Saturday, May 30, 2020

तीन ओंजळ पाणी ।सुधा मूर्ती

*तीन ओंजळी पाणी*

मी लहान असताना माझ्या आजी-आजोबांबरोबर कर्नाटकमधल्या एका छोट्याशा गावात राहत असे.
माझी आजी कृष्णाक्का दिसायला खूप छान होती. पण ती खूप साधी राहत असे. फक्त सणासुदीला किंवा काही कार्य असेल‚ तेव्हाच ती चांगली साडी नेसायची.
एक दिवस मी शाळेतून घरी आले‚ तर ती तिची एक जुनी पेटी पुढ्यात घेऊन बसली होती. त्यात तिच्या रेशमी साड्या आणि काही महत्त्वाच्या गोष्टी असतात‚ हे मला माहीत होतं. ही पेटी आजी फारशी कधी उघडत नसे‚ त्यामुळे त्यातल्या गोष्टींविषयी मला कुतूहल होतं.  त्यामुळे क्वचित कधीतरी आजीनं ती पेटी उघडली‚ की मी माझे सगळे उद्योग सोडून पळत तिच्याजवळ जाऊन तिथं बसत असे. या खेपेलाही मी तेच केलं. मी शाळेचं दप्तर दारातच टाकलं आणि आजीजवळ जाऊन बसले. आजीने ती पेटी उघडताच मी आत डोकावून पाहिलं. आत एक कुंकवाचा करंडा‚ चांदीची मूठ असलेला छोटा आरसा‚ हस्तिदंती कंगवा‚ आणि काही छोटी चांदीची भांडी होती.
‘‘हे माझ्या वडिलांनी मला लग्नात दिलं होतं‚’’ आजी अभिमानानं म्हणाली. तिच्या वडिलांना जाऊन बरीच वर्षं झाली होती.
मी तो कुंकवाचा करंडा हातात घेऊन त्याकडे बराच वेळ निरखून बघत बसले. तो करंडा म्हणजे पॅगोडाच्या आकाराची एक लहानशी डबी होती. मी फारसा काही विचार न करता त्या करंड्याचं झाकण उघडलं. त्यात तीन कप्पे होते. सर्वांत वराच्या कप्प्यात मेण होतं‚ दुसऱ्या कप्प्यात अगदी लहानसा आरसा होता आणि तळाशी कुंकू ठेवण्यासाठी जरा खोलगट कप्पा होता. ते पाहून मी मंत्रमुग्ध झाले.  ‘‘अव्वा‚’’ मी जरा चाचरत म्हणाले‚ ‘‘तुझ्या या सगळ्या गोष्टींमधला हा कुंकवाचा करंडा मला सर्वांत जास्त आवडलाय. मी जेव्हा मोठी होईन‚ तेव्हा तू मला हा देशील का गं?’’ त्यावर ती हसून म्हणाली‚ ‘‘बाळा‚ मला तेरा नातवंडं आहेत. त्यातल्या प्रत्येकाला माझ्याकडचं काही ना काही मिळायलाच हवं ना? पण हा करंडा मी नक्की तुझ्यासाठी ठेवीन.’’
जरा वेळानं ती घरातल्या मोठ्या आरशासमोर जाऊन बसली. तिनं केस विंचरून केसांचा छान आंबाडा घातला‚ नाकात चमकी घातली. त्यानंतर तिनं हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली‚ पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला. कपाळाला मोठं कुंकू लावलं‚ कानात मोत्यांच्या कुड्या घातल्या‚ त्यासोबत दोन दोन सोन्याच्या बांगड्याही घातल्या. अंबाड्यावर फुलांची वेणी घातली. उत्तर कर्नाटकातील वयस्कर भारदस्त स्त्रियांप्रमाणे ती छान तयार झाली.
‘‘अव्वा‚ आज तर कुठलाच सण नाही. मग तू अशी छान साडी नेसून का तयार झाली आहेस?’’ मी विचारलं.
‘‘अगं‚ मी जेवायला चाललेय. तुला यायचंय का माझ्याबरोबर?’’ ती म्हणाली.
मी जरा वेळ विचारात पडले. मग ती हसून म्हणाली‚ ‘‘तू तुझ्या दुपारच्या वर्गाची चिंता करू नको. तुझ्या शाळेच्या बाई पण तिकडे येणार आहेत.’’
खेडेगावातल्या शाळेत अशा गोष्टी काही नवीन नव्हत्या. कधीतरी अचानक आठवड्याच्या मध्येच आम्हाला सुट्टी देण्यात यायची आणि मग पुढच्या रविवारी शाळा भरायची. तेव्हा नियम फारसे कडक नव्हते. आयुष्यं सोपं होतं. मी माझ्या स्वतःच्या विश्वात रममाण झालेली उमलणारी कळी होते.
तिचे शब्द ऐकताच मी आनंदानं तिच्या सोबत जायला तयार झाले. आपल्याला जेवायला जायचंय या कल्पनेनं मी हरखून गेले होते. मी लगेच कपडे बदलून झटपट तयार झाले. त्या वयातसुद्धा मला कपडे बदलून तयार व्हायला जास्त वेळ लागत नसे.
आमची अव्वा तशी काही फार बोलकी नव्हती. पण त्या दिवशी ती खूप खूश दिसत होती. माझ्या आजोबांना तिच्याबरोबर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना यायला मुळीच आवडत नसे. त्यामुळे ती त्यांना म्हणाली‚ ‘‘मी आज इंदिराकडे जेवायला चालले आहे. मी तुमचं पान वाढून केळीच्या पानाखाली झाकून ठेवलंय. पण वेळेत जेवून घ्या हं!’’
मी माझ्या आजोबांना प्रेमानं शिग्गाव काका म्हणत असे. त्यांनी मान हलवली आणि परत वर्तमानपत्र वाचायला सुरवात केली.
आम्ही लगेच घराबाहेर पडून इंदिरा आजीच्या घरी चालतच निघालो.
‘‘आज तिकडे काय आहे?’’ मी विचारलं.
‘‘माझी मैत्रीण इंदिरा नुकतीचं वाराणसीहून परत आली आहे‚ म्हणून तिनं आम्हा मैत्रिणींना जेवायला बोलवलं आहे. तो एक छान सोहळा असतो. त्याला ‘काशी समाराधाने’ असं म्हणतात.’’
‘‘म्हणजे काय गं आजी? आणि जर इंदिरा आजी गावाला जाऊन आली‚ तर आपण सगळ्यांनी एकत्र जमून सण का साजरा करायचा? आपण नाही का हुबळी किंवा गदगला जाऊन येतो! मग परत आल्यावर कुठे लोकांना जेवायला बोलवतो?’’
अव्वानं एक मोठा निःश्वास टाकला. ‘‘अगं‚ काशीला जाऊन येणं म्हणजे काही हुबळी किंवा गदगला जाऊन येण्याइतकी साधीसुधी गोष्ट नाही. _काशी हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. ते गंगा नदीच्या काठी वसलेलं आहे. असं म्हणतात‚ की या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारा विश्वनाथ हा देव काशीत राहतो. तो तिथून सर्वांचं रक्षण करतो‚ सर्वांना आशीर्वाद देतो. त्यामुळे या जगातलं काशी हे या विश्वनाथाचं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. तिथे गंगेमध्ये स्नान करण्यासाठी ऐंशी घाट आहेत. त्या शहरात हजारो संस्कृत पंडित राहतात. मी आज जी साडी नेसले आहे ना‚ ती बनारसी साडी आहे. आपल्याला जर कुणी लग्नात बनारसी साडी दिली‚ तर ते शुभ मानण्यात येतं‚ कारण काशी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ती बनते.’’_
हे सगळं मला काही फारसं पटलं नव्हतं.
‘‘हो‚ गं आजी. पण तरीही त्यांनी सगळ्या लोकांना जेवायला का बोलावलंय?’’ मी पुन्हा विचारलं. खरं म्हणजे मला तिकडे जाऊन गोडाधोडाचं जेवायची इच्छा होतीच.
‘‘एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत असली किंवा तिची काशी विश्वेश्वरावर अगदी गाढ भक्ती असली‚ तरीसुद्धा काशीला जाणं मुळीच सोपं नसतं‚ बरं का! तिकडे जाणं आणि येणं खूप कष्टांचं आहे. तो सगळा प्रवास फार खडतर आहे. बऱ्याच ट्रेन्स आणि बसेस बदलून तिकडे जावं लागतं. तिकडचे लोक आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. ते हिंदी बोलतात. शिवाय त्या गावात आपले कुणीच नातेवाईक नाहीत. कुठे आणि कसं जायचं ते सांगायला कुणीच नाही. शिवाय तिकडे हिवाळ्यात इतकी कडाक्याची थंडी असते‚ की आपण साधं पाण्यात पायही बुडवू शकत नाही. तेच उन्हाळ्यात तिथं इतकं गरम होतं‚ परिसर इतका तापून निघतो की‚ पूजा करण्यासाठी अनवाणी चालताना खूप हाल होतात. तुम्ही परक्या प्रांतातून आलेले असल्याचं तिथल्या लोकांच्या लक्षात आलं‚ तर ते तुम्हाला फसवू शकतात. पूर्वीच्या काळी कितीतरी लोक काशीयात्रेला गेले; पण पुन्हा परत घरी न आल्याची उदाहरणं आहेत‚ त्यामुळे आपल्या ओळखीतलं कुणी काशीला जाऊन सहीसलामत परत आलं‚ तर आपण ते मोठंच भाग्य समजतो. त्यामुळं ते लोक काशीयात्रा करून परत आल्याचा आनंद साजरं करण्यासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवतात. आपण त्यांना काहीतरी भेटवस्तू पण द्यायची असते.’’
‘‘मग तू काय देणार आहेस‚ अव्वा?’’ मी उत्सुकतेनं विचारलं.
अव्वानं तिच्या हातातली पिशवी उघडून माझ्यासमोर धरली. आत एक सुती साडी‚ फळं  आणि गजरे होते.
‘‘आणि मग ते आपल्याला काय देणार?’’ मी म्हणाले.
‘‘त्यांनी आपल्यासाठी काशीहून गंडा आणि गंगाजल आणलं असेल. त्या दोन्ही गोष्टी पवित्र मानल्या जातात. तो गंडा तू रोज गळ्यात घालत जा किंवा मनगटावर बांधत जा. म्हणजे देव तुझं रक्षण करेल. सर्व प्रकारच्या संकटांमधून तो तुझी सुटका करेल.’’
हे तेवढं बरं होतं. माझी परीक्षा जवळ आली होती. मला सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी त्याचा उपयोग नक्की झाला असता.
माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून अव्वा म्हणाली‚ ‘‘तुला इतक्या लहान वयात काशीचा गंडा घालायला मिळणार आहे. तू खरोखर नशीबवान आहेस.’’
‘‘आजी‚ तो काशीचा गंडा कसा दिसतो गं?’’
‘‘अगं तो साधा काळ्या रंगाचा गाठी मारलेला दोरा असतो. काशी नगरामध्ये भैरवनाथ आहे. हा शिवमहादेवाचा निस्सीम भक्त. हाच काशी आणि आसपासच्या परिसराची राखण करतो. कुणी जर काशीला जाऊन तिथल्या कालभैरवाच्या मंदिरात न जाता परत आलं‚ तर त्याची काशीयात्रा अपूर्ण राहिली‚ असं मानतात. काशीमध्ये तो गंडासुद्धा त्या कालभैरवाच्या मंदिरापाशीच मिळतो. मग तो गळ्यात घालायचा किंवा मनगटावर बांधायचा. म्हणजे भैरवनाथ त्या व्यक्तीचं रक्षण करतो‚ त्याच्या प्रवासात अदृश्य स्वरूपात त्याच्याजवळ राहतो आणि त्याला सुखरूप घरी पोहोचवतो. त्यानंतरच तो त्याच्या पुढच्या भक्ताची काळजी घेण्यासाठी परत फिरतो.’’
‘‘हं‚’’ मी विचारात पडले. पण त्याला जर एकापेक्षा जास्त माणसांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला जावं लागलं‚ तर? माझ्या मनात आलं.
पण मी हा प्रश्न अव्वाला विचारणार‚ इतक्याच तीच म्हणाली‚ ‘‘तुला आता नेमका कोणता प्रश्न पडलाय‚ ते आलं माझ्या लक्षात. पण भैरवनाथाला एका वेळी अनेक रूपं घेता येतात.’’
मग मी विचारलं‚ ‘‘गंगेचं पाणी कशासाठी द्यायचं लोकांना? त्याचा काय उपयोग?’’
‘‘किती वेडी मुलगी आहेस गं. गंगेच्या पवित्र तीर्थाचे उपयोग आता मी कसे काय समजावून सांगू तुला?’’ असं म्हणून तिनं माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला प्रेमानं थोपटलं. गंगेचं पाणी रोज पिण्याची खरं तर सगळ्यांचीच इच्छा असते; पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही ना. आपण तर दक्षिण भारतात राहत असल्यामुळे ते आपल्याला शक्यच नाही. म्हणून आपण घरी थोडंसं गंगेचं पाणी ठेवतो. कुणी समजा अगदी शेवटच्या घटका  मोजत असेल‚ तर त्याला मुद्दाम चमचाभर गंगेचं पाणी पाजतात म्हणजे तो माणूस स्वर्गात जातो.’’
‘‘अव्वा‚ मी म्हणाले. ‘‘काशीला जाणं जर इतकं महत्त्वाचं असेल‚ तर तुझा जर एवढा विश्वास असेल‚ तर काका आणि तू काशीला का जात नाही? हवं तर मी पण येईन तुमच्याबरोबर.’’
माझं बोलणं ऐकून अव्वा विचारात पडली. ‘‘मी आजवर कधीच कर्नाटकाच्या बाहेर पडलेली नाही. तुला माहीत आहे ना‚ प्रवासात मी आणि काका बाहेरचं काही खात नाही. काशीला जायचं तर किमान दहा दिवस हवेत. शिवाय आपल्याला तिथली भाषा येत नाही‚ त्यामुळे चार लोकांच्यासोबतीनं गेलेलं बरं. पण या गावात काशीला जायला तयार होणाऱ्या लोकांचा गट तयार करणार कोण? आमचं आता वय होत चाललंय. आम्ही जर प्रवासात आजारी पडलो‚ तर उगाच इतरांनाच त्याचा त्रास होईल. त्यामुळे काशीला जाणं माझ्या दृष्टीनं तरी एखाद्या स्वप्नासारखंच आहे. ते स्वप्न पुरं होणं कठीण आहे. पण इंदिरा तिच्या भावंडांबरोबर जाऊन आली‚ याचा  मला खूप आनंद झाला. आता तिच्या घरी जाऊन तिकडच्या गोष्टी ऐकायच्या आहेत मला!’’
माझ्या आजीला काशी या तीर्थक्षेत्राविषयी एवढी भक्ती का वाटत असे‚ ते मला त्या वेळी कळलं नव्हतं.
जरा वेळात आम्ही इंदिरा आजीच्या घरी पोहोचलो. तिथं सगळं समारंभाचं वातावरण होतं. घराच्या फाटकापाशी केळीचे खुंट आणि आंब्याच्या पानांची आरास केलेली होती. सगळीकडे फुलांच्या माळा आणि तोरणं होती. घराच्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळी रेखाटलेली होती. माझ्या वर्गातल्या काही मुलीसुद्धा तिथं खेळत होत्या. ते पाहून मी हरखून गेले. माझ्या वर्गशिक्षिका पण तिथं होत्या. त्या सर्वांना सरबत देत होत्या. एका बाजूला गंगाजलाच्या छोट्या छोट्या गडूंची उतरंड रचून ठेवण्यात आली होती. प्रत्येक गडूला काळा गंडा बांधण्यात आला होता. शेजारी एक मोठं केळीचं पान पसरून त्यावर मेवामिठायांनी भरलेली ताटं ठेवण्यात आली होती; पण तिथं कुणीच जेवायला बसलेलं नव्हतं. मी मनातल्या मनात त्या मिठायांचे प्रकार मोजू लागले.
त्याला लागूनच घरातली मोठी खोली होती. मी आणि अव्वा आत शिरलो. माझी आजी गावातली सर्वांत वयस्कर स्त्री होती. ती सर्वांचीच आवडती होती. त्यामुळे तिला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. अव्वा तिच्या मैत्रिणीला- इंदिरेला म्हणाली‚ ‘‘तू खरंच नशीबवान आहेस हो. तू काशीला जाऊन गंगास्नान केलंस आणि साक्षात विश्वनाथाचं जवळून दर्शन घेतलंस.’’
इंदिरा आजी गोडसं हसली. तिनं आम्हा दोघींना प्रेमानं बसवलं. तिच्याभोवती खूप मंडळी जमा झाली होती. सगळ्यांनाच तिच्या तोंडून काशीयात्रेची हकिगत ऐकायची होती.
कुणीतरी विचारलं‚ ‘‘तिकडचं अन्नपूर्णा देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे म्हणे! तुम्ही ते पाहिलंत का?’’
‘‘हो‚ ते फार सुंदर आहे.’’ इंदिरा आजी म्हणाली‚ ‘‘विश्वनाथाच्या मंदिराच्या आधीच अन्नपूर्णेचं मंदिर आहे. शंकर भगवान मंदिरात आपल्या पत्नीसमोर भिक्षापात्र धरून भिक्षा मागतात. अशा प्रकारचं हे एकमेव मंदिर आहे. असं म्हणतात की काही खास दिवसांमध्ये स्वतः शंकर भगवान इथं प्रकट होतात.’’
लोक इंदिरा आजीवर प्रश्नांचा भडिमार करत होते. जरा वेळातच मी कंटाळून गेले.
मी हळूच माझ्या आजीला कोपरानं ढोसलं. तिनं माझ्याकडे वळून पाहताच मी कुजबुजत्या स्वरात तिला विचारलं‚ ‘‘आजी‚ बाहेर बघ ना किती पानं वाढून ठेवलेली आहेत. पण तिथं कुणीच जेवायला बसलेलं नाहीये. मी जाऊन त्यातलं काहीतरी खाऊ का? मला खूप भूक लागली आहे.’’
‘‘अगं‚ असला काही विचारसुद्धा मनात आणू नको. तो नैवेद्य भैरवनाथासाठी वाढून ठेवलाय बरं. पण त्याला खूप काम असतं ना. शिवाय  त्याला काशीला परत जायची घाई आहे. तुला हवं तर तू त्याची प्रार्थना कर.’’
पण तिथं तर कुणीच जेवायला बसलेलं दिसत नव्हतं. मग मला आठवलं‚ भैरवनाथ अदृश्य रूपात असतो. मग मी त्या नैवेद्याच्या ताटांकडे पाहून हात जोडून भैरवनाथाची प्रार्थना करत बसले.
थोड्या वेळानं आम्हाला जेवायला वाढण्यात आलं. जेवण अतिशय रुचकर होतं.
आम्ही परत घरी जायला निघालो.
रस्त्यात आजी म्हणाली‚ ‘‘इंदिरेनं तीन ओंजळी गंगाजलाचं अर्घ्य उगवत्या सूर्याला दिलं. फार छान झालं. किती सुंदर दृश्य असेल ते. कधीतरी मलाही वाटतं‚ आपणही तिकडे जावं‚ हे असं करावं. पण आपल्या घरच्या बागेतला झरा म्हणजेसुद्धा गंगेचंच रूप आहे‚ असं मी मानते. मी माझ्या बागेत वाहणाऱ्या झऱ्याची पूजा केली‚ तर ती गंगेला नक्कीच पोचेल असं माझं मन मला सांगतं.’’
आता संध्याकाळ झाली होती. दुरून आमचं घर दिसत होतं. आजोबा व्हरांड्यात येऊन बसले होते. माझे आजोबा म्हणजे काका माझे मित्रच होते. मी पळतच त्यांच्यापाशी जाऊन त्यांना दिवसभराची हकिगत सांगायला बसले.
मी जवळ जाताच ते हसून म्हणाले‚ ‘‘काय गं‚ _काशीयात्रेला जाऊन आल्यावर काहीतरी सोडायला लागतं त्याविषयी तुला तुझ्या अव्वानं सांगितलं की नाही?’’__
‘‘काका‚ तुम्ही कशाविषयी बोलताय?’’
‘‘पूर्वीच्या काळी काशीयात्रेला काही दिवस नव्हे‚ तर काही महिने लागत. आज आपल्याकडे रेल्वे आहे‚ बसेस आहेत. पण त्या काळी लोकांना जंगल पार करून जावं लागे. वाटेत वन्य पशूंचं भय असे़  अनेकांना आपल्या घरी परत पोहोचणंसुद्धा शक्य होत नसे. त्या वेळी काशी यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना जिझिया नावाचा कर भरावा लागत होता. पण अकबर राजाने हा कर रद्द केला. पुढे औरंगजेबाने तो परत आकारण्यास सुरवात केली. त्यामुळे काशीयात्रेला जाणं हे कष्टांचं तर होतंच‚ पण खर्चाचंही होतं. त्यामुळे हे सगळं पार करून एखादी व्यक्ती काशीला पोहोचलीच‚ तर तिथं जाऊन त्या व्यक्तीला एक जगावेगळा नेम करावा लागायचा. *गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळी पाण्याचं अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षाने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यामुळे ते वचन कधीच मोडाचयं नाही.’’*
मी काकांचे ते शब्द ऐकून आश्चर्यचकित झाले. काकांनी थांबून एक दीर्घ श्वास घेतला.
*‘‘त्या व्यक्तीला काही विशिष्ट नियमांचं पालन करावं लागतं.’’*
‘‘कोणते नियम?’’
*‘‘गहू‚ तांदूळ‚ दूध‚ डाळी‚ तूप आणि गूळ या गोष्टी सोडता येत नाहीत. पण तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल‚ त्या भागात मुबलक पिकणारी एखादी भाजी‚ एखादं फळ किंवा तुमचं आवडतं एखादं पक्वान्न खाणं तुम्ही कायमचं सोडू शकता.* उदाहरणार्थ तुला समजा जिलबी खायला खूप आवडत असेल‚ तर तू काशीला जाऊन जिलबी कायमची सोडू शकतेस. पण समजा तुला एखादी गोष्ट मुळातच आवडत नसेल‚ म्हणजे उदाहरणार्थ कार्ल्याची भाजी‚ तर ती काही तू काशीला जाऊन सोडू शकत नाहीस. *थोडक्यात काय‚ आपल्या आवडत्या गोष्टीचा आपण कायमचा त्याग केला‚ तर जेव्हा जेव्हा ती गोष्ट आपल्याला दिसते‚ तेव्हा तेव्हा आपल्याला काशीची आठवण होते.’’*
‘‘पण काका‚ ही गोष्ट खूपच अवघड आहे हो.’’
माझ्या आजोबांचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ते तसेच पुढे बोलत होते. *‘‘समजा जर पती-पत्नी एकत्र काशीयात्रेत गेले‚ तर ते दोघंही एकच गोष्ट सोडू शकतात. ते खूप सोपं पडतं‚ कारण घरी परत गेल्यावर दोघांसाठी वेगळा स्वयंपाक करावा लागत नाही. पण समजा असं झालं‚ की पती-पत्नी काशीयात्रेला एकत्र न जाता वेगवेगळे गेले आणि त्यांनी तिथे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी सोडल्या‚ तर मात्र दोघांनाही एकमेकांनी सोडलेल्या गोष्टी खाणंसुद्धा वर्ज्य असतं.’’*
तेवढ्यात अव्वासुद्धा व्हारांड्यात येऊन बसली.
‘‘बापरे! हे सगळं फारच गुंतागुंतीचं प्रकरण दिसतंय‚’’ माझ्या मनात आलं. मी विचारलं‚ ‘‘काका‚ *आपली आवडती गोष्ट कायमची सोडणं फार अवघड असेल ना?’’*
