[06/08, 7:26 am] Charudatta: आ चल के तुझे मैं लेके चलू ....!!!
एक असं जग,जिथे प्रेमाचं साम्राज्य असेल,दु:खाचा लवलेशही नसेल,जिथे मनात उमललेली आशा जीवन प्रवासास प्रेरणा देईल...अशा आशयाचं हे गाणं एका वेगळ्या क्षितिजावर नेणारं..."दूर गगन की छाव में" या क्लासिक चित्रपटातील... त्यातील स्वरांची गहराई आत्म्याला स्पर्शून जाणारी...एकाच अवलियाची ही जादुई करामत...!!!"सबकुछ किशोरकुमार",..गीतलेखन,संगीत,स्वर ,दिग्दर्शन,निर्मिती सारे सारे त्यांचेच...!!!आज त्यांची जयंती...!!!त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!!!!
लतादीदींनी किशोर कुमार यांच्या घेतलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटले होते की देवाने किशोरकुमार यांना पूर्ण संगीतकार बनवून इहलोकी पाठविले .."सैगल" हा त्यांचा आदर्श..!!लहानपणापासून एकलव्याप्रमाणे आराधना करत सैगल यांची गाणी ऐकून ते हुबेहुब गात असत...आई गौरीदेवी श्रीमंत परिवारातील आणि त्यांचे वडील कुंजीलाल हे नामवंत वकील...आपल्या मित्रांपुढे ते किशोरला गायला सांगत आणि किशोरही सैगल गीतासाठी एक रुपया आणि थोरले बंधू दादामुनी यांच्या गीतासाठी चवन्नी घेऊन त्यांची इच्छा पूर्ण करत.. "गायक" व्हायचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी या चित्रसृष्टीत प्रवेश केला...सोबत होती प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द...!!!!
गांगुली परिवारातील "किशोर" हे शेंडेफळ...मोठे बंधू अशोक कुमार,नंतर भगिनी सतीदेवी,अनुपकुमार आणि नंतर किशोर कुमार...अशोककुमार आणि त्यांच्यात १८वर्षांचे अंतर...!!!किशोर कुमार मुंबईत आल्यावर त्यांनी छोटी मोठी चित्रपटातील काम करावीत ही अशोक कुमार यांची इच्छा ...!पण किशोर ना मात्र गायक बनायचे होते...अभिनय त्यांना खोटा वाटे..गाणं हे हृदयातून आलेलं, सच्च्या सुरांनी बहरलेलं... त्याचा आनंद अनुपमेय...त्यामुळे अभिनय करताना ते उटपटांग हरकती करत...!!!कधी संवाद विसरत ,तर कधी सेटवरून निघून जात..दादामुनी अशोककुमार याना वाटे की रफी,तलत,हेमंत कुमार,नौशाद अशा गानदिग्गजांच्या मांदियाळीत सारस्वतीदेवींकडे गाण शिकलेल्या माझी सुद्धा डाळ शिजली नाही मग किशोरचे कसे होईल?त्याने आधी छोट्या भूमिका पडद्यावर साकारून रोजी रोटी मिळवावी,ते स्वतः बॉम्बे टॉकीज चे हुकमी नट होतेच.. अभिनयात त्यांची मदत किशोरदाना नक्कीच झाली असती...!!!पण किशोरदाना अभिनय रुचत नसे...!!दादामुनींनी आधी त्यांना बॉम्बे टॉकीजच्या "जन्मभूमी" चित्रपटातील "गयी रात आई प्रभात"या गीतातील कोरस मध्ये गाण्यांची संधी दिली आणि नंतर त्यांना संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश यांच्याकडे पाठविले..त्यांचा आवाज पारखण्यासाठी..!!
लतादीदींनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे किशोर आणि त्या खेमचंद प्रकाश यांच्याकडे एकदमच गेल्या पण परस्परांशी ओळख नसल्याने कोणी अनोळखी तरुण आपला पाठलाग करत असल्यासारखं त्यांना वाटलं...खेमचंदजींनी त्यांची किशोरदांशी ओळख करून दिली.त्यांना किशोरचा आवाज खूप आवडला..."थोडी सी बारीकिया सीखने की देर है बस"...!!!"हा एक नामवंत गायक होऊ शकेल" असेच भविष्य त्यांनी वर्तविले..त्यांनीच "जिद्दी" या देवानंद अभिनित चित्रपटात त्यांना "मरने की दुवाए क्यू मांगू" हे सोलो आणि लताबरोबरचे "ये कौन आया ,ये कौन आया रे करके ये सोलह सिंगार" हे युगलगीत गाण्याची संधी दिली.अगदी सैगल च्या ढंगात किशोर यांनी ही गाणी म्हटली आहेत.देवानंद चा आवाज बनण्याची संधी किशोरदाना पहिल्याच चित्रपटात मिळाली आणि पुढे ते या सुपरस्टार चा प्रमुख आवाज बनले.
