Thursday, April 30, 2020

ऋषी कपूर

[30/04, 10:25 am] Charudatta: *आज सकाळी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले.*
*ऋषी कपूर यांचा अल्प परिचय.*
जन्म. ४ सप्टेंबर १९५२
असा अभिनेता होणे नाही.
बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. 
आपल्या पहिल्याच चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत, आपल्या वडिलांच्या लहानपणची भूमिका करताना तो निळ्या डोळ्यांचा, गोंडस मुलगा,गोल चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य.... दिलेली भूमिका त्याने फक्त व्यवस्थितपणे पार पडलीच नाही तर त्यात आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. त्या भूमिकेबद्दल त्याला उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि लगेच ३ वर्षानंतर आपल्या अभिनेता म्हणून आलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेताचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटातील प्रतिष्ठीत कुटुंबात जन्म घेतल्यामुळे अभिनयाचे संस्कार बालपणापासूनच होते पण त्या चित्रपटसृष्टीत जर यशस्वी होण्यासाठी स्वताच्या अभिनयाची क्षमता लागते हे ऋषीकपूर यांनी सुरवातीलाच ओळखले होते. आपल्या पहिल्या चित्रपटात ‘बॉबी’ मध्ये डिम्पल कपाडिया सोबत पदार्पण केल्याबरोबरच कितीतरी महिलांच्या गळ्यातला ताईत झालेला हा अभिनेता कायम ‘लवर बॉय’ म्हणून प्रस्थापीत झाला. आपल्या सुरवातीच्या काळात रोमांटिक हीरो म्हणून लोकांच्या हृदयात जागा बनविणाऱ्या या अभिनेत्याने त्याचा नंतरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका करून स्वताला अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रस्थापित केले. ते , रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यापेक्षा यशस्वी झाले. ‘बॉबी’ बद्दल बोलताना ऋषीकपूर सांगतात कि बऱ्याच लोकांना आजपर्यंत असेच वाटायचे की ऋषीकपूरला पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ‘मेरा नाम जोकर’ च्या अपयशामुळे खचून गेलेल्या राजकपूर यांना एका नवीन प्रेमकहाणी वर चित्रपट बनविण्याचा होता पण त्यावेळेचा रोमांटीक हिरो राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी निवड करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसा निधी नव्हता. मग पैसे वाचविण्यासाठी त्यांनी घरचाच कलाकार निवडला आणि नंतर आपण सर्व जाणतोच कि मेरा नाम जोकर चा गेलेला पैसा वसूल करणारा हा सिनेमा ठरला. या चित्रपटासाठी पहिल्यांदा राजकपूर यांनी आपले सुरवातीपासुनाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना डावलून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अनुबंधित केले होते. तो विषय वेगळा कधी त्या विषयावर पण पोस्ट करेल. १९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते एकटेच नायक होते तर ४१ बहुनायक चित्रपट होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. १२ चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. मग ती ‘नमस्ते लंडन’ चि वडिलांची भूमिका, ‘औरंगझेब’ मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी, ‘हाउसफुल्ल 2’ मधील विनोदी, स्टूडेंट ऑफ द ईयर मधील डीन, अग्निपथ मधील ‘रौफ लाला’ किंवा ‘D-Day’ मधील डॉन. या वरूनच दिसून येते कि आपल्या अभिनयासाठी समर्पित ऋषीकपूर यांनी आपल्या सुरवातीच्या काळा प्रमाणेच आपल्या दुसऱ्या डावात सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. इतक्या सर्व यशस्वी चित्रपटातून भूमिका करीत असताना पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे तेवढेच लक्ष दिले. ते कधीही सायंकाळी ६ नंतर शूटिंग करीत नसत. ऋषी कपूर यांची बहुतांश गाणी सुपरहिट झाली होती. प्रत्येकाच्या तोंडात त्यांची गाणी असायची. त्यांच्या साठी आघाडीच्या सर्व गायकांनी पार्श्वगायन केले होते पण शैलेंद्र सिंग यांचा आवाज त्यांना सर्वात जवळचा वाटायचा. २०१९ मध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. तिथे वर्षभर ते होते. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले. या फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र बुधवारी प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. *ऋषीकपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.*
*सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
*ऋषीकपूर यांची गाणी.*
https://www.youtube.com/watch?v=buak7IIvWxY
https://www.youtube.com/watch?v=1ldwcYP4PjQ
https://www.youtube.com/watch?v=VLmVJmi3CtA
[30/04, 11:33 am] Charudatta: मेरी उमरके नौजवनो...

