" पु. लं. चा 'चित्रपटीय' विनोद " -- धनंजय-कुरणे-कोल्हापूर
(9325290079)
(दि. 8 नोव्हेंबर 2018)
---------------------------------------------------------
1948 ते 1954 अशी, उणीपुरी सहा-सात वर्षांची,
पु. लं.ची 'रुपेरी पडद्यावरची' कारकीर्द ! पण या छोट्या कालावधीतसुद्धा, 'प्रसन्न व निर्विष विनोद आणि हजरजबाबीपणा' यामुळं, त्या वेळच्या चित्रसंसारात पु. लं. नी एक आगळंच चैतन्य निर्माण केलं होतं.
चित्रपट सृष्टीतले ते 'मंतरलेले दिवस' होते आणि पु. लं. हे त्या दिवसातले एक प्रभावी 'मांत्रिक' होते.
'दत्ता धर्माधिकारी' नावाचे एक चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात किमान एक तरी "स्मशानदृश्य" असायचं . एका रात्री पु.लं., वसंत सबनीस आणि इतर काही मित्र अलका टॉकीजला 'नवाचा खेळ' बघायला गेले होते आणि सिनेमा संपल्यावर रात्री बारा-साडेबारा वाजता 'लकडी पुलावरुन' परत येत होते. तेव्हा समोर 'वैकुंठ'मधे एक 'चिता' जळताना दिसली. भोवती भरपूर गर्दी होती. वसंत सबनीस म्हणाले, 'कुणीतरी बडी असामी गेलेली दिसतेय!' पु.लं. चटकन म्हणाले, ' छे रे, दत्ता धर्माधिकारीच्या पुढच्या सिनेमाचं शूटिंग चालू असेल'. या विनोदानं त्या गंभीर वातावरणातही सगळे मित्र जोरजोरात हसू लागले.
काही निर्मात्यांनी आर्थिक व्यवहारात फसवल्यामुळे पु.लं.नी चित्रपटसृष्टी सोडली असं म्हणतात. पण पु.लं.नी याची जाहिर वाच्यता कधीच केली नाही.
तरी 'निर्मात्यांविषयीचं' त्यांचं मत कधीतरी विनोदातून प्रकट होत असे. 'एकमेकांशी अजिबात सख्य नसलेले' दोन निर्माते एका समारंभात परस्परांना आलिंगन देत आहेत असं दृश्य पु.लं.नी पाहिलं. तेव्हा, शेजारच्या व्यक्तीला ते म्हणाले, 'बघ, आत्ता एकाचं पाकिट चोरीला गेलं असणार आणि एकाचं पेन! शिवाय, मुळात ते पाकिट आणि पेन ज्यांचं आहे ते बिचारे आपलं पाकिट आणि पेन शोधत असणारच!'
'सब कुछ पु.लं.' अशी जाहिरात झालेल्या 'गुळाचा गणपती'ला सुरूवातीला फारशी गर्दी होत नव्हती. तेव्हा पुलं विनोदानं म्हणाले की, 'सब कुछ पुलं' या जाहिरातीमुळं लोकांचा असा समज झाला असावा की इथे 'प्रेक्षकांच्या' भूमिकेत सुद्धा फक्त पुलंच आहेत; म्हणून लोक चित्रपट बघायला येत नसावेत !
(नाहीतरी त्या काळी, काही अपवाद वगळता मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळणं दुरापास्तच होतं. माझे एक ज्येष्ठ मित्र सांगतात की त्यांच्या लहानपणी गावात मराठी सिनेमा लागला की 'दुपारी तीनच्या' खेळाला पन्नास साठ प्रेक्षक असायचे, 'सहाच्या' खेळाला ही संख्या पंचवीस तीस पर्यंत कमी व्हायची आणि रात्री 'नऊच्या शो'ला तर डोअरकीपर, 'वर बाल्कनीत एकट्यानं भिती वाटते' म्हणून खालीच येऊन उभा रहायचा!)
'दूधभात' चित्रपटाचं शूटिंग चालू असताना, हिंदीतले एक प्रसिद्ध निर्माते सेटवर आले होते. तिथलं साधं वातावरण आणि कामाचा वेग पाहून त्यांनी विचारलं, 'तुमचा मराठी चित्रपट तयार व्हायला बजेट किती लागतं? आणि वेळ किती लागतो ?' तेव्हा पुलं त्वरीत उत्तरले, 'तुमच्या हिंदी चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंग मधे 'लंच'वर जेवढा खर्च होतो तेवढ्या बजेटमधे आमचा मराठी सिनेमा तयार होतो आणि 'लंच'वर तुमचा जेवढा एकूण वेळ जातो, तेवढ्या वेळात आमचं सगळं शूटिंग पूर्ण होतं'. यावर ते निर्मातेसुद्धा खळखळून हसू लागले.
"चित्रपटसृष्टीतली सहा वर्षांची सफर ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी सफर होती" असं पुलं नी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे पुलं ची ही चित्रयात्रा, त्या काळी सिनेजगतात वावरणा-या अनेकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरली होती. पुण्यातल्या तिन्ही स्टुडिओतल्या कलाकारांना पुलं हवेहवेसे वाटत व पुलं च्या येण्याची, ते उत्सुकतेनं वाट बघत.
पुलं नी 'रुपेरी दुनियेचा' निरोप घेतल्यानं मराठी सिनेमाची हानी तर झालीच पण सारे सहकलाकार, पुलंच्या 'रुपेरी विनोदाच्या सत्संगाला' कायमचे मुकले !
---------------------------------------------------------
अभिप्राय --
खुप-छान-माहिती !
पु-लं-नी मराठी चित्रपट व्यवसायाला भरभरून दिलं.
पण दुर्दैवानं ह्या व्यवसायातल्या लोकांनी त्यांना फसवलं.
म्हणूनच ते ह्या व्यवसायापासून दूर गेले. जर आर्थिक यश मिळालं असतं तर आपल्याला एकसे-एक दर्जेदार विनोदी सिनेमे पहायला मिळाले असते.
-- श्रीनिवास-लखपती-पनवेल
No comments:
Post a Comment