सचिनदेव बर्मन यांनी किशोरदांचा आवाज दादामुनींच्या घरी गेले असता बाथरूम मध्ये गाताना ऐकला.त्या आवाजात त्यांना "स्पार्क" दिसला...त्यांनीच किशोरदाना सैगल ढंगातून बाहेर काढले..."बेटा आप अपनी खुद की स्टाईल में गाईए"... असे म्हणत त्यांचा उत्साह दुणावला."प्यार" चित्रपटासाठी "कच्ची पक्की सडको पे मेरी टमटम चली जाये","मोहोब्बत का छोटासा एक आशियाना किसीने बनाया" आणि गीता दत्त यांच्याबरोबर चे "एक हम और दुसरे तुम","ओ बेवफा ये तो बता लुटा चमन क्यू प्यार का" अशी गाणी त्यांनी किशोरदांकडून गाऊन घेतली.किशोरदांच्या खट्याळ स्वराची ओळख रसिकांना यातून झाली.संगीतकार अनिल बिस्वास यांनीही फ़रेब चित्रपटात किशोरदांकडून "हुस्न भी है उदास उदास","मेरे सुख दुख का संसार तेरे दो नैनन में" ही सोलो गीते आणि "आ मोहोब्बत की बस्ती बसाएंगे हम" हे युगलगीत गाऊन घेतले आहे...किशोरदांनीही ही गीते सुंदर गायली आहेत.
१९४९ मधे आलेल्या "कनिज" चित्रपटात किशोरदा पडद्यावर प्रथम आपल्या यॉडलिंग स्टाईलने गायले.ते तुरुंगातील कैद्यांचे गीत होते,"हर ऐश है दुनिया में अमिरों को आराम नहीं"त्याचं असं झालं...अनुपकुमार यांनी टेक्स मॉर्टन,जिमी रॉजर्स यांच्या काही यॉडलिंग रेकॉर्ड्स आणल्या होत्या.त्या किशोरदांना खूप आवडल्या.एक दिवस अचानक बाथरूम मधून किशोरदांच्या "यॉडलिंग" चा आवाज आला...अनुपकुमार यांनी त्यांना "यॉडलिंग" हा आपल्या स्टाईल मधील "सेंटर पॉईंट" बनविण्यास सांगितले,आणि किशोरदांची अनेक गीते यॉडलिंग ने सजली.योडलिंग करणे हे सोपे नव्हे...एकापाठोपाठ वेगवेगळ्या पट्ट्यातील सूर लावणे म्हणजे गायकाची परीक्षाच...!!!!
किशोरदांनी प्रथम फक्त देवानंद साठीपार्श्वगायन केले."ए मेरी टोपी पलट के आ","देनेवाला जब भी देता"(दोन्ही फंटुश),"माना जनाब ने पुकारा नहीं"(पेइंग गेस्ट),"दे भी चुके हम दिल नजराना दिल का"(गीता/किशोर..."जाल")अशी अनेक गाणी देवसाठी गाऊन त्याने त्याची चॉकलेट हिरो ची इमेज जपली.किशोरदांच्या स्वरातील अगदी हलके फुलके गीत "ख्वाब हो तुम या कोई हकीकत" (तीन देवीया),नीरज यांच्या सुंदर शब्दांनी साकारलेले किशोरदांच्या तरल स्वरातील "फुलों के रंग से ,दिल की कलम से"(प्रेम पुजारी),त्यांच्या खोडकरपणाची साक्ष देणारे "अरे यार मेरी,तुम हो गजब",मनावर मोरपीस फिरविणारे प्रणयरम्य असे "ऐसे तो ना देखो",स्वच्छंदीपणाने म्हटलेले "ये दिल ना होता बेचारा" अशी अनेक गीते त्यांनी देव साठी गायली.
बुलेटवर स्वार झालेला तरुण राजेश खन्ना आणि स्वप्नसुंदरी हेमामालिनी म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत..."जिंदगी एक सफर है सुहाना" ..."ओडलई ओडलई ओ ऊ" असे योडलिंग करत जाणारी ही जोडी तेव्हा अत्यंत लोकप्रिय ठरली..."मेरे जीवन साथी" मधील कार मधून मिलनातुर असलेला राजेश खन्ना जेव्हा गुलाबी स्वप्न रंगवत गाणे गातो त्या गीतातील,किशोरकुमार यांच्या स्वरातील धुंदी काही औरच..."चला जाता हूँ किसीके धुन में" हेच ते गीत ,त्याचा अंतरा पहा.."
ये मस्ती के एss नजारे है एss तो ऐसे में ssए सम्हलना कैसा सनम...
प्रत्येक शब्दानंतरचे मनातील आनंदाचे तरंग जणू योडलिंग मधून उमटले आहेत...!!१९५७ मध्ये आलेल्या "बेगुनाह" चित्रपटातही "आज ना जाने पागल मनवा काहे को घबराये,हिच हिच हिचकी हाय तबियत बिचकी बिचकी जाये"..."डी डा ता डी डा ता डीडाता"...मुखड्याचे शब्द जणू अवरोही ढंगाने खाली घरंगळत येतात नंतर किशोरदांचे दमसास घडविणारे भन्नाट योडलिंग...फक्त किशोरदाच करू जाणे...!!!!
झुमरू, हाफ टिकट, चलती का नाम गाडी,आशा,रंगोली, पडोसन,दिल्ली का ठग,दूर गगन की छाव में हे काहीसे किशोरदांचे अभिनय,संगीत,गीते यासाठी नावाजले गेलेले चित्रपट.त्यांची "विनोदी गायक नट "अशी प्रतिमा जनमानसात चांगलीच रुजली होती...पण त्याबरोबरच त्यांनी दूर गगन की छाव में,दूर का राही",मुसाफिर,नौकरी याही चित्रपटात काम केले होते.त्यांच्या मर्दानी स्वरातील ,दमसास करणारी,स्वरात चढ उतार करणारी गीते ऐकणे,पाहणे हा निखळ आनंद होता..एकाच वेळी अभिनय,नृत्य करत ,सूर सावरत,तालाशी खेळत जेव्हा ते गीते म्हणत तेव्हा त्यांच्यातील अष्टपैलू कलावंताला मनापासून सलाम करावासा वाटे...कसे शक्य होत असेल सारे...??त्यांचा विनोदही अश्लील नसे...विचित्र वेषभूषा,हावभाव,उटपटांग हालचाली ,मिमिक्री,आवाजातील चढ उतार यातून तो निर्माण होई..काही वेळा तर ते हसता हसता कधी रडवत ते कळतही नसे...!!
