Friday, October 11, 2019

Amitabh l Priya Prabhudesai

१९७८ / ७९ साल असेल. शोले लागून वर्षे झाली होती. सिनेमा खूप गाजला होता. कधी नव्हे ते बाबा तिकिट्स घेऊन आले. “मारामारी खूप आहे असे ऐकले आहे. मला नाही पाहायचा”
तोपर्यंत सिनेमा पाहायची फारशी आवडही नव्हती.
मिनर्व्हाचा ७० एम एम चा पडदा आणि त्यातून जिवंत होणारी पात्रे , गब्बर, जय, वीरू, बसंती, ठाकूर …पहिल्या दहा मिनिटातच हिंदी सिनेमाशी जे नाते जमले ते जमलेच.
सिनेमाचा शेवट माहित नव्हता ते चांगलेच झाले. जय मरतो हे आधी माहित असते तर मी शोले, पूर्ण न पाहताच निघून गेले असते.
त्या आधी कधीतरी संत ज्ञानेश्वर पहिला होता ज्याच्यात ज्ञानेश्वर समाधी घेतात हे दृश्य पाहून खूप रडले होते.
“ अग , हे सगळे खोटे असते ग “ हे आजीने सांगितल्यावर सिनेमातल्या कोणत्याही ट्रॅजेडीने कधीच रडवले नव्हते ते जयने रडवले. मृत्यू एवढा अस्वस्थ करतो! हा पहिला अनुभव होता. तो इतका सुंदर असतो हे समजण्याचा सुद्धा हा पहिलाच अनुभव. आयुष्यात पहिल्यांदा , कोणी दुसरे मरायला हवे होते असे वाटले खरे. नंतर अनेकवेळा शोले पाहिला पण त्याचा शेवट नाही. प्रत्येकवेळी पाहताना हेच मनात आले, की रमेश सिप्पीचे काय घोडे मारले होते जयने!
त्या न कळत्या वयात “जय”च्या प्रेमात पडले आणि आज जवळजवळ चाळीस वर्षे होतील त्यातून बाहेर पडायची मनाची तयारी नाही.
अमिताभला प्रत्यक्ष पाहीले ते फिल्मफेअर च्या पार्टीत. तेव्हा षण्मुखानंद हॉल मध्ये हा कार्यक्रम असायचा. बाबाना पासेस मिळायचे. डॉन या सिनेमासाठी त्याला उत्कृष्ट सिनेमाचा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाचे निर्माता नरिमन इराणी यांचे निधन सिनेमाच्या अगोदर झाले. अमिताभने हा पुरस्कार त्यांच्या पत्नीच्या हातून स्विकारला. त्यावेळेला अस्खलित इंग्रजी मधून केलेले छोटेसे भाषण आणि त्यांच्या पत्नीकडून पुरस्कार स्विकारण्याचे दाखवलेले औचित्य ह्यामुळे तो अजूनच आवडला.
काही वर्षांनी व्हिडिओ च्या जमान्यात अमिताभचे सर्व चित्रपट पाहीले. जे नवीन ते थिएटर मध्ये पण जे पाहता आले नव्हते ते घरी आणून पाहिले. देश प्रेमी , महान, बेशरम हे त्याला नाही, पण स्वतःलाच शिव्या देत संपूर्ण पाहिले; हा रेकॉर्ड मला दुसरा कोणत्याही नटाच्या बाबतीत जमला नाही. बेकारातला बेकार सिनेमा त्याच्यामुळे सुसह्य झाला.
सलग सात चित्रपटात अपयशी ठरलेल्या नायकाचा दिवार आला आणि अपयशाची भिंत भंगली. दिवार, कस्मे वादे, अभिमान, शोले, त्रिशूल, जंजीर, काला पथ्थर ...एवढ्या सर्व सिनेमांकडे फिल्म फेअर ने पाठ फिरवली. उत्कृष्ट सिने मासिकाला अमिताभ पुरस्कार द्यावा एवढे डोंगराएवढे काम हा माणूस या सिनेमात करून गेला आहे. अमर अकबर अँथोनी च्या पुरस्काराने खरेतर फिल्म फेअरची लाज राखली. नंतरचा जीवघेणा अपघात, मायस्थेनिस ग्रेव्हीसचा आजार, बोफोर्स ची चिखलफेक, राजकारणातले अपयश … आणि कळस म्हणजे ABCLचे दिवाळे .. या सगळ्यातून तो तरला, स्वतःच्या स्वकर्तृत्वावर उजळून बाहेर पडला ह्याचा नुसता लांबून जरी अभ्यास केला तरी नैराश्य हा शब्द बाद होईल.
अमिताभवर पोस्ट नाही तर पुस्तक लिहावे लागेल एवढे काम त्या माणसाने करून ठेवले आहे आणि पंचाहत्तरीत करत आहे. ज्या माणसाच्या आगमनाने हिंदी सिनेमाची मेलडी संपली असा आरोप त्याच्या इमेजमुळे केला जातो , त्याची गीते निवडणे त्यापेक्षा सोपे आहे.
प्रत्येक भारतीयांच्या मनातल्या अँग्री यंग मॅनला जिवंत करणाऱ्या अमिताभला “अभिमान” या सिनेमात गायकाचा रोल साकार करायला मिळणे ही त्याच्या करिअरच्या नजरेतून घेतलेली जोखीमच होती. त्यात त्याला फुकाच्या अहंकाराची काळी कड होती. नवरा बायकोच्या नात्यात, नवऱ्याला वाटणाऱ्या न्यूनगंडामुळे दुरावा येणे ही गोष्ट भारतीय प्रेक्षकाला आवडेल का हा विचार ऋषीकेश मुखर्जी यांनी केला नसावा किंवा असा कठीण रोल आपला हिरो उत्कृष्ट करेल यांवर त्यांचा विश्वास असावा.
यशस्वी गायक असलेला सुबीर कुमार उमाच्या आवाजावर भाळून तिच्याशी लग्न करतो. तिला गाण्यासाठी उत्तेजन देतो.
सुरुवातीला केवळ सुबीर बरोबरच गाण्याचा आग्रह धरणारी उमा , हळूहळू नवर्याच्या संमतीने स्वतंत्र गायिका म्हणून उदयाला येते. शास्त्रोक्त संगीताची बैठक असल्याने आणि अत्यंत मधुर आवाजाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान प्रस्थापित करते. तिचे यश, त्याला स्वतःच्या गायक म्हणून असलेल्या मर्यादांची जाणीव करून देते. आधी मनात आणि मग संसारात दरी निर्माण होते. सूर, बेसूर होण्याची सुरुवात असते ती.
नायक , हा सहज ,खल नायक वाटू शकेल एवढी कठीण भूमिका असूनही , त्याचे बेअरिंग अमिताभने पेलले आहे. त्याचा राग येत असूनही, त्याची कीवही येते. पुरुषाच्या मनातला अहंकार , त्याचे प्रेम असूनही , संसाराला मारक ठरू शकतो याचे परिणामकारक दर्शन अमिताभने या सिनेमात दाखवले आहे.

