Tuesday, October 13, 2020

नवऱ्याशी वागावं कसं! लेखिका नीता गोडबोले

नवऱ्याशी वागावं कसं!              लेखिका नीता गोडबोले 

थंड पाणी प्यावं म्हणून मैत्रिणीकडे (आशाकडे )गेल्या गेल्या मी फ्रीज उघडला अगदी दर्शनीच दोन मऊ अन सुरकुतलेले चिक्कू दिसले मी पाणी घेतलं अन् आशाला म्हटलं ,”हे चिक्कू अगदी खराब झालेले दिसतात चिरून बघते म्हणजे टाकून तरी देता येतील “
“राहू दे “आशा म्हणाली.
“अगं अगदी खराब झाल्यासारखे दिसताहेत.”
“ अगं शोधलं तर तर बरंच काही सापडेल,उद्या फ्रीझ डिफ्रॉस्ट करायचाच आहे.”
“पण ते चिकू ..........”
माझं वाक्य अर्धवट तोडत आशा म्हणाली ,”राहू दे ग,नाही तरी ऑफिसमधून आल्याआल्या पाणी प्यायच्या निमित्ताने हे फ्रीज उघडतात अन मग समोरच असं काही दिसलं की तत्परतेने फेकून देतात .”
“अग मग आताच दे की टाकून.”
“तुला माहित नाही ,आशा म्हणाली,”यांना असं चटकन बोलायला निमित्त मिळालं की बर असतं ,नाही तर आल्या आल्या तासभर फ्रिजमध्ये उचकपाचक करून ‘दोन वाट्या शिळं ताक ,परवाची उरलेली गवारीची भाजी ,काल रात्रीची आमटी ,आठवड्यांपूर्वीचं इडलीचं थोडंसं पीठ, गुलाबजामचा उरलेला पाक ,पंधरा दिवसांपूर्वीचा चीजचा बोटभर तुकडा ‘असं काढून दाखवतात.”
माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून  आशाच पुढे म्हणाली ,
“माझ्या नवऱ्याला स्वच्छतेची भारी आवड , मला त्याच्यासारखा घर स्वच्छ ठेवता येत नाही ही त्याची ठाम समजूत ! मी अगदी आटापिटा करून सर्वच्लं कोट्यातही तो दोष काढतोच त्यामुळे आजकाल मीच वागण्याचं तंत्र बदलले बाहेरची खोली पूर्ण आवरली तरी मी  आदल्या दिवशीचा पेपर टीपॉयवर तर ताजा पेपर बेडरूममध्ये डायनिंग टेबलवर ,एक दोन डिव्हीडी ची कव्हर  एकीकडे डिव्हिडी  दुसरीकडे असे ठेवते ,आल्या आल्या बराच पसारा आवरायला मिळाला की त्याला मला बोलायला निमित्त मिळतं आणि मुद्दामच ते ठेवलं असल्याने मलाही त्याचं काही वाटत नाही.ऑफिसमधून आल्या आल्या आशाच्या नवऱ्याने फ्रीज उघडला अन् “काय हे चिक्कू किती खराब झालेत”म्हणत तत्परतेनं फेकून दिलेत.चेहऱ्यावर बायका या अशाच आम्हा पुरुषांचं लक्ष असतं म्हणून निभतं बरं असा भाव !
                  
        “काय हे एक वस्तू नीट ठेवलेली नसते म्हणत सगळं आवरलं ,एका दगडात दोन पक्षी ! 
“माझं घरात कसं लक्ष असतं,अन काहीही म्हटलं तरी बायको कसं उलट उत्तर करत नाही “या दोन्ही गोष्टी इतरांपुढे मिरवायला नवरे उत्सुक असतात. 

     बायकोला बोलायचं निमित्त बहुतेक नवरे शोधात असतात अशा वेळी आपणच निमित्त पुरवायचं अन् प्रेक्षक बनायचं हे मैत्रिणीचं तंत्र मला फारच आवडलं . 

