बहारो फूल बरसाओ ....!!!!
तो जुबिली स्टार होता....नशिबाची त्याला भरभक्कम साथ लाभली होती.....!!!!१९६०चे दशक त्याने गाजविले होते...त्याच्या रोमँटिक अदांमुळे तरुणी त्याच्यावर फिदा असत,एवढेच नव्हे तर एकही तरुणी अशी नव्हती ,जिच्या पुस्तकात राजेंद्रकुमार चा फोटो नव्हता. एकाच वेळी त्याचे ४/५चित्रपट चित्रपटगृहात गाजत...!!धूल का फूल,दिल एक मंदिर,मेरे मेहबूब,संगम,आई मीलन की बेला,आरजू,सूरज,झुक गया आसमान,तलाश हे त्याचे ६० च्या दशकातील सुपर हिट चित्रपट ,ज्यांनी त्याला "जुबिलिकुमार" हा किताब मिळवून दिला.
पंजाबमधील सियालकोट मधला याचा जन्म....आजोबा मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर,वडील टेक्सटाईल उद्योगात ...पण फाळणी नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थिरावले... आणि हा पठ्ठया सिनेसृष्टीत नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला.....त्याला नायक व्हायचेच नव्हते....तब्बल पाच वर्षे त्याने एच एस रवेल यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिले...(पतंगा,सगाई,पॉकेटमार या 3 चित्रपटांसाठी)
रवेल साहेब छोट्या भूमिकाही त्याच्याकडून करून घेत असत...!दिलीपकुमार आणि नर्गिस अभिनीत "जोगन"या चित्रपटात छोटीशी भूमिका त्याला त्यांच्यामुळेच मिळाली.रुपेरी पडद्यावर तर त्याचे आगमन झाले....पण अजूनही रवेल यांचा सहदिग्दर्शक म्हणून तो कार्यरत होताच...!!"जोगन" मधील त्याची भूमिका पाहून देवेंद्र गोयल यांनी १९५५मध्ये आलेल्या त्यांच्या "वचन"या चित्रपटात त्याला भूमिका दिली. आणि चित्रपट चक्क सिल्वर जुबिली झाला.....याचा मोबदला त्याला मिळाला फ़क्त १५०० रुपये.....मग मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही.....!!व्ही शांताराम यांच्या "तुफान और दिया" या चित्रपटातील त्याची भूमिकाही गाजली..."ये कहानी है दिये की और तुफान की"...हे गीत जणू त्याचेच होते..!!!त्याच्या संघर्षाची कहाणी जणू सांगत होते."एक झलक "या दिलीपकुमार,वैजयंतीमाला अभिनित चित्रपटात त्याची एक झलकच दिसली...पण नामवंत निर्माते "मेहबूब खान" यांच्या मदर इंडिया तील रामूच्या भूमिकेने मात्र त्याची दखल चित्रसृष्टीने घेतली...मदर इंडिया ला हिंदुस्थानी मातीचा सुगंध लाभला होता...येथे परदेशातील निसर्ग नव्हता,की रोमान्स नव्हता...येथे होती भारतातील विस्तीर्ण शेते ,शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद,त्यांची सुख दु:ख...आणि सर्वच कलाकारांचा अविस्मरणीय अभिनय...!!!हा चित्रपट अजरामर ठरला...!!