*‘‘ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. तुम्ही जर मनापासून एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची शपथ घेतली असेल‚ तर काही काळानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा मोह पडत नाही. त्या गोष्टीवाचून जगण्याची सवय होऊन जाते.’’*
‘‘तुम्ही जर काशीला गेलात‚ तर तुम्ही काय सोडाल?’’ मी त्यांना खोडकरपणे विचारलं.
‘‘तुझी ही अव्वा आहे ना‚ ती मला सगळ्यात जास्त आवडते. म्हणूनच मी कधीही काशीला जायचं नाही‚ असं ठरवलंय.’’ आजोबा हसून म्हणाले. त्यांचे डोळे चमकत होते.
अव्वा खरं तर इतकी म्हातारी होती. पण तरीसुद्धा आजोबांच्या बोलण्यावर ती लाजून हळूच घरात निघून गेली.
मग जरा गंभीर होत ते म्हणाले‚ ‘‘अगं‚ *काशीला जाणं आपल्या हातात कुठे असतं? सगळं तर त्या काशी विश्वनाथाच्या हाती असतं. त्याची जेव्हा मर्जी होईल‚ तेव्हा तोच बोलावणं धाडेल.’’*
असे दिवस‚ महिने‚ ऋतू लोटले. आमची अव्वा काशीला कधी गेलीच नाही. ती त्याआधीच देवाघरी गेली. तिची फार पूर्वीपासून भीष्माष्टमीला देह ठेवण्याची इच्छा होती. भीष्माचार्यांनी ज्या दिवशी देह ठेवला‚ त्याच दिवशी आजीला काळानं ओढून नेलं‚ असं म्हणतात‚ की ज्यांना भीष्माष्टमीच्या दिवशी मृत्यू येतो‚ त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं आपोआप खुली होतात. त्या वेळी मी पुण्यात होते. अव्वाच्या निधनाची बातमी ऐकून मी हुबळीला पोहोचेपर्यंत ती भिंतीवरच्या तसबिरीत जाऊन बसली होती. मला तिच्या रक्षेच्या कलशाचं तेवढं दर्शन घेता आलं. आजही माझ्या डोळ्यांपुढे हसरी‚ खेळकर स्वभावाची‚ कामसू आणि सर्वांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारी माझी अव्वा येते.
अव्वाच्या शेवटच्या इच्छेनुसार तिचा कुंकवाचा करंडा माझ्या मावशीनं माझ्या हातात ठेवला. मी तो एका जुन्या पेटीत अगदी जपून ठेवला आहे. अव्वा बऱ्याचदा त्यातलं कुंकू घेऊन लावायची. पण ती गेली तेव्हा आपल्याकडे कुंकवाच्या टिकल्यांची पाकिटं बाजारात मिळू लागली होती. त्यामुळे मी त्या कुंकवाचा फारसा वापर केला नाही.
जसे जसे दिवस लोटले तसा माझा वाचनाचा व्यासंग खूप वाढला. मी बौद्ध धर्माविषयी खूप वाचन केलं. गौतम बुद्धाच्या हृदयात जी अपार करुणा भरलेली होती‚ त्यानं माझं हृदय हेलावून गेलं. माझ्या मनात खोलवर कुठेतरी ते विचार स्पर्शून गेले. मला नक्की काय झालं‚ ते नीट सांगता येणार नाही. गौतम बुद्धानं मध्यम मार्ग का स्वीकारला होता‚ ते त्या वेळी मला समजलं. बौद्धधर्माची प्रतीकं म्हणजे चक्र आणि दोन हरणं. गौतम बुद्धाच्या आयुष्यात सारनाथ या स्थळानं खूप मोठी भूमिका बजावली आहे. बुद्धानं आपल्या आयुष्यातील पहिलं प्रवचन सारनाथ येथे दिलं. वाराणसीपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका उद्यानात त्यांनी हे प्रवचन दिलं. या उद्यानात खूप हरणं होती. मला त्या वेळीच असं कळलं की वारणा आणि अस्सी या नद्या पुढे जाऊन गंगेला मिळतात. त्यावरूनच वाराणसी शहराचं नाव पडलं. फार प्राचीन काळापासून हा परिसर पवित्र आहे‚ असं मानलं जातं. इसवी सन पूर्व ३२९मध्ये ह्यू एनत्संग हा चीन प्रवासी जेव्हा भारतात आला‚ तेव्हा त्यानं लिहिलेल्या प्रवासवर्णनांमध्ये वाराणसी शहराचं‚ तेथील मंदिरांचं‚ छोट्या छोट्या नद्यांचं‚ झऱ्यांचं आणि त्या शहराच्या वैभवाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मला एकदा तरी काशीला जाऊन येण्याची तीव्र इच्छा झाली होती. पण कामाचं दडपण आणि दैनंदिन गोष्टीमध्ये मी इतकी गुंतले होते‚ की ते जमतच नव्हतं.
१९९५ सालच्या दिवाळीत मला कुणीतरी एक भेट पाठवली. मी ती उघडून पाहिली. ते एक पुस्तक होतं. पुस्तकाचं शीर्षक होतं- ‘बनारस : प्रकाशाचं गाव.’  डायना एल. एक. या लेखिकेनं ते लिहिलं होतं. मी ते बाजूला ठेवून दिलं. दिवाळीची गडबड संपली की निवांतपणे ते वाचायचं‚ असं मी ठरवलं होतं. त्या वर्षी दिवाळीत परंपरागत आरती करायची‚ असं आम्ही कुटुंबीयांनी ठरवलं होतं. मी माझ्या खोलीत जाऊन माझी जुनी ट्रंक उघडून बसले. मला पूजेसाठी चांदीचं तबक काढायचं होतं. अचानक मला तो कुंकवाचा करंडा दिसला आणि माझ्या अव्वाची तीव्रतेनं आठवण झाली. मी त्या तबकाविषयी पूर्णपणे विसरले. मी हळुवार हातांनी तो करंडा उघडला आणि माझ्यासमोर अव्वा आली. ती करंड्यातून कुंकू घेऊन कसं लावायची‚ ते आठवलं. ती त्या दिवशी काशी समाराधनेच्या कार्यक्रमासाठी कशी तयार झाली होती‚ त्याची मला आठवण झाली. आम्ही दोघी पायी पायी चालत‚ गप्पागोष्टी करत त्या समारंभात गेलो होतो‚ ते सगळं डोळ्यांसमोर उभं राहिलं. तिनं तो कुंकवाचा करंडा मला द्यावा‚ म्हणून मी तिच्यापाशी किती लाडीगोडी लावत असे‚ तेही मला आठवलं. तिचा काशीयात्रेला जाण्यावर किती गाढ विश्वास होता. पण तिला स्वतःला कधीच काशीला जाण्याची संधी मिळाली नाही. एवढं असूनही तिला त्या गोष्टीचा कधी खेद वाटला नाही. मी स्वतःशीच म्हणाले‚ ‘‘आजकाल काशीला जाणं इतकी काही काठीण गोष्ट राहिलेली नाही. शिवाय डायनानं लिहिलेलं हे पुस्तक माझ्या सोबतीला आहे. मी जाण्यापूर्वी ते वाचलं‚ की मला ते शहर नीट कळेल. माझ्या आजीसाठी तरी मला काशीला जायलाच हवं...’’
‘‘काय गं? आतल्या खोलीत काय ध्यान वगैरे लावून बसली आहेस की काय?’’ माझी आई बाहेरून विचारत होती. ‘‘चल लवकर‚ बाहेर ये. सगळे इथे वाट बघतायत.’’
आईच्या हाकांनी मी भानावर आले.
मी घाईनं ते तबक शोधलं आणि हातात तबक आणि तो कुंकवाचा करंडा घेऊन बाहेर आले. मी त्या दोन्ही गोष्टी माझ्या आईच्या हातात ठेवल्या.
‘‘अरे वा‚ हा तर माझ्या आईचा कुंकवाचा करंडा. तिचा अत्यंत आवडता होता हा. म्हणजे या करंड्याच्या रूपानं जणू काही आईच आपल्यात आज आहे.’’ माझी आई म्हणाली.
दिवाळीचे दिवस संपल्यावर मी ते बनारस शहराबद्दलचं पुस्तक वाचायला घेतलं. ते पुस्तक अप्रतिम सुंदर होतं. खरंतर त्या लेखिकेनं हार्वर्ड विद्यापीठात सादर केलेला तो पीएच.डी.चा प्रबंध होता. ती एक परदेशी स्त्री होती ती. मुद्दाम भारतात येऊन राहिली होती. तिनं इथल्या धर्मक्षेत्रांचा खास अभ्यास केला होता आणि इथे मी काहीही न करता नुसती बसून होते. मला स्वतःचीच लाज वाटली. ते पुस्तक वाचून मला काशीला भेट देण्याची तीव्र इच्छा झाली. मला बालपणी त्या नगराविषयी जी उत्सुकता वाटली होती‚ त्याची आठवण झाली. शिवाय माझ्या आजीची अपुरी राहिलेली इच्छासुद्धा पूर्ण करायची होती.
१९९६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात मी कोणालाही बरोबर न घेता एकटीच काशीला गेले. तिथं एका हॉटेलात उतरले. शहराच्या एका टोकाला असलेल्या विश्वनाथ मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलं. मंदिरात विश्वानाथाची बिल्वपत्रांची पूजा करण्यात येत होती. तिथे दर्शनासाठी आलेल्या लोकांची मोठीच गर्दी उसळली होती. तिथे बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा पहारा होता. पलीकडच्या बाजूलाच ग्यानवापी मशीद होती. दोहोंच्या मधोमध तारेचं कुंपण होतं. माझ्या मनात या मंदिराची जी प्रतिमा होती‚ त्यापेक्षा खूपच वेगळं दृश्य होतं ते. ते पाहून माझी थोडी निराशा झाली. पण देशभरातून विविध वयाचे लोक तिथे दर्शनासाठी आले होते. त्यांची श्रद्धा व भक्ती पाहून मी आश्चर्यानं थक्क झाले.
मंदिरात दर्शन घेऊन मी बाहेर पडले‚ ती थेट मणिकर्णिका घाटावर गेले. या ठिकाणी अहोरात्र चिता पेटलेल्या असतात. मृतदेहांचं दहन करण्याचं काम सुरूच असतं. आपल्या देशात शिक्षणाचा इतका प्रसार झाला‚ संस्कृतीमध्ये इतके बदल घडून झाले तरीही काशीला देह ठेवल्यावर स्वर्गप्राप्ती होते‚ या संकल्पनेत काहीही बदल झाला नाही. त्यानंतर मी आणखीही घाटांवर जाऊन आले. या पवित्र शहरात जागोजागी घाणीचं साम्राज्य पाहून उबग आला. त्यानंतर मदन मोहन मालवीय यांनी एकट्याच्या जिवावर उभ्या केलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाला मी भेट दिली. तसेच वस्तुसंग्रहालये पाहिली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचं तैलचित्रांच्या माध्यमातून केलेलं मनोहारी चित्रण या संग्रहालयांमध्ये पाहायला मिळालं.
मी पायी चालत अनेक मंदिरांमध्ये जाऊन तिथल्या देवदेवतांचं दर्शन घेतलं. अन्नपूर्णा देवी‚ भैरवनाथ‚ संकटमोचन हनुमानाचं  प्रसिद्ध मंदिर‚ असं सगळं पाहिलं. हनुमान मंदिरात भक्तांपेक्षा जास्त संख्येनं माकडं उपस्थित होती. माझ्या आजूबाजूला सर्वत्र काळे गंडे विक्रीला ठेवण्यात आले होते. पण मी मात्र एकसुद्धा खरेदी केला नाही. कारण आता माझा त्यावर विश्वास उरला नव्हता. गंगेचं पाणीसुद्धा लहान-मोठ्या कलशांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं. गंगेचं पाणी आजही पवित्र मानण्यात येतं.
त्यानंतर काशीच्या गल्ल्या-बोळ्यांमधून मी पायी भटकंती केली. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. जागोजागी दुकानांमध्ये अतिशय सुंदर बनारसी साड्यांचं प्रदर्शन मांडलेलं होतं. कित्येक साड्या माझ्या नजरेत भरल्या. खरंच‚ साडी हा सुंदर शोध आहे. एक लांब कापडाचा पट्टा‚ आणि तो नेसण्याच्या किती विविध पद्धती! ग्रीक‚ रोमन आणि आपण भारतीयांनी शोधून काढलेल्या! मी अनेकदा परदेश प्रवास करते. तिथं भेटलेल्या अनेक लोकांकडून मला आपल्या भारतीय साडीचं− तिच्या काठपदराचं‚ तिच्या सौंदर्याचं वर्णन ऐकायला मिळतं. साडी नेसलेल्या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच दिमाख आणि भारदस्तपणा प्राप्त होतो. मी कित्येक लोकांना साडीच्या सौंदर्यानं भारावून गेलेलं पाहिलं आहे.
काशीमध्ये अत्यंत सुंदर आणि आगळ्यावेगळ्या बनारसी साड्या निर्माण होतात. ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. काळानुसार त्यात थोडेफार बदल घडून आलेले आहेत; पण आजही तिथे बनणाऱ्या साड्या सुंदरच असतात. मीसुद्धा स्वतःसाठी थोड्या साड्या खरेदी करायचा बेत केला होता. एक फिक्या रंगाची साडी आणि एक  अव्वाकडे होती तशी हिरव्यागर्द रंगाची साडी. दुकानातील विक्रेते मला आणि रस्त्यावरच्या इतर लोकांना बोलावत होते. साड्या खरेदी करण्याच्या विचाराने मी हरखून गेले होते. पण मग मी स्वतःच्या मनाला समजावलं- ‘एवढी घाई करायची काय गरज आहे; उद्या आणखी थोड्या साड्या बघून झाल्यावर सावकाश खरेदी करता येईल.’ मग मी नुसतंच रस्त्यांमधून  फेरफटका मारायचं ठरवलं.
मी चालता-चालता पुन्हा एकदा घाटांकडे गेले. अखेर मी अत्यंत गजबजलेल्या दशाश्वमेध घाटापाशी जाऊन पोहोचले. तिथे बरीच गर्दी जमली होती. आरतीची तयारी सुरू होती. मी आजूबाजूला नजर फिरवली. तिथे बरेच पर्यटक होते. ते केवळ भारतातल्या विविध राज्यांमधूनच नव्हे‚ तर जगभरातून आलेले होते. ते हसून परिसराचे फोटो काढत होते. तिथली घाण‚ तिथले गल्ल्या-बोळ‚ तिथली ती उबग आणणारी गर्दी यांपैकी कशाचाच त्यांना त्रास होताना दिसत नव्हता. तिथे ध्यानस्थ बसलेले साधू होते. काही भक्त गंगास्नानाची तयारी करता होते. ते पाहून मलासुद्धा मोह पडला. ‘आपणही गंगेच्या पाण्यात एक डुबकी घ्यायला काय हरकत आहे! आपणही तीन ओंजळी पाण्याचं अघ्र्य देऊन या काशीयात्रेची सांगता केली पाहिजे.’−माझ्या मनात आलं. मग त्या पाण्याकडे निरखून पाहिलं. त्या पाण्यात खूप घाण तरंगत होती. तिथे डुबकी मारायला माझं मन होईना. मला अचानक आठवण झाली. माझा एक जुना मित्र अजय या घाटाच्या जवळपासच कुठेतरी राहत होता. ‘गंगेच्या पाण्यात उतरण्यासाठी जवळपास कुठलं कमी गर्दीचं‚ जरा स्वच्छ ठिकाण आहे का‚ हे त्याला विचारलं पाहिजे‚’ मी स्वतःशीच म्हणाले.
मी जवळ असलेल्या पे फोनवरून त्याला फोन केला. मी काशीला येत असल्याचं अजयला आधी कळवलं नव्हतं‚ याबद्दल तो माझ्यावर चिडला. मग त्यानं मला त्याच ठिकाणी थांबायला सांगितलं. काही मिनिटांतच तो स्कूटरवरून तिथं आला.
‘‘मुळात तुझा मित्र या शहरात राहत असताना तू हॉटेलत जाऊन राहिलीसच कशी? आत्ताच्या आता सामान घेऊन माझ्या घरी चल.’’ तो म्हणाला.
त्याचं मन मोडणं माझ्या जिवावर आलं. मी त्याचं म्हणणं मान्य केलं.
मी सामानसुमान घेऊन त्याच्या हवेलीत येऊन दाखल झाले. त्या हवेलीत तीन कुटुंब राहत होती. हवेली खूपच मोठी होती. प्रत्येक कुटुंबाला स्वतःची स्वतंत्र जागा होती. अजयच्या घराच्या बाजूने गंगेचं विस्तीर्ण पात्र दिसत होतं. रात्री अंधारात दिवे चमकत होते. अत्यंत सुंदर दृश्य होतं ते.
त्याची पत्नी निशी हिनं मला आग्रहानं जेवायला वाढलं. खास बनारसी मिठाई आणि बनारसी पान असा छान बेत केला. त्यानंतर अजय मला हिंदुस्थानी संगीताच्या मैफलीला घेऊन गेला. हे शहर संगीतप्रेमींचं शहर होतं. बिसमिल्ला खान आणि रविशंकर यांच्यासारखे महान वादक याच शहरातले. हे शहर कितीही घाणीनं भरलेलं असलं‚ तरीसुद्धा ते जिवंत होतं‚ इथली संस्कृती चैतन्यपूर्ण होती.
मी पहाटे उठून घाटावर गेले. गंगेत डुबकी मारण्याची मनाची तयारी करून गेले. मी आधी पायऱ्यांवर एकटीच जाऊन बसले. नंतर पाण्यात उतरून खांद्यापर्यंत नदीच्या पात्रात शिरले. पाणी खूप थंडगार होतं. माझ्या अंगात हुडहुडी भरली. पण जरा वेळात त्याची सवय झाली.
मी हातांच्या ओंजळीत पाणी घेतलं आणि मला अव्वाची आठवण झाली. माझ्या नजरेसमोर ती उभी राहिली. हिरवीकंच साडी आणि पिवळा ब्लाऊज घालून ती उभी होती. ती प्रेमानं माझ्याकडे पाहत होती. गंगेच्या पाण्याच्या तीन ओंजळींविषयी मला सांगत होती. मला त्या उन्हाळ्यात व्हरांड्यात बसलेल्या माझ्या आजोबांची-काकांची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर तरळली. कुणी‚ कधी काशीला जायचं‚ हे स्वतः काशीचा विश्वनाथच ठरवतो‚ असं त्यांनी मला सांगितलं होतं. माझ्या आजी-आजोबांना या काशी शहराविषयी‚ गंगा नदीविषयी केवढं प्रेम होतं! माझे डोळे पाण्यानं भरून आले. किती तृप्त आणि समाधानी होते माझे आजी-आजोबा. त्यांची ईश्वरावर किती गाढ श्रद्धा होती. असे आजी-आजोबा मला लाभले हे माझं केवढं भाग्य!
‘‘आजकाल काशीला जाणं किती सोपं झालंय‚’’ माझ्या मनात आलं. ‘‘मी बंगळूरहून विमानानं दिल्लीला आणि तिथून वाराणसीला आले. मी केवळ पाच तासांत इथे येऊन पोहोचले. आता परत गेल्यावर काशी समाराधने नव्हतं‚ जेवणावळी नव्हत्या. लोकांना काळे गंडे आणि गंगाजळ वाटायचं नव्हतं. या सगळ्या गोष्टींसाठी कुणाकडे वेळही नव्हता आणि कुणाची इच्छाही नव्हती.’’
मी उगवत्या सूर्याकडे पाहिलं आणि वर्तमानात परत आले. मी हातांत गंगेच्या पाण्याची ओंजळ घेऊन म्हणाले‚ ‘‘हे गंगामाते‚ आज मी इथे या उगवत्या सूर्याच्या साक्षीने ही पहिली ओंजळ माझ्या आजी-आजोबांच्या वतीने तुला अर्पण करत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. ते जिथे कुठे असतील‚ तिथे सुखात राहू देत.’’
मला त्यानंतर खूप मोकळं झाल्यासारखं‚ खूप हलकं वाटलं. माझ्या आजोबांनी मला काहीही सांगितलं नव्हतं. पण तरीसुद्धा काशीयात्रा करण्याची त्यांची इच्छा मी आज पूर्ण केली होती.
त्यानंतर मी आणखी एक ओंजळभर पाणी घेऊन मोठ्यांदा म्हणाले‚ ‘‘हे गंगामाते‚ या सूर्याच्या साक्षीने तू सातत्याने आमच्या देशाची जीवनधारा बनून राहिली आहेस. तू तुझ्या या काठावर अनेक साम्राज्ये उदयास येताना आणि जमीनदोस्त होताना पाहिली आहेस. मी या देशात जन्माला आल्याबद्दल कृतज्ञ आहे आणि या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान वाटतो. तुझा असाच उत्कर्ष होऊ देत; मी या ओंजळभर पाण्याशिवाय तुला दुसरं काय देऊ शकणार?’’
पाण्याची तिसरी ओंजळ भरून घेत असताना मला माझ्या आजोबांचे शब्द आठवले. *‘‘तुला जी गोष्ट सर्वांत प्रिय आहे‚ ती सोड.’’*
‘‘मी कुठल्या गोष्टीचा त्याग करू?’’ मी विचारात पडले. हे जीवन‚ विविधरंग‚ आकार‚ निसर्ग‚ संगीत‚ कलाकृती‚ वाचन आणि खरेदी हे सर्वच अत्यंत प्रिय होतं. साडी खरेदी ही माझी अतिशय आवडती गोष्ट होती. मला निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगाच्या साड्या आवडायच्या. दर वर्षी बदलत चाललेल्या साड्यांच्या विविध  डिझाईन्सची मला नेहमीच भुरळ पडायची. ‘‘ठरलं तर मग. मला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट मी सोडली पाहिजे‚ असं या काशी शहराचंच म्हणणं आहे तर *आज इथे‚ या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं मी आजपासून मी सर्व प्रकारच्या खरेदीवर पाणी सोडत आहे.  अन्न‚ औषधपाणी‚ प्रवास‚ पुस्तके व संगीत याचा अपवाद वगळता‚ मी इथून पुढे कोणत्याही प्रकारची खरेदी करणार नाही. मी आजपासून हा नेम करत असून‚ माझ्या जीवनाच्या शेवटापर्यंत मी या गोष्टीचं पालन करेन‚’’ असं म्हणून मी ओंजळीतील पाणी गंगा नदीच्या प्रवाहात सोडलं.*
दूरवर कुठेतरी माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुटल्यासारखं मला वाटलं. काही क्षणांनंतर मी पाण्यातून चालत बाहेर आले आणि टॉवेल पांघरून घाटाच्या पायऱ्यांवर जरा वेळ बसले.
मग अजयच्या घरी परत येऊन मी कपडे बदलले आणि अव्वाच्या कुंकवाच्या करंड्यातून चिमूटभर कुंकू घेऊन स्वतःच्या कपाळाला लावलं.
ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची आहे.
खरं सांगायचं‚ तर मी तो नेम केला आणि मला एक नवीन स्वातंत्र्य प्राप्त झालं. *आता स्वतःसाठी कशाचाही संचय करण्याची इच्छाच मनातून नाहीशी झाली आहे.* वर्षातून एकदा माझ्या काही जवळच्या मैत्रिणी‚ बहिणी मला त्यांच्या पसंतीच्या साड्या भेट म्हणून देतात. त्या साड्या मी नंतरचे कित्येक दिवस वापरते. पण जसजशी वर्षं गेली‚ तेव्हा हळूहळू मला त्या भेटी स्वीकारणंही नकोस वाटू लागलं. मला आता कुणीही काही देऊ नका‚ असं मी आता सर्वांना सांगितलं आहे.
*त्या शेवटच्या ओंजळभर पाण्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं आहे.*