तेरे मेरे मिलन की ये रैना
नया कोई गुल खिलाएगी
तभी तो चंचल है तेरे नैना देखो ना देखो ना,
एकमेकांच्या प्रेमात आकंठ डुबलेले ते सुरेल जोडपे. त्या संसारवेलीवर आता फुल येण्याची वेळ आली आहे हे किती सूचक पणे सांगितले आहे. सिनेमात हे गीत दोनदा येते. एकदा, जेव्हा ती दोघे एकमेकांत रमलेली असतात. पियानोवर तो गीताची धून तयार करत असतो. शब्द गुणगुणत असतो .. हे गीत त्यांच्या प्रेमाचे प्रतीक बनणार असते.
आणि नंतर त्यांच्या संसाराला त्यांचीच नजर लागते . घरटे मोडून जाते. त्या वादळाने ती मिटून जाते. स्वतःला हरवून बसते. तो आता मात्र भानावर येतो. तिच्या मनाचा थांग त्याला लागत नसतो . त्याच्या मदतीला हे गीत येते .
तुझे थामे कई हाथों से, मिलूंगा मदभरी रातों से
जगा के अनसुनी सी धड़कन, बलमवा भर दूंगी तेरा मन
नई अदा से सतायेगी
तभी तो चंचल हैं तेरे नैना
पती पत्नीच्या मनोज्ञ नात्यावर जे काही मोजके चित्रपट आहेत त्यातला हा एक.
मारलेली मिठी हा फक्त प्रेमाचा अविष्कार नाही तर तो भक्कम आधार आहे. प्रेमाचे बंधन आहे. हे फक्त शब्दातून नाहीतर नजरेतून व्यक्त केले आहे अमिताभने.

