मंडळी *सप्रे*म नमस्कार ! आज २६ आॅक्टोबर २०१९! आज मी तुम्हाला एका अशा कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की जो पहिल्यांदा चालायला लागला तेंव्हा ८ वर्षाचा होता.पायाला हाडाचा क्षयरोग झालेला , पायाच्या असह्य वेदनेमुळे जो कळवळायचा , लपालपीच्या खेळात सहज पकडला जायचा कारण डाव्या पायामागची रक्ताची धार सांगायची तो कुठे लपलाय ते ! याच्या गळणार्या रक्त पुवामुळे मोठ्या ४ बहिणी कुठे बाहेर खेळायलाच जात नसंत... वडील गेले ( २४ एप्रील १९४२ ) ४१ वर्षे ३ महिने २३ दिवस त्यांचं वय होतं व याचं वय होतं साडे चार वर्षे ! कोल्हापूरच्या मुक्कामात एका शेतकर्याने दिलेली मुळी उगगाळून लावली व आठ दिवसांत पाय बरा झाला व आठव्या वर्षी हा चालायला लागला पण डावा पाय आखूड राहिला.असा हा कृश चालीचा मुलगा ९ व्या वर्षी *छान चालीत गाऊ लागला तो अजून गातोय आजपर्यंत !* चाल नीट नसलेला हा भलत्याच चांगल्या चालीचा निघाला ! ९ व्या वर्षी फिटस् चा आजार झाल्यावर पुढे औषधपाण्याने नव्हे तर शंकरापुढील अखंड ज्योतींनी हा १३ वर्षांनी म्हणजे २२ व्या वर्षी चं फिटस् चं भयंकर दुखणं गेलं!
मंडळी हा मुलगा म्हणजे २६ आॅक्टोबर १९३७ रोजी सांगलीला मूळ हर्डिकर आडनांवाच्या पण मंगेशीला स्थायिक झाल्याने आंडनांव मंगेशकर पडलेल्या मास्टर दीनानाथ व शेवंती यांना लता , मीना , आशा व उषा या ४ बहिणींनंतर झालेला *ह्रृृदयनाथ ऊर्फ बाळ !*
बाळच्या आठवणीतील मास्टर दीनानाथांच्या अनेक आठवणींपैकी एक इथे नमूद करतो.....
लता,मीना,आशा,उषा खाली खेळायला गेल्या होत्या.आई स्वयंपाकघरात काहितरी करीत होती.मला शौचाला लागली. सरपटत मी खालच्या संडासात जाऊ शकत नव्हतो. मी रडारड सुरू केली. आई बाहेर आली. माझी अडचण तिच्या लक्षात आली. ती थकली होती का कंटाळली होती देव जाणे , पण एक कागद घेऊन तिने माझ्या समोर ठेवला व म्हणाली, *हां बस इथेच !* मीही त्या कागदावरच देहधर्म करू लागलो. आणि अचानक बाप गच्चीवरून त्या खोलीत आला. नेहमीचे कनवाळू डोळे रागाने एकदम लाल झाले. एकदम ओरडला , *गाढवा, इथे घाण करतोस? लाज नाहि वाटत?* माझ्यावर आणखी तो ओरडणार तेवढ्यात मीही धारदार आवाजात म्हणालो, *संडासात जायला मला काही तुमच्या सारखे चालता येत नाही!* मला मारायला उगारलेला बापाचा हात लुळा पडला! रागाने लाल झालेले डोळे झरू लागले. काही न बोलता तो पाय खेचत दुसर्या खोलीत गेला. आईने मला स्वच्छ केले. खिडकीपाशी हा बसला होता — खिन्न होऊन, डोळ्यात पश्चात्ताप , दुःख , पाणी सारे सामावलेले होते! माझं अपंगत्व मीच बापाला बोलून दाखवलं होतं.जी गोष्ट सारे जण माझ्यापासून लपवत होते ते रहस्य मला कळले आहे , उमगले आहे हे ह्या माझ्या उद्गारांनी बापाला दाखवून दिले होते. व्यंगाचा अर्थ कळत नव्हता. कळत होते ते दुखणारे हाड! मी बापाला माझी फक्त अडचण सांगितली होती !मला काय माहीत मला अज्ञात असलेल्या कट्यारीने मी त्या काळजावर मी खोल घाव केला होता म्हणून !
