Sunday, February 23, 2020

पिशी मावशी आणि भुतावळ । विंदा करंदीकर

 उपक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तनुजा रहाणे यांनी त्या कवितासंग्रहातील एक कविता, तसेच रत्नाकर मतकरी यांची ‘ऐक, टोले पडताहेत’ ही कथा सादर केली आहे....
.........
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई
स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्टर
दोन पोरे लठ्ठत मठ्ठे
पण प्रत्येक एकादशीस
रताळ्याचा खाते कीस.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आला आला महासमंध;
त्याची चाल संथ संथ
त्याची उंची दहा फूट
अंगावरती काळा सूट,
डोक्यावरती हॅट बीट,
तुम्ही फसाल! पहा नीट
वळवळणारे गळ्यात काय?
नागोबाचा लंबा टाय!
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपोआप खोले!
आले आले थातूमातू ;
हे खाते रोज सातू
जर सातू नसले घरात 
तर बसते नखे खात.
रोज रात्री मांजरावरुन 
हे येते जग फिरुन,
हे भूत आहे मुत्रे,
तरी त्याला भितात कुत्रे.
किर्र रानी सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्यांचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आले आले अरेतुरे;
हे भूत काळेबेरे
मध्य रात्री रांगत येते;
दारावरती थाप देते.
जर त्याला घेतले घरात
जीभ काढते तेरा हात.
पण कारे म्हटले तर,
जाईल सोडून तुमचे घर.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला आग्या वेताळ;
त्याच्या डोक्यात असतो जाळ.
कोळसे खातो कराकर;
राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरून
भुते घेतात स्वैपाक करून
केसामधून उठतात ज्वाळा,
सगळे न्हावी भितात त्याला.
किर्र रात्री सुन्न रानी;
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आला आला पिंपळावरून
एक मुंजा संध्या करून.
त्याची पोथी चालत येते;
हळूच त्याच्या हातात जाते.
रक्तातसारखी पाने लाल,
खुणेसाठी असते पाल.
तीच पोथी ऐकण्यासाठी
भुते आली; झाली दाटी
पाल लागली चुकचुक करू,
पोथीवाचन झाले सुरू;

हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड
फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
सर्व आले सर्व आले
दार हसले बंद झाले!

- विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के । विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के! - अभिवाचन : वैभव मांगले


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे अभिनेते वैभव मांगले यांनी...
........
जितकी डोकी तितकी मते 
जितकी शिते तितकी भुते;
कोणी मवाळ कोणी जहाल 
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढिले कोणी घट्ट; 
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा 
तुम्ही पेरा तुम्ही कापा
जुन्या आशा नवा चंग 
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? 
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्यामध्ये 
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के 
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी 
जिकडे सत्य तिकडे गोळी;
जिकडे टक्के तिकडे टोळी
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; 
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू" : चित्रपट : वक्त । रोहित कुलकर्णी

*"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू" : चित्रपट : वक्त !*

           *{ रसग्रहण : रोहित कुलकर्णी. }*

#Cinemagully
**********************************
*'वक्त'* ... ! या 1965 साली आलेल्या आणि रवी यांच्या संगीताने सजलेल्या चित्रपटाच्या नावाला अत्यंत साजेसं असं हे गीत ... आशाताईंच्या 'आशादायक' स्वरातील या गीताचे गीतकार... शायर साहिर लुधियानवी !

*"आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू"* ...
**********************************
      *'वक्त'*.... काळ हा एकाचवेळी अनादि, अनंतही असतो आणि त्याचवेळी तो क्षणभंगूरही असतो !
      'वक्त' ... वेळ ही कधी अगदी सरता सरत नाही आणि कधी तीच वेळ वाळूसारखी ओंजळीतून निसटून जाते तेव्हा हातात उरता उरत नाही !
      वक्त के 'सितम' आणि 'करम' दोन्ही भोगलेल्या साहिरसारख्या शायरने हे सगळं तत्त्वज्ञान इतक्या सहज आणि सोप्या शब्दात सांगितलंय की ते अक्षरशः  'Timeless Classic' होऊन मनामनात रूजलं आहे !
**********************************
*आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू जो भी है, बस यही एक पल है*

      एखाद्या जीवाच्या जिवलगाने सहज खांद्यावर हात ठेवून सांगावं; इतक्या सहजतेने साहिर हे कालातीत सत्य सांगून गेले आहेत ! यातील 'जाने ना तू' हे शब्द खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. कारण या हातातून निसटलेल्या काळावर...क्षणावर जसं आपलं काहीच नियंत्रण नाही, हक्क नाही... तसंच येणाऱ्या वेळेवरही कुठलीच मालकी नाही, विजय मिळवलेला नाही.
      'आपला' म्हणता येईल असा एकच क्षण असतो; तो म्हणजे चालू वर्तमान काळातील चालू क्षण ! आधीच्या क्षणाचा मृत्यू...आणि पुढील क्षणाचा जन्म... यामध्ये खऱ्या अर्थाने 'जिवंत' असलेला एकमेव क्षण...आत्ता श्वास घेत असलेला क्षण ! आपल्याला जे काही करायचंय, जगायचंय, उरायचंय... ते फक्त आणि फक्त याच एका क्षणात... याच एका क्षणासाठी ! "जो भी है, बस यही इक पल है !"
**********************************
*अन्जाने सायों का, राहों में डेरा है*
*अनदेखी बाहों ने, हम सबको घेरा है*

      या सावल्या... काळाच्या असीम मार्गावर आयुष्याच्या वाटेत येणाऱ्या या सावल्या... सुखदुःखांच्या, भावभावनांच्या, जय-पराजयांच्या...तसंच एक सावली जन्माची आणि एक सावली मृत्यूचीही !
      यातील एखादी सावली अथक प्रवासातील शीतल विसावा होऊनही येते, सुखावून... ताजंतवानं करून जाते. आणि एखादी दु:खाची छाया; सगळं जगणंच गोठवून, वठवून जाईल की काय असंही वाटतं.
      पण यातील काहीच आपोआप किंवा उगाच होत नाही. त्या 'नियंत्याला' जरी कुणीच प्रत्यक्ष पाहिलेलं नाही... तरी 'नियती' मात्र तिचं अस्तित्व पदोपदी जाणवून देते. त्याच नियतीच्या हातातले आणि काळाच्या पटावरील आपण सगळेच मोहरे ! ती खेळवेल तसं आणि तोपर्यंतच खेळायचं... "अन्जानी बाहों ने हम सबको घेरा है"
**********************************
*ये पल उजाला है, बाक़ी अंधेरा है*
*ये पल गँवाना ना, ये पल ही तेरा है*

