मंडळी , *सप्रे* म नमस्कार !
आता आपण जाणून घेणार आहोत मधुबालाच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ कलाकृती *मोगल—ए—आझम* बद्धल ! पण सगळ्यात धक्कादायक बातमी मी आधीच सांगतो : हा सिनेमा अकबर बादशहाची थोरवी दाखवण्यासाठी निर्माण केलेला असूनसुद्धा पृथ्वीराज कपूरसारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर तोडीस तोड अभिनय करत जिने अख्खा सिनेमा पृथ्वीराज कपूरइतकाच खाल्ला , ती *मधुबाला ही या सिनेमासाठी निवडली गेलेली शेवटची कलाकार होती !* या सिनेमाला पूर्ण व्हायला एका तपापेक्षाही ( १२ वर्ष = १ तप ) जास्त काळ लागला , १९५३ मधे अनारकलीची भूमिका स्विकारणारी मधुबाला २० वर्षांची होती व सिनेमा आॅगस्ट१९६० मधे रिलीझ होईतोवर ती साडे सत्तावीस वर्षांची होऊन गेली होती ! सिनेमाचं काम सुरु होताना ती व दिलीपकुमार एकमेकांचे प्रेमी — आशिक होते व सिनेमा रिलीझ होईतोवर खर्या आयुष्यातील या सलीम—अनारकलीची विदारक ताटातूट झालेली होती ! हा सिनेमा बनायलाच एवढा काळ लागला , मग त्याची संपूर्ण माहिती सांगणारा लेख किती मोठा व सखोल असेल याचा विचार रसिक वाचकहो , तुम्ही करा आणि पुढील इशारा वाचून मगंच काय ते ठरवा :
*वैधानिक इशारा : मोगल—ए—आझम च्या घडणावळीची ही रंजक हकीगत खूप मोठी आहे व लेख एकदा वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याखेरीज उठवणार नाही! तेंव्हा एवढा वेळ हाताशी असेल तेंव्हाच हा लेख वाचायला घ्यावा!*
तर मंडळी , या इशार्यानंतर मी *मोगल—ए—आझम* च्या घडणावळीची ही रंजक हकीगत सुरु करतो .....
१९४०—५० या काळात नजीर अहमद खान नावाचे एक नामवंत नट होते.पूर्वीचं टी.टी.सर्कल अाणि अाताचं खोदादाद सर्कल येथे चरित्र अभिनेता जीवन { म्हणजे तेजाबमधील भुंकणारा खलनायक किरणकुमार याचा बाप } व अभिनेता प्रेम अदीब यांचं एक भागीदारीतील हाॅटेल होतं.चित्रपट सृष्टीतील इतर मंडळींप्रमाणेच नजीरही मोकळ्या वेळेत त्या हाॅटेलला भेट देत व सोबत स्वत:चा १६—१७ वर्षांचा भाचा करीमुद्दीन यालाही अाणत.सिनेक्षेत्राचं विलक्षण वेड असल्याने करीमला नजीरनी अत्रे पिक्चर्सच्या टेलरिंग डिपार्टमेंटला चिकटवून टाकलं होतं.पण मोठी स्वप्नं पहाणार्या करीमला स्वतंत्र व्यवसायाच्या वेडानं झपाटल्याने त्याचं मन नोकरीत रमेना.मग या खोदादाद सर्कलच्या हाॅटेलशेजारीच नजीरनी करीमला लेडीज टेलरिंगचं दुकान थाटून दिलं.पण इथंहि तो फार काळ रमला नाहि.अापलं काम अाटोपून तो या हाॅटेलमधे यायचा — जो चित्रपट सृष्टीशी संबंधित कलाकारांचा अड्डा बनला होता.मामाच्या शिडीने चित्रपटसृष्टीत शिरण्याचं उदात्त स्वप्नं पहाणारा करीम मोठमोठ्या बाता—बढाया मारयचा : *अरे , मुझे चान्स देकर तो देखिये ! ऐसा सिनेमा बनाऊँगा के देखते रह जाओगे!*..... *बायकांची मापं घेणार्या लेडीज टेलरला सिनेमातलं काय व कितपत कळणार?* अशी त्याची चेष्टा व्हायची.....
पण त्याच्या या फेकूगिरीला कंटाळून म्हणा किंवा भाच्याच्या या वेडापुढे हात टेकून म्हणा , नाइलाजाने का होईना , नजीरनं त्याला अापल्यासोबत स्टुडिओत न्यायला सुरुवात केली.असंच भटकंतीत असताना करीम ताडदेवच्या फेमस फिल्म्स लॅब नावाच्या चित्रपटसंस्थेच्या मालकांना म्हणजे के.अब्दुल्ला अाणि सिराज अली हकीम यांना भेटला.करीमच्या भन्नाट कल्पनांनी भारावलेल्या सिराजनं करीमला चित्रपट निर्मितीसाठी भांडवल द्यायचं कबूल केलं अाणि करीमच्या *लेडीज टेलर शाॅपला टाळं लागलं*.....
फेमस फिल्म्स बॅनरखाली करीमनं पहिला सिनेमा काढला.मुस्लीम पार्श्वभूमीवरील कथानक , उत्तमोत्तम सेट्स , पन्नास हजाराच्या खाली कामाला हात न लावणारी वीणा हि नटी नायिका म्हणून , पृथ्वीराज कपूर , याकूब , वास्ती अाणि अागा , दुय्यम नायिका सुरैय्या , सितारादेवी असे नट—नट्या , लाख रुपये मानधन घेणारा संगीतकार गुलाम हैदर ..... या सार्यांचं जबरदस्त मिश्रण होत एक *फूल* चित्रपटसृष्टीत फुललं *फूल* नावाच्या चित्रपटाच्या रूपानं ! ... सिनेमा तुफान हिट ठरला ..... पूर्वी कुठल्याहि सिनेमाने इतके पैसे मिळवून दिले नव्हते म्हणून सिराज अली प्रचंड खूष झाला व त्याने या लेडीज टेलर करीमच्या हातात सही केलेला कोरा चेक दिला.....
माझ्या प्रिय वाचकांनो , या १४ जून १९२२ रोजी म्हणजे ९६ वर्षांपूर्वी जन्मलेल्या लेडीज टेलरचं संपूर्ण नांव होतं *करीमुद्दीन असीफ ऊर्फ के.असीफ*.....
*जीवनातील सर्वश्रेष्ठ स्वप्नपूर्तीची खडतर वाटचाल*
माझ्या प्रिय वाचकांनो , वर अापण पाहिलं की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला..... { फक्त उपमालंकार म्हणून वाचावं ..... उगीच *मराठी / हिंदू अस्मिता* वगैरे खडबडून जागी नको व्हायला..... }.... इथून पुढे अापण या कलाकाराचा करीमुद्दीनचा उल्लेख टंकलेखन सोयीसाठी *के* असा करुया..
*फूल* च्या यशानंतर के नं *हीर रांझा* ची घोषणा केली , पण ती कागदावरंच राहिली.... कारण इम्तियाज अली ताज नावाच्या एका नाटक लेखकानं *मुगल—ए—अाझम* नावाच्या नाटकाचं हस्तलिखित के च्या हातात ठेवलं..... लखनौमधे जिची कबर असल्याचं ऐकिवात अाहे , त्या मोगल सम्राटाच्या जनानखान्यातील अनारकली नामक एका असामान्य रुपाची नृत्यसुंदरी यावर बेतलेलं *मीयाँ मूठभर दाढी हातभर* पठडीतील एक संहिता....पण सारी सिनेसृष्टी अवाक् होऊन जाईलसा एक भव्यदिव्य चित्रपट निर्माण करायचं मनाशी ठरवलेल्या स्वप्नवेड्या के ला त्याच्या जगण्याचं कारण सापडलं.... *मुघल—ए—अाझम*.....
*फूल* च्या यशानंतर के च्या असामान्य कर्तृत्वावर भाळून सिराज अलीनं *लागेल तेवढा खर्च कर , पण पुन्हा कुणी धाडंस करु नये असा सिनेमा निर्माण कर!* असं के ला सांगितलं..... झालं... वारं प्यायलेलं के नावाचं शिंगरु सुसाट उधळलं ना रांव ! *पाँच दस लाखमें ऐसा नामचिन सिनेमा बनाना यानि के "चूहेके बिलमें हाथीको घुसानेकी कोशिष करना!" !* असं जाहिरपणे बोलण्याइतका फटकळपणा के दाखवू लागला....
१९४८—१९५० या दोन वर्षांत के नं पटकथा लेखनासाठी शोधकाम सुरु केलं व संपवलंहि! *मुघल—ए—अाझम एकमेवाद्वितीय हवा , अंपर टंपर ऐरे गैरे मिज़ाज़च्या पठडीतली चार दिवसांत लिहिली जाणारी पटकथा नको , कितीही काळ लागो.....पटकथा उत्कृष्टंच झाली पाहिजे!* हा perfectionist के चा अट्टाहास होता..... पटकथा अावडली नाहि म्हणून *नहिं यार , छोड दो — ये तुम्हारे बस की बात नहिं!* असं म्हणंत पण फूल—ना—फुलाची पाकळी म्हणून सुयोग्य मानधन हातावर टेकवत किमान तीन एक पटकथाकारांना तरी के नं त्याच्यालेखी *पैगंबरवासी* करून टाकलं होतं.....