चाळीस चाळीस वर्षांचा बोजड हिरो आणि डोळ्यांची पिटपिट करणारी षोडशा नायिका बघण्याची सवय झालेल्या भारतीय प्रेक्षकांना एकदम 16 वर्षांची डिंपल आणि समोर 18 वर्षांचा नायक प्रथम दिसला तो ऋषिकपूरच्या रूपाने. ऋषीकपूर सिनेमात येईपर्यंत 18व्या वर्षी सिनेमा बघणे देखील संस्कारात बसत नव्हते. तोच डिंपल आणि ऋषीने सिनेमा एकदम तरुण करून टाकला. मेरा नाम जोकर पडला आणि त्याच्या वडिलांना म्हणजे राजकापूरला मोठा आर्थिक फटका तर बसलाच पण स्वतःचा सिनेमा या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागला. नर्गिस, नूतन, वैजयंतीमाला, पद्मिनी, हेमामालिनी अशा अपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान नायिकांबरोबर लोक आपल्याला मान्य करणार नाहीत याची जाणीव राजला झाली. त्याने हार मानली आणि नायक म्हणून स्वतःला बाजूला करून ऋषीला पुढे आणले आणि देशातली तरुणाई एकदम बदलून गेली. प्रेमाचा अंकुर सोळाव्या वर्षीच फुलू लागला या जोडीमुळे. नर्गिस प्रथम ज्या रुपात दिसली ते तिचे रूप आणि त्या पौगंडावस्थेतील आपला झालेला गोंधळ मोठ्या खुबीने डिंपल व ऋषींच्या रूपाने त्याने दाखवला आणि तरुणांना जाणवले की आपले देखील असेच होते. बॉबी लोकांनी डोक्यावर घेतला. अतिशय तरल वाटणाऱ्या मेरा नाम जोकरचे अपयश बॉबीने अक्षरशः धुवून काढले. लोकांना फ्लॅशबॅकचा कंटाळा आला होता. तरुणाई वर्तमानात जगू बघत होती. बॉबी आला तो वादळ घेऊन. मला घरातून तंबी मिळाली होती. बॉबी बघायचा नाही. बघायचा नाही म्हणल्यावर जास्तच बघावा वाटू लागला. एकेक मित्र बघून सांगत अरे येड्या डिंपल काय दिसते दस्सा. सगळे पाहून आलेले ऋषिकपूर होऊन वावरायला लागले होते. शेवटी एकदाचा बॉबी बघितला. एकदाचे गालावरून मोरपीस फिरले. सगळं नवीनच घडत होते.  संस्कार बदलून टाकले बॉबीने. इतिहास घडवला ऋषी आणि डिम्पलने.
मग ऋषी खेळखेलमे बघितला, बारुद बघितला, अमर अकबर अँथनीत देखील भाव खाऊन गेला. राजेश खन्नाला डब्यात घालणारा हा हिरो अनेक दिवस गळ्यातला ताईत बनून राहिला. कपूर घराण्याचा आनुवंशिक जाडेपणा जेव्हा आला तेव्हा मात्र वेळेत एक्झिट घेतली. वयाला आणि जाडीला शोभतील काही चरित्र भूमिका केल्या. 
ऋषीचे जाणे म्हणजे आमच्या पिढीतल्या एका मित्राच्या जाणे. जीवाला चटका लावून गेले. तरुणावस्थेतून सगळे जातात पण सगळे तारुण्य जगतात असे नाही. ऋषीने आमच्या पिढीला तारुण्य जगणे शिकवले. 
'मेरी उमरके नौजवनो...' असे म्हणून नाचायला शिकवले त्या ऋषीला माझी ही छोटीशी श्रद्धांजली.

श्रीकांत कुलकर्णी
9850035037
30.04.2020
[30/04, 12:12 pm] Charudatta: *अजून एक तारा निखळला.....*