      'छाया-प्रकाशाच्या' या खेळात; त्या स्वच्छ, शुभ्र प्रकाशाने उजळलेले असे किती क्षण येतील, कधी येतील आणि कुठवर टिकून राहतील... हे आपल्या हातात तर नाहीच. मग असा तेजाळलेला क्षण जर आत्ता असेल तर तुही स्वतःला त्या क्षणाच्या हवाली कर, उजळून जाऊ देत या क्षणात आयुष्य !
      पुढच्या प्रवासात जरी कधी अंधार दाटून आला तर निदान हा प्रकाशित क्षण निसटून गेल्याचं दु:ख तरी होणार नाही. उलट त्या आठवणींचे लुकलुकते काजवे; अंधाराचीही शोभा वाढवतील ! म्हणूनच हा क्षण तरी झाकोळू देऊ नकोस... *"ये पल ही तेरा है !"*
**********************************
*जीनेवाले सोच ले,*
*यही वक़्त है कर ले, पूरी आरज़ू*

      'जीनेवाले' ... हा खरोखरच वरवर पाहता साधा वाटला तरी फार महत्त्वाचा शब्द आहे. ज्याला खऱ्या अर्थाने जगायचं आहे, जिवंतपणाची सारी नैसर्गिक लक्षणं मिरवत पुढे जायचं आहे आणि जगण्याची केवळ सक्ती न होता; सोहळा साजरा करायचा आहे; त्यालाच उद्देशून साहिरजींनी ही साद घातली आहे...'जीनेवाले' ... आत्ताच विचारपूर्वक ती समरसून जगण्याची इच्छा पूर्ण करून घे !
*"यही वक्त है कर ले, पूरी आरजू"*
**********************************
*इस पल के जलवों ने, महफ़िल संवारी है*
*इस पल की गर्मी ने, धड़कन उभारी है*
*इस पल के होने से, दुनिया हमारी है*
*ये पल जो देखो तो, सदियों पे भारी है*

      'क्षणभंगूर' म्हणून कायमच हिणवल्या गेलेल्या त्या क्षणाचं...'पल' चं ते क्षणिक असणंही किती लाक्षणिक आहे; हे साहिरजींनी अतिशय सुचकतेने मूर्तीमंत समोर उभं केलं आहे !
      क्षणभंगूरतेलाही...क्षणसुसंगत कसं करता येईल; हा दृष्टीकोन तेव्हाच समजेल जेव्हा सगळ्या आयुष्याची एक स्वानंदी  'मैफल'  करण्याची इच्छा असेल. इथे साहिरजींनी अगदीच नजाकतीने हा  'महफ़िल' शब्द वापरला आहे.... 'जलसा' नाही... 'महफ़िल' !
      जी मैफल  'सोबती काही जीवाचे'  बरोबर असतानाच रंगते, समेवर दाद देते-घेते आणि त्या जीवाभावाच्या सोबतीनेच  'संपन्न'  होते !
      याच क्षणी ह्रदयातून रक्तात मिसळलेला श्वास फक्त आपला आहे. पुढच्या क्षणी तो सुद्धा निरोप घेऊन निश्वास झालेला असेल. जिथे तुझाच श्वासही पुढच्या क्षणी परका होऊन पाठ फिरवणार आहे; तिथे बाकी जग तर परकंच आहे... त्या दुनियेकडून कसली अपेक्षा ! म्हणून तुझ्या या क्षणात जे काही आणि जे कुणी बरोबर आहेत... तेच खरं तुझं विश्व आहे.
      असा हा विश्वरूप दर्शन घडविणारा क्षण जेव्हा साहिर दाखवतात... तेव्हा तो  'सदियों पे भारी है' ... हे अगदी मनापासून पटतं ! मनात पुन्हा पुन्हा त्याच शब्दांचे प्रतिध्वनी उमटत राहतात... *"जीनेवाले सोच ले..." !*
**********************************
*इस पल के साए में, अपना ठिकाना है*
*इस पल के आगे की, हर शय फ़साना है*
*कल किसने देखा है, कल किसने जाना है*
*इस पल से पाएगा, जो तुझको पाना है*

      'उद्या', 'नंतर कधीतरी', 'पुढच्या वेळी',  'आयुष्यात अजून प्रगती केल्यानंतर'..... असे अनेक पुढच्या मृगजळांचे वायदे आपण स्वतःला आणि इतरांनाही नेहमीच करत राहतो.
      जणू काही काळावर विजय मिळवला आहे... अशीच आपली समजूत असते.  पण  'जहा पे सवेरा हो, बसेरा वही है' ... हे विसरतो आपण सगळेच.
      जे या क्षणात नाही, ते पुढच्या क्षणात...काळात असेल असं मानणं ही एकप्रकारे स्वतःच स्वतःची केलेली फसवणूक आहे. धुक्यातील धुसर आकृती किंवा ढगातील पोकळ चित्रांचे आकार खरे मानण्यासारखंच आहे हे.
      अर्थात याचा अर्थ माणसाने  'आशावादी'  असू नये; असा नकारात्मक नक्कीच नाही ! उलट  'आशा'  आणि  'अपेक्षा'  यातील फरक समजून घेतला तर संपूर्ण तत्व नीट उमलून येईल.
      जर आपल्याला कधीतरी सावलीची  'आशा'  असेल; तर त्या वृक्षाचं बीज अगदी आजच , आत्ता... चालू क्षणात लावलं पाहिजे... ही त्या 'क्षणाची' अपेक्षा असते आपल्याकडून !
      चालू क्षणाची अपेक्षा आपण पूर्ण केली; तरच तो आपल्या आशा पल्लवित करत राहिल... !

