Tuesday, July 28, 2020

सुधीर फडके। कौशल इनामदार

साल २००१. स्थळ वांद्र्याच्या एका रेस्टराँचा मॅझनाइन मजला. दोन टेबल. एका टेबलावर एक पंजाबी कुटुंब – दोन मुलं, आई, वडील आणि आजी-आजोबा. शेजारच्या टेबलावर विविध वयातले साधारण दहा-बारा लोक.  या पंजाबी कुटुंबाला आपल्या शेजारच्या टेबलावर एक ऐतिहासिक बैठक सुरू आहे याची सुतराम कल्पना नाही.

मला मात्र हा इतिहास उलगडतांना दिसत होता. कारण त्या दहा-बारा लोकांमधला वयाने सगळ्यात लहान सदस्य मी होतो. निमित्त होतं मराठी भावसंगीतातले एक मोठे संगीतकार पं. यशवंत देव यांच्या पंच्याहात्तरीचं. देवकाकांनी त्यांच्या पंच्याहात्तराव्या वाढदिवसानिमित्त मराठीतल्या त्यांच्या आवडत्या संगीतकार आणि संगीत संयोजकांना या हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं होतं. यात सर्वश्री सुधीर फडके, दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, कमलाकर भागवत, अशोक पत्की, श्रीधर फडके, नंदू होनप, विलास जोगळेकर, आप्पा वढावकर, मिलिंद जोशी होते. सोबत देवकाकांचा पुतण्या आणि उत्कृष्ट गिटारवादक ज्ञानेश देव होता, सौ. करुणा देव होत्या, आणि मिलिंदची बायको, गायिका मनीषाही होती. जणू मराठी संगीताची आकाशगंगाच जमिनीवर अवतरली होती! देवकाकांनी आपल्याला आवडत्या संगीतकारांपैकी एकाचा दर्जा देणं यात मला पद्मश्री मिळाल्याचा आनंद तर होत होताच, पण मराठी संगीतातले माझे आदर्श माझ्या समोर बसले होते याचा जास्त आनंद होता.

ती संध्याकाळ भारलेली होती इतकंच मला आता आठवतंय. त्या भारलेल्या वातावरणाचा स्पर्शही न होता शेजारचं पंजाबी कुटुंब घरी निघून गेलं पण आम्ही सगळे हॉटेल बंद होईपर्यंत तिथेच गप्पा मारत बसलो. यशवंत देवांनी तिथे जमलेल्या प्रत्येक संगीतकारावर एक चार ओळींची कविता लिहिली होती. बुजुर्ग संगीतकारांमध्ये संगीताबद्दल गप्पा रंगल्या, संगीताच्या सोनेरी दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मी डोळे विस्फारून या दिग्गजांकडे पाहत होतो आणि कान टवकारून त्यांचा प्रत्येक शब्द साठवत होतो.

शेवटी निरोपाचा क्षण आला. अगदी जाता जाता श्रीधर फडकेंनी मला एका कोपऱ्यात नेऊन विचारलं –

“तू कसा आला आहेस? दादरलाच जाणार आहेस ना?”

“गाडी आहे. हो. दादरलाच चाललोय.”

“जरा बाबूजींना सोडशील का घरी?” माझा विश्वासच बसे ना. खुद्द सुधीर फडकेंना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा बहुमान मला मिळत होता. मी लगेच होकारार्थी मान डोलावली.

श्रीधरजी पुढे म्हणाले – “आणि महत्त्वाची गोष्ट – त्यांचा जरा तोल जातो तर वर घरापर्यंत सोड. त्यांचा स्वभाव स्वाभिमानी आहे त्यामुळे ते नको म्हणतील पण काहीही कर आणि घराच्या आतपर्यंत सोडूनच ये.”

श्रीधरजींनी बाबूजींना सांगितलं की मी त्यांना सोडेन. आम्ही गाडीत बसलो. वांद्रा ते दादर बाबूजींनी फार आपुलकीने माझी चौकशी केली. तो वेळ कसा गेला हेच मला कळलं नाही. शिवाजी पार्कजवळ ‘शंकर निवास’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो तसे ते म्हणाले –

“तुम्ही मला इथेच सोडा. मी जाईन वरती.” त्यांच्या बोलण्यात करारीपणा होता. पण मला तर श्रीधरजींची आज्ञा होती की वरपर्यंत सोडायला जा!

“मी वर येतो…” असं मी म्हणेस तोवर बाबूजींनी – “त्याची गरज नाही. मी एकटा जाईन.” असं ठामपणे म्हटलं. आता आली का पंचाईत! तेवढ्यात मला एक युक्ती सुचली.

मी म्हटलं – “बाबूजी, मला पाणी हवंय.”

बाबूजी क्षणभर थबकले आणि लगेचच म्हणाले – “हुशार आहात – मला ठाऊक आहे की तुम्हाला श्रीधरने मला वरपर्यंत सोडायला सांगितलं आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे की मी पाण्याला नाही म्हणणार नाही. तेव्हा चला आता वर. पण मला जिने चढायला वेळ लागतो आता वयामुळे. तुम्हाला चालेल ना?”

‘शंकर निवास’चा तो दोन मजली जिन्याचा प्रवास मी आयुष्यात विसरणार नाही. एका भारलेल्या संध्येची रात्र ही तितकीच भारलेली असणार आहे हे मला कळून चुकलं. आम्हाला २ मजले चढायला २० मिनिटं लागली. दर चार-पाच पायऱ्यांनंतर बाबूजी एक छोटी विश्रांती घेत आणि मग पुढे चालत. त्यांचा स्वभाव गप्पिष्ट असणार हे उघडच आहे कारण या २० मिनिटात त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतल्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. त्यावेळी होणारं ध्वनिमुद्रण, श्यामराव कांबळेंसारखे संगीत संयोजक, आशाबाईंकडून गाऊन घेण्याचा त्यांचा अनुभव, कसं हिंदीतली त्यांची बहुतांश गाणी लताबाईंनी गायली आहेत, बालगंधर्वांबद्दल त्यांची श्रद्धा, आणि त्यांची निर्मिती असलेल्या ‘विठ्ठल रखुमाई’ या चित्रपटात बालगंधर्वांनी केलेलं काम अशा अनेक विषयांवर ते बोललेलं मला अंधुकसं आठवतंय पण नेमकं काय बोलणं झालं याची माझी स्मृती फारच अस्प्ष्ट आहे, इतका मी त्या घटनेने संमोहित झालो होतो. प्रत्येक मजल्यावर बाबूजींच्या कारकीर्दीतला एक जुना कृष्णधवल फोटो लावला होता असं मला अस्पष्ट आठवतंय. त्या वीस मिनिटात बाबूजींनी कृष्णधवल काळात एक सैरसपाटा करून आणला.

आम्ही वर पोहोचलो. ललिताताई (श्रीधरजींच्या आई) जाग्याच होत्या. बाबूजींनी माझी ओळख करून दिली आणि म्हणाले – “यांना पाणी द्या. त्यासाठीच हे वर आलेत!”

हा दोन मजल्यांचा प्रवास माझ्यासाठी बरंच काही देऊन जाणारा प्रवास ठरला. आपल्या आवडत्या संगीतकाराबरोबर असा वेळ घालवता येणं हे एक प्रकारचं वरदानच आहे असं मला वाटतं.

सुधीर फडकेंच्या संपूर्ण कारकीर्दीचा वेध घ्यायला एक लेख अपुराच पडेल पण त्यांच्या संगीताचं आकर्षण माझ्यासारख्या नंतरच्या पिढीतल्या संगीतकाराला का वाटलं हे सांगण्याकरता केवळ एका गाण्याचाही दाखलाही पुरेसा आहे.

सुधीर फडकेंच्या संगीताची मोहिनी माझ्यावर पडण्याचं एक प्रमुख कारण असं असावं की त्यांना चित्रपट हे माध्यम किती बारकाईने कळलं होतं. लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, चंद्र होता साक्षीला, आम्ही जातो आमच्या गावा, अशा अनेक चित्रपटातली त्यांची गाणी ही गाणी म्हणून सुंदर आहेतच पण चित्रपटात चपखल बसतात. कमीतकमी वाद्यांतसुद्धा जास्तीत जास्त नाट्य केवळ चालीद्वारे उभं करण्याची अवघड किमया ते लीलया करायचे.

चित्रपट संगीत नसतानाही केवळ संगीतातून दृश्यात्मकता निर्माण केली आहे असं ‘गीतरामायण’ हा तर मराठी संगीतसृष्टीतला एक चमत्कार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

गीतरामायण ही एक अद्भुत कलाकृती आहे ती अनेक कारणांसाठी. एक कवी, एक संगीतकार, एक कथा आणि ५६ गाणी. मला या कलाकृतीचं सर्वात मोठं बलस्थान हे वाटतं की विषय ठरला असून, डेडलाइनवर काम करून देखील संपूर्ण कलाकृती तिची सहजता गमावत नाही. सहजता असावी लागते. ती निर्माण करता येत नाही. आणि तरीही या दोन थोर कलाकारांनी ती निर्माण केली आहे. ही गीतरामायणाची किमया आहे.

मला स्वतःला गीतरामायणाची ‘अनुभव’ निर्माण करण्याची क्षमता अचाट वाटते. चित्रपटसंगीताचं उत्तम ज्ञान दोन्ही कलाकारांना असल्यामुळे गीतरामायणाला एक ‘सिनेमॅटिक क्वॉलिटी’ आहे. आपण गीत ऐकत असतांना आपल्यापुढे चित्र तर निर्माण होतंच, पण आपणही त्या काळाचा, वातावरणाचाच एक भाग आहोत असं वाटू लागतं. सुधीर फडके लहानलहान गोष्टींचा उपयोग करून अचूक वातावरणनिर्मिती करतात.

उदा.‘राम जन्मला’ हे गीत एक घोषणा आहे, हे सप्तकाच्या वरच्या सूरापासून सुरू होतं यवरूनच स्पष्ट होतं. या गीताची लय उत्सवाचं वातावरण निर्माण करते. त्याउलट ‘पराधीन आहे जगती’ या गीताची सुरुवात सप्तकाच्या खालच्या सुरापासून होते. गीताची लयही अशी आहे की आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी पुरेसा वेळ देते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे – या एका कलाकृतीतच सर्व नवरसांचा अंतर्भाव आहे. एकीकडे ‘माता न तू वैरिणी’सारखं रौद्ररसाचं गीत आहे आणि दुसरीकडे ‘तात गेले, माय गेली’मध्ये करूणरसाचं दर्शन घडतं तर ‘सूड घे त्याचा लंकापती’मध्ये बीभत्स रसाची झाक दिसते.

आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे गीतरामायण ही कलाकृती रेडियो या माध्यमासाठी तयार केली होती. मी वर म्हटल्याप्रमाणे बाबूजींची चित्रपटसंगीतावरची पकड इतकी जबरदस्त होती की त्यांना गीतातलं नाट्य उत्तम समजायचं. फक्त गोड सुरावट म्हणजे गाणं नाही हे सत्य त्यांना पुरेपूर उमगलं होतं. गाणं हा एक संपूर्ण अनुभव म्हणून बाबूजी आपल्यासमोर सादर करायचे. परिणामी नुसतं गाणं ऐकूनही त्याची चित्रफीत रसिकांच्या मनात समांतर चालायची!