मला त्याने मांडीवर उचलून घेतले व म्हणाला , *गाढवा चुरूचुरू बोलायला शिकला आहेस. गाणं येतं का?*
मीही जोरात म्हणालो *मला गाता येतं!*
*गाऊन दाखव !* — बाप कौतुकाने म्हणाला. मग मी गायलो , *बालम आयो बसो मेरे मन में* — हे सेहगलचं गाणं म्हणून दाखवलं.
*अगं ए , इकडे ये!* बाप अत्यानंदाने ओरडला! *अगं , आतापर्यंत यांचं रडणंच ऐकत आलो.पण हा गातोही , लेकाचा सुरात आहे! लंगडा असला तरी गाणारा होणार हा !*
मला हृदयाजवळ ओढून बाप म्हणाला ,*मी तुमच्यासाठी काही ठेवलं नाही! पण तुला कळायचं नाही , थांब तुला मी एक बंदीश शिकवतो — चल गा!* आणि बाप गाणं शिकवू लागला *अलबेली तू घुंगट खोल*
*आज या बंदिशीचा राग ताल माहित नाही पण बंदिश पूर्ण संपूर्ण सही सही याद आहे कारण त्या देशी बापाने मला गंडाबंद शागीर्द केले होते ना !*
मंडळी , *बैजू बावरा* मधे नौशादसाहेबांनी मास्टर रतन या बाल कलाकाराच्या तोंडी असलेलं एक भजन बाळकडून गाऊन घेतलं होतं ! हे बाळचं चित्रपटातील पहिलं गाणं — वय वर्ष १५ ! साधारण याच सुमाराला बाळच्या वयाच्या मुलांनी *सुरेल बाल कला केंद्र* या नावाने एक वाद्यवृंद तयार केला.यात मीना उषा आणि हृदयनाथ यांचा सहभाग होता पडला काळात संगीतकार झालेला लक्ष्मीकांत मेंडोलिन प्यारेलाल व्हायोलिन वाजत असे लक्ष्मीकांतचा भाऊ शशिकांत तबला वाजवत असे लक्ष्मीकांत आणि पॅरेलल या दोघांची ओळख याच वाद्यवृंदात झाली बाळाचा गाण्यावरचा गाण्याचा कल बघून लताने त्याला शास्त्रशास्त्रीय संगीताचे गायक उस्ताद अमीर खाँ यांच्याकडे शिकायला पाठवलं एकोणीसशे छप्पन्न सत्ता सालच्या सुमाराला बाळने पहिला चाली बनवल्या आणि त्या होत्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या कशी काळ नागिणी आणि चांदणे शिंपीत जाशी
*बाळ बद्दल बोलताना लता सांगते :*
त्याला आधी आकर्षित करते ती कविता! सोप्या सोप्या कवितांऐवजी गोविंदाग्रज ,आरती प्रभू , भा.रा. तांबे , बालकवी या मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवींच्या रचनांना बाळनं चाली दिल्या. *घन तमी शुक्र बघ राज्य करी* या सारख्या अवघड कविता त्यांना रेकॉर्ड केल्या कवी ग्रेस साठी !बाळने आजतागायत माझ्यापुढे स्वतःसाठी कधीही पैसे मागितले नाहीत! त्यांचं संगीत ,त्यांचे कार्यक्रम यातून मिळणाऱ्या पैशातून तो स्वत:चा खर्च भागवतो. माझ्या शिफारसीवर बाळला सहज काम मिळाले असते. पण ते त्याला खपत नाही , तो म्हणतो *दीदी तुझा भाऊ म्हणून सिनेमा मिळणार असेल तर मला ते नको ! माझ्या गुणांमुळे काम मिळालं तर मी ते स्वीकारेन!*
भालजी पेंढारकर यांच्या बरोबर आमचे घरोब्याचे संबंध होते .म्हणून मी एकदाच बाळसाठी शब्द टाकला. भालजींचा *आकाशगंगा* बाळनं संगीत दिलेला पहिला चित्रपट ! त्यानंतर बाळने *निर्मल चित्र* ही संस्था सुरू करून दोन तीन चित्रपटांची निर्मिती केली. एखादं काम हाती घेतलं म्हणजे त्या विषयात पूर्णतः बुडून जाण्याचा बाळाचा स्वभाव आहे. त्या काळात तो अस्वस्थ असतो. माझ्यासोबत केलेला कोणताही अल्बम असूदे , त्याचं ते अभ्यासात बुडून गेलेलं रूप मी पाहिलं आहे.ज्ञानेश्वरांच्या रचना बाळनं दोन टप्प्यात स्वरबद्ध केल्या. पहिल्यांदा घनू वाजे घुणघुणा , पैल तोगे काऊ कोकताहे , पसायदान या रचनांची रेकॉर्ड निघाली. पुढे ज्ञानेश्वर माऊली ही लाँग प्ले रेकॉर्ड केली. दोन्ही वेळा ज्ञानेश्वरीचा बाळनं सखोल अभ्यास केला !