आज ३० एप्रिल २०२०
कालंच इरफान खान गेल्याचं दु:ख अजून २४ तासही जुनं झालेलं नसतानाच ऋषि कपूर गेल्याची बातमी कळली आणि मन हेलावून गेलं..... ४ सप्टेंबर १९५२ ला जन्मलेला ऋषि आज वयाच्या ६८ व्या वर्षी गेला.....
*मेरा नाम जोकर*  मधे छोट्या राजूची भूमिका साकारणारा गोबर्‍या गालांचा निळसर डोळ्यांचा ऋषि गेला ..... १९७० साली त्याकाळचा सर्वांत मोठा — २ मध्यंतरं असलेला सिनेमा *मेरा नाम जोकर* पडला , अतोनात आर्थिक नुकसान झालेलं , पण उत्कृष्ट बालकलाकाराचं पारितोषिक मिळवलेला ऋषि , आणखीन ३ वर्षांनी परत *बाॅबी* मधे राज नाथ ऊर्फ दुर्गा खोटेंच्या मिसेस ब्रिगॅन्झासाठीचा राजूबाबा साकारणारा ऋषि , कोवळ्या वयातल्या डिंपलपेक्षाही जास्त चिकणा वाटला होता मला ! त्याने कुणाचीही काॅपी केली नाही ! स्वत:ची अभिनयाची एक स्टाईल , नाचण्याची स्टाईल डेव्हलप करंत आणि अखेरपर्यंत हाॅस्पिटलमधेही स्टाफ नर्सेस व डाॅक्टर्सशीही सतत करमणूकपर संवाद साधणारा ऋषि गेला..... त्याने किती सिनेमात काम केलंय यापेक्षा किती प्रकारचे रोल्स किती समरसून केलं याला जास्त महत्व आहे!

पण मला थोडसं वेगळंच सांगायचंय.....
आपलं जीवन नाट्य—सिने सृष्टीतील कलाकारांनी इतकं व्यापलेलं असतं , की त्यांपैकी कुणीही गेलं तरी आपल्याला आपल्याच कुटुंबातील कुणीतरी गेल्यासारखं वाटतं. आणि मग *गुड्डी* सिनेमाद्वारे दिला गेलेला संदेश आठवतो.....

आज कोरोना नामक संकटाने ग्रासलंय म्हणून आपल्याला जे जास्त जाणवतंय — सैनिक , पोलीस , डाॅक्टर्स , नर्सेस , वाॅर्ड बाॅईज , साफसफाई कामगार , अत्यावश्यक सेवा पुरवणारे बँकर्स , टेलिफोन वाले , इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स..... अनेक जण आपलं जीवन धोक्यात घालून आपल्या संरक्षणासाठी झटतायत.यामधेच काहींनी आपले प्राण गमावले ! यासारखे कितीतरी लोक बारा महिने तेरा काळ आपल्यासाठी झटत असतात.प्रसंगी कितीतरी जणांनी आपले प्राण गमावलेत व आजही गमावत आहेत.पण हे सगळे खरे हिरो ( यामधे स्व.ऋषि कपूर किंवा पै.इरफान खान यांच्याशी तुलना करून त्यांचा अवमान करण्याचा तिळमात्रही उद्देश नाहिये ! ) ..... पण हे सगळे खरे हिरो गेल्यावरती त्यांना कुठल्याही न्यूज चॅनलवर इतका वेळ स्थान मिळतं ? नसेल तर किमानपक्षी आपण सगळे तरी त्यांचं किती काळ स्मरण करतो ? आणि मग बा.भ.बोरकरांच्या ओळी हमखास ओठी येतातंच *परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती , तेथे कर माझे जुळती!*

आज राजेश खन्नासारखाच एक चाॅकलेट हिरो म्हणून बरेच रोल्स केलेला पण नंतर वयोपरत्वे बरेच विविध रोल्स तितक्याच समर्थपणे केलेला ऋषि गेला..... चिंटू , ईश्वर तुझ्या आत्म्यास सद्गति देवो !

पण यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्या जीवनात कुठलीही करमणूक न करणारे परंतू ते आपले जीवनंच सुसह्य व्हावे म्हणून आपली जान निछावर करणार्‍या खर्‍या हिरोंनाही आठवूया आणि बघा , डोळ्यांच्या पापण्यांमधून दोन थेंब आपसूकंच गालवरती ओघळतील तुमच्या , अगदी माझ्यासारखेच !
© उदय गंगाधर *सप्रे* म—ठाणे
[30/04, 4:09 pm] Charudatta: ऋषी कपूरच्या कारकिर्दीतील कोरोना!!

सगळं ठीक ठाक चालू होतं आणि मधेच हा कोरोना आला. असा कोणीतरी मधेच आला आणि सगळा खेळ बिघडवून गेला तर किती यातना भोगाव्या लागतात ना. पण ऋषी कपूर हा असा अभिनेता आहे ज्याच्या कारकिर्दीत नेहमीच कोरोना सारखे इतर अभिनेते टपकत राहिले. तरीही ऋषीने कधीही हार मानली नाही. दुसऱ्या अभीनेत्याने भाव खाल्ल्यामुळे काही सिनेमे त्याच्या करिअरला लॉक डाऊन ठरले तरी तो पुन्हा उठला. असे अनेक लॉक डाऊन आले आणि गेले आणि तरीही ऋषी पुन्हा पुन्हा त्यावर मात करत राहिला. अखेरीस कोरोनाच्या कठीण काळातच ऋषीच्या निधनाची बातमी आली. अनेक चाहते हळहळले. ऋषी गेला तरी त्याची गाणी, वाद्य वाजवण्याचा अभिनय रसिकांच्या मनात अमर राहील.