*इकडे.....*
ख्वाजा अहमद अब्बास ऊर्फ के.ए.अब्बास या माणसानं सय्यद अमीर हैदर कमाल नक्वी या नावाच्या माणसाकडनं १९४९ साली रिलीज झालेल्या *महल* ची पटकथा लिहून घेतली होती.A to Z सदरातलं नांव असलेल्या *सय्यद अमीर हैदर कमाल नक्वी* या *कमाल* माणसाला तो *अमरोहा* गावचा असल्यानं के.ए.अब्बासनं *कमाल अमरोहि* असं सुटसुटित नांव सुचवलं. के चा *पटकथा लेखक शोध अखेर कमाल अमरोहिंपाशी येऊन थांबला!*
मंडळी हाच तो मीनाकुमारीचा नवरा कमाल अमरोहि , ज्याच्या नावाचा स्टुडिओ मुंबईत जोगेश्वरी—पवई लिंक रोडवर पवईकडे येताना L&T Powai च्या अलिकडे फर्लांगभर अंतरावर डाव्या हाताला लागतो.....
या चित्रपटाचा गाभा म्हणजे *संवाद* हे जाणून , पटकथा तयार झाल्यावर के नं कमाल अमरोहिंसोबत उर्दू मिश्रित हिंदी संवाद लिहिण्यासाठी *एहसान रिझवी , वजाहत मिर्झा अाणि अमान उल्ला खान ( झीनत अमानचे वडील ! )* या तीन नामवंत लेखकांना पाचारण केलं.या चौघांनीहि एकमेकांशी को—आॅर्डिनेशन करत अजरामर संवाद लिहित *मुघल—ए—अाझम* पूर्ण केला.....
मंडळी ,अशा प्रकारे *मुघल—ए—अाझम* नामक भव्य कलाकृतीचा पाया तयार झाला..... आता वळूया
*मुघल—ए—अाझम* या सांगितिक प्रवासाकडे...
मंडळी , नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं अाणि इथे तर *न भूतो न भविष्यति!* अशा अनारकलीची जगावेगळी चित्तरकथा घडवू घातली होती के नं ..... कथा — पटकथा — संवाद हा त्रिवेणी संगम तर जुळवून झाला होता.अाता चित्रपटाच्या संगीताकडे के नं लक्ष केंद्रित केलं.
अगदि अलिकडे नावारुपाला येणार्या अनिल विश्वासची संगीतकार म्हणून नेमणूक केली.१—२ गाणी रेकाॅर्डहि झाली.पण ती के ला तशी सामान्यंच वाटल्यानं त्यानं अनिल विश्वासना त्या जबाबदारीतून मुक्त केलं.
अाता के नं त्याकाळी फारशा नावारूपाला न अालेल्या परंतू अत्यंत हुशार अशा सज्जाद हुसेनला पाचारण केलं.पण झालं काय की के चा असा { *गैर*? } समज होता की त्याला सिनेमाच्या सर्व अंगांची उत्तम जाण अाहे , म्हणून तो सज्जादला पार्श्वसंगीत , गीतांच्या चाली , फार कांय — अार्केस्ट्रेशनसंबंधीही सारख्या सूचना देऊ लागला.हे अगदीच असह्य होऊन सज्जाद हुसेननं बाहेरचा रस्ता पकडला.....
*मुघल—ए—अाझम* हा संथगतीने होणार असल्याची खात्री असल्यानं के नं दिलीपकुमार—नर्गीसला घेऊन *हलचल* नावाचा चित्रपट काढला होता , तेंव्हाही सज्जाद असाच बाहेर पडला व मोहम्मद शफी ( नौशादचा सहाय्यक ) या संगीतकारानं बाकीचं काम पूर्ण केलं होतं.अाताहि शफीला पाचारण करण्यात अालं.पण स्वत:ला व्ही.शांताराम किंवा राजकपूर समजणार्या के ला शफीचं संगीत रुचेना अाणि शफीला के ची माजोरी पचेना!शेवटी शफी पण बाहेर पडला.
याच सुमारास *अान* या चित्रपटातलं नौशादचं *दिलमें छुपाके प्यारका तूफान ले चलें , हम अाज अपनी मौतका सामान ले चलें , मौतका सामान ले चलें* हे घोड्याच्या टापांच्या ठेक्यावरचं गाणं प्रत्येकाच्या ओठांवर घोळत होतं. ( हिंदी सिनेमात घोड्याच्या टापांच्या संगितासाठी ओ.पी. पुढे प्रसिद्ध झाला , पण अशा प्रकारचं हे पहिलं गाणं नौशादनं सिनेसृष्टीला दिलंय महाराजा ! ) के नं नौशादना विनंती केली.पण के ची मुजोरी सर्वदूर पसरली असल्यानं नौशादनी के ला फटकारलं की *असीफभाई , माझा माझ्या कर्तृत्वावर व क्षमतेवर संपूर्ण विश्वास अाहे!त्यामुळे मला माझ्या कामात मला कुणाचीही — अगदी निर्माता—दिग्दर्शकाचीही ढवळाढवळ चालंत नाहि!खेरीज माझं अाणि शकील बदायुनीचं ट्यूनिंग जमलंय.त्यामुळे माझ्यासोबत शकीललाच गीतकार म्हणून घ्यावं लागेल.या माझ्या अटी मान्य असतील तरंच पुढचा विचार करता येईल, एरवी मला माफ करा!*
अाश्चर्याची गोष्ट म्हणजे परफेक्शनीस्ट के नं हे सगळं मान्य केलं ! { हे अापल्यासारख्या *कानसेनांचं नशीब!* }
मंडळी , शकील बदायुनी अाणि नौशाद या जोडीनं *मुघल—ए—अाझम* च्या यशातला किती वाटा उचललाय हे म्या पामराने सांगायची अावश्यकता नाहि!पण नौशादचं एक कौशल्य जाता जाता सांगवल्याशिवाय रहावंत नाहि म्हणून सांगतो { व्यवसायाने एक इंजिनिअर असल्याने या तांत्रिक गोष्टीचा उल्लेख अत्यावश्यक अाहे.... }
असं म्हटलं जातं की ,प्यार किया तो डरना क्या या गाण्यातलं अावाज घुमण्यामागचं रहस्य हे अाहे की त्याकाळी Echo Recording तंत्रज्ञान प्रगत नसल्यानं नौशादनं ते गाणं लताकडून एका स्टुडिओच्या न्हाणीघरात म्हणजे बाथरूममधे गाऊन घेतलं होतं !
सलाम नौशादच्या असामान्य प्रतिभेला !
*परफेक्शनीस्ट के.असीफ*
मंडळी , मी तुम्हाला अनेकदा के हा परफेक्शनीस्ट असल्याचं म्हटलंय.त्याचे अनेक दाखले आता तुम्हाला वाचायला मिळतील.
हा चित्रपट ज्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेवर अाधारित अाहे , त्या व्यक्तिरेखेची — अनारकलीची भूमिका करणारी कलाकार सगळ्यात शेवटी नक्की केली गेली......
१९४८ च्या सुमारास चित्रपटाचं बीज के च्या भन्नाट डोक्यात रोवलं गेलं.तेंव्हा अनारकलीसाठी सुरैय्या , वीणा व नर्गिस अशी तीन नावं के च्या नजरेसमोर होती.पैकी सुरैय्याचं सौंदर्य व अावाज दोन्हि उतरणीला लागलंय असं वाटल्यानं के नं त्यावर फुली मारली.वीणा मुसलमान खानदानातील सौंदर्यवती होती हे वादातीत , पण अनारकली साठी के ला अपेक्षित विनयशील लोभसपणा व लावण्य तिच्याकडे नाहि म्हणून तिचं नांव के नं मनातून काढून टाकलं.नर्गिस हि लावण्यवती खचितंच नव्हती , पण तिचा अभिनय वादातीत होता.म्हणून के नं तिला विचारलं.परंतू इथेहि त्याचं दुर्दैव { *अाणि माझ्यासारख्या तमाम रसिक डोळंस प्रेक्षकांचं सुदैव* } अाडवं अालं.झालं काय की , *मुघल—ए—अाझम* हा एक दीर्घ *मुदत—ए—चित्रम्* होणार असल्याने के नं दिलीपकुमार व नर्गिसला घेऊन *हलचल* नावाचा चित्रपट काढला व त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिलीपकुमारनं नर्गिसला अभिनयाबाबत अवाजवी शिकवण्याचा प्रयत्न केला व याला कंटाळून नर्गिसनं *यापुढे मी दिलीपकुमार सोबत एकंहि सिनेमा करणार नाहि* असं जाहिर केलं !
अाता अनारकलीसाठी पुन्हा पाढे पंचावन्न.....
१९५२ फेब्रुवारीच्या *स्क्रीन* साप्ताहिकात जाहिरात : *१६ ते २२ वयोगटातील सुंदर अाकर्षक तरुणींनी मुघल—ए—अाझम या अागामी चित्रपटातील अनारकलीच्या भूमिकेसाठी अापले पोर्टफोलिओज् ....येथे पाठवावेत.Sterling Investment Corporation या निर्मिती संस्थेचे झैदी हे प्राथमिक चाचणी दिल्ली , कलकत्ता , लखनौ , हैद्राबाद येथे घेतील.यातून निवडलेल्या तरूणींची चाचणी मुंबई कार्यालयात दिग्दर्शक के.असीफ व दिलीपकुमार घेतील.अनारकली व इतर भूमिकांसाठी या दोघांचा निर्णय अंतिम असेल.त्यांच्या लेखी सुंदर व अभिनयातील जाणकार अशा युवतीलाच अनारकलीच्या भूमिकेसाठी निवडण्यात येईल.*.....