"चलती का नाम गाडी" हा अशोक ,किशोर,अनुप या तीन भावांचा चित्रपट...नायिका मधुबाला चे सौंदर्य,नृत्य आणि बर्मन दादांचे संगीत या जमेच्या गोष्टी...!!!!तसेच "पडोसन" हा मेहमूद,सुनील दत्त आणि किशोर कुमार यांचा धमाल चित्रपट...मेरे सामनेवाले खिडकी में,एक चतुर नार,मेरी प्यारी बिंदू अशी सगळीच गाणी खूप गाजली..."एक चतुर नार" मध्ये तर किशोरदा आणि मेहमूद यांनी धुमाकूळ घातला आहे...किशोरदांनी आपल्या मनीच्या हरकतीही घेतल्या आहेत.
त्यांची काही गीते निव्वळ विनोदी गीते होती ,जसे "चिल चिल चिल्लाके कजरी सुनाए" ,"आके सिधी लगी दिल पे जैसे कटरिया"(दोन्ही हाफ टिकट,आके सिधी लगी हे डुएट लताजी आणि किशोरदा गाणार होते,पण लताजी उपलब्ध नसल्याने किशोरने एकट्याने दोन्ही आवाजात अतिशय सुंदर गायले आहे),"हम थे वो थी और समा रंगीत समझ गये ना"(चलती का नाम गाडी),"यार तुम शादी मत करना"(परिवार),तर काही काळजाला भिडणारी..जसे "दुखी मन मेरे सून मेरा कहना"(फंटुश) हे बर्मनदादानी दिलेले असेच एक गीत...या हळुवार गीताने त्यांचे गीतातील भाव व्यक्त करण्याची क्षमता आणि नैपुण्य सिद्ध केले.त्यांच्या बदललेल्या आवाजाचा पोत निदर्शनास आला आणि त्यांची "मनमौजी" प्रतिमा बदलली.."बेकारार दिल तू गाये जा" हेही गाणं डोळे ओलावून टाकणारे...आणखी एक गीत होते "कोई हमदम ना रहा कोई सहारा ना रहा"..(झुमरू),हे गाणं आधी "जीवन नैय्या" चित्रपटात अशोक कुमार यांनी गायले होते(राग झिंझोटी, आडा चौताल ,संगित..सरस्वतीदेवी...!!)किशोरदाना ते गाणं खूप आवडे म्हणून किशोरदानी ते "झुमरू" चित्रपटात पुन्हा म्हटले आणि त्यातील दर्द आपल्या स्वरातून व्यक्त करून रसिकांना रडविले...दादामुनींना त्यांनी तसे सांगितलेच होते की हे गाणं मी नक्की तुमच्यापेक्षा चांगलं गाईन... असे होते किशोरदा...मनस्वी...!!!!
१९७०च्या आधी आणि नंतरही आलेल्या युगलगीतात आशा,लता यांचा स्वर प्रमुख होताच...गीता,शमशाद,मुबारक,सुमन यांच्याबरोबरही त्यांनी गाणी म्हटली.पण किशोर कुमार आशाजी म्हटल्यावर "हाल कैसा है जनाब का","पाच रुपैय्या बारा आना"(चलती का नाम गाडी)"पिया पिया पिया मेरा जिया पुकारे" (बाप रे बाप)" ये राते ये मौसम नदी का किनारा"(दिल्ली का ठग),"खूबसूरत हसीना"(मिस्टर एक्स इन बॉम्बे),"छोड दो आंचल","ओ निगाहे मस्ताना"(पेइंग गेस्ट)ही गाणी मनात फेर धरू लागतात."चांद रात तुम हो साथ" (हाफ टिकट),"लिखा है 'तेरी आंखो ने किसका अफसाना","गाता रहे मेरा दिल" यासारखी लताजींबरोबरची गाणीही लोकप्रिय आहेत.सगळ्याच सहगायकांसोबत हसत खेळत ते गात असत.दो पंछी दो तिनके()हे गीत त्यांच्याबरोबर गाताना आरती मुखर्जी वयाने लहान असल्याने घाबरत होत्या,त्यांची भीती किशोरदांनी घालविली..त्यांना हिम्मत दिली आणि गाणं छान रेकॉर्ड झालं.
देव आनंदप्रमाणेच किशोरदा राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा ही प्रमुख आवाज बनले होते.१९६९मध्ये शक्ती सामंता यांचा आलेला "आराधना" हा चित्रपट त्यांना वरदान ठरला....आराधनाचा सगळा अल्बम सुपरहिट झाला...या चित्रपटाने इतिहास रचला,राजेश सुपरस्टार तर किशोरदा नंबर वन गायक बनले.किशोरदांनी यातील गाणी म्हणण्यापूर्वी राजेश खन्ना ला घरी बोलावले होते...हा नवखा तरुण बोलतो कसा?,त्याच्या लकबी काय आहेत? हे सर्व त्यांना जाणून घ्यायचे होते..त्यांच्या मनाचे समाधान होईपर्यंत ही प्रश्नोत्तरांची फैर झडत राहिली पण नंतर मात्र किशोरदानी राजेश चे स्वागत केले,खातीरदारी केली..राजेश-किशोर हे कॉम्बिनेशन म्हणजे अनमोल गीताची सुखद लहर आहे...!!!