या जोडीचा अजून एक गाजलेला सिनेमा होता “ मिली “
कॅन्सरची रुग्ण आणि एकाकी माणसाची प्रेमकहाणी. आयुष्य गुंतागुंतीचे जरी असले तरीही हास्याची एक लकेर ते सुसह्य करू शकते हा संदेश घेऊन मिली शेखरच्या आयुष्यात प्रवेश करते. त्याचा भूतकाळ काळा . त्याची काळोखी अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाही. लोकांच्या संशयाने भरलेल्या नजरा आणि स्वतःचा लाजिरवाणा भूतकाळ यात जगणे हरवून बसलेला आहे तो. तिचे निखळ हसू आणि पुढे केलेला मैत्रीचा हात मात्र तो नाकारू शकत नाही. त्या निरागस मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि त्याचा जगण्यावर विश्वास बसतो.
पण तो टिकेल का ? तिच्या आयुष्याचे मोजके क्षण शिल्लक आहेत आता. या सत्याचा आणि त्यातून परत येणाऱ्या एकाकीपणाचा सामना करणे कसे शक्य आहे ? त्याच्या ती रोमारोमांत आहे. मनाच्या अशा कोपऱ्यात रुतून बसली आहे की तिचे नसणे म्हणजे त्याचे अस्तित्व संपणे. तिच्या आठवणी त्याच्या हृदयाच्या ठोक्याशी संलग्न असताना ती त्याला सोडून जाऊच कशी शकते!

आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन
खुशबू लाई पवन, महका चन्दन

आतापर्यंत एकाकी आयुष्य जगायची सवय झालेली असताना , मनाची तयारी सुद्धा असताना ती त्याचा सारा विऱोध मोडून आत शिरली आहे. उध्वस्त मनाने परत एकदा स्वप्ने रंगवायची सुरुवातही केली आहे. त्याच्या नजरेसमोर ती येते ती नववधू बनून. पण मेहंदी रेखलेल्या हातावरील रेषा काही वेगळेच सांगत आहेत! जिस पल नैनों में सपना तेरा आए
उस पल मौसम पे मेंहंदी रच जाए
और तू बन जाये जैसे दुल्हन
आए तुम याद मुझे …

कारकिर्दीच्या सुरुवातीला अपयशी ठरलेल्या अमिताभची साथ दिली ती जयाने. ती तेव्हा यशस्वी नायिका होती. सिनेमात तिच्या भूमिकांना प्राधान्य दिले जायचे. अमिताभच्या सिनेमात सशक्त भूमिका करायचा वाव, नंतर फार कमी नायिकांना मिळाला . अभिमान आणि मिली हा अपवाद ठरावा असे सिनेमा नंतर अमिताभने केले. ज्यांनी त्याला अपार लोकप्रियता मिळवून दिली. अँग्री यंग च्या अवताराने मात्र हळव्या प्रेमिकाला मागे टाकले. अमर, अकबर अँथोनी या सिनेमाने आतापर्यन्त हुकलेले फिल्म फेअर मिळवून दिले , आणि वन मॅन इंडस्ट्री चा जन्म झाला.. त्याने या सिनेमात काय केले नाही ! तो नाचला गायला , लढला , हरला , आरशासमोर उभा राहून स्वतःशीच बोलला… आणि परवीन बाबीला पटवण्यासाठी प्रेमाचा जुगार खेळला. हा सिनेमा म्हणजे रोलर कोस्टर राईड होती. त्याच्या जागी कोणताही दुसरा नट असता तर हे मनोरंजन , मूर्खपणा दिसला असता . केवळ अमिताभ म्हणून त्याने हा सिनेमा आपल्या करिष्म्यावर तारून नेला. मनमोहन देसाईच्या ब्रँडने चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवले.