या जाहिरातीच्या प्रतिसादात्मक साधरण साडे सहा हजार अर्जांतून अंदाजे पाचशे तरुणींची प्राथमिक चाचणी घेऊन त्यातून फक्त पाच तरुणी झैदींनी निवडल्या.....मुंबईतील अंतिम चाचणीत दिल्लीच्या *शीला दलाया* नामक काॅलेजकुमारीची निवड झाली.के नं तिची स्क्रीन टेस्ट घेतली , नंतर अनारकलीच्या जीवनातील निवडक प्रसंगांचं शूटिंग व डबिंगहि करण्यात अालं.पण परफेक्शनीस्ट के ला तिची expressions { भावमुद्रा } , body language { देहबोली } व English accent { इंग्रजीची झांक असलेले } चे उर्दू उच्चार पसंतीस उतरेनात......अाणि मग *शीला की जवानी* अनारकली ऐवजी सिनेमातील अनारकलीच्या धाकट्या बहिणीला बहाल झाली.....
परत *अनारकली* ढगात.....
.....अाता नगीना वगैरे चित्रपटांतून नावारुपाला अालेली अभिनय *समर्थ* { व शोभना *समर्थ* कन्या } अभिनेत्री *नूतन* हिचं नांव पुढे अालं.पण या सुवर्णसंधीला नाकारंत खुद्द नूतननंच सुरुंग लावला! एका अाघाडीच्या सिनेसाप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत नूतन अत्यंत नि:संदिग्ध अन् परखड शब्दांत म्हणाली , " *अनारकली सर्वार्थाने शोभणारी एकंच अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टित अाहे अाणि ती अाहे मधुबाला!* "...... { माझ्या प्रिय वाचकांनो , तमाम हिंदी सिनेसृष्टीमधे इतकं Best Self Analytical Mind अाजपर्यंत माझ्या पहाण्यात नाहि ! या एका वाक्यात नूतननं *ती फक्त दिसायलाच भाबडी , निष्पाप नव्हती , तर मनानंहि तितकीच निष्पाप होती* हे सिद्ध केलं ! }
सौंदर्य , लाघवी व अार्त असे हावभाव अाणि मार्दव याचा त्रिवेणी संगम असलेल्या मधुबालाविषयी के चं अजिबात दुमत नव्हतं.पण खरी ग्यानबाची मेख वेगळीच होती...... *महल* च्या यशामुळं मधुबालाला प्रचंड मागणी होती अाणि तिच्या मानधनाची रक्कम तिचे सर्व व्यवहार पाहणार्या अाताउल्लाखान { खरं तर अा *त* ता *यी* उल्लाखान } या बापाच्या हव्यासापायी अाकाशाला भिडली होती.त्यामुळे के नं तूर्तास हा विषय बाजूला ठेवला.....
सलीमच्या भूमिकेसाठी दिलीपकुमारचं नांव सुरुवातीला सुचवण्यात अालं होतं.पण तेंव्हा तो बारकुडा , पोरगेलासा व नवखा असल्यानं गोर्या घार्या चंद्रमोहनला निवडण्यात अालं.बहार या सलीमच्या प्रेयसीची भूमिका के नं अापली पत्नी सितारादेवी { जी अाधी त्याची मामी होती , जिच्याशी त्याने मामाला परत *मामा* बनवून लग्न केलं होतं ! }हिला दिली होती.दुर्जनसिंहची भूमिका अजितला दिली.जोधाबाईच्या भूमिकेसाठी दुर्गा खोटेंना करारबद्ध केलं.अकबराच्या भूमिकेसाठी सप्रू ला निवडलं.
तर मंडळी अाता या स्टारकास्टची परंत कशी विल्लेवाट लागली व के नं मानसिक स्तरावंर झालेली किती अाक्रमणं लीलया पेलली व पुरून उरला ते बघा :
अतिमद्यपानानं चंद्रमोहन अचानक वारला.तोवर दिलीपकुमार अंगापिंडानं भरला असल्याने त्याला सलीमची भूमिका देऊ केली तर अकबर—अनारकलीवरंच दरोमदार असल्यानं सलीमची भूमिका दुय्यम असल्यानं दिलीपकुमार हटून बसला.के नं *कमालला सांगून मी या भूमिकेला लिफ्ट देतो , पण या गहिर्या रंगांच्या अजरामर होऊ घातलेल्या भूमिकेला तू नाकारू नकोस!* असा सार्थ विश्वास दिलीपकुमारला दिला.चला.....सलीम बसला घोड्यावर.....
सप्रू अनेक चित्रपटात कामं करत असल्यानं शूटिंगच्या वेळी अडचण नको म्हणून मग अकबराची भूमिका पृथ्वीराज कपूर कडे अाली.
मध्यंतरी , के च्या विचित्र व विक्षिप्त स्वभावाला कंटाळून के ची बायको सितारादेवी त्याच्या जीवनातून व बहारच्या भूमिकेतून बाहेर पडली.....नुकत्याच के च्या जीवनात नवी बायको म्हणून प्रवेश केलेल्या निगार सुलतानानं बहारची भूमिका पटकावली{ *अाठवा*: तेरी मेहफिलमें किस्मत अाजमाकर हमभी देखेंगे.... }
अाता सांगतो मी या सिनेमाच्या अनारकलीच्या एन्ट्रीविषयी.....
*जिच्या सौंदर्याच्या तेजोवलयामधे तिच्या सहजसुंदर अभिनयाचं , भावमुद्रांचं कौशल्य झाकोळून गेलं असं एक शापित सौंदर्य : मुमताज जहान देहलवी ऊर्फ मधुबाला—जे नांव तिला देविकारानींनी बहाल केलं ती !*
दिलीप—मधुबालाचं प्रेमप्रकरण त्याच काळात रंगू लागलेलं......त्यामुळे अापल्या या अलौकिक चित्रपटाच्या एकमेवाद्वितीय अनारकलीसाठी मधुबालाकडे शब्द टाकायची विनंती के दिलीपला केली.दिलीपनं सूतोवाच केल्यावर मगंच के अताउल्ला खानला भेटायला गेला.के च्या सढळ हाताच्या कथा सर्वश्रुत होत्या , त्यामुळे अताउल्लाने ढीगभर अटी घालत अाकडा सांगितला *पाच लाख!*..... यावर *पागल हो गए हो क्या?पांच लाखात मला तीन नामांकित नट्या मिळतील.येतो मी...* असं म्हणंत के तिरमिरीत जायला निघाला.तेंव्हा अातापर्यंत गप्प बसलेली मधुबाला म्हणाली , *ठहरिये असीफसाहाब , मैं अापका पिक्चर साईन करुँगी.मुआवज़ा जो अाप देना चाहते हो दे दो , पर मेरे मिज़ाझके माफिक मेहनताना हो तो बेहतर होगा!*
के ला तर लाॅटरीच लागली , दारातून माघारी फिरत अाणलेल्या थैलीतील लाखभर रुपये टेबलवर ठेवत के म्हणाला , *ये अॅडव्हान्स है , इसके अलावा और दो लाख मैं तुम्हें दे सकूँगा!* अाणि लाखभर रुपयांची पावतीहि न विचारता *माझा दिवाणजी बाकी फाॅर्मॅलिटीज् पूर्ण करून जाईल !* म्हणंत के बाहेर पडला.....
अशा तर्हेने १९५३ साली अनारकली म्हणून २० वर्षीय मधुबालाचा *मोगल—ए—आझम* मधे सगळ्यात शेवटी शिरकाव झाला !
मंडळी के.असिफ परफेक्शनिस्ट होता , त्यामुळे इतरांना तो चक्रम व विक्षिप्त वाटला असेलहि पण तो तितकांच वफादार व दिलदार होता अाणि मधुबालाहि अत्यंत प्रामाणिक व इमानदार होती. *तीन लाख हि ठरलेली बिदागी असूनहि मधुबालाला शेवटचा हप्ता देताना के नं पंचवीस हजाराची भर घालून चेक मधुबालाला सुपूर्द केला!* असं नेमकं कांय घडलं की के नं पंचवीस हजार रक्कम जास्त द्यावी ? मंडळी , हे आता आपण जाणून घेऊया .....
*कोशिष करनेवालोंकी हार नहिं होती!*
*मंडळी , अापल्या अायुष्यात अापण एकंच स्वप्न बघावं अाणि त्याची पूर्तता करण्यासाठी अायुष्य पणाला लावावं अाणि तेहि अापल्या तत्वांशी कुठलीहि तडजोड न करता !* ह्याचं चालतंबोलतं उदाहरण म्हणजे ध्येयवेडा परफेक्शनीस्ट के.असीफ !
आता तुम्हाला मी सांगणार अाहे के नं एक तप म्हणजेच डोक्यात *मुघल—ए—अाझम* भरल्यापासून तो १९६० ला रिलीज करेपर्यंत किती व काय काय संकटांना कसं तोंड देत नौका किनार्याला लावली.....
साधारण दहा—पंधरा लाख रुपये खर्च झाले होते.अाणि हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर ध्यानीमनी नसताना काहि वर्षांनंतर सिराज अली एक दिवस अचानक पाकिस्तानला चालता झाला ! के ला दिवसा तारे दिसू लागले... सुदैवाने जाण्यापूर्वी सिराज अलीने पैशांची डिमांड केली नाहि.....पण म्हणतात ना , ज्याँको राखे साईयाँ , मार सके ना कोय!...... मुंबईचाच एक बडा भांडवलदार , ज्याने सिराज अलीसारखे कित्येक फायनान्सर्स चाकरीला ठेवले असते , त्याने के च्या असामान्य महत्वाकांक्षी सिनेमाबद्धल असलेल्या माहितीच्या अाधारावर अाणि के च्या क्षमतेवर प्रचंड भरवसा दाखवत के ला फायनान्सर म्हणून मदतीचा हात पुढे केला.....त्याचं नांव *शापूरजी पालनजी*......इंधनाअभावी जमिनीवर अापटून चक्काचूर होणारं के चं आकांक्षा—विमान परंत दुप्पट वेगानं अाकाशात भरारलं !