ऋषी पहिल्यांदा "मेरा नाम जोकर" मध्ये दिसला. त्याला सुपरस्टार बनवले ते "बॉबी" ने.. सन होतं १९७३. पदार्पणात जोरदार सुरुवात झाली. त्याच्या पित्याने म्हणजे राज कपूरने कर्जातून मुक्त होण्यासाठी हा टीनएजरच्या प्रेमाचा फॉर्मुला आणला, जो चांगला यशस्वी झाला. ऋषीचा सुपरस्टारचा प्रवास सोपा झाला. पण एका लंबूटांग अभिनेत्याच्या रूपात माशी शिंकली. त्याबद्दल ऋषी काय म्हणतो.? ऋषीचे नुकतेच एक आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे, ज्याचे नाव आहे-'' खुल्लम खुलला ऋषी कपूर". त्यात तो म्हणतो की लंबूटांग अमिताभच्या सिनेमात असायचं तरी काय - सिर्फ टांगे टांगे दिखती थी !!

काहीही असो, पण ऋषीला अमिताभने रोखून धरले. हा अमिताभ ऋषीच्या पाचवीलाच पूजाला होता. 'अमर अकबर ऍंथोनी' चे उदाहरण घ्या. अमिताभ, ऋषी आणि विनोद खन्नाला समान फुटेज होतं. '' परदा है परदा " हे गाणं ऋषींच्या वाट्याला आलं होतं. स्टेजवर गाणं रंगात येतं. पण प्रेक्षकात बसलेला अमिताभ मधेच उठून गातो " तो अकबर तेरा नाम नाही है". बस एकच ओळ अमिताभ म्हणतो. पण ऋषीचं दुर्भाग्य बघा, टाळ्या आणि शिट्या इथे वाजतात.

तरी ऋषी हरला नाही. जितेंद्र, धर्मेंद्रसुद्धा अमिताभ सोबत सिनेमा करायला राजी नसताना, ऋषी अमिताभ सोबत कितीतरी चित्रपट करत गेला. 'कभी कभी' मध्ये अमिताभ वयस्कर दाखवला आणि ऋषी कपूर नव्या पिढीचा तरुण. इथे अमिताभच्या ग्रहांनी ऋषीच्या ग्रहांवर मात केली. आजही 'कभी कभी' अमिताभचा चित्रपट ओळखला जातो. ऋषीच्या बाबतीत एक बाब नेहमी चांगली घडत गेली. त्याला चांगली गाणी मिळाली. तो कोणतही वाद्य असं वाजवायचा की असं वाटे तो खरंच स्वतः वाजवतोय. म्हणून त्याच्या वाट्याला अशी गाणी आली की त्यात कधी त्याच्या हाती डफली आली तर कधी गिटार!!

पण सह-अभिनेता भाव खाऊन जाईल हा योग काही त्याच्या कुंडलीतून जाता जात नव्हता. 'सागर' ची कथा पूर्णपणे ऋषीच्या बाजूची होती. त्याच्या वाट्याला '' सागर जैसी आँखोवाली'', " सागर किनारे, दिल ये पुकारे', '' जाने दो ना'' अशी गाणी होती. प्रेमाच्या त्रिकोणात नायिका त्यालाच मिळणार होती. सोबत होता दक्षिणेचा म्हणून ओळखला जाणारा कमल हसन. म्हणजे ऋषी सुरक्षित होता. तरीही कमल हसन लोकांना आवडला. प्रेमभंग झालेल्या प्रेक्षकांनी कमल हसनसाठी सिनेमा पुन्हा पाहिला. तेल गेले, तूप गेले आणि हाती आले धुपाटणे ह्या म्हणीप्रमाणे ऋषीच्या हाती फक्त गाण्यातील गिटार उरली आणि सगळा 'सागर' कमल आणि डिंपल घेऊन गेले.

ऋषीला असे कोरोना कायम छळत राहिले. 'खेल खेल में ' सारखा सिनेमा ऋषीसाठी बनला होता. पण तिथेही वेगळी भूमिका करणारा राकेश रोशन आडवा आला. 'साहिबान' तरी त्याच्या नावावर व्हायला हरकत नव्हती. तिथे संजय दत्त आडवा आला. 'शेषनाग' बरा चालला. पण जितेंद्रने बाजी मारली.