इस्टरची पार्टी. आवडती मुलगी तिच्या बॉडीगार्ड बरोबर आहे आणि नायकाला तिला इंप्रेस करायचे कठीण काम दिलेले आहे. अशावेळी गीताचे सुंदर शब्द आणि चाल नायकाच्या मदतीला येतात पण इथे तेही नाही .
“ My name is Anthony Gonsalvis” असे धेड गुजरी शब्द घेऊन अमिताभ इस्टरच्या अंड्यातून बाहेर पडतो आणि सारा सीन नायिकेसकट खिशात टाकतो.
अभी-अभी इसी जगह पे इक लड़की देखि है
जो मुझे इशारे करती है पर किसी से शायद डरती है
प्यार करेगी क्या डराने वाली
मेरी बनेगी कोई हिम्मत वाली
जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए \-२
रूपनगर प्रेमगली खोली नम्बर चार सौ बीस.
पत्ता चार सौ बीस पण माणूस मात्र शंभर नंबरी सोने निघाला. आज पोरी चेकळायला जॉन इब्राहिमला आहे ती छोटीशी चड्डी सरकवावी लागते. आम्ही सीक्रेटली त्रिशूलमधील पांढऱ्या सुटातील अमिताभ पाहून उसासे सोडले आहेत.
मला अमिताभ -परवीन आणि अमिताभ - झीनत ह्या जोड्या आवडतात. अभिनयात राहूदे, तसेही त्याच्या सिनेमात तोच सबकुछ होता. (बाई असणे फक्त त्याच्या हातात नव्हते … त्याची कमीही लावारीस मध्ये पूर्ण केलीच.) पण दिसण्यात ह्या दोघीही अमिताभला तोडिस तोड होत्या. सणसणीत उंची आणि सोफिस्टिकेशन. ड्रेस सेन्स उत्तम. काहीही शोभायचे.
अमिताभ सुटात शोभलाच पण तोंडात विडी आणि बटन्स सोडलेला शर्ट मधला त्याचा अवतारही लोकांना आवडला. पात्राशी एकरूप होणे त्याच्याइतके कोणालाच जमले नाही. चेहरा रूढार्थाने देखणा नसणे ही देणगीच म्हणावी लागेल. जुर्मानात बड्या बापाचा रईस बेटा या भूमिकेमध्ये तो सहज वावरला. तेवढाच सौदागर मध्ये गूळ विक्या म्हणून ही शोभला.
परवीन सारखीच झीनतची पडद्यावरची इमेज काहीही असो, प्रत्यक्ष आयुष्यात त्या काळी तिच्याएवढी आर्टिक्युलेट बाई नव्हती. कपड्यांची उत्तम समज आणि इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व या गुणांचे हिंदी सिनेसृष्टीत काही मोल नव्हते. पण काही कार्यक्रमांचे तिने केलेले नियोजन मात्र त्याकाळी अतिशय गाजले होते. जिथे तिची वेस्टर्न इमेज दिग्दर्शकानी वापरली, तिथे मात्र ही जोडी खूप गाजली.
द ग्रेट गॅम्बलर हा सिनेमा हा सिनेमा फार गाजला नाही पण “ दो लफ़्ज़ों की है, दिल की कहानी, या है मोहब्बत, या है जवानी” हे गीत मात्र लोकप्रिय आहे. सस्पेन्स कॅटेगरी मधल्या या चित्रपटाचे चित्रण कैरो, लिस्बन, रोम आणि व्हेनिस ला झाले. नायकावर पहारा ठेवणे हे नायिकेचे काम आहे . त्याला मात्र तिची खरी ओळख नाही . प्रेम का अंतस्थ हेतूची पूर्तता या चक्रात आहे ती . उद्या नक्की काय होईल ते माहित नाही . माहित असेल तरी थांबवणे हातात नाही
दिल की बातों का, मतलब न पूछो,
कुछ और हमसे, बस अब न पूछो
जिसके लिये है, दुनिया दीवानी
या है मोहब्बत, या है जवानी
मुखवटा तर फाटला जाणार आहे, त्याची खंत आहेच तरीही प्रेम असेल किंवा तारुण्यातील वेड ..जे काय आहे ते उपभोगू का नये असे विचार करून केलेले वेडे साहस .
व्हेनिस ला येणारे भारतीय एकदा तरी ही सैर करतात ती ही जोडी आठवून. सुरुवातीला इटालियन शब्द आहेत. अर्थ तोच , स्वर तेच आणि प्रेमाची परि-भाषा सुद्धा तीच.
अमिताभ -- जया --परवीन --झीनत या प्रमाणेच आणि एक जोडी गाजली ती अमिताभ आणि हेमा ची. तेव्हा हेमा आणि धर्मेंद्र यांचे नातेही ठरल्यात जमा होते म्हणून ही जोडी विवादास्पद सुद्धा झाली नाही. आताही अमिताभ जेव्हा चरित्र भूमिकेत शिरला आहे तेव्हा त्याच्याबरोबर वीर-झारा ,बागबान आणि बाबूल या सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत हेमा फिट्ट बसली. दोघांनाही वार्ध्यक्याने स्पर्श केलेला नाही. अभिनय आणि हेमा , या बाबतीत वाद असू शकतील पण she has aged gracefuly. , So as Amitabh.
सत्ते पे सत्ता या सिनेमात एक गीत आहे “दिलबर मेरे कब तक मुझे, ऐसे ही तड़पाओगे, मैं आग दिल में लगा दूँगा वो, के पल में पिघल जाओगे”
सात भावांपैकी रवी सर्वात मोठा . जबाबदार पण सर्व कुटुंबच जंगली. शहरी रीती रिवाज सोडाच, स्वच्छता , शिस्त या बेसिक गोष्टींचा सुद्धा अभाव असलेले त्यांचे घर. नियती त्याच्या आयुष्यात इंदूला घेऊन येते आणि प्रेम हसते.
“एक दिन आएगा, प्यार हो जाएगा” हा जबरदस्त आशावाद आहे. तिला जिंकण्याचा.
प्रेमात स्वतःला पूर्ण बदलवून तो तिच्याकडे तिचा हात मागतो. अहं , ही याचना नाही. सहा फूट देहाला शोभेल असे च हिम्मतवान मन ही आहे त्याच्याकडे.