बाबूजींचा संगीतकार-गायक म्हणून विचार केला तर कळेल की त्यांना चित्रपट आणि रेडियो या दोन्ही माध्यमांची समज किती सखोल आणि शहाणी होती. गीत रामायण रेडियोकरिता केलं होतं. तिथे फक्त श्राव्य माध्यमातून चित्र उभं करायचं असतं. त्यामुळे गातांना जरा भावनातिरेक तिथे गाण्याची परिणामकारकता वाढवतो. पण चित्रपटात मात्र दृश्य हे आपल्या इतर संवेदनांवर हावी होतं. तिथे गाण्यात भावनातिरेक टाळायला हवा आणि या सात्क्षात्काराची प्रचिती तुम्हाला बाबूजींच्या गाण्यात येते.

वर सांगितल्याप्रमाणे संगीतकार म्हणून त्यांना चित्रपट हे माध्यम किती अवगत होतं हे सांगण्याकरिता केवळ एकाच गाण्याचा दाखला पुरेसा आहे.

मुंबईचा जावई मधली सगळीच गाणी एकापेक्षा एक आहेत. पण माझ्या मनातला एक कोपरा मी ओनरशिप बेसिसवर ‘का रे दुरावा, का रे अबोला?’ या गाण्यासाठी दिला आहे! या गाण्याबद्दल सारं काहीच जमून आलंय. रजिता ठाकूर आणि अरूण सरनाईक यांचा अभिनय, गदिमांचे शब्द, सुधीर फडकेंचं संगीत, आणि आशा भोसलेंचा आवाज! मला नेहमी वाटतं की चांदण्यांचा म्हणून काही आवाज असेल तर तो आशा भोसलेंचा आवाज असेल. म्हणूनच ‘केव्हांतरी पहाटे…’ मध्ये ‘उरले उरांत काही, आवाज चांदण्याचे’ हे आशाबाईंनी गावं हा मला एक दैवी योग वाटतो! आणि याच आवाजामध्ये ‘हात चांदण्याचा घेऊनी उशाला’ असे शब्द येतात तेव्हां आपल्या अंगावर कुणी चांदणं शिंपडल्याचा भास होतो!

‘का रे दुरावा?’ या गाण्यात अनेक गोष्टी मला वेळोवेळी जाणवत राहतात आणि या गाण्याची गोडी माझ्यासाठी अवीट राहते. प्रथम मला ‘का रे दुरावा…’ या शब्दांमधला आणि चित्रपटातल्या दृश्यातला विरोधाभास जाणवतो. एका चाळीच्या आखुड खोलीत एक एकत्र कुटुंब! जागेचा अभाव… पडदे लावून खोलीची विभागणी केलेली… दोन जोडपी… एक नुकतंच लग्न झालेलं जोडपं – पण जागे अभावी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी झोपावं लागतंय. दुसरं जोडपं – जरा लग्नात स्थिरावलेलं… लग्नात स्थिरावलेल्या कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात येणारे काही मधुर अस्थिरतेचे क्षण – भांडण, चिडचिड, अबोला! आणि अबोल्यानंतर पुन्हा समेटाकडे वाटचाल! एकाच पलंगावर शेजारी शेजारी लवंडलेले नायक – नायिका… आणि तरीही हा ‘दुरावा’. या विरोधाभासामुळे गाण्यातलं नाट्यही अधिक रोमांचक होतं. गाण्यातही एक कथानक आहे, आणि गाणं हे कथानक पुढे नेतं, असंही आपल्याला दिसून येतं. दोन नायिकांपैकी एक नायिका हे गीत गात आहे, पण दुसऱ्या नायिकेलाही ते गाणं आपलंच मनोगत वाटतं – या दिग्दर्शकाने आणि पटकथाकाराने मांडलेल्या कल्पनेला हे गीत अचूक न्याय देतं!

चेतन दातार आम्हाला नाटक शिकवत असताना म्हणत असे – “लेखक न बोलता, पात्र बोललं पाहिजे!”

या गाण्यामध्ये गदिमांनी आणि सुधीर फडकेंनी नेमकं हेच साधलंय! ‘इथे संगीतकार दिसतो!’ अशा जागा गाण्यात न दिसता नायिकाच हे गाणं रचते आहे… किंबहुना हे गीत नसून एक सुरेल संवाद आहे असं आपल्याला वाटू लागतं. खरं तर आजच्या गाण्यांच्या तुलनेत या गाण्यात कोरियोग्राफर नाहीत, कॉस्च्युम चढवलेल्या (अथवा न चढवलेल्या!) नर्तिका नाहीत, चेहऱ्याच्या नावावर फक्त केस असलेले, नर्तक सदृश्य पैलवान नाहीत, भलं मोठं नेपथ्य नाही की लोकेशनचे वरचेवर बदल नाहीत! इतकंच काय तर चित्राच्या चौकटीत रंगाचा एक थेंबही नाही! फक्त प्रकाशाचा आणि सावल्यांचा रोमहर्षी खेळ आणि हृदयाचा ठाव घेणारं संगीत आणि काव्य.

“का रे दुरावा?” मधल्या “का रे?” या शब्दांना गंधारावर ठेऊन सुधीर फडकेंनी संवाद प्रश्नार्थक करावा अशी ती ओळ प्रश्नार्थक केली आहे, तर दुसऱ्या ओळीत (“अपराध माझा असा काय झाला?”) मध्ये त्यांनी “झाला”च्या “ला” या अक्षरावर “सारेग” अशी हरकत घेऊन वेगळ्या तऱ्हेने पुन्हा ती ओळ प्रश्नार्थक केली आहे. तसंच “अबोला” या शब्दावर त्यांनी कोमल ‘नी’ स्वराची ग्रेस नोट लावून त्या ओळीत आर्जव निर्माण केलं आहे.

तिसऱ्या कडव्यापर्यंत ज्या नायक – नायिकेमध्ये अबोला आहे त्यांच्यामधली परिस्थिती निवळलेली आहे आणि त्यामुळे तिसऱ्या कडव्याची चाल सुधीर फडकेंनी आधीच्या दोन कडव्यांपेक्षा वेगळी केली आहे. या कडव्यामध्ये नायकाचा राग निवळल्यामुळे नायिका निर्धास्त आहे आणि त्यामुळे तिसऱ्या कडव्याची सुरुवात वरच्या सुराने होते. “रात्र जागवावी असे आज वाटे, तृप्त झोप यावी पहाटे पहाटे” अशी तिच्या अंतर्मनातली इच्छा ती बोलून दाखवते! चित्रपट न पाहाताही, नुसतं गाणं, त्याचे शब्द आणि त्याचा वाद्यमेळ ऐकूनही आपल्याला चित्रपटातल्या प्रसंगाचा अचूक ठाव घेता येतो हे कसब बाबूजींच्या संगीतामध्ये होतं.

बाबूजींचं प्रत्येक गाणं हा अभ्यासाचा विषय आहे. एक लेख त्यासाठी अपुराच पडेल. आजही रात्री १२ वाजताच्या नीरव शांततेतला बाबूजींबरोबर केलेला तो दोन मजल्यांचा प्रवास मला आठवतो. परवाच श्रीधरजी भेटले असता मी त्यांना विचारलं – “तुमच्या शंकर निवासच्या घरात प्रत्येक मजल्यावर बाबूजींचे जुने कृष्णधवल फोटो लावले होते ना?”

ते म्हणाले “नाही, असे काही फोटो लावले नव्हते.” मला आश्चर्य वाटलं. अस्पष्ट का होईना मला बाबूजी, माडगुळकर आणि राजा परांजपे, बाबूजी आणि आशाबाई, बाबूजींचा ध्वनिमुद्रणाच्या वेळचे काही कृष्णधवल फोटो मला पाहिल्याचं आठवत होतं. मला अचानक साक्षात्कार झाला – जे बाबूजी गाण्यांतून करायचे तोच परिणाम त्यांनी त्या २० मिनिटांच्या गप्पांमध्येही साधला होता. माझ्या मनात त्यांनी तो काळ आणि त्या काळातल्या प्रतिमा उभ्या केल्या होत्या आणि मला वाटत राहिलं की मी फोटो पाहत होतो!

‘आकाशी झेप घे रे पाखरा’ सारखं एखादं बाबूजींच्या सुरांत येतं तेव्हा वाटतं की सामान्य संगीतकार गाणं ‘संगीतबद्ध’ करतात, पण बाबूजींसारखा किमयागार गाण्यातल्या शब्दांना सुरांचे पंख देतो आणि आकाशाची वाट मोकळी करून देतो.

कौशल इनामदार

Sunday, July 26, 2020

बोमन इराणी

एका शून्यातून तयार झालेला हिरो - बोमन इराणी!..

मित्रांनो,

बोमन इराणी तुम्हाला आवडतो का?

मुन्नाभाई एम बी बी एस मधला डॉ. रस्तोगी,

थ्री इडियटस मधला इंजिनीअरींग कॉलेजचा प्रिंसिपल, प्रो. सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस,

आणि अशाच अनेक विविधरंगी भुमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. 
  
पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का?

बोमनचा जन्म मुंबईतल्या एका पारशी घरात झाला, 

बोमन जन्मण्याच्या सहा महिने आधीच बोमनच्या वडीलांचे निधन झाले,

बोमनला तीन बहिणी होत्या, दोन मावश्या, आणि एक आत्या होती, 

सतत सर्व स्त्रियांच्या सहवासात राहील्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भित्रा झाला,

त्याला डिस्लेक्सिया नावाचा रोग होता, शाळेत, अभ्यासात बोमन अतिशय मंद होता,

बोलताना तो तोतरे बोलायचा, त्यामुळे त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचे,

न्युनगंडामुळे बोमन इराणी स्वतःला अपयशी मानु लागला होता, त्याने स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्ने पाहिली नाहीत, 

त्याचे मित्र डॉक्टर, इंजिनीअर आणि सी.ए. झाले, मात्र बोमन कधीच काही मोठे मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचा नाही. 

बोमनने स्वतःसाठी वेटरचा जॉब निवडला,

बोमनची आई कुटूंबाची उपजीविका चालवण्यासाठी फरसाण, फाफडा वगैरे तयार करुन पदार्थ विकायची, 

बोमनचे ग्रॅंट रोडवर फरसाण विक्री करायचे आठ बाय आठ फुटाचे एक छोटेशे टपरीवजा दुकान होते,

वयाच्या बत्तीस तेहतीस वर्षांपर्यंत बोमन इराणी त्या दुकानातुन जेमतेम उत्पन्न कमवायचा,

ग्रॅंट रोड हा मुंबईचा एक रेड लाईट एरीया आहे, सगळी रफ पब्लिक दुकानात यायची,

ह्या सगळ्या परिस्थितीची बोमनला चीड आली,

बोमनने साईड बिजनेस म्हणुन फोटोग्राफी सुरु केली,

१९९0-९२ तो काळ असेल,

बोमन क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे छान छान फोटो काढायचा,

वीसवीस रुपयांना ते फोटो त्या मुलांच्या आईवडीलांना विकायचा,

अशा प्रकारे काही रुपये त्याने जमा केले,

लग्नानंतर सात वर्षांनी आपल्या बायको मुलांना घेऊन उटी फिरायला गेला,

जमलेली बचत फार मोठी नव्हती, म्हणुन एक बजेटमधले हॉटेल त्याने बुक केले,

पण ते हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाचे निघाले,

एखाद्या भुतबंगल्याप्रमाणे असलेल्या त्या हॉटेलात अत्यंत भीतीदायक वातावरण होते,

हॉटेलच्या खोलीत फक्त एकच झिरोचा बल्ब होता,

बोमन म्हणतो, तो झिरो लाईट पाहुन मला स्वतःचीच, माझ्या गरीबीचीच जबरद्स्त चीड आली,

“आयुष्यात पुन्हा कधी अशी ‘झिरो लाईट मोमोंट’ येऊ नये म्हणुन मी संपुर्ण जीवनभर मी झोकुन देऊन मेहनत करेन असा मी चंग बांधला,”

