्द होते.. ‘आधी रात खनक गया मोरा कंगना..’ गाणे संपल्यावर लताबाईंचा निरोप घेऊन मी निघाले; तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘ओव्यांचा साध्या, सरळ शब्दांत अर्थ सांगणारी ‘ज्ञानेश्वरी’ची एखादी प्रत आहे का? ती मिळू शकेल का?’’

‘‘साखरे महाराजांची ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ आहे. ती यादृष्टीने तुम्हाला आवडेल असे मला वाटते.’’ मी म्हणाले.

‘‘ती कुठे मिळेल? मला अशी ‘ज्ञानेश्वरी’ हवी आहे.’’ त्यांनी सांगितले. त्यावर मी त्यांना साखरे महाराजांची ‘ज्ञानेश्वरी’ मिळवून देण्याचे अभिवचन दिले आणि काही दिवसांनी ती प्रत त्यांच्या घरी पोहोचती केली.

त्याच सुमाराला केव्हातरी मीनाताईंचे लग्न झाले. त्याचे आमंत्रण लताबाईंनी स्मरणपूर्वक मला पाठवले होते. असा आमचा परिचय हळूहळू होत चालला आणि मग ‘सूनबाई’ या चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी त्यांनी कुणाबरोबर तरी मला घरी बोलावून घेतले. गीतलेखनाचा अद्याप मला फारसा सराव झालेला नव्हता. ‘सूनबाई’ चित्रपटासाठी प्रसिद्ध बंगाली संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी हे संगीत देणार होते. त्यांच्या काही बंगाली गाण्यांच्या चालींवरून मला गाणी करायची होती. मला ते काम खूप अवघड वाटले. ‘मंगेशकर’ या नावाचा दबावही मनावर होता. पण स्वत: लताबाई, त्यांची भावंडे, स्वत: सलिल चौधरी साऱ्यांनीच मला सांभाळून घेतले आणि मग फारशी जिकीर न होता ‘सूनबाई’ची गाणी सहजपणे माझ्या हातून लिहून झाली. यानिमित्ताने लताबाईंच्या पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’मधल्या प्रशस्त घरी मला अनेकदा जावे लागले. हळूहळू सर्वाशी ओळखी झाल्या आणि मनावरचे दडपण कमी कमी होत गेले. हे घर खूप अनौपचारिक आहे, इथली मंडळी साधी आणि प्रेमळ आहेत, आपल्याला आवडण्यासारखी आहेत याची लवकरच मला जाणीव झाली. औपचारिक परिचयाचे, व्यावहारिक संबंधांचे घनिष्ठ स्नेहात पर्यवसान झाले. पुढे मी त्या घरात गीतलेखनाचे भरपूर काम केले. अनेक गाणी लिहिली. स्वत: लताबाईंनी ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘मोहित्यांची मंजुळा, ‘तांबडी माती’ अशा चित्रपटांसाठी माझ्याकडून गाणी लिहून घेतली. पुढे हृदयनाथ यांच्याबरोबर तर कितीतरी गाणी करण्याची संधी मला मिळाली. कोळीगीते, गणपतीची गाणी त्यांच्याबरोबर मी लिहिली. इतकेच नव्हे तर मीनाताई, उषाताई, आशाबाईंचा मुलगा हेमंत यांच्या संगीत दिग्दर्शनाखालीही मी गीतलेखन केले. प्रथम केवळ कामासाठी आणि कामापुरतीच मंगेशकरांच्या घरी जाणारी मी- नंतर काम नसतानाही भेटीच्या, गप्पांच्या, गाणी ऐकण्याच्या लोभाने तिथे वारंवार जाऊ लागले. माझा संकोच मावळला. अवघडलेपण दूर झाले. आणि बघता बघता मी त्या घरातलीच जणू एक होऊन गेले..