दिल से मिलेगा जो दिल तो महकने लगोगे
तुम मेरी बाहों में आ के बहकने लगोगे
होश खो जाएगा, प्यार हो जाएगा
दिलबर मेरे..The best proposal indeed.

दहा ऑक्टोबर नंतर अकरा येतो … तारखेने त्या दोघांची गाठ एका दिवसाने चुकली आहे.
रेखा आणि अमिताभ ही दंतकथा आहे असे मी मानते , लोकांना ती खरी वाटते. 📷:)
मुकद्दर का सिकंदर आणि सिलसिला दोन पर्याय … मी पहिला घेते 📷:)

सलामे इश्क़ मेरी जा ज़रा क़ुबूल कर लो
तुम हम से प्यार करने की ज़रा सी भूल कर लो
मेरा दिल बेचैन मेरा दिल बेचैन है हमसफ़र के लिए

हिंदी सिनेमात प्रेमासाठी कुर्बानी देण्याची प्रथा चंद्रमुखी ने सुरु केली. जोहरा बेगम या भूमिकेत रेखाने चार चांद लावले.
“ भूल कर लो” ही वॉर्निंग मनावर घेतली मात्र अमिताभने …
नको तिथे जीव जडव ही चुकी कितीही सुंदर जादुगरणीने केली तरी चुकी ती चुकीचं.
पडद्यामागे कितीही हृदये जळो , निदान त्याचा धूर बाहेर आला नाही … त्याने काही कबुली दिली नाही .

इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन
सुनके तेरी नज़र डबडबा जाएगी
बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी
मेरा दावा है होठों पे आ जाएगी

ह्या सिनेमात तरी त्याच्या हृदयावर फक्त राखीचा हक्क होता.
मला स्वतःला राखी आणि अमिताभ यांची जोडी अफाट आवडते. कभी कभी , बेमिसाल , बरसात की एक रात, जुर्माना ,कस्मे वादे या सिनेमात प्रियकर प्रेयसी म्हणून ती वावरली. कभी कभी आणि बेमिसाल यात ते प्रेमही अयशस्वी झाले. Maturity आहे या नात्यात. एक प्रगल्भ नाते.

कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये
तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं
तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये

प्रेम , विरह , वेगळ्या झालेल्या वाटा , आपापल्या जोडीदाराबरोबर समजुतीने केलेला संसार आणि ती तडजोड छान अंगवळणी पडलेली असताना नियतीने परत खेळलेली चाल …
संयमाची परीक्षा आहे ही !

सिनेमाच्या सुरुवातीला एक कवी गातो हे गीत . एका प्रेमिकाचे हळवे गीत.

कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के ये बदन, ये निगाहें मेरी अमानत हैं
ये गेसुओं की घनी छाँव है मेरी ख़ातिर
ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं
कभी कभी मेरे दिल में..
बर्फाची थंड चादर बसलेले ते दोघे आपल्या संसाराची स्वप्ने रंगवीत आहेत. निष्पर्ण वृक्षांची सावली कशी मिळणार ! मनातले मनातच राहते आणि कोणा दुसऱ्याच्या शेजेवर हेच गीत म्हणणे तिच्या नशिबी येते.

कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूँ ही
उठेगी मेरी तरफ़ प्यार की नज़र यूँ ही
मैं जानता हूँ , के तू ग़ैर है, मगर यूँ ही
कभी कभी मेरे दिल में...
हे गीत म्हणणारा तो आता मात्र हळवा राहीलेला नाही.
If only हे छोटेसेच दोन शब्द … आयुष्य बदलवून टाकतात …

अभिमान , सौदागर आणि कभी कभी चा नायक …. नायिकेच्या तुलनेत मूल्यांत थोडासा हिणकस असलेला रोल आहे हा. पण अमिताभने जी उंची दाखवली आहे ती पारंपरिक नायकाला जमणे कठीण.

केवळ पंच्याहत्तर वर्षे झाली म्ह्णून अमृत महोत्सव करणारे अनेक आहेत, अमृतासारखी अमूल्य कारकीर्द घडवणारा एखादाच.
श्री. अमिताभ बच्चन यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment