जयदीप पाठकजी
Sunday, October 16, 2011 AT 03:15 AM (IST)
सर्वसामन्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम जगजितसिंग यांच्या गझलेनं केलं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या गझलांनी साथीदाराची भूमिका बजावली. तुम्ही विचाराल, जगजित यांच्या गझलांनी काय दिलं? एका पिढीचं उत्तर तयार असेल- ""त्यांच्या गझलेने संवेदनांना आयाम दिले. हळव्या मनाला उभारी दिली आणि जगण्याला आसक्तीही दिली.'' त्यांच्या माघारी गुलजार यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ""शामसे आँखमें नमी-सी है, आज फिर आपकी कमी-सी है।'' ...अशी मनाची अवस्था असण्यामागं कदाचित हेच कारण असावं.
गझल एक अनुभव असतो. निर्मितीचं अदृश्य संचित अन पैलतीर गाठल्यानंतरचा दीर्घ उसासा यात होणारी अक्षरांची दमछाक म्हणजे गझल नव्हे. ती एक भावना असते. तिथं बकुळफुलांची स्वप्ने असतात, अश्रूंचे उत्पात असतात, तिथंच असते एक पहाट, वाऱ्यातील मयूरपंखांची थरथर, त्याचा एक नाद आणि गूढमय लय. मग या अशा हळुवार गझलेचंही गाणं होऊन जातं आणि मैफल सजू लागते शब्द-सुरांची...अशीच मैफल जगजित सिंग यांनी आयुष्यभर सजवून रसिकांना तृप्त केलं. रंगलेली ही मैफील ते अशीच अर्ध्यातून सोडून गेल्यानं खऱ्या अर्थानं गझलच मूक झाली. गझल म्हणजे दर्द, गझल म्हणजे भूतकाळाचे आठव अशी व्याख्या केली जाते. अगदी प्रेयसीचा विरह अशी मूळ ओळख असणाऱ्या गझलेचा प्रवास फार व्यामिश्र स्वरूपाचा आहे. मात्र जगजित सिंग यांनी गायलेली गझल आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आठवत राहते. रम्य भूतकाळ आणि चटका लावणारा वर्तमानकाळ "अगदी आहे असा' त्यांच्या गझलेतून उभा राहतो.
बेगम अख्तर, मेहंदी हसन, गुलाम अली यांनी गझलगायनाची राजेशाही शैली जोपासून गझल अजरामर केली, मात्र ती केवळ मूठभर रसिकांपर्यंतच सीमित राहिली. जगजित यांनी हिंदी चित्रपटगीतांच्या चौकटीमध्ये गझलेला बांधले आणि ती सर्वसामान्यांच्या ओठावर खेळवली. जगजितसिंग यांच्या निधनानंतर प्रसिद्घ झालेल्या अनेक लेखांमध्ये त्यांच्यातील संगीतकाराचा पैलू दुर्लक्षित राहिला असे वाटत राहते. त्यांनी अनेक गैरफिल्मी अल्बम व चित्रपटांना दिलेले संगीत एका प्रतिभावान गायकासोबत त्यांच्यातील समर्थ संगीतकारही अधोरेखित करते. "सीतम' चित्रपटातील "सारा दिन जागी तो बेजान सी हो जाती है' हे आशा भोसलेंचं गाणं असो किंवा "कौन गली से निकलू' हे रवींद्र साठे यांच्या आवाजातील गीत असो. त्यांच्यातील संगीतकार कायमच काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करीत होता. तलत अझीज या त्या वेळी तुलनेनं नवीन असणाऱ्या गझल गायकानं गायलेल्या गझलांचं संगीत जगजित सिंग यांचं होतं. संगीतकार जयदेव यांनी स्वरबद्ध केलेलं "ये है प्यार के नजारे' हे आशा भोसले यांच्यासोबतचं गीत जगजित सिंग यांचं पहिलं हिंदी चित्रपटगीत होय. मात्र या गाण्याच्या रेकॉर्डवर आशा भोसले आणि कोरस असं प्रसिद्घ झाल्यानं जगजित यांच्याकडे चित्रपटसृष्टीचं दुर्लक्ष झालं. दुर्दैवाचा फेरा त्याचवेळी सुरू झाला. तो काळ महम्मद रफी, किशोरकुमार यांचा असल्यामुळे पोटापाण्यासाठी लग्नांच्या पार्ट्यांमध्ये तलत मेहमूद, हेमंतकुमार यांची गाणी गायची वेळ जगजित यांच्यावर आली होती. याच काळात त्यांची भेट चित्रा सिंग यांच्याशी झाली आणि नंतर ती त्यांची सहचारिणी झाली. "दि अनफर्गेटेबल' या अल्बममुळे जगजित सिंग हे नाव प्रकाशात आलं. चित्रपट पार्श्वगायक म्हणून जगजित यांना यश देणारा पहिला चित्रपट म्हणजे "साथ साथ'. 