या काळात लताबाईंनी मला अतिशय जिव्हाळ्याने, आपुलकीने वागवले. त्यांच्याशी जसजशी जवळीक निर्माण होत गेली, तसतसे त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू, त्यांच्या इतर आवडीनिवडी मला कळू लागल्या. गाणे हा त्यांच्या सर्वाधिक प्रेमाचा, चिंतनाचा, अहर्निश ध्यासाचा विषय होता. पण त्याखेरीज इतर अनेक गोष्टींत त्यांना रस असल्याचे माझ्या ध्यानात येऊ लागले. साहित्य ही त्यांच्या आवडीची गोष्ट आहे. गडक ऱ्यांच्या आणि सावरकरांच्या नाटकांत मा. दीनानाथांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांच्या- विशेषत: गडक ऱ्यांच्या नाटकांशी या सर्वच भावंडांचा बालपणापासून संपर्क आलेला आहे. लताबाईंनी तर एकदा ‘भावबंधना’त लतिकेची भूमिकाही केलेली होती. त्यामुळे गडक ऱ्यांच्या नाटकांतले अनेक संवाद त्यांना पाठ असत आणि त्यांचा त्या प्रसंगोचित मार्मिक वापरही करत. एखादा अपरिचित माणूस भेटीला येऊन खूप सलगीने बोलू लागला तर धुंडिराजाच्या शब्दांत त्या हळूच विचारत, ‘‘आता हे कोण बरे?’’ किंवा एखादी बाई पहिल्या भेटीतच आढय़तेने बोलू लागली, आपला बडेजाव सांगू लागली तर महेश्वरांच्या शब्दात त्या थट्टेने म्हणत, ‘‘काय अवदसा डोळ्यादेखत थापा मारते आहे!’’ ‘राजसंन्यासा’तली सुंदर गाणी त्यांना मुखोद्गत असल्यास नवल नव्हते; पण त्या नाटकातली पल्लेदार, अलंकारिक भाषणेही त्या अनेकदा म्हणून दाखवीत.

तशी इतरही जुन्या नाटकांतली कितीतरी गाणी लताबाईंना ज्ञात आहेत. पुढे पुढे त्या अनेकदा मला आपल्याबरोबर रेकॉर्डिगला नेऊ लागल्या. मीही कॉलेजचे टाइमटेबल सांभाळून त्यांची अनेक ध्वनिमुद्रणे जवळून ऐकण्याचा आनंददायक अनुभव घेतला. रेकॉर्डिगला जाता-येताना लहर लागली तर त्या अशी गाणी अगदी आवडीने म्हणून दाखवायच्या. त्यामध्ये ‘सौभद्रा’तील ‘पांडुनृपती  जनक जया’, ‘अरसिक किति हा शेला’ किंवा ‘सं. संशयकल्लोळा’तील ‘सुकान्त चंद्रानना’, ‘मृगनयना रसिक मोहिनी’ ही गाणी असत.

गडक ऱ्यांच्या नाटकांतील दीनानाथांनी अतिशय लोकप्रिय केलेली ‘शूरा मी वंदिले’, ‘चंद्रिका ही जणू’ किंवा ‘रवि मी चंद्र कसा’ यांसारखी गाणी थेट वडिलांच्या शैलीत म्हणताना त्यांना मोठा आनंद वाटत असे. साथीला वाद्ये नाहीत, समोर श्रोते नाहीत अशा अवस्थेत केवळ स्वत:च्या निर्भर आनंदासाठी लताबाईंनी गायिलेली ती गाणी माझ्या आजही स्मरणात आहेत.