हुश्श म्हणंत परत चित्रीकरणाचं काम सुरु झालं.पण अजून शनी *सु* स्थानी यायचा होता.....
एम्.अॅण्ड टी सिने प्राॅडक्शनचे मालक पिता—पुत्र माखनलाल जैन अाणि राजेंद्र जैन यांनी अनारकलीवर चित्रपट काढण्याची घोषणा केली.आणि त्या अनारकलीचं कथालेखन व दिग्दर्शन करणार होता कमाल अमरोहि ! म्हणजे के च्या कथेत फेरफार करुन चक्क त्याने स्वत:च्या नावाला साजेशी *कमाल* केली होती!
के नं पत्रकार , Indian Motions Pictures' Producers' Association , बडे मध्यस्थ यांचेमार्फत जैन बाप—लेकांना समजवण्याचा प्रयत्न केला पण सगळं मुसळ केरात.....मग के नं त्यांना पंधरा लाख अाॅफर केले , पण करोडपती जैनांना ते दर्यामें खसखस..... जैनांच्या म्हणण्यानुसार के ला चित्रपट पूर्ण करायला अजून ८—१० वर्षं लागणार होती.त्यामुळे पाहता पाहता पूर्ण होणारा त्यांचा चित्रपट कुठलीच बाधा नव्हता के साठी.....पण मग के का असा का अस्वस्थ होता ? .....याचं कारण होतं : *अनारकलीच्या भूमिकेसाठी जेंव्हा के चाचण्या घेत होता व मधुबालाचा अनारकलीच्या भूमिकेसाठी दूरान्वयानेहि उल्लेख त्यानं केला नव्हता , त्या काळात अताउल्लानं जैनांकडून साईनिंग अमाऊंट स्वीकारुन मधुबाला त्यांच्या चित्रपटात काम करील असा वादा केला होता!*
अशा वेळी फिल्म इंडिया अाणि मूव्हि टोन्स या दोन प्रसिध्द मासिकांतून बाबूराव पटेल अाणि बी.के.करंजिया यांनी के ची बाजू मांडली.दिलीपकुमारनं तर जाहिररित्या कमाल अमरोहिची वागणूक नीतीमूल्यांना धाब्यावर बसवणारी असल्याचं सांगत निषेध नोंदवला ! पण जैन ढासळले तो घाव घातला नीतीमान व इमानदार मधुबालानं ! *के.असीफ साहेबांच्या अपरिमीत प्रयत्नांवर पाणी पडू नये म्हणून मी एम्.अॅण्ड टी च्या चित्रपटात अनारकलीची भूमिका करणार नाहि अाणि करारापोटी स्वीकारलेली साईनिंग अमाऊण्ट मी व्याजासकट त्यांना परत करते अाहे!* असं सांगून !....या सगळ्याचा परिणाम म्हणून एम्.अॅण्ड टी.चा अनारकली ढगात गेला अन्यथा कमालने कदाचित् *मुघल—ए—अाझम* चा पाऊणपेक्षाहि अधिक ट्रेलर अनारकलीत दाखवला असता.....
पण हे एकंच संकट नव्हतं.जवळ जवळ यांच सुमारास फिल्मीस्तानचे संचालक शशधर मुखर्जींनी आपल्या एका सिनेमाचं — *अनारकली* चं दिग्दर्शन नंदलाल जसवंतलाल कडे सोपवलं.सलीम होता प्रदीपकुमार अाणि अनारकली बीना राॅय. सी.रामचंद्रांचं संगीत ! .... अाणि १९५३ साली हा अनारकली प्रदर्शितहि झाला , सी.रामचंद्रांनी व लताने , हेमंत कुमारनं दिलेल्या योगदानामुळं अनारकली वारेमाप यशस्वी झाला ! तेंव्हाही के चा *मुघल—ए—अाझम* बाल्यावस्थेतंच होता ! पण या अनारकलीमुळं तमाम समीक्षकांनी असीफला सावधगिरीचा इशारा दिला.
पण *कुत्ते भौंकते रहते है , हाथी अपनी चाल चलता है!* या न्यायानं असीफ अापल्या चिकाटिनं काम करत राहिला व उलट या सार्यांनाच त्यानं सुनावलं : *मेरी अनारकली तो मियाँ करोडोंमें एक होगी जो इन सबकी छुट्टी कर देगी! देखते रहियो , सौ सुनारकी —एक लोहारकी!*.....याला म्हणतात *अात्मविश्वास!*.....
अाता जरा *परफेक्शनीस्ट* ची लक्षणं बघा.....
के च्या चित्रपटात : लढाईवरुन विजयी होऊन परतणार्या सलीमला एक संगमरवरी पुतळा भेट देण्याचं अकबर ठरवतो.पण शिल्पकाराकडून मुदतीत पुतळा पूर्ण न झाल्यानं शिल्पकार एका अनुपम लावण्यवतीला पुतळा म्हणून उभं करतो.ती लावण्यवती म्हणजेच हि अनारकली !
हा प्रसंग वास्तववादी दिसण्यासाठी मधुबालाच्या अंगाला संगमरवरी लेप देण्यात अाला होता.पापण्या पण तिला हलवता येत नव्हत्या!मुंबईची दमट हवा व वरतून अार्कलाईटस् चे प्रखर झोत अाणि कहर म्हणजे या पुतळ्यावर म्हणजे पर्यायाने मधुबालावर पारदर्शक कापडाचं अावरण !
सलीम धनुष्यातून बाण सोडून ते अावरण दूर करतो — हा प्रसंग असीफनं ट्रिक सीन्सनी चित्रित केला हे नशिब !
एका गाण्याच्या चित्रिकरणात मधुबालाच्या हातापायात खरे लोखंडी साखळदंड अडकवून अनेक रिटेकसह चित्रिकरण करण्यात अालं!यामुळं नितळ अाणि मुलायम कांतीवर काळेनिळे डाग पडले.अताउल्लाचा चडफडाट झाला.कलादिग्दर्शकानं कचकड्याचे रंगवलेले साखळदंड लोखंडी साखळदंडांचे अाभास सहज निर्माण करतील असा पर्यायहि सुचवून पाहिला , पण वास्तववादाचं वेड रक्तात भिनलेला के अापल्या कार्यपध्दतीवर ठाम राहिला!
पण एक मात्र तितकंच खरं होतं , के दुराग्रहि होता पण बेफिकीर वा निष्काळजी नव्हता ! अापल्या सेटवर एक डाॅक्टर , एक नर्स व एक अॅम्ब्यूलन्स तमाम कलाकारांसाठी त्याने सतत तयार ठेवली होती !
अकबर बादशहा अजमेरच्या सलीम चिश्तीच्या दर्ग्याला भरदुपारी अनवाणी चालत जातो.पृथ्वीराज कपूरच्या चेहेर्यावर नैसर्गीक हावभाव यावेत यासाठी छायाचित्रकार माथूर यांचा फक्त पायांच्या क्लोज—अप शाॅटस् साठी डमीचा प्रस्ताव के नं धुडकावून लावंत पृथ्वीराज कपूरला अनवाणी चालायला लावंत शाॅटस् घेतले ! त्यामुळे तळपाय भाजून तळपायाला मोठमोठाले फोड अाले ! तेंव्हा त्यांचे पाय स्वत:च्या हातात धरुन के नं डाॅक्टरांना मलमपट्टी करायला लावली !
अकबर अनारकलीला सलीमबरोबर एक रात्र गुजारण्याची परवानगी देतो.कां तर , दुसर्या दिवशी तिला भिंतीत चिणून मारण्यात येणार असतं.सलीमच्या सहवासाच्या सुखानंतर राजाज्ञेवरुन ती सलीमला एक गुलाबाचं फूल हुंगण्यासाठी देते —जे हुंगल्यावर तो बेशुद्ध पडणार असतो....या प्रसंगाचे खूपदा रिटेक्स झाले.चार—अाठ अाण्यात सहंज मिळणारा कुठल्याहि बागेतला गुलाब चालवून न घेता तीनदा विमानानं ते फूल के नं काश्मीरहून मागवलं व त्यासाठी पंधरा हजार खर्च केले !
अनारकलीला ज्या भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा अकबर देतो , त्या शाॅटसाठी के नं शापूरजींकडे पन्नास हजार मागितले.मंडळी , स्वत: मोठे बिल्डर असल्याने १९५५—५६ या काळात अशा भिंतीला पांच हजार खर्च येतो याची खात्री असल्याने शापूरजींनी यावर स्पष्टीकरण मागितलं , तेंव्हा के म्हणाला , *सेठ दीवार के लिए जबलपूरका संगेमरमरका पत्थर होना और उसका कारीगरभी उधरकाच होना तभी सीन रिअलिस्टिक लगता ना?*
कपाळावर हांत मारुन घेत शापूरजींनी मुकाट के ला पैसे काढून दिले , पण *चित्रपट पूर्ण होईस्तोवर असीफ अनारकली अाणि अापली कबर एकाच वेळी बांधणार बहुतेक!* या विचाराने धास्तावून गेले!