♦️ *सुधा मूर्ती* ♦️

आज काल पाव। महेश मंडलिक

आज कल पाव.....

परवा सकाळी सकाळी चहा घेताना हिनं माझ्यापुढं प्लॅस्टिकचा डबा सरकवला आणि म्हणाली, अरे आपल्या शेजारी एक नवीनच बेकरी उघडलीय, काल तिथून मी खास तुझ्या साठी छान बटर आणलेत ते घे. बटर म्हणल्यावर मी ताबडतोब डब्याचा ताबा घेतला. झाकण उघडून बघितलं तर आत मध्यम वाटीच्या आकाराचे खरपूस भाजलेले बटर होते. ते बटर पाहताच मी एकदम ७५-७६ सालातच गेलो.

म्हणजे मी साधारणतः चौथीत असेन. लहानपणा पासून मला चहा पोळी खायला प्रचंड आवडायचं. ताज्या किंवा शिळ्या पोळीचा घट्ट रोल करून, अर्धा अधिक चहात बुडवून, भिजवुन खाणे म्हणजे एक आनंद होता. अश्यात, एक दिवस मी कोणाकडे तरी पहिला बटर खाल्ला आणि मला तो खूप आवडला. त्या वेळेस खरंतर हे बटर १० पैशात दोन येत असत. पण तेव्हढे सुद्धा आणायला मला आईच्या खुप मागे लागायला लागायचं. तेव्हा फार काही कळत नव्हतं, पण नंतर कधीतरी कमवायला लागल्यावर, आईशी गप्पा मारताना ते कळलं. त्यावेळी आई नोकरी करायची, खडकी च्या शाळेत शिकवायची. तिची शाळा सकाळी सात सव्वासात ला असायची त्यामुळं तिला घरातून सहाला निघायला लागायचं, तेव्हा ती साडेसहाची बस, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल पासून पकडू शकायची. तिच्या बसचं तिकीट २५ पैसे होतं. आम्ही तेव्हा बालगंधर्व जवळ राहायचो, त्यामुळं कधी जरा उशीर झाला तर तिला रिक्षा करायला लागायची आणि रिक्षावाला बालगंधर्व ते COEP हॉस्टेल पर्यंत १ रुपया घ्यायचा आणि असे ४/५ 'उशीर' अख्ख्या महिन्याचं बजेट कोसळवायला पुरेसे असायचे. मला आठवतंय, त्या सुमारास मी एकदा, एकटा माझ्या मावशीकडे, म्हणजे सदाशिव पेठ हौदा पाशी बसनं गेलो होतो. ते सुद्धा संभाजी बागेच्या पहिल्या गेटच्या जवळच्या बस स्टॉप पासून कुमठेकर रोडवरच्या चितळे सदन पर्यंत. किती तिकीट होतं तर १५ पैसे ! त्यावेळी एकटं जाताना खूप भारी वाटलं होतं, अर्थात बसवायला आई आली होती आणि उतरवून घ्यायला मावशी. तर सांगायचं कारण जाण्यायेण्याला लागणारे पैसे बटर सारख्या फालतू किंवा '"कुत्र्याच्या खाण्यावर" कशाला खर्च करायचे असा साधा विचार होता.अर्थात तो मला नंतर समजला. 

काही काळातच आर्थिक परिस्थिती जरा सुधारल्यावर, माझं बटर वरचं प्रेम ओसरून पावावर कधी बसलं ते मला कळलंही नाही. त्यावेळी आपटे रोड वर हनुमान बेकरी होती (आताची संतोष बेकरी), तिथे खूपसे बेकरी आयटम बनायचे. म्हणजे छोटा ब्रेड साधारणपणे ७/८ स्लाईसेस असलेला, ४५ पैशात मिळायचा आणि त्याच्या पेक्षा आकाराने मोठा आणि १२/१३ स्लाइसेसचा १ ते १.२५ रुपयाला असायचा. दर एक तारखेला मला छोटा ब्रेड आणायला परवानगी असायची, कारण आईनं आणि मी ठरवलं होतं की, आईचा पगार झाला की ती मला ४५ पैसे देणार, त्यामुळं १ तारीख केव्हा एकदा येतेय असं मला व्हायचं. ब्रेड खाण्याची माझी पद्धत बाकीच्यांना जरा वियर्ड किंवा चमत्कारिकच वाटायची. दोनच स्लाईस खायचे, त्यामुळं एक चहात बुडवुन खायचा आणि दुसरा चक्क बशीत ठेऊन, वरून कपातला उरलेला चहा ओतून, पूर्ण भिजवून (आईच्या भाषेत थडगं करून) बशीला तोंड लावून खायचा. तो पूर्ण भिजलेला, लुसलुशीत ब्रेड जिभेवरून घशात ढकलताना अवर्णनीय सुखाची अनुभूती यायची. कुणाला हे खूप ई... वाटू शकतं असं माझ्या खिसगणतीतही नसायचं, कारण असल्या छोट्या छोट्या गोष्टींतून मला आनंद मिळायचा. मध्यंतरी, हा प्रयोग मी घरात केल्यावर हिच्या सकट मुलांनी कपाळाला हात लावला. असो, तर सांगत होतो, आता मला बेकरीतले सगळेच आयटम खुणावायला लागले होते. हनुमान बेकरीत त्यावेळी छोटे / मोठे वाटी केक्स, क्रीमरोल्स (त्याच्या वरच्या टोकाशी असलेलं क्रीम बाहेर येऊन मला वाकुल्या दाखवायचं), दोन्ही पाळ्या खुसखुशीत पण सेन्टरला जरा फुगीर आणि थोडीशी कच्ची अशी पिळाची खारी, कॅरम च्या स्ट्रायकर पेक्षा थोडी मोठी अशी खुसखुशीत नानकटाई आणि खरपूस भाजलेले आयताकृती पॅटिस बनत. हे सगळे आयटम बनताना, तेथे एक अतिशय खमंग वास येत असे, तो वास मी कधीच विसरू शकत नाही, रादर तो वास अजूनही माझ्या नाकात भरून आहे. 

आम्ही जेथे राहात होतो, तिथून जवळच जंगली महाराज रोडवर हॉटेल पर्ल च्या समोर, अशोक बेकरी म्हणून एक बेकरी होती, आता ती नाहीये, पण पूर्वी ती माझ्या फार आवडीची होती. तिथूनच मी पहिल्यांदा बटर आणले होते. तिथं नेहमीचे ब्रेड, बटर, खारी, क्रीमरोल्स या व्यतिरिक्त, बरेच खास आयटम सुद्धा मिळायचे उदा. बनपाव, डोनट, क्रीमकेक, जॅमकेक. मला आठवतंय, मी जेव्हा बटर घ्यायला जायचो, तेव्हा तिथे काचेच्या काउंटर खाली, अल्युमिनियम च्या ट्रे मध्ये, साधारण ३"x ३" आकाराचे क्रीमचे केक्स ठेवलेले असत. वरती हार्डली ३ ते ४ मिलिमीटर जाडीचा क्रीमचा गुलाबी थर आणि त्यावर निळसर किंवा पिवळं नाजूक क्रीमचंच फूल. त्याच्याच शेजारच्या ट्रे मध्ये, पुर्वीच्या काळी बैठी लाकडी उतरती डेस्क असत ना, त्या आकाराचे केक्स असत आणि त्या केकच्या वरच्या आणि खालच्या भागा मध्ये लावलेला लाल लाल जॅम चा थर नजर खेचून घेत असे. तेव्हा त्या केक्स ची किंमत पण २५ आणि ३५ पैसे होती, त्यामुळं मी गुमान १० पैशाचे दोन बटर घेऊन घरी यायचो. पण मन मात्र त्या केक्स भोवतीच रेंगाळत असायचं. एकदा काय झालं, माझी मावशी आमच्या कडे आली होती. तशी ती नेहमीच यायची, कारण ती आईची लाडकी, शिवाय ती आणि आई दोघीही शिक्षिका आणि ते सुद्धा एके ठिकाणी. ती राहायची सदाशिव पेठेतल्या हौदाजवळ. ती माझे लाड करायची, पण मी तिला कायम म्हणायचो तू माझ्या दादाचेच जास्ती लाड करतेस. तेव्हा ती मेल्या, असं म्हणून माझ्या मागे लागायची. ती येताना कधी कधी खडकीहून माझ्यासाठी ब्रून (मोठ्ठा बटर, जिरं वगैरे घातलेला) घेऊन यायची. एक दिवस ती घरी आली असताना, मी आईला म्हणालो, आई, मी क्रीमचे केक्स आणू का ? अपेक्षेप्रमाणे आई नाही म्हणाली, पण मग मावशी म्हणाली मेल्या, तुला केक्स खायचेत ? मी म्हणालो हो, त्यावर ती म्हणाली चल, मी तुला केक्स खायला घालीन, पण एका अटीवर, माझ्याघरी सायकल वर एकटं यायचं. बघ, आलास तर मी तुला परातभर केक आणि किटलीभर चहा देईन. प्रस्ताव अत्यंत आकर्षक होता, पण एक गोची होती आणि ती फारच सॉलिड होती. मला सायकल चालवायलाच येत नव्हती. आता काय करायचं ह्या विचारात मी पडलो, कारण काका म्हणजे तीर्थरूप, त्यांच्या ऑफिस च्या मित्रांसोबत ट्रिप ला गेले होते आणि पंधरा दिवसांनी येणार होते. ते केव्हा येणार आणि केव्हा मला शिकवणार हा प्रश्न मला पडला. काही समजत नव्हतं. तरीपण मावशीचं चॅलेंज मी स्वीकारलं. मला आठवतंय ते १९७७ साल होतं आणि शिक्षकांचा संप झाला होता आणि तो जवळ जवळ ५१ दिवस चालला. आमच्या कडे काकांची सायकल होतीच, मग काय त्या सुट्टीत माझी माझीच सायकल शिकलो अगदी कुणालाही खबर न लागू देता, अर्थात आईला सोडून. आणि मग एक दिवस, आईला सांगून मावशीकडे दत्त म्हणून उभा राहिलो. पहिल्यांदा तिचा विश्वासच बसला नाही, पण मग सायकल बघून तिची खात्री पटली. मी आईला सांगून आलोय म्हटल्यावर ती निश्चिन्त झाली आणि ताबडतोब तिनं माझ्या मोठ्या मावसभावाला केक आणायला पिटाळले. खरोखर परात भरेल एव्हढे केक्स तिनं आणवले आणि भरपूर चहा करून मला खायला घातले. तर असं माझं केक, नव्हे मैदा प्रेम फुलू लागलं.

अर्थात नंतर मोठं झाल्यावर केकचं अप्रूप राहिलं नाही, पण मैद्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. मैद्याचा कुठलाही प्रकार मला वर्ज्य नव्हता आणि अजूनही नाहीये ! म्हणजे जेव्हा मैद्याला पर्यायी गोष्टी यायला लागल्या, तश्या त्या मी पुर्णपणे फेटाळून लावल्या. उदा. कणकेची बिस्किटे, व्हीट ब्रेड, मल्टि ग्रेन ब्रेड, अय्यंगारचा रवा केक. अरे , हे काय पर्याय आहेत का ? शेवटी सचिन तो सचिनच, जरी काही वेळेला कांबळी चांगला खेळला म्हणजे तो काही सचिन ची जागा घेऊ शकत नाही. असं आपलं माझं मत, ह्यात मतांतरे असू शकतात. आता हेच बघा, अस्सल नानकटाई किंवा गेलाबाजार मारी किंवा ग्लुकोजचं बिस्कीट चहात बुडवून खाताना जिभेवर जी चव रेंगाळते, ती कणकेच्या बिस्किटाने येते का ? उमरावजान मध्ये, उमरावजान म्हणून आणि मुकद्दर का सिकंदर मध्ये जोहराबाई म्हणून फक्त आणि फक्त रेखाच डोळ्या पुढे यायला पाहिजे नाही का ? तिथं कॅटरिना किंवा करीना ची कल्पना तरी करवते का ? नाही, ना ? तसंच आहे हे. 

आता ह्या ब्रेडचीच किती रूपं आहेत बघा. हा टोस्ट बनून चहा बरोबर येतो, आम्लेट बरोबर स्लाईस म्हणून येतो, चेंज म्हणून ब्रेड उप्पीट होऊन येतो, बटाट्या वड्याचा तर हा सच्चा साथीदार, ब्रेड पॅटिस, सँडविच अश्या स्टायलिश रूपांत पण तो येतो. अगदी झालंच तर तो रात्री आमटी बरोबर पुरावठ्याला सुद्धा येतो. ह्या पावाचा एक स्लाईस आमटीत बुडवून, लुसलुशीत करून मुखात सोडल्यावर काय बिशाद आहे की तृप्ततेची ढेकर येणार नाही. अजून एक सांगतो, ताज्या पावाचे स्लाईस घ्या, कडा नको असतील तर काढून टाका, मस्त एक चमचाभर लोणी घ्या (ताजं असेल तर अतिउत्तम, फ्रीज मधलं असेल तर थोडं आधी बाहेर काढून ठेवा) त्या स्लाईस वर सगळीकडे पसरावा आणि त्यावर थोडी साखर भुरभुरवा, साखर अगदी पिठी नको किंवा खांडसरी, म्हणजे जाड पण नको, पुळंण असेल तर फार उत्तम. अश्या पावाच्या स्लाईसचा तुकडा अलगद तोडून खाताना लोणी, साखर आणि ताज्या पावाची जी चव जिभेवर रेंगाळते, ती फारच अफलातून असते, त्यातून एखादा बारीक साखरेचा दाणा दाताखाली आला, तर मग बघायलाच नको. सोबत एक चहाचा घुटका घेतला की ब्रह्मनंदीच लागली म्हणून समजा. असाच प्रयोग जरा झणझणीत दाण्याची किंवा लसणाची चटणी दोन ताज्या स्लाईस मध्ये घालून केला, तर तो पण अप्रतिमच होतो हे मी स्वानुभवातून ठाम पणे सांगू शकतो. 

आतापर्यंत बऱ्याच कॉर्पोरेट मिटिंग्ज आणि सेमिनार्स अटेंड केलेयत. अश्या वेळी एक टी ब्रेक असतो. त्यात असे काही महाभाग किंवा नमुने बघितलेत, की ते बिनधास्त आपल्या कडे कुणी बघतंय वगैरे याची तमा न बाळगता, बाउल मध्ये असलेल्या कुकीज किंवा बिस्किट्स खुशाल चहाच्या कपात बुडवून खातात आणि समजा अर्धा भाग चहात पडलाच, तर खुशाल दुसऱ्या बिस्किटाने काढून खातात. हे खरे मैदा प्रेमी ह्यांना मानायलाच पाहिजे. बेकरी आयटम खायच्या सुद्धा काही पद्धती आहेत आणि ते तसेच खावेत. उदा. क्रीमरोल हा चहात बुडवून नव्हे, तर बुचकळूनच खायचा असतो. जसं आमरस हा चमच्या ऐवजी डायरेक्ट वाटी तोंडाला लावूनच प्यायचा असतो, श्रीखंड चमच्याने खाणे हे मागासले पणाचं लक्षण आहे, ते नेहमी बोटानं चाटून च खायचं असतं तसं. अहो, आपल्याला आत्मिक समाधान लाभतं, मग लोकांची फिकीर कशाला करायची. पिळाची खारी, टोस्ट वगैरे बुडवून खाल्ले तरी चालतात. पिळाच्या खारीवरून आठवलं, माझा एक मित्र आहे, त्याला मी वर म्हटली तशी पिळाची, पण मध्ये जरा कच्ची राहिलेली अशीच खारी आवडते, बाकीच्यांच्या खाऱ्या म्हणजे नुसतं भुसकट असं त्याचं ठाम मत आहे. आमचं दोघांचं हे मैदा प्रेम इतकं आहे की, आम्ही दोघं पूर्वीच्या कंपनीत एकत्र कामा निमित्त एकदा बाहेरगावी राहिलेलो असताना मध्ये रविवार आला. त्या दिवशी आम्ही सकाळी फार ब्रेकफास्ट वगैरे न करता, जेवण्याच्या वेळेस दोन थर्मास भर चहा आणि त्याच गावातील प्रसिद्ध बेकरीतून आणलेले क्रीमरोल्स आणि केक्स फस्त केले. तो आणि अजून माझे एक दोन मित्र आहेत. आमच्यात एक डील झालेलं आहे, ते म्हणजे अगदी पुण्यात, कॅम्प मध्ये आमच्या पैकी कुणी गेलं तर कयानीतुन श्रुजबेरी आणि साधा किंवा मावा केक आणायचाच. ह्यात कुचराई झाली तर बोलणी खायची हे ठरलेलं. तसंच कुणीही कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी गेलं, तर येताना तिथले स्पेशल बेकरी आयटम आणायचे. मग त्यात कधी बेळगावचे मसाला टोस्ट, हनी केक्स असतात, तर कधी नगर जवळच्या जलारामचे टोस्ट आणि खारी असतात. ही खारी सुद्धा कशी खायची ह्याची प्रोसिजर पण पॅकिंग वर छापलीय अगदी चित्र काढून ! कमाल आहे ना ? पण खरंच, त्यांच्या सांगण्या प्रमाणे, खारी खायच्या आधी, थोडी गरम करून घेतली म्हणजे त्यातलं घट्ट झालेलं तूप थोडं वितळतं आणि मग ती खारी अजूनच खुमासदार लागते. अगदी चहा मुरतांना, चहाच्या झाकणावर गरम करून तो आनंद मी मिळवतो.

