Thursday, February 4, 2021

अमरप्रेम : रसास्वाद

अमरप्रेम : रसास्वाद  

१९७० साली आपल्याच हिंगेर कोचुरी या कथेवर अरबिंद मुखर्जी साहेबांनी उत्तम कुमार आणि साबित्री चटर्जीला घेवून एक अफाट बंगाली सिनेमा बनवला " निशिपद्म". नचिकेत घोष साहेबांच्या अफाट संगीतानी सजलेला हां चित्रपट ( मन्ना डेन्ना नेशनल अवार्ड आहे या चित्रपटासाठी ). हां सिनेमा शक्ती सामंता साहेबांनी बघितला आणि ते प्रेमाताच पडले या चित्रपटाच्या. अरबिंद कडून त्यांनी ही स्क्रिप्ट घेतली आणि त्यांनाच हिंदीत लिहायला लावली. शक्ती सामंता स्वतः दिग्दर्शन करणार होते. संगीत पंचम कड़े, गीतकार म्हणून आनंद बक्षी, हीरो म्हणून राजेश खन्ना आणि हेरोइन म्हणून शर्मीला. बघता बघता " अमरप्रेम " फ्लोरवर गेला, बनला आणि ऑल टाइम ग्रेट झाला.

पण हां चित्रपट ऑल टाइम ग्रेट झाला तो सगळ्यांनी घेतलेल्या अफाट मेहनती मुळे. रिहर्सल वगरेला न मानणारा राजेश खन्ना स्क्रिप्टवर अभ्यास करु लागला, शक्ती सामंतानीं बेफाट डिटेलिंग केले आणि हसत खेळत टून्स बनावणारा पंचम बारा बारा तास म्यूजिक रूम मध्ये घालवायला लागला. शक्ती सामंतांना या चित्रपटासाठी स्वर्गीय संगीताची गरज होती आणि पंचमला दादा बर्मनच्या सावलीतून बाहेर येण्याची.

अमरप्रेम साठी आंनद बक्षी साहेबांनी काय जबरदस्त गाणी लिहिली आहेत. आपली कलम त्यांनी पणाला लावली आहे अस म्हंटल तरी कमीच पडेल. एक एक शब्द म्हणजे मोती आणि या सुंदर मोत्यांना पंचमनी या जगा पलीकडच कोंदण लावले आहे. किशोरदाचा अमरप्रेम मध्ये लागलेला आवाज म्हणजे साक्षात स्वरराजाचा आवाज. तीन सोलो गाणी आहेत किशोरदाच्या आवाजात पण अशी की, या तीन सोलोच्या भरोश्यावर देखील ते लीजेंड झाले असते.

लताला पण अशीच दोन खूबसूरत गाणी दिली आहेत पंचमनी अमरप्रेम मध्ये. " रैना बीती जाये" म्हणजे अक्षरश: कहर आहे. दादा बर्मन कड़े असिस्टेंट म्हणून असतांना पंचमनी बनवलेली अर्धवट ट्यून. दादा बर्मनना राग मिक्स केलेले आवडत नसे, म्हणून कदाचीत ही ट्यून तशीच पडून राहिली असावी. पण बरच झाल, पंचमच्या सर्वोत्तम गाण्या पैकी एक असलेले हे गाणे पंचमच्या नावावर झाल. श्रोत्यांना सर्व सुरात चींब भिजवण्यात पंचमला फार आनंद मिळत असावा. रैना बीती जायेचा मुखडा आहे तोड़ी रागात आणि अन्तरा आहे खमज रागात. लतानी पण आपले संपूर्ण कौशल्य पणास लावून गायले आहे हे गाणे.
इराणी संतूरचा एक तुकडा वापरला आहे पंचमनी या गाण्यात ( शिव कुमार शर्मा साहेबांनी वाजवल आहे ) आणि आपण त्या तुकड्याचे रसग्रहण करतो न करतो तोच येतो एक बासरीच्या पैच, हरिप्रसाद साहेबांनी वाजवलेला. पंडित मल्लिकार्जुन मंसूर साहेबांनी हया गाण्याची स्तुती करतांना यात असलेल्या नोट्सच भरभरुन कौतुक केले आहे. रैना बीती जाये ऐकल्यावर साक्षात मदन मोहन साहेबांनी अभिनंदनाचा फोन केला होता दादा बर्मनला पण हे गाणे पंचमच आहे या वर मात्र ते बराच काळ विश्वास ठेवु शकले नाही.