नवे क्षितिज त्याला खुणावत होते.....आणि मग तो चित्रपट आला ,ज्याने त्याला यशाच्या शिखरावर नेले...निर्माते दिग्दर्शक विजय भट यांचा"गूँज उठी शहनाई"....बिस्मिल्ला खान यांची मधुर सनई, अमिता सारखी सुन्दर नायिका.... वसंत देसाई यांचे सुरेल संगीत.....तेरे सूर और मेरे गीत,जीवन में पिया तेरा साथ रहे सारखी गाणी, "किशन" च्या भूमिकेत त्याने स्वत:ला झोकून दिले....ख़राखुरा सनई वादक वठवला त्याने...चित्रसृष्टीला त्याची दखल घ्यावीच लागली.....हा चित्रपट खूप गाजला....बिस्मिल्लखां शहनाई वाजवत असता राजेंद्रकुमार त्यांचे हावभाव,बोटांची हालचाल ,खांद्यांची ठेवण यांचे सूक्ष्म निरीक्षण करत,पडद्यावर शहनाई वादकाची भूमिका वठविणे इतके सोपे नव्हते...चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी खान साहेबांना आपल्या भूमिकेबद्दल विचारले...ते म्हणाले,"मैं तो खुद् को ही परदेपर देख रहा था। आप तो हमे नजर ही नहीं आये।" केवढी मोठी दाद मिळाली...आणि ती सुद्धा बिस्मिल्ला खान यांच्याकडून ...याच अथक परिश्रमांमुळे राजेंद्रकुमार यशस्वी ठरले आणि त्यांचे पाय चित्रपट सृष्टीत घट्ट रोवले गेले...
"कानून"ज्यात एकही गाणं नव्हतं,रोमान्स नव्हता...हा एक कोर्ट रूम ड्रम होता.या मधील त्यांची वकिलाची भूमिका "जस्टीस छागला" यांना इतकी आवडली की "अशोक कुमार" सारखा "जज" आणि "राजेंद्रकुमार" सारखा "वकील" आपण पाहिला नाही अशा शब्दात त्यांनी शाबासकीची थाप त्यांना दिली.."कानून" चित्रपट गाजत असताना एक गरीब माणूस त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला ,"वकिलसाहब मेरे लडके को बचा लिजीए,वो बेकसूर है"...!!! ही घटना म्हणजे त्यांची वकिलाची भूमिका यशस्वी झाल्याची पोच पावती होती जणू...!!!"धूल का फूल"हा चोप्रा बंधूंचा गाजलेला चित्रपट,गाणी ,दिग्दर्शन सारेच सुंदर...कुमारी मातेची कथा...तेरे प्यार का आसरा चाहता हूँ म्हणत माला सिन्हा बरोबर चे प्रेम त्याने छान रंगविले.
चित्रपटातील अनेक रोमँटिक गीते म्हणत राजेंद्रजीनी तरुणाईची मने जिंकली होती...!"बहारो फूल बरसाओ"म्हणत त्याने वैजयंतीमालाशी प्रणयाराधना केली तर "तेरी प्यारी प्यारी सूरत को किसीकी नजर ना लगे....म्हणत बी सरोजादेवीची मनधरणी केली."संगम" मधील "ये मेरा प्रेम पत्र पढकर" आजही ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात...शुभ्र साडीतील वैजयंती माला आणि देखणा राजेंद्र कुमार यांचा प्रणय आजही मनावर मोरपीस फिरवून जातो...!!"ए फुलो की रानी, बहारो की मलिका" म्हणत त्याने साधनाचेही मन जिंकून घेतले होते...!!!
त्याचा गोरा वर्ण,उंचा पूरा बांधा, सोज्वळ स्वभाव, मृदुता सारे काही आवडून जायचे....राज कपूर च्या "संगम" मधे तो त्रिकोणा चा तिसरा कोन होता.... त्याचा "मॅजिस्ट्रेट गोपाल" मनात घर करून गेला...राधावर जिवापाड प्रेम करणारा पण सच्ची मैत्री निभावणारा जीवलग मित्र केवळ अविस्मरणीय....!!!!!"दोस्त दोस्त ना रहा" या गाण्यानंतरचा त्याचा संवाद आजही आठवतो..."सुंदर ,मेरे दोस्त जो गीतकार पे गुजरी वो उसने कहा,मगर यार कुछ लोग ऐसे भी होते है,जिनपर गुजरती है लेकीन वो कुछ नहीं कहते....!!!हा त्याचा उत्स्फूर्त संवाद रसिकांना तर आवडलाच पण खुद्द राजकपूरनाही आवडला...