पुढे ह्या झिरो लाईटने बोमनचे आयुष्यच बदलावुन टाकले, 

बोमन इराणीला मुंबईत होणाऱ्या बॉक्सिंग ऑलंपिकबद्द्ल माहिती मिळाली,

तो ऑलिंपीक च्या ऑफिसमध्ये गेला, व त्याने बॉक्सिंगचे फोटो काढण्याची परवानगी मागितली,

पण तिथल्या डायरेक्टरने ती धुडकावुन लावली,

बोमनने अनेक अर्ज विनंत्या केल्या, आर्जवे केली,

मी फ्रीमध्ये काम करीन असे सांगितले, 

तेव्हा तो खडुस डायरेक्टर थोडासा नरमला, 

आणि सध्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा चालु आहेत, त्याचे फोटो काढुन आण, 

तुझ्यातली गुणवत्ता बघुन तुला काम देऊ असे सांगितले,

बोमन कंबर कसुन कामाला लागला,

पुढचे सहा महिने बोमनने प्रचंड मेहनत घेतली,

कसेही करुन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचेच होते,

ह्या एकाच विचाराने त्याला पुर्ण झपाटले होते,

उठता-बसता, खाता पिता, त्याला फक्त आणि फक्त बॉक्सिंगचे फोटोच दिसायचे,

माझं काम आणखीण उत्कृष्ट कसे होईल, हा एकच विचार त्याच्या डोक्यात असायचा,

तो कॅमेरा गळ्यात घेऊन आठ आठ - दहा दहा तास बॉक्सिंगच्या मॅचेस च्या ठिकाणी तळ ठोकुन बसायचा,

त्यादरम्यान त्याने अप्रतिम फोटोग्राफ्स शुट केले,

सगळे फोटोग्राफर फक्त व्यवसाय आणि कामाचा भाग म्हणुन फोटो काढायचे,
बोमन मात्र पॅशनेट होता, 

शेवटी जागतिक बॉक्सिंग ऑलंपिकचा ऑफिशीयल फोटोग्राफर म्हणुन बोमनचीच निवड झाली,

अमेरीकेतल्या मॅनेजरची बोमनने अपॉईंटमेंट घेतली,

त्याने बोमनला तीन फोटो काढायची ऑर्डर दिली,

 एक अमेरीकन बॉक्सर समोरच्या मुष्ठियोद्ध्याला एक जोरदार पंच मारेल तेव्हाचा,

एक समोरचा बॉक्सर जमिनीवर पडलेला असताना, अमेरीकन बॉक्सर उन्मादाने उड्या मारतानाचा,

आणि तिसरा,

सामना जिंकल्यानंतर अमेरीकन बॉक्सरचा हात उंचवताना,

ह्या प्रत्येक फोटोबद्द्ल बोमनला तीनशे डॉलर्स मिळणार होते,

बोमन जोमाने कामाला लागला,

इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागचे सहा आठ महिने त्याने प्रचंड मेहनत केली होती,

आता यश अगदी दृष्टीपथात होते,

त्याने रिंगच्या बाजुचा एक योग्य कोपरा निवडला,

सामना सुरु झाला, पण बोमनचे नशीब त्याच्यावर जणु रुसले होते, 

बोमनचे ग्रह काही ठिक नव्हते की काय माहित पण त्या दिवशी अमेरीकन बॉक्सर सपाटुन मार खात होता,

तीनपैकी एकाही फोटोची शक्यता दिसत नव्हती,

बोमनचे स्वप्न जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होते,

त्याची मेहनत पाण्यात चाललेली त्याला दिसत होती,

हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाताना जे तीव्र दुःख होते, अगदी तसेच दुःख त्याच्या मनात साठुन आले होते,

त्याच्या डोळ्यात पाणी तरळले, उर भरुन आला,

एकेक ठोसा अमेरीकन बॉक्सर खात होता, पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे दुःख बोमनला होत होते,

बोमनने स्वतःला समजावले,

“मी आणखी मेहनत करीन, एके दिवशी नियतीला माझी नक्की दया येईल,”

आणि त्याची आर्त प्रार्थना ब्रम्हांडापर्यंत जाऊन पोहोचली,

चमत्कार घडावा असे काही रिंगमध्ये घडले,

पंचेचाळीस मिनीटे मार खाणारा अमेरीकन बॉक्सर त्वेषाने उठला,

त्याने समोरच्या बलाढ्य मुष्टियोद्धयाला एक जोरदार तडाखेबाज पंच मारला, 

बोमनने तो क्षण अचुक टिपला, 

समोरचा बॉक्सर खाली पडला, बोमनने दुसरा क्लिक केला,

आणि अमेरीकन बॉक्सर विजेता झाला, बोमनने तिसरा क्लिक केला,

त्या बॉक्सरला झाला नसेल तितका आनंद बोमनला झाला,

त्याने तात्काळ धावतपळत स्कुटरवरुन आधी फोटो डेव्हलपिंगची लॅब गाठली, मग टेलिफोन ऑफीसला पोहोचला,

तिथुन त्याने अमेरीकेला फोटोज स्कॅन करुन पाठवले.

पण रात्रीचे दोन वाजले तरी फोटो अमेरीकेला पोहोचले नाहीत, असा फोन आला,
दुसऱ्या दिवशी बोमन पुन्हा टेलेफोन ऑफीसला पोहोचला,

ती मशीन मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी पॅक करुन नेण्यात येणार आहे, असे त्याला सांगण्यात आले,

बोमन खवळला, त्याने तिथे प्रचंड आरडाओरडा केला,

सरकारी यंत्रणेच्या अशा भोंगळ कारभारामुळे भारताचे नाक कापले जाईल, असे त्याने ऑफीसरला ठासुन सांगितले,

त्याच्या ह्या ह्र्दापासुन केलेल्या युक्तिवादाचा परिणाम झाला,

आणि पॅक केलेली मशीन उघडण्यात आली,

फोटो अमेरीकेला पाठवले गेले,

बोमनला नऊशे डॉलर्सची रॉयल्टी मिळाली,

त्याला लगेच पुढची टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी चेन्नईला पाठवण्यात आले,
बोमन स्वखुशीने गेला,

त्याने आपल्या लाघवी, विनोदी, निरागस स्वभावाने जिथे जाईल तिथे मित्र जोडले, लोकांना जिंकुन घेतले,

त्याचा फोटो स्टुडीओ मुंबईत एक टॉपचा फोटो स्टुडीओ म्हणुन ओळखला जाऊ लागला,

एके दिवशी फोटोसेशन करण्यासाठी बोमनच्या स्टुडीओत सुप्रसिद्ध कोरीओग्राफर शामक दावर आला,

शामकने बोमनला नाटकात काम करशील का असे विचारले,

व त्याची भेट प्रसिद्ध नाटककार अल्काझी पद्मसी यांच्यासोबत करुन दिली,
बोमन साशंक होता,

अल्काझीनी तर बोमनला पाहिल्याबरोबर नाकारले,

पण शामक दावर आपल्या मागणीवर अडुन राहीला,

अल्काझींना त्याने बोमनला घ्या, नाहीतर मी नाटक सोडुन देईन अशी धमकीच दिली,

बोमनला आपल्या पहिल्या नाटकात एका वेश्येच्या दलालाचा एक छोटासा रोल मिळाला,

बोमनने त्याचेही सोने केले,

पुढची पाच सात वर्ष बोमनने नाटकाचे मैदान गाजवले,

अनेक उत्तमोत्तम भुमिका केल्या,

एकदा त्याचे नाटक विधु विनोद चोप्राने पाहिले, आणि त्याला चित्रपटात काम करण्याविषयी विचारले,

बोमन त्यासाठी तयार नव्हता,

पण राजु हिराणी हा चोप्रांचा असिस्टंट बोमनच्या स्टुडीओत आला,

पंधरा मिनीटांसाठी ठरलेली ही भेट पुढचे आठ तास कशी चालली, हे दोघांनाही कळले नाही,

बोमनने स्वतःला राजुच्या हातात स्वाधीन केले,

आणि मुन्नाभाईमधले मामु नावाचे पात्र अवतरले,

ह्यावेळी बोमन पंचेचाळीस वर्षांचा होता,

त्यासाठी बोमनला त्यावर्षीचे बेस्ट कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले,

पुढे काही वर्षांनी थ्री ईडीयटस मध्ये बोमनने तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या व्हायरस उर्फ सहस्त्रबुद्धेची भुमिका केली 

त्यासाठी त्याने आपली लहानपणीची तोतरे बोलण्याची खास लकब वापरली, 

मित्रांनो,

एक मंदबुद्धी, तोतरा बोलणारा, दहा एक वर्ष वेटरची कामे करुन, वयाच्या तेहतीसाव्या वर्षी फरसाणची टपरी चालवणारा एक माणुस वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी चित्रपटात डेब्यु करतो काय,

आणि साठाव्या वर्षापर्यंत एंशी हुन अधिक चित्रपट काय करतो?  

सगळेच थक्क करुन टाकणारे आहे,

बोमन म्हणतो,

उटीच्या हॉटेलात आलेल्या झिरो लाईट मोमेंटमुळेच माझ्या ह्र्द्यात आग लागली, आणि त्यामुळेच मी इथवर पोहचु शकलो आहे,

मित्रांनो, 

*जेव्हा केव्हा आयुष्यात , व्यवसायात ,कुटुंबात  कसली संकटे येतील तेव्हा बोमन इराणीला आठवा....

*त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना आठवा, त्याच्या झिरो लाईट फिलॉसॉफीला आठवा...

*संकटावर मात करण्याची कितीतरी पट जास्त उर्जा तुम्हाला मिळेल.....

*किती ही संकटे आली तरी घाबरु नका, धैर्याने तोंड द्या....

आभार आणि शुभेच्छा!

Friday, July 24, 2020

लोकमान्यांची तीतीक्षा । डॉ आनंद नाडकर्णी

*लोकमान्यांची ‘तितिक्षा’*

इंग्रजीमधल्या Resilience ह्या शब्दासारखा पण मूळ इंग्लीश शब्दापेक्षा सखोल अर्थ असलेला संस्कृत शब्द आहे ‘तितिक्षा’ ! ज्ञानेश्वरांनी वापरलेला मराठी शब्द आहे 'सहनसिद्धी' . . . सहनशक्ती नव्हे ! सहनशक्तीमध्ये एक प्रकारचा Passive पणा आहे. ‘सिद्धी’ शिकावी लागते. त्यासाठी साधकाची वृत्ती लागते. परिश्रमांची तयारी लागते. विवेकनिष्ठ मानसोपचाराचे जनक डॉ. अल्बर्ट एलीस शब्द वापरतात ‘FRUSTRATION TOLERANCE’ . . . तणावाच्या प्रसंगामध्ये, ज्यांचा हा FT खंबीर ते वादळातून जाताना डगमगले तरी भरकटणार नाहीत. ह्या प्रवासामधल्या मानसिकतेचं एलीस ह्यांनी केलेले बारसे आहे, ‘I can stand it' . . . म्हणजेच अडचणींना सामोरे जातानाचा कणखरपणा.