अापल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे डोळे दिपून जावेत म्हणून के नं एक शीशमहलचा सेट उभारायचं ठरवलं.यासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमधे शेकडो कारागीर दोन वर्षं अहोरात्र राबवले.कलादिग्दर्शक एम्.के.सैद यांनी मुंबईतल्या दोन—तीन नावाजलेल्या अार्किटेक्ट व इंटिरिअर डिझायनरची मदत घेतली.इटालिअन टाईल्सचं फ्लोअरींग , इराणी गालीचे , संस्थानिकांकडून उधारीवर घेतलेली हंड्या—झुंबरे, काळानुरूप नक्षीदार खिडक्या व भिंतींच्या कमानी, संगमरवरी भासणार्या प्लॅस्टर अाॅफ पॅरीसच्या मूर्ती....
एक लाख रुपये मानधन देऊन काचेचं नक्षीकाम करण्यात माहिर अशा अागा सिराझीला शीशमहल सजवण्याचं काम देण्यात अालं.विशिष्ट रंगाच्या काचा अाणि अारसे बेल्जियमवरुन मागवण्यात अाले.
अशा तर्हेने पस्तीस लाख रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या शीशमहलचा सेट पहाण्यासाठी मुंबई , कलकत्ता , मद्रासहून अनेक दिग्गज तंत्रज्ञ , हाॅलिवूडचे तंत्रज्ञ , चीन , जपान , हाँगकाँगहुंहून जाणकार मंडळी सेट पहायला अाली होती.
या सेटवर अनारकलीचं सप्तरंगांतलं नृत्य चित्रीत करायचं ठरलं होतं.कृष्णधवल छायाचित्रणातला कसबी सिनेमॅटोग्राफर अार.डी.माथूर यानं ट्रायलसाठी मोठमोठे दिवे प्रकाशित केले.पण असंख्य अारशांमुळे परावर्तीत झालेल्या प्रकाशामुळे एक्सपोझ झालेली फिल्म जळून पांढरीफटक पडली ! तमाम कसबी तंत्रज्ञांनी *इतक्या प्रखर प्रकाशात कॅमेर्याच्या लेन्सेस काम करूच शकणार नाहित!* असं छातीठोकपणे सांगितलं !
के च्या वास्तववादाच्या वेडाने धास्तावलेल्या शापूरजींना के च्या हितशत्रूंनी अधिकंच बिथरवलं व *पैसा पाण्यात जाईलंच , वर सिनेमाहि पूर्ण होणार नाहि!* अशा कानपिचक्या दिल्या.
प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले शापूरजी तडक त्याकाळच्या ज्येष्ठ दिग्दर्शक सोहराब मोदिंकडे गेले.मोदिंनी प्रत्यक्ष सेट पाहिल्यावर *प्रेक्षकांचे डोळे दिपवण्याच्या नादात असीफ स्वत:सकट सगळ्यांसाठी खड्डा खणतोय!* असा निर्वाळा दिला !
सटपटलेल्या शापूरजींनी *झालं एवढं बास , इथून पुढे सोहराब मोदी दिग्दर्शनाचं काम पहातील !* असं के ला सुनावलं !
मंडळी , कल्पना करा की , तुमच्या जीवतोड मेहनतीनं हातातोंडाशी अालेली स्वप्नपूर्ती व त्याचं सगळं श्रेय तुमच्या डोळ्यांदेखत जर दुसर्याच कुणालातरी मिळणार असं कळलं तर तुमची काय अवस्था होईल?
बेभान होत असीफ म्हणाला ," *सेठ तुमचे पैसेच खर्च झालेत , पण माझ्यासकट शेकडो लोकांनी या चित्रपटासाठी रक्ताचं पाणी केलंय! या सेटवर अकबर—जोधाबाई—सलीमसमोर अनारकली नाचणार अाहे!माझ्या स्वप्नपूर्तीच्या या परमोच्च क्षणी मी कुणाचीही लुडबुड खपवून घेणार नाहि! तुम्हि माझे कुबेर अाहात अाणि मोदिसाहेबांविषयीहि मला अादर अाहे , पण अशा ऐन वेळी मला अाडवं येणार्यांची तंगडी तोडून हातात दिल्याशिवाय मी रहाणार नाहि!"*
असीफचा अावेश पाहता शापूरजींनी थोडं नमतं घेत म्हटलं , " *अाॅल राईट , हा सिक्वेन्स तुझा ! बट देन इनफ विल बी इनफ! पुढचं काम मोदिसाहेब बघतील !"*
हे सगळं ऐकंत इतका वेळ मेक अप मधे उभी असलेली मधुबाला अापल्या शांत पण दृढनिश्चयी स्वरांत म्हणाली , " *सलाम सेठ , सलाम मोदिसाब , गुस्ताखी माफ ! पर मेरा अॅग्रीमेंट असीफसाहाबके साथ हुवा है , अापके साथ नहिं , अगर असीफसाहाब डायरेक्टर नहिं होंगे तो फिर ये मधुबालाभी अनारकली नहिं होगी !*"
*पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या चित्रपटातून मधुबाला बाहेर पडली तर अापण कुठे जाऊन पोचू?* हे ओळखता येण्याइतपत चाणाक्ष व व्यावसायीक असलेले शापूरजी पालनजी हे सोहराब मोदिंबरोबर एकंहि अवाक्षर न काढता सेटवरून निघून गेले !
पाणावलेल्या डोळ्यांनी मधुबालाकडं पहात असीफ म्हणाला , " *अापका ये एहसान मैं ता—उम्र नहिं भूलुँगा मधूजी!*"......मधुबालाच्या या खंबीर पाठिंब्यासाठी म्हणून , करारात नसतानाहि मधुबालाला मानधनाचा शेवटचा हप्ता देताना पंचवीस हजाराची भर घालून असीफनं चेक तिला सुपूर्द केला !
शीशमहलच्या शेकडो अारशांवरून प्रकाशकिरण परावर्तीत होऊन फिल्म कोरीच राहू लागली ! शेवटी अार.डी.माथूरनं डायरेक्ट लाईटऐवजी सर्व दिव्यांवर उलटे रिफ्लेक्टर्स बसवले व इनडायरेक्ट लाईटमधे शूटिंग करून पाहिलं , ज्यामुळे अारशांत हजारो प्रतिमा स्पष्ट दिसल्या व हि अायडिया यशस्वी झाली !
मंडळी , अाजकाल जे स्टिल व लाईव्ह फोटोग्राफीचं तंत्र वापरतात , त्याचा उगम इथून झाला !
*एक मधुबाला डोळ्यात न मावणार्या माझ्यासारख्या करोडो रसिक प्रेक्षकांना "चारो तरफ है उनका नजारा" या लताच्या सूरमयी ओळींवर थिरकणार्या शेकडो मधुबाला पडद्यावर दाखवणार्या अार.डी.माथूरला माझे लाख सलाम अाणि इतक्या उच्च कोटीची अनारकली याची देहि याची डोळा , एक तप अापल्या कल्पनाशक्तीत साठवून ठेवत हा खजिना अाम्हासाठी रिता करणार्या वेड्या कलाकारा , करीमुद्दीन असीफ , तुला कोटि कोटि सलाम !*
मंडळी आता वळूया या सिनेमच्या संगित विभागाकडे.....
*अजरामर संगीताचा खजाना : मुघल—ए—अाझम*
हा भाग जो संगीतविषयक अाहे , यात सुरुवातीला गाण्यांची सर्वसाधारण माहिती अाणि मग शक्य तितक्या गाण्यांवर विशेष माहिती व विवेचन ! { हे विधान माझ्यासारख्या संगीतविषयातील *दगड* व निव्वळ *कानसेन* असलेल्याने करणं हे एक मोठ्ठंच धाडस अाहे म्हणा ! }
मंडळी , शकील बदायुनी व नौशाद अली या जोडगोळीनं या चित्रपटासाठी १३ गाणी ध्वनीमुद्रित केली.परंतू चित्रपटाची लांबी व कालावधी बघता या वीसपैकी फक्त १२ गाणीच चित्रपटात ठेवण्यात अाली! प्रत्येक गाण्याला सरासरी ₹ ३,०००/— च्या हिशोबाने ₹ ६०,०००/— व दोन विशेष गाण्यांचे ₹ ५०,०००/— असे मिळून ₹ १,१०,०००/— हे फक्त अाडिओ रेकाॅर्डिंगसाठी लागले ! दोन विशेष गाण्यांचं गौडबंगाल काय अाहे ते यथावकाश सांगेनंच!
चित्रपटात असलेली १२ गाणी , गायक—गायिका व गाण्याचा अवधी पुढीलप्रमाणे :
1."मोहे पनघट पे"
*लता मंगेशकर व समूह*
अवधी 04:022 मिनिटे.
2. "प्यार किया तो डरना क्या" *लता मंगेशकर व समूह*
अवधी 06:213 मिनिटे.
3. "मुहब्बत की झूठी"
*लता मंगेशकर*
अवधी 02:404 मिनिटे .
4. "हमें काश तुमसे मुहब्बत" *लता मंगेशकर*
अवधी 03:085 मिनिटे .
5. "बेकस पे करम कीजिए"
*लता मंगेशकर*
अवधी 03:526 मिनिटे.
6."तेरी महफ़िल में"
*लता मंगेशकर, शमशाद बेग़म व समूह*
अवधी 05:057 मिनिटे.
7. "ये दिल की लगी"
*लता मंगेशकर*
अवधी 03:508 मिनिटे.
8. "ऐ इश्क़ ये सब दुनियावाले" *लता मंगेशकर*
अवधी 04:179 मिनिटे .
9. "खुदा निगह्बान"
*लता मंगेशकर*
अवधी 02:5210 मिनिटे.
10. "ऐ मुहब्बत जिंदाबाद" *मोहम्मद रफ़ी* व { *100 गायकांचा* } समूह
अवधी 05:0311मिनिटे.