तोड़ी म्हणजे सकाळचा राग आणि खमज उत्तर रात्रिचा पण पंचमनी याच अफाट कॉम्बिनेशन केले आहे. अमरप्रेम मध्ये पंचमनी खमज रागाचा भरपूर उपयोग केला पण प्रत्येक गाणे वेगळे आणि अफाट. "बड़ा नटखट है रे " मध्ये पण यशोदा आणि किशन कन्हैयाच वेगळेच नाते विणले आहे. वेश्यागृहात असलेल्या स्त्रीच्या वाटल्या येणारे ते काही तिचे स्वतःचे क्षण.

" चिंगारी कोई भड़के " म्हणजे कळस आहे या चित्रपटाचा. गिटारच्या माइनर कॉर्डनी पंचमनी या गाण्याची सुरवात केली आहे, मग हळूच बासरी येते आणि संपूर्ण गाण्यात हळुवार वायलिन वाजत राहत. तीव्र मध्यमचा इतका सुरेख वापर फार थोड्याच गाण्यात झाला आहे. भानु गुप्ताच गिटार, पंडीत हरिप्रसाद साहेबांची बासरी, चक्रवर्ती साहेबांच वायलिन आणि मग त्यावर किशोरदाचा आवाज, सगळ कस स्वर्गीय. आनंद बक्षी साहेबांचे पाय धरले असते मी या एका गाण्यासाठी. कसले अफाट बोल आहेत. परत एकदा रागांचा वापर करुन एक अजरामर गाणे बनवले पंचमनी. हे गाणे मग अनेक ठिकाणी बेंचमार्क ठरत गेले. 

हेमंत कुमार, पंडीत अजॉय चक्रबर्ती साहेबांचे हे आवडते कम्पोजीशन असल्याच त्यांनी सांगीतले आहे, शक्ति सामंतानी हे त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीतल सर्वोत्तम गाणे होते असे म्हंटले पण खरी दाद दिली ती पंडीत ए टी कानन साहेबांनी. " ज्यांना किशोर कुमार आवडत नाही आणि जे असल्या अप्रतीम कलाकृतीच कौतुक करु शकत नाही ते मैड आहेत"

अजुन ऐंग्री यंग मैनचा ज़माना सुरु व्हायचा होता आणि लोकांना कोणीतरी रिबेल स्टार हवा होता. अमरप्रेम मध्ये असच एक गाणे आहे जे त्याकाळी लोकांच्या भावनांना डायरेक्ट हात घालणारे होते. " कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है केहना ". आपल्याला काय वाट्टेल ते बोलाणाऱ्या लोकांकडे आपण काय लक्ष द्यायचे, सोड त्यांना असे म्हणत किशोर गातो " छोड़ो बेकार की बातो में, कही बीत न जाये रैना". गाण्याचे बोल आणि पंचमची अफाट ट्यूननी डायरेक्ट लोकांच्या काळजाला हात घातला. खमज राग हळुवार पणे मिसळला आहे राग कलावती मध्ये पंचमनी या गाण्यात. संगीतात रागांचा वापर कसा करावा याचे उदाहरण देण्यासाठी पंडीत अजॉय चक्रवर्ती साहेब हे गाणे वापरत असत. सहज गुणगुणता येणारे हे गाणे मात्र कसल अफाट आहे. या गाण्यातले बोल बघा, आनंद बक्षी साहेबांनी चाबुक ओढले आहेत त्या काळच्या समाजातील दूहीवर. बीत न जाये रैना यात किशोर इतका लड़ीवाळ खेळला आहे " रैना " या शब्दाशी. किशोरदानी काही काही घेतलेया हरकती म्हणजे स्वर्गीयच

एखाद्या ट्रायोलॉजी सारखी आहेत किशोरदाची तीन सोलो गाणी अमरप्रेम मध्ये. चिंगारी कोई भड़के म्हणजे झालेल्या दुःखाच गाणे, कुछ तो लोग कहेंगे म्हणजे छोड़ो यार, जगला फाट्यावर मारू आणि ये क्या हुवा म्हणजे आलेल्या दुखःद अनुभवाची टिंगलच. किशोरदा कसल भन्नाट गायला आहे हे गाणे .