मैद्याचं कसं आहे, तो बिचारा सगळे अत्याचार सहन करतो, पण तुम्हाला मात्र अद्वैताचा आनंद देतो आणि तेही खुसखुशीतपणे. हो माझ्या लेखी अद्वैताचाच. कारण अद्वैताची प्राप्ती द्वैतातूनच होत असते. म्हणजे कसं, तर मैद्याची समर्पित वृत्ती, चहा बरोबरच खुलून येते (कॉफी बरोबर नाही) आणि मोक्षप्राप्ती चा आनंद देते. शिवाय असं बघा, नुसतं बेकरी प्रॉडक्ट्स पुरतं त्यानं स्वतः ला मर्यादित नाही ठेवलं. दिवाळीच्या फराळातून ह्याला वजा करा बरं, करंजी ला हात तरी लावला जाईल का ? चिरोट्याकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही, गोडे किंवा खारे शंकरपाळे मटकाविले जातील का ? अहो, याचा नुसता सहभाग जाणवला ना तरी पदार्थ खुशीत येतो. येथे करीना, सॉरी कणिक मिसळून बघा बरं, छे मला तर कल्पना ही सहन होत नाही. असो, एक खरं की दिवाळीच्या फराळाची लज्जत नुसत्या चकल्या, कडबोळ्या नी नाही येत, तर मैदा त्यात खरी खुमारी आणतो. 

मी लहानपणापासून बेकरी आयटम खातोय. माझं हे वेड त्यावेळी सगळ्यांना ठाऊक होतं, त्यामुळं माझा कोल्हापूरचा आत्येभाऊ किंवा आत्याचे यजमान पुण्याला येताना हटकून माझ्यासाठी स्लाईस न केलेला पाव घेऊन यायचे. तो पाव इतका लुसलुशीत आणि गोड असायचा की मी त्यांची फेरी आमच्या कडे कधी होतीय याची वाट बघायचो. तशी पावाची टेस्ट आजपर्यंत मला पुण्यात सोडा, पण कोल्हापूर मध्ये पण शोधून सापडली नाहीये. परवा सुद्धा बटर खाताना माझ्या मनात हाच विचार आला, की हल्ली इतक्या प्रकारचे बेकरी आयटम मिळायला लागलेत त्यात हरतऱ्हेचे ब्रेड सॉरी पाव सुद्धा मिळायला लागलेत आणि ते मी खातो सुद्धा, पण तरीही, आज कल पाव नही मिलते वैसे, हेच खरं.

सर्व मैदा प्रेमींना समर्पित.

महेश मंडलीक

मिसळ एक रसग्रहण

मिसळा- यण

*मिसळ - एक रसग्रहण*

मिसळ खाणे एक आनंद सोहळा असतो.

मिसळ हा खरं तर गरीबापासून श्रीमंतांपर्यन्तचा राजमान्य राजश्री बेत. अश्या या मिसळीचा स्वाद घेण्याचे एक शास्त्र आहे.

म्हणजे बघा, उत्तमात-उत्तम मिसळ कुठे मिळेल याची आधी माहिती काढावी. मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ हादडली याला काहीच अर्थ नाही.

मिसळ खायला जाण्याच्या आधी त्या मिसळीचा इतिहास, बनवण्याचं  तंत्र, मिसळीतले घटक पदार्थ, यांचा अभ्यास करावा.

उगाच चिचूंद्रया वाटीत, पातळ बेचव रस्सा देणाऱ्या मिसळीच्या दुकानात पाऊलही ठेवू नये.

अश्या निवडलेल्या मिसळीच्या ठिकाणी शक्यतो कमी गर्दीच्या वेळी पोहोचावे.

चांगली उजेडाची आणि हवेशीर जागा बघुन आपली बैठक मारावी आणि मिसळ ऑर्डर करावी.

काही ठिकाणी मिसळ ऑर्डर केली की आधी कांदा आणि लिंबू याची प्लेट आणून देतात.

काही मुर्ख लगेच त्यातील कांदा तोंडात टाकतात, लिंबु चाखुन बघतात. असं कधीही करु नये. 

हे म्हणजे वाग्दत पत्नीला भेटण्यासाठी गेलेलं असतांना, तिच्याच धाकट्या बहिणीवर नजर टाकण्याइतकं आचरटपणाचं आहे.

हे असले पदार्थ मिसळ खाण्याआधी तोंडात टाकून तुम्ही जिभेचा स्वाद ही बिघडवून टाकता.

तर, मिसळ समोर येवु द्यावी. मिसळ शक्यतो आडव्या मोठ्या डिश मध्ये असावी. उगाच छटाकभर गोलाकार डिश मध्ये अजिबात असू नये.

समोर उजव्या बाजूला कमीत कमी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा असावा. त्यात कोथिंबीर असणं क्रमप्राप्त आहे. नसेल, तर सरळ निषेध नोंदवा. कांद्या बरोबर लिंबाच्या फोडी असाव्यात.

डाव्या बाजूला गरमागरम, चमचमित रश्याचं भांडं असावं.

त्यातील लाल-पिवळा, काळसर तर्रीबाज रश्याचा वास नाकाच्या रंध्रा रंध्रात सामावून घेत जीभेला आवाहन करावे. नुसत्या त्या वासाने जिभेत उत्साह सळसळला पाहिजे.

सर्व मांडामांडी झाली की लगेच भसकन मिसळ खायला सुरुवात करू नये.

प्रथम मिसळी मध्ये काय काय आहे याचा अंदाज घ्यावा. ती व्यवस्थित मिसळून घ्यावी. मस्त मिसळून झाली कि त्यातील रस्सा शेव, पापडी, शेंगदाणे इत्यादी पदार्थात शोषला जातो. मिसळ थोडी घट्टही होते.

मग रस्सा चमच्याने व्यवस्थित घुसळून त्यातील उसळीचा भाग या मिश्रणावर नीट पसरवावा. मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे.

त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी.

सर्वात शेवटी, चवी पुरते लिंबू पिळावे. उगाच समोर आहे म्हणून भरमसाठ लिंबू पिळून मिसळीचा स्वाद बिघडू नये.

आता पाव. तो मऊ, लुसलूशित ताजातवाना असावा. कडक झालेला, सुरकुतलेला, काळे ठिपके असलेला पाव लगेच धुत्कारुन लावावा.

पावाची डिश डाव्या बाजूला ठेवावी. आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी.

पावचा छोटा टुकड़ा तोडून तो मिसळ मध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा जिभेवर अभिषेक करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात!

हळूहळू, स्वाद घेत घेत खावे. मधुनच कच्चा कांदा चवी पुरता खावा. 

खातांना घाई करु नये. तसंच खात असतांना ऑफिसचं काम, साहेबाचा विक्षिप्त स्वभाव, राजकारण असल्या क्षुद्र गोष्टींची चर्चाही करु नये. 

मिसळ खाणं हे एक योगसाधन आहे.

प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. तो मिसळीचा विनयभंग असतो.

पावामुळे डिश मधले रस्स्याचे प्रमाण कमी होते. मग थोडे खाणे थांबवावे. पुन्हा रस्साचे भांडे समोर आणावे. ते गरम नसेल तर दूसरे आणायला सांगावे. मग पुन्हा तो गरमागरम रस्सा आपल्या मिसळीत टाकून, मिसळून घ्यावा.

हा रस्सा भांडयातून मिसळीवर टाकतांना त्याचे दोन चार थेंब तुमच्या कपड्यावर उडालेच पाहिजेत. नाहीतर तुम्ही मिसळीशी एकरूप झालाच नाही असा अर्थ होतो.

पुन्हा कांदा, लिंबू याचे सोपस्कर करावे. आणि पुन्हा खायला सुरुवात करावी.

आणि असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

जास्तीत जास्त दोन पावात मिसळ खावी. आपला उद्देश मिसळ खाणे हा आहे, पाव खाणे नाही. त्यामुळे पाव कमी, मिसळ जास्त असू द्यावी. तरच मिसळीचा मान राखला जातो.

नुसतंच पोट भरेपर्यंत खाऊ नये. आत्मा संतुष्ट होईपर्यंत खावं. 

खातांना डाएटींग, ब्लड शुगर, कोलेसटेरॉल असले चिंताजनक विचार डोक्यात आणू नयेत.

खाऊन झालं कि रिकाम्या डिश मध्ये एक मोठा चमचाभर रस्सा ओतून घ्यावा. चमच्या चमच्याने तो रस्सा ग्रहण करावा.

तुमच्या नाकातून, डोळ्यातून पाणी आलं आणि कपाळावर घामाचे दवबिंदु जमले कि मिसळ सुखरूप पोहोचली हे ओळखावं!

आता तुम्ही हात धुवायला मोकळे!

ज्या कोणा अन्नपुर्णेने ही मिसळ बनवली तिचे आभार मानावे, तिला दीर्घायुष्य चिंतावं.

समोरचा चहा घेण्याआधी जरा हाताचा वास घ्यावा. 

मिसळ अजूनही आपल्या बोटांवर रेंगाळत असते, पुन्हा येण्याचं वचन मागत असते!  😃😋😃

Friday, May 29, 2020

बाबुराव अर्नालकर । सतीश चाफेकर

सुप्रसिद्ध लेखक , रहस्य कादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...

बाबुराव अर्नाळकर यांचा जन्म ९ जून १९०९ ( काहीजण १९०७ असेही म्हणतात ) रोजी झाला. अर्थात ही तारीख ज्योतिषाच्या मदतीने काढलेली आहे. अर्नाळ्याच्या या जबरदस्त लेखकाचं मूळ नाव आहे ‘ चंद्रकांत सखाराम चव्हाण ! ' आईबापाचं छत्र अगदी लहानपणीच हरवल्यामुळं त्यांना  मुंबईच्या यावे लागले  त्यांचे शिक्षण मुंबईत झाले.  मुबंईत आल्यावर एका कुटुंबात ते व्हरांड्यात रहात होते  त्या कुटुंबात  इंदिरा नावाची  मुलगी होती पुढे तिच्याशी त्यांनी  विवाह केला. त्याचे शिक्षण आर्यन शाळेत झाले .  ते एका ब्रिटिश कंपनीमध्ये कामाला होते . परंतु त्यांना   नोकरीत रस नव्हता. मुंबईत एका चष्म्याच्या दुकानातला अनुभव होता.  बाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते , ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत. वयाच्या ५५ व्या वर्षी बाबूरावांनी चष्म्याचे दुकान बंद केले.
मला आठवतंय गिरगावातल्या त्या दुकानाजवळ कुतूहलाने मी जायचो , कारण तेथे माझे एक नातेवाईक रहात होते ,  अगदी लहानपणी जायचो त्या  छोट्या  चष्म्याच्या  दुकानाजवळ . तेथे एक व्यक्ती लिहीत बसलेली असे , किंवा त्या दुकानात दिसे. ते लेखक आहेत अशी घरात चर्चा व्हायची  परंतु  ते बाबुराव अर्नाळकर होते हे मला मागाहून कळले . 
 गुन्हेगारीची आणि गुन्हेगाराच्या तपासणीची आधुनिक तंत्रंही तिकडेच विकसित झाली आहेत. इतर लेखकही त्याचा उपयोग आपल्या लेखनात करतात. मग एकटय़ा अर्नाळकरना दोष देऊन काय उपयोग ? बाबूराव अर्नाळकरांनी आपल्या रहस्यकथांचे स्वरूप अखेपर्यंत निभ्रेळ ठेवले. त्यांत कधी जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतपिशाच्च, परग्रहावरील जीव अशा गोष्टी येऊ दिल्या नाहीत. बाबूरावांचे कथा नायक-नायिका अर्नाळकरांनी त्या वेळी धनंजयमाला, झुंजारमाला, जयहिंदमाला, प्रफुल्लमाला, यौवनमाला अशा माला सुरू करून त्यातून दरमहा पाच-सहा कथा लिहिल्या. धनंजयमालेत डिटेक्टिव्ह धनंजय व त्यांचा मदतनीस छोटू असायचा. झुंजारमालेत झुंजार हा रंगेल उठावगीर असा होता, त्याच्याबरोबर विजया होती.   नेताजी हा नोकर पण सहायक होता. काळापहाड आणि  पत्नी सुहासिनी असायची. दिवसा उजेडी तोच चंद्रवदन व्हायचा. सामान्य जनतेचे शत्रू असलेल्या बदमाशाला अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचं. याशिवाय गोलंदाज, कोदंडराव अशी पात्रंही होती. धर्मसिंग हा त्यातील बदमाश, तसेच शेरखान , सुंदरा ही झुंजार विजयाप्रमाणेच एक जोडी, दर्यासागर एक चाचा. आबा दरेकर हे एक बेरकी पात्र. अशा अनेक पात्रे  त्यांनी निर्माण केली.  त्यांनी  पहिली रहस्य कादंबरी  वयाच्या ३७ व्या वर्षी १९४६ मध्ये लिहिली. तिचं नाव होतं ‘ चौकटची राणी ’ या कादंबरीनं वाचकांना अक्षरश: वेड लावले. त्याच्या काळा  पहाड आणि झुंझारने तर माझ्यासारख्या अनेकांचे तरुणपण व्यापून टाकले होते. अर्थात त्या वयाची गरजच होती म्हणण्यापेक्षा त्यांच्या कादंबऱ्यामधील ओघवती भाषा आणि एकापाठोपाठ घडणारे प्रसंग हातातून पुस्तक सोडू देत  नव्हते. काही ' विचारवंतांनी '  नाके मुरडली , अर्थात ह्या मध्ये ' समीक्षक ' हा वर्गही होता आणि असणारच . बाबुरावांनी १९३६ ते १९८४ या कालखंडात १०९२ रहस्यकथा लिहिल्या. गिनीज बुक मध्ये नोंद झालेले बाबुराव अर्नाळकर हे मराठीमधील पहिले  लेखक म्हणावे लागतील. मला आठवतंय जेव्हा बाबुरावांचे नाव ' गिनिज बुक ' मध्ये आले तेव्हा मी शोधत शोधत त्याच्या पांडुरंगवाडीतील गोरेगावच्या घरी गेलो होतो. तेव्हा आदल्याच दिवशी त्यांचे अभिनंदन करायला सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी येऊन गेले होते. बाबुरावांचे लेखन सगळ्यांनी मान्य केले होते जे उत्तम लेखक आणि उत्तम माणूस होते . बाबुराव हे साडेशहान्नव टक्क्यांचे  लेखक होते , साडेतीन टक्क्यांचे लेखक नव्हते आणि त्यांना त्याची पर्वा नव्हती . १४८० च्या वर कादंबऱ्या लिहिणे हा काही जोक नाही . आमची अनेक लेखक मंडळी आत्मचरित्र आणि एकदोन पुस्तकातच जेव्हा संपतात तेव्हा त्याच्या मागे ' कसदर साहित्य ' याचे बिरुद लागते. बाबुराव मला सांगत होते की मी लिहिताना अक्षरशः ' परकाया प्रेवश ' करायचो. हा परकाया प्रवेश किती  लेखकांना जमतो . फारच कमी लेखकांना जमतो कारण तिथे लेखक संपूर्णपणे त्या कथानकात , व्यक्तिचित्रात एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे घुसलेला असतो. बाबुरावांचे वाचक हे १२ वर्षांपासून ते ८०-८५ वर्षापर्यंतचे होते. जर बाबुराव परदेशात जन्माला आले असते तर तिथल्या लोकांनी त्यांना डोकयावर घेतले असते आणि मग आमच्या लोकांनी. बाबुराव म्हणाले अनके कादंबऱ्यातून मी मुबईचे वर्णन  करत असे त्यात वाळकेश्वर पासून नेपियन सी पर्यंत  अनेक विभागांची नावे  असत त्यावेळी गावातून आलेले वाचक त्या विभागात रात्रीच्या वेळी फिरून कुठे काळापहाड , झुंझार  दिसतो का ते बघायचे.  अशा अनेक बाबुरावांनी निर्माण केलेल्यांना नायकांना मी काय शेकडो, हजरो , लाखो वाचक भेटले असतील ते त्यांच्या  पुस्तकातूनच. अशी पुस्तके म्हणजे खरे तर त्यावेळी  वाचनसंस्कृतीचा पाया होता असच म्हणावे लागेल. ' काळा पहाड ’ हाही झुंजारप्रमाणेच गुप्तहेरगिरीत प्रवीण आहे. तो रबरी तळवे असलेले बूट घालतो. मुखवटा घेऊन वावरतो. धनंजय आणि छोटू हे मारामारी न करता रहस्य उलगडणारे. आश्चर्य म्हणजे, यातील केवळ ‘ धनंजय ' च रुपेरी पडद्यावर आला. संगीतकार सी. रामचंद्र यांनी तो सिनेमा बनवला होता. त्या सिनेमात त्यांनीच ' धनंजय ' चे काम केले होते. 

मी जेव्हा बाबुराव अर्नाळकर यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी त्यांची दृष्टी अधू झालेली होती . जवळजवळ काहीच  त्यांना दिसत नव्हते. मी एका  मासिकासाठी त्यांची मुलखात घ्यायला गेलो होतो त्यावेळी त्यांचा मुलगा शेखर हा होता . बाबुरावाना मी माझ्या स्वाक्षरीच्या छंदाबद्दल सांगेतले तेव्हा त्यानी  त्याच्या मुलाच्या मदतीने एक अभिप्राय लिहून दिला होता आणि त्याखाली त्यांनी स्वाक्षरी केली होती . त्याना माझा आवाज त्याच्या मानलेल्या मुलासारखा वाटत होता. काही महिन्यांनी मी त्या मासिकात लेख आल्यावर त्याच्या गोरेगावच्या निवासस्थानी गेलो , मी त्याच्याशी बोलू लागलो तेव्हा ते मोठमोठयाने रडू लागले आणि रडता  रडता म्हणाले अरे शेखर गेला रे . जवळजवळ पाऊण तास  ते माझा हात हातात घेऊन रडत होते. काळापहाड आणि झुंझारचा निर्माता माझ्यासमोर रडत होता मला खूप वाईट वाटत होते , मी त्यांची समजूत घालत होतो. माझ्यामनात विचार आला शेवटी ते माणूसच होते. त्यानंतर का कुणास ठाऊक त्याच्या घरी जाण्याचे  मला कधीच धाडस झाले  नाही. पूढे  ते गेल्यावर मी काही वर्षांनी कल्याणच्या श्री. विभाकर कर्वे यांना भेटलो, त्याच्याकडे बाबुरावांच्या १८०० पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी त्यांच्या खूप आठवणी सांगितल्या . मी अनेक पुस्तकांच्या कव्हर्सचे फोटो काढले. विभाकर कर्वे म्हणजे त्यांचे खरे मानसपुत्रच म्हणावे लागतील. त्याचे खरे भक्तच आहेत ते अगदी गिरगावात असल्यापासून त्याच्याशी त्यांची मैत्री होती. सतीश भावसार यांनी बाबुरावांवर जे पुस्तक काढले आहे त्यासाठी लता मंगेशकर यांनी त्यांना एक पत्र दिले . त्यात त्यांनी लिहिले आहे  "रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकरांबरोबर आम्हा मंगेशकरांचा, खास करून आमची आई " माई "  हिचा परिचय होता. तिच्यामुळे आम्हा भावंडांना बाबूरावांच्या रहस्यकथा वाचण्याची आवड निर्माण झाली. धनंजय, छोटू, झुंझार, काळा पहाड या रहस्यकथा आम्ही वाचलेल्या आहेत. आपण निर्माण करीत अाहात त्या ग्रंथाला आम्हा मंगेशकर भावंडांच्या मनापासून शुभेच्छा! ' .

बालगंधर्व आजारी असताना बाबूराव अर्नाळकर त्यांना भेटायला माहीमला गेले होते. तेव्हा बालगंधर्व
 म्हणाले, ’माझी सेवा करणारी दोनच माणसे उरली आहेत, एक गोहर आणि दुसरे तुम्ही. मी तुमची पुस्तके वाचतो आणि सगळी दुःखे विसरतो.’

आज बाबुराव आपल्यात नाही परंतु त्यांनी जे निर्माण केले त्याला तोड नाही. बाबुरावांबद्दल  एक मोठे पुस्तक बाबुरावांच्या कार्याबद्दल , कादंबऱ्याबद्दल आले आहे.त्यात त्यांचे हस्ताक्षर असते तर बरे वाटले असते.  मला वाटते आजचा तरुण वर्ग आणि  कालचा, परवाचा तरुणवर्ग त्याचे निश्चित स्वागत करेल. निदान कळेल ' बाबुराव अर्नाळकर नावाची एक जिवंत दंतकथा होती  अशा ह्या विख्यात लेखकाचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले.