'' दामिनी'' मध्ये त्याची भूमिका केंद्रस्थानी होती. सगळी गाणी त्याला मिळाली होती. सनी देओल फक्त एक वकील होता. त्याला ना नायिका होती आणि ना गाणी. तो फक्त कोर्टात दिसणार होता. पण सनीच्या ''तारीख पे तारीख'' सारख्या संवादावर प्रेक्षक फिदा झाले. इंटरवल नंतर आलेला सानी देओलचा ढाई किलो का हात भारी पडला. " ढाई किलो का हात आदमी पे पडता है, तो आदमी उठता नही उठ जाता है." असं म्हणणाऱ्या सनीने ऋषिलाच सिनेमातून उठवलं.

यश चोप्रा ह्यांना तर कधीच कुणाचं प्रेम नीट पाहवत नसे. कायम एक प्रेम जमत नाही तर दुसरा येऊन टपके. ऋषीला त्यांचा हा फॉर्मुला माहित होता. तरीही त्याने " चांदनी" ला होकार दिला. इथे ऋषीच्या हिमतीचं कौतुक करायलाच हवं. ऋषीला " दामिनी" मध्ये नमवणाऱ्या सनी देओलने यश चोप्रांच्या ' डर ' मध्ये वाईट अनुभव घेतला. व्हिलन बनलेल्या शाहरुखने डर ' स्वतःकडे ओढून घेतला, त्यानंतर सनी चोप्रांपासून नव्हे तर दुसऱ्या स्टार पासून दूर राहिला. पण ऋषी समोर कोणीही असला तरीही सिनेमा स्वीकारत राहिला. ' चांदनी' मध्ये विनोद खन्ना असूनही त्याने मुख्य नायकाची भूमिका केली. " चांदनी, ओ मेरी चांदनी" सारखी चोप्रांचा टच असलेली गाणी होती खरी पण विनोद खन्ना दुसरा नायक असून तो लोकांच्या लक्षात राहिला आणि दोघांना मागे टाकून श्रीदेवीने ' चांदनी' चं यश खेचून नेलं.

पुढे '' दिवाना'' आला. ऋषीला नव्या अभिनेत्याकडून मात खावी लागणार नव्हती. इथेही ऋषी हाती वाद्य घेऊन तारा छेडत राहिला, पण सूर दुसर्यालाच गवसत राहिले. शाहरुख हा काही मोठा स्टार नव्हता. त्याला चांगली गाणीही मिळाली नव्हती. ऋषी गिटार घेऊन " सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं''' गाताना दिसतो, " 'तेरी पायलीया" गाताना डफली वाजवतो तिथपर्यंत सगळं सुरळीत चालू राहतं. पण नवखा शाहरुख बापाशी भांडतो, " लाथ मारता हू तुम्हारी दौलत को" असं म्हणतो आणि पुढे प्रेक्षक त्याला पाहताना, ऋषीला विसरतात. जसे इतरजण ऋषीला मागे टाकून गेले तसे शाहरुखही ऋषीला मागे सोडून सुपरस्टार पदाकडे निघून गेला.

ऋषीच्या कारकिर्दीत "कर्ज", " लैला मजनू", " सरगम", "बोल राधा बोल" असे काही चित्रपट आले ज्यामुळे ऋषी सुपरस्टार पदावर विराजमान झाला. " हीना", " प्रेमग्रंथ" हे घरचे सिनेमा बनवताना त्याने दुसरा नायक मध्ये येणार नाही ह्याची काळजी घेतली. पण दुसरा नायक भाव खातो म्हणून फक्त सोलो सिनेमा करेन अशी ऋषीने अट घातली नाही, हे त्याचे वैशिष्टय आहे. अजूनही तो इतर अनेक सुपरस्टार सोबत भूमिका करतो. अमिताभ सोबत " १०२ नॉट आऊट " करताना तो कचरला नाही. इतकंच नाही तर आगामी " पहिले आप जनाब" मध्ये तो पुन्हा अमिताभ सोबत आहेच.

ऋषी नावाप्रमाणे ऋषी आहे. आपल्याबाबत काहीही घडो, आपल्या बाजूने घडो किंवा आपल्या विरोधात... तो आपलं काम करत राहिला. हम किसीसे कम नहीं हे त्याने सिद्ध करून दाखवलं.

आता तो जरी ह्या जगात नसला तरी त्याच्या कामातून अमर राहील.

ओम शांती ओम !!

- निरेन आपटे.

ऑनलाईन पुस्तक: अमृताशी पैजा

https://www.facebook.com/nirenaptethoughts/

No comments:

Post a Comment