1981 च्या या नितांत सुंदर चित्रपटातील गाण्यांमध्ये संगीतकार कुलदीप सिंग ("दिल तो पागल है'फेम उत्तम सिंग यांचे बंधू) यांनी जगजितसिंग व पत्नी चित्रा सिंग यांच्या आवाजाचा फारच सुरेख वापर करून घेतला. ऐन तारुण्यात प्रेमाच्या धुंदीत आयुष्याची सुरवात करणाऱ्या प्रेमी युगलाच्या भावना "तुम को देखा तो ये खयाल आया', "प्यार मुझसे जो किया तुमने', "ये तेरा घर ये मेरा घर', "क्यू जिंदगी की राह मे' यासारख्या गाण्यांमधून जीवंत झाल्या. जगजित खऱ्या अर्थानं एक वेगळ्या शैलीचे गझल गायक म्हणून प्रसिद्ध झाले. जगजित यांच्या गाण्यांचा समावेश असणाऱ्या चित्रपटांनी रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव साजरे केले असं कदापि झालं नाही. मात्र ती गाणी रसिकांच्या स्मरणात राहिली आज इतक्या वर्षांनंतरही ती आपलीशी वाटतात. अगदी उदाहरणच द्यायच झालं तर "होठो से छुलो तुम' (प्रेमगीत), "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो', "झुकी झुकी सी नजर' (अर्थ), "ये फासले तेरी दुनियाके' (मम्मो), "इस दुनिया में अपना क्या है' (भोपाळ एक्स्प्रेस), "मेरी आखोंने चुना है' (तरकीब), "बडी नाजूक है ये मंझिल' (जोगर्स पार्क), "चलते ही जाना है' (कसक) ही गाण्यांची यादी अशीच वाढविता येईल. मात्र त्यांच्या गझलांमध्ये जी विविधता आहे त्याला मात्र तोड नाही. बालपणाच्या स्वप्नरंजनात रंगलेली "वो कागज की कश्ती वो बारीश का पानी' आणि ऐन तारुण्यातल्या प्रेमाची धुंदी "होश वालोंको खबर क्या बेखुदी क्या चीज है' किंवा "प्यारका पहला खत लिखनेमे वक्त तो लगता है नये परिंदोको उडनेमे वक्त तो लगता है' अशी भलीमोठी रेंज या गझलांमध्ये आहे. पारंपरिक गझलेचा आकृतिबंध तोडण्याचा आरोप झाल्यानंतरही सातत्यानं प्रयोगशील गझलेचे नमुने सादर करून त्यांनी रसिकांना संमोहित केलं. गालिब, निदा फाजली, सुदर्शन फकीर, गुलजार, जावेद अख्तर यासारख्या कवींच्या गझलांना त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोचवलं.
एखादी कला साकार करत असताना कलावंताच्या वाट्याला आलेले भोग जर त्या कलेत उतरले, तर त्या कलेचे सादरीकरण अंत:करणाला भिडते. दारिद्य्राचे चटके सहन करत संघर्षासाठी केलेली वणवण, चित्रपटसृष्टीत लोकप्रिय होण्यासाठी खूप काळ पाहिलेली वाट, विवाहानंतर ऐन तारुण्यात झालेला मुलाचा मृत्यू असं सारं काही या माणसानं निमूटपणे सहन केलं. हे दु:ख त्यांच्या मखमली आवाजातून उतरले नसते तर नवलच. मुलाच्या मृत्यूनंतर चित्रानं गाणं सोडलं मात्र जगजित गात राहिले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत गात राहिले. त्यांच्या आयुष्याचं सारं संचित त्यांनी गायलेल्या असंख्य गझलांमध्ये आहे.
"जगने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा सब जीता की ये मुझसे मैं हरदम ही हारा तुम हारके दिल अपना मेरी जीत अमर कर दो' होठोंसे छुलो तुम मेरा गीत अमर कर दो
किंवा
यादोंके काटे अब दिलमें चुभते है ना दर्द ठहरता है ना आँसू रुकते है तुम्हे ढूंढ रहा है प्यार अब कैसे करे इतबार कहॉं तुम चले गए... चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौनसा देश कहा तुम चले गये....
या ओळींमध्ये जगजित सिंगांचं जीवनगाणं आहे. गझलेतील काव्याला जराही धक्का न लावता या माणसानं निरपेक्ष वृत्तीनं आयुष्यभर गझल सादर केली. प्रतिभावान दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या निधनाच्या तारखेदिवशीच एका हळव्या मनाच्या गझल गायकाचा मृत्यू व्हावा हा विचित्र योगायोग.
"टॉप टेन' फिल्मी गझल
- तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
- होठोंसे छुलो तुम
- होशवालोंको खबर क्या
- तुमको देखा तो ये खयाल आया
- चिठ्ठी न कोई संदेश
- तुमको देखा तो ये खयाल आया
- झुकी झुकी सी नजर
- कोई ये कैसे बताए के वो तनहा क्यू है
- बडी नाजूक है
- मेरी ऑखोंने चुना है
नॉनफिल्मी टॉप टेन
- हम तो है परदेस में देस मे..निकला होगा चॉंद
- वो कागज की कश्ती वो बारिश का पानी
- हात छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते
- गरज बरस प्यासी धरती को...पानी दे मौला
- कल चौदवीकी रात थी
- प्यार का पहला खत लिखने मे
- बात निकलेगी तो दूरतलक जाएगी
- जिंदगी यू हुई बसर तनहा
- गमका खजाना तेरा भी है मेरा भी
- तेरा चेहरा कितना सुहाना लगता है
|