सतीश चाफेकर

लोकमत

Tuesday, May 26, 2020

परवीन सुलताना । नितीन आरेकर

सुप्रभात, *वलयांकितांच्या सहवासात* या लेखमालेतील दुसरा लेख.
आवडला तर सांगा आणि तुमच्या स्नेह्यांना जरूर शेअर करा- 

५ जुलै १९८१. नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. दादरचा राम मारुती रोडवरचा सी.के.पी. समाज हॉल. माझ्या धाकट्या काकाचं, रविकाकाचं लग्न होतं. रजिस्टर्ड लग्न झालं व स्वागत समारंभ सुरू झाला. साडे अकरा-बाराच्या सुमारास हॉलच्या दरवाजापाशी एकदम धांदल उडाली. अरुणकाका मुळे एका अत्यंत देखण्या, जुन्या काळातली राणी असावी अशा रुबाबदार महिलेसमवेत हॉलमध्ये शिरला. तिच्याबरोबर तिच्यापेक्षा साधारण फूटभर उंच असलेला, तितकाच देखणा पुरुषही होता. तिनं उंची साडी परिधान केली होती, तिच्या अंगावरून प्रकाश परिवर्तित होत होता, मोठे मोठे पारदर्शी डोळे, त्यात भरलेलं काजळ, लांब केसांची घट्ट वेणी बांधलेली, मोजके पण ऐश्वर्यसमृद्ध दागिने तिनं घातलेले; तर त्या पुरुषानं पांढरा शुभ्र झब्बा आणि पायजमा घातलेला, लांब कुरळे भरगच्च केस, स्वप्नील पण दुसऱ्याच्या हृदयाचा ठाव घेणारे डोळे. सारे नवदांपत्याकडे गेले. आम्ही पोरं भांबावलो होतो. आई कानात म्हणाली, "या बेगम परवीन सुलताना आहेत, आणि ते उस्ताद दिलशाद खां, त्यांचे पती." मी लांबून त्या दोघांकडे पाहात बसलो, आणि पाहातच बसलो. अचानक आठवलं, उस्तादजींना मी 'मिली' सिनेमात पाहिलं होतं. त्यात ते डॉक्टरची भूमिका करत होते. आणि परवीनजी तर त्यांच्या आवाजामुळे आमच्या घराचा एक अविभाज्य हिस्सा झालेल्या होत्या. रविकाकाच्या खजिन्यात त्यांच्या बऱ्याच रेकॉर्ड्स होत्या. त्याच्या बोलण्यात 'परवीनजी' असा उल्लेख कायम असायचा. पण रविकाकाचं लग्न, हा मी त्यांना पाहण्याचा पहिला प्रसंग!

 
त्या लग्नातला या सर्वांचा फोटो आहे. खांसाहेब मध्यभागी उभे आहेत, त्यांनी दोन्ही खांदे फैलावून रविकाका आणि अरुणकाकाला कवेत घेतला होता. आजही तो क्षण मनात कायमस्वरूपी बसला आहे. एवढी मोठी गायिका पण लग्नाच्या पंगतीमध्ये सर्वांसोबत जेवायला बसली. ब्राह्मणी पद्धतीचं जेवण आवडीनं जेवली. प्रत्येक पदार्थाची त्यांनी ओळख करून घेतली व त्या मनसोक्त जेवल्या. जाताना माझ्या एक्याऐंशी वर्षांच्या आजीला व्यक्तिश: भेटून, तिला खाली वाकून नमस्कार करून गेल्या. खांसाहेबांनीही तिला वाकून नमस्कार केला. आई म्हणाली, "हे संस्कार असतात."

त्यांच्या या पहिल्या दर्शनानंतर त्यांचं गाणं अधिक जवळचं झालं. शास्त्रीय संगीत हे जाणकारांनाच कळतं. मला ते आजतागायत कळलेलं नाही. तुम्हाला जेव्हा खूप कळायला लागतं, तेव्हा असमाधानाच्या पाकोळ्या भिरभिरायला लागतात. एखादी गोष्ट न कळताही अज्ञानाचा आनंदही भोगता यायला हवा. मला तो भोगता येतो.

१९८३ चा सुमार असावा. (सालाची खात्री नाही) त्या काळात दूरदर्शन हा एकमेव चॅनेल होता. पुढच्या आठवड्यात कोणते कार्यक्रम आहेत, ते दर रविवारी सकाळी दाखवलं जायचं. तो त्या काळातला लोकप्रिय कार्यक्रम होता. आम्ही वह्या घेऊन बसायचो, कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम बघायचा, हे नक्की करून ठेवायचं. तर जानेवारी महिन्यातल्या एका रविवारी सकाळी 'साप्ताहिकी' सुरू होती आणि येत्या शनिवारी रात्री नॅशनल नेटवर्कवर साडे नऊ वाजता परवीनजी व खांसाहेब अशी जुगलबंदी आहे, असं निवेदिकेनं सांगितलं. लगेच कार्यक्रमाची क्षणचित्रे दाखवली गेली. खांसाहेब व परवीनजी, असे दोघे काश्मीरमधल्या एका हाऊसबोटीवर बसून गायन करताना दिसले. मी शनिवारची वाट बघू लागलो. साडे आठ वाजता लाईट गेले. लगेच आमची फोना फोनी सुरू झाली. एम्.एस्.ई.बी. वाल्या मंडळींकडे धावपळ केली आणि कसेबसे नऊ पंचवीस वाजता लाईट आले. बरोबर साडे नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला. ते दोघं त्या दिवशी जे काही गायले ते अद्भूत होतं. ते कोणता राग गायले, त्याचे आरोह-अवरोह कसे होते, हे कळण्याची माझी क्षमता नव्हती. पण, माझ्यासारख्या औरंगजेबाला जागेवर बांधून ठेवण्याचं अफालतून गारुड त्यांच्या गायनात होतं. परवीनजींचा कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसलेला, तिन्ही सप्तकांत वीजेसारखा लीलया फिरणारा नितळ, निकोप, धारदार आणि तरीही कानाला मृदू असणारा आवाज व खांसाहेबांचा घनगंभीर, प्रशांत महासागराच्या खोलीतून येणारा, सारी खळबळ, सारी उर्जा खंबीरपणे धरून असलेला, वीजेला पोटात सामावून घेणारा आणि तिला कोंदण प्राप्त करून देणारा स्वर ... अफाट जुगलबंदी होती ती. या क्षणीही कर्णसंपुटाला त्यांच्या अस्तित्त्वाचं सार्थकत्त्व बहाल करणारी ती जुगलबंदी आठवते!

`वलयांकितांच्या सहवासात' या लेखमालिकेतील हा लेख, `मराठीसृष्टी डॉट कॉम` (www.marathisrushti.com) या वेबपोर्टलवर दिनांक २५ मे २०२० रोजी प्रथम प्रकाशित झाला.

मला राजेश खन्ना आणि किशोरकुमार हे काँबिनेशन फार आवडतं. किशोरकुमार गेल्यावर तर मी काही दिवस सूतक पाळलं होतं. राजेश खन्नाचा बेकार चित्रपटही मी आवर्जून पाहायचो. तसा मी 'कुदरत' नावाचा चित्रपट पाहिला आणि त्यातलं 'हमें तुमसे प्यार कितना' हे गाणं ऐकलं. ते दोघांनी किशोरकुमार आणि परवीनजींनी गायलं होतं. फॉर अ चेंज, मला पहिल्यांदा किशोरकुमारइतकंच परवीनजींनी गायलेलं गाणं आवडलं. ('शर्मिली'त किशोरकुमार आणि लता मंगेशकर दोघेही 'खिलते है गुल यहाँ', हे गाणं गातात. मला किशोरचंच आवडतं. का? या प्रश्नाला उत्तर नाही) मी रविकाकाच्या मागे लागायचो, मला परवीनजींना भेटायचंय. पण ते जमतच नव्हतं.

दरम्यान शिक्षण, प्राध्यापकी, स्वत:ला स्थिरता प्राप्त करून देणं अशा प्रकारे मी जगण्याच्या मागे लागलो.

प्राचार्य दिनेश पंजवानी नावाच्या एका मोठ्या झपाट्याच्या प्राचार्यानं आम्हां शिक्षकांना मोठी स्वप्नं पाहायला शिकवलं. त्या स्वप्नांचा एक भाग म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महान व्यक्तीना, त्यातही कलावंतांना विद्यार्थ्यांच्या भेटीला आणणं. पहिले रवींद्र जैन, मग उस्ताद झाकीर हुसेन. तिसऱ्या वर्षी कोणाला बोलवायचं याचा विचार सुरू झाला. मी सुचवलं, "आपण परवीन सुलतानांना तिसरा गौरव पुरस्कार देऊ या का?" सर म्हणाले, "तू त्यांनाही ओळखतोस?" मी - "हो, मी ओळखतो. त्या मला ओळखत नाहीत. पण रविकाकाचा व त्यांचा दोघांचा स्नेहबंध घट्ट आहे." सरांनी सुचवलं, "ठीक आहे. असं कर, खांसाहेबांनाही ते येऊ शकतील का? असं विचार." मी एकदम हवेत गेलो.

 
रविकाकानं परवीनजींना फोन केला. त्यांनी क्षणात येण्याचं मान्य केलं. मी व रविकाका त्यांच्या खारच्या घरी त्यांना निमंत्रण करायला गेलो. चर्चबेल वाजते तशी त्यांच्या दारावरची बेल होती. राहीनं दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो. साधारण अठरा बाय पंधराचा तो हॉल होता. छान सजवला होता. धूप दरवळत होता. साधेसे सोफे होते, खाली पसरलेली एक गादी, लोड, तक्क्ये होते. भिंतीवर मक्केचं चित्र होतं. दुसऱ्या बाजूला सत्यसाईबाबांची तसबीर होती. मी अवघडून बसलो होतो, तर रविकाका आरामात बसला होता. काही क्षणांनंतर मधल्या दारावरचा पडदा बाजूला सारून परवीनजी आल्या. साधासा पंजाबी ड्रेस, हातात सोन्याचे नक्षीदार तोडे, कपाळावर मोठं कुंकू आणि मुद्रवर प्रसन्न हास्य! रविकाका सहजपणे आणि मी धपडपत उठलो. "अरे रविभाई कैसे हो? आजकल तो आप आतेही नहीं हो?" रविकाकाने माझी ओळख करून दिली. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. "जिते रहो बेटा, जिते रहो. भगवान को नमश्कार करना चाहिये, इन्सान को नहीं।" मी पटकन म्हणालो, "जी, आप जैसे कलाकारों में भगवान दिखते है।" त्यांनी मिश्कील नजरेनं माझ्याकडे पाहिलं, मजेत हसल्या. बावीस वर्षांपूर्वी त्यांना जसं बघितलं तशाच त्या दिसत होत्या. मी त्यांना आमच्या गौरव दिवसाची कल्पना समजावून द्यायला सुरुवात केली. तर त्यांनी मला थोपवलं व अस्खलित मराठीत म्हणाल्या, "बेटा, आरामात बस. रविभाईने सांगितलं म्हणजे मी येणार. नाही, आम्ही येणार! तुम्ही आता काय घेणार ते सांगा. चहा, कॉफी की शरबत?" आणि मग त्या स्वत: स्वयंपाकघरात गेल्या. स्वत: चहा केला, काही कुकीज आणि मिठाई एका ट्रेमध्ये घेऊन आल्या. त्या नुकत्याच उत्तर भारतात मैफिलीसाठी जाऊन आल्या होत्या. तिथून आणलेली मिठाई होती. त्या मिठाईबद्दल त्या माहिती देऊ लागल्या. ती कशापासून बनवतात, कशी बनवतात, कोणत्या उत्सवात तिचं महत्त्व असतं, हे सारं त्या वर्णन करून सांगत होत्या. भारतातील सर्वश्रेष्ठ शास्त्रोक्त संगीत गायिकांमधील ही एक गायिका, जिनं माझं आवडतं गाणं गायलंय ती गायिका, संगीताविषयी न बोलता मिठाईबद्दल बोलत होती. चहा वगैरे झाल्यावर मग त्यांनी विचारलं, "अब बताओ बेटा, प्रोग्राम कैसे होगा?" मी त्यांना कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्यामागील कल्पना सांगितली. त्यांच्याकडे तारीख मागितली. त्या म्हणाल्या, "तुला कोणती हवी ते सांग." मी ३० जानेवारी २००३ म्हणालो. त्यांनी होकार दिला. आम्ही त्या उभयतांना आमचा 'गौरव पुरस्कार' देणार होतो. परवीनजी म्हणाल्या, "बेटा, एक बात का ख़याल रहे, पहले सम्मान खांसाब का होगा, बाद में मेरा होगा। वह मेरे पती है इसलिये नहीं। वह मेरे गुरु है। मैं उन्हीं के पास आज भी सिखती हूँ।" मी हैराणलो. "आज भी का मतलब क्या?" मी विचारलं. "अरे भई, परवीन आज भी बड़े सुबह पाच बजें उठकर रियाज़ करती है," असं म्हणत खांसाहेबांनी प्रवेश केला. साडे सहा फूट उंचीचे खांसाहेब हॉलमध्ये शिरताच तो हॉल भरून गेला. "बेटा ध्यान में रखना, रियाज़ करोगे तो राज करोगे" दीदी म्हणाल्या, "हां ह़म दोनों रोज़ बडे सुबह पाच बज़े उठकर रियाज़ करते हैं। रात को कितनी भी देरी होने दो, सुबह पाच बज़े रियाज़ शुरू।" "रविभाई कैसे हो?" आपल्या लांब केसांची झुल्फे दोन्ही हातांनी मागे सारत खांसाहेबांनी विचारणा केली. ते नमाज़ पढून आले होते. त्यांच्या गप्पा सुरू राहिल्या. ते तिघं स्नेही एकमेकांशी बोलत होते. मी बघत होतो.

ठरल्या दिवशी त्या दोघांना घेऊन रविकाका कॉलेजला आला. स्वागतासाठी प्राचार्य आणि अन्य उपप्राचार्य उभे होते. आमच्या उपप्राचार्या उमा विश्वकर्मा यांना बघून परवीनजी हर्षभरित झाल्या. त्यांनी भर्रकन पुढे होऊन त्यांना मिठी मारली. दोघींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. आम्ही आश्चर्यचकित झालेलो. माझ्याकडे बघून परवीनजी म्हणाल्या, "बेटा, खांसाहेब व मी, शादाबच्या (त्यांची मुलगी) जन्मानंतर पहिल्यांदा परदेशात गेलो, तेव्हा खांसाहेबांची एक शिष्या अंबरनाथला राहायची. शादाबला आम्ही तिच्याजवळ सोडून गेलो होतो. उमा तिच्यासमोर राहायची. तिनंही शादाबची काळजी घेतली. हम दोनों सहेलीयां है." उमा मॅडमना मी नंतर विचारलं, "तुम्ही आधी का बोलला नाहीत?" त्या म्हणाल्या, "बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटणार होतो, ती खूप मोठी गायिका झालीय. शी इज अ लीजंड नाऊ, काय माहीत ती ओळख देईल की नाही. बट नो, आय् वॉज राँग. शी डिड नॉट चेंज अट ऑल?" परवीनजींच्या व खांसाहेबांच्या सत्काराच्या वेळी समोर साडे तीन हजारांहून अधिक मुलं बसलेली होती. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम दोन अडीच तास रंगला. त्या कार्यक्रमात परवीनजींनी पद्म पुरस्कार देण्याच्या त्यावेळच्या प्रक्रियेवर सडकून टीका केली होती आणि नंतर तो कार्यक्रम 'टॉक ऑफ द प्रेस' बनला होता. परवीनजींनी मुलांसमोर आपल्या आयुष्यातील काही किस्से सांगितले आणि त्या गायल्या, "हमें तुमसे प्यार कितना." हे गाताना त्यांनी सर्व मुलांसमोर आपले हात नेले, आणि ते हात हृदयाशी नेऊन त्यांनी सांगितलं, "तुम्ही उद्याची आशा आहात. म्हणून हे गाणं तुमच्यासाठी." स्त्री-पुरुष प्रेमाच्या गीताला त्यांनी मातृप्रेमाची छटा दिली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमानंतर शेकडो मुला-मुलींनी त्या दोघांना गराडा घातला. त्यांनी सर्वांना खूश केलं, सह्या दिल्या, फोटो काढले. त्या महान गायिकेनं मुलांची मनं जिंकली.

 
त्याच वर्षी मला 'ऋतुरंग'च्या अरुण शेवतेंनी परवीनजींच्या मातृत्त्वाच्या अनुभवाचं शब्दांकन करण्यासाठी सांगितलं. मी परवीनजींना कल्पना सांगितली. एकच अपत्य व तेही कन्यारत्न असणाऱ्या पालकांवर त्या वर्षीचा 'ऋतुरंग'चा दिवाळी अंक असणार होता. ही कल्पना सांगितल्यावर त्यांना अतिशय आनंद वाटला, कौतुक वाटलं. त्यांनी मला दिवस व वेळ सांगितली. मी अर्थातच रविकाकाच्या बरोबर त्यांच्याकडे गेलो. मला 'परवीनजी' किंवा 'मॅडम' म्हणणं थोडंसं ऑड वाटत होतं. मी त्यांना 'दीदी' म्हणून साद दिली, त्यांनी हसून प्रतिसाद दिला. म्हणाल्या, "अब ठीक लग रहा है।" आमची ती मुलाखत रंगली. आम्ही दोन अडीच तास तिथं होतो. आपल्या मुलीबद्दल बोलताना कोणतीही आई जशी एक्साईट झालेली असते, तशाच त्या एक्साईट झालेल्या होत्या. "शादाब हे लग्नानंतर अनेक वर्षांनी झालेलं अपत्य आहे. आम्ही तो निर्णय ठरवून घेतला होता," दीदी मला म्हणालेल्या, "माझ्यावर जबाबदाऱ्या होत्या, खांसाहेबांवरही त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या होत्या. आम्ही दोघंही कलाकार. त्यामुळे एकूण आर्थिक स्थैर्य आल्याशिवाय मूल घेणं शक्य नव्हतं. आपण एक नवा जीव जगात आणतो आहोत, त्याला व्यवस्थित जगवता आलं पाहिजे. तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मग आम्ही दोघांनी मूल घेण्याचा निर्णय घेतला. तुला सांगते, मी ते आई होणं आणि नंतरचं आईपण खूप एंजॉय केलं. खरं म्हणशील तर आम्ही दोघांनी आई-बाप होण्याची प्रक्रिया उपभोगली." शादाब ही संगीताइतकंच त्यांच्या जीवनाचं केंद्रस्थान आहे. हा सारा अनुभव मी 'ऋतुरंग'साठी लिहिला. एका संगीत सम्राज्ञीच्या मातृत्त्वाचा अनुभव तिनं मोकळेपणानं सांगितला होता. मी त्यांना तो लेख प्रसिद्धीला देण्यापूर्वी वाचून दाखवायला गेलो, त्यांनी बारकाईनं ऐकला व एकाही ओळीचा बदल न करता छापायला मान्यता दिली. तो लेख खूप गाजला. दीदींनी नंतर कधीही माझ्या लेखांची आधी तपासणी केली नाही.

त्यानंतर मी दीदींकडे जाऊ लागलो. कधी रविकाका असायचा कधी नसायचा. त्यांच्या घरात कधी परकेपणा वाटला नाही. घराची बेल वाजवली की घरभर मंजूळ नादावून ती बाहेर ऐकू यायची. दीदी कायम सांगत, "येण्यापूर्वी रिंग देत जा." मी त्या भानगडीत कधी पडत नाही. आधी का कळवायचं? तर मी कर्जतहून त्यांच्याकडे आधी खारला आणि आता कांदिवलीला जाणार. त्या घरी नसल्या तर, माझी फेरी फुकट जायला नको, हा त्यांचा विचार असायचा. दोनदा त्यांनी मला सांगितलं, तिसऱ्या वेळी मीच त्यांना म्हणालो, "दीदी, देवाच्या देवळात जाण्यापूर्वी देवाला सांगायचं असतं का?" त्यानंतर मात्र त्यांनी आजपर्यंत मला कधीही सांगितलं नाही की फोन करून ये.

त्यांचं नवं घर कांदिवलीला आहे. मोठा फ्लॅट आहे. ते घर घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, "बेटा, मैं अब खार से और दूर, कांदिवली में रहने के लिये गयी हूँ।" पण जिथं मनात अंतर नसतं तिथं मैलांच्या अंतराला कुठे जागा असते? आम्हाला ते अंतर कधीच लांब वाटलेलं नाही. त्यांचं घर सोळाव्या मजल्यावर आहे. घराच्या दारावर दीदी, खांसाहेब आणि शादाब अशा तिघांच्या नावाची पितळी पाटी आहे. पहिल्यांदा त्यांच्या कांदिवलीच्या घरी गेलो, तर भला मोठा दरवाजा उघडून त्यांनी स्वागत केलं. मी पाटीकडे बघून छान आहे अशा अर्थानं मान डोलावली. तर दीदी म्हणाल्या "रविभाईने बना के दिया है।" त्यांच्या घराच्या आत पाऊल टाकलं की मोठा हॉल आहे. याला दिवाणखाना म्हणायला काही हरकत नाही. समोर तीन जण बसू शकतील असा सोफा आहे, त्याच्या दोन बाजूला एक एक कोच ठेवलेला आहे. मक्केचा मोठा फोटो आहे. एका बाजूच्या भिंतीवर सत्यसाईबाबांचा फोटो आहे. त्या फोटोच्या बाजूला त्या दोघांना मिळालेल्या काही महत्त्वाच्या स्मृतिचिह्नांची रचना आहे. जमिनीवर गालिचा आहे, त्यावर काही तक्क्ये पसरलेले असतात. दीदी एका सोफ्यावर बसल्या की मी त्यांच्या किंवा खांसाहेबांच्या पायाजवळ बसतो. ज्यानं त्यानं आपापली पायरी ओळखली पाहिजे.