मनातील रेशमी भावनांचे वादळ नेमकं स्वरात उमटविणारे "रूप तेरा मस्ताना" हे गाणं,याची टोनल क्वालिटी पहा..किती सॉफ्ट,रोमँटिक होऊन म्हटले आहे."कोरा कागज था" मधील पहिला "हे हे हा हा आहा" हा आकारच मन जिंकून घेतो,गीतातील रोमान्स गहिरा करण्यास मदत करतो.."मेरे सपनो की रानी" हे गीत त्यांनी ज्या खळाळत्या उत्साहात,मस्तीत,स्वप्न रंजन करत म्हटले आहे तो काबिले तारीफ...!!प्रत्येक तरुणीच्या मनात अलगदपणे शिरलेले हे गीत.."ये जो मोहोब्बत है मधील "व्हॉल्ट्स" चा ठेका,चेलो व्हॉयलीनची ची हार्मनी सारेच विलक्षण सुंदर आणि "चिंगारी कोई भडके" म्हणजे त्यांच्या स्वरात प्रकटलेला दु:खाचा सैलाब...आयुष्यात सोसलेल्या विरह दु:खाचे प्रतिबिंब जणू...!!!कुछ तो लोग कहेंगे या खमाज मधील गीतातील बेफिकिरी ऐकून पहा...
"दो रास्ते" मधील "खिजा के फूल में आती कभी बहार नहीं", "जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम" ,"जीवन से भरी 'तेरी आंखे मजबूर करे जीने के लिये","जिंदगी का सफर है ये कैसा सफर","दिल ऐसा किसी ने मेरा तोडा" या सगळ्या दर्दभऱ्या गीतातील दर्द मनाला भिडणारे,हृदय दुभंगून टाकणारं... इतकं खोल खोल मनात रुजावं की ते आपलं वाटावं...!!!विश्वास बसत नाही की "टीमबकटु" ,"चिल चिल चिल्लाके "गाणारा मनमौजी हाच का ...??
किशोर कुमार जे गाणं म्हणत ,त्याची वातावरण निर्मिती करत...उदा "खाईके पान बनारस वाला" हे त्यांनी कलकत्ता पान खात म्हटले आहे ,तर "सूरज की तरह तू जलती जा"(सुहाग रात) हे गाणं म्हणण्याआधी त्यातील दर्द गळ्यातून नेमके उमटावे म्हणून त्यांनी आधी चक्क पकोडे,रबडी खाल्ली होती आणि मनावरील ताण हलका केला होता."ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप" या गाण्याच्या १०/१२तालमी होऊनही हवा तसा भाव किशोरदांच्या गळ्यातून येत नव्हता. लक्ष्मी प्यारे भाईंना अगदी सॉफ्ट स्वर हवा होता...गालावर हात ठेवून किशोरदा गात म्हणाले असाच हवा हा स्वर..?"होय" म्हटल्यावर ते गीत त्यांनी तसेच गालावर हात ठेवून गायले.असे होते किशोरदा...गाण्यात पूर्ण समर्पित होणारे,भावनाशील,थोडे विक्षिप्त आणि लहरी ,पण गाण्याच्या बाबतीत अगदी परफेक्ट...!!!!
अमिताभ साठीही त्यांनी अनेक सुंदर गीते म्हटली.महमूद च्या "बॉम्बे टु गोवा" मधील "देखा ना हाय रे सोचा ना" किशोरदांनी अगदी जोशात,मस्तीत पेश केले आहे..तसेच "कसमे वादे निभायेंगे हम "यातील स्वरांवरील ठेहराव खूप सुंदर...!!!"देखा एक ख्वाब तो ये सिलसिलें हुए" हे मखमली प्रेमाचे युगलगीत त्यांनी तितक्याच ताकदीने म्हटले आहे.जितका उत्कट अमिताभ रेखाचा अभिनय आणि रोमान्स तितकीच उत्कट किशोरदा आणि लतादीदींची स्वरसाथ...!!!!"अभिमान" मधील "तेरे मेरे मीलन की ये रैना" हे रवींद्र संगीतावर आधारित युगलगीत अतिशय भावपूर्ण रित्या त्यांनी म्हटले आहे."छुकर मेरे मन को" हे गीत ,ती धुन सारे स्वप्नवत वाटते...वेगळ्या जगाची सैर घडविते.ज्या नजाकतीने त्यांनी ते पेश केले आहे त्याला तोड नाही..
खामोशी मधील "वो शाम कुछ अजीब थी" हे गाणं पाहताना त्यातील हळवे भाव ,शब्द न शब्द मनाला भिडतो..तसेच "घर" मधील "आप की आंखो में कुछ" मधील धुंद प्रणयभाव त्यांच्या स्वरातून चपखल उमटला आहे तर त्यातीलच "फिर वोही रात है" मधील शब्दांची फेक सुंदर...जोडीदाराच्या भावना समजून घेणारा प्रियकर त्यांनी शब्दांतून साकारलाय,किशोरदा अभिनय करत पण गाताना ते शब्दांतून सुद्धा अभिनय करत...!!!