लोकमान्यांच्या ‘तितिक्षें’चे एक प्रमुख साधन होते, भगवतगीता. त्यांचे जवळचे सहकारी दादासाहेब खापर्डे लिहितात, “भांबवण्यासारखा प्रसंग प्राप्त झाला की तात्काळ लोकमान्यांना कोणत्यातरी गीतावचनाची आठवण होत असे. आणि त्या वचनाच्या अर्थाला ते आपले मन असे करकचून बांधीत की त्यास (त्या मनाला) भांबावताच येऊ नये" दादासाहेबांचेही कौतुक वाटतं, आपल्या नेत्याचे किती बारकाईने निरीक्षण केलं होतं त्यांनी.

‘तितिक्षे’साठी लागणारे पहिले विचारसूत्र आहे, ‘ध्येयाबद्दलची पक्की बांधिलकी ! . . . टिळकांचा लोकसेवेचा आणि देशसेवेचा वसा त्यांच्या निरीक्षण, अनुभव, चिंतनातून आला होता. त्यात भर पडली असणार त्या काळातल्या ज्येष्ठांबरोबरच्या चर्चांची आणि आगरकरांबरोबरच्या दोस्तान्याची. ह्या दोघांची ओळख आणि मैत्री झाली १८७९ मध्ये. पुढे दोघेजण एकत्र तुरूंगात होते तेव्हा आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगवासातल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. व्यापक उद्दिष्टाचा स्वीकार आणि त्यातील ऊर्जा कायम ठेवणे किती कठीण. पण हे दोघे मित्र सतत ऊर्जेची देवाणघेवाण करत ध्येयनिष्ठा टिकवून ठेवत.

आगरकर लिहितात, 'मी (आगरकर) एम. ए. करिता व टिळक एल.एल.बी. करिता अभ्यास करण्यासाठी कॉलेजात राहिलो असता सरकारी नौकरी न पत्करिंता देशसेवेत आयुष्य घालवण्याचा ज्या दिवशी निश्चय केला त्या दिवसापासून आम्ही जे जे बोललो चाललो होतो त्याची पुन: पुन: आठवण होऊन अनेक वेळा पुनरावृत्ती होत असे.' हा उतारा साकल्याने एवढ्यासाठी दिला की तितिक्षेसाठी फक्त उद्दिष्ट सापडून चालत नाही. त्याचा जाणता आणि जागता जप सतत करावा लागतो. आणि समध्येयी मित्रांचा सहवासही महत्त्वाचा असतो.

ध्येयांचा खुंटा बळकट झाला की पुढचा गुणधर्म आहे ‘डोळस साहस' . . . हे साहसही स्वार्थी नाही. त्यामध्ये समाजाबद्दलची करुणा आहे. १८९६ साली मोठा दुष्काळ पडतो. दुष्काळ निवारणाचा कायदा म्हणजे ‘फॅमीन कोड' लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून टिळक लिहिलेला शब्द आणि वाणी इतकी कामी आणतात की सरकारवरही त्यामुळे प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य तो दबाव यावा.

पुढच्याच वर्षी येते प्लेगची साथ. भर पडते रँडसाहेबाच्या दहशतीची. पुण्याच्या प्रत्येक वस्तीत टिळक जागृती सभा घेतात. शरीरविक्रय करणाऱ्या वस्त्यांनाही ते वगळत नाहीत. 'टिळकांच्या सभेला वेश्या' अशा मथळ्याची बातमी येते तेव्हा ते म्हणतात, "का? . . . त्या स्त्रियासुद्धा माणूस आहेत ना ! . . . प्लेग पहाणार आहे का संसर्गापूर्वी ? . . ."

त्या काळामध्ये लोकमान्य स्वयंसेवकांना संघटीत करण्याचे प्रयत्न करतात. त्यांनाही विफलतेचे एक क्षण येतात. 'काँग्रेसचा एखादा कार्यक्रम ठरला वा एखाद्या नेत्याचे भाषण ठरले तर आमचे स्वयंसेवक लगेच पुढे येतात, कारण तिथे मिरवायला मिळते, मौज पहायला मिळते. प्लेगमध्ये काबाडकष्ट करून त्यांना काय मिळणार आहे.' अशा क्षणांना लोकमान्य कधी शरण जात नाहीत.

त्याच वर्षाच्या अखेरीला त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली पहिली शिक्षा होते. म्हणजे समाजकार्यासोबत राजकारणही सुरू असते. ६ सप्टेंबर १८९८ ला जेव्हा ते सुटतात तेव्हा त्यांच्या वजनात बऱ्यापैकी घट झालेली असते. कारण शिक्षा असते ती साधी नव्हे तर सक्तमजुरीची. असे असतानाही प्रत्येक तुरूंगवासाचा वापर ह्या गृहस्थांनी संशोधन, वाचन, लेखन ह्यासाठी केलेला दिसतो. सहनसिद्धीचा पुढचा गुणधर्म आहे, संकटाला सामोरे जातानाही जीवनाचे समग्रपण न विसरणे. जगण्यातल्या अनेक अंगांचा विचार करीत असताना त्या अंगांना एकमेकांशी जोडणे. टिळकांच्या लिखाणात कायदा, गणित, इतिहास, अर्थशास्त्र, तत्वज्ञान असे सारेच विषय हातात हात घालून येतात. धकाधकीच्या जगण्यातही ज्ञाननिष्ठा न सोडणे हा नक्कीच ‘सिद्धी’चा भाग. यामुळे जन्म घेतो दुर्दम्य आत्मविश्वास ज्याची मूळे शरीरमेंदुच्या पेशीपेशीमध्ये मुरून जातात.

सत्यभामाबाईंना लिहिलेल्या एका पत्रात लोकमान्य लिहितात, "आपण आणि दुर्दैव यांची टक्कर जुंपलेली आहे. त्यातून कोणीतरी एक हरणार व एक जिंकणार. अर्थात आपण हार न जाण्याचा निश्चय केला तर आपणच जिंकू"

' . . . उन्हाळ्यात मंडालेचा तुरुंग म्हणजे लोहारकामाची तापलेली जणू भट्टीच असे. त्यातच उन्हाळ्यातले वादळी वारे मातीचे थर अंगावर उभे करीत. हिवाळ्यात कमालीची आणि बोचणारी थंडी असे. लाकडी दरवाजे या थंडीपासून कुणाचेच संरक्षण करू शकत नसत. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि सूर्य तापलेला. पाण्यात भिजवलेला टॉवेल जर अंगाभोवती गुंडाळला तर काही मिनिटातच कोरडा होत असे. आमच्यापैकी एकही जण मोठ्या आजारातून गेल्याशिवाय राहिलेला नाही. अशा परिस्थितीत लोकमान्यांनी बौद्धिक लिखाणाकडे लक्ष दिलं, हे अपूर्वच ! . . .’

दिनांक १ ऑगस्ट १९४४ ला आझाद हिंद नभोवाणीवरून नेताजी सुभाषचंद्र बोसांनी लोकमान्यांना वाहिलेली ही आदरांजली. टिळक निवर्तल्यानंतर काही वर्षातच, देशद्रोहाच्याच आरोपाखाली सुभाषबाबू मंडालेमध्येच होते. एखाद्या मंदिराचे दर्शन घ्यावे तसे त्यांनी लोकमान्यांच्या त्या कोठडीचे दर्शन घेतले होते . . . एका जबरदस्त ‘तितिक्षा’ तज्ञाने केलेले दुसऱ्याचे गौरव - वर्णन . . . त्यातला गुणधर्म हा आहे की सहनसिद्ध व्यक्ती, त्या त्या वेळच्या कर्तव्यावर, कामावर जेव्हा लक्ष केंद्रित करते तेव्हा सभोवतालचे पर्यावरण, व्यावहारीक परिस्थिती, अडचणी ह्या साऱ्यांपासून स्वतःचे मन अलिप्त करू शकते. त्यासाठी लागतो निर्धार म्हणजे Determination ही भावना. असे झाले की प्रत्येक प्रसंगात मन स्थिर राहू लागते.

मंडालेला असताना लोकमान्यांनी एका बाजूला ‘गीतारहस्य’ ह्या ग्रंथाच्या लेखनाला हात घातला. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या शिक्षेच्या संदर्भातले अपील थेट इग्लंडमध्ये पोहोचले होते. ती कायदेशीर लढाई सुरू होतीच. त्या संदर्भातल्या १३ फेब्रुवारी १९०९ च्या पत्रामध्ये लोकमान्य लिहितात -'अंतिम सुनावणीची तारही थेट लंडनहून पाठवा. माझा तारेचा पत्ता अगदी थोडकाच आहे. 'टिळक, जेल, मंडाले' जेलच्या आधी सेंट्रल म्हणायची आवश्यकता नाही. कारण दुसरा तुरुंग येथे नाहीच. त्यामुळे तुमचा एक शब्द वाचेल. एका शब्दाला तीन रुपये पडतात. पत्ता फक्त तीन शब्दात लिहावा'.

तत्वज्ञानाच्या प्रदेशात विहरत असतानाही टिळक व्यवहाराला विसरत नाहीत. पुढे प्रत्यक्ष तारेच्या मजकुराचे ही ते तीन 'खर्डे' (Drafts) सांगतात. 'ॲडमिटेड, गव्हरमेंट नॉट अपोझिंग' हा पहिला. दुसरा आहे 'ॲडमिटेड इनस्पाईट ऑफ अपोझिशन’ आणि ‘डिसमिस्ड’ हा तिसरा. ब्रिटीश सरकारने टिळकांचे तारेचे पैसे कमीत कमी खर्च होतील असं पाहिलं.

‘तितिक्षे’च्या साधकाचे मन कधीच नाही का विव्हल होत? होते ना . . . मंडालेला असताना टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई गेल्या. सात जून १९१२ चा दिवस. टिळकांवर झालेला ‘आघात’ आणि झालेले ‘क्लेश’ त्यांनी पत्रात लिहिले आहेत . . . आघात आणि क्लेश हे त्यांनीच लिहिलेले शब्द . . . पण स्वयंशिस्त अशी जबरदस्त की त्यातूनच भावनिक नियमन येत असावे. टिळकांना दुःख झाले पण ते त्यात अडकले नाहीत. दुःख पचवणे हे सहनसिद्धीचेच लक्षण.

१९०३ साली टिळकांना पुत्रशोक झाला होता. त्यावेळची एक हकीगत त्यांचे लेखनिक आ. वि. कुळकर्णी ह्यांनी सांगितली आहे. टिळकांकडून अग्रलेखाचे टिपण लिहून घेण्यासाठी ते खोलीचे दार वाजवतात. तसे टिळक सवयीने 'विश्वनाथ' अशी हाक मारतात. क्षणात त्या पित्याचे हृदय विध्द होते पण ते उठून कडी काढतात. कुळकर्णी लिहितात, "दुःखाचा आलेला उमाळा त्यांनी ताबडतोब कसा गिळून टाकला हे त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होते." भावनिक नियमनाशिवाय तितिक्षा अशक्य !

टिळक म्हटले की आपल्याला त्यांची सुपारीची सवय आठवते. मंडालेहून परत आल्यावर एका मुलाखतीत त्यांना विचारले की मंडालेत सुपारीशिवाय कसे चालले? टिळक म्हणतात, “सुपारी म्हणजे काही ऑक्सीजन नव्हे की ज्यावाचून माणसाला जगणे अशक्य आहे.” कसोटीच्या काळात अनेक 'अभावांना' सामोरे जावे लागते. त्याकडे पहायचा दृष्टीकोन ठरवावा लागतो.