मिर्झा गालिबची रेकॉर्ड करताना गालिब समजून घेण्यासाठी बाळनं उर्दूचा अभ्यास केला. केवळ गालिब नव्हे तर मोमीन , मीर , दाग इत्यादी कवीदेखील अभ्यासले.
छत्रपती शिवाजी महाराज , सावरकर ही त्याची आराध्यदैवतं आहेत ! १९७४ मध्ये शिवराज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आम्ही *शिवकल्याण राजा* हे रेकॉर्ड बनवली. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यासाठी खास निवेदन केलंय. त्याची तयारी दीड दोन वर्षे सुरू होती. त्या वेळेलाही बाळने मराठ्यांचा इतिहास अभ्यासला.
मीराबाईच्या रचनांच्या दोन रेकॉर्ड देखील बाळनं अशा झपाटल्यागत केल्या! विशेषत: *चाला वाहि देस* या रेकॉर्डचा इथे उल्लेख करावा लागेल. मीरासाठी त्यांना राजस्थानी संस्कृतीचाही अभ्यास केला!
१९७४लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये ११ , १२ आणि १४ मार्चला मी पहिल्यांदा संगीत रजनी केली. त्याचं संपूर्ण नियोजन आणि देखरेख बाळची होती. दहा बारा वर्षांपूर्वी आम्ही पुण्यात दीनानाथ रूग्णालय उभारलं. लता मंगेशकर नावाच्या वलयामुळे या रुग्णालयाला फक्त लताची प्रेरणा आहे असाच लोकांचा समज ! खरी गोष्ट अशी आहे की हे रुग्णालय उभं करण्याची कल्पना प्रथम बाळ आणि उषा यांच्या डोक्यात आली. त्या दोघांनी त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमातून मिळालेल्या अल्पशा उत्पन्नातून पहिली ओंजळ टाकली आणि प्रत्यक्ष रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी मला ही कल्पना सांगितली. पुढे मग आम्ही बाबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पुण्यात व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात संगीत रजनी सादर करून निधी उभारला. या एकूणच प्रकल्पात बाळनं अपार मेहनत घेतली !
*माई मंगेशकर म्हणजेच बाळची आई यांच्या दृष्टीकोनातून बाळ :*
*बाळ सिंहासारखा आहे! शूद्र गोष्टींचा विचार त्याच्या मनात कधीतरी येणे शक्य आहे का ?त्याची झेप फार मोठी आहे.* तंबोरा लावून तो असाच चीज़ा आळवीत बसला होता तेंव्हा माझ्या मनात हा विचार आला! मध्यंतरी टीव्हीवर बाळची मुलाखत झाली *शब्दांच्या पलीकडे* मध्ये मुलाखत घेणार्याला बाळ सांगत होता की *त्याची कुठली कुठली गाणी त्यांना त्यांच्या वडिलांच्या चीज़ांवरून घेतली म्हणून! त्या ऐकताना मी विचार करीत होते की, वयाच्या पाचव्या वर्षी वडील गेल्याचे धड ते गेलेलेही आठवत नसेल याला तर त्यांच्या चीजा कुठून आठवतात ? त्यांच्या वडिलांची त्याच्यावर संपूर्ण छाया पडलेली आहे! त्यांच्या या चिजा त्याच्या मुखातून कशा येतात हे कुणाला कळायचं नाही! त्यांच्या या चीज़ा तो म्हणतो हे कसं होतं हे फक्त आम्हाला समजतं , लोकांना नाही समजायचं ते!*