    बहुतांशी एखाद्या रविवारी नवऱ्याला घर आवरायची हुक्की येते मग निवडून मोक्याच्या जागा शोधल्या जातात उदाहरणार्थ दिव्याच्या शेड्स ,डायनिंग टेबल किंवा सोफिया खालची जळमट, स्टोअर रूम, काहीच नाही मिळालं तर बायकोची पर्स तर असतेच!!!  एकच सुट्टीचा दिवस तरीही मलाच घराची स्वच्छता करावी (बघावी ?)लागते आहे ! मी आहे म्हणून संसार निभतोय  चा आव आणत आवराआवरीला सुरुवात होते .
“किती घाण झाली होती लॅम्पशेड आता कशी नवी दिसतेय, कुठलीही वस्तू मेंटेन करावी लागते ! किंवा तो जुना पतंग कशाला ठेवलाय जपून? अन ह्या औषधाच्या  रिकाम्या बाटल्या ?अन् हा गॅसचा कार्डबोर्डचा खोका?  दे फेकून असं विजयी स्वरात म्हणत नवरा सैनिकांच्या आवेशात घरातल्या वस्तूंवर वार करत असतो आपण गप्प बसून एक एक वार  झेलायचे कारण अश्या वेळी मी आवरणारच होते ,फेकणार होते, ही समर्थान नवऱ्याला मुळीच पटत नाहीत .उलट दोन दिवसांनंतर “माझा पतंग कुठे?” म्हणून मुलाने भोकाड पसरले की आपण त्याला बाबांकडे समजूत घालायला पाठवायचे असते तेव्हा त्याला तो जुना पतंग का जपून ठेवावा लागतो ते कळतं.
       इतर बाबतीत मात्र परवा यांनी लैंप शेड धुतली किंवा टेबल खुर्च्यांना पॉलीश केलं असं कौतुकानं चार चौघात विशेषत: नवऱ्याच्या मित्रात किंवा नातेवाईकांत सांगितलं की नवर्याची खुशी काय वर्णावी!!! आता ही तंत्र जरा मुरल्या खेरीत जमत नाहीत.
       लग्न झाल्यानंतर चे नवे नवलाईचे दिवस सहाजिकच तांदूळ किती आहेत ? भाजी आणली की नाही ?कणिक संपली का ? वगैरे तपशील कसे लक्षात राहणार ?त्यामुळे नेहमीच कणकेचा डबा पार रिकामा होईपर्यंत लक्षातच यायचे नाही . त्यानंतर गहू आणून ते निवडून दळायला देणे म्हणजे दोन तीन दिवस बिन पोळीचे अन् असं तर नेहमीच व्हायचं ,दर दहा पंधरा दिवसांनी आमटी भात किंवा ब्रेड आम्लेट!  एकदा केव्हा तरी नवर्याच्या  लक्षात आलं . लक्षात आल्याबरोबर तमाम नवरे जातीशी इमान राखून त्याने “नो प्रॉपर मॅनेजमेंट “असा कुजकट शेरा दिला . राग आला  खूप कारण अशा वेळी बायकोची अपेक्षा असते की नवऱ्याने कौतुकाने म्हणावं की “आता तर संसारात पडली आहेस येईल  हळूहळू .” 
   नवं लग्न नवी स्कूटर त्यामुळे रोज भटकणं  ठरलेलं एकदा पेट्रोलपंपाशी ,एकदा  घराजवळ स्कूटर ठप्प!  रिझर्वला  आल्यानंतरही पेट्रोल न भरल्याने ही अवस्था ! तिसऱ्यांदा हॉटेलमधून जेवून बाहेर पडलो होतो ,डोळ्यावर गुंगी आलेली अन् धड ना पेट्रोल पंपाजवळ ना घर जवळ अशी स्कूटर ठप्प ! पेट्रोल  पूर्ण संपलेलं ,आधीचा राग मनात होताच त्यामुळे तोंडून पटकन निघालं “नो प्रॉपर मॅनेजमेंट” तेव्हा अभावितपणे निघून गेलेल्या शब्दांनी काम केलं . 

   आता काय बिशाद आहे “नो  प्रॉपर मॅनेजमेंट “म्हणायची  ? (कणिक संपली तरी .)

     पण प्रत्येक वेळी असं जशास तसं चालत नाही . आता हेच बघा बदली झाल्याने सामानाची आवराआवर सुरू आहे नवरा बाहेरच्या खोलीत सामानाच्या गराड्यात भांबावून बसला आहे , अशा वेळी आपल्या मनात येतं बाबा किती चटकन पॅकिंग करायचे बदली झाली की , आईचं आपलं निवांत स्वयंपाक वगैरे सुरू असायचं ,पण तसं बोलून दाखवलं तर तोबा तोबा कारण सासू सुने प्रमाणे जावई सासऱ्याचं नातं असतं.  मुलाला आई आदर्श तर मुलीला बाबा ! 