 
तुम्ही त्यांच्या घरात पाऊल टाकलं व स्थिरस्थावर झालात की दीदी स्वत: उठून पाणी आणून देतात. त्यासोबत एखादा गोड पदार्थ असतोच. दीदी किंवा खांसाहेब सतत दौऱ्यावर असतात. कुठल्या तरी दौऱ्यावरून परतताना, त्यांनी त्या त्या भागातला प्रसिद्ध पदार्थ आणलेला असतो. तो त्या आवडीनं खिलवतात. परवीनजींना उत्तम खाण्याचा आणि खिलवण्याचा शौक आहे. त्यांच्या स्वराची माधुरी त्यांनी तयार केलेल्या पदार्थात असते. एकदा गप्पा मारताना त्यांनी एक किस्सा सांगितला - पूर्वी भारत सरकारच्या वतीनं जगभरात इंडिया फेस्टीव्हल केले जायचे. एकदा फ्रांसमध्ये कार्यक्रम होता. दीदी आणि खांसाहेबांच्या आधी काही दिवस, बिस्मिल्ला खांसाहेब पोहोचले होते. दीदींना पॅरिसच्या विमानतळावर उतरल्यावर भारतीय राजदूतांनी निरोप दिला की, "बिस्मिल्ला खांसाहेबांनी ताबडतोब बोलावलं आहे, ते वाट पाहात आहेत." दीदी धास्तावल्या. 'काय झालं असेल?' अशी शंका मनात येऊन त्या घाई घाईनं खांसाहेब जिथं उतरले थेट तिथे गेल्या. बिस्मिल्ला खांसाहेब त्यांची वाट पाहात होते. दीदींना बघितल्यावर त्यांनी हुश्श केलं. दीदींनाही हायसं वाटलं- "मेरी सांस रुकी थी। लेकीन जब बिस्मिल्ला खांसाब को ठीक ठाक देखा तो, मेरी जान में जान आ गयी," त्या म्हणाल्या. बिस्मिल्लाखांसाहेब त्यांना म्हणाले, "बेटा, यहां का डबल रोटी-बटर खाकर मैं परेशान हो गया हूँ और यहाँ का नॉनव्हेज खाने में डर लगता है। कुछ अच्छा खाने के लिये बनाओ।" ते बेचव जेवण जेवून बिस्मिल्ला खांसाहेब कावले होते. दीदी म्हणाल्या, "मेरी एक सहेली थी वहां। उसके साथ जा कर मैं बहोत सारा मटन लेकर आयी। उस फाइव्ह स्टार होटल के कीचन में गयी। वहां मैंने शेफ को रिक्वेस्ट किया। और अगले तीन घंटे के अंदर मैंने अपने जैसा खाना बनाया। पैंतीस लोगों ने वह खाना खाया था। मुझे गाना और खाना दोनो पसंत है।"

 
आणि हे खरं आहे. दीदी या बहुधा एकमेव गायिका असतील की ज्यांनी आवाजासाठी तेलकट, तुपकट खाणं, थंडगार सरबत सोडलं नसेल. प्रकाश माक्याचं तेलवाले धनंजय बेडेकर एकदा सांगत होते, कर्जतला त्यांच्याकडे परवीनजींचं शास्त्रोक्त गायन ठेवलं होतं. ओंकार गुलवडी आणि अप्पा जळगांवकर या साथीदारांसह धनंजय दीदींना घेऊन कर्जतला येत होता. १९८७ ची गोष्ट असेल. पळस्पा फाट्याजवळ तेव्हा नुकतंच पर्शिअन दरबार हॉटेल सुरू झालं होतं. त्यानं गाडी तिथं वळवली. दीदींच्या लक्षात आलं की गाडी पळस्प्याला आलीय. त्या म्हणाल्या, "इथं कुठं गाडी आणलीत. समोर घ्या. तिथं दत्त स्नॅक्स आहे. आपण तिथं कोथिंबीर वडी आणि बटाटेवडे खाऊ." धनंजय गार पडला. रात्री गाण्याचा कार्यक्रम आहे आणि आत्ता ह्या बटाटेवडे खाणार? गुलवडी त्याला म्हणाले, "काळजी करू नकोस. त्यांना सवय आहे." दीदींनी आवडीने कोथिंबीर वडी आणि बटाटेवडे खाल्ले. समोरच उसाचं गुऱ्हाळ होतं. हातानं फिरवायचा चरक होता. त्या म्हणाल्या, "आता रस पिऊ या." धनंजयने रसवाल्याला बर्फ न घालता रस आणायला सांगितलं. ते दीदींनी ऐकलं. गुऱ्हाळवाल्या व्यक्तीला त्या म्हणाल्या, "भाईसाब इनका मत सुनिये। बरफ डाल दीजिये।" त्यांनी भरपूर बर्फ घातलेला रस प्यायला आणि रात्री त्या रसाची गोडी त्यांच्या गायनात पूर्ण उतरली.

दीदींना अप्रतिम सौंदर्यदृष्टी आहे. त्या रात्री त्या कार्यक्रमासाठी कर्जतला धनंजयच्या घरी पोहोचल्या. घरात शिरता शिरता बागेत पिवळ्या रंगाचं टपोरं गुलाबाचं फूल दिसलं. त्यांनी आत शिरल्या शिरल्या रेखा वहिनींना सांगितलं, "वो पिला गुलाब का फूल निकाल कर फ्रीज़ में रखवा दो। मैं मोतिया कलर की साडी पहननेवाली हूँ। उसके साथ ये फूल अच्छा दिखेगा।" मी 'लोकसत्ते'साठी दीदींची भेट घेऊन शब्दांकन केलं होतं. त्यावेळी दीदी हसत हसत म्हणाल्या, "शुरुवाती दिनों में पहले मुझे देखने के लिये लोग आते थे और बाद में मेरे गाने में खो जाते थे।" मी आगाऊपणे त्यांच्या सौंदर्याबद्दल विचारलं, "तुम्ही इतक्या सुंदर दिसता. कोणती कोणती क्रीम लावता? कोणती काळजी घेता?" दीदी मोकळेपणाने हसल्या, म्हणाल्या, "बेटा, मी कोणतंही क्रीम लावत नाही की कसलीही काळजी घेत नाही. अल्लाह ने मला जशी घडवली तशीच मी राहते. गाण्याच्या आधी हलकासा मेक अप करते, बस! तशी माझी आई, मारूफा बेगम ही इराणी आहे, तिच्यातलं सौंदर्य मला वारसाहक्कानं मिळालं इतकंच."

दीदींचे वडील जनाब इकरामुल माजिद हे शास्त्रीय संगीताचे जाणकार होते, ते स्वत: उत्तम गात असत. (रविकाकाची व इकरामुल साहेबांची आधी जान पहेचान झाली व मग दीदींबरोबर त्याचा स्नेह जडला.) गोहाती रेडिओवरचा पहिला शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम त्यांच्या गायनाचा होता. दीदींच्या जन्मापूर्वी त्यांनी पत्नीला उत्तमोत्तम शास्त्रीय संगीत, लोकसंगीत ऐकवलं होतं. अभिमन्यूप्रमाणे दीदींना गर्भातच संगीत मिळालं. पण त्या अभिमन्यूच्या थोडं पुढे गेल्या. त्याला चक्रव्यूह भेदता आला नाही, दीदींना मात्र संगीतातले नवनवे चक्रव्यूह शोधून भेदता आले, व त्यातून त्यांच्या संगीताचा विलोभनीय व्यूह तयार झाला. दीदींचं गाणं ऐकताना मला, एक सामान्य रसिक म्हणून कोडी पडत नाहीत. त्या गाताना रसिकाला सोबत घेऊन जातात, रसिकाला त्या गाणं ऐकायला शिकवतात आणि कोडीही सोडवून देतात. गाताना त्या स्वरांची अशी काही रचना करतात की जाणत्या ऐकणाऱ्याला वाटावं की आता या कोठे जाणार? कशा जाणार? आणि त्या सर्रकन समेवर येतात. गाताना त्या प्रत्येक वेळी, प्रत्येक रागाची नवनवी क्षितिजं शोधायला सुरुवात करतात, त्या स्वराकाशातलं एकेक नक्षत्र सहजपणे करतलावर घेतात आणि तितक्याच सहजतेनं रसिकांसमोर अलवार तरलतेनं पेश करतात. मी त्यांची 'भवानी दयानी' किती वेळा ऐकली असेल, याची गणना नाही. पण सीडीवर ती ऐकत असताना किंवा कित्येक मैफिलीचा समारोप ऐकताना तिचा प्रत्यय वेगळाच येतो. आपण देवीच्या त्या निराकार रूपाला साक्षात होताना बघत असतो, 'भवानी दयानी' ऐकताना दीदींच्या प्रत्येक आर्त स्वरागणिक रसिक स्वत:च्या आत आत जातो, स्वत:त दडलेल्या त्या आत्मरूपाचा साक्षात्कार त्याला घडतो आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यांतून पाणी झरायला लागतं.

त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो. ईद, रमज़ानच्या निमित्ताने आमचा फोन जातो. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आई-बाबांना नमस्कार केल्यानंतर मी दीदींना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतो. त्यांनी फोन उचलला की पहिलं वाक्य "कैसे हो आप सब लोग?" असं असतं. त्या जसं मला फोन करतात, तसाच त्यांची काही कामे सांभाळणाऱ्या आमच्या प्रदीप गोगटेलाही त्यांचा स्वतंत्र फोन जातो. मध्यंतरी काही कामामुळे तो त्यांच्याकडे जाऊ शकला नाही, तर त्यांनी मलाच फोन करून प्रदीपची चौकशी केली. हे सौहार्द फार क्वचित अनुभवायला मिळतं. माझी आई अर्धांगवायूने आजारी पडल्यावर त्यांच्या फोनवरून होणाऱ्या चौकशीतलं पहिलं वाक्य बदललं, "माँ कैसी है? उनका ख़याल रखना." आत्ता कोविड-१९ च्या महामारीत, त्यांचा पंधरा दिवसांतून चौकशी करणारा फोन हा येणारच. हा फक्त माझा अनुभव असेल असं नाही, त्यांच्या संपर्कात असणार्‍या प्रत्येक व्यक्तीविषयी, भारतातील आजच्या सर्वश्रेष्ठ अशा शास्त्रीय गायन करणाऱ्या गायिकेला काळजी असेल. आमचे शांताराम जाधव अनेक वर्ष दीदींना हार्मोनियमवर साथ करायचे, त्यांच्या कुटुंबियांची त्या रविकाका किंवा माझ्याजवळ चौकशी करायच्या. खांसाहेबांचे शिष्य जाईल काका व विद्याकाकू यांच्यावर त्यांचं विलक्षण प्रेम आहे. जाईलकाकांनी वांगणीला संगीत विद्यालय सुरू केलं, त्यावेळी त्या तशा आडगावात दीदी आणि खांसाहेब त्यांना शुभाशीर्वाद द्यायला आले होते. त्यांच्या घरी गुरुकुल पद्धतीनं काही विद्यार्थी मध्यंतरी राहात असत. त्यांना दीदी, शादाबप्रमाणेच वागवत असत. त्यांना कधीही आपण दुसऱ्याच्या घरी आहोत असं वाटलं नाही. एक संपूर्ण माणूस बघायचा असेल, तर मी नि:संदिग्धपणे दीदींचं नाव घेईन.

तुम्ही त्यांना भेटता तेव्हा तुमच्यावर असलेलं दडपण त्या सहजपणे हलकं करतात. माझा मावसभाऊ संतोष जोशी हा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करतो. त्याची पार्टनर प्रियांका साठे आणि 'सूरश्री'चा अभिजित सावंत हे कल्पक कार्यक्रम करतात. 'An Evening with an Artist' हा एक कार्यक्रम ते करतात. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्ध्या भागात कलाकाराची मुलाखत असते आणि अर्ध्या भागात त्यांचं एकल सादरीकरण असतं. त्या कार्यक्रम मालिकेत त्यांना दीदींचा कार्यक्रम हवा होता. तिघांना घेऊन मी दीदींकडे गेलो. व्यवस्थित वेळ ठरवली होती. हे तिघेही शाकाहारी आहेत, याची माहिती दीदींनी माझ्याकडून घेऊन ठेवली होती. दीदींनी मस्तपैकी मटार टिक्की, व्हेज कबाब स्वत: केले होते आणि बंगाली मिठाई आणून ठेवली होती. आमची प्रियांका छान दिसते आणि तिनं दीदींना भेटायचं म्हणून खास वेशभूषा केली होती. तिचं भरपूर कौतुक करून इव्हेंट मॅनेजमेंट ती करते म्हणून तिला शाबासकी दिली. मग संतोष आणि अभिजितनं दीदींना विचारलं, "तुमची मुलाखत कोणी घेतली तर आवडेल तुम्हाला?" दीदी क्षणात म्हणाल्या, "बॉबी इंटरव्ह्यू लेगा। वो मुझे जानता है, लिखता भी है और प्रोफेसर है। घर का बच्चा है।" मी उडालो. लगेच म्हणालो, "ते शक्य नाही." दीदी म्हणाल्या, "मैंने बोल दिया बस।" दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातल्या त्या मुलाखतीपूर्वी माझी हवा गुल होतीपण दीदींनी मला सांभाळून घेत छान मुलाखत दिली. कार्यक्रम तुफान रंगला.

त्या रात्री शास्त्रीय गायनानंतर 'हमें तुमसे प्यार कितना' त्या गायल्या. ते सुरू करण्यापूर्वी त्यांनी सर्व आयोजकांना विंगतून समोर प्रेक्षकांत येऊन बसायला सांगितलं. ते गाणं 'मिश्र भैरवी'वर आधारित होतं. ते संपल्यावर प्रेक्षकांना वाटलं आता कार्यक्रम संपला. लोकांत चुळबूळ झाली, ते उठायला लागले. परवीन दीदींनी शुद्ध मराठी भाषेत उठलेल्या मंडळींना विचारलं, "एव्हढ्यात चाललात? 'भवानी दयानी' नाही ऐकायचं?" नंतर त्या मोजून साडे पाच मिनिटं गायल्या. पण, त्यावेळची 'भवानी दयानी' काही वेगळीच झाली. थिएटर हाऊस पॅक होतं. कार्यक्रम संपल्यावर पुढे पाच मिनिटं टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. आमच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर झरत होता आणि त्या प्रसन्नपणे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सभोवार विहरणाऱ्या स्वरलहरींना स्वत:त सामावून घेत होत्या आणि हळूवारपणे नतमस्तक होत होत्या.

_{वलयांकितांच्या सहवासात' या लेखमालिकेतील हा लेख,  www.marathisrushti.com या वेबपोर्टलवर दिनांक २५ मे २०२० रोजी प्रथम प्रकाशित झाला. }_

- डॉ. नीतिन दत्तात्रेय आरेकर
nitinarekar@gmail.com
880 555 0088
www.marathisrushti.com

Monday, May 25, 2020

लोकडाऊन

लॉकडाऊन, कंटाळा आणि त्याचा उपयोग.... 
                         
                    ...... दत्ता जोशी 



जर तुम्हाला तुमच्या घरात बसण्याचा कंटाळा आला असेल तर हे नक्की वाचा आणि नंतर ठरवा की तुमचं घरात बसणं मी सांगणार आहे त्या व्यक्तीच्या अनुभवापेक्षा  कठीण आहे का. 
होय, मी जिच्या विषयी सांगणार आहे ती व्यक्ती आहे इमाकुली इलिबागीझा, जीला एका 3 x 4 फूट ( म्हणजे फक्त 12 स्क्वेअर फूट ) आकाराच्या बाथरूम मध्ये थोडे थोडके नव्हे तर तब्बल 91 दिवस घालवावे लागले.तिथं तिच्या सोबत अजून सात महिला होत्या.निव्वळ कल्पना करा की येव्हढ्याशा जागेत सात व्यक्तींना 91 दिवस राहायचं आहे. किती कठीण होतं असेल आणि त्यांनी हे दिव्य कसं पार पाडलं असेल?  हे सर्व जाणून घ्यायच्या आधी बघू या इमाकुलीवर ही वेळ का आली, कोण आहे ही इमाकुली.
आफ्रिकेमध्ये रेवंडा नावाचा छोटासा देश आहे. जिथली लोक संख्या दीड कोटी असून,तिथं  स्वाहिली भाषा बोलली जाते. अश्या  देशातल्या एका छोट्या खेड्यात इमाकुलीचा जन्म झाला. ती आणि तिची तीन भावंड यांच्या सोबत तिचे बालपण खूप सुखात गेले. त्यांच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक आणि शिक्षणाला महत्व देणारे होते.इमाकुली अत्यंत हुशार होती.रेवंडाच्या राजधानी असलेल्या शहरातील युनिव्हर्सिटीत ती इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीरिंग चे शिक्षण घेत होती. सगळं काही व्यवस्थित सुरु होतं. 1994 साली ईस्टर संडे ला इमाकुली तिच्या घरी आली. आणि त्यानंतरच तिचं  सगळं आयुष्यच बदलून गेलं.
त्या दिवशी रेवंडा मध्ये वंश वादाने प्रचंड हिंसाचार सुरु झाला. एकमेकांशी गोडी गुलाबीने राहणारे तुत्सी आणि हुतू समुदायाचे शेजारी एकमेकांवर तुटून पडले.तुत्सी समुदायाची क्रूर पणे सामूहिक हत्या, खून, बलात्कार यांचा उद्रेक झाला.या हत्याकांडात इमाकुलीचे आई बाबा आणि सर्व कुटुंब ठार झाले. फक्त तिचा आईमेबल नावाचा एक भाऊ जो सेनेगल शहरात शिकत होता तो वाचला. एका भावाची तर डोक्यात कुऱ्हाड घालून तिच्या डोळ्यासमोर हत्या करण्यात आली. त्या रात्री तिच्या बाबांनी तिला आपले राहते घर सोडून, तिचे कॅथॉलिक चर्चचे पास्टर असलेल्या शिक्षकाच्या घरी आश्रय घ्यायला सांगितला. हा निर्णय फार धाडसाचा होता. कारण इमाकुली तुस्तू जमातीची होती आणि शिक्षक होते हुतू जमातीचे.परमेश्वरावर आणि आई वडिलांवर विश्वास ठेऊन इमाकुली त्या शिक्षकांकडे आश्रय घ्यायला आली.तिथं गेल्यावर तिला कळलं की आपल्या सारख्याच अजून सात महिला त्यांच्या कडे आश्रयाला आलेल्या आहेत. शत्रू पक्षाच्या लोकांना आश्रय देणं खूप धोकेदायक गोष्ट होती. पण त्या दयाळू असलेल्या शिक्षकाने या मुलींना आश्रय द्यायचे ठरवले. घरात कुठेच सुरक्षित जागा नव्हती. फक्त एक बाथरूम होतं, जे वापरात नव्हतं. या सात मुलींना त्यांनी बाथरूम मध्ये लपण्यास सांगितले. बाथरूमच्या दरवाजा ला एक भलंमोठं लाकडी कपाट आडोसा म्हणून ठेऊन दिलं. त्यामुळे त्या कपाटामागे बाथरूम आहे हे कोणालाच समजून येत नव्हतं. त्या मुलींना, आपल्याला किती दिवस आतमध्ये लपून राहावे लागेल हे माहित नव्हतं. आतमध्ये अपुरा प्रकाश असायचा.जागा इतकी अपुरी होती की सरळ उठता बसता येणं अवघड होतं.दुपारी ते दयाळू शिक्षक त्यांना दरवाजाच्या खालच्या फटीतून जेवण सरकावायचे. अंघोळ करणं शक्यच नव्हतं. शिवाय नेहमीच्या शारीरिक प्रातर्विधी सारख्या गोष्टी सगळ्यांसमोर करणं खूप अवघड होतं. पण हळूहळू सगळ्यांना त्याची सवय व्हायला लागली. सगळ्यांनी एकमेकांना ऍडजेस्ट करून जगायची सवय लावून घेतली. पण तरीही सतत एकमेकांचा स्पर्श व्हायला लागला की चिडचिड व्हायची. त्यात स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात त्यांच्या मनस्थितीत खूप बदल व्हायचे. अंघोळ नसल्याने शरीराला खूप घाण वास यायला लागला. त्यात डोक्यात उवा आणि त्वचेचे आजार व्हायला लागले. मुख्य म्हणजे सगळ्या स्त्रीया मानसिक रुग्ण व्हायला लागल्या. त्याच काळात रेवंडात तुत्सुच हत्याकांड सुरूच होतं.सुमारे दहा हजार लोकांची निघृणपणे हत्या करण्यात आली. 
या काळात बाथरूम मध्ये बंद असतांना छोटी इमाकुली मात्र पॉसिटीव्ह विचार करत होती. देवाने मला नक्कीच काहीतरी हेतूने जिवंत ठेवले आहे. म्हणून मी या संधीचा फायदा करून घेईन असं तिनं ठरवलं. तिनं या काळात इंग्रजीचा अभ्यास करायचं ठरवलं.इंग्रजी शिकायचं आणि इथून सुटका झाली की थेट युनो मध्ये जाऊन रेवंडातील परिस्थिती जगापुढे मांडायची, असली अचाट स्वप्न ती पहायला लागली.आणि त्या दिशेने तिनं वाटचाल सुरु केली.त्या शिक्षकाला तिने इंग्रजीची पुस्तकं द्यायला सांगितले आणि बाथरूम मध्ये अभ्यासाला सुरुवात केली. 
आणि बघता बघता ती त्या भाषेत पारंगत झाली.
हळू हळू हिंसाचार थांबत गेला. आणि एक दिवस तब्ब्ल नव्वद दिवसांनी या मुलींना बाहेर निघण्याची संधी मिळाली. प्रखर सूर्यप्रकाश त्यांना सहन होत नव्हता.  एकोणीस वर्षाच्या इमाकुलीच वजन झालं होतं फक्त एकोणतीस किलो. आयुष्य कुठून कुठं आलं होतं. तिच्या कुटुंबाला ठार करणाऱ्या लोकांमधील एकानेच तिचा जीव वाचवला होता. रेवंडा मध्ये झालेल्या हत्याकांडा बद्दल बाहेरच्या जगाला काहीच माहिती नव्हती. हजारो कुटुंब उध्वस्त झाली होती, अनाथ झाली होती. पोरकी झाली होती. 
आणि एक दिवस खरोखरच स्वप्न पहिल्या प्रमाणे इमाकुलीने युनो च्या ऑफिस मध्ये प्रवेश मिळवला. आणि बाहेरच्या जगाला ही माहिती दिली. तिच्या माहितीने सगळं जग हादरून गेलं.
युनोने तिच्या माहितीची पूर्ण दखल घेतली.तिला युनो मध्ये रेवंडाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिने ज्या ठिकाणी, ज्या लोकांनी तिच्या कुटुंबियांना ठार केलं होतं त्या ठिकाणी घेऊन जाण्याची युनोच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. तिच्या विनंती नुसार तिला तिच्या गावी, जिथं तिच्या आई बाबांना ठार केलं गेलं होतं, जिथं तिच्या हुशार भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याला मारलं गेलं होतं तिथं ती गेली. त्या नंतर ज्या लोकांनी तिच्या डोळ्यसमोर हे घडवून आणलं होतं त्या लोकांसमोर तिला नेण्यात आलं. आता ती अबला नव्हती. तर सर्व शक्तीमान अशा युनोची एक प्रतिनिधी होती. क्षणभर तिच्या मनात वेदनेचा डोंब उसळला. मनात आणले असते तर ती त्या मारेकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देऊ शकली असती. पण अचानक तिच्या मनात परमेश्वराने जणू विवेक जागृत केला.तिच्या मनात आले की या लोकांना शिक्षा द्यायसाठी देवाने नक्कीच मला जिवंत ठेवलेले नसणार. माझं कार्य अजून वेगळं आहे. असे म्हणून ती त्या मारेकऱ्यांसमोर उभी राहिली आणि तिने प्रभू येशुला त्यांना क्षमा करण्यासाठी प्रार्थना केली. त्याच क्षणी तिचं हृदय एका अनामिक शांतीने भरून गेलं. 
त्या नंतर तिने तीन आठवड्यात आपली कहाणी लिहून काढली. पुस्तकाचं नाव होतं.. लेफ्ट टू टेल... या पुस्तकाची संपूर्ण जगात सत्तर भाषेत भाषांतरं झाली. 
इमाकुलीने आपले आयुष्य निराधार लोकांच्या सेवेत घालवायचं ठरवलं आणि आज ती हे काम रात्रंदिवस करत असते. युनाइटेड स्टेटस ऑफ अमेरिकेने तिला आपल्या देशाचे नागरिकत्व दिलेले आहे. अनेक सन्माननीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, उच्च डॉक्टरेट पदवी तिला बहाल केली गेली आहे. 
मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी ती सगळ्या जगभर प्रवास करत असते. अंतरराष्ट्रीय शांतंतेचा महात्मा गांधी पुरस्कार तिला देण्यात आलेला आहे. 
तिच्या मते आजूबाजूला मृत्यू च थैमान सुरु असतांना जगण्या साठी जेव्हा परमेश्वर आपल्याला संधी देत असतो, त्या मागे निश्चितच काहीतरी प्रयोजन असते. म्हणून जगायचं असतं आणि या संकटाचा संधी म्हणून उपयोग करून घ्यायचा असतो.
म्हणून मित्रांनो लॉक डाऊन ही  अचानक हातात आलेली संधी समजा आणि त्याचा चांगला उपयोग करून घ्या. 