*"जो भी है, बस यही इक पल है !"*

*{ रसग्रहण : रोहित कुलकर्णी }*
**********************************

मी एक 'चहा'ता l डॉ. शंतनू अभ्यंकर

मी एक 'चहा'ता 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

आमच्या एका मित्राकडे येणाऱ्याजाणाऱ्यांचं स्वागत करण्याची त्रिसूत्री होती, 
पहिल्यांदा आलात तर पोहे आणि चहा,
दुसऱ्यांदा आलात तर नुसताच चहा 
आणि तिसऱ्यांदा आलात तर फक्त  अहा!!                                                 
                                               
अर्थात हा प्रकार मला मात्र आवडत नाही. आल्यागेल्याला निव्वळ चहासुद्धा देण्याची माणुसकी असू नये म्हणजे फार झालं. 
कल्पना करा, तुम्ही या मित्राकडे   चालला आहात. चांगली टळटळीत दुपार आहे. घड्याळात चहा वाजले आहेत. आम्हां चहाबाजांच्या घड्याळात चार वाजत नाहीत, चहाच वाजतात. याच्याकडे होईलच या भरवशावर, तुम्ही घरचा चहा धुडकावून लावता आणि हा तुम्हाला नुसतंच 'अहा' म्हणून  कटवतो!! कसं वाटतं? चहा आणि अहा असं यमक जुळत असलं तरी चहाची जागा काही अहा घेऊ शकत नाही. चहा तो चहाच! 
  …आणि फक्त तोच चहा, की जो साग्रसंगीत तयार केला जातो आणि तितकाच तन्मयतेने प्यायला जातो. अशी रससिद्धी साधून जाणे हे साधं काम नाही. यासाठी आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. अशा  आनंदाच्या उकळ्या फुटल्यावर साखर टाकली पाहिजे. साखरही कशी? वर कणभर जरी टाकली तरी जास्त होईल अशी. त्याच वेळी दुसऱ्या शेगडीवर दूध तापत असलं पाहिजे. चहा उकळल्यावर नंतर  दूध तापवलं तर दूध तापेपर्यंत चहा गार होतो. साखर विरघळली की मगच  चहापावडर टाकायची. त्या फेसाळत्या पाण्यात त्या चहाचा अर्क छानपैकी उतरतो. तात्काळ गॅस बंद करून चहावर झाकण ठेऊन तो मुरू द्यावा. लोणचं मुरतं तसा चहा सुद्धा मुरतो बरं. आणि अट्टल चहाबाजांना चहा मुरला किंवा  नाही हे लगेच कळते. असो. आता दूध तापलं असेल. आता चहा गाळावा आणि त्यात दूधही गाळून घालावे. चहात साय घालणं हा फौजदारी गुन्हा ठरवला पाहिजे. चहा म्हणजे लस्सी नाही. सायीमुळे चहाची सगळी रयाच जाते. साय  नावाचा तो गिळगिळीत पदार्थ घुटक्यासरशी गिळणारी मंडळी पाहिली की पट्टीच्या चहाबाजांच्या अंगावर काटा येतो.  असो. तर अशा   रीतीने सिद्ध झालेला चहा आता गार होण्याच्या आत घुटके घेत घेत  संपवायचा आहे. 
टी टाईम ही पंचेंद्रीयांनी अनुभवायची वेळ आहे.  चहाचा वास वातावरणात दरवळ्यापासूनच खरंतर तुम्ही चहा प्यायला सुरुवात करता. मग कपबशांचा मंजूळ किणकीणाट कानी येतो. मग तो वाफाळता कप किंवा गिलास कलीजा  खलास करून जातो.   चहा समोर आल्यावर तुम्ही आधी नजरेने चहा पिता आणि मग जिभेनं. पहिल्याच घोटात ओठ आणि जीभ किंचित पोळायला हवी!  चहा बशीत ओतून, फुंकून, फुंकून, फुंकून, गार करून पिणं म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून शहाण्णवाव्या वर्षी संभोग करण्यासारखं आहे! चहा गरम नाही प्यायचा म्हणजे काय? तोंड भाजतं म्हणे.  भाजलं तर भाजू देत. काही वेदना या सुखकर असतात हे या वयात तरी   तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
एकदा चहाचे तुम्ही रसिक चहाते बनलात की  मग तुम्हाला, 'घाईचा  चहा लागणं' म्हणजे काय हे कळेल, आणि नुसतंच "अहा" वर कटवणाऱ्या मित्राबद्दल मला एवढा राग का तेही कळेल. 
बाकी या चहाची खुमारी काही औरच आहे. अगदी तस्साच केलेला चहा स्थलकालप्रसंगानुरूप वेगवेगळा लागतो हे मी अनुभवलं  आहे. 
सकाळच्या पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्राच्या कागदाचा वास हवा. शिवाय रविवार असेल तर चांगली जाडजूड पुरवणी हवी. या शिवाय त्या चहाला पूर्तता नाही. संध्याकाळच्या चहाआधी चांगली लांबलचक जबडाफाड जांभई हवी आणि आळोखेपिळोखे देत संपूर्ण शरीरावर्तनी आळस हवा.  पावसाळ्यात जर तुम्ही चहा पिणार असाल तर पाऊस धुवांधार बरसत असताना प्या. उगाच नळ गळावा तसा पाऊस गळत असेल तर ती चहाची वेळच नाही.  धुवांधार पावसाबरोबर थंडी आणि धुकं असेल तर मग चहा प्यायल्यावर आभाळ ठेंगणं होतं. थंडीतही चहाची खास वेळ आहे. हात पाय चांगले गार पडले, की  मग चहाकडे वळावं चहाच्याच कपानं  हात शेकत शेकत चहा प्यावा. थंडीत चहा कपानं न पिता चांगले मोठे मग घ्यावेत. उन्हाळ्यात मात्र चहा थोडा थोडा आणि बऱ्याचदा प्यावा. अगदी बोळक्यानं किंवा बोडल्यानं चहा प्यायलाही हरकत नाही. ‘असा तीर्थासारखा वारंवार घेतलेला चहा उन्हाळ्यात शीतकारक असतो’, असे चरकमुनी (जर चहा पीत असते तर) म्हणाले असते. अर्थात पट्टीचे चहाबाज असतात त्यांना चहा कोणत्याही वेळी वर्ज्य नसतो. फक्त काही वेळा तो अधिक प्रिय असतो एवढंच. सवाष्ण बायका जसं कुंकवाला नाही म्हणत नाहीत तसं हे कधी चहाला नाही म्हणत नाहीत.   