    पण या उलट घडतं ते स्वयंपाक घरात आपली तारांबळ उडते तेव्हा . भाजीपोळी एका वेळी करायची म्हणजे कसरतच. अर्थात स्वयंपाकाची सवय नसलेल्या काळात पोळ्या करू म्हटलं तर भाजीकडे दुर्लक्ष अन् भाजी बघू म्हटलं तर पोळी जळून खाक ! आपली धांदल बघून नवरा मध्ये एक बाण सोडतो ,”माझी आई एकीकडे पुरणाच्या पोळ्या अन् दुसरीकडे भजी गरमगरम करून वाढायची” असं ऐकल्यावर,” हो करत असतील त्या ,इतकी  वर्षे संसार झालाय त्यांचा “ असं पटकन मनात येतं पण ते ओठावर ठेवून म्हणायचं,”  जमतं  एकेकाला , मलाही शिकून घ्यायला हवं त्यांच्याकडून . चेहऱ्यावर जितके बाळबोध भाव आणता येतील तितकं चांगलं ,कारण मग तेवढ्या एका वाक्याने काम होतं ,अन् त्यानंतरचे  काही दिवस तरी नवरा कच्ची भाजी आणि करपलेल्या पोळ्या निमूट खातो .

       लग्नाची नवलाई जशी कमी होत जाते तसतसं नवऱ्यांना इतरांच्या बायकांची स्तुती करायला स्फुरण येतं . “दिलीपच्या बायकोनं  काय फॉर्म राखला आहे , वाटत नाही दोन मुलांची आई म्हणून! “  किंवा  “हेमंतची बायको फारच अॅक्टिव्ह हं सतत काही तरी करत असते, नोकरी तर आहेच शिवाय तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करते, पेंटिंग करते ,योगाच्या क्लासला जाते “ किंवा “राम नाथनची बायको खरी सुगरण हं ,काय सांबार बनवलं होतं परवा ?”  असल्या कुठल्याही वाक्यावर आपला फक्त हूं असतो. त्याच्या वाढत्या स्तुती गणित ‘घरकी मुर्गी ‘ वगैरे वगैरे आपल्याला सुचायला लागतं अन् तिथेच घात होतो . मग नवऱ्याचं मत बनतं की  तुला इतर कुणाचे चांगले गुण वाखाणलेले पण आवडत  नाहीत . “जेलसी दाय नेम इज वूमन” वगैरे वगैरे .
 
        आता समजा नवऱ्यानं कुणाच्या पदार्थाची स्तुती केली की आपण म्हणायचं ,परवा आले होते नं ते आपल्याकडे , भेळ केली होती मी त्यादिवशी, तेव्हाच मी तिला म्हटलं ,”  मला सांबार  शिकायचंय म्हणून “ आता अर्थात” भेळ” केली होती मी हे वाक्य जरा ठासून म्हटलं की झालं . भेळ खाल्ल्यावर ,” छान झालीय भेळ ,तू पण शिकून घे “ असं रामनाथन ने आपल्या बायकोला म्हटलेलं नवऱ्याला आठवतं अन् “भेळ  तुला छान जमते”  असं गुळमुळीतपणे का होईना म्हणावंच लागतं . अर्थात काही जण “पण तू सांबार शिकून घे “ असं म्हणून बायकोने कितीही प्रश्नाला बगल देता द्यायचा प्रयत्न केला तरी मूळ मुद्दा डावलत नाहीत ते वेगळं !  

   एखादे वेळी आपली एखादी मैत्रीण आपल्या बरोबर एक वीस पंचवीस इडल्या होतील असा इडली कुकर आणि दोन डोशांचे  तवे “जातेच आहेस तू  पुण्याला तर एवढं घेऊन जा , नणंदेला हवं होतं माझ्या “ म्हणत माथी मारते . अर्थात आपणही ते स्वीकारलेलं असतं कारण  पुढल्या वेळी हीच मैत्रिण आपल्याला दिल्लीहून संगमरवरी पोळपाट आणून देणार असते . पण गावाला जायचं तेही नवर्याबरोबर,  अन् असल्या वस्तू घेऊन झालंच , आधीच आपल्या साड्यांनीच  निम्म्यापेक्षा जास्त बॅग भरली म्हणून नवर्याची  तक्रार असतेच .
    
        अशा वेळी मुलं खेळायला गेल्याची संधी साधून म्हणायचं ,”अहो ,तुमची ती मैत्रीण ,”(कधी काळी नवरा अन् तुमची जास्त असलेली मैत्रीण एकाच गावी होते चा फायदा घेऊन) “ तुमची ती मैत्रीण “ असं  म्हटलं की बाण वर्मी बसतो .
“कोण ग कोण ?” इति नवरा .
(“हुं जणू काही शेकड्यांनी मैत्रिणी आहेत “ ) असं मनात म्हणत मोठ्यांना म्हणायचं ,”तीच ती तुमच्याबरोबर हैदराबादला होती ती छाया राजमाचीकर , परवा आली अन  म्हणाली ,”पुण्याला तिची नणंद असते ,तिला मोठा इडली कुकर अन् डोशांचे तवे  हवे आहेत , घेऊन जाशील का म्हणून? “ ( अन् मग जास्तीतजास्त त्रासिकपणे म्हणायचं ), ”लोक तरी कसले काय वाट्टेल त्या वस्तू द्यायला मागे पुढे बघत नाहीत. 