ही तर सारी गाजलेली आणि सर्वश्रुत गाणी. पण अगदी बालवयात ऐकलेली किंवा आजोळी असताना आजीकडे पाठ केलेली गीतेही लताबाईंच्या तोंडून मला ऐकायला मिळाली आहेत. सांगलीला त्यांच्या घरासमोर एक भिकारीण येत असे. तिच्या तोंडून ऐकलेले ‘जाईजुईच्या झाडाखाली फुलांचा भडिमार गं’ हे गाणे त्याच्या गोड चालीमुळे आजही लताबाईंना चांगलेच आठवते. आजीच्या तोंडून ऐकलेली कितीतरी पारंपरिक गाणी लताबाईच नव्हे, मीनाताई, उषाताई यांच्या तोंडूनही सतत ऐकायला मिळत. ‘कुठे तुझे पंचपती दाविगे मला’ हे कीचकाचे किंवा पांडव वनवासात असताना त्यांच्याकडे दुर्वास ऋषी आपले ६० सहस्र शिष्य घेऊन आले, त्यावेळचे ‘दोन प्रहर रात्र झाली ऋषी आले भोजना। निद्रिस्त आम्ही होतो त्यांनी केली गर्जना’ ही गाणी लताबाईंना आजही आवडतात. पाठ येतात. इतकेच नव्हे, तर बालपणी आजीच्या तोंडून ऐकलेली खानदेशी भाषेतली ‘मेरे छलके जो घूम गये ढूंढ जमादार’सारखी गमतीदार लोकगीतेही त्यांच्या छान स्मरणात आहेत. स्वत: चित्रपटांना संगीत देताना त्यातल्या काही गाण्यांच्या चालीचा लताबाईंनी कलात्मक वापर केला आहे.

लताबाईंच्या लोकविलक्षण पाठांतराचा आणखी एक भाग म्हणजे जुनी धार्मिक गीते. रामदासांचे ‘मनाचे श्लोक’ किंवा त्यांचे ‘मारुतिस्तोत्र’ ऐन पारंपरिक चालीत त्या अतिशय गोड गातात. ‘घरे सुंदरे सौख्य नाना परीचे। परी कोण जाणेल हे अंतरीचे’ किंवा ‘भजनरहित रामा सर्वही जन्म गेला। स्वजनजन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला’ अशा ओळी लताबाईंच्या तोंडून ऐकताना त्यातले सारे कारुण्य, अगतिकता, माणसाचे एकाकीपण खोल ठसत जाई आणि हे सारे त्यांनी कधी पाठ केले असेल असा प्रश्न मनात उभा राही.

मी लताबाईंच्या घरी वारंवार जाऊ लागले तो काळ खरे तर त्यांच्या खूप कामाचा होता. त्यांच्याइतकी कामात व्यग्र असलेली व्यक्ती मी क्वचित पाहिली असेल. पण त्यातही वेळात वेळ काढून त्या साहित्याशी ठेवता येईल तेवढा संपर्क ठेवीत. कोल्हापूरला गेल्या म्हणजे जाताना बरोबर पुस्तके नेत आणि तिथे निवांत वाचन करीत. मराठीइतकेच- किंबहुना थोडे अधिक त्यांचे हिंदी वाचन असे. एकदा आम्ही शरदबाबूंच्या साहित्याबद्दल बोलत होतो. मी त्यांना मामा वरेरकर यांनी केलेले अनुवाद वाचण्याविषयी सुचवले, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘शान्ताबाई, मी हिंदी अनुवादांमधून शरदबाबूंचे सारे साहित्य वाचलेले आहे!’’

शरदबाबू लताबाईंचे फार आवडते लेखक. तशी रवींद्रनाथांची अनेक बंगाली गीते त्यांनी ध्वनिमुद्रित केली आहेत. पण शरदबाबू गद्य लेखक असूनही त्यांच्या कथा-कादंबऱ्या लताबाईंनी अगदी मन लावून बारकाईने वाचलेल्या आहेत असे त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवत राही. त्यातले संदर्भ, व्यक्तिरेखा लताबाईंच्या बोलण्यातून अनेकदा प्रकट होत.

एकदा त्यांच्याबरोबर कलकत्त्याला जाण्याची संधी मला मिळाली. सनातन मुखर्जी या बंगाली गृहस्थांनी लताबाईंच्या गाण्याचा कार्यक्रम तिथे ठरवला होता आणि लताबाईंची व त्यांच्या सर्व परिवाराची उतरण्याची व्यवस्था त्यांनी चौरंगी विभागात नव्यानेच उघडलेल्या ‘स्ट्रँड’ नावाच्या एका पंचतारांकित आलिशान हॉटेलात केली होती. हॉटेल अतिशय सुंदर होते. पण लताबाई मला म्हणाल्या, ‘‘खरे सांगू का? मला इथे चुकल्या चुकल्यासारखे वाटते!’’