एका नटाला रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकाराव्या लागतात...एका इंटरव्ह्यू मध्ये राजेंद्रकुमार म्हणाले होते की हमे एक जीवन में अनेक जीवन जीने का तजुरबा मिलता है।
"दिल एक मंदिर" हा त्याच्या अभिनयाला आव्हान देणारा आणखी एक सुन्दर चित्रपट.....त्यातील त्याचा "डॉ धर्मेश" इतका जिवंत होता की जणू ती भूमिका त्याच्या अंगी भिनली होती...समोर मीनाजी आणि राजकुमार यांच्यासारखे कसलेले कलाकार असतानाही त्याने ही भूमिका जिवंत केली.... त्याचे प्रेयसीच्या आठवणीने झुरणे, विकलता ही त्याच्या "याद ना जाए "या गीतातून प्रतिबिंबित होते...हे गीत मनाला चटका लावून जाते...!!!!अवघ्या २८दिवसात दिग्दर्शक श्रीधर यांनी हा चित्रपट केला...त्या २८दिवसात दिवसरात्र,झोपेत,जेवत असताना सगळ्या युनिट ने त्या चित्रपटाचाच विचार केला.आणि त्यामुळेच एक गाजलेला,दर्जेदार चित्रपट रसिकांना मिळाला...
"मेरे मेहबूब"हा त्याचा आणि साधनाचा आणखी एक सुन्दर चित्रपट...यातील नौशादसाहेबांची गाणी म्हणजे रसिकांना मेजवानीच जणू....!!!यातील "तुमसे इजहारे हाल कर बैठे"हे गीत पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंदच.....!!!!हा चित्रपट आणि ही जोड़ी खरच खुप लोकप्रिय झाली.त्याच्या "आरजू" चित्रपटाचा एक किस्सा त्यानेच एक मुलाखतीत सांगितला होता.. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एक मुलगा पुण्याहून त्याला भेटायला आला...त्याच्या हातात फुलांचा हार होता.राजेंद्रकुमार यांना भेटल्यावर तो ढसाढसा रडला आणि म्हणाला,"मेरी टांग कटनेसे मैं जिंदा नहीं रहना चाहता था,लेकिन आप की "आरजू" ने मुझे जिंदगी जीने की प्रेरणा दी"।राजेंद्रकुमार यांनाही आरजू मध्ये एक पाय अपघातात गमवावा लागतो... आपली चित्रपटातील भूमिका प्रामाणिक पणे करणाऱ्या कलाकारांना अशी दाद नक्कीच मिळत असेल आणि त्यांच्या अभिनयाची पोचपावती देत असेल...
"तलाश "या चित्रपटात त्याने शर्मिलाच्या आणि बर्मन दादांच्या संगीताच्या साथीने वेगळीच् लज्जत आणली..."आज को जून ली रातमा"म्हणत चांदण्या रात्री त्याने शर्मिलाशी केलेला रोमांस लाजवाब.....!!!!!त्याच्या नशिबाने त्याला उत्तम संगीत,नायिका,मोठ्या बैनर चे चित्रपट सारे काही लाभले....
त्याच्या दिल एक मंदिर,आई मिलन की बेला, आरजू साठी त्याला बेस्ट एक्टर च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते...मात्र त्याच्या "कानून"आणि "मेहंदी रंग लायो" (गुजराती)या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला पंडित नेहरू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला...तसेच 1969 मधे "पद्मश्री"देऊन भारत सरकारने त्याचा बहुमान केला....
आज त्याचा वारसा त्याचा मुलगा "कुमार गौरव" चालवितो आहे....पण आजही "कौन है सपनो में आया,कौन है जो दिलमे समाया "हे गाणे ऐकले की वाटते प्रियाला साद घालत हा खरच आकाशातून पुनः पृथ्वीवर अवतरणार नाही ना.....
आज राजेंद्रकुमार यांचा स्मृतिदिन....!!!!त्यांच्या स्मृतीला लक्ष लक्ष प्रणाम.....!!!!!!!!
© मानसी पटवर्धन..
No comments:
Post a Comment