 शिवाय चहात्यांचे जेवढे रंगढंग तेवढेच चहाचेसुद्धा. साधा चहा, स्पेशल चहा, ‘पेशल’ चहा, कटींग, मारामारी असे अनेक प्रकार.  शुद्ध दुधाचा चहा आहे, बिनदुधाचा चहा आहे, साखरेचा आहे, बिन साखरेचा आहे, गुळाचा आहे. कसले कसले मसाले घातलेला चहा आहे  इतकंच काय  मुळात दुसरीच  कुठली तरी  ‘कीस झाड की पत्ती’  घातलेला, असा बिनचहापत्तीचाही  चहा आहे.   गोरा, काळा, हिरवा असा विविधरंगी आहे.  खारट, आंबट, तिखट, तुरट  अशा अनवट चवीचा आहे.  करपलेला, धुरकटलेला अशा नकोशा वासाचा आहे. शंभर पासून शून्यापर्यंत वेगवेगळ्या तापमानचा चहा आहे. त्यामुळे   ओट्यावरून टेबलावर येईपर्यंत  ‘गार झाला’ म्हणणारे आहेत. ‘आता तोंडात गाळू का?’ विचारणारे आहेत आणि बर्फयुक्त, थंडगार चहा घुटकणारेही आहेत. बर्फ घालून चहाचं लाल पाणी पिणाऱ्या व्यक्ती बहुधा स्त्रिया असतात. त्या तोकडे कपडे घालून पोहण्याच्या तलावाजवळ किंवा समुद्रकाठी बसून हे कृत्य करतात आणि त्यांच्या चहाच्या ग्लासात नळी  आणि ग्लासच्या कडेवर लिंबाचा काप खोचलेला असतो; एवढेच मला ठाऊक आहे.
बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर येणारा थरथरता चहा आहे, किटलीतून गिलासात झेपावणारा हापिसातला ‘च्या’ आहे, ‘वामांगी कॉफीबाई दिसे दिव्य शोभा’, असा  रेल्वेतला ‘च्याय ग्रेम’ आहे, नेमकं या द्रावणात आहे तरी काय असा  बुचकळ्यात पाडणारा पंचतारांकित ‘टी’ आहे, मैत्रिणीबरोबरचा पहिलावाहिला,  नवथर, मितभाषी,  चहा आहे आणि मित्रांच्या मैफिलीतला चहाटळ चहा आहे. शिवाय या सर्वांहुनी निराळा असा इराण्याचा चहा आहे. घोटभर चहा बरोबर इराण्याकडे पोटभर गप्पा फ्री मिळतात.      
अमृततुल्य चहा ही  मात्र वेगळीच संस्था आहे. मराठी भाषा आणि इये मराठीचीये  नगरीतील चहा वगळता दुसऱ्या कशाची अमृताशी तुलना झाल्याचं मला आठवत नाही. बाकी अमृत नावाचं एक अंजन आणि अमृत नावाची एक दारू मात्र आहे.    स्वर्गातही सध्या 'चहातुल्य अमृत मिळेल' अशा पाट्या आहेत म्हणे! तो अल्युमिनियमचा चबुतरा, ती  शेगडी, पैशाच्या ड्रॉव्हरवर बसलेला पायजमा आणि  बनियन घातलेला चहाकर्ता; त्याच्यामागे  असंख्य देवांच्या तसबिरी आणि "मैने उधार में बेचा", "गीता-सार" वगैरेचे स्टिकर, पाण्याच्या ग्लासात, तरंगत, तेवणारी ज्योत,  हे सारं प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं असतंच. शिवाय गिर्हाइकांसाठी 'प्रभात' आणि 'संध्यानंद' घेणंही यांना कायद्यानं बंधनकारक असावं. चहाकर्ता स्वतः पेपर कधीच वाचत नाही. चहा करण्यात तो अगदी गढलेला असतो. आधीच्या गिऱ्हाईकाचे पैसेही तो निव्वळ  कर्तव्यभावनेनं घेतो. चहा पकवण्यात जे सुख आहे ते चहा खपवण्यात नाही, हे त्याला  उमजलेलं असतं.   इकडे आधण आलेले आहे आणि त्यानं त्यात चहा पावडर टाकलीसुद्धा. आता चहा उतू जायच्या आत मघाशीच खलून ठेवलेला मसाला तो किती चापल्यानं  घालतो ते  पहा. त्याच्या  हालचालीत एखाद्या सर्जनचा आत्मविश्वास आहे. ते पहा, चहा ऊतू जातोय म्हटल्यावर त्यानं ओगराळं  पातेल्यात फिरवून चहा ढवळला सुद्धा. हाच तो क्षण जेंव्हा शेजारच्या पातेल्यातलं गरम दूध बरोब्बर मापानं चहात पडणार आहे, जादूगाराने छू मंतर करावे  तसं पुनः ओगराळं फिरणार आहे आणि ते मंतरलेलं पाणी सिद्ध होणार आहे.  इकडे किटल्या आणि त्यावर फडकी तयार आहेत. आता तो चहा गाळला आणि फडका चिमटयाने पिळला की बस्स. अशा तामसतीर्थाचा अमृतानुभव ज्यानं घेतला नाही तो चहाबाजच  नाही.
 काही मंडळी निव्वळ चहा पिण्याऐवजी त्यात काही ना काही बुचकळून बुचकळून खातात. हेही निषिद्ध समजायला हवं. खारी, मारी, केक, पोळी, क्रीमरोल वगैरे चहाच्या चवीला मारक आहेत. तुम्ही हे सारं आधी खा आणि वर नुसता चहा प्या. पण  वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दोन्ही एकदम करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मात्र या शिफारसीला एक अपवाद आहे. पहाटेपासूनची ड्यूटी असावी, श्वास घ्यायलाही उसंत नसावी, नाष्टा,  जेवणाचे मुळी  भानच नसावे. पोटातले कावळे देखील उपाशी ओरडून ओरडून  गप्प झालेले असावेत.  मग कधीतरी, उतरत्या कातरवेळी जरा वेळ मिळावा. तहान, भूक, थकवा याची एकत्रित जाणीव व्हावी.   अशावेळी झक्कपैकी कपभर चहा आणि ग्लुकोज बिस्किटांचा अख्खा पुडा  घेऊन बसावे. मांडी ठोकावी. आपोआप पाय चेपले गेल्यानेच ते दुखत होते याची जाणीव व्हावी.  आता  चार बिस्किटे घेऊन  एकाच वेळी चहात बुडवावीत आणि चारीही एकदम खावीत. कषायपेयपात्रपतित बिस्किटाचा तुकडाही मखमाली चिमटीने तोंडात टाकावा.   डोळे मिटावेत.  जीभ आणि टाळूमध्ये तो लगदा अलगद  दाबावा. मोक्ष मिळेल. 
चहा हे फार महत्वाचं पेय आहे. त्याचा आदर करा. चहा आणि पोहे न घेता लोकांची लग्नं  कशी ठरली असती? चहा नसता तर किरिस्तावांच्या घरी चहा आणि भिस्कुटे खाण्याबद्दल लोकमान्यांना माफी मागावी लागली नसती. चहा नसता तर   फिल्मवाल्यांना  सगळी चहाच्या मळ्यातली गाणी उसाच्या मळ्यात चित्रित करावी लागली असती. चहा नसता तर  सरकारी सेवकांनी चहापाण्यासाठी चिरीमिरी कशी बरं मागितली असती? चहा नसता तर लांबून नुसतं बोट वर करताच कँटीनवाल्यानं आपल्याला काय आणून दिलं असतं बरं?  जाऊ दे. नकोच ते.  बिनचहाच्या जगाची कल्पनाही करवत नाही. 
कुणीतरी म्हंटलंच आहे   
                                               