आपल्या असं लक्षात येतं, टिळकचरित्राचा अभ्यास करताना की ह्या माणसाने सहनसिद्धीसाठी कठोर साधना केली असणार. बालपणातले आणि तरुणपणातले टिळक चंचल आणि व्रात्यही दिसतात. कॉलेजमध्ये त्यांना ‘ब्लंट’ किंवा ‘डेवील’ अशी टोपण नावेही होती. म्हणजे मूळात काहीसा उतावळा स्वभाव असतानाही ते ‘साधक’ झाले. अहो किती आव्हाने पेलली असतील ह्या माणसाने आयुष्यात. मंडालेत असताना त्यांना मधुमेह हा सोबती होताच. सोबत हायड्रोसील, पचनविकार आणि हिरड्यांचा त्रास. पण ह्या साऱ्या विकारांसह ह्या माणसाने आपली साधना अखंड सुरू ठेवली. म्हणून बुलंद कणखरपणा अर्थात Resilience शिकावा तर लोकमान्यांपासून.

आपण मोठ्या गौरवाने टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अर्थात 'Father of Indian Unrest' असे म्हणतो. पण हा उल्लेख प्रथम केला व्हॅलेंटाईन चिरोल ह्या गृहस्थांनी. तोही संपूर्णपणे नकारात्मक पद्धतीने. ह्या चिरोल साहेबावर टिळकांनी केलेल्या, नुकसानीच्या खटल्याच्या संदर्भात टिळक इग्लंडमध्ये गेले. आणि तो खटला शेवटी हरले.

ह्या खटल्याच्या निकालानंतर टिळकांनी दा. वि. गोखल्यांना लिहिलेले एक पत्र आपल्या साऱ्यांना ज्ञात आहे. कोणत्याही आपत्तिकाळाला सामोरे जाताना आपली वृत्ती कशी हवी हे टिळक सांगताहेत. हा आहे तितिक्षेचा परमोच्च बिंदू . . . ज्ञानेश्वरांना त्यांचा ‘सहनसिद्ध’ लोकमान्यांमध्ये सापडला.“केसचा निकाल अनपेक्षित लागल्याने मी खचून गेलो असेन, ही समजूत पूर्णपणे निराधार आहे. माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळले, तरी निराश न होता माझ्या उद्दिष्टांसाठी मी त्या कोसळलेल्या आकाशाचा उपयोग करेन. असेल त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले पाहिजे. परिस्थितीला आपल्यावर सत्ता गाजवू देता कामा नये. आजवरच्या माझ्या कामाचे वैशिष्ट्य हेच आहे"

लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षामध्ये त्यांच्याकडून आलेला तितिक्षेचा वारसा, सखोल गिरवण्यासाठी खरं तर आपल्यासमोर एक 'नामी संधी' उभी येऊन ठाकली आहे.

- *डाॅ. आनंद नाडकर्णी*

कोल्हापुरी भाषा । डॉ रणधीर शिंदे

'वडाप' शब्दाची उत्पत्ती आज ह्या लेखामुळे समजली🙂 उत्तम आढावा घेतलाय.

***************************************
कोल्हापूरची बोलीभाषा आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण. या बोलीला रांगडेपणाचा आणि उधळेपणाचा खास बाज. विशिष्ट भू-प्रदेश, निसर्ग, सीमावर्ती प्रदेश, लोकजीवन आणि कोल्हापुरी लोक संवेदनस्वभाव यामुळे बोलण्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी विभागलेल्या आणि दुसऱ्या बाजूला कन्नड आणि कोकणी प्रदेशाच्या सीमांनी या भाषेला वेगळे रंगरूप प्राप्त झाले. व्याकरण व्यवस्था, शब्दसंग्रह अनेक भेदांमुळे ती स्वतंत्र वेगळी ठरत नाही. मात्र, इथल्या भौगोलिक व सामाजिक ठेवणीमुळे तिला वेगळे अस्तित्व मिळाले. दीर्घकाळ संस्थांनी राजवट आणि निसर्गपोषणावर भरलेल्या संपन्न प्रदेशाने या लोकजीवनाला वेगळे रंग प्राप्त करून दिले. जॉर्ज ग्रिअसर्नच्या १९०५च्या भारतीय भाषा सर्वेक्षणात कोल्हापुरी बोलीचा इंडो-आर्यन कुळातील भाषा म्हणून निर्देश आहे.

कोल्हापुरातील संस्थानी राजवटीचा लोकव्यवहारावर मोठा ठसा आहे. बौद्ध, कदंब, शिलाहार ते मुसलमान राजवटीशी या प्रदेशाचा संबंध आला. इनामदार, जहागीरदार, शेतकरी, कुणबी, अलुतेदार, बलुतेदार व डोंगराळ प्रदेशातील लोकसमूहांनी या प्रदेशाला आकारित केले. भू-प्रदेश, निसर्ग, लोकजीवन आहारसंस्कृती यांनी या भाषेला वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त करून दिली. भौगोलिक विविधतेमुळे भाषेने कमालीची विविधता धारण केली.

कोल्हापूरच्या भाषेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्त्रियांची भाषा. व्याकरणव्यवस्थेत लिंग वचनाबद्दलचा मोठा फरक स्त्रियांच्या भाषेत आहे. ‘येतो’, ‘जातो’, ‘करतो’, ‘आलो’ अशा पुरुषवाचक क्रियापदांत मुली व स्त्रिया बोलतात. एकाचवेळी भरड, रांगडी पुरुषवाचक बोलीरूपाच्या पुनरावृत्तीने त्यास सामाजिक, सांस्कृतिक वेगळेपण प्राप्त झाले. उच्चारणाच्या वेगळ्या धाटणीमुळे त्यास एक भावपरिणामकारकता प्राप्त झाली. मात्र, या ध्वनी उच्चारात माधुर्यभावाचे प्रसारण करणाऱ्या शब्दांची विपुल उपस्थिती असते. ‘काय मर्दिनी’ असा उच्चार केवळ या परिसरातच स्त्रियांच्या तोंडी ऐकायला मिळतो. तसेच ‘बलिवलंय’ (बोलावले आहे) अशा लोभस मृदस्वरव्यंजनाचीही साथ असते. सकृतदर्शनी स्त्रियांची उच्चाररूपे भरड, थेट वाटावीत अशी असतात. मात्र, या उच्चारणपरिणामात आत्मीय गोडवा असतो. ‘कवा आलासा’, ‘येतायसा’, ‘जातायसा’, ‘गेलासा’ अशा अकारान्त प्रत्ययाचा स्वाभाविक गोडवा या भाषेत टिकून आहे.

शेतीसंस्कृती व लोकजीवनाने काही वेगळे शब्द घडविले आहेत. भात, काजू व ऊस शेतीने अशा शब्दांची सुरुवात केली. डोंगराळ, अतिदुर्गम भागातील विरळ मानवी समूहानेही नव्या शब्दांची व उच्चारण लकबीची भर टाकली. ‘इरलं’, ‘टोकणं,’ ‘तरवा’, ‘बेजमी’, ‘हुरदं’, ‘झोमडं’ असे शब्द त्यामुळेच आढळतात. चंदगड, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी या प्रदेशातील लोकभाषेच्या व्याकरण, शब्दसंग्रह आणि सुरावटीत कमालीची विविधता दिसते. या भाषेत प्रेमवजा आज्ञाही असते. ‘यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय’, ‘यंदा द्यायचा दणका काढून’ अशी रूपेही दिसतात. नामाच्या विशिष्टतादर्शक सुलभ उच्चारणातून प्रेमभावाचे प्रसारण करण्याची लकब भाषेत आहे. उदा. ‘दसुदा’, ‘वसुदा’, ‘शामादा’, ‘अण्णादा’ ‘दा’ उत्तरप्रत्यय लावून शब्दांचे सुलभीकृत पॅटर्न्स तयार करणे हा एक या समूहबोलीचा विशेष आहे. उच्चारणातले दीर्घत्व काढून टाकून प्रसंगी मध्य स्वरव्यंजनाचा लय करून शब्द तयार करण्याची वृत्ती या भाषेत आहे. ‘शंक्रोबा’, ‘भैरोबा’ असे न म्हणता ‘भैरी’, पोह्यासाठी ‘फव्वं’, ‘मधघर’ अशी उच्चारणरूपे तीमध्ये आहेत.

कोल्हापुरी बोलण्यावर प्रचलित भाषिकांना अनेक धक्के बसतात. ‘शिस्तात’ हा शब्दवापरही याच प्रकारचा, तसेच नववधू-वरांचे कपडे खरेदीसाठी ‘मुलाचे कपडे काढायचे आहेत’, तर ‘रांडेच्या’ या शब्दाचा वापर इतका विपरीत व बहुअर्थप्रसवी केवळ कोल्हापुरात वापरला जात असावा. नकार, तिरस्कार, जवळीकता, निकटता व आत्मीय द्योतकतेचा अर्थ या शब्दांतून व्यक्त केला जातो. एवढेच नव्हे तर मुस्लिम मराठीत ‘रांडेकू’ असाही उच्चार होतो. व्याकरणिक विशेषात या भाषेत नपुसंकलिंगी भाषारूपांचा वापर होतो. ‘कुठं गेलं रं ते’, ‘हे आमचं’, ‘तुमचं’ इ. तसेच शब्दांचा अनेकवचनी वापरही विपरितपणे केला जातो. ‘चैन’चे चैनी, ‘भूक’चे भुका, असे.

‘कव्वा आलासा’, ‘गेलासा’ अशा विपुल शब्दांची उच्चारण घडण या भाषेत आहे. काही प्रदेशनिविष्ट शब्दही इथे सर्रास वापरले जातात. झाडूसाठी ‘साळोता’ नळासाठी ‘चावी’, दळणासाठी ‘दळाप’, वाजंत्रीसाठी ‘वाजाप’ असे प्रदेशविशिष्ट शब्द आढळतात. ‘चर्चा झालं’, ‘अंघोळ केलं’ अशी कानडी प्रदेश भाषा उच्चारप्रभावित रूपे पाहायला मिळतात. ‘परपंच्या’, ‘बजार’, ‘उंडग्यानू’, ‘कावबारणे’, ‘खांडूक’, ‘माही’, ‘गदबाळलं’, ‘हुबाल्या’, ‘हेमलं’, ‘कडू बेणं’, असे शब्दही आढळतात. कानडी प्रभावाचे द्योतक म्हणून ग्रामनामे व व्यक्तिनामेही विपुल आढळतात. जुन्या काळात गडहिंग्लजचा या शब्दाचे रूप ‘गडइंग्लज’ किंवा ‘हिंग्लज’ असे होते, तर हातकणंगलेचे ‘हातकलंगडा’. ‘आगा कुठं चाललाय गा’, ‘तंबाखू धर गा जरा’, ‘जाशील बस की’, ‘आगा बस गा’ अशी दीर्घ उच्चाररूपे या भाषेत आहेत. या साऱ्या भाषिक लकबांकडे पाहिले की, येथील सामूहिक जाणिवेत निवांतपणा, अघळपणाला विशेष महत्त्व असल्याचे ध्यानात येते. सामाजिक परिस्थितीतून काही क्षेत्रविशिष्ट शब्द तयार केले आहे. ते आता सार्वत्रिक अंगवळणी पडले आहेत. ‘वडाप’ असा एक नवाच शब्द रिक्षासंस्कृतीने व वृत्तपत्रसृष्टीने घडविला. ‘वढा, डांबा आणि पळवा’ अशा तिहेरी शब्दांतून तो घडविला आहे.