“ म्हटलं नाही ना तिला तसं ?” नवरा धास्तावून विचारतो .

“इश्श तोंडावर  कसं म्हणेन?” ( सापडला ना सापळ्यात ) 

  “ आता दिले ना तर घेऊन जाऊ ,नाही तरी आपलं रिझर्व्हेशन आहे ,हमाल पण करावाच लागेल . चालायचंच शेजार धर्म!” आता इडली कुकर बरोबर दोन कॉफी फिल्टर आपल्या वाहिन्यांसाठी ,एक डोशाचा तवा मैत्रिणीसाठी ,काही मदुरै कॉटनच्या  साड्या बहिणीसाठी ,मद्रासच्या चादरी अजून कोणासाठी तरी असतात . चालायचंच नातेवाईक धर्म असतोच नं!

    नवऱ्याची मैत्रीण म्हणजे अवघड जागेचं दुखणं . अर्थात खरीखुरी मैत्रिण की जीचं नाव काढताच आपली तळपायाची आग मस्तकात जाते किंवा अंगाचा तिळपापड होतो अशी ! योगायोगाने अश्या मैत्रिणीशी आपली गाठ पडते , नुसती गाठच  नाही तर एका गावात राहण्याचा योग येतो नवऱ्याला इतर तमाम बायकांमधले  गुणच दिसत असतात ,मग ही तर खरी खुरी मैत्रीण. 

   आपण सोयीस्करपणे नवरा गात असलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करायचं अन् म्हणायचं ,”परवा किनई त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला तिच्या नवर्याने  तिला अमेरिकन डायमंडचे कानातले घेऊन दिले ,की लगेच आपल्याला आपल्या लग्नाचा वाढदिवस नसतानाही ते मिळतात ,कारण तिच्या नवऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ असं नवऱ्याला दाखवून द्यायचं असतं .

    नवऱ्याने  जळमट झालीत किंवा धूळ साचली म्हटलं की तिनं  - सॉरी , तिच्या नवऱ्यानं  व्हॅक्यूम क्लीनर घेऊन दिला तिला म्हणायचं किंवा एखादे वेळी आपण होऊनच म्हणायचं ,”परवा किनई  तिच्या नवऱ्याने तिला सरप्राइज गिफ्ट म्हणून पटोला साडी आणली.”   

       थोडक्यात काय की नवऱ्याने आपली तिच्याशी तुलना करण्याआधी आपण च नवर्याची तिच्या  नवऱ्याशी तुलना केली की स्वतःचं श्रेष्ठत्व सांभाळण्यातच त्याची त्रेधा उडते .

          अर्थात केव्हा कसं अन् काय बोलायचं हे जिचं तिनंच ठरवायला हवं कारण “व्यक्ती तितक्या प्रकृती “
      
         नाही तर हा लेख वाचून तुम्ही पण म्हणाल बघा हो पमीच्या - पमी म्हणजे अर्थातच तुमच्या नवऱ्याची मैत्रीण !
  मैत्रिणीची नाव प्रमिला सुशीला अशी असली तरी त्याचं पमी , पम्मू किंवा  सुशी ,शिलू  असं करून आपले आपल्या मैत्रिणीशी फारच जिव्हाळ्याचे संबंध होते असं दर्शवायला बहुतेक नवऱ्यांना आवडते . (मग भले तुमच्या नावाचा शॉर्टफॉर्म उच्चारायला एखादा खास दिवस उजाडावा लागतो .) 
      बरे ते असो , तर तुम्ही म्हणाल बघा हो पमीच्या नवऱ्याने तिला किती सुरेख नारायणपेठ साडी आणून दिली, आणि काही दिवसांनी तुमचा नवरा म्हणेल ,”तुला फारच वाईट वाटत होतं ना पमीला  तिच्या नवऱ्याने नारायणपेठ साडी घेऊन दिली म्हणून!  
     बघ मी पण ................... इथे तुम्ही श्वास रोखून तुम्हाला कुठली साडी  मिळतेय चा अंदाज बांधाल अन् कानावर शब्द आदळतील,” बघ मी पण कांजीवरम साडी घेऊन दिली बरका तिला .”
———-———————————x———————————————x————————————- 

Sent from my iPad

No comments:

Post a Comment