Wednesday, October 28, 2020

*भा.रा.तांबे*

*भा.रा.तांबे*


मधुघट!

आधुनिक मराठीतील गीतकाव्य या साहित्य प्रकाराचे प्रवर्तक असे ज्यांचे उचीत वर्णन केले जाते, त्या राजकवी भास्कर रामचंद्र उर्फ भा. रा. तांबे यांचा आज १४६ वा जन्मदिन.

शब्द व गेयता यांचे निसर्गदत्त लेणे लाभलेल्या तांबेंनी बालगीते, प्रणयगीते, निसर्गगीते, विराणी अशा गीतकाव्याच्या सर्वच क्षेत्रांत मुक्त मुशाफिरी केली व आपल्या शब्दप्रतिभेचा कायमचा ठसा मराठी मनावर उमटवला.

तांबेंचा जन्म व सारी हयात महाराष्ट्राबाहेर हिंदीभाषी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी गेली. त्यांचे शिक्षणही अलाहाबाद येथे झाले. पण १९ व्या शतकात उत्तरेत अनेक मराठी भाषक संस्थाने होती. त्यामुळे त्यांना राजाश्रय मिळाला. ते ग्वाल्हेर संस्थानचे 'राजकवी' बनले.

*झांशीच्या राणी लक्ष्मीबाई या तांबेंच्या आत्या.* ते वीररक्त तांबेंच्या धमन्यांमधून वाहात होते. त्यांनी विरश्रीयुक्त कविता लिहिली:

हे हिंद बांधवा थांब या स्थळी
दोन अश्रू ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मालवे
इथे झाँसीवाली ।।

'हे दूध तुझ्या त्या घटातले', 'डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका', या सारख्या त्यांच्या कवितांनी प्रणयरस फुलवला, तर 'तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा'त  भावा-बहिणीचे प्रेम दाखवले.

वार्धक्य, मृत्यू व वियोग या संज्ञांबद्दल तांबेंना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता,  असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. 

कळा ज्या लागल्या जीवा
मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे
कुणाला काय सांगाव्या

अशा त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा! 

कशी काळनागिणी
सखी गं वैरिण झाली नदी
प्राण विसावा पैलतीरावर
अफाट वाहे मधी

ही तांबेंची विरह कविता अंतर्मुख व्हायला लावणारी आहे.

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या', 'मावळत्या दिनकरा' 'जन पळभर म्हणतील हाय हाय', अशा कवितांतून त्यांना त्यांच्या अखेराची स्पष्ट जाणीव झाल्याचे जाणवते.

मृत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले.

तांबे १९४१ साली गेले. त्याच्या थोडाच काळ आधी त्यांना एका दिवाळी अंकात कविता लिहिण्याविषयी विनंतीचे पत्र आले. त्यावेळेस उत्तरादाखल त्यांनी कविताच पाठवली. ती बहुधा त्यांची अखेरचीच कविता असावी, असे म्हटले जाते.

तीच ही 'मधुघट' कविता :

मधु मागशि माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं न रोष सख्या, दया करीं.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगीं अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचें मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचें नांव का सया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.

- *भारतकुमार राऊत*

No comments:

Post a Comment