बाळ मीरेची गाणी करत असताना आणखी एक चमत्कार झाला. लता खूप आजारी होती. तिच्या पोटात ट्युमर झाला होता. तिच्या पोटात इतकं दुखायचं की तिला धड चालताही येत नसे. मला कुणी काही सांगितलं नाही. तिला तर वाटलं की आपण आता काही जगत नाही. पण ती म्हणायची, *बाळ मीरा करायची आहे!* रेकॉर्डिंगच्या वेळी बाळ, मीना, उषा सगळे रडताहेत. मी विचारलं, * का रे सगळे रडता ?* तर म्हणाले *चाल चांगली झाली आहे म्हणून!* मला खोटंच सांगितलं की लता कोल्हापूरला चालली आहे म्हणून. पण ती गेली हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला. पोटातला गोळा इतका मोठा होता की डॉक्टरही अचंबा करून राहिले ! पण अशा परिस्थितीत पण लता गायली! हा सगळा मीराचाच चमत्कार ! मी लताला म्हणाले *मीरानंच तुला वाचवलं!*
*बाळच्या वडिलांनी म्हणजेच मालकांनी पुण्याला घर घेतलं तेव्हा बाळ अवघा चार वर्षांचा होता. तर गृहशांतीला ब्राह्मण नाही बोलावले. बाळकडून संस्कृत मंत्र म्हणवून घेऊन घराची शांती केली — इतकी बाळची स्मरणशक्ती तल्लख! मालकांना संस्कृत भाषेचं फार वेड होतं !सामवेद म्हणंत असायचे !*
*बाळच्या बाबतीत आशा भोसले म्हणते :*
"आम्ही सांगलीत आहोत. आमचं घर खूप मोठं आहे. सकाळी उठून मी गॅलरीत येते. रस्त्यावर बायका कमरेवर घागरी घेऊन येत आहेत. एवढं पाणी कशाला बरं ? माझ्या मठ्ठ डोक्यात प्रकाश पडेना ! धावत धावत जिन्याकडे जाते. जिना संपला की खाली एक मोठी फरशी आहे — त्यावर त्या बायका घागरीतील पाणी ओतंत आहेत. हे कशासाठी ?एक बाई दुसरीला सांगते, *देव पावला बघा त्यास्नी! चार पोरींच्यावर एक प्वारगं दिलं बगा !लै चांगली माणसं हाईत* बमी माईच्या खोलीकडे जाते तर तिच्या खोलीकडे मला जाऊ देईनात !अरे पण का? या पुढील काही आठवत नाही ....
साताऱ्यात आमचा मुक्काम आहे. घरासमोर अजिंक्यतारा दिसतोय. लता ,मीना ,मी ,उषा आणि बाजूची मुलं आली आहेत. मी बघते आहे : तो गोरा जाडा डोक्यावर खूप केस असलेला सुंदर पोरगा आहे. त्याला माईने पांढर्या चादरीवर बसवलेला आहे. आणि त्याच्या डोक्यावर टोपली भरून मुरमुरे बोरं मिसळून ओतते. मी धावते खाण्यासाठी. मुठी भर भरून घेते आणि खात सुटते! *हावरट मेली!* — इति माई. मला हे ऐकण्याची सवय झाली आहे — कारण मी खादाड आहे. मग कळलं की बाळ आज एक वर्षाचा झाला! म्हणजे मी चार वर्षांची झाली! त्या गोऱ्या जाड्या कडेवर घेऊन फिरण्यात खूप मजा आहे. आम्ही सर्व बहिणी त्याच्यावर खूप प्रेम करतो. बाबांचा तो जीव आहे. माई तर काय त्याची वेडी झाली आहे !
*बाळ , कधी कधी तू दीदीच्या प्रेमापोटी माझ्यावर अन्याय पण करतोस.पण तुला सर्व माफ आहे. कारण तू माझा छोटा भाऊ आहेस! पण तुला मी माझ्या मुलासारखं वागवलं आहे!*
माझं दुःख जाणणारा बाळ ,आता तो मला गाणं शिकवत होता. ते गाणं : *जिवलगा राहिले रे दूर घर माझे* १५ पंधरा ऑगस्ट १९६६ चं गाणं आहे. तो मला त्या छोट्या वयात सुद्धा कुठेतरी अंतराळात गेल्यासारखा वाटतो !त्यांचं वाचन फार दांडगं आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊनच तो चालीला सुरुवात करतो. *जिवलगा राहिले रे दूर घर माझे* हे गाणं तर एक नवा प्रयोग !हे सात मिनिटांचं गाणं —इंटरल्यूड म्युझिक नाही व आलाप हेच म्युझिक आहे. डबिंग नाही — लाइव्ह रेकॉर्डिंग ! एकदा सुरू केलं की थांबायचं नाही! फार अवघड पण मजा देणारं! आपली ताकद आजमावणारं गाणं !