‘‘का बरे?’’ मी आश्चर्याने प्रश्न केला.

‘‘हे हॉटेल तर सुंदर आहे!’’

‘‘ते खरे.’’ लताबाई म्हणाल्या, ‘‘पण आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा कलकत्त्याला आले आहे तेव्हा मी इथल्या ‘ग्रँड हॉटेल’मध्येच आवर्जून उतरलेली आहे!’’

‘‘त्या हॉटेलचं एवढं काय वैशिष्टय़ आहे?’’ मी कुतूहलाने प्रश्न केला. त्यावर किंचित हसून लताबाई म्हणाल्या, ‘‘शरदबाबूंची ‘विप्रदास’ वाचली आहे ना तुम्ही? त्यातली वंदना आणि तिचे वडील कलकत्त्याला येतात तेव्हा ते या ग्रँड हॉटेलमध्ये उतरतात. त्यामुळे मला या हॉटेलबद्दल विशेष आपुलकी वाटते.’’

लताबाईंचे ते बोलणे ऐकून शरदबाबूंच्या साहित्याविषयीच्या त्यांच्या प्रेमाची मजेदार साक्ष मला पटली. असाच आणखी एक प्रसंग.. त्यावेळी दूरदर्शनवर शरदबाबूंच्या ‘श्रीकान्त’वरची मालिका सुरू झाली होती. ‘श्रीकान्त’वर लताबाई अनेकदा बोलत. तेव्हा त्या ही मालिका नक्की बघत असतील असे मला वाटले. पण मी त्यांना त्याबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘नाही. मी ‘श्रीकान्त’ मालिका बघत नाही, बघणारही नाही.’’

‘‘का बरे?’’ मी अतिशय आश्चर्याने प्रश्न केला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘शान्ताबाई, ‘श्रीकान्त’ ही माझी फार आवडती कादंबरी आहे. श्रीकान्त आणि राजलक्ष्मी यांना माझ्या मनात विशिष्ट जिव्हाळ्याचे स्थान आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना तिथे काही व्यक्तिमत्त्व, रंगरूपही मिळालेले आहे. दूरदर्शनवरच्या नट-नटय़ांची कामे सुंदर होत असतील, पण मला माझ्या मनातला श्रीकान्त, ती राजलक्ष्मी यांची माझ्यापुरती असलेली चित्रे बिघडवायची नाहीत. म्हणून मी त्यांच्यावरची मालिका बघत नाही!’’

लताबाईंचे ते विवेचन मला मार्मिक वाटले. त्याचबरोबर कथा-कादंबऱ्यांतल्या आपल्या आवडीच्या व्यक्तिरेखा आणि नाटकात किंवा रूपेरी पडद्यावर त्यांना दिली जाणारी रूपे यांच्यामधल्या नात्यासंबंधी काही वेगळा बोध मला झाला. नंतर त्या विषयावर मी एक लेखही लिहिल्याचे मला आठवते.

लताबाईंना बंगाली साहित्याची बरीच माहिती आहे. बंगाली भाषेत त्या उत्तम बोलू शकतात. हृषिकेश मुखर्जी, सलिल चौधरी यांच्याशी बंगालीत गप्पा मारताना मी त्यांना ऐकले आहे. अनेक बंगाली गीते त्यांनी ध्वनिमुद्रित केली आहेत. इतकेच नाही तर गेली कित्येक वर्षे त्या बंगालीतल्या सर्वाधिक लोकप्रिय गायिका होत्या. रवींद्रनाथांची अनेक गीते त्यांनी गायिली आहेत. इतकेच नव्हे तर सलिल चौधरी यांनी माझ्या कोळीगीतांचा बंगालीत अनुवाद केला तेव्हा ती गाणीही लताबाई आणि हेमन्तकुमार यांनीच ध्वनिमुद्रित केली होती. सलिल चौधरी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांची बंगाली गीते गाताना मी ते ध्वनिमुद्रण ऐकलेले आहे. बंगाली साहित्याचे लताबाईंचे ज्ञान कधी कधी अचानक प्रकट होत असे. एकदा मी त्यांना कवी रेंदाळकर यांची ‘अजुनि चालतोच वाट’ ही कविता वाचून दाखवली. कविता लताबाईंना आवडली. पण  त्यांनी मला विचारले,

