Tuesday, February 26, 2019

कौन नागरिया लुटलं लो ।। राजेश भुतकर

कौन ठगवा नगरिया लूटल हो
संत श्री गुरु कबीर दास यांचे हे खुपच उद्बोधित असे निर्गुण भजन असून पं. कुमार गन्धर्वजी आणि श्रीमती कलापनीजी यांनी अत्यंत सुंदर चाल दिली आहे. हि रचना अत्यंत गुह्यतम असे जीवनरहस्य उलगडवून दाखविते. मानवी जीवनाचे उद्दिष्ट काय आहे हे या रचनेतून सुस्पष्ट होते. हे गाणे या लिंक वर क्लिक करून या अर्थासह साथोसाथ ऐकावे. http://www.saavn.com/s/KAUN-THAGVA-NAGARIYA-LUTAL-HO-PT-KUMAR-GAVDHARVA

कौन ठगवा नगरिया लूटल हो
कौन ठगवा नगरिया लूटल हो ||
येथे नगराची उपमा शरीराला दिली आहे. “ठगवा” हा शब्द “न सांगता चोरपावलाने येणाऱ्या मृत्यूसाठी” वापरला आहे. हा केवळ शाररीकच मृत्यू असा अर्थ घेऊन चालणार नाही. तर गाफील राहिलेल्या साधकाच्या सदसदविवेकबुद्धीला लुटणाऱ्या मायेसाठी “ठगवा” हा शब्द वापरला गेला आहे असेही आपल्याला म्हणता येईल, कारण मायेच्या आधीन असलेली व्यक्ती मृत्यूला सत्य मानतेच त्यामुळे मृत्यू अस्तित्वात नसूनही मृत्यूचे भय त्या मायाधीन व्यक्तीस असतेच. या भयापोटी ती मायेच्या आधारे कितीही मृत्यूस चुकवीत राहिली तरी तो मृत्यू त्या मायेच्या रूपानेच त्या व्यक्तीला गाठतो.
चंदन काट के बनल खटोला,
तापर दुलहिन सूतल हो ||
चंदनाच्या लाकडापासून पलंग तयार झालेला आहे. याचा अर्थ आपले शरीर. शरीराला चंदनाची उपमा दिली आहे कारण साधकाने त्याचा देह जगत कल्याणासाठी चंदनासारखा झिजवून त्यातून सुगंधरूपी अद्वैत आनंद व निरंकारत्व साधायचे आहे.  आता या चंदनरुपी देहात जो आत्मा आहे त्याला नववधूची उपमा दिली आहे. झोप हे अज्ञानाचे लक्षण आहे. ती एक अज्ञानरूप ग्लानी आहे. आत्म्याचे स्वस्वरूपाबद्दलचे अज्ञान म्हणजेच त्याची भ्रांतमय निद्रा. कठोपनिषदात “उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्न बोधत...” हा श्लोक या अज्ञानवश ग्लानीतून साधकाने उठावे यासाठी आला आहे. ती आत्मारुपी नववधू या पलंगरुपी शरीरामध्ये अज्ञानवश ते स्वत:चे समजून त्यावर निजते असे रूपक दिसून येते.
उठो सखीरी मांग सवारौ
दुलहा मोसे रुठल हो ||
आता या झोपी गेलेल्या नववधूला तिची सखी उठवीत आहे आणि त्या नववधूला तिची सखी म्हणते आहे कि “अग ऊठ साजशृंगार कर नाहीतर नवरदेव माझ्यावर रागावतील.” आता यात हि सखी कोण? हि सखी आत्म्याची किंवा आत्मारुपी नववधूची सखी आहे. आत्म्याची सखी म्हणजे सदसदविवेकबुद्धी होय, जी ते परमतत्व जाणते. सदसदविवेकबुद्धी व संतांचे मार्गदर्शन आत्म्याला जागृत करत असते आणि सतत सांगत असते कि तू या मायावी शरीरामार्फत मायेमध्ये गुंतू नकोस कारण येथे सर्व फसवणूक आहे सत्य काहीच नाही. सदसदविवेकबुद्धी हि परमात्म्याला जाणत असल्याने ती हेसुद्धा जाणून आहे कि या आत्म्याचे निजधाम हे परमात्मा आहे व त्याप्रमाणे हा परमात्मा त्या आत्मारुपी नववधूचा पती आहे. म्हणून ती सदसदविवेकबुद्धी तिच्या सखीला म्हणते, “त्या पतीला जर