*तरुण आहे रात्र अजुनी* या गीतात तर तो मंद्र सप्तकातला पंचम लावायचा व मग तारा सप्तकांतला पंचम लावायचा ! हे गाताना गाणार्याची परीक्षाच असते.पण त्यातंच मजा असते. त्याचं गाणं गायल्यावर मला एक वेगळंच समाधान मिळतं! पण ते समाधान माझी मुलं काही मला घेऊ देत नाहीत!
आनंद व वर्षा मला म्हणतात, *आई एक गोष्ट सांगू ?* *काय रे नंदू वर्षा ?*
वर्षा : *जसे बाळ मामा गातात ना तसं तुम्ही दोघी बहिणी म्हणजे तू आणि दिदी मावशी गात नाही!*
आनंद म्हणाला , *बाळ मामा तानेला फेड आऊट फेड इन करतात ना आणि भावना पण जास्त असते त्यांच्या आवाजात !तुमचं गाणं छान असतं , पण त्यांच्या सारखं नसतं का?*
*बोडकं! या प्रश्नाला काय उत्तर आहे ?त्याचं गाणं गाताना ना सर्व ताकद एकत्र करावी लागते तरी सुद्धा त्याच्यासारखं जमत नाही!*
*बाळ बद्दल बोलताना मीना खडीकर म्हणते :*
मी बाळकडे फार कमी गायली आहे. पण संगीतकार म्हणून मला उभं करण्यात बाळने फार मदत केली! *माणसाला पंखा असतात* चं म्युझिक करतेवेळी तो संपूर्ण पाठीशी होता. त्याची *निस दिन बरसत्या नैन हमारे* ही चाल तर पंडित रविशंकरजींना खूप आवडली होती .पण तरी मला हे दु:ख आहे कि तो जो आहे तेवढा मान त्याला मिळाला नाही!
वयानं मी सहा वर्षांनी मोठी आहे पण म्युझिकमध्ये तो माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे !
*बाळ बद्दल बोलताना उषा मंगेशकर म्हणते :*
बाळला शंकराचार्यांच्या हस्ते *भावगंधर्व* ही पदवी मिळाली हा आम्हा मंगेशकर कुटुंबियांच्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे !कारण पूजनीय शंकराचार्य यांच्याकडून गौरवली गेलेली मंगेशकर परिवारातील ही तिसरी व्यक्ती — बाबा , दीदी आणि त्यानंतर बाळचा हा सन्मान झाला !
*सुरेल कला केंद्राच्या* माध्यमातून बाळने गाण्याचे कार्यक्रम सुरू केले आणि त्याच्या मुळे मी स्टेजवर गाऊ लागले. त्याला खेळाची पण खूप आवड आणि माहिती.तो लहानपणी उत्तम बॉलिंग करत असे. त्याला पेंटिंगची आवड पण होती. तो खऱ्या अर्थाने पूर्ण कलावंत आहे! एल.पी. रेकॉर्ड्सच्या चित्र डिझाईन्सच्या कल्पना पूर्ण त्याच्या असतात. बाळकडे गायला नेहमीच आवडतं — पण गाताना भीती पण वाटते. खूप रिहर्सल्स करून घेतो. अवघड चालीमुळे परफेक्शन होई तो तो सोडत नाही. त्यामुळे बाळकडे गायलेली गाणी गाजतात. मी तुलनेने बाळकडे कमी गायले .पण अशा *आकाशगंगा* दीदी बरोबर *दसरा अन् दीपावली गाण्यात* खूप सुरुवातीला गायले.
*पवनाकाठचा धोंडी* मधलं *काय बाई सांगू* खूप लोकांना आवडलं! बॅलेट रामायण कोरसमध्ये गायले. जानकीचं टायटल गायले. स्टेजवर ओम नमोजी आद्या प्रथम आमच्या वाद्यवृंदात कोरसमध्ये आरंभाला गायलं गेलं. सुरेल कला केंद्र ऑर्केस्ट्रात मी , मीनाताई , बाळ असायचो व लक्ष्मीकांतचा वाद्यवृंद ,शशिकांत , गणेश आनंद ,गोरख नायडू ,अरविंद मयेकर ,सुरेंद्र सिंह असत. नृत्यांगना म्हणून जीवनकला असे.
मंडळी , कालच्या या बाळला आज ८२ वर्ष पूर्ण झाली ! बाळासाहेब असच तुमचं संगीत ऐकत तुम्हाला शंभराव्या वर्षी पण शुभेच्छा द्यायचं भाग्य आम्हांस लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना !
कळावे,
आपला विनम्र ,
© उदय गंगाधर *सप्रे* म—ठाणे
No comments:
Post a Comment