‘‘शान्ताबाई, या कवीला बंगाली येत होतं का?’’

‘‘येत होतं!’’ मी आश्चर्याने प्रश्न केला, ‘‘का बरे?’’

‘‘मी तुम्हाला विचारले ते अशासाठी, की बंगालीत अशाच आशयाची ‘रानार’ म्हणून एक कविता आहे. ‘रानार’ म्हणजे ‘रनर’ म्हणजेच ‘पोस्टमन’! गंमत म्हणजे ही कविता मी ध्वनिमुद्रितसुद्धा केलेली आहे!’’ लताबाई म्हणाल्या.

मी चकित झाले. रेंदाळकरांच्या कवितेसंबंधी एक वेगळाच तपशील मला मिळाला होता. त्याचबरोबर लताबाईंची रसिकता, काव्याची त्यांची चोखंदळ जाण आणि त्यांची तल्लख स्मरणशक्ती यांचाही मला अनपेक्षित प्रत्यय आला होता.

बंगालीइतकेच संस्कृतचेही लताबाईंना आकर्षण वाटते. हे कळले तेव्हा मी आवडणारी संस्कृत सुभाषिते त्यांना सांगू लागले. त्या परदेश प्रवासाला गेल्या तेव्हा काही सुभाषितांचे मराठी अनुवाद करून ती वही मी त्यांना दिली होती. ही सर्व भावंडे लहान असताना त्यांच्या वडिलांनी मुलांचे उच्चार निर्दोष व्हावेत म्हणून एक संस्कृत गुरुजी त्यांना शिकवायला ठेवले होते. त्यांनी काही सोपे श्लोक, स्तोत्रे मुलांकडून पाठ करवून घेतली होती. पुढे उर्दू गीते ध्वनिमुद्रित करावी लागली तेव्हा आपले उर्दूचे उच्चार साफ व्हावेत म्हणून लताबाईंनी एका उर्दू शिक्षकाची नेमणूक केली होती. त्यांना त्या ‘मास्टरजी’ म्हणत. भगवद्गीतेच्या अध्यायांचे ध्वनिमुद्रण करताना तर लताबाई एखाद्या विद्यार्थिनीसारख्या गो. नी. दांडेकरांच्या समोर बसत आणि अप्पा त्यांच्याकडून गीतेतील शब्दांचे उच्चार घटवून घेत.

एकदा लताबाई म्हणाल्या, ‘‘शान्ताबाई, शंकराचार्याच्या ‘सौंदर्य लहरी’ काव्याबद्दल मी खूप ऐकलं आहे. कधीतरी ते ध्वनिमुद्रित करण्याची माझी इच्छा आहे. ‘सौंदर्य लहरी’ कुठे मिळेल का?’’