आहे चहा तंवर प्या चहा,   
नाही चहा तर नुसतंच अहा,                                                 
हा हा हा; हा हा हा!!!
(शेवटचं हा हा हा हे हास्य माझे आहे. ही फालतू कविता वाचण्याबद्दल मी तुम्हाला हसतोय.)

Tuesday, February 18, 2020

जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल। चारुदत्त

[07/02, 4:41 am] Charudatta: मित्रांनो,  "जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल' हे  गाणे सर्वांनाच आवडते, 'गुलामी' चित्रपटातील गुलज़ार यांनी लिहिलेले हे गीत अशीच याची ओळख, पण मुळात हे गाणे ७०० वर्षापूर्वीचे आहे, १४ व्या शतकात अमीर खुसरो यांनी हे लिहिले आहे, इतकी वर्ष या गाण्याने अनेक पिढ्यांना भूरळ पाडली आहे, विशेष म्हणजे सांगितले तर आश्चर्य वाटेल पण हे गीत म्हणजे हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या संम्मीलनाचे आगळे वेगळे प्रतीक आहे, कारण हे गीत दोन भाषेत आहे, फ़ारसी आणि ब्रज या त्या दोन भाषा, मूळ गीतातील पहिले कडवे फ़ारसी भाषेत आहे तर दुसरे अस्सल भारतीय अशा ब्रज भाषेत, ७०० वर्षांपूर्वी काही कलावंत दोन भिन्न संस्कृतीला भाषेच्या सहाय्याने एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न करीत होते, त्याअर्थी या गीताचे मोल अधिक आहे, अनेक ख्यातनाम गायकांनी हे गीत गायले आहे, नव्हे त्यांना तो मोह आवरला नाही इतके ते अप्रतीम आहे ! सोबत सम्पूर्ण मूळ गीत देत आहे, नक्की वाचा ! 

                  

"जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल, 

 दुराय नैना बनाय बतियाँ। 

किताबे हिज्राँ, न दारम ऐ जाँ, 

न लेहु काहे लगाय छतियाँ।। 

शबाने हिज्राँ दराज चूँ जुल्फ बरोजे वसलत चूँ उम्र कोताह। 

सखी पिया को जो मैं न देखूँ तो कैसे काटूँ अँधेरी रतियाँ। 

यकायक अज़दिल दू चश्मे जादू बसद फरेबम बवुर्द तस्कीं। 

किसे पड़ी है जो जा सुनावे पियारे पी को हमारी बतियाँ 

चूँ शम्आ सोजाँ, चूँ जर्रा हैराँ, हमेशा गिरियाँ ब इश्के आँ माह। 

न नींद नैंना, न अंग चैना, न आप आये न भेजे पतियाँ।। 

बहक्के रोजे विसाले दिलबर के दाद मारा फरेब खुसरो। 

सपीत मन के दराये राखूँ जो जाय पाऊँ पिया की खतियाँ।   

        - अमीर खुसरो 
[07/02, 4:41 am] Charudatta: लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवून, निरनिराळ्या कहाण्या रचून
माझ्या ह्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करण्याचा तुझा प्रयत्न मला कळतो आहे!

( खरे तर ही माझी अवस्था तुझ्या विरहामुळेच झाली आहे!)

प्रिये , माझ्या सहनशक्तीचा कडेलोट होत आहे,
अशा स्थितीत तू मला हृदयाशी का कवताळत नाही आहेस?

तुझे लांब कुरळे केस म्हणजे जणू विरहाच्या प्रदिर्घ रात्री
आपल्या मिलनाचा वेळ जवळ जवळ काहीच नाही!

सखी प्रिया ची साथ नसेल तर ह्या  अंधाऱ्या रात्री कशा बरे कटतील?
तुझ्या शेकडो विभ्रमांनी माझी आधीच दुर्दशा झाली आहे!

कोणाला माझी  इतकी काळजी पडली आहे,
जो माझी अवस्था प्रियेला जाऊन सांगेल!

एखाद्या मिणमिणत्या पणती प्रमाणे,
मी प्रेमाच्या वण्यव्यात भटकतो आहे!

बैचेन मन , थकलेली काया,
ती येत नाही,तिचा निरोपही येत नाही!!

ती मला एकदा तरी भेटावि ह्या आशेनं मी व्याकुळ आहे,
ती तुला खूप काळ नुसती झुलवत आहे खुसरो!!

हे शापित जीवन मी असाच जगत राहीन,
कारण कधीतरी मिलनाची वेळ येईल अशी आशा आहे !!!

अनुवाद- चारुदत्त

Tuesday, February 11, 2020

बाबा आमटे। विकास आमटे

*बाबा आमटें* ना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारादरम्यान घडलेला किस्सा...

स्थळ : राष्ट्रपती भवन. दरबार हॉल.