काही युगलगीते त्यांनी संवाद साधत म्हटलेली आहेत..."अच्छा तो हम चलते है",""भिगी भिगी रातो में(अजनबी),"सुनो कहो,कहा सुना" (आप की कसम)",सुन जा आ ठंडी हवा(हाथी मेरे साथी),"ओ साथी चल"(सीता और गीता) हे त्याचे काही दाखले...!!!ऋषी कपूर साठीही त्यांनी त्यांच्या चुलबुल्या,मस्तीभऱ्या अंदाजात खालीवर होत असलेला स्वर मेळ साधत गायलेली युगलगीते म्हणजे "एक मैं और एक तू" ,"खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो"...आणि "ओ हंसिनी ,कहा उड चली" हे गीत त्यांनी आपल्या दमदार स्वरफेकीने आणि धीर गंभीर स्वराने अमर केले आहे.
डबल व्हर्जन च्या गीतात किशोरदांची नेहमीच सरशी झाली आहे."मेरे नैना सावन भादो"..(राग शिवरंजनी वर आधारित हे गीत लतादिदींच्या स्वरातही आहे हे कळल्यावर किशोरदा म्हणाले "तो पहले उनसे गवाइये मैं बाद में गाऊंगा.".),हमे तुमसे प्यार कितना(कुदरत), रिमझिम गिरे सावन(मंझील),ओ साथी रे(मुकद्दर का सिकंदर )"तुम बिन जाऊ कहा"(प्यार का मौसम...रफी किशोर ),खिलते है गुल यहा (शर्मिली)अगर तुम ना होते(टायटल सॉंग) अशी अनेक गीते दोन वेगळ्या स्वरात आहेत.
देव आनंद,राजेश खन्ना,अमिताभ,ऋषी कपूर अशा अनेकांचा आवाज म्हणून दिमाखाने गाजत असलेला त्यांचा गळा लहानपणी मात्र खराब होता,ते नीट बोलू शकत नव्हते.एका अपघाताने त्यांचे पायाचे मधले बोट कापले गेले,तेव्हा आतासारखी वेदना त्वरित शमविणारी औषधं नव्हती.किशोरदा महिनाभर रडत राहिले...आणि नवल वर्तले...रडून मोकळा झाल्याने त्यांचा आवाज सुधारला..त्यांच्या महिनाभराच्या सहन केलेल्या वेदनांनी जगाला चिरंतन आनंद दिला.
किशोरदांचा सूर पक्का होता,खुला होता.त्यात सहजता होती..कोणताही भाव त्यातून पटकन उमटत असे..स्वत: संगीतकार असल्याने गाण्यात काही उत्स्फूर्त हरकती त्यांना सुचत... विधिवत शास्त्रीय संगीत मात्र ते शिकले नव्हते."खुश है जमाना आज पहली तारीख है" हे सुधीर फडके यांच्या संगीतातील त्यांचे सिलोन रेडिओ वर ५०वर्षे सातत्याने वाजणारे गीत...!!!किशोरदांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला ,तरी त्यांच्या मनात खोल खोल दडलेले दु:ख होते...ते एकटेपणाचेच असावे,ते त्यांच्या गीतात प्रतिबिंबित होई.
पण मुंबईत त्यांना भेटलेले लोक स्वार्थी,मतलबी होते,कितीतरी वेळा निर्माते त्यांचे गाण्याचे पैसे बुडवत, कारण गाणं आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टी ते करत..मग किशोरदा आपल्या सेक्रेटरीला गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या आधी चाय पी क्या?असे विचारत म्हणजेच पैसे मिळाले का?त्याचे होकारार्थी उत्तर असेल तर रेकॉर्डिंग होई नाहीतर पुढे ढकलले जाई... यामुळे किशोरदांची गणना कंजूष म्हणून होऊ लागली.पण किशोरदा कंजूष नव्हते.
"पथेर पांचाली" चित्रपटाच्या वेळी सत्यजित रे आर्थिक अडचणीत आले असता त्यांनी ५०००ची मदत केली होती.१९६४ मध्ये आलेल्या "दाल में काला" च्या शूटिंग प्रसंगी निर्माते "विपीन गुप्ता" आर्थिक अडचणीत आले ,त्यांनी शूटिंग थांबविले,किशोरदाना हे समजताच त्यांनी त्यांना २००००देऊन होणारे नुकसान थांबविले.
किशोरदांचा जन्म मध्यप्रदेशातील खंडवा येथील...त्यांचं खर नाव "आभासकुमार"...पण चित्रसृष्टीत त्यांनी "किशोर" हे नाव घेतले...त्यांना त्यांच्या जन्मगावाची खूप ओढ होती...सवड मिळताच ते तिथे जात...तिथली माणसं त्यांना आपली वाटत...आपल्या अनेक विनोदी भूमिकांतून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले..."पान"हा त्यांचा विक पॉईंट...!!!त्यावर त्यांची एक कविताही आहे.आपल्या खुल्या,सच्च्या स्वरांनी त्यांना मंत्रमुग्ध केले.."दूर गगन की छाव में","दूर का राही" यासारख्या अनेक क्लासिक चित्रपटांची निर्मिती केली...त्यांच्या गीतातून नेहमीच जीवन जगण्याचं बळ मिळालेलं आहे...त्यांची जिद्द,त्यांचे कष्ट ,त्याचे गाण्यावरील प्रेम सारे सारे विलक्षण होते..आज त्यांचा मुलगा अमीतकुमार त्यांचा गाण्याचा वारसा चालवत आहे...!!!