डोली में बिठाई के कहा हे गाणे गायला पंचम नी तर साक्षात दादा बर्मनला बोलावाले. या चित्रपटानी पंचमच्या टैलेंटला योग्य मान सन्मान मिळवून दिला आणि मुख्य म्हणजे पंचम म्हणजे वेस्टर्न यातून पंचम बाहेर आला. ज्या वेस्टर्न स्टाइलसाठी काही जाणकार पंचमला ओळखतात त्यांना कदाचीत हे माहीत नसेल की पंचमच्या पहिल्या दहा गाण्यात एकही गाणे वेस्टर्न स्टाइलच नाही. पंचमनी त्याच्या एकंदर कारकीर्दीत तीन पिढ्यांना भुरळ घातली आणि तेही त्यांना आवडते ते संगीत देवून, उगाच नाही सुनील दत्त साहेब म्हणाले आहे " He understood youth like no other music director did "

ओ सजणा बरखा बहार आयी

1959 सालच्या उन्हाळ्यातला प्रसन्न दिवस होता.लॉस एंजेलिस मधल्या शहरातल्या मध्यावरच्या वाद्यांच्या सुप्रसिद्ध दुकानाचे मालक,मि.डेव्हीड बर्नार्ड आपल्या मोठ्या काळ्या रोल्सराईस मधून उतरून दुकानातल्या स्टाफचे अभिवादन स्विकारत केबीनकडे वळले.काऊंटरवरची ख्रिस्टीना परत आपल्या समोरच्या गिर्हाईकांना वाद्य दाखवण्यात गुंतली. कुठल्याही गिर्हाईकाला हवे तसे वाद्य निवडण्यासाठी मदत करण्यासाठी ती नेहमीच तत्पर असायची. या दुकानात जगभरातली सगळ्या प्रकारची वाद्ये निवडून आणून विक्रीसाठी ठेवलेली असायची. स्वतः बर्नार्ड साहेब वाद्यांचे चोखंदळ जाणकार होते. 
दुकानाच्या पायर्या चढून त्याचवेळी एक साधासा, पांढरा कुर्ता पायजमा घातलेला भारतीय पुरूष आत प्रवेश करता झाला. ख्रिस्टीनासमोरचे गिर्हाईक त्याला हवे तसे मनपसंत वाद्य घेऊन तिला धन्यवाद देत निघाले होतेच. तिने हसतमुखाने याच्याकडे बघितले.त्याच्या साध्यासुध्या दिसण्यावरून तिने त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावला. प्रत्येक गिर्हाईकाच्या खिशाचा अंदाज घेऊनच ती त्याला वाद्य निवडीसाठी मदत करायची.त्यामुळे तिचा आणि त्यांचाही वेळ वाचायचा.
त्याला कुठल्या वाद्याची खरेदी करायची हे विचारून तिने त्याला दुकानाच्या सतार विभागात नेले.मि.बर्नार्ड स्वतः सतार प्रेमी होते.पंडीत रविशंकर यांचे निस्सीम चाहते होते.भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी सतारी मागवलेल्या होत्या. त्यांना माहीत होते,सतार वाजवणे ही एक कला असली तरी सतार बनवणे ही एक वेगळीच कला आहे. सतार बनवतांना कुशल कारागीर फक्त पंढरपूरचे आणि लखनौचे भोपळेच वापरतात.पंढरपूरच्या भोपळ्यांची साल जाड असते तर लखनौच्या भोपळ्यांची पातळ.सतार बनवणारे कारागीर त्याच्या पसंतीने भोपळे निवडतात.खाण्याच्या भोपळ्यांपेक्षा हे भोपळे वेगळे असतात.चवीला अत्यंत कडू असतात.
त्या साध्याशा माणसाच्या खिशाला परवडणारी सतार त्याला दाखवणे कठीणच काम होते.ती दाखवत असलेल्या सतारी बघत असतांनाच त्याची नजर वर ठेवलेल्या इतर सतारींकडे जात होती.त्याने सगळ्यात उंचावर ठेवलेल्या एका सतारीकडे अंगुली निर्देश करून ती दाखवण्यास सांगितले.ख्रिस्टीनाने समजूतीच्या स्वरात सांगितले की ती सतार अत्यंत महाग आहे.तिला ते बेस्ट सितार म्हणतात.तिला माहीत होते मि.बर्नार्ड यांनी ही सतार खास जयपूरच्या कारागिराकडून बनवून घेतलेली होती. त्या साध्याशा दिसणार्याने तिला माहीती दिली की त्या सतारीला सूरबहार म्हणतात.आणि ती बघण्याची आपली इच्छा परत प्रकट केली. ख्रिस्टिनाने नाईलाजाने ती काढून त्याच्या हातात दिली.अतिशय प्रेमाने तिला कुरवाळून त्याने तिथेच जमीनीवर बैठक मारली. तिच्या तारा जुळवल्या आणि काही स्वर त्यातून काढले.त्या अतिशय सुरेल नादाने दुकानातली इतरही माणसं त्या दिशेला आकृष्ट झाली.मन लावून त्याची खमाज रागाची आळवणी सुरू होती.आजूबाजूला गोळा झालेल्या गर्दीला बेखबर तो डोळे मिटून सतारीवर बोटे फिरवित होता.तीही त्याला तितक्याच उत्स्फुर्ततेने प्रतिसाद देत होती.मि.डेव्हीड बर्नार्डही आपल्या केबीनमधून बाहेर येऊन, गर्दीत बाजूला उभे राहून त्या अनौपचारिक मैफिलीत सामिल झाले होते.जराशाने त्याचे सतारीशी चाललेले प्रणयाराधन थांबून त्याने हलकेच डोळे उघडले. आजूबाजूची गर्दीही भानावर आली.टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.मि.बर्नार्ड पुढे होऊन गदगदीत स्वरात त्याला म्हणाले की, “तुम्ही कोण हे मी जाणत नाही पण या वादनामुळे इतकंच समजलंय की तुम्ही फार मोठे कलाकार आहात.माझ्या या दुकानात येऊन आपण मला उपकृत केलंय.मी आपली काय सेवा करू शकतो ते मला सांगावं.” नम्रपणे त्याने सांगितले की त्याला सूरबहार खरेदी करायची आहे.तिची किंमत फक्त त्यांनी सांगावी.डेव्हीड सरांनी ती सतार त्यांना भेट म्हणून दिली.ज्याच्यासाठी ती निर्माण झाली होती त्याच्या पर्यंत पोहोचवण्याचे ते माध्यम ठरल्याचाच त्यांना अतिशय आनंद झाला होता. दुकानातून निघतांना त्याने निरोपासाठी ख्रिस्टिनापुढे हात धरला.आतापर्यंत जणू समाधीत असलेली ख्रिस्टीना जागी झाली. आणि तिने त्याला भावविभोर होऊन मिठीच मारली. डोळ्यातले आनंदाश्रू पुसत तिने त्याच्यासमोर आपली छोटीशी डायरी सहीसाठी पुढे केली. त्याने त्यात सही केली...सलील चौधरी..
तिथून परत कलकत्त्याला आल्यावर त्यांनी डोक्यात घोळत असलेली तीच खमाज रागातली धून आपल्या एका बंगाली गाण्यासाठी वापरली.शब्द होते...ना जेओ ना..खूपच भावली बंगाली रसिकांना ती. मग आपल्या ‘परख’ सिनेमातल्या गाण्यासाठी वापरली...आणि निर्माण झाले ते सिनेसंगीतातले अजरामर गाणे ...ओ सजना,बरखा बहार आयी...