11. "प्रेम जोगन बनके"
*उस्ताद बड़े ग़ुलाम आली खाँ*
अवधी 05:0312 मिनिटे .
12. *"शुभ दिन आयो राजदुलारा"* उस्ताद बड़े ग़ुलाम आली खाँ अवधी 02:49 मिनिटे
*12 गाण्यांचा एकूण अवधी 49.02 मिनिटे*
मंडळी , विचार करा की १२ वर्षं खपून निर्माण केलेल्या चित्रपटाचा एकूण अवधी १९७ मिनिटांचा { म्हणजेच सव्वातीन तास+ } अाणि यापैकी फक्त गाणी ४९.०२ मिनिटांची , म्हणजे २४.८८% *~ जवळ जवळ २५%* काय जिगर अाहे !
तर अाता अापण वळूया गाण्यांच्या रसग्रहणा कडे......
*मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे*
कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अाहे.राणी जोधाबाईच्या सांगण्यानुसार तो मोठ्या जल्लोशात साजरा व्हायला हवाय.राजवाड्यात सुंदर झर्यांच्या दोहो बाजूंना सतार—वीणा वाजवत ललना बसल्या अाहेत.कृष्णाची खर्या सोन्याची मूर्ती { परफेक्शनीस्ट असीफनं } मधोमध ठेवली अाहे.अाणि नाजूक पदन्यास करत लचकत मुरडत राधा बनून ती येते ..... अाणि म्हणते *मोहे पनघटपे....* अंतर्यामधे जे काहि ठुमके तिने घेतले अाहेत , अहाहा..... नंदलाल काय , *नंद* सुद्धा चळला असता राव !मंडळी , विचार करा , दिग्दर्शक कमरुद्दीन असीफ , कलादिग्दर्शक एम्.के.सैद , गीतकार शकील बदायुनी , संगीतकार नौशाद अली , ठुमकती राधा — मुमताज जहान देहलवी ऊर्फ मधुबाला ..... तमाम लोक मुसलमान अाणि पडद्यावर साकारतंय *गारा* या दुर्मीळ रागातली लाडीक तक्रारवजा गाणं......हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या बहुतेक सगळ्या रागांवर अाधारित गाणी देणारा नौशाद हा एकमेव संगीतकार असावा ! *स्वर्गसुख यापेक्षा काय वेगळं असेल महाराजा?*
अाता वळुया त्या गाण्याकडे , ज्या एका गाण्यासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमधे पस्तीस लाख रुपये खर्च करून दोन वर्ष अथक मेहनत करून *३५ फूट उंच ; ८० फूट रुंद अाणि १५० फूट लांब शीशमहल बनवण्यात अाला !* : *प्यार किया तो डरना क्या?*
वास्तववादाचा भुकेला दिग्दर्शक परफेक्शनीस्ट के.असीफ , याएका गाण्यासाठी बनवलेला शीशमहल , असीफसाठी चित्रपट सोडण्याची तयारी दाखवणारी मधुबाला , अत्यंत कल्पकतेने अारसेमहालात पण शूटिंग करणं शक्य करून दाखवलेला अार.डी.माथूरसारखा कॅमेरामन , सितारादेवी—लच्छू महाराज—१५—१६ वर्षीय गोपीकृष्ण यांच्याकडून कमकुवत ह्रदयाची पर्वा न करता नृत्य शिकणारी मधुबाला..... या सगळ्याचंच दडपण मनावर असणार्या शकील बदायुनीनं अापली सारी प्रतिभा पणाला लावून या शीशमहलमधील गाण्याचे पंचवीस एक मुखडे तयार केले.पण नौशादच्या पसंतीस ते उतरेनात!बरंच विचारमंथन चाललं होतं अाणि मध्यरात्रीच्या सुमारास नौशादला *युरेका* सापडली......लोकगीतांच्या संग्रहातील एका जुन्या रेकाॅर्डवर एक राजस्थानी गीत नौशादला सापडलं *प्रेम किया का चोरी करी?*.... प्रतिभावान शकीलनं { याचं खरं नांव *शक्कल* असणार , नक्कीच ! } गीत लिहून काढलं..... गीत सुरु होण्यापूर्वीची दोन ओळीतील अार्त तत्वज्ञान ज्या धाडसाने दरबारातील एक य:कश्चित् नाची अनारकली अकबर बादशहाला ऐकवते , ते त्याच तोलामोलाचे बोल शकीलनं लिहिले — नौशादने साजात मढवले अाणि लताने अमर केले.... *इन्सान किसीसे दुनियामें* *इकबार मुहोब्बत करता है* *इस दर्दको लेकर जीता है , इस द s s s s र्द को लेकर मरता है!*..... या दोन वाक्यांच्या फेकीनंतरचा मधुबालाचा अावेश अाणि निरुत्तर अकबराच्या मनातील खळबळ दाखवणारा पृथ्वीराज कपूरचा अभिनय अाणि या पार्श्वभूमीवर संथ लयीत साकारणारं *प्यार किया तो डरना क्या?* हे नेभळट व मुर्दाड सलीमच्या पौरूषत्वावर मात करणारं व सार्वभौम राजावर तुच्छतादर्शक कटाक्ष टाकत मधुबालानं केलेलं अावाहनात्मक विधान !
*अाज कहेंगे दिलका फसाना , जान भी ले ले चाहे जमाना* म्हणताना फिरवलेला व शेवटी अकबरावर स्थिरावलेला हात..... सगळं सांगून जातो की मला परिणामांची तमा नाहि !
*छुप ना सकेगा इश्क हमारा , चारों तरफहै उनका नजारा* म्हणणारी करोडोंतली एक मधुबाला सहस्त्र अारशांमधे दाखवणार्या असीफ , तुझे *असीम* उपकार! अस वाटतं गाणं इथेच फिल्म तुटून थांबावं अाणि जिवाचे हजारो डोळे व्हावेत!
*पर्दा नहीं जब कोई खुदासे , बंदोंसे पर्दा करना क्या?* म्हणंत अकबराच्या पायावर सुरी ठेवून सलीमला अात्मसमर्पणानंतर मी मरायलाहि सिध्द अाहे हे ठसक्यात दाखवणारे मधुबालाचे हावभाव , परिणामांच्या विचारांनी भयाकूल व अनारकलीची कीव वाटणारे व्याकूळ दुर्गा खोटेचे हावभाव व पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत उसळ्या मारणारं वाढतं बी.पी. डोळ्यांत उतरवंत रागाने सिंहासनावर मूठ अापटणारा पृथ्वीराज कपूर ! *जगातल्या तमाम कलांचं संगम असणारं हे साडेसहा मिनिटांचं गाणं माझ्या मते सर्वोत्कृष्ट दृक—श्राव्य { Best Audio-Visual }* गाणं असावं!
मंडळी , *मोहे पनघटपे नंदलाल* अाणि *प्यार किया तो डरना क्या* हि रसग्रहण केलेली दोनंच गाणी रंगीत शूट झाली अाणि नंतर चित्रपटाची ट्रायल बघताना अंदाजे ८५% कृष्णधवल व १५% रंगीत असा सिनेमा पडद्यावर पाहून असीफला अख्खा चित्रपट रंगीत असावा असं वाटू लागलं.परंतू १२ वर्षांनी तयार झालेला चित्रपट री—शूट करणं म्हणजे परत पैशांचा व वेळेचा अपव्यय , कारण जिथे १०—१५ लाखांत संपूर्ण हिंदी सिनेमा तयार व्हायचा तिथे असीफनं जवळ जवळ दोन कोटी रुपये खर्च केले होते ! चित्रपटाच्या प्रीमीअरला मात्र तो बघताना शापूरजीला असीफचं म्हणणं पटलं व त्यांनी असीफला सिनेमा पुढेमागे रंगीत करण्याचं अाश्वासन दिलं.
दिल्या शब्दांना शापूरजी जागले ,१९ जुलै २००४ ला स्टर्लिंग इन्ह्वेस्टमेंटस् च्या बॅनरखाली शापूरजींच्या वारसदारांनी १० कोटी रुपये खर्च करून रंगीत मुघल—ऐ—अाझम रिलीझ केला , पण अफसोस..... हे पहायला ना शापूरजी होते ना मधुबाला ना असीफ..... नाहि म्हणायला दिलीपकुमारने मात्र रंगीत प्रीमीअर { अाणि *मुघल—ऐ—अाझम* सिनेमा पण , *पहिल्यांदाच !* } पाहिला.....
अाता वळूया पुढच्या गाण्याकडे : *मुहोब्बतकी झूठी कहानीपे रोए*.....
हातापायात खरेखुरे साखळदंड लेवून बंदिवासातून अार्त दरबारी कानडातले सूर कानी येतात ... *खबर क्या थी होठोंको सीना पडेगा*
*मुहब्बत छुपाकरभी जीना पडेगा*
*जिये तो मगर जिंदगानीपे रोये , रोये*
चित्रपट सुरु होताना ऐन बहरातली दिलीप—मधुबालाची खरीखुरी प्रेम—प्रणय हकीकत या गाण्याच्या चित्रिकरणापूर्वीच इतिहासजमा झाली होती , अाणि हे कुणालाहि जाणवू न देता संपूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून दोघांनी हा चित्रपट पूर्ण केला.पण या गाण्यातल्या संगीताने , विशेषत: अंतर्यानंतर समेवर येण्याअाधीच्या ओळींमधल्या music pieces नी अक्षरश: *अंत:करण पिळवटून निघते* तेंव्हा या गीताचे बोल श्रेष्ठ की संगीत की मधुबाला की अार्तता ह्रदयाला भिडवणारी लता श्रेष्ठ की हे सगळं संपूर्ण वास्तववादानुरूप अापल्या डोळे व कानांपर्यंत पोचवणारा असीफ श्रेष्ठ ह्या संभ्रमात पडायला होतं अाणि सैरभैर मनाने पडद्यावर डोळे व कान असूनहि अलगद ही विराणी संपुष्टात येते.....
