कौन ठगवा नगरिया लूटल हो
संत श्री गुरु कबीर दास यांचे हे खुपच उद्बोधित असे निर्गुण भजन असून पं. कुमार गन्धर्वजी आणि श्रीमती कलापनीजी यांनी अत्यंत सुंदर चाल दिली आहे. हि रचना अत्यंत गुह्यतम असे जीवनरहस्य उलगडवून दाखविते. मानवी जीवनाचे उद्दिष्ट काय आहे हे या रचनेतून सुस्पष्ट होते. हे गाणे या लिंक वर क्लिक करून या अर्थासह साथोसाथ ऐकावे. http://www.saavn.com/s/KAUN-THAGVA-NAGARIYA-LUTAL-HO-PT-KUMAR-GAVDHARVA
कौन ठगवा नगरिया लूटल हो
कौन ठगवा नगरिया लूटल हो ||
येथे नगराची उपमा शरीराला दिली आहे. “ठगवा” हा शब्द “न सांगता चोरपावलाने येणाऱ्या मृत्यूसाठी” वापरला आहे. हा केवळ शाररीकच मृत्यू असा अर्थ घेऊन चालणार नाही. तर गाफील राहिलेल्या साधकाच्या सदसदविवेकबुद्धीला लुटणाऱ्या मायेसाठी “ठगवा” हा शब्द वापरला गेला आहे असेही आपल्याला म्हणता येईल, कारण मायेच्या आधीन असलेली व्यक्ती मृत्यूला सत्य मानतेच त्यामुळे मृत्यू अस्तित्वात नसूनही मृत्यूचे भय त्या मायाधीन व्यक्तीस असतेच. या भयापोटी ती मायेच्या आधारे कितीही मृत्यूस चुकवीत राहिली तरी तो मृत्यू त्या मायेच्या रूपानेच त्या व्यक्तीला गाठतो.
चंदन काट के बनल खटोला,
तापर दुलहिन सूतल हो ||
चंदनाच्या लाकडापासून पलंग तयार झालेला आहे. याचा अर्थ आपले शरीर. शरीराला चंदनाची उपमा दिली आहे कारण साधकाने त्याचा देह जगत कल्याणासाठी चंदनासारखा झिजवून त्यातून सुगंधरूपी अद्वैत आनंद व निरंकारत्व साधायचे आहे. आता या चंदनरुपी देहात जो आत्मा आहे त्याला नववधूची उपमा दिली आहे. झोप हे अज्ञानाचे लक्षण आहे. ती एक अज्ञानरूप ग्लानी आहे. आत्म्याचे स्वस्वरूपाबद्दलचे अज्ञान म्हणजेच त्याची भ्रांतमय निद्रा. कठोपनिषदात “उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्न बोधत...” हा श्लोक या अज्ञानवश ग्लानीतून साधकाने उठावे यासाठी आला आहे. ती आत्मारुपी नववधू या पलंगरुपी शरीरामध्ये अज्ञानवश ते स्वत:चे समजून त्यावर निजते असे रूपक दिसून येते.
उठो सखीरी मांग सवारौ
दुलहा मोसे रुठल हो ||
आता या झोपी गेलेल्या नववधूला तिची सखी उठवीत आहे आणि त्या नववधूला तिची सखी म्हणते आहे कि “अग ऊठ साजशृंगार कर नाहीतर नवरदेव माझ्यावर रागावतील.” आता यात हि सखी कोण? हि सखी आत्म्याची किंवा आत्मारुपी नववधूची सखी आहे. आत्म्याची सखी म्हणजे सदसदविवेकबुद्धी होय, जी ते परमतत्व जाणते. सदसदविवेकबुद्धी व संतांचे मार्गदर्शन आत्म्याला जागृत करत असते आणि सतत सांगत असते कि तू या मायावी शरीरामार्फत मायेमध्ये गुंतू नकोस कारण येथे सर्व फसवणूक आहे सत्य काहीच नाही. सदसदविवेकबुद्धी हि परमात्म्याला जाणत असल्याने ती हेसुद्धा जाणून आहे कि या आत्म्याचे निजधाम हे परमात्मा आहे व त्याप्रमाणे हा परमात्मा त्या आत्मारुपी नववधूचा पती आहे. म्हणून ती सदसदविवेकबुद्धी तिच्या सखीला म्हणते, “त्या पतीला जर असे कळले कि तू अजूनही त्या मायावी शरीरात अज्ञानवश झोपलेली आहेस तर तो परमात्मारुपी नवरदेव माझ्यावर नाराज होईल.” “मांग सावारो” म्हणजे “साजशृंगार कर” याचा शब्दश: अर्थ न घेता, याचा अर्थ त्या आत्म्याने त्या सदसदविवेकबुद्धीच्या आधारे अद्वैतभाव, ध्यानधारणा, शुचित्व, समाधी, निरांकारत्व, योग आणि बंधमुक्ती हे साधनस्वरूप दागिने ल्यायावयाचे आहेत जे त्या आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होण्यास साधन होणार आहेत.