किशोरदांचं गाणं म्हणजे साक्षात चैतन्य,खळाळता उत्साह,भावनांचा अथांग सागर...!!बेगडी जगाच्या रुक्ष अनुभवांनी त्रस्त झाल्यावर त्यांचं गाणं ऐकावं...मन पुन्हा प्रसन्न होतं, पुढच्या जीवन प्रवासासाठी आणि गुणगुणत त्यांच्याच "दूर का राही" चित्रपटातील गीताच्या ओळी....!!!!आजही त्या चिंकाऱ्याचा नाद कानात घुमतोय...सांगतोय..'उत्तिष्ठ, जागृत, प्राप्य वरान्निबोधत।' 'उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय गाठा हे स्वामी विवेकानंदांचे वचन....!!!!
जिन्ना जिन जिन जिन्नारा
साथ तेरे है ऊपर वाला वही है तेरा रखवाला
जीवन से ना हार ओ जीने वाले बात मेरी तू मान अरे मतवाले
हर ग़म को तू अपना कर दिल का दर्द छुपाकर
बढ़ता चल तू लहरा कर दुनिया के सुख-दुख को बिसरा कर
जीवन से ना हार …!!!!
मानसी पटवर्धन
[06/08, 7:26 am] Charudatta: आज ४आॅगस्ट .. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या जादूमयी आवाजाने अधिराज्य गाजविणारे गायक किशाेरकुमार यांचा आज जन्मदिन 🙏🙏
सैैगलजींचे किशोरदा भक्त होते.सैगलजींच्या गायकीचा सुरूवातीस किशोरदांच्या गाण्यावरही प्रभाव पडलेला जाणवतो🙏🙏
१९४८ मधील 'जिद्दी' या चित्रपटातील 'मरने की दुआये क्यू मांगू ' या गीतापासून ते 'गुरू गुरू आ जाओ गुरू' या 'वक्त की दिवार ' या चित्रपटापर्यंतचा त्यांचा हा सांगितीक प्रवास खरोखर दैवी, विलक्षण चमत्कृतींचा ,असामान्य वाटताे. स्वतः ते कुशल अभिनेते असल्याने ते गाणार असलेल्या चित्रपटांत काम करणारा हिरो ते कसे अभिनीत करेल त्याबरहुकुम गात असत🙏🙏
औपचारिकपणे गाणे न शिकलेला हा महागायक स्वयंनिर्मित असे एक 'किशेारकुमार' नावाचे खास घराणेच निर्माण करून गेला...आपल्या उत्तम गायकीने रसिकांना,नवोदित गायकांसाठी खुले विद्यापीठ बनला🙏🙏
महमंद रफी हे किशोरदांचे आवडते गायक होते..रफीसाहेबांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच त्यांच्या घरी सर्वप्रथम पोचलेले फिल्मी दुनियेतील किशोरदाच होते आणि अगदी रफीसाहेबांचा जनाजा उठेपर्यंत रडत बसले होते.😔त्े दोघे खरे तर एकाच क्षेत्रात असूनही ते मैत्रीच्या अतूट धाग्याने बांधले गेले होते🙏🙏
'वल्ली ' हे नाव या माणसालाच शाेभते ..अहाे हा माणूस काेणनव्हता?गीतकार,संगीतकार,अभिनेता,पटकथाकार,निर्माता,दिग्दर्शक,गायक असा अष्टपैलू कलाकार हाेता.' नाच मेरी जान फटाफटफाट'ह्या गाण्याचे रेकाॅर्डींग करताना किशोरदा आपल्याला 'मै सुंदर हूँ' या सिनेमात बघायला मिळू शकतात, त्यात त्यांचा उत्साह,जोषपूर्णआवाज ऐकून चकीत व्हायला हेाते👌👌🎵
एकीकडे 'चलती का नाम गाडी' ,पडाेसन,प्यार किये जा'सारख्या विनादी भूमिका करूनही 'दूर गगन की छाव में' मध्ये गंभीर भूमिका उत्तम केली.काही उत्तम सिनेमाचे निर्माते बनून यशस्वी ंझालेला हा कलाकार रेकाॅर्डींगच्या वेळेला फार धमाल करीत असे😃😃
आसू आणि हासू यांचे अजब रसायन म्हणजे किशाेरदा ...वैयक्तीक जीवनात अनेकं चढउतारांना ताेंड देऊनही हास्याचा मुखवटा परिधान केलेले किशोरदा एक महान विदूषक असावेत असे कायम वाटते.. आम्हा रसिकांसमाेर ताे हल्लागुल्ला करणारा अवलीया हाेता. मराठी चित्रपटातही त्यांनी 'अश्विनी येना'हे गाणे म्हणून रसिकांची वाहवा मिळविली
🙏सुधीर फडके यांनी संगीतबध्द केलेल्या आणि किशोरदांनी गायलेल्या 'नौकरी'या चित्रपटातील 'दिन है सुहाना आज पहली तारीक है'आजही रेडिओवर महिन्याच्या १ तारखेला आठवणीने लावले जात े👍👍
१९८४ सालची गोष्ट आहे की तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींच्या हत्येनंतर त्यंाना श्रध्दांजलीपर गाणे दूरदर्शनवर किशाेरदांनी अत्यंत भावपूर्णतेने गायले हेाते हे आपणांस ठाऊक असेल, गाण्याचे बेाल हेाते' अाँधियारी रातोमें मँा कोईदीप जला,
भूले भटके राही हम
हमको राह दिखा'🙏🙏
एस.डी.बर्मन यांचे ते अतिशय आवडते गायक होते..किशोरदांच्यातील वल्लीपण जपून किशोरदांच्या उमेदवारीच्या काळात सचिनदांनी संधी दिली होती..त्यांच्या गाण्याच्या रेकॅार्डींगच्या वेळेस आदल्या मध्यरात्री किशोरदांचा केवळ आवाज कसा आहे हे ऐकायला सचिनदा फोन करीत असत🙏🙏कमीतकमी वाद्यवृंदात सचिनदांनी बनवलेले गाणे म्हणजे 'माना जनाबने रुकारा नही..'यात काय अफलातून किशोरदा गायले आहेत तसेच सचिनदांनी एका गाण्याचे रेकाॅ्रडींग प्लॅन केले होते आणि ते आजारी पडले तेंव्हा किशोरदा हाॅस्पिटलमध्ये त्यांना जाऊन भेटले ठरलेले रेकाॅ्र्डींग नीट पार पाडेन असे आश्वासन दिले..सचिनदांच्या उपस्थितीशिवाय किशोरदांनी ते अजरामर दर्दभरे गाणे गायले ते म्हणजे 'बडी सुनी सुनी है जिंदगी ये जिंदगी' हे हो़य.
दादा बर्मन याच्या 'फुलोंके रंग से दिलकी कलमसे..'या गाण्यात अतिशय मधाळ आवाजात किशोरदा गायले आहेत👍गाणे गाताना ते अक्षरशः गाणे जगले असे नक्की म्हणता येईल🙏'कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना'या अमर प्रेम या चित्रपटातील गाण्यात किशोरदांनी'बीतना जाये रैना'हे गाताना काळजाचा ठाव
घेणारी हरकत घेतली आहे👌
आर.डी.बर्मन,बप्पीदा तसेच लक्ष्मीकांत प्यारेलाल,कल्याणजी आनंदजी ,रवीद्र जैन अशा अनेक मान्यवर संगीतकारांच्या गाण्यांना चार चाँद लावण्याचे श्रेय किशोरदांना जाते🙏🙏विशेषतः आर.डी.बर्मनांकडील गाणी तर अतिशय लाजवाब आहेत असे मला कायम वाटते🙏
वास्तविक हिंदी चित्रजगतात नायक बनायला आलेले किशाेरदा गायक म्हणून नावारूपास आले...
'दूर का राही'मधील 'बेकरार दिल अरे तू गाये जा' या गाण्यात आपले माेठे बंधू अशाेककुमार यांच्यासाठी पार्श्वगायन केले आहे आणि शेजारी नायकाच्या भूमिकेत स्वतः किशाेरदा बसले आहेत,मला वाटते हिंदी सिनेमांमध्ील हे दुर्मिळ दृष्य आहे ....
आवाजात कमालीची रेंज,दैवजात लाभलेला खर्ज ,उत्तम ग्रहणशक्ती,निखालस विनाेदबुध्दी असा हा कलाकार पुन्हा न हाेणे 🙏🎵🙏.
किशोरदांसारख्या गायक कलाकारांचा सुरेल प्रवास हा एका जन्माचा नसताे तर अनेक जन्माजन्मांतराचा असताे. 🙏🙏🙏
'कोई होता जिसको अपना
हम अपना केहे लेते यारो
पास नही तो दूर भी हेाता
लेकिन कोई मेरा अपना'
ही सल कायम ह्रदयात ते बाळगून होते..
'पडोसन'या विनोदी चित्रपटाचे दिवसभर शूटींग करून रात्री घरी आपल्या अत्यंत आजारी अशा सहचरिणीची म्हणजे मधुबालाची शुश्रुषा करीत असत.तो मधुबालाचा अगदी कठीण असा शेवटचा काळ होता..हे 'स्वीच आॅन आणि स्विच आॅफ'चे तंत्र किशोरदाच करू जाणे..
अतिशय चिरतरूण असा आवाज लाभलेला हा एक शापित गंधर्व होता..एस.डींकडचे गाणे असो वा इतर कोणाही दिग्गजांकडचे गाणे असो त्यांच्या गायकीतील परिपूर्णतेत किशोरदा सातत्य बाळगून असायचे 🙏🙏
किशोरदांचा मुलगा प्रसिध्द गायक अमितकुमार आपल्या वडीलांविषयी बोलताना कायम भावनाविवश होतात. किशोरदा आणि त्यांचे नाते मुलगा-वडील याचबरोबर गुरू- शिष्याचेही होते..किशोरदा या झगमगत्या चंदेरी दुनियेत राहूनही 'पार्टी संस्कृती'शी लांबच असत पण आपला लेक २५वर्षाचा झाला याप्रित्यर्थ खूप शानदार पार्टी दिली होती आणि राज कपूरसाहेबांसारखी दिग्गज मंडळी कौतुकाने हजर होती.त्या पार्टीत किशोरदा स्वतः 'शोला जो भडके' हे गाणे गात होते आणि भगवानदादा नाच करत होते अशी ह्रूद्य आठवण अमितजींनी दूरद्रशनवरील एका मुलाखतीमध्ये सांगितली होती.
किशोरदा,तुमचे'रूक जाना नही तू कही हारके..'हे गाणे आम्हा रसिकांच्या जीवनातील चढउतारात कायम प्रेरणादायी ठरते 🙏
किशोरदा,तुम्ही आम्हा रसिकाच्या ह्रुदयात पिढ्यानपिढ्या अढळस्थानी आहात आणि
ईश्वराकडून पृथ्वीतलावर येतानाच रियाज करून आलेल्या या महानगायकाला मानाचा मुजरा.🙏🙏🌹🙏🙏
©दीपा देशपांडे🙏🌹🙏
मो.नं.९३७१०१८८५८
[06/08, 7:26 am] Charudatta: शापित विक्षिप्त… ०४ ०८ १५
अत्यंत प्रतिभावान माणूस. त्याच्या गाण्यांची यादी मी इथे देणार नाही, फार उल्लेखही करणार नाही. हा माणूस सोडून इतर गायक नेहमी नंतरच्या क्रमांकावर राहिलेत माझ्या, याचा अर्थ ते टुकार, भिकार, कमी दर्जाचे आहेत असं नाही. एखादी गोष्टं, माणूस का आवडतो याचं नेमकं स्पष्टीकरण देता येत नाही. जे उमगतात ते मन व्यापत नसावेत. त्याची नक्कल करणारे अनेक आले, येतील. पण काही नेमके हळवे शब्दोच्चार (त्याचा 'ह' दुसरा कुणी म्हणत नाही तसा), सॅड व्हर्जन त्याच्या आवाजातच ऐकावीत.
मराठीत पुलं आणि हिंदीत हा. यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय. गीतलेखन, अभिनय, संगीतदिग्दर्शन, गायन, लेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि सोड्याच्या बाटलीसारखा बाहेर येणारा निर्विष, उच्च दर्जाचा कारुण्याची झालर लावून आलेला, टचकन डोळ्यात पाणी आणणारा, सहज, आटापिटा न केलेला विनोद. त्याच्या हस-या मुखवटयामागे दडलेला खरा चेहरा पाह्यचा असेल तर दूर गगन की छांवमें बघा. त्याच्या धीरगंभीर आवाजातलं 'आ चल के तुझे' कधीही ऐका, श्रवणीयच.
संगीत शिकलेला अशोककुमार आणि न शिकलेला हा. आपण जे शिकतो ते काम सोडून दुस-याच गोष्टीत जेंव्हा अफाट यश मिळतं तेंव्हा दैवी देणगी शब्दाचा अर्थ कळतो. मोठ्या भावानी सहज अभिनयाचे मापदंड निर्माण केले, यानी एकाच गळ्यातून नवरस बाहेर काढले. स्वत:विषयी फार कुणी चांगलं बोलणार नाही याची काळजी त्यानी सतत घेतली. त्याचे आचरटपणाचे, विक्षिप्तपणाचे अनेक खरे खोटे किस्से आहेत पण आपण नेहमी सांगणा-याची बाजू ऐकत असतो. मूळ घटना वेगळी असू शकते याची जाणीव आपण ठेवायला हवी.
योगीताबालीशी लग्नं केलं म्हणून त्यानी काही काळ मिथूनसाठी आवाज देणं बंद केलं होतं. 'लव्ह स्टोरी' साठी कुमार गौरवचा आवाज तो देणार होता. कबूल करूनही रेकॉर्डींगला तो गेलाच नाही, माणूस घ्यायला आला तर त्यानी दरवाजाच उघडला नाही शेवटी आरडीनी अमितकुमारला घेऊन काम केलं, याचा हेतू साध्यं झाला.फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण प्रयत्नं करतोच आपल्या मुलांना पुढे आणायला, ह्याचा खाक्या वेगळाच. अनेक हिरोंची चलती याच्या आवाजामुळे झाली. आराधना हिट नसता झाला तर हा गायन बंद करणार होता. पण सगळी गाणी हिट झाली मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही कधी. रफी, मुकेश, मन्नादा सगळे मागे पडले. यॉडलींगचा आठवा सूर होताच.
माणूस होता मात्रं हळवा, प्रेमळ. आपल्या भिकार संगीत देणा-या भाच्यासाठी - बप्पी लाहिरी साठी - त्यानी कुठलंही गाणं गायलं (ऐका सुमधुर - झ झ झ झोपडीमें चारपाई आणि खरोखर चांगलं दिलेलं - इंतेहा हो गई इंतजार की, चलते चलते मेरे ये गीत). कुठलंही लग्नं याला लाभलं नाही. पहिल्या रूमाला आणि शेवटच्या लीनाला पोर झालं एवढंच. रुमा गुहा पहिली (५०-५८) मग अप्सरा मधुबाला (६०-६९), मग योगिता बाली (७५-७८) आणी अत्यंत दुर्दैवी, पहिल्या लग्नाच्या नंतर अल्पकाळात विधवा झालेली लीना चंदावरकर (८०-८७). कुणाच्या खासगी आयुष्याबाबत आपण अर्धवट माहितीवर खूप बोलतो.
आज त्याचा वाढदिवस. जिवंत असता तर ८६ वर्षाचा झाला असता. पण काय करायचं एवढं जगून? तुझ्या मागे अनेक पिढ्या तुझं नाव राहिल. सत्तेचाळीस गेलेला सैगल अजून ऐकतो मी, तुला जाऊन अठ्ठावीस वर्ष झालीत फक्तं. मी मरेपर्यंत तू सोबत असशील. शेवटी तूच लिहिलेल्या, संगीत दिलेल्या, गायलेल्या, अभिनीत केलेल्या वर्णनाच्या ठिकाणीच जाणार, मी काय किंवा अजून दुसरा कुणी काय :
आ चल के तुझे मै लेके चलू एक ऐसे गगन के तले
जहां गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले
आहे का रे खरंच असं सगळं तिथे? तरच मजा आहे तिथे येण्यात.
*जयंत विद्वांस*
(पोस्टमधले आकडे २०१५ चे आहेत, चुकलेत असं कॉमेंटायचे कष्ट कृपया घेऊ नयेत)
No comments:
Post a Comment