कोल्हापूर परिसरातील तरुणांच्या भाषेचा एक वेगळाच बाज आहे. कट्ट्यावरची भाषा अशी वेगळी परिभाषा येथे अस्तित्वात आहे. ग्राम्य वाटाव्या अशा शब्दांचे सुलभीकृत संदेशन हेही कोल्हापुरी भाषेचे वेगळे परिमाण आहे. टपोरी, अधिक विन्मुक्त वाटावी अशी ती बोलीरूपे आहेत. ‘काय भावा’, ‘नाद नाही करायचा,’ ‘काटा कीर्रर्र’, ‘खटक्यावर बोट, जाग्यावर पल्टी’ अशी अनेक बेधडक उच्चारणरूपे अवतीभवती भेटत राहतात. एक प्रकारची जीवनातील बेफिकीर वृत्ती व स्वातंत्र्याचा अधिकाधिक उधळमोकळा आविष्कार करणारी शब्दरूपे तरुणांच्या बोलण्यात असतात.

शंकर पाटील, महादेव मोरे, नामदेव व्हटकर यांच्या साहित्यात सीमाभाग व कोल्हापूर परिसराची भाषा आहे. १९८० नंतर मात्र राजन गवस, आनंद पाटील, कृष्णात खोत, किरण गुरव, अशोक पाटील, रफीक सूरज यांच्या लेखनातून या भाषेचा अत्यंत लक्षणीय आणि वेधक आविष्कार झाला. अप्पासाहेब खोत यांनी कथाकथनातून कोल्हापुरी बोली महाराष्ट्रभर पोहोचवली.

एकंदरीत कोल्हापुरी भाषेला, बोलण्याला एक विशिष्टता प्राप्त झाली आहे. भूप्रदेशाची विविधता, लोकजीवन, संस्थानी विरासतीची छाया, कालस्थळ-भू-प्रभाव आणि व्यक्तिभाषा यांनी ती घडलेली आहे. या भाषाविष्कारात मुक्तपणा, रांगडेपणा मोकळेढाकळेपणा, स्वातंत्र्याची अधिकची कांक्षा, अर्थाचा विपरीत वापर आणि लोकसमूहाच्या संथ, निवांत भावजीवनाचा संपृक्त आणि दणकट आविष्कार झाला आहे. हा भाषेचा अस्सल बाज इथल्या माणसाने सर्वप्रकारची बाह्य आव्हाने परतावून लावत जिवा-भावाने सांभाळला आहे.

- डॉ. रणधीर शिंदे,
अधिव्याख्याते, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ.

Thursday, July 9, 2020

पंडितकाका

आपण कोणत्या घराण्यात जन्माला यायचे हे आपल्या हातात नसते. पण आपण जेव्हा कुलकर्णींसारख्या नावाजलेल्या घराण्याचा एक भाग असतो तो क्षण नक्कीच भाग्यावर हेवा करण्यासारखा.
     आज लिहीताना खूप भरून आलेय,  शब्दही सुचत नाहीत पण लिहावंस वाटतं,आपल्या आभाळाएवढं कतृॆत्व असलेल्या आजोबांबद्दल.
लहानपणापासून  फक्त लांबून निरखत आले,त्यांना. जवळ जाऊन बोलण्याचे क्षण तर फार कमीच. पण आयुष्यभर   पंडीतरावांच्या घरातली मुलगी म्हणून  सदा सन्मानाने वावरले याची कृतज्ञता मनात कायम राहील आजोबा!!
मला आठवतं, गंगामाई विद्या मंदिर शाळा. पलिकडेच आजोबा बॅडमिंटन खेळायला यायचे. खूप लहान होते हळूच लपून मी  त्यांच्याकडे पहात होते. खेळताना शटल खाली पडले ते उचलत असताना आजोबांचे लक्ष माझ्याकडे गेले. दोन्ही भुवया उचलून हसत हसत त्यांनी माझ्याकडे पाहून बॅट हालवली.  आजोबा आपल्याला ओळखतात याचाच आनंद इतका होता की,मी घरी जाऊन आईला सांगितले ते काका आजोबा मला,ओळखतात.
     छोट्या वयातले आनंद  मात्र मोठे, हे लहानपण जपता आलं तर किती बरं  झालं असतं.
       साधा शटॆ, पायजम्यातली  ही व्यक्ती  केवढी कतृॆत्ववान आहे हे ऐकत, पहात आम्ही मोठे झालो. फायफाऊंडेशनचे ते मोठाले कायॆक्रम ,त्याची शान इचलकरंजीतली चर्चा हे सगळे रोमहषॆक क्षण,अजूनही डोळ्यसमोरून हलत नाहीत
फायफौंडेशनचा कायॆक्रम ठरला, की   कुलकर्णी म्हणून शाळेत आमचा रूबाब काही औरच.  त्यात आमचे एस व्ही काका असणार मग आमचे विमान वरचं.  शाळेतल्या मैत्रिणींना आमचा खूप हेवा वाटायचा.की लता मंगेशकर, दिलीपकुमार हेमामालिनी,  सुधामूर्ती, य़ाआधी पुल, बाबा आमटे,  मोठे मंत्री, संत्री यांनाआम्हांला अगदी जवळून पहायला मिळतात याचा, त्यात दोन वर्ष मला डायरेक्ट स्टेजवर बक्षीस पाहुण्यांच्या हातात देण्याचे काम मिळाले.पेपरमध्ये तेव्हा पाहुण्यांच्या मागे छापून आलेल्या छोट्याशा फोटोेेने माझं बालपण समृध्द केलं..
      खूप मोठी माणसं, जवळून पाहता आली त्यांचं विचार ऐकायला मिळालॆ केवळ फायच्या कायॆक्रमामुळे.
लग्न झालॆ, ठरलॆ, पण तेव्हाही पंडीतकाकांच्या घरातली मुलगी 
या सन्मानाने माझ्याकडे पाहिले गेले आणि अजूनही तसॆचपाहिले जाते.आपल्या घरगुती कायॆक्रमाला काका काकूंचे येण म्हणजे खूप सन्मानाचं वाटायचं! आनंद वाटायचा,.  
आमच्या घरातल्या प्रत्येक सुख दुखाच्या क्षणी काका काकू भेटून  जायचॆ, तेव्हा बरे वाटायचे 
आधार वाटायचा..!!
        खरं सांगूका, की  लांबूनच एखाद्या फुलाचा सुगंध येतो आणि त्या सुगंधाने आपले ही मन सुगंधित होते तसं नातं होत आपलं. आजोबा!!तुमच्या कतृॆत्वाच्या सुगंधात  आमच्यासारख्या छोट्या लता वेलीही बहरून गेल्या,कदाचित तुम्हांला त्याचा थांगपत्ताही नसावा.
भावपूर्ण श्रध्दांजली आजोबा!!

..................................स्मिता, (राणी)

Xxxxxxxxx

एक आठवण काकांची 

जपानच्या कंपनी सोबत काम करत असताना काही अविस्मरणीय गोष्टी घडत होत्या.. 
मुळातच जपान म्हंटले की अंतिम टेक्नॉलॉजी असेच सगळ्यांना वाटत असे .आम्ही इथे करत असलेला थ्रोटल व्हॉल्व्ह हा कंपोनंट जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो 26 सेकंदात पूर्ण व्हायचा .जपान च्या काकुडा प्लांट मध्ये हाच जॉब 12 सेकंदात पूर्ण होत होता .त्याची माहिती काकांना समजल्यावर प्रचंड प्रमाणात टेक्निकल मिटिंग होऊ लागल्या आणि एके दिवशी काकांनी जाहीर केले की हा जॉब 10 सेकंदात पूर्ण झाला पाहिजे..मिटिंग संपवून बाहेर आलेली टीम घाम पुसत होती..स्तब्द निर्विकार चेहरे मी न्याहाळत होतो .कोणालाही त्या गोष्टीवर विश्वास बसला न्हवता ..हे अशक्य आहे इतकंच सगळेजण बोलत होते..जपानमध्ये12 सेकंद आणि इथे 10 सेकंड???
अशक्य!!
पण...8 नंबर मिटिंग रूम मध्ये झालेला हा काकांचा स्वतःचा निर्णय होता आणि तो त्यांच्या हिमतीवर घेतलेला निर्णय होता..म्हणजेच अशक्य ते शक्य करणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ.
दररोज मिटिंग वर मिटिंग होत होत्या त्यात काकांनी घेतलेले ते निर्णय आणि धाडस अभुतपुर्व होते .सर्व टेक्निकल स्टाफ आणि इंजिनिअर झपाटल्यागत कामात बुडून गेले होते ..जसे काही दिवस ,आठवडे सरले तसे रिझल्ट दिसू लागले ..26 सेकंदाचे 20 सेकंड झाले,मग 15 झाले,व ते कमी कमी होत गेले13सेकंड,12 सेकंड,
काकांची टीमम्हणजे डॉ पडते,मुरगुंडीसाहेब,प्रशांत गलगले, डी डी कुलकर्णी,जे व्ही कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी,व अनेक सहकारी त्यात वेगवेगळ्या कारणासाठी सहभागी होते.
जयसिंगपूर चे गिरमल साहेब,पाटील साहेब,हर्ष फडणीस आणि सर्वांचे आधार स्वतः एस व्ही कुलकर्णी
हळू हळू जॉब चे सायकल time कमी येत होते सर्व टीम मध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली होती,जेवताना,झोपताना,पण फक्त टार्गेट एकच ..सायकल टाइम कमी आणणे..
एक दिवशी सर्व टेक्निकल टीम ला जपान च्या काकुडा प्लांट ला व्हिजिट करण्याची एस व्ही नच्या अथक परिश्रमामुळे परवानगी मिळाली होती.
सगळेजण आपले एक्सरे सारखे डोळे आणि स्कॅनर घेऊन जपान ला मार्गस्थ झाले ..
10 सेकंदात होणारा जॉब कसा करत असतील या उत्सुकतेपोटी ते सर्वजण प्लांट मध्ये पोचले. कंपनी ने त्यांना दुरूनच सर्व गोष्टी दाखवल्या काचेच्या पार्टिशन मधून आत सोडण्यात आले ,मोबाईल फोन,कॅमेरे वगैरे परवानगी न्हवतीच .तसाच तो दौरा आटोपून सर्व टीम इकडे परतली,जे काही त्यांना दुरून पाहायला मिळाले होते त्याची स्केच काढून ठेवले होते .निषणांत डोळ्यांनी आपले काम फत्ते केले होते..
जुजबी माहिती हाती लागली होती त्यावर पुन्हा युद्धपातळीवर काम सुरू झालं..आणि अनेक महिने रात्रीचा दिवस करून तो सुवर्ण क्षण आला होता  ..
वेळ आली होती फक्त 5 सेकंड !!!
होय अथक परिश्रमाचे फळ 5 सेकंदात एक जॉब तयार!!
आणि रात्रंदिवस ती वेळ 3 सेकंद करण्याचे काम चालूच होते .
जपानी लोकांनी आपली टेक्नॉलॉजी शेअर न करण्याची भूमिका काकांना आवडली न्हवती ..
त्यांनी आचिव्ह केलेली वेळ केहीन फाय येथे कंपनी मध्ये समजताच हडकम्प झाला होता ..जपान पेक्षा कमी वेळेत जॉब होणे शक्य नाही असे म्हणत जपानी टेक्निकल टीम ने आमचा प्लांट बघण्याची परवानगी काकांच्याकडे मागितली. क्षणाचाही विलंब न करता काकांनी होकार दिला ..
पुण्याहून आणि जपान हुन त्यांचे इंजिनिअर व सर्व टीम इचलकरंजी त दाखल झाली.
त्यांची टीम पूर्णपणे सावध होती त्यांना सर्व गोष्टी गुप्तपणे रेकॉर्ड करायच्या होत्या पण कोणालाही नकळत !!
कोणाच्या बटनाला छुपा कॅमेरा ,तर कोणाच्या हातात पेन कॅमेरा अशी ती टीम व आपली टेक्निकल टीम प्लांट व्हिजिट करू लागले .जसे जसे फायनल मशिंनिंग जवळ आले तसे त्यांचा डोळ्यावर विश्वास बसेना ..चक्क 3 सेकंदाला 1 जॉब तयार होत होता आणि तो आजही होतोय... .. Unbelievable!!
जपानी लोकांना ते रेकॉर्ड करून घेण्याचा मोह आवरत न्हवता..ही बातमी स्टाफ ने काकांना कळवली ..
झाले..काकांनी ताबडतोब आज्ञा दिली की त्यांना एक प्रोफेशनल कॅमेरा मॅन, लाईट ची तातडीने सोय करून घ्या.
बोट दाखवेल ते रेकॉर्ड करून त्यांना द्या ..
जपान मध्ये दुरून प्लांट दाखवणाऱ्या जपानी लोकांना हे अदभुत वाटलं असणार आणि काय काय विचार आले असतील देव जाणे..
संपुर्ण प्लांट आणि प्रोसेस पाहिल्यावर मिटिंग झाली त्यात जपानी लोक फक्त , unbelievable!!!
इतकाच शब्द उच्चारत होते..
त्यांना बोलायला शब्द सुचत न्हवते तेव्हड्यात त्यांनी जे व्हिडिओ शूटिंग करायचा प्रयत्न केला होता त्याची व्हिडीओ cd त्यांच्या समोर फोल्डर मध्ये घालून त्यांना प्रेझेंट  देण्यात आली होती..