आये जमराजा पलंग चढि बैठा
नैनन अंसुवां टूटल हो ||
आता काळरूपी यमराज या चंदनरुपी पलंगावर चढून बसले आहेत. याचा अर्थ कणाकणाने हे शरीर खंगत असते आणि त्यामुळे ते हळूहळू त्या अटळ मृत्यूकडे वाटचाल करीत असते. जन्माला आल्यानंतर “पलंगावर हक्काने चढून बसणाऱ्या यमराजाप्रमाणे” मृत्यू हक्काने त्या शरीरासमवेतच असतो. आता या सदसद्विवेकबुद्धीचे वेळेत ऐकले नाही आणि हे कलेवर पडण्यापूर्वीच या शरीराच्या सहाय्याने त्या आत्म्याने स्वस्वरुपानुभव जर करून घेतला नाही तर? म्हणजेच त्या आत्मारूपी नववधूने सदसदविवेकबुद्धीरुपी सखीच्या सहाय्याने अद्वैतभाव, ध्यानधारणा, शुचित्व, समाधी, निरांकारत्व, योग आणि बंधमुक्ती हे साधनस्वरूप दागिने ल्यायले नाहीत तर त्या आत्मारुपी नववधूला दु:ख होणार आहे. हे अज्ञान घेऊन त्याला पुन्हा नवीन शरीर धारण करून मानवी अवतार धारण करावा लागणार आहे ज्यात पुन्हा माया त्या आत्म्याला भरकटवून टाकण्यासाठी तत्पर आहे.
चार जने मिल खाट उठाईन,
चहुं दिसि धूं धूं उठल हो ||
चंदनकाष्ठापासून तयार केलेला पलंग चौघेजण उचलून नेतील आणि त्याला जाळतील. म्हणजे साधक असो व सामान्य व्यक्ती त्याचे कलेवर हे शेवटी सरणावर जाळणार आहे व धुं धुं करून अग्निशिखा त्यातून फुटून येणार आहेत. याचा अर्थ स्वस्वरुपानुभव प्राप्त व्यक्तीचे शरीरसुद्धा मायावी असून तेसुद्धा त्याचे एक साधन होते आणि त्याच्या निर्वाणानंतर ते मायावी साधन जाळण्याशिवाय कोणताही उपाय नाही हि वस्तूस्थिती संत श्री गुरु कबीरदास येथे नमूद करीत आहेत.
कहत कबीरा सुनो भाई साधो
जगसे नाता छूटल हो ||
संत श्री गुरु कबीरदास येथे साधकाला सांगताहेत की आता हे अग्निसंस्कार झाल्यावर शरीराच्या माध्यमातून जगाशी असलेले त्या व्यक्तीचे नाते संपुष्टात येते. बंधमुक्त व्यक्तीचेसुद्धा त्याच्या शरीराच्या माध्यमातून असलेले भौतिक जगतातील वास्तव्य व नाते त्याच्या भौतिक मृत्यूनंतर संपुष्टात येते. आता जगाशी असलेले आपले नाते शरीर संपल्याने म्हणजे मृत्यूप्रलयाने संपुष्टात आणावयाचे? का शरीराचे पतन होण्यापूर्वीच स्वस्वरुपानुभव प्राप्त करून म्हणजेच दासबोधात सांगितलेला “विवेकप्रलय” साधून जगाशी असलेले मानसिक नाते संपुष्टात आणावयाचे? हे पर्याय ते साधकासमोर ठेवत आहेत. येथे वाक्यार्थ, रूपक व लक्ष्यार्थ तिन्ही गोष्टीना महत्व असून त्याप्रमाणे या रचनेचा सखोल व अचूक वेध घेणे आवश्यक आहे.
राजेश गजानन भूतकर.
पुणे. ९६८९९३१४५८
No comments:
Post a Comment