मुस्लीम कथानक असून *क* व्वाली नसेल तर अशा कथेला कोण *वाली* ?अगदी कालपर्यंत अापल्यावर फिदा असलेला सलीम अनारकलीकडे अाकृष्ट होताना बहार या कनीझला कसं सहन व्हावं ? ती अनारकलीला कव्वालीचं अाव्हान देते अाणि तिला तिचं भवितव्यंच जणू ऐकवून टाकते : *मुहोब्बत करनेवालोंका है इतनाहि अफसाना*
*तडपना चुपके चुपके अाह भरना घुटके मर जाना*
*किसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हमभी देखेंगे , अजी या हाँ हमभी देखेंगे*
अशा जबरदस्त जळकट अाणि जहरिल्या अॅटिट्यूडचा बेमालूम अभिनय करणारी असीफची दुसरी बायको निगार सुलताना अाणि गळ्याला पहाडी अावाज शमशाद बेगमचा ! अहाहा जियो शकील—नौशाद—निगार सुलताना और असीफ !
यावर कुरघोडी करणारं अाणि संपूर्ण सिनेमाचं ध्येयवाक्य अन् उद्दीष्टंच शकीलनं बहारच्या वरील इच्छेला उत्तर म्हणून शकीलनं अनारकलीच्या तोंडी लाजवाब ओळी दिल्यायत् ....
*मुहब्बत हमने माना जिंदगी बरबाद करती है*
*ये क्या कम है की मर जानेपे दुनिया याद करती है*
*किसीके इश्कमें दुनिया लुटाकर हमभी देखेंगे , अजी हाँ हमभी देखेंगे*
मधाळ पण नशील्या डोळ्यांची लोभस अनारकली अाणि तितकाच सुधारसात घोळवलेला लताचा अावाज.....
या सर्वांच्याही वरती असीफ काळजाला भिडतो कव्वाली संपल्यावर.....सलीम हातात गुलाबाचं फूल घेऊन उठतो , फूल बहारच्या हाती देतो अाणि काटेरी देठ अनारकलीला देतो ! मान लिया असीफमियाँ , या अर्ध्या मिनिटात अख्ख्या सिनेमातील अनारकलीचं भवितव्य काय हे दाखवून दिलंस..... पण मधुबाला जे उत्तर दिलीपला देते , त्यात संवादलेखकांनी पूर्ण बुद्धि पणाला लावली असल्याचं कळून येतं : *काटोंको ( कलीयोंकी तरह — हे अध्याह्रृत !) मुरझानेका ख़ौफ़ नहिं होता!*
अाता वळूया चित्रपटातील अतिअत्कृष्ट दर्जाच्या प्रणयदृष्याकडे.....
अनारकली महालातून उतरुन बागेत सलिमला भेटायला जाते तेव्हा महालातले दिवे उजळायला लागलेले असतात आणि बादशहाच्या दरबारातून तानसेनने छेडलेल्या रागिण्यांचा स्वर पार्श्वभूमीवर पाझरत असतो अाणि एकीकडे दिलिपकुमार आणि मधुबालाचा तो सुप्रसिद्ध रोमॅन्टिक चेहर्यावरुन पिस फिरवण्याचा आणि मधुबालाच्या अंगावर फुलांची पखरण झालेली आहे तो इतका लांबलचक सीन पडद्यावर एकही संवाद न घालता साकारण्ं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे महाराजा ! पण तेही शिवधनुष्य असीफनं लीलया पेललं अाहे ! अाणि यावर कळंस म्हणजे शेजारच्या महालात तानसेनचं गाणं पार्श्वभूमीला टाकलं अाहे ! अाणि जे गाणं टाकलंय त्याची संपूर्ण हकीकत ऐकल्यावर तर असीफ कलाकार म्हणून अक्षरश: ह्रदयाच्या उच्चस्थानी जाऊन बसला !
झालं असं की .....
तानसेनच्या अावाजाच्या तोडीची अालापी हवी म्हणून असीफने नौशादला सागितले ! झालं , असा अावाज असलेला *संगीतरत्न म्हणजे बडे गुलाम अली खाँ साहेब* असं नौशादनं असीफला सांगितलं! गुणवत्तेशी कुठलीहि तडजोड मान्य नसलेला असीफ बडे गुलाम अली खाँ साहेबांकडे पोचला.पण *चित्रपटासाठी मी गात नाहि!* असं सांगत खाँ साहेबांनी हा प्रस्ताव नाकारला.असीफनं चिकाटी न सोडता अाग्रह चालू ठेवला तेंव्हा असीफला टाळण्यासाठी अापल्या तीन तासांच्या महफिलीची मानधनाची रक्कम म्हणजे *पंचवीस हजार एका गाण्याचे घेईन!* असं सांगितलं ! अबब ! मंडळी , ज्या काळात लता—रफी सारख्या कलाकारांना एका गाण्याचे ४०० रूपये मानधन असे , त्या काळात एका गाण्याला पंचवीस हजार ? *असीफनं खिशातून दहा हजारांचं बंडल काढून खाँसाहेबापुढे ठेवत म्हटलं , " हि पेशगी अाहे , बाकी रक्कम उद्या रेकाॅर्डिंगच्या वेळी मिळेल!*
असीफच्या वेडाने अाणि दानतीने अवाक् झालेले खाँ साहेब दुसर्या दिवशी त्यांच्या तबलानवाझ निजामुद्दीन खाँ ना घेऊन स्टुडिओत पोचले व नौशादनं सोहनी रागात बांधलेली *प्रेम जोगन बन जा* हि ठुमरी गाऊन ध्वनीमुद्रित केली.पण ती ऐकल्यावर असीफ अापली नाराजी लपवू शकला नाहि व म्हणाला , " *नाराझ न होना खाँ साहाब , पण सलीम अाणि अनारकलीच्या प्रणयप्रसंगाला साजेशी मुलायम अालापीवाली नजाकतभरी ठुमरी हवी..... हि अशी झाली नाहिये!*"
मंडळी , कल्पना करा की हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या मेरुमणी असलेल्या खाँ साहेबांना एक सिनेमावाला सांगतो की ठुमरी कशी हवी ? भडकलेल्या खाँ साहेबांनी असीफला सांगितलं *मला प्रसंग पडद्यावर दाखवा , फिर हम तय करेंगे !*" झालं...... धावपळ करून असीफनं या प्रणय प्रसंगाचे रशेस अाणवले व पडद्यावर खाँ साहेबांसमोर प्रोजेक्ट केला.त्यातला मधुबालाचा अभिनय बघून खाँसाहेब हरखून गेले व म्हणाले , " *अमा निजामुद्दीन मियाँ क्या खूबसूरती है , जैसे अासमानसे कोई परी उतर अायी हो ! असीफमियाँ , सहि फर्माया आपने , इसकेलिए अालापी वाकई मलमलसी चाहिये ! नौशादभाई चलो फिरसे गातें हैं हम !* आणि खाँ साहेबांनी परत नव्याने तब्येतीत गायलेली हि ठुमरी पुन्हा ध्वनीमुद्रित करण्यात अाली !
मंडळी , तब्बल पाच मिनिटाच्या या प्रणयप्रसंगात मधुबलाच्या चेहेर्यावर दिलीपकुमार पीस फिरवतो अाणि खाँ साहेबांचा मखमली अावाज अापल्या ह्रदयावर *पीस* फिरवतो ! पंचेंद्रियं पडद्यावरच्या प्रणयप्रसंगाला उत्कटतेने दाद देत असताना अंतरात्म्याला खाँ साहेब *Peace* मिळवून देतात !
अाणखीन एक गाणं खाँसाहेबांकडून असीफनं गाऊन घेतलं *शुभदिन अायो राजदुलारा*
मंडळी , तुम्हाला मी म्हटले ना ते हे दोन विशेष गाण्यांवर सार्थक झालेले पन्नास हजार रुपये !
याखेरीज *जब रात है ऐसी मतवाली , फिर सुबहका अालम् क्या होगा?* या ध्रुवपदातंच श्रृंगार व्यक्त करणार्या गीताला लताने जास्त न्याय दिलाय की ध्रूवपद संपवताना प्रश्नार्थक विधानाऐवजी गोड गुपीत सांगणार्या समेवर संपवणार्या नौशादनं , हे मला खरंच कळलेलं नाहि ! अाणि हे चित्रपटातलं गाणं *ऐकणे* ble पेक्षा जास्त *बघणे* ble जास्त अाहे .....
*बेकसपे करम कीजीए सरकार—ऐ—मदीना* हि अार्त अाळवणी ऐकून पत्थराला पण पाझर फुटावा !
*खुदा निगेहबान हो* हि एका लाचार बेबस अनारकलीची दुवा सलीमसारख्या भावी मुघल बादशहाला पण नक्की सुखरूप ठेवेल असे शब्द पेरलेत शकीलनं !
अाणि चित्रपटातलं एकमेव रफीनं गायलेलं गाणं ..... कोरसला गायला उभ्या असलेल्या १०० गायकांना भेदून पार जाणारा रफीचा *झिंदाबाद , झिंदाबाद , ऐ मुहोब्बत झिंदाबाद* हा अावाज..... गाण्याच्या शेवटि रफी ज्या पट्टीत गायलाय ना , त्या पट्टीत बोलताना पण अापला अावाज फाटेल ! एकंच गाणं पण खणखणीत सादरीकरण!