Tuesday, February 2, 2021

Phulonsi rang se Hemant Deshpande

#Cinemagully

वहिदा रहमानच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त -

फूलों के रंग से...  
 
फूलों के रंग से, दिल की कलम से
तुझको लिखी रोज़ पाती
कैसे बताऊँ, किस किस तरह से
पल पल मुझे तू सताती
तेरे ही सपने, लेकर के सोया
तेरी ही यादों में जागा
तेरे खयालों में उलझा रहा यूँ
जैसे के माला में धागा
हाँ, बादल, बिजली, चंदन, पानी 
जैसा अपना प्यार
लेना होगा जनम हमें, कई कई बार
हाँ, इतना मदिर, इतना मधुर
तेरा मेरा प्यार
लेना होगा जनम हमें, कई कई बार

     फुलांच्या रंगात हृदयाची लेखणी बुडवून तुला रोज कित्येक पत्रे लिहिलीत.  वारंवार अशी पत्रे तुला लिहीत गेलो, मात्र मला प्रतिसाद देण्याऐवजी क्षणोक्षणी तू मला सतावत राहिलीस, त्रास देत राहिलीस.  ही आपल्या जवळ आलीय असं वाटावं नि तू पाऱ्यागत जवळून निसटावी असंही कित्येकदा झालंय.  हे तुला सांगावं तरी कसं?  झोपताना तुझीच स्वप्नं मनात दडवून झोपलो नि तुझ्याच विचारांच्या जाळ्यात गुरफटत गेलो नि तेही अशा प्रकारे की एखाद्या हारातला दोरा फुलांमध्ये जणू अडकून पडावा.  होय, आकाशातला मेघ नि वीज जसे एकत्र राहतात नि पाण्यात उगाळल्यानंतर चंदन जसे पाण्याशी एकरूप होते तसं परस्परांशी एकरूप झालेलं प्रेम आहे आपलं.  इतकं मदिर, इतकं धुंद करणारं मधुर प्रेम आहे तुझं-माझं! हे प्रेम निभविण्यासाठी आपल्याला इथे अनेकवार जन्म घ्यावा लागेल.
 