असे कळले कि तू अजूनही त्या मायावी शरीरात अज्ञानवश झोपलेली आहेस तर तो परमात्मारुपी नवरदेव माझ्यावर नाराज होईल.” “मांग सावारो” म्हणजे “साजशृंगार कर” याचा शब्दश: अर्थ न घेता, याचा अर्थ त्या आत्म्याने त्या सदसदविवेकबुद्धीच्या आधारे अद्वैतभाव, ध्यानधारणा, शुचित्व, समाधी, निरांकारत्व, योग आणि बंधमुक्ती हे साधनस्वरूप दागिने ल्यायावयाचे आहेत जे त्या आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होण्यास साधन होणार आहेत.
आये जमराजा पलंग चढि बैठा
नैनन अंसुवां टूटल हो ||
आता काळरूपी यमराज या चंदनरुपी पलंगावर चढून बसले आहेत. याचा अर्थ कणाकणाने हे शरीर खंगत असते आणि त्यामुळे ते हळूहळू त्या अटळ मृत्यूकडे वाटचाल करीत असते. जन्माला आल्यानंतर “पलंगावर हक्काने चढून बसणाऱ्या यमराजाप्रमाणे” मृत्यू  हक्काने त्या शरीरासमवेतच असतो. आता या सदसद्विवेकबुद्धीचे वेळेत ऐकले नाही आणि हे कलेवर पडण्यापूर्वीच या शरीराच्या सहाय्याने त्या आत्म्याने स्वस्वरुपानुभव जर करून घेतला नाही तर? म्हणजेच त्या आत्मारूपी नववधूने सदसदविवेकबुद्धीरुपी सखीच्या सहाय्याने अद्वैतभाव, ध्यानधारणा, शुचित्व, समाधी, निरांकारत्व, योग आणि बंधमुक्ती हे साधनस्वरूप दागिने ल्यायले नाहीत तर त्या आत्मारुपी नववधूला दु:ख होणार आहे. हे अज्ञान घेऊन त्याला पुन्हा नवीन शरीर धारण करून मानवी अवतार धारण करावा लागणार आहे ज्यात पुन्हा माया त्या आत्म्याला भरकटवून टाकण्यासाठी तत्पर आहे.
चार जने मिल खाट उठाईन,
चहुं दिसि धूं धूं उठल हो ||
चंदनकाष्ठापासून तयार केलेला पलंग चौघेजण उचलून नेतील आणि त्याला जाळतील. म्हणजे साधक असो व सामान्य व्यक्ती त्याचे कलेवर हे शेवटी सरणावर जाळणार आहे व धुं धुं करून अग्निशिखा त्यातून फुटून येणार आहेत. याचा अर्थ स्वस्वरुपानुभव प्राप्त व्यक्तीचे शरीरसुद्धा मायावी असून तेसुद्धा त्याचे एक साधन होते आणि त्याच्या निर्वाणानंतर ते मायावी साधन जाळण्याशिवाय कोणताही उपाय नाही हि वस्तूस्थिती संत श्री गुरु कबीरदास येथे नमूद करीत आहेत.
कहत कबीरा सुनो भाई साधो
जगसे नाता छूटल हो ||
संत श्री गुरु कबीरदास येथे साधकाला सांगताहेत की आता हे अग्निसंस्कार झाल्यावर शरीराच्या माध्यमातून जगाशी असलेले त्या व्यक्तीचे नाते संपुष्टात येते. बंधमुक्त व्यक्तीचेसुद्धा त्याच्या शरीराच्या माध्यमातून असलेले भौतिक जगतातील वास्तव्य व नाते त्याच्या भौतिक मृत्यूनंतर संपुष्टात येते. आता जगाशी असलेले आपले नाते शरीर संपल्याने म्हणजे मृत्यूप्रलयाने संपुष्टात आणावयाचे? का शरीराचे पतन होण्यापूर्वीच स्वस्वरुपानुभव प्राप्त करून म्हणजेच दासबोधात सांगितलेला “विवेकप्रलय” साधून जगाशी असलेले मानसिक नाते संपुष्टात आणावयाचे? हे पर्याय ते साधकासमोर ठेवत आहेत. येथे वाक्यार्थ, रूपक व लक्ष्यार्थ तिन्ही गोष्टीना महत्व असून त्याप्रमाणे या रचनेचा सखोल व अचूक वेध घेणे आवश्यक आहे.
राजेश गजानन भूतकर.
पुणे. ९६८९९३१४५८