१९९९ सालचा जानेवारी महिना. त्या दिवशी तापमान असेल ५-६ डिग्री सेन्टीग्रेड. बाबांचा पोशाख मात्र नेहमीचाच. खादीची बनियन आणि चड्डी. कंबरेला पट्टा. *पंतप्रधान अटलजी* मला बाजूला घेत म्हणतात,

_‘‘विकास, तेरे बाप को ठंड नहीं लगती क्या?’’_

मी त्यांना म्हणालो, _‘‘नहीं अटलजी, ये पैलवान आदमी है!’’_

पुढे बाबांना राष्ट्रपती भवनातच आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यादरम्यान आणखी एक प्रसंग घडला. भारताने नुकतीच पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. अणुकार्यक्रमाचे जनक *डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम* या पुरस्कार सोहोळ्यास उपस्थित होते. पुरस्कार सोहोळ्यादरम्यान त्यांच्याकडे जात बाबांनी त्यांना सुनावलं,

*_‘‘Dr. Kalam, we don't need bombs, we need toilets! ‘National Highways’ have become national toilets! If you say we are a nation of Mahavir, Buddha, Guru Nanak and Gandhi, we don't need bombs!’’_*

डॉ. कलाम अचंब्याने पाहतच राहिले! (आजच्या परवलीच्या *‘स्वच्छ भारत अभियाना’*ची नीव बाबांनी कधीच रचली होती.)

_‘मेरा बाप पैलवान आदमी था..’_ असं मी कायम म्हणतो याचं कारण- जसे बाबांनी अनेक प्राणघातक हल्ले, अपघात, आजारपणं पचवली, तशी त्यांनी विधायक कार्य असो वा संघर्ष- ‘ठाम भूमिका’ ही घेतलीच. त्यांनी कधीही कचखाऊ धोरण अवलंबलं नाही. त्यामुळे बाबांचं शारीरिक अस्तित्व संपल्यानंतर माणसं रडली निश्चित; पण खचली मात्र नाहीत.

ब्लड कॅन्सरशी लढता लढता बाबांनी ९ फेब्रुवारी २००८ ला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. बाबांच्या या अखेरच्या आजारपणात रात्रीचा दिवस करत उपचार करणारे डॉ. विजय पोळ आणि विलास मनोहर त्यावेळी बाबांसोबत होते. बाबांची मनोभावे सेवा करणारे देवानंद सलामे, कमल उमरोटकर होते. इंदू, रेणुका, मी आणि भारतीही आनंदवनातच होतो. प्रकाश-मंदा लोकबिरादरी प्रकल्पावर. आमची पोरं बाहेर होती.

रात्रीपर्यंत सर्वजण आले. तो पूर्ण दिवस, रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा बाबांना बघण्यासाठी लोकांची रीघ कायम होती. दोन किलोमीटरची माणसांची रांग. कुठलाही आवाज नाही. फक्त बाबांना बघून हात जोडण्याची आस असलेली, सर्वदुरून आलेली ही माणसं. हजारोंची गर्दी लोटली होती.

केळीच्या पानात गुंडाळून आणि वरनं मीठ टाकून आपलं दफन केलं जावं, ही बाबांची इच्छा होती. त्याला दोन वैज्ञानिक कारणं होती. बाबा म्हणत, *_‘‘एका मृतदेहाचं दहन करायला जेवढी लाकडं लागतात तेवढ्यात हजार माणसांचा तीन-चार दिवसांचा स्वयंपाक होऊ शकतो!’’* (हा विचार अहमदाबादच्या ‘सद्विचार परिवारा’ने रुजवला होता. म्हणून बाबा-इंदूने त्यांचे फॉर्म्स भरत दहनाऐवजी दफन जाणीवपूर्वक स्वीकारलं होतं.)_

दुसरं म्हणजे _‘पशूपंछी भोजन करे, तन भंडारा होएँ’_ या संत कबिरांच्या दोह्याप्रमाणे, मर्त्य शरीरावर पशुपक्ष्यांचा, किड्यामुंग्यांचा अधिकार असतो. तेव्हा मृतदेह त्यांच्या हवाली केला जावा; जेणेकरून हे शरीर भंडाऱ्याप्रमाणे विरून जाईल! त्याप्रमाणे बाबांच्या देहाचं दफन केलं गेलं. ही तीच अनाम कुष्ठरुग्णांच्या स्मरणशिलेची जागा- जिथे बाबांच्या जिवाला जीव देणारे त्यांचे शेकडो कुष्ठमुक्त सोबती वास करत होते.

९ फेब्रुवारी काय किंवा १० फेब्रुवारी- आनंदवनाला सुट्टी नव्हती. त्या दिवशीही काम सुरूच होतं. पॉवरलूम्स तशाच धडधडत होत्या. हातमाग खट्खट् आवाज करत चादरी-टॉवेल्स विणत होते. वेल्डिंग मशीन्स चरचर आवाज करत जोडणी करत होत्या. आनंदवन थांबलं नव्हतं.

२०१४ हे बाबा आमटेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. हे वर्ष कसं ‘साजरं’ करणार, याबाबत नेहमीच कुणी ना कुणी विचारत. अशी विचारणा करणाऱ्यांना मी सांगत असे की, आनंदवनात साजरं होतं ते *‘कार्याचं गुणात्मक विस्तृतीकरण’!* समाजातील जास्तीत जास्त दुर्बल घटकांपर्यंत कार्याचा विस्तार हाच आमच्यासाठी सोहोळा. आनंदवनाच्या इतिहासात कधी कुणाची जयंती, पुण्यतिथी साजरी झाल्याचं मला स्मरत नाही. आणि भविष्यातही असं होणं नाही.

*बाबा आमटे* या व्यक्तीशी किती माणसं जोडली गेली होती याचा प्रत्यय आम्हाला ते गेल्यानंतर आला. बाबांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सुमारे तीन लक्ष तारांचा खच आनंदवनात पडला! अक्षरश: पोती भरभरून तारा येत होत्या.

असं काय होतं बाबांमध्ये ज्याने ही माणसं त्यांच्याकडे ओढली गेली आणि कायमची जोडली गेली? यात जशी राजकारण, प्रशासन, उद्योग, कला, संगीत, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान-तंत्रज्ञान, अध्यात्म या क्षेत्रांतली नावाजलेली मंडळी होती, तशीच देश काय आणि विदेश काय, समाजातल्या प्रत्येक स्तरातली लाखो सर्वसामान्य माणसंही होती. या अनुषंगाने मला काही छोटे-मोठे प्रसंग आठवतात ते सांगतो...