Pindrop silence...


सर्व टेक्निकल टीम ज्यांना काकांचे मार्गदर्शन मिळाले व हा प्रोजेक्ट अविस्मरणीय करून दाखवला त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे ..

आदरणीय तीर्थरूप काका आजोबांना विनम्र श्रध्दांजली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रशांत कुलकर्णी..
Xxxl xx१९७४ साली इचलकरंजीत संपन्न झालेल्या,सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाचेवेळी, मा.पंडितराव इचलकरंजीचे नगराध्यक्ष होते.त्यामुळे मान्यवरांच्या मांदियाळीतील त्यांच्या स्वागतापर भाषणाने,प्रफुल्लित झालेल्या संमेलनाध्यक्ष पु लं देशपांडे यांनी पंडितरावांच्या कार्याची व भाषणाची स्तुती करतानांच ते म्हणाले ,”बरे झाले पंडितरावांनी साहित्य क्षेत्रांत अधिक लक्ष दिले नाही ते,नाहीतर आम्हाला कुठेतरी कोपऱ्यावर सायकल पंक्चर रिपेरीचे दुकान काढावे लागले असते” 
👏👏🙏



Wednesday, July 8, 2020

पंडितकाका। राजेंद्र ढवळे

अवघ्या  देशांचे  मेकॅनिकल ईंजिनिअरींग कोळून प्यालेले इचलकरंजी  येथील जगप्रसिद्ध
FIE ऊद्योगाचे जनक  पंडितकाका कुलकर्णी आपल्यात आता नाहीत ही विषण्ण करणारी बातमी ऐकली . खरोखर काही काळ स्तब्ध झालो .
इंजिनिअरींगची फॉर्मल डिग्री नसली तरी एकलव्याप्रमाणे  स्वत:च प्रयोगशीलतेच्या जोरावर  अभियांत्रिकी विद्या पारंगत झाले होते . इतकेच नव्हे तर या ज्ञानावर  पण सुतार लोहार कुंभार या परंपरागत  हक्क असलेल्या व पिढीजात कौशल्ये विकसित झालेल्या जमातीतील अनेकांना त्यांच्या हजारो लोकांच्या हजारो पीढ्यांचे संचिताचे ज्ञान या
कुलकर्ण्यांच्या लिखापडी करणार्‍या घरात जन्मलेल्या एकट्या   माणसाने एकाच जन्मात कसे मिळवले असेल या कोड्यात निश्चितच टाकले होते.
त्यांच्या अनमोल ज्ञानामुळे शेकडो ऊद्योजक तयार होऊन स्वत:च्या पायावर ऊभे राहीले व भारताचे नाव सातासमुद्रापार टिकवले .प्रिसीजन हाच स्थायीभाव असलेल्या त्यांच्या  सर्व प्रकारच्या टेस्टींग मशिनची ख्याती ही सर्वदूर पोहोचली.भारतातील अनेक मशिनशॉप्स  वर्कशॉप्स व रिसर्च टेस्टींग  सेंटर्स या टेस्टींग  मशिनच्या भरवशावर यशस्वी झाली असे म्हटले  तर अतिशयोक्ति होणार नाही .त्यांच्या कौशल्यावर जपानी लोकांचा पण इतका भरवसा  होता की तेव्हा दुचाकीच्या इंजिनचा कळीचा काम्पोनंट असलेला कार्ब्युरेटर भारतात तयार करताना 
त्यांना फक्त  पंडितरावांची साथ घेणे योग्य वाटले . आणि त्यातून KEHEIN FIE Pvt.Ltd  या कंपनीचा जन्म झाला .जपानी कोलॅबोरेशन नव्हते तेव्हाही ते देशी तंत्रज्ञानावर आधारीत Fuel Instruments and Engineers Pvt .Ltd.  (FIE) या स्वत:च्या कारखान्यात डिझेल इंजिन्ससाठी फ्युएल इंजेक्शन इक्विपमेंट्स  तयार करत होते . Kehein FIE कारखाना सुरू झाल्यावर देशी वाहन ऊत्पादकांचा तर त्यांच्यावर इतका गाढा विश्वास होता  की हीरो होंडा कंपनीचे ५० लाखावर कार्ब्युरेटर्स असोत की बजाज पल्सारचे १६ लाख असोत ते कारखान्यातून थेट प्रीईन्सपेक्शन न होता थेट असेंब्ली लाईनवर जाऊन जुळत असलेल्या गाडीवर बसवले जात . त्यांच्या नावातच इतके प्रचंड वलय होते की त्यांनी स्थापन केलेल्या फाय फौंडेशनच्या पुरस्कारासाठी देशाचे पंतप्रधान स्वत: ऊपस्थित 
रहात असत . 
त्यांच्याकडेच नोकरी केलेले  अनेक जण  त्यांची प्रॉडक्ट्स जशीच्या तशी कॉपी मारून इचलकरंजी,कोल्हापूरातच  उद्योजक म्हणून त्याचेच कॉंपीटीटर म्हणून ऊभे राहीले पण त्यांनी कधीही या लोकांना कॉपीराईटची भीती घालून त्यांचे व्यवसाय बंद पाडले नाहीत ऊलट शक्य होईल तेवढा आधारच दिला . त्यांचे पोट भरतेय याचेच त्यांना समाधान होते .

 पंडित जितेंद्र  अभिषेकींच्या एका गाण्याचे  बोल आहेत ...
माझे जीवन गाणे गाणे ..
त्याच धर्तीवर पंडितराव  कुलकर्णींचे 
जीवन म्हणजे .........

माझे जीवन यंत्रे यंत्रे 
मशिनींग असो की टेस्टींग असूदे ।
अॅक्युरसी किवा प्रिसिजन असू दे ।
 धातू असो मऊ की राठ असू दे  ।
 आकार देतही जाणे  ॥
 अशा या ऊत्तुंग व्यक्तिमत्वास 
माझे कोटी कोटी प्रणाम व अभिवादन !!!!

....प्रा. राजेंद्र कृष्णराव ढवळे ,
    कोल्हापूर 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐

Tuesday, July 7, 2020

पंडीत काका । नितीन कुंभोजकर

जसे “ शिवरायांचे आठवावे रूप “ असे प्रत्येक मराठी माणूस म्हणतो तसेच आम्ही दक्षिण  महाराष्ट्रीय इंजींनीयर म्हणू “पंडित काकांचे आठवावे रूप” 
ईतीहास परिवार व वारसा  : 
काका हे श्री शंकर राव (अप्पा) दाजी कुलकर्णी या थोर इंजींनीयर उद्योजकांचे  चे सर्वात छोटे बंधु .. 

इचलकरंजी जवळील , माणकापुर (कर्नाटक) या गावातील मध्यमवर्गीय कुलकर्णी मंडळी . 
शंकर राव , LK किर्लोस्करांकडे तरबेज मेकॅनिक म्हणून नोकरीला होते . 
इचलकरंजी पाणी पुरवठा , पावसाळा आणि पुर स्वातंत्र्य पूर्व काळात इचलकरंजी येथील संस्थानिक घोरपडे सरकार. 19 40-45 मध्ये असेल . प्रचंड पुरामुळे गावाला पाणी पुरवठा करणारे इंजिन पुरात बुडाले . बंद पडले ...  इंग्रजी कंपन्या नी रेपेरी करायला पाण्यातून बाहेर काढून आणायला संगितले. .. म्हणजे काही आठवडे पाण्याशिवाय ? 
त्यावेळी , आप्पांनी पुरात पाण्यात जाऊन मशीन रीपेयरी केले ... ही होती आमच्या परिवाराची इन्जीनीयरिंग सुरुवात . या सफलतेने माणकापुरेंना जागा पैसा आणि कारखाना मिळाला .
त्यातून ऊभी राहिली “कुल्को” ... दोन पूर्ण वेग वेगेळे गुण असलेले अप्पा आणि तात्या .. यांच्या जोडीने कुल्को ही भारतातील सर्वात मोठी इंजिन करणारी भारतीय कंपनी बनली 
याच कंपनीने , यशवंत राव चव्हाण यांच्या मदतीने मोटर कार निर्मितीचे परवाने मिळवले . 
आणि खास भारतीय अशी मीरा कार निर्माण केली . मारुति ला टक्कर देत , यशवंतरावा बरोबर कुल्को ने ही इंदिरा जी चा झटका खाल्ला . 
कुल्को बंद पडली..   
त्या आधी पंडित काकांनी कुल्को ला लागणारे पार्ट तैय्यार करण्यासाठी एक छोटे मशीन शॉप चालू केले होते .. पहिले कामगार होते , त्यांचे परम मित्र बाळासाहेब हळदीकर.
           .   . 

....
FIE सुरवातीचा काळ : प्रेरणा 

न्हाव्याचे कटींग मशीन : ..काही ही करू पण प्रॉडक्ट करू .. ही जिद्द .
अनेकांना माहीत नसेल , पण 1950-55 मध्ये  (वयाच्या पंचविशीत ) काका अपांच्या मागे न्हाव्याचे कटींग मशीन करणार म्हणून लागले होते. पण त्याच काळात कुलको चे काम जास्त झाल्याने तो विचार मागे पडला . पण नंतर परत एक परदेश प्रवास त्यांना हार्डनेस टेस्टर / बालनसिंग मशीन डोळ्यासमोर येऊ लागले .             . 
त्याच काळात काकानी एक ग्रायंडिंग मशीन खरेदी करून मुंबईच्या “फ्यूएल इंजेक्शन” या कम्पनीला फ्यूएल पंपाचे पार्ट करून द्यायला सुरू केले होते . 30-40 कामगारांचे त्यांचे नवे युनिट 1960 मध्ये प्रगत झाले होते. कुल्को शिवाय स्वतंत्र अस्तित्व , काकांनी निर्माण केले होते. हीच आजच्या FIE ची सुरुवात . 