(इमाकुली इलिबागीझा हिचे Left  to Tell हे पुस्तक वाचल्या नंतर तिच्याशी संपर्क साधण्याची ईच्छा झाली आणि अनपेक्षित पणे तिच्याकडून उत्तर आलं.  जगातील या निष्ठुर वास्तवाला सामोरं जाऊन इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणाऱ्या या लेखिकेच्या मनाच्या मोठेपणाने मी भारावून गेलो... दत्ता जोशी )

Saturday, May 23, 2020

बेळगाव

बेळगांव 
बेळगांव म्हणजे बेळगांव असतं
माझे गांव म्हणजे खूप छान असतं ,
माणसं अशी जगात कुठेही नसतील ,असतील ज री जगाच्या पाठीवर
     नक्कीच प्रेमळ असतील !
 अशी मायबोली कुठेच नसेल ,
हुडकून ,हुडकून शब्द कुठेच नसेल 
काळजीपोटी पुसती 'अरे मरत्यास 
                             काय ?
सायकल जरा बाजूला घेऊन
         चालवशील का़य ?
बेळगांव म्हणजे बेळगांव असतं ,
माझे गांव म्हणजे खूप छान असतं ,
गरिबांचे हे महाबळेश्वर ,
बघता बघता झाले
       विद्येचे माहेरघर !
नोकरीनामे येणारे पाहूणे झाले 
                   बेळगांवकर,
        अन् मानू लागले
          हेच आपूलेघर !
असे हे गांव सर्वाना सामावून घेतं ,
बेळगांव म्हणजे बेळगांव असतं,
माझे गांव म्हणजे खूप छान असतं ,
अजूनही मुबलक भाजीपाला 
                       चवीचा ,
 लालभाजीची चव चाखेल तो,
                        भाग्याचा !
लोकांच्या स्वप्नातील मांडे ,
                       साक्षात ,
        इथे मिळतात  प्रत्यक्षात !
बेळगांव कुंदा ,चव मधूर ,
ख्याति याची  ,दूरदूर ,
 आलेपाक ,अन् उसाचा रस 
प्यावा तो रसवंती इथेच ,
    नाही तोड कुठेच !
मेहनत घेऊनी पिक काढती 
                       शेतकरी ,
      काळा वाटाणा ,मसूर
                        लईभारी !
बेळगांव म्हणजे बेळगांव असतं ,
माझे गांव म्हणजे खूप छान असतं
       तळयाकाठचा गणपति
   सर्वांची भक्ती न्यारी ,
       मिलीटरी महादेव 
     इथे कडक शिस्त भारी !
   समादेवी ,दुर्गामाता
      आई कलावती ,लक्ष्मीदेवी ,
     भक्तीने पुजती नारी !
     बाळेकुंद्री पंतमहाराज ,
 श्रध्दा ठेऊनी जाती भक्त ,
चरण स्पर्श करोनी 
        होती चिंता मुक्त !
बेळगांव म्हणजे बेळगांव असतं ,
माझे गांव म्हणजे खूप छान असतं ,
 मुले गेली दाही दिशा ,
        तरी आोढ या मातीची
आठवण येई ,आईबांबाची !
            वेशीत शिरताच
             स्वागत करे गारवा ,
     हवेची झुळूकयेताच
             अंगावर गोड शहारा !
      मन गाऊ लागे ,डोलू लागे ,
           गांव माझे आले ,
       बेळगांव माझे आले !
बेळगांव म्हणजे बेळगांव असतं ,
माझे गांव म्हणजे खूप छान असतं !  forwarded to all lovely Belgaumites👌👌👌👌

Monday, May 18, 2020

#दिवेलागणीचे_श्लोक । सौ आरती अत्रे-कुलकर्णी

#दिवेलागणीचे_श्लोक

© सौ आरती अत्रे-कुलकर्णी

. लेख कुठेही शेअर करायचा असल्यास नावासहित करावा.

हे बहुतेक श्लोक मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे. काही श्लोक कधीतरी वाचलेले संग्रह केलेले आहेत. त्याचा एकत्र अर्थासहित हा संग्रह/संकलन इथे देत आहे. याशिवाय कोणाला असेच लहान, छोटे श्लोक माहिती असल्यास ते कॉमेन्टमध्ये लिहावे. त्याचा अर्थ माहिती असल्यास तो पण लिहावा.
संध्याकाळी म्हणायचे दिवेलागणीच्या श्लोक हि हिंदू संस्कृती फक्त मनाच्या नव्हे तर कुटुंबाच्या स्वास्थासाठीपण आवश्यक आहे. दिवा लावल्यावर डोळे मिटून घरातील सर्वानी एकत्र बसून हे श्लोक म्हणावे.
आम्ही श्लोक म्हणून झाल्यावर पाढे म्हणत असू. आमच्या आधीची पिढी पाढे झाल्यावर पावकी, निमकी, अडीचकी असेही म्हणत असायचे.
पण आजकाल मुलांना आणि पर्यायाने पालकांनाही 'इतका' वेळ नसतो. दिवेलागणीच्या वेळेस घरातील सर्व लोक हजर असतात, रिकामे असतात, देवासमोर येतीलच... असेही नाही. जर का हे श्लोक एकदा स्पष्ट, मोठ्याने म्हणून ऑडिओ करून ठेवला आणि स्वयंपाक करताना, मुलांना एकत्र बसवून टेबलवर ऐकले आणि म्हणाले तर ते पाठही होतील. 
हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे देव आहेत, त्यांची वेगवेगळी 'वाहने' आहेत जसे प्राणी, फुले.... वेगवेगळ्या कारणाने देवाने वेगवेगळे अवतार घेतले आहेत. विचार करा, आपणही हे सारे पाठ्यपुस्तकांमधून शिकलेलो नाहीत. गोष्टीतून, रात्रीच्या गप्पातून, आजी-आजीबाकडून आपल्याला हळूहळू हि सारी माहिती होत गेलेली आहे. 
आता कुटुंब लहान झाली, वेगवान झाली, व्यग्र झालीत. शिवाय हे सारे वाचण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा त्यांना गॅझेट्स जवळची वाटतात. रोज थोडा वेळ द्या, अगदी १० मिनिटेपण चालतील आणि मुलंबरोबर काहीतरी म्हणत जा...  
सोबत दिलेले बहुतेक श्लोक संस्कृत आणि मराठीमध्ये आहेत. तसेच ते चार ओळींचे लहान श्लोक आहेत. मोठे श्लोक मुलांना कंटाळवाणे वाटतात, ते मुलांनी म्हणावे असा आग्रह धरू नये. सोबत कुठल्या गोष्टी सांगाव्यात, माहितीही दिलेली आहेत. मुलांना अश्या गोष्टीही सांगाव्यात. मुले प्रश्न विचारतील.. का, कसे, किती, केव्हा, कशाला ...शक्यतो उत्तरे द्यायचा प्रयत्न करावा, टाळू नये.
आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. शुभम भवतु!

संध्याकाळी (तिन्हीसांजेला) देवासमोर, तुळशीसमोर तेलाचा दिवा लावून हा श्लोक म्हणावा.
शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धि-विनाशाय, दीपज्योती नमोऽस्तुते
दिव्या दिव्या दिपोत्कार, कानीं कुंडलें मोतीहार
दिव्याला देखून/पाहून नमस्कार
ये ग लक्ष्मी बैस ग बाजे, आमचे घर तुला साजे
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो सारीरात/मध्यान्हरात
दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशीं
माझा नमस्कार सर्व देवांपाशी 
घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे, भाऊ-बहीण सुखी राहू दे
(अर्थ - हे दीपज्योती,तू शुभ आहेस, कल्याणकारी आहेस. ती आरोग्य आणि धनसंपदा देतेस. शत्रुबुद्धीचा तू नाश करतेस, म्हणून तुला नमस्कार असो.
संध्याकाळची वेळ हि लक्ष्मी येण्याची वेळ. बाजे म्हणजे पलंगावर. लक्ष्मीचे स्वागत करूयात आणि तिला आपले घर 'साजे' म्हणजे आवडेल असे ठेउयात. थोडक्यात दिवेलावणीच्या आधी घर स्वच्छ आवरून, झाडून नीट ठेवावे. घरातील इडा-पीडा बाहेर जाऊ देत आणि लक्ष्मी घरामध्ये येऊ देत. तिळाचे तेलाची वात जास्त वेळ तेवत राहते, तो दिवा सारी रात्र जळू देत.दिवा देवाजवळ आणि तुळशीपाशी लावावा. घराचा धनी सुखी असला तर घरातील सर्व लोक सुखी होतात, म्हणून घरच्या धन्याला सुखी ठेव. घरातील लहान मुले सुखी राहू देत. हीच मुले मोठी झाल्यावर जेव्हा हे श्लोक म्हणतात तेव्हा त्यांना त्यांच्यातील हे बंध आठवूदेत.)

कोणत्या देवाकडे काय मागावे -
गणपती बुद्धी दे
मारुती शक्ती दे
विठोबा भक्ती दे
नारदा युक्ती दे
श्रीकृष्णा प्रेम दे
सरस्वती विद्या दे
लक्ष्मी संपत्ती दे
सूर्य प्रकाश दे
रामराया..सर्वाना सुखी ठेव 
 एखादेवेळेस मुलांना एका एका देवाची गोष्ट सांगावी

गुरूंना नमस्कार करताना म्हणावे -
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः
(अर्थ - गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच विष्णू आणि गुरु हेच महेश्वर/शंकर आहेत.गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. अश्या गुरूंना मी नमस्कार करतो. गुरु म्हणजे अशी व्यक्ती असते ज्याकडून तुम्ही काहीतरी चांगले शिकता. अशी व्यक्ती जी तुमची टीचर असेल, पालक असेल, मित्र-मैत्रिणी असतील किंवा समाजातील इतर कोणी.)

गुरूंना/ देवाला  नमस्कार करताना म्हणावे -
ज्या ज्या स्थळीं हे मन जाय माझे | 
त्या त्या स्थळीं हे निज रूप तुझे |
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ||
जय जय रघुवीर समर्थ ||

देवीस नमस्कार करताना म्हणायचा श्लोक –
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
(अर्थ - सर्व शुभ, शुभ कर्तृत्ववान, सर्व शुभ गुणांनी परिपूर्ण, जी भक्तांचे सर्व उद्देश पूर्ण करतो (पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष), जिला तीन डोळे आणि एक चमकणारा चेहरा आहे  अश्या हे  नारायणी देवी तुला माझा नमस्कार असो.)

देवीस नमस्कार करताना म्हणायचा श्लोक –
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः  
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्  ।
(अर्थ - देवीसूक्तमच्या ३० श्लोकांपैकी हा पहिला श्लोक आहे. हे देवी माझा नमस्कार असो, जी शिवाचा एक भाग आहे तसेच निसर्ग (प्रकृती)आणि भद्राला(सुस्वभावी देवीला)  प्रणाम करतो.)

शिवस्तुती -
कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी |
(अर्थ - शिवस्तुती मध्ये एकूण ३१ श्लोक आहेत, त्यातील हा पहिला श्लोक. कैलासावर राहणार 'राणा' म्हणजे कैलासाचा मालक, जी डोक्यावर चंद्र धारण करतो, ज्याच्या डोक्यावर (नागाने) फणी धरलेली आहे आणिजो सगळ्यांचे दुःख हरण करतो म्हणजे दूर नेतो अश्या शंभू/शंकराशिवाय मला कोण तारणार/मदत करणार?)

गणपतीचे श्लोक -
प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे, आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवू
हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहू तोषवी ||
(अर्थ - प्रारंभी, सुरुवातीला गणपतीला विनंती करूयात, जी विद्यांचा सागर आहे, जो आपले अज्ञान हारोनी/दूर नेऊन आपल्याला बुद्धी देतो, असा आराध्य/पहिला मोरेश्वरा, जो चिंता क्लेश दरिद्र दुःख आपल्यापासून लांब/देशांतर पाठवतो आणि हेरंब/गणाचा नायक/गज मुख असलेला तो आपल्याला तोषवतो/आनंद देतो.

गणपतीचे श्लोक -
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
(अर्थ - वक्र म्हणजे वाकडी आणि तुंड म्हणजे तोंड/सोंड, महाकाय ज्याचा शरीराचा आकार महा/मोठा आहे असा, कोटीसूर्याएव्हडे ज्याचे तेज आहे (अश्या गणपतीला माझा नमस्कार) आणि माझे सर्व कार्य निर्विघ्न, विघ्न न येत पार पडू देत.)

गणपतीचे श्लोक -
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
(अर्थ - मोरया, मी तुझ्यापुढे लहान बाळच आहे. माझे कोटीच्या कोटी अन्याय तू/ मोरेश्वरा / बा/बाप/वडील तुझ्या (मोठया/महाकाय) पोटात घाल.)

गणपतीचे श्लोक -
मोरया मोरया असे नाव तुझे
कृपासागर हेचि माहेर माझे
तुझी सोंड हि वाकडी असे एकदंता
मला बुद्धी दे चांगली ज्ञानवंता
(अर्थ - मोरया, तुझे नाम घेणे हेच मला माहेर आहे. (माहेरी आल्यासारखाच तुझे नाव घेऊन आनंद होतो.) तुझी सोंड वाकडी आहे, तू एकदंत आहेस. तू ज्ञानवंत आहे, मला चांगली बुद्धी दे.)

गणपतीचे श्लोक -
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे वरी वरे, दुर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे ||
(अर्थ - तुझ्या डोळ्यात जे दोन हिरे आहेत त्याचा पसरलेला प्रकाश सगळीकडे आहे, माथ्यावरून शेंदूर पाझरत आहे आणि माथ्यावर वाहिलेल्या दुर्वांचे  तुरे आहेत. याचे दर्शन घेऊन माझ्या मनातील मनोरथ पूर्ण झालेले आहे आणि चिंता हरण/दूर झाल्या आहेत. गोसावींचा मुलगा कवी वासुदेव अश्या मोरयाचे स्मरण करतो.)

गणपतीचे श्लोक -
गणपती तुझे नांव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधे! श्रीगजानना || किंवा आम्हा बुद्धी दे, बुद्धीवंदना ||
(अर्थ - हे गणपती , तुझे नाव घेता घेता माझे चित्त त्यातच रंगले आहे. हे गौरीनंदन, मी तुझी प्रार्थना करतो. हे बुध्दीवंदना, तू आम्हाला बुद्धी दे.)
गणपतीच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्यात जसे पृथ्वीप्रदक्षिणा,रावण आणि शिवलिंगाची गोष्ट

जेवताना म्हणायचे श्लोक -
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥
(अर्थ - कवळ/जेवतानाचा घास वंदन/तोंडात घास घ्यायच्या आधी श्रीहरीचे/देवाचे नाव घ्यावे. फुकाचे/फुकटचे नाव घेऊन सहज/प्रयत्नांशिवाय (अन्नाचे) हवन/पचन होते. अण्णा आपल्याला जीवन देते, म्हणून ते पूर्णब्रह्म आहे.हे केवळ उदार/पोट भरण नसून एक यज्ञकर्म आहे.)

जेवताना म्हणायचे श्लोक -
जनीं भोजनी नाम वाचे वदावे
अती आदरे गद्यघोषे म्हणावे
हरीचिंतने अन्न सेवित जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥

जेवताना म्हणायचे श्लोक -
देवा, अन्न दिलेस मज तू
तुझे आभार मानू किती
आईनेही पदार्थ सुंदर 
केले प्रयास अति ||
वाया न दडवीन अन्न कणही 
मी जेवताना कदा
देशी तूच सुबुद्धी शक्ती मजला
या अन्नरूपे सदा ||

जेवताना म्हणायचे श्लोक -
धुवा हात-पाय, चला भोजनाला
बस नीट येथे, तुम्ही मांडी घाला
नका मागू काही, अधाशीपणाने
नका टाकू काही, करा स्वच्छ पाने ||

जेवताना म्हणायचे श्लोक -
मुखी ग्रास घेता, करावा विचार
कशासाठी हे, अन्न मी सेवनार?
घडो माझिया हातुनी देशसेवा
म्हणोनि मिळावी, मला शक्ती देवा ||
ज्ञानेश्वरांची मांड्याची गोष्ट सांगावी.

सरस्वती स्तुती –
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा पूजिता
सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥
(अर्थ - अगस्ती मुनींनी केलेल्या सरस्वती स्तोत्रामधील २१ श्लोकांमधील हा पहिला श्लोक. चमेलीच्या/कुंदाच्या  फुलांसारखी पांढरेशुभ्र , मोत्याची चमक असलेली  आणि शुद्ध पांढर्या कपड्यांसह जी संरक्षित आहे,जिने एका हातात वीणा आणि दुसरा हात वरदानाचा उचलला आहे, जी पांढऱ्या शुभ्र कमळावर बसलेली आहे,  भगवान ब्रह्मा, भगवान अच्युता (विष्णू), शंकर आणि इतर देवतांनी सदैव जिचे उपासना करतात , अशी हे सरस्वती देवी, कृपया माझे रक्षण करा आणि माझे अज्ञान पूर्णपणे काढून टाक.)

शारदा स्तुति -
नमस्ते शारदे देवी, वीणा पुस्तक धारिणी
विद्यारंभम् करिष्यामि, प्रसन्ना भावसर्वदा |
(अर्थ - हे शारदेदेवी,तुझ्या एक हातात वीणा आणि दुसऱ्या हातात पुस्तक आहे.तुझे स्मरण करून मी विद्या मिळवण्याचा आरंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमीच प्रसन्न राहा.)

पंचकन्या श्लोक -
अहल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा ।
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ॥
(अर्थ - गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता, हरिश्चंद्राची पत्नी तारामती आणि रावणाची पत्नी मंदोदरी, ह्या पाच महासतीचे जो रोज स्मरण करतो त्याच्या महापातकाचा/पापाचा नाश होतो. 
एखादेवेळेस मुलांना ह्या महासतींची गोष्ट सांगावी. https://en.wikipedia.org/wiki/Panchakanya )

वेदपठण शिकण्यापूर्वी -
गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिन् । 
पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवृत्तये ॥
(अर्थ - गणेश, सरस्वती, रवि, शुक, और बृहस्पति या पाच जणांचे स्मरण करूनच वेदपठण शिकले पाहिजे.)

पाच ज्ञानी लोक -
कृष्णो योगी शुकस्त्यागी राजानौ जनकराघवौ ।
वसिष्ठः कर्मकर्ता च पञ्चैते ज्ञानिनः स्मृताः ॥
(पार्टीच - योगी श्री कृष्ण, त्यागी शुकदेवजी, राजांमध्ये जनक आणि श्रीराम, आणि कर्मामध्ये वसिष्ठ हे पाच ज्ञानी लोक होते.)

पुण्यरुप लोक -
पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः ।
पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः ॥
(अर्थ - नल राजा, युधिष्ठिर, विदेही जनक आणि जनार्दन हे पुण्यरुपआहेत.)

ब्रह्माचे मानस/मानलेले पुत्र -
भृगुं पुलस्त्यं पुलहं क्रतुमङ्ग़िरसं तथा ।
मरीचिं दक्षमत्रिं च वसिष्ठं चैव मानसम् ॥
(अर्थ - भृगु, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अंगिरस, मरीचि, दक्ष, अत्रि, और वसिष्ठ हे नऊ ब्रह्माचे मानस/मानलेले पुत्र होय.)

अर्जुनाची नावे -
अर्जुनः फाल्गुनो जिष्णु र्किरीटी श्वेतवाहनः ।
बीभत्सु र्विजयः कृष्णः सव्यसाची धनञ्जयः ॥
(अर्थ - अर्जुन, फाल्गुन, जिष्णु, किरीटी, श्वेतवाहन, बीभत्स, विजय, कृष्ण, सव्यसाची, धनंजय हि अर्जुनाची नावे आहेत.)

कोण कश्यात श्रेष्ठ -
लक्ष्मणो लघुसन्धानः दूरपाती च राघवः ।
कर्णो दृढप्रहारी च पार्थस्यैते त्रयो गुणाः ॥
(अर्थ - लक्ष्मण लहान वस्तूचा वेध घेणार तरबेज होता, दूरच्या गोष्टीचा वेग घेण्यात श्रीराम निष्णात होते. कर्ण दृढ प्रहार करण्यात कुशल होता तर अर्जुन या तिन्ही गुणांमध्ये श्रेष्ठ होता.) अर्जुनाची 'पोपटाचा डोळा' हि गोष्ट सांगावी

नऊ कवी -
धन्वन्तरिक्षपणकामरसिंह शङ्कु
वेताल भट्ट घटकर्पर कालिदासाः ।
ख्यातो वराहमिहिरो नृपतेः सभायां
रत्नानि वै वररुचि र्नव विक्रमस्य ॥
(अर्थ - धन्वंतरि, क्षपणक, अमरसिंह, शंकु, वेतालभट्ट, घटकर्पर, कालिदास, वराह, मिहिर, और वररुचि हे महाराज विक्रमच्या नवरत्नासारखे नऊ कवी आहेत.)

भारतीय कालगणनाची सुरुवात -
युधिष्ठिरः विक्रम शालिवाहनौ
ततो नृपः स्याद्विजयाभिनन्दनः ।
ततस्तु नागार्जुन भूपतिः कलौ
कल्किः षडेते शककारकाः स्मृताः ॥
(अर्थ - युधिष्ठिर, विक्रमादित्य, शालिवाहन, विजयाभिनंदन, नागार्जुन आणि कलियुग मध्ये कल्कि या सहा लोकांपासून शक (भारतीय कालगणना) ची सुरुवात होते.)

सात चिरंजीव -
अश्वत्थामा बलि र्व्यासो हनुमांश्च बिभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ॥
(अर्थ - अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत.)

सहा वैष्णव -
बलि र्बिभीषणो भीष्मः प्रह्लादो नारदो ध्रुवः ।
षडेते बैष्णवा ज्ञेयाः स्मरणं पापनाशनम् ॥
(अर्थ - बलि, बिभीषण, भीष्म, प्रह्लाद, नारद आणि ध्रुव या सहा वैष्णवोंच्या स्मरणाने पापाचा नाश होतो.)

सहा संगीत मधील महर्षि -
वह्नि र्वेधाः शशाङ्कश्च लक्ष्मीनाथस्तथैव च ।
नारदस्तुम्बरु श्चैव षड्जादीनां ऋषीश्वराः ॥
(अर्थ - अग्नि, ब्रह्मा, चंद्र, विष्णु, नारद, तुंबरु हे सहा संगीत मधील महर्षि आहेत.)

तीन महात्मा -
नीतितत्त्व प्रवक्तारः त्रयः सन्ति धरातले ।
शुक्रश्च विदुरश्चायं चाणक्यस्तु तृतीयकः ॥
(अर्थ - या धरतीवर नीतितत्त्व प्रवर्तन करणारे तीन महात्मा होऊन गेलेले आहेत - शुक्र, विदूर और चाणक्य.)

व्यासमुनींचा श्लोक-
अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः ।
अभाललोचनः शम्भुर्भगवान् बादरायणः ॥
(अर्थ - त्यांना चार चेहरे नाहीत, तरीही ब्रह्मा ते आहेत. ज्यांना दोन हात आहेत, तरीही हरि (विष्णू) आहे; मेंदूवर तिसरा डोळा नाही, तरीही शंभू, असे भगवान श्री बादरायण (व्यास मुनि) आहेत.)

महान लोक (आत्म-शक्तीद्वारे) कामगिरी करतात -
विजेतव्या लंका चरण-तरणीयो जलनिधिः ।
विपक्षः पौलस्त्यो रण-भुवि सहायाश्च कपयः
तथाप्येको रामः सकल-मवधीद्राक्षसकुलम् ।
क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे ॥
(अर्थ - लंकेवर विजय मिळवण्यासाठी पायाने समुद्र ओलांडून जावे लागले. पुलस्त्य ऋषि यांच्या पुत्रासी, रावणाशी शत्रुत्व(विपक्षः) असताना वानरांना मदतीला घ्यावे लागले. तरीही रामचंद्रांनी एकटाच सर्व राक्षसांचा नाश केला. महान लोक (आत्म-शक्तीद्वारे) कामगिरी करतात आणि मार्गांनी नव्हे.)

चांगल्या लोकांचा सहवास करावा -
संगः सर्वात्मना हेयः स चेत् त्यक्तुं न शक्यते ।
स सद्भिःसह कर्तव्यः साधुसंगो हि भेषजम् ॥
(अर्थ - सोबत/मोह येणे अगदी स्पष्ट आहे; परंतु जर हे शक्य नसेल तर सज्जनांमध्ये सामील व्हा.साधू/चांगल्या लोकांचा सहवास करावा .)

सत्पुरुषाची सहवास सर्वाना फायद्याचा /उपकारक असतो -
महानुभावसंसर्गः कस्य नोन्नतिकारकः ।
रथ्याम्बु जाह्नवीसंगात् त्रिदशैरपि वन्द्यते ॥
(अर्थ - सत्पुरुषाची सहवास कोणाला फायद्याचा /उपकारक नसतो? गंगेबरोबर वाहून वाईट पाणीही पुज्यनीय बनते.)

महान लोक समाजात या कारणासाठी प्रसिद्ध असतात -
वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि ।
लोकोत्तराणां चेतांसि को हि विक्षातुमर्हति ॥
(अर्थ - (बाहेरून) वज्रासारख्या कठोर (आतून) फुलासारखा मऊ असा पुरुषांचा विवेक असतो. महान लोक समाजात याच कारणासाठी प्रसिद्ध असतात.)

एकश्लोकी रामायण -
आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं
वैदेही हरणं, जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं
बाली निर्दलं, समुन्द्र तरणं, लंकापुरी दाहनं
पश्चाद्रावण-कुम्भकरण हननं, एतद्धि रामायणं
(अर्थ - हे एकश्लोकाचे रामायण आहे. राम तपोवनामध्ये गेला, त्याने कांचनमृगाची हत्या केली, वैदही/जानकीला पळवून नेले, जटायु मरण पावला, सुग्रीवाशी ओळख झाली, वालीचा वध केला, समुद्र तरून/ओलांडून लंका जाळून टाकली. नंतर रावण, कुंभकर्ण यांचाही मारले, हेच रामायण आहे.)  शूर्पणखेची गोष्ट सांगावी 

विष्णूस्तुती -
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥
(अर्थ - जो अतिशय शांत आहे, भुजंगावर झोपलेला आहे, ज्याच्या नाभीत कमळ आहे, जो सर्वाचा देव आहे, विश्वाचा आधार आहे, आकाशासारखा सर्वत्र व्याप्त आहे,मेघासारखा (निळा) रंगाचा आहे, सर्वांगाने सुंदर आहे, जो कांत म्हणजे पती अर्थात लक्ष्मीचा पती आहे, ज्याचे कमळासारखे डोळे आहेत, ध्यान करून प्राप्त होतो, अश्या विष्णूला माझे वंदन असो जो सर्वांचे भय दूर करतो आणि लोकांचा नाथ आहे.)

एकश्लोकी श्रीकृष्णालीला श्लोक -
आदौ देवकी देव गर्भ जननं, गोपी गृहे वर्धनम्।
मायापूतन जीवताप हरणं गोवर्धनो धारणं ।।
कंस छेदन कौरावादी हननं कुंती सुतापालनम् ।
एतद् भागवत पुराण कथितम् श्री कृष्ण लीलामृतम् ।।
(अर्थ - जो देवकीच्या गर्भातून जन्मला, गोपीच्या घरी वाढला, ज्याने पुतना (जी मायावती होती) तिचा जीव घेतला, गोवर्धन पर्वत धारण केला (उचलला)कंसाचा वध केला, कौरवांचा पराभव केला, कुंतीच्या मुलांचे पालन/रक्षण केले; हे सारे भागवतामध्ये आहे जे श्रीकृष्णाच्या लीला आहेत.) कंसाची/पूतनेची/गोवर्धन उचलण्याची गोष्ट सांगावी.

कृष्णाला नमस्कार करताना म्हणावे -
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्
देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्
(अर्थ - कृष्णाष्टकमचे ८ श्लोकांपैकी हा पहिला श्लोक.वासुदेवाच्या पुत्र, राजा कंसाला आणि मल्ल चाणूर याला ठार मारणारा, देवकीमातेला आनंद देणारा आणि जगाचा गुरु असलेल्या कृष्णाला माझा नमस्कार असो.)

कृष्णस्तुती -
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ॥
(अर्थ - ज्याच्या कृपेने मुका मनुष्य बोलू शकतो आणि पांगळा मनुष्य पर्वत उल्लंघून/ओलांडून जाऊ शकतो, अशी कृपा मला आठवते जी माधवच्या परम आनंदातून प्रकट होते.)

कृष्णाचे श्लोक -
हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या
हरी वाढतो ब्राह्मणा वेळोवेळा
असे ब्राह्मण जेवुनी तृप्त झाले
विडा दक्षिण देउनी बोळाविले 

कृष्णाचे श्लोक -
हरीच्या घरी मोगरा फार येतो
काळ्या तोडुनी हार गुंफीत जातो
नको हार गुंफू गळा भार होतो
नको शब्द मोडू मनी राग येतो

कृष्णाचे श्लोक -
हरीच्या हाती लाल रंगीत काठी
हरी बैसला भूवरी वाळवंटी
तुरा खोवीलं मस्तकी मंजिरीच्या
असा विठ्ठल पहिला पंढरीचा
(भक्त पुंडलिकाची गोष्ट सांगावी)

संत ज्ञानेश्वरांस नमस्कार -
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
जिथे नांदतो ज्ञानराज सुपात्र
तया आठवीत महापुण्यराशी
नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांशी |
(ज्ञानेश्वरांची रेड्याच्या तोंडून वेद म्हणाले असल्याची/भिंत चालवण्याची एखादी गोष्ट सांगावी.)

मारुती स्तुति -
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
(अर्थ - रामरक्षेमधील एकूण ३६ श्लोकांमधील हा ३३ वा श्लोक. जो मनाच्या वेगालाही मागे टाकतो, (आपल्या बुद्धीने) बुद्धीमंतांना जिंकतो,असा तो, वारा/वात याचा सूत/मुलगा, वानरसेनेचा मुख्य (सेनापती) श्रीरामाचा दूत (हनुमान) आहे.) हनुमानाची भीमाचे गर्वहरण, हि कथा सांगावी किंवा रामायणातील एखादी कथा सांगावी.

मारुती स्तुति -
सुमित्रासुता लागली शक्ति जेव्हां ।
धरी रुप अक्राळ विक्राळ तेव्हां ।
गिरी आणुनी शीघ्र तो ऊठवीला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥ 
(अर्थ - सुमित्रसुत म्हणजे लक्षणास जेव्हा मदतीची गरज होती (तो बेशुद्ध होता) तेव्हा भव्य रूप घेऊन ज्याने पर्वत (द्रोणागिरी) आणून (तिथल्या औषधी वनस्पतीने) ज्याला शुद्धीवर आणले, अश्या मारुतीस माझा नमस्कार असो.) मारुतीची द्रोणागिरी पर्वत आणल्याची कथा सांगावी.

मारुतीस नमस्कार करताना म्हणायचा श्लोक -
जगीं भीम तो मारुति ब्रह्मचारी ।
समस्तांपुढें तापसी निर्विकारी ।
नमूं जावयालागिं रे मोक्षपंथा ।
नमस्कार माझा तया हनुमंता ॥

पहिले पाच नमस्कार कोणास व का करावे?
पहिला नमस्कार करितो देवाला
घातले जन्माला ज्याने मज |
दुसरा नमस्कार जन्मभूमी तुला
वाहीन देहाला तुझ्या पायी |
तिसरा नमस्कार आईला नेमाने
वाढविले जिने प्रेमे मज |
चौथा नमस्कार वडिलांचे पायी
ठेवियले डोई नित्यनेमे |
पाचवा नमस्कार गुरुजी तूम्हाला
शिकविले मला प्रेमे तुम्ही |

आईचा श्लोक -
जयाच्या कुशी लाभला जन्म माझे
जिने पाजिले आपुलिया स्तनाते
जपून जिने देह हा वाढविला
नमस्कार माझा तया माउलीला

वडिलांचा श्लोक -
शुक्रे जायचा मम जन्म झाला
वेचितसे जी अनुप धानाला
लोकी प्रतिष्ठा मज वाढण्याला
नमस्कार माझा असो त्या पित्याला

तिरंगी ध्वजाचा श्लोक -
जयाचे शिरी केशरी रंग शोभे
जिचा पंधरा पाहता चित्त लोभे
हिरवा तिचा देई शांती मनाला
सदा ठेऊ चित्ती तिरंगी ध्वजाला 

अंघोळीच्या वेळेस म्हणायचे श्लोक -
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥
(अर्थ - गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी नद्या, कृपया मी तुमच्या पाण्याने स्नान करीत आहे, त्या तुमच्या समृद्धीस समृद्ध करा. थोडक्यात या पाण्यामध्ये या सर्व पवित्र नद्यांचे पाणी येत आहे आणि त्याने मी अंघोळ करत आहे.)

अंघोळीच्या वेळेस म्हणायचे श्लोक -
गंगा सिंधु सरस्वति च यमुना गोदावरि नर्मदा ।
कावेरि शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी ।
पूर्णा:पूर्णजलै:समुद्रसहिता:कुर्वन्तु मे मंगलम् ।।
(अर्थ - गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्रत्नय, चंबळा, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (एक नदी) मुख्यतः महासुरनाडी, जया आणि गंडकी नदी आणि समुद्रासह पवित्र होऊ शकतात. माझ्यावर कृपा करा.)

गंगा नदीचा श्लोक -
नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपाम् ।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।
(अर्थ - भगवंतांच्या विविध स्तरांनुसार सर्व सांसारिक आनंद, सुख आणि मोक्ष देणारी माता गंगा, सर्व देवता आणि राक्षस तुझ्या पवित्र चरणी पूजतात, मीसुद्धा तुझ्या पवित्र चरणी नतमस्तक होतो.)

गंगा नदीचा श्लोक -
गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि ।
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति ।।
तीर्थराजाय नमः ।
(अर्थ - जो तिच्यापासून शेकडो मैलांच्या अंतरावर असूनही तीन वेळा ‘गंगा’ ची पुनरावृत्ती करतो तो आपल्या सर्व पापांपासून शुद्ध होतो आणि मरणानंतर विष्णुलोककडे जातो.)

गंगा नदीचा श्लोक -
पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभवः ।
त्राहि मां कृपया गंगे सर्वपापहरा भव ।।
(अर्थ - मी चुकीची कर्मे केली आहेत. मी पापी व्यक्ती आहे आणि वाईट वरून तयार केले गेले आहे. हे आई गंगा, कृपया माझ्या पापांपासून मला शुद्ध कर आणि माझे रक्षण करा.)

हरवलेली वस्तू शोधताना म्हणायचा मंत्र -
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बहुसहस्रवान 
तस्य स्मरणमात्रेंण गतम् नष्टयं च लभ्यते 
(अर्थ - कार्तवीर्य द्वादशनामस्तोत्रम् या स्तोत्रातील ८ श्लोकांपैकी हा पहिला श्लोक. हरवलेले शोधात असताना हा मंत्र म्हणल्यास/ स्मरण केल्यास, हजार हात असलेला (सहस्त्र बाहू) कार्तवीर्य राजाचा मुलगा अर्जुन, आपल्याला त्याच्या हजार हातानी वस्तू शोधायला मदत करतो आणि हरवलेले सापडते.)

सकाळी उठल्यावर अंथुरणामध्ये बसून म्हणायचा श्लोक -
कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
(अर्थ - हाताची ओंजळ करून हा श्लोक म्हणायचा असतो. कर म्हणजे हात. अग्र म्हणजे पुढचे टोक. हाताच्या टोकावर जिथे लक्ष्मी राहते, मध्यभागी सरस्वती, मुळाशी गोविंद(विष्णू); अश्या हाताचे प्रभातवेळी (सकाळी) दर्शन घेतो.)

सकाळी उठल्यावर पहिले पाऊल जमिनीवर ठेवायच्या आधी म्हणायचा श्लोक -
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
(अर्थ - समुद्र जी वसने(वस्त्रे) म्हणून वापरते आणि जिचे स्तन(छाती) म्हणजे पर्वतशिखरे आहेत अश्या विष्णूच्या पत्नीला (पृथ्वी) माझा नमस्कार असो. मी तिला पायाने स्पर्श करत आहे, म्हणून तिची क्षमा मागतो.

उगवत्या सूर्याला पाहून म्हणायचा श्लोक -
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते ॥१॥
(अर्थ - हे आदिदेव सूर्यनारायण, मी तुला नमस्कार करतो. हे भास्कर, तू प्रसन्ना हो. हे दिवाकर, मी तुला नमस्कार करतो. हे प्रभाकर, माझा तुला नमस्कार असो.)

उगवत्या सूर्याला पाहून म्हणायचा श्लोक -
आदित्यस्य नमस्कारं, ये कुर्वन्ति दिने दिने
जन्मान्तर सहस्रेषु, दारिद्र्यं नोपजायते
(अर्थ - जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मात दारिद्र्य प्राप्त होत नाही.)

गायत्री/सावित्री मंत्र -
ॐ भूर् भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
(अर्थ - ऋग्वेदामधिं हा मंत्र सावित्रीसाठी लिहिलेला आहे.
जो मानसला जीवन देतो, दुःखाचा नाश करतो आणि सुख देतो असा सूर्य, जो उत्तम रक्षणकर्ता आहे आणि आत्मचिंतन करण्यास योग्य आहे, आम्हाला बुद्धी आणि शक्ती दे.
ॐ = प्रणव , भूर = माणसाला जीवन देणारा, भुवः - दुःखाचा नाश करणारा, स्वः = सुख़ देणारा, तत = तो , सवितुर = सूर्यासारखा उज्ज्वल , वरेण- ्यं = सर्वात उत्तम, भर्गो = रक्षणकर्ता, देवस्य = देवा, धीमहि = आत्म चिंतन करण्यास योग्य, धियो = बुद्धि, यो = जी , नः = आम्हाला  , प्रचो- दयात् = शक्ति दे )
----------------------------------------------------------------------------------
एखाद्या वेळेस देवाच्या आरत्या, मंत्रपुष्पांजली म्हणावी. हळूहळू ऐकून आणि म्हणून, मुलांचे पाठ व्हायला लागेल.