ते बहुधा १९५९ साल असावं. जबलपूरच्या ‘नवभारत’ दैनिकात साहाय्यक संपादक म्हणून काम करणारी *चंद्र मोहन जैन* नावाची एक व्यक्ती आनंदवनात येते आणि काम बघून प्रभावित होत बाबांना म्हणते,

_‘‘बाबा, आपके हाथों को सेवा कि खुशबू आती है.’’_ परत जाऊन जैन ‘नवभारत’मध्ये बाबांबद्दल विस्तृत लेख लिहितात. या लेखावरून जैन यांचा दैनिकाच्या मालकाशी वाद होतो. मालक म्हणतात,

_‘‘तू माझं दिवाळं काढणार! राजकारण, हत्या, भानगडी यांच्या बातम्या सोडून असे विधायक कार्याविषयीचे लेख छापून आले तर माझं दैनिक लवकरच बंद पडेल.’’_

यावर जैन उत्तरतात, _‘‘जगात खून, आत्महत्या, अत्याचार यांव्यतिरिक्त चांगल्या गोष्टीही खूप घडत असतात. बाबा आमटेंनी आपलं आयुष्य कुष्ठकार्यासाठी वेचलं आहे. या माणसाचं काम सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. बाबा आमटेंविषयी छापल्यामुळे दैनिकाचं सक्र्युलेशन वाढणार नाही हे मला माहिती आहे. पण काळजी नसावी. मी बाहेर पडतो. तुम्ही तुमचं सक्र्युलेशन वाढवा,’’_ असं म्हणत तत्क्षणी ते आपला राजीनामा मालकाच्या तोंडावर फेकतात.

*हीच चंद्रमोहन जैन नावाची व्यक्ती पुढे जाऊन सुप्रसिद्ध आध्यात्मिक विचारक बनते... ज्यांना आपण सर्व ‘रजनीश-आचार्य- भगवान- ओशो’ म्हणून ओळखतो.*

जेआरडी टाटांना बाबांविषयी प्रचंड स्नेहादर होता. मणक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान बाबा मुंबईला असताना जेआरडींनी त्यांची भेट घेतली. ते बाबांना म्हणाले, _‘‘मी आनंदवनाला काय मदत करू शकतो?’’_

बाबा उत्तरले, _‘‘मी आपला ऋणी आहे. पण आनंदवनाला मदतीची गरज नाही. उलट, समाजाने नाकारलेल्या ज्या माणसांच्या कष्टांतून आनंदवन उभं राहिलं आहे, त्यांच्यात आज समाजातल्या मूलभूत समस्यांवर मात करण्याची जिगर आहे!’’_

२०१३ च्या जूनमध्ये मी आणि माझा मुलगा कौस्तुभ एका कामासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र भवनातून आम्ही दोघं ऑटोरिक्षा घेऊन ७, रेस कोर्स रोडला पोहोचलो. आता ऑटोरिक्षामधनं ७, रेस कोर्स रोडला येणारी माणसं कदाचित विरळाच असतील. कारण गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर तरी तेच भाव होते!

_‘‘क्या है?’’_ असं विचारताच मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. कार्ड आत काय गेलं, मिनिटभरातच सगळे पहारे खटाखट बाजूला झाले आणि काय चाललंय याचा थांगपत्ता लागण्याआधीच आम्ही पंतप्रधानांच्या ‘Special Protection Group’चे प्रमुख चतुर्वेदी यांच्या कार्यालयात पोहोचलोसुद्धा!

चतुर्वेदी मला विनंतीवजा शब्दांत म्हणाले, _‘‘विकासजी, आपको यदी कोई परेशानी ना हो तो क्या आप मुझसे दस मिनिट बात कर सकते है?’’_

मला झेपलंच नाही. मी म्हणालो, _‘‘जी हाँ, क्यूं नहीं?’’_

गप्पा सुरू झाल्या. चतुर्वेदी म्हणाले, _‘‘बाबांचं ‘भारत जोडो अभियान’ सुरू असताना मी विद्यार्थीदशेत होतो. अभियानादरम्यान बिहारमध्ये बाबांचं भाषण मी ऐकलं होतं. त्याच्या नोंदी आजही माझ्या डायरीत आहेत. बाबांच्या ‘ज्वाला और फूल’ (‘ज्वाला आणि फुले’चा हिंदी अनुवाद) या काव्यसंग्रहातल्या कविता मला तोंडपाठ आहेत!’’_

हे ऐकून आम्ही चाटच पडलो. पहारे का बाजूला झाले याचं उत्तर मिळालं. अर्थात आम्हाला बसणारे धक्के अजून संपले नव्हते. काही मिनिटांनी चतुर्वेदींच्या कार्यालयातून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेलो. वाटलं, आता तपासतील, मग तपासतील. पण कुणीच आमची झडती वगैरे घेतली नाही. पाच मिनिटं एका रूममध्ये बसलो.

एवढ्यात बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि आवाज आला, _‘‘आईये.’’_ *दरवाजा खुद्द पंतप्रधानांनी उघडला होता!*

आम्ही आत गेलो. सुमारे अर्धा तास मनमोहन सिंगजींशी विविध विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आनंदवन भेटीचं निमंत्रण दिलं आणि उभा राहून त्यांच्या पाया पडणार एवढयात ते खाली वाकत चक्क माझ्याच पाया पडले!

मी गडबडून गेलो. ओशाळत त्यांना म्हणालो, _‘‘ये आपने क्या किया?’’_

मला जवळ घेत ते म्हणाले, *_‘‘ये बाबा के लिये है, उनको पहुँचा देना!’’_*

मी सद्गदित झालो. आम्ही परत निघतानाही खोलीचं दार पुन्हा त्यांनी स्वत:च उघडलं होतं!

‘पंजाब केसरी’ दैनिकाचे मुख्य संपादक *विजयकुमार चोपडम* पंजाबातल्या घुमान येथे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हणतात,

*_‘‘संत नामदेवांनंतर पंजाबशी उत्कटतेने जुळलेली बाबा आमटे ही एकमेव मराठी व्यक्ती आहे!’’_*

गाडीवर आनंदवनाचं नाव वाचून वाहतूक पोलीस कधी कधी आनंदवनाची गाडी अडवत. (आजही अडवतात.) आणि _‘का अडवली?,’_ असं विचारलं की म्हणत,

*_‘‘बाबांना, साधनाताईंना कधी पाहू किंवा भेटू शकलो नाही, निदान आनंदवनातील माणसांना भेटून ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान लाभावं म्हणून थांबवली गाडी!’’_*

यावर आपण काय बोलणार?