थोडे पसे हातात आल्यावर, काकांनी ते कशावर “उधळले” हे आजच्या छोट्या उद्योजकांनी समजून घेतले पाहिजे ... त्या काळात परदेश गमन हे अत्यंत उधळपट्टी चे होते . पण काकांनी प्रचंड खर्च औद्योगिक एक्झिबिशन पाहण्यावर खर्च केले . स्वतः एकटे जाऊन स्टॉल लावले . परदेशी कारखानदार मित्र बनवले . जे पुढील काळात खूप मदतीला आले .. उदा, श्री सायटो . जे जपान मध्ये यूनी व्हरसल टेस्टिंग मशीन तैय्यार करत होते . 
अश्याच प्रदर्शनातून कल्पना घेऊन काकांनी बनवलेला पहीला (कमर्शियल) प्रॉडक्ट म्हणजे हार्ड नेस्स टेस्टर . त्याच काळात, त्यांनी electronic बालन्सिंग मशीन करणे चालू केले . 

जसे शिवरायांनी मावळ्यांना, अडाणी जनतेला मदतीला घेऊन स्वराज्य निर्माण केले तसेच काकांनी केले . MG (?) कुलकर्णी या सारखे इलेक्ट्रिशियन, काही मेकॅनिक , वायरमन  ना बरोबर घेऊन, रेडियो , स्पीकर चे पार्ट वापरुन त्यांनी बालन्सिंग चे सेंन्सर निर्माण केले . पहिले मशीन, 1962-65 मध्ये  उत्तर परदेशात विकल्याचे ऐकले आहे. त्याच वेळी अनेक परदेश वार्‍या केल्या.. 1695-67 दरम्यान युरोप मध्ये श्री गजाननराव कुंभोजकर या गणितज्ञा बरोबर परदेशी तंत्रज्ञान विकास करणे चालू केले  . 
काकांची ही एक खासीयत होती . गणितज्ञ, मानसोपचार तज्ञ , वकील (राजाभाऊ फडणवीस)  , सिविल इंजींनीर ( कै. JV कुलकर्णी –बंडा )असे विविध व्यक्ति मत्व त्यांनी कारखान दारीत आणण्याचे प्रयत्न केले.
त्या टेस्टिंग मशीन करण्याच्या प्रयत्नांना आलेल्या यशातून आजचा सगळा गोतावळा उभा राहिला असे म्हणायला हरकत नाही 
आज ही FIE ही , भारतातील सर्वात मोठी व नावाजलेले टेस्टिंग मशीन करणारी कंपनी असावी . 

महाराष्ट्रातल्या अनेक सिनेमा गृहात पूर्वी documentary दाखवली जायची . यात काकांनी कामगारांना लुना वाटल्याचे नेहमी आभिमानाने दाखवले जायचे . 

कामगारांना दूध केळी देणारे ते कदाचित पहिलेच मालक असतील . 

कामगारांच्या आरोग्यासाठी डॉक्टर ठेवणारे अनेक मालक असतील पण काम गारांच्या  मानसीक स्वास्थ्यसाठी  मानसोपचार तज्ञ त्याकाळात (1965) नेमणारे दूरदृष्टी असणारे काका ..... शिवाजी महाराज च कारखानदरी साठी , 

आज प्रचंड परिवार एकत्र गुफला तो काकांनीच . 
काकांच्या तीसर्‍या पीढीतील आम्ही 70-80 भावंड एकत्र आहोत ते काकांची मुळेच ..

शे दोनशे माणसांचा प्रचंड परिवार एकत्र करून उन्हाळ्याची सुट्टी एकत्रपणे पन्हाळा गडावर दोन दोन महीने साजरी करणारा आख्या पांच क्रोशीत सापडेल का ?? .. आणि हो....  नुसतेच गोला करायचे नाही .... तर त्यांच्यासाठी इतिहास तज्ञ गुळवणींचे व्याखाने , उत्खनन प्रयोग. .. करवंदच्या जाळीतून भ्रमण … असे अनेक उपकरम राबवायचे ... असा कोणी होणे नाही ... झाला ही नाही . 

इचलकरंजी सारख्या गावात काकांनी किती थोर लोक आणले ... त्याच्या 10% पण कोणी अनू शकणार नाही .

व्यक्तिमत्व : .
प्रचंड हजरजबाबी :  
प्रचंड विनोद बुद्धी :
टोकाची मस्करी खोरी : 
वाद विवादात प्रचंड क्षमता : . 
नेहमीच थोडा वेळ एका बाजूने, तर थोड्या वेळाने दुसर्‍या बाजूने वाद घालत. . 
टोकाची कारण मीमांसा: (?) : 
असामान्य विचार शक्ति :
असामान्य स्मरण शक्ति :
टोकाची विश्लेषण शक्ति : 
कल्पनेच्या पलिकडची चिकित्सक बुद्धी :
शाकाहारी पदार्थातील चवीतील सूक्ष्म छटा साठी प्रचंड पाठपुरावा करणारे :
असामान्य वाचन :
प्रचंड मित्र परिवार :
इतीहासाची  प्रचंड आवड :  
प्रचंड पणे परिवारात रमणारे :

पंडित काका। रूपा कुलकर्णी

पंडित काका

काका, आपल्या जगण्यातून काय शिकावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

या जगात येऊन ऐसे भव्यदिव्य करावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

किती दान केले न कधी आठवावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

आपणाबरोबर सर्व जनांस उद्धरावें
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

पैसा कमवता कमवता आयुष्यही जगावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

शेवटच्या क्षणापर्यंत हातीपायी नीट असावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

स्वविकास करता करता इतरांच्या प्रगतीस नावाजावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

'पंडित' नावांस शोभेल ऐसे पांडित्य कमवावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

कित्येकांनी शिष्य होण्यास धडपडावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

वैभव उभे करता करता देशकर्तव्यही आठवावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

ऐसा आशीर्वाद मागते, तुमच्यासारखे मला थोडेतरी जमावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

©रुपा कुलकर्णी
9423278984

मधूशाला। प्रसाद साळुंखे

मधुशाला - हरिवंशराय बच्चन

कविता आवडणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असावं असं हे एक अफलातून पुस्तक. या पुस्तकाद्वारे हरिवंशराय बच्चन यांनी फार मायेने, आणि अत्यंत विश्वासाने त्यांच्या प्रिय मधुशालेला वाचकांच्या हवाली केलं.

वयाच्या २७-२८ व्या वर्षी हरिवंशराय बच्चन यांनी 'मधुशाला' लिहिली. नावाप्रमाणे मधुशाला मदिरा, मदिराक्षी नि मदिरालय या गोष्टींभोवती या कवितेची कडवी फिरतात. अशी जवळपास १४० च्या आसपास कडवी त्यांनी लिहिली. आणि यातल्या प्रत्येक कडव्याचा शेवट मधुशाला ने होतो. १९३३ साली काशी विश्व हिंदू विद्यालयात एका कविता संमेलनात बच्चनजींनी मधुशाला सादर केली. एकतर कवितेचा अंगभूत ठेका आणि तरुणाईला आवडणारा विषय त्यामुळे मधुशाला फार थोड्या दिवसांत लोकप्रिय झाली.  महाविद्यायीन तरुणांना मधुशालाची कडवी तोंडपाठ झाली,  मधुशाला आवडीने कट्ट्यावर गुणगुणू जाऊ लागली. कविता संमेलनासारख्या साहित्य या विषयाला वाहिलेल्या कार्यक्रमात चक्क महाविद्यालयीन तरुण गर्दी करू लागले, आणि बच्चनजींना मधुशाला सादर करण्याच्या फर्माईशी येऊ लागल्या. एकूणच मधुशाला ने आगमनापासून धमाल उडवली होती. बच्चन नावाचं वलय जंजीर पासून सुरु झालं असं आपण आपलं म्हणतो, पण वलयाची खरी सुरुवात १९३३ पासूनचीच.

वर म्हटल्याप्रमाणे मदिरालय हा एकच धागा घेऊन एखादा कलाकार त्यात काय काय विचार गुंफू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधुशाला.  पुष्पमाला म्हणून ती नितांत सुंदर आहेच, पण यातल्या प्रत्येक फुलानेही आपलं वेगळं सौंदर्य आणि मनमोहक गंध उराशी आजही जपला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काही ठिकाणी बच्चनजी धर्मभेद, जातिभेद यांवर भाष्य करतात, साम्यवादाचा पुरस्कार करतात, जसं ही कडवी पहा

मुसलमान औ' हिन्दू हैं दो,
एक, मगर, उनका प्याला,
एक, मगर, उनका मदिरालय
एक, मगर, उनकी हाला;

दोनों रहते एक न जब तक
मस्जिद - मन्दिर में जाते; 
वैर कराते मस्जिद - मन्दिर
मेल कराती मधुशाला !

कभी नहीं सुन पड़ता, 'इसने,
हा, छू दी मेरी हाला',
कभी न कोई कहता, 'उसने
जूठा कर डाला प्याला;

सभी जाति के लोग यहाँ पर
साथ बैठकर पीते है; 
सौ सुधारकों का करती हैं;
काम अकेली मधुशाला |

साम्यवादाबद्दल मत मांडताना म्हणतात,

रंक-राव में भेद हुआ है
कभी नहीं मदिरालय में,
साम्यवाद की प्रथम प्रचारक
है यह मेरी मधुशाला |

तर कधी आयुष्याचा शेवट कसा असावा यावर ते विनोदबुद्धीने भाष्य करतात.

मेरे शव पर वह रोए, हो
जिसके आँसू में हाला,
आह भरे वह, जो हो सुरभित
मदिरा पीकर मतवाला

दें मुझकों वे कंधा जिनके
पद मद - डगमग होते हों,
और जलूं, उस ठौर, जहाँ पर
कभी रही हो मधुशाला

तर पुढच्याच कडव्यात श्राद्धाबद्दल लिहितात,

प्राणप्रिये यदी श्राद्ध करो तुम,
मेरा, तो ऐसा करना 
पीनेवालों को बुलवाकर,
खुलवा देना मधुशाला

असे नानाविध विषय त्यांनी कल्पकतेने या मधुशालेत मांडलेत. एवढं सगळं लिहिणारा म्हणजे अट्टल दारुडा असणार याची आपल्याला खात्री होते, बच्चनजींना अशा बऱ्याच शंका विचारून विद्यार्थ्यांनी भंडावून सोडलं, पण बच्चनजी दारूला स्पर्श करत नसत. त्यांनी दारूचा पुरस्कारही केला नाही. काहीजण केवळ दारू या विषयी गमतीशीर वाचायला मिळेल म्हणून या प्याल्यावर घोंघवतात, मात्र फक्त मोजके रसिक या प्याल्यातल्या अर्थाच्या अर्कापर्यंत खोल शिरू शकतात. म्हणून बच्चनजी म्हणतात,

जितनी दिल की गहराई हो,
उतना गहरा है प्याला; 
जितनी मन की मादकता हो,
उतनी मादक है हाला;

जितनी उर की भावुकता हो
उतना सुन्दर साक़ी है,
जितना ही जो रसिक, उसे है
उतनी रसमय मधुशाला

मधुशाला बद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असण्याचा निश्चित संभव आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी १९३३ साली लिहिलेल्या या मधुशालेची आजच्या वाचकांवरही नशा कायम आहे. म्हणतात ना वाईन जुनी झाली की अधिक चवदार होते तसं काहीसं. आयुष्यात एकदा तरी तोंडी लावावा असा हा अस्सल रसरसता प्याला रसिकांनी जरुर चाखावा.

- प्रसाद साळुंखे