गळा मोती एकावळी काळी वो माय...!
काल नवरात्री मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, "रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय". आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं. जणू काही टाईम मशीनमध्ये बसून टाईम ट्राव्हल करावी तसं मन जुन्या जगात निघून जातं.
एखादी सभ्य शांत, मराठी मध्यमवर्गीय वस्ती असावी, रेडीयो वाजण्याचे दिवस असावेत, संध्याकाळची वेळ असावी घरात पिवळे बल्ब लावलेले असावेत आणि हे गाणे कानी पडावे. या गाण्याची चालही तशीच, सभ्य आणि शूचिर्भूत. हे गाणं जुन्या प्रेमळ शिक्षकाच्या घरातच जणू काही शोभावे. आता ही विशेषणे गाण्याच्या चालीला लागत नाहीत हे मला ठावूक आहे. पण तरीही हे गाणं ऐकताना असंच वाटतं. या अविस्मरणीय गाण्याविषयी आणखी काही वेगळं वाटत राहतं. ज्यांनी ही रचना केली ते विष्णूदास नामा आणि आपले नामदेव महाराज एकच का हे मला माहित नाही. मात्र ही रचना मला शंकराचार्यांच्या केवलाद्वैताची आठवण करून देते.
केवलाद्वैताची आठवण आली की संस्कृतचे वेदान्ताचे वर्ग आठवतात. वेदान्ताची परीक्षा दिली नाही. कारण तेवढे धाडस नव्हते. पण आम्हाला वेदान्त शिकवणार्या प्राध्यापिका डॉ. शकुंतला गावडे यांच्या वर्गात जाऊन बसत असे. तेथे ब्रह्म, माया, अध्यास, साधन चातुष्ट्य, केवलाद्वैत, मध्वाचार्य, निंबार्क, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, विशिष्टाद्वैत सत्य, मिथ्या, विवर्तवाद, सत्कार्यवाद, सांख्य, योग, बौद्धमत यांच्याबद्दल ऐकले. या विषयात रस होताच. पण सुदैवाने माझ्या असंख्य शंकांना शांतपणे, समाधान होईपर्यंत उत्तरे देणार्या शकुंतला मॅडमसारख्या शिक्षिका मला लाभल्या.
त्या जुन्या काळच्या शिक्षकांप्रमाणे आपल्या विषयाची चौफेर आणि परिपूर्ण तयारी करून येत असत त्यामुळे त्या वेदान्त शिकवत असताना मला एखादी सस्पेन्स फिल्म पाहिल्याचा फिल येत असे. शंकराचार्यानी कुणाचे मत कसे खोडले त्याबद्दल आधी पूर्व पक्ष मांडल्यावर शंकराचार्य त्याचे खंडन कसे करतात याची उत्सुकता लागून राहात असे. मग एखादे कोडे उलगडावे त्याप्रमाणे त्याचा उत्तरपक्ष त्या सविस्तरपणे मांडत. त्यांचे शिकवण्याचे कौशल्य जबरदस्त होते. या वेदान्ताच्या वर्गाचा कंटाळा कधी आलाच नाही. "रात्र काळी..." गाणे ऐकल्यावर त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आठवल्या.
जगात दिसणार्या यच्चयावत गोष्टींमागे एकच एक तत्त्व आहे. आणि मिथ्या याचा अर्थ खोटे असा नसून अशाश्वत हा जास्त योग्य अर्थ अहे हे सांगणार्या केवलाद्वैताचे तत्त्वज्ञान यात सांगितले आहे असे वाटत राहते कारण, रात्र, घागर आणि यमुनाजळ या तिन्हींचा रंग काळा आहे. जी सखी पाणी भरायला गेली आहे तिचे बुंथ, बिलवर हे अलंकारही काळे आहेत. तिने नेसलेली वसनेही काळी आहेत.
आणि गाण्याच्या चरम सीमेला संत म्हणतात "कृष्णमूर्ती बहु काळी वो माय". या ओळीत हा अद्वैतप्रवास पूर्ण होतो अशी माझी समजूत आहे. हा काळीमा जणू ब्रह्मतत्त्व आहे. जे चराचराला व्यापून उरले आहे. जीव आणि जगतच नव्हे तर ज्याला आपण सगुण ईश्वर म्हणतो त्यालादेखील त्याच तत्त्वाने व्यापले आहे असेच या अभंगाच्या रचयित्याला म्हणायचे असावे.
साजणी एकलीच पाण्याला जाते आहे अशावेळी तिजसोबत सावळी मूर्ती पाठवा असे संत येथे म्हणतात. म्हणजेच जगात वावरत असताना ईश्वराचे स्मरण असावे, एकलेपणाने वावरू नये. येथे द्वैताचा आधार घेतलेला दिसतो. याचे कारण मानवी मर्यादा हे असावे. प्रत्येकाला सुरुवातीला अद्वैत झेपेलच असे नाही. मात्र हे सांगत असतानाच तात्त्विक दृष्ट्या भेद नाहीच. ज्याला मी माझी स्वामिनी मानतो ती देखील म्हणजेच भगवान कृष्णही काळाच आहे असे संत म्हणतात आणि अद्वैत सूचित करतात असे मला नम्रपणे वाटते.
अतुल ठाकुर
शरद in जनातलं, मनातलं
4 Oct 2010 - 7:19 am
आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका. विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे
रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !
एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !
बुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडॆ
.
प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण ( पाणी भरण्याकरिता अनावष्यक पण शृंगाराला आवष्यक असे अलंकार ) बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले,"मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली." मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको ? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !" च्या.
आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या "कृष्णा"ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंत नाही. तो साफ़ सांगतो " माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे. पटत नाही ? पंढरपूरचा विठ्ठल पहा !"
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?
अवांतर १. : विष्णुदास नामा म्हणजे म्हणजे आपले नेहमीचे, विठ्ठलाला खीर पाजणारे, जानेश्वरांचे सांगाती, नामदेव महाराज नव्हेत. हे बरेच नंतरच्रे. पण गाथेत याचे अभंग पहिल्या नामदेवांच्या अभंगातच मिसळून टाकले आहेत. "कॉपी राईट" कायदा नव्हता ना.
Log in or register to post comments
+३ छानच!
4 Oct 2010 -
शरदराव ,
4 Oct 2010 - 10:28 am | रामदास
बरीच वर्षे ही गवळण जाणकाराकडून समजून घ्यावी या प्रयत्नात होतो.
ती इच्छा फलद्रुप झाली.
सुंदर रसग्रहण .भाटकर बुवांनी लावलेली या गवळणीला सुंदर चाल दिली होती.
एकली पाणीया नच जाय साजणी ह्या ओळीला फार सुरेख वळण दिले होते.
आणखी लिहा .तुमचे विवेचन आनंददायक अनुभव आहे.
रात्र काळी.. घागर काळी
मला हे गाणे खूप आवडते. एकदा ऐकून कधीच समाधान होत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकलेच जाते.
नंदनने एकदा हे गाणे काहीतरी संदर्भाने माझ्या खरडवहीत लिंकवले होते. तेव्हाही "बुंथ" म्हणजे काय, किंवा गाण्याचा एकंदर अर्थ काय हे लक्षात येत नव्हते. कधीतरी निखिलने तुमच्या उपक्रमावरील लेखाची लिंक दिली होती. तो लेख इथेही प्रकाशित केल्याबद्दल तुमचे, आणि हे इतके सुंदर गाणे मी ज्यांच्यामुळे ऐकले आणि अर्थ समजून घेतला त्या नंदन आणि निखिलचेही आभार.
No comments:
Post a Comment