Friday, February 22, 2019

शातजन्म शोधितांना ।स्वातंत्र्यवीर सावरकर

शत जन्म शोधिताना.. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर काव्याचे रसग्रहण

शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||

तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||

हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||

कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
नाटक: सन्यस्तखड्ग

भूमिका

समग्र सावरकर वाङ्मय ७वा खंड काव्य-नाटक विभाग असा आहे आणि त्यामध्ये संन्यस्त खड्ग हे संपूर्ण नाटक
दिलेले आहे. य़ा नाटकाचे कथानक थोडक्यात असे आहे:
ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतमबुध्द पित्याला भेण्यासाठी कपिलवस्तूत येतो.भेटीनंतर तो त्याची आई, पत्नी आणि
लहान मुलगा राहुल यांना बुध्द धर्माची दीक्षा देतोच पण शाक्यांचा सेनापती विक्रम(सिंह) यालाही बुध्द धर्माचा
स्वीकार करण्याचा आग्रह करतो. दुःख नाशासाठी बुध्दाने सांगितलेला मार्ग पटत नसतानाही आपल्या नका्रामुळे
त्याचा नवीन धर्म स्थापनेचा प्रयोग फसू नये म्हणून विक्रम संन्यास घेतो. त्यावेळी त्याचा मुलगा वल्लभ (सिंह) केवळ दीड वर्षचा असतो.
यानंतर चाळीस वर्षांचा काळ जातो. वल्लभाची शाक्यांचा सेनापती म्हणून नेमणूद झालेली असते.त्याने कोलीय
वशाच्या सुलोचना नामक स्रीशी विवाह केलेला असतो.त्यांच्या प्रीतिविवाहास एक वर्ष झाले आहे आणि सुलोचना
तो सण साजरा करण्यासाठी वल्लभाची वाट पहात असते. वल्लभ येतो,त्यांचे प्रेमालाप चालू असतात. कामदेवाच्या पूजेसाठी सुलोचना माला गुंफत असते. सोंगट्यांचा पटही तिने मांडून ठेवलेला असतो आणि
त्याचवेळी दरबारातून त्याला तातडीचे बोलावणे येते कारण शाक्य राज्यावर कोसलाचा राजा विद्युत्गर्भ याने
हल्ला केलेला असतो. क्षणाचाही विलंब न करता वल्लभ दरबारात जातो आणि सुलोचनेचा निरोप न घेताच
युद्धावर निघून जातो.युद्धात तो शत्रूचा बंदिवान होतो. ही बातमी सुलोचनेस मिळते (अंक ३ प्रवेश २रा) ती तिच्या
सखीस,नलिनीस म्हणते:की मीही आता वीरवेष धारण करून शत्रूवर हल्ला करणार. या तिच्या निश्चयानंतर
हे पद तिच्या तोंडी आहे.
आर्ति म्हणजे ओढ. अनंत काळ आणि अनेक जन्म मी माझ्या प्रियकराची-वल्लभाची वाट पाहिली तेंव्हा माझी
सुखसाधना सिध्दीस गेली प्रियकराशी मीलन झाले.पण हे मीलनही क्षणाचेच ठरले! मी उठून त्याला आलिंगन
देणार होते पण क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी.
य़ा पुढच्या नाटकाच्या कथानकाची ह्या पदाचा अर्थ समजण्यासाठी आवश्यकता नसल्याने येथेच थांवतो.

From ..web

Thursday, February 14, 2019

मधुबाला ।। जयंत विद्वांस

सौ.मधुबाला आभासकुमार गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त...

“मधुबाला"

निखळ, निरोगी शुभ्रं दंतपंक्ती दाखविणारं, निर्मळ हास्य म्हणजे मधुबाला  कृत्रिमपणा, कुचकेपणा, छद्मीपणाचा  लवलेश  नसलेला  मोहक चेहरा म्हणजे मधुबाला. प्रसन्न व्यक्तिमत्व , सहज वावर, शिडशिडीत शरीरयष्टी म्हणजे मधुबाला.  झीनत अमान  आणि  मधुबाला यांच्यात साम्यं काय? तर दोघींचा अभिनय बघायला कुणीही जात नाही. काय बघायला जातात याची कारण फक्तं वेगळी.

उणपुरं फक्तं छत्तीस वर्षाचं आयुष्यं जगली ती. त्यातली शेवटची सात आठ वर्ष  आजारपणातच गेली. वयाच्या चौदाव्व्या वर्षी, १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा ती आधीच्या सहा बहिणींना जगवण्यासाठी वडिलांच्या पारतंत्र्यात गेली आणि राजकपूर बरोबर 'नीलकमल' मध्ये चमकली. नंतर आलेला गूढ चित्रपट 'महल', त्यातील गाणी, रहस्यं आणि मधुबाला मुळे गाजला. तिच्या हृदयाला भोक पडलं होतं. तसंही मतलबी वडील, असफल प्रेम यांनी पडली होती ती वेगळीच!!!

मधुबालाबद्दल अश्लील बोललेलं, लिहिलेलं मी आजपर्यंत ऐकलेलं, वाचलेलं नाही. डोळ्यात दुर्योधनाची नजर घेऊन चित्रपट बघणा-या माणसांकडूनही नाही. ती नितांत सुंदर होती, ते सौंदर्य अलौकिक होतं. मेकपमन  नी  फुलवलेलं  नव्हतं  ते.  गावठी  गुलाब जसा मोहक, सुगंधी असतो तशी होती ती. अफाट स्त्री सौंदर्याची वर्णनं करताना अतिशयोक्तीचा  आधार घेतात, जसं  मस्तानीच्या कंठातून म्हणे तांबूलरस उतरताना दिसायचा…म्हणे मत्स्यगंधेच्या अंगाचा सुगंध काही मैल लांबून यायचा (म्हणून  तिचं  एक नाव योजनगंधा असंही होतं). थोडक्यात काय…जे साध्या शब्दात सांगता येत नाही ते थोडं  अतिशयोक्त  सांगायचं.  मधुबाला  बद्दल लिहिताना असच होतं. एक शापित अप्राप्यं सौदर्य. ज्याला मिळेल त्याचा हेवा करायचा.   

मूळ कृष्ण-धवल 'मुघल-ए-आझम' नंतर रंगीत झाला. के.असिफनी  मूळ चित्रपटात 'जब प्यार किया तो डरना क्या….' एवढं एकच गाणं रंगीत केलं होतं. माझ्या मते मधुबालाच्या सौंदर्याला दिलेली ती सर्वात मोठी दाद होती. वरच्या शेकडो आरशात मधुबाला सहन होत नाही. तो ऐश्वर्य सीन होता. एक देवानी पाठवलेलं शिल्पं आणि बाजूनी मनुष्यं निर्मित सौंदर्य!!!

मधुबाला 'चीप' कधीच वाटली नाही. 'हावडा ब्रिज' मधलं 'आईये मेहेरबां' कधीही बघा, मोहक आहे. 'काला पानी' मधलं 'अच्छा जी मैं हारी पिया' मध्ये फक्तं तिला आणि तिच्या खट्याळ चेह-याला बघत रहावं. किशोर बरोबरची 'दे दो मेरा पाच रुपय्या', 'चांद रात तुम हो साथ', 'एक लडकी भिगी भागीसी', 'हाल कैसा है जनाब का', 'झुमरू' मधलं 'ठंडी हवा ये चांदनी सुहानी' ही गाणी जेवढी श्रवणीय होती तेवढीच प्रेक्षणीयंही होती.  

दिलीपकुमार आणि प्रेमनाथ दोघं तिच्या प्रेमात होते. दिलीपकुमारसाठी प्रेमनाथनी माघार घेतली असं वाचलय.तिचं दोघांपैकी  कुणाशीच लग्नं होऊ शकलं नाही. हरहुन्नरी पण विक्षिप्त किशोरकुमारशी झालेलं लग्नं अल्पंकाळाचं सुखं होतं. पण ती फार काळ जगणार नाही हे तो पर्यंत माहित झालेलं होतं.

दोघांची जात एक असताना तिचं दिलीपकुमारशी लग्नं झालं नाही ('नया दौर' मध्ये होती ती, त्यावेळी झालेल्या वादात दिलीपकुमारनी तिच्या वडिलांची माफी मागितली असती तर झालं असतं त्यांचं लग्नं, असं वाचलंय) आणि धर्म वेगळा आहे म्हणून देव आनंद चं सुरैय्याशी आणि सायरा बानो चं राजेंद्रकुमारशी झालं नाही. सुंदर बायका नेहमी अयोग्य पुरुषाच्या  प्रेमात  का  पडतात  हे  एक  कोडंच आहे!!! पहा ना या जोड्या - ऐश्वर्या-सलमान, माधुरी-संजय दत्त, स्मिता पाटील-राज बब्बर, परवीन  बाबी-महेश  भट  आणि   मधुबाला-प्रेमनाथ…असो …  

जोपर्यंत सौंदर्य, सौंदर्यवतींची चर्चा होईल तोपर्यंत सगळ्या गोष्टी मधुबालाशी (ती परिमाण आहे) ताडून पाहिल्या जातील एवढं निश्चित. मग समाधानासाठी कुणाला तिच्या हसण्यात आणि माधुरीच्या हसण्यात साम्य आहे असं वाटेल, असेलही, पण मधुबाला एकमेवाद्वितीय होती. काय नंबर लावायचेत ते अकरा पासून पुढे लावा, एक ते दहा तीच आहे!!!  

मला तर वाटतं स्वर्गलोकीच्या अप्सरांचं यान गुपचूप पृथ्वीवर आलं असावं. त्यातली एक छोटीशी अप्सरा इथेच राहून गेली. मनमोहन देसाईं च्या चित्रपटात जसं 'हरवले सापडले' असतं ना त्याप्रमाणे एका अप्सरेला ती पृथ्वीवर दिसली असावी. मग काय… घेतलं बोलावून तातडीने… 'त्याच्या' घरचा खजिना त्यांनी परत नेला. तो आपल्याला पहायला मिळाला हेच आपलं भाग्यं.

जयंत विद्वांस

राजेन्द्र कुमार ।। मानसी पटवर्धन

बहारो फूल बरसाओ ....!!!!

तो जुबिली स्टार होता....नशिबाची त्याला भरभक्कम साथ लाभली होती.....!!!!१९६०चे दशक त्याने गाजविले होते...त्याच्या रोमँटिक अदांमुळे  तरुणी त्याच्यावर फिदा असत,एवढेच नव्हे तर एकही तरुणी अशी नव्हती ,जिच्या पुस्तकात राजेंद्रकुमार चा फोटो नव्हता. एकाच वेळी त्याचे ४/५चित्रपट चित्रपटगृहात गाजत...!!धूल का फूल,दिल एक मंदिर,मेरे मेहबूब,संगम,आई मीलन की बेला,आरजू,सूरज,झुक गया आसमान,तलाश हे त्याचे ६० च्या दशकातील सुपर हिट चित्रपट ,ज्यांनी त्याला "जुबिलिकुमार" हा किताब मिळवून दिला.

पंजाबमधील सियालकोट मधला याचा जन्म....आजोबा मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर,वडील टेक्सटाईल उद्योगात ...पण फाळणी नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थिरावले... आणि हा पठ्ठया सिनेसृष्टीत नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला.....त्याला नायक व्हायचेच नव्हते....तब्बल पाच वर्षे त्याने एच एस रवेल यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिले...(पतंगा,सगाई,पॉकेटमार या 3 चित्रपटांसाठी)
रवेल साहेब छोट्या भूमिकाही त्याच्याकडून करून घेत असत...!दिलीपकुमार आणि नर्गिस अभिनीत "जोगन"या चित्रपटात छोटीशी भूमिका त्याला त्यांच्यामुळेच मिळाली.रुपेरी पडद्यावर तर त्याचे  आगमन झाले....पण अजूनही रवेल यांचा सहदिग्दर्शक म्हणून तो कार्यरत होताच...!!"जोगन" मधील त्याची भूमिका पाहून देवेंद्र गोयल यांनी १९५५मध्ये आलेल्या त्यांच्या  "वचन"या चित्रपटात त्याला  भूमिका दिली. आणि चित्रपट चक्क सिल्वर जुबिली झाला.....याचा मोबदला त्याला मिळाला फ़क्त १५०० रुपये.....मग मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही.....!!व्ही शांताराम यांच्या "तुफान और दिया" या चित्रपटातील त्याची भूमिकाही गाजली..."ये कहानी है दिये की और तुफान की"...हे गीत जणू त्याचेच होते..!!!त्याच्या संघर्षाची कहाणी जणू सांगत होते."एक झलक "या दिलीपकुमार,वैजयंतीमाला अभिनित चित्रपटात त्याची एक झलकच दिसली...पण नामवंत निर्माते  "मेहबूब खान" यांच्या मदर इंडिया तील रामूच्या भूमिकेने मात्र त्याची दखल चित्रसृष्टीने घेतली...मदर इंडिया ला हिंदुस्थानी मातीचा सुगंध लाभला होता...येथे परदेशातील निसर्ग नव्हता,की रोमान्स नव्हता...येथे होती भारतातील विस्तीर्ण शेते ,शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद,त्यांची सुख दु:ख...आणि सर्वच कलाकारांचा अविस्मरणीय अभिनय...!!!हा चित्रपट अजरामर ठरला...!!

नवे क्षितिज त्याला खुणावत होते.....आणि मग तो चित्रपट आला ,ज्याने त्याला यशाच्या शिखरावर नेले...निर्माते दिग्दर्शक विजय भट यांचा"गूँज उठी शहनाई"....बिस्मिल्ला खान यांची मधुर सनई, अमिता सारखी सुन्दर नायिका.... वसंत देसाई यांचे सुरेल संगीत.....तेरे सूर और मेरे गीत,जीवन में पिया तेरा साथ रहे सारखी गाणी, "किशन" च्या भूमिकेत त्याने स्वत:ला झोकून दिले....ख़राखुरा सनई वादक वठवला त्याने...चित्रसृष्टीला त्याची दखल घ्यावीच लागली.....हा चित्रपट खूप गाजला....बिस्मिल्लखां  शहनाई वाजवत असता राजेंद्रकुमार त्यांचे हावभाव,बोटांची हालचाल ,खांद्यांची ठेवण यांचे सूक्ष्म निरीक्षण करत,पडद्यावर शहनाई वादकाची भूमिका वठविणे इतके सोपे नव्हते...चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी खान साहेबांना आपल्या भूमिकेबद्दल विचारले...ते म्हणाले,"मैं तो खुद् को ही परदेपर देख रहा था। आप तो हमे नजर ही नहीं आये।" केवढी मोठी दाद मिळाली...आणि ती सुद्धा बिस्मिल्ला खान यांच्याकडून ...याच अथक परिश्रमांमुळे राजेंद्रकुमार यशस्वी ठरले आणि  त्यांचे पाय चित्रपट सृष्टीत  घट्ट रोवले गेले...