मी ‘सौंदर्य लहरी’ हे नाव ऐकले होते. पण प्रत्यक्ष ते काव्य कधी मला बघायला मिळाले नव्हते. आता लताबाईंनी त्या काव्याची चौकशी केल्यानंतर माझेही कुतूहल जागृत झाले. मी ते काव्य त्यांना मिळवून दिले. स्वत:ही थोडेबहुत वाचण्याचा प्रयत्न केला. पुढे काय झाले मला कळले नाही. ‘सौंदर्य लहरी’ ध्वनिमुद्रित करण्याचा लताबाईंचा विचार नंतर मागे पडला असावा. एक मात्र खरे, की आपली व्यावसायिक ध्वनिमुद्रणे सांभाळून केवळ विशिष्ट कवींबद्दलच्या उत्कट प्रेमामुळे लताबाईंनी अशी वेगळी ध्वनिमुद्रणे कितीतरी केली आहेत. ‘शिवकल्याणराजा’, मीरेची गाणी, गालिबच्या ‘गझला’, भगवद्गीतेचे दोन अध्याय आणि ज्ञानदेवांच्या विराण्या- लताबाईंच्या या सर्व गीतांना अपरंपार लोकप्रियता मिळाली. ‘मीरा’ आणि ‘गालिब’ या ध्वनिमुद्रिका तर अप्रतिम आहेतच; तेच ज्ञानदेवांच्या विराण्यांबद्दलही म्हणता येईल. या साऱ्या ध्वनिमुद्रणांना मला हजर राहता आले याचा मला आजही फार आनंद वाटतो आणि त्यावेळी लताबाईंनी मला मीरेच्या काव्याचा, गालिबच्या गझलांचा जो अर्थ समजावून सांगितला त्याने माझ्या काव्यविषयक जाणिवेत कितीतरी भर पडलेली आहे याचा मला प्रत्यय येतो.

आज मागे वळून पाहिले तर मंगेशकरांबरोबरच्या- विशेषत: लताबाईंबरोबरच्या आपल्या त्या मैत्रीचा काळ किती सुंदर होता हे ध्यानात येते. लताबाईंच्या घरातही त्याकाळी अनेक घटना घडत होत्या. त्यांची ध्वनिमुद्रणे जवळजवळ रोज चालू होती. राज कपूर, सिप्पी, चोपडा अशा मातब्बर निर्मात्यांच्या जोडीने सामान्य निर्मात्यांच्या चित्रपटांसाठीही त्या गात होत्या. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, सलिल चौधरी, आर. डी. बर्मन.. अशा कितीतरी जुन्या-नव्या संगीत दिग्दर्शकांबरोबर त्या कामे करत होत्या. त्यांचा पहिला परदेश प्रवास, चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीचा २५ वर्षांच्या वाढदिवसाचा सोहळा, शासनाकडून ‘पद्मभूषण’ पुरस्काराची प्राप्ती, हृदयनाथचे लग्न, त्यांच्या मुलांचे जन्म, वाढदिवस, अनेक कौटुंबिक समारंभ आणि जाहीर सत्कार.. येई तो दिवस भरगच्च काम घेऊन येई आणि अपेक्षित आनंदाचा लाभ करून देई. मी केवळ एक कौटुंबिक मैत्रीण. पण या साऱ्या खाजगी आणि जाहीर कार्यक्रमांत लताबाईंनी मला जिव्हाळ्याने सामावून घेतले. त्यांनीच केवळ नव्हे, तर साऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी मला आपले मानले. माझ्या अवघड काळात मला आधार, दिलासा दिला. त्या आठवणी आजही मनात कायम आहेत. त्यांनी आपल्याला किती संपन्न आणि समृद्ध केले, या जाणिवेने हृदय भरून येत आहे.

पंचाऐंशी साली माझे मुंबईचे राहणे अचानक संपुष्टात आले आणि मी पुण्याला येऊन स्थायिक झाले. तरी मुंबईत जडलेले हे नाते अजूनही अबाधित राहिले आहे. आजही लताबाई, त्यांची भावंडे अधूनमधून पुण्याला येतात. आमच्या घरापासून जवळच असलेल्या ‘श्रीमंगेश सोसायटी’तल्या घरी उतरतात. मी त्यांना भेटायला जाते. सुरुवातीचे अवघडलेपण थोडय़ाच वेळात दूर होते आणि सुरू होतात गप्पा, जुन्या-नव्या आठवणी, विनोद, चेष्टामस्करी, जिव्हाळ्याने केली जाणारी माझी विचारपूस आणि चहा-खाणे हेदेखील.. जुन्या प्रेमाचा नवा प्रत्यय नवा आनंद घेऊन येतो. मन सुखावते.
(शैला दातार यांच्या संग्रहातून)