साँसों की सरगम, धड़कन की बीना, 
सपनों की गीतांजली तू
मन की गली में, महके जो हरदम,  
ऐसी जुही की कली तू
छोटा सफ़र हो, लम्बा सफ़र हो, 
सूनी डगर हो या मेला
याद तू आए, मन हो जाए, 
भीड़ के बीच अकेला
हाँ, बादल बिजली, चंदन पानी 
जैसा अपना प्यार
लेना होगा जनम हमें, कई कई बार
 
     माझा श्वास सतत तुझीच सरगम छेडत राहतो.  तुझ्या श्वासांचे चढउतार माझ्या श्वासात मला जाणवतात.  तुझ्या स्पंदनांची वीणा सतत माझ्या मनात वाजत असते नि माझ्या स्वप्नांच्या मधुर गीतांची ओंजळ होऊन तू माझ्या मनाच्या गल्लीबोळात नेहमी दरवळणारी जुईची कळी आहेस असेही मला वाटू लागते.  मी एखाद्या छोट्या पल्ल्याच्या प्रवासात गेलेला असो वा दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात असो, एखाद्या सुनसान रस्त्यावर असो वा गर्दीने वेढलेल्या एखाद्या यात्रेच्या ठिकाणी असो, तू मला प्रत्येक ठिकाणी आठवू लागतेस.  तुझी आठवण मला प्रत्येकच ठिकाणावर येऊ लागते नि भरलेल्या गर्दीत देखील तुझ्यात गुंतलेलं माझं मन अगदी एकटं-एकटं असल्यागत व्याकुळ होऊन जातं अगदी!  होय, आकाशातला मेघ नि वीज जसे एकत्र परस्परात मिसळून जातात तसं आपलं प्रेम अगदी एकरूप झालंय आता! हे प्रेम निभविण्यासाठी आपल्याला इथे अनेकवार जन्म घ्यावा लागेल.

पूरब हो पश्चिम, उत्तर हो दक्खिन, 
तू हर जगह मुस्कुराए
जितना भी जाऊँ, मैं दूर तुझसे, 
उतनी ही तू पास आए
आँधी ने रोका, पानी ने टोका, 
दुनिया ने हँस कर पुकारा
तसवीर तेरी, लेकिन लिये मैं, 
कर आया सबसे किनारा
हाँ, बादल बिजली, चंदन पानी 
जैसा अपना प्यार
लेना होगा जनम हमें, कई कई बार
हाँ, इतना मदिर, इतना मधुर 
तेरा मेरा प्यार
लेना होगा जनम हमें, 
कई कई बार

     पूर्व दिशा असो वा पश्चिम, उत्तर असो वा दक्षिण, तू प्रत्येक ठिकाणी नि प्रत्येक जागेवर मंद-मंद हास्याची पखरण पसरवीत जणू हसत असतेस.  मी तुझ्यापासून जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतो तितकी तू अधिकाधिक माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतेस.  आपल्या प्रेमाच्या मार्गात कितीतरी वादळे आली.  आपल्या प्रेमात अडथळा आणण्यासाठी, संकटांच्या कित्येक नद्या मार्गात आडव्या आल्या नि त्या अडसर ठरणाऱ्या पाण्याने देखील मला माझ्या प्रेमाविषयी टोकण्याचे सोडले नाही.  पाणीदेखील माझी अकारणच चौकशी करू लागलं.  मला वारंवार टोकू लागलं नि सारं जग तर छद्मीपणे हसून म्हणालं, 'अरे वेड्या, तू निघालास तरी कुणीकडे?'  मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून, तुझी तसबीर हृदयाशी लावल्यामुळे मला किती दिलासा मिळाला, किती शांती मिळाली ते माझं मलाच माहीत.  कारण आकाशातला मेघ नि वीज जसे एकत्र असतात.  चंदन नि पाणी परस्परात मिसळून जातात तसं आपलं प्रेम अगदी एकरूप झालंय आता!  परस्परात मिसळलंय आता!  परस्परात विरघळलंय आता! हे प्रेम निभविण्यासाठी आपल्याला इथे अनेकवार जन्म घ्यावा लागेल.
 
चित्रपट : प्रेम पुजारी (1970)
गायक : किशोर कुमार 
संगीतकार : सचिन देव बर्मन 
गीतकार : नीरज (गोपालदास सक्सेना)
 
    ✍️हेमंत देशपांडे         
------------------------------------------------------------------------------------