"कानून"ज्यात एकही गाणं नव्हतं,रोमान्स नव्हता...हा एक कोर्ट रूम ड्रम होता.या मधील त्यांची वकिलाची भूमिका "जस्टीस छागला" यांना इतकी आवडली की "अशोक कुमार" सारखा "जज" आणि "राजेंद्रकुमार" सारखा "वकील" आपण पाहिला नाही अशा शब्दात त्यांनी शाबासकीची थाप त्यांना दिली.."कानून" चित्रपट गाजत असताना एक गरीब माणूस त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला ,"वकिलसाहब मेरे लडके को बचा लिजीए,वो बेकसूर है"...!!! ही घटना म्हणजे त्यांची वकिलाची भूमिका यशस्वी झाल्याची  पोच पावती होती जणू...!!!"धूल का फूल"हा चोप्रा बंधूंचा गाजलेला चित्रपट,गाणी ,दिग्दर्शन सारेच सुंदर...कुमारी मातेची कथा...तेरे प्यार का आसरा चाहता हूँ म्हणत माला सिन्हा बरोबर चे प्रेम त्याने छान रंगविले.

चित्रपटातील अनेक रोमँटिक गीते म्हणत राजेंद्रजीनी तरुणाईची मने जिंकली होती...!"बहारो फूल बरसाओ"म्हणत त्याने वैजयंतीमालाशी  प्रणयाराधना केली तर  "तेरी प्यारी प्यारी सूरत को किसीकी नजर ना लगे....म्हणत बी सरोजादेवीची मनधरणी केली."संगम" मधील "ये मेरा प्रेम पत्र पढकर" आजही ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात...शुभ्र साडीतील वैजयंती माला आणि देखणा राजेंद्र कुमार यांचा प्रणय आजही मनावर मोरपीस फिरवून जातो...!!"ए फुलो की रानी, बहारो की मलिका" म्हणत त्याने साधनाचेही मन जिंकून घेतले होते...!!!

त्याचा गोरा वर्ण,उंचा पूरा बांधा, सोज्वळ स्वभाव, मृदुता सारे काही आवडून जायचे....राज कपूर च्या "संगम" मधे तो त्रिकोणा चा तिसरा कोन होता.... त्याचा "मॅजिस्ट्रेट गोपाल" मनात घर करून गेला...राधावर जिवापाड प्रेम करणारा पण सच्ची मैत्री निभावणारा जीवलग मित्र केवळ अविस्मरणीय....!!!!!"दोस्त दोस्त ना रहा" या गाण्यानंतरचा त्याचा संवाद आजही आठवतो..."सुंदर ,मेरे दोस्त जो गीतकार पे गुजरी वो उसने कहा,मगर यार कुछ लोग ऐसे भी होते है,जिनपर गुजरती है लेकीन वो कुछ नहीं कहते....!!!हा त्याचा उत्स्फूर्त संवाद रसिकांना तर आवडलाच पण खुद्द राजकपूरनाही आवडला...