मंडळी , या सिनेमातल्या *मोहे पनघटपे* आणि *प्यार काया तो डरन क्या?* या दोन गाण्यात मधुबालाचं जे नृत्यकौशल्य आपणाला दिसलं , त्यासाठी ह्रृदय कमकुवत असल्याने कथ्थकसारखं शास्त्रीय नृत्य शिकायला बंदी असूनहि मधुबाला या सिनेमाचे नृत्य दिग्दर्शक लच्छू महाराज यांच्याकडे २ वर्ष नृत्य शिकत होती महाराजा ! याला म्हणतात समर्पण !सलाम तुला मधू !
एका सीनमधे अनारकली जळती मेणबत्ती हाताने विझवते.यात जळत्या मेणबत्तीच्या ज्योतीमुळे झालेली वेदना चेहेर्यावर दिसू नये म्हणून मधुबालाच्या चेहेर्यावर २—३ छोट्या बालद्यांनी पाणी ओतण्यात आले व मगंच शूटिंग करण्यात आलं !
मंडळी हा या लेखाचा शेवटचा भाग ! या भागाच्या अखेरीस तुमच्याही मनात असीफविषयी नितांत आदर व कौतुक उत्पन्न होईल ! चला तर .....
*मोगल—ऐ—अाझम : एक तपानंतर अवतीर्ण*
*प्यार किया तो डरना क्या* गाण्याच्या रंगीत प्रिंट पाहिल्यावर शापूरजी खूश झाले ! असीफच्या डोक्यात तर अख्खा सिनेमाच रंगीत करावा व त्यासाठी री—शूट करण्याची टूम आली.पण या नुसत्या विचारांनीच शापूरजींना धडकी भरली की जवळजवळ १२ वर्षांनी पूर्ण होत आलेला सिनेमा आता री—शूट करून कधी पूर्ण होईल? शेवटी असीफला तो मोह आवरावा लागला.....
या कलाकृतीची संकल्पना अाखल्यापासून मे १९५९ च्या आसपास सिनेमा पूर्ण झाला व
तब्बल १२ वर्षानंतर...... ५ ऑगस्ट १९६०ला रिलीझ झाला. १५० थिएटर्समधे लागोपाठ रिलीज झालेल्या या चित्रपटाने वारेमाप नांव , प्रसिद्धी , पैसा कमावला.....
अाता सरतेशेवटी अशी माहिती सांगतो की जी वाचून माझ्या मनात असीफविषयीचा अादर व प्रेम द्विगुणीत झालं !
असीफनं स्वत:च्या ऐशोअारामासाठी वापरता येणं शक्य असूनहि फायनान्सर्स सिराज अली व शापूरजी पालनजी यांचा संपूर्ण पैसा चित्रपटाच्या निर्मितीसाठीच वापरला!
तो सदैव साध्या कापडाच्या शर्ट पायजम्यातंच वावरला!त्याच्याकडे स्वत:ची मोटार नव्हती—तर टॅक्सीनं ये—जा करायचा.नाहि म्हणायला व्यसन म्हणजे ओठात सदैव सिगारेट असायची...ती पण स्वस्तातली !
५ अाॅगस्ट १९६० ला मराठा मंदिरला *मुघल—ऐ—अाझम* चा प्रिमिअर होता.शीशमहलचा अख्खा सेट थिएटरबाहेर अाणवला होता.जत्रा होती जत्रा ! मुंबई , मद्रास , कलकत्ता , अमेरिका , इंग्लंड , चीन , पाकिस्तान.... सगळीकडचे अाघाडीचे दिग्दर्शक , नट नट्या ,निर्माते , नामवंत मंडळी अाली होती.चित्रपट पाहिल्यानंतर प्रमुख पाहुणे — तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण म्हणाले , " *हा ऐतिहासिक चित्रपट स्वत:च एक इतिहास निर्माण करेल व चित्रपट इतिहासात त्याचं नांव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल!*"
अाचार्य अत्र्यांनी म्हटलं , " *इतका भव्य दिव्य सुरेख सुंदर तसंच सुमधुर संगीताचा साज चढवलेला चित्रपट पुढील शंभर वर्षांत निर्माण होणार नाहि !*"
हाॅलीवुडच्या एका नामवंत निर्मात्यानं असीफच्या कर्तृत्वाची वाखाणणी करंत म्हटलं , " *या प्रतिभाशाली माणसानं इतिहासाचं परिवर्तनंच या अलौकिक कलाकृतीनं केलं अाहे!* "
चित्रपटाच्या प्रीमीअरला दुनिया लोटली होती , अाल्या नव्हत्या फक्त दोनंच व्यक्ती : नायक सलीम ऊर्फ युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार ( कारण त्याच्या बहिणीशी , म्हणजे अख़्तरशी निगार सुलताना जीवनातून निघून गेल्यावर असीफने लग्न केलं होतं ! ) अाणि *नया दौर* सिनेमाप्रकरणी कोर्टाची पायरी चढायला लागल्यानंतर अाणि दिलीपकुमार बरोबरचे अापले प्रेम वकिलांकरवी चव्हाट्यावर मांडलं गेल्यानं दुखावली गेलेली चित्रपटाची नायिका अनारकली ऊर्फ मुमताझ जहान देहलवी ऊर्फ मधुबाला !
१९६१ ला *मुगल—ए—आझम* ला फिल्मफेअरची ३ अॅवाॅर्डज् मिळाली :
*बेस्ट सिनेमॅटोग्राफर — आर.डी.माथूर*
*बेस्ट डायलाॅग्ज* आणि
*बेस्ट पिक्चर आॅफ द इयर*
यापैकी डायलाॅग्जसाठी एकंच ट्राॅफी होती व सिनेमाचे ४ लेखक होते : कमाल अमरोही , वसाहत मिर्झा , एहसान रिझवी व अमान उल्ला खान ! म्हणून या ट्राॅफीसाठी सिनेमासाठी सगळ्यात जास्त योगदान असणारा लेखक निवडायचा निर्णय असिफवर सोपवण्यात आला.परंतू असिफने याला विनम्रपणे नकार दिला — कारण एक सच्चा कलाकारंच दुसर्या सच्च्या कलाकाराचं मोल जाणतो ! असिफच्या मते चौघेही लेखक या बक्षिसाचे मानकरी होते! असिफने नकार दिल्यामुळे हे बक्षिस रद्द झालं !
बेस्ट सिनेमाचं अॅवाॅर्ड पण असिफनं नाकारलं ! याचं कारण : बेस्ट अॅक्ट्रेस म्हणून बीना राॅयला *घूँघट* साठी अॅवाॅर्ड मिळालं — जो अतिसामान्य सिनेमा होता! *मोगल—ए—आझम* च्या शीशमहलचे खांब व सेटस् असिफने आपला मित्र गुरुदत्त याला *चौदहवी का चाँद* साठी वापरायला दिले होते. बेस्ट कलादिग्दर्शनाचं अॅवाॅर्ड मिळालं
*चौदहवी का चाँद* सिनेमासाठी एम्.सादिक यांना
असंच बेस्ट अॅक्टर , लिरिक्स ,म्यूझिक सगळी अॅवाॅर्डझ् इतर सिनेमांना मिळाली — म्हणून असिफचं म्हणणं असं होतं की , *जर माझा सिनेमा बेस्ट आहे ज्या सगळ्यांच्या बेस्ट परफाॅर्मन्समुळे , त्यांना सगळ्यांना ( तेवढी योग्यता असूनही! ) अॅवाॅर्ड नसतील तर माझा सिनेमा बेस्ट म्हणून मला हे अॅवाॅर्ड घेण्याचा अधिकारंच नाही!* बा असिफ , तुला त्रिवार सलाम !
मंडळी , करीमउद्दीन असीफची पहिली बायको सितारादेवी , दुसरी बायको निगार सुलताना त्याला सोडून गेल्या.त्यानं तिसरं अन् शेवटचं लग्न केलं दिलीपकुमारच्या अख्तर नावाच्या बहिणीशी ! ( हेच कारण होतं ज्यामुळे दिलीपकुमारचे असिफशी संबंध दुरावले व तो *मुघल—ऐ—अाझम* च्या प्रीमीअरला पण गेला नाही! )
मंडळी १४ जून १९२२ ला जन्माला अालेला करीमुद्दीन असीफ ९ मार्च १९७१ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४९ व्या वर्षी गेला तेंव्हा त्याच्या बँकेत सेव्हिंग्जला सत्तावन्न रुपये { ₹ ५७/— } शिल्लक होते !
असीफ , अाज ५८ वर्षांनीही हा चित्रपट वा त्याची गाणी बघतानाहि पडद्यामागची तुझी एक तपाची मेहनंत जाणवते अाणि टचकंन डोळ्यांत पाणी येतं.....कसला कलाकार होतास रे तू? तुझं नांव करीमुद्दीन असीफ न ठेवता *कमाल (करणारा) असीम (कर्तृत्वाचा)* ठेवायला हवं होतं !
म्या कलाप्रेमीची तुला एक उत्कृष्ट कलाकार म्हणून कायमंच खडी ताजीम अाणि त्रिवार वंदना !
झिंदाबाद झिंदाबाद , *मोगल—ऐ—आझम* झिंदाबाद !
कळावे ,
आपला विनम्र ,
© *उदय गंगाधर सप्रे* म — ठाणे
सेल फोन : +९१९००४४१७२०५
No comments:
Post a Comment