बाबांच्या भूमिकेशी फारकत घेणारेही अनेक होते, पण बाबांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्यामुळे बाबांपासून दूर गेलेली माणसंही पुन्हा त्यांच्याशी जोडली गेली.

इंदिराजींचा आणि बाबांचा परिचय साठीच्या दशकापासूनचा. बाबांनी आणीबाणीविरोधात व काही शासकीय धोरणांविरोधात भूमिका घेतल्याने यात तणाव निर्माण झाला असला तरी इंदिराजींच्या मनातला बाबांविषयीचा आदर कमी झाला नव्हता. १९८३ साली त्यांनी आनंदवनाला भेट दिली होती. काही मिनिटांची ही प्रस्तावित भेट चक्क एक तास लांबली!

बाबा म्हणत,

*_‘‘Great heroes of history are nothing to me. The ‘Uncommon determination’ in the ‘Common man’ is my ideal. I do not want to be a great leader. I want to be a man who goes around with an oil-can, offering help wherever needed. To me, the man who does this is greater than any holy man in a saffron robe. The mechanic with the oil-can is my ideal in life...’’_*

याच तत्त्वाने बाबा आयुष्य जगले. त्यामुळे जी सगळी माणसं त्यांच्याशी जोडली गेली त्याचं हेच कारण होतं, की बाबा आमटे हा *‘साधा’* माणूस होता, सर्वासाठी _‘Accessible’_ आणि _‘Approachable’_ होता. प्रत्येकाला आपलासा वाटणारा होता. सामान्य माणसांतल्या असामान्यत्वाचं मूल्य जाणणारा आणि जपणारा होता. बिघडलेल्या यंत्रास तेलपाणी करून ठीक करत पुढे वाटचाल करणारा ‘मेकॅनिक’ बाबांसाठी आदर्श होता.

न्याय्य हक्कांसाठी लढत अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करणाऱ्यांबद्दल आपण नेहमी भाष्य करत असतो. पण *_‘बाबांचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे जाणारा आहे,’_* असं कुणीतरी म्हटलं होतं. मलासुद्धा ही मीमांसा चपखल वाटते, याचं कारण समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्ण बांधवांना बाबांनी अंध:कारातून प्रकाशाकडे आणलं आणि पुन्हा पुन्हा नवे अंधारे कोपरे धुंडाळून सामाजिक न्यायाची प्रकाशवाट उजळ करण्यासाठी ते सतत कार्यमग्न राहिले.

देवाविषयी त्यांच्या मनात विलक्षण करुणा! ते म्हणत, *_‘‘ईश्वर माझा पेशंट आहे. तो आजारी आहे. कारण तो चालत नाही, बोलत नाही, दीनदुबळ्यांचं त्याला ऐकू येत नाही. उपचारांची गरज त्याला आहे! शिवाय तो प्रचंड बिझी आहे. अंतरिक्षात एवढया सूर्यमालिका आहेत. त्यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. तेव्हा त्याचं काम त्याला करू द्यावं, आपलं आपण करावं.’’_*

एकूणात काय, तर _‘देव’_ या व्यवस्थेकडे सगळं सुपूर्द करून आपली जबाबदारी झटकत निष्क्रिय आयुष्य जगणं त्यांना अमान्य होतं.

बाबा आमटे हा _‘घाईतला’_ माणूस होता. त्यांना टेबल, ऑफिस असं काहीच नव्हतं. त्यांनी कधी जांभई दिल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही! तसंच पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर बाबांचा विश्वास नव्हता.

_‘‘मी एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलो. I am affluent in affection which society has showered on me. जगाचा निरोप घेताना मी पूर्णपणे समाधानी आहे,’’_ असं ते म्हणत.

बाबांना *‘अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढ्य इंजिन’* असं संबोधणाऱ्या *कवी कुसुमाग्रजांनी* बाबांवर *‘संत’* नावाची कविता केली होती. त्यातला काही अंश..

_सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात..._
_भूमीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या_
_विराट वृक्षावर_
_अपराजित कुऱ्हाड मारणारा तू -_

_वणव्याच्या समोर_
_घनघोर पाऊस होणारा_
_दु:खाच्या समोर_
_फक्त निर्भेळ माणूस होणारा_

_दुबळ्या दयेच्या चिखलातून_
_माणुसकीला बाहेर काढणारा तू -_

_अरे आम्ही आहोत असे करंटे_

_की आमच्या पेठेत लागतात पताका_
_फक्त मंत्री आले तर_

_सोनेरी अंबारीचे ऐरावत_
_जेव्हा रस्त्याने झुलू लागतात_

_तेव्हा आमचे हिशेबी हात_
_जुळून येतात छातीवर_

_आणि तुझ्यासारखे संत_

_ऐहिकाच्या प्रपंचातील_
_ईश्वरी अंशाचे रखवालदार_
_निघून जातात_
_गस्त घालीत अंधारात_

_उद्ध्वस्त मनांच्या मोहल्ल्यातून_
_आसवांच्या दलदलीतून_
_दु:खानं उसवलेल्या दुनियेवर_
_अमृताचं सिंचन करीत..._

_हे यात्रिका,_
_विस्कटलेल्या शरीरांचा_
_चुरगळलेल्या आत्म्यांचा जत्था घेऊन_
_तू तुझ्या मार्गानं जा_

_मागे वळून पाहू नकोस_

_जो हिशेब कधी केला नव्हतास_
_तो यापुढेही करू नकोस_

_तुला साथसोबत आम्ही करणार नाही_

_आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश_
_तुझ्या रात्रीवर पडणार नाही_

_तुझ्या अलौकिक वेदनेसाठी_
_आम्ही रडणार नाही_

_आमच्या जयघोषांच्या जमावातही_
_तू राहणार आहेस एकटा_

_दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा_
_अगदी एकटा_

_पण असेच एकाकीपण_
_लाभले होते ख्रिस्ताला_

_ज्याच्या हाताचा ठसा_
_मला दिसतो आहे तुझ्या हातावर_

_असेच एकाकीपण_
_लाभले होते बुद्धाला_

_ज्याच्या प्रज्ञेचे किरण_
_मला दिसताहेत तुझ्या पथावर_

_हीच तुझी सोबत_
_आणि हेच तुझे संरक्षण..._

_‘जेथे जाशी तेथे.._
_तो तुझा सांगाती_
_चालवील हाती- धरोनिया..’_

🙏🙏🙏

~ *विकास आमटे*
vikasamte@gmail.com

forwarded as received