एका नटाला रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकाराव्या लागतात...एका इंटरव्ह्यू मध्ये राजेंद्रकुमार म्हणाले होते की हमे एक जीवन में अनेक जीवन जीने का तजुरबा मिलता है।

"दिल एक मंदिर" हा त्याच्या अभिनयाला आव्हान देणारा आणखी एक सुन्दर चित्रपट.....त्यातील त्याचा "डॉ धर्मेश" इतका जिवंत होता की जणू ती भूमिका त्याच्या अंगी भिनली होती...समोर मीनाजी आणि राजकुमार यांच्यासारखे कसलेले कलाकार असतानाही त्याने ही भूमिका जिवंत केली.... त्याचे प्रेयसीच्या आठवणीने झुरणे, विकलता ही त्याच्या "याद ना जाए "या गीतातून प्रतिबिंबित होते...हे गीत मनाला चटका लावून जाते...!!!!अवघ्या २८दिवसात दिग्दर्शक श्रीधर यांनी हा चित्रपट केला...त्या २८दिवसात दिवसरात्र,झोपेत,जेवत असताना सगळ्या युनिट ने त्या चित्रपटाचाच  विचार केला.आणि त्यामुळेच एक गाजलेला,दर्जेदार चित्रपट रसिकांना मिळाला...

"मेरे मेहबूब"हा त्याचा आणि साधनाचा आणखी एक सुन्दर चित्रपट...यातील नौशादसाहेबांची गाणी म्हणजे रसिकांना मेजवानीच जणू....!!!यातील "तुमसे इजहारे हाल कर बैठे"हे गीत पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंदच.....!!!!हा चित्रपट आणि ही जोड़ी खरच खुप लोकप्रिय झाली.त्याच्या "आरजू" चित्रपटाचा एक किस्सा त्यानेच एक मुलाखतीत सांगितला होता.. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एक मुलगा पुण्याहून त्याला भेटायला आला...त्याच्या हातात फुलांचा हार होता.राजेंद्रकुमार यांना भेटल्यावर तो ढसाढसा रडला आणि म्हणाला,"मेरी टांग कटनेसे मैं जिंदा नहीं रहना चाहता था,लेकिन आप की "आरजू" ने मुझे जिंदगी जीने की प्रेरणा दी"।राजेंद्रकुमार यांनाही  आरजू मध्ये एक पाय अपघातात गमवावा लागतो... आपली चित्रपटातील भूमिका प्रामाणिक पणे करणाऱ्या कलाकारांना अशी दाद नक्कीच मिळत असेल आणि त्यांच्या अभिनयाची पोचपावती देत असेल...

"तलाश "या चित्रपटात त्याने शर्मिलाच्या आणि बर्मन दादांच्या संगीताच्या साथीने वेगळीच् लज्जत आणली..."आज को जून ली रातमा"म्हणत चांदण्या रात्री त्याने शर्मिलाशी केलेला रोमांस लाजवाब.....!!!!!त्याच्या नशिबाने त्याला उत्तम संगीत,नायिका,मोठ्या बैनर चे चित्रपट सारे काही लाभले....

त्याच्या दिल एक मंदिर,आई मिलन की बेला, आरजू साठी त्याला बेस्ट एक्टर च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते...मात्र त्याच्या "कानून"आणि "मेहंदी रंग लायो" (गुजराती)या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला पंडित नेहरू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला...तसेच 1969 मधे "पद्मश्री"देऊन भारत सरकारने त्याचा बहुमान केला....

आज त्याचा वारसा त्याचा मुलगा "कुमार गौरव" चालवितो आहे....पण आजही "कौन है सपनो में आया,कौन है जो दिलमे समाया "हे गाणे ऐकले की वाटते प्रियाला साद घालत हा खरच आकाशातून पुनः पृथ्वीवर अवतरणार नाही ना.....

आज राजेंद्रकुमार यांचा स्मृतिदिन....!!!!त्यांच्या स्मृतीला लक्ष लक्ष प्रणाम.....!!!!!!!!

© मानसी पटवर्धन..