Monday, May 18, 2020

डावखोरा सुनील गावसकर।द्वारकानाथ संझगिरी

*डावखोरा सुनील गावसकर*
*द्वारकानाथ संझगिरी* 

परवा कोणीतरी ‘व्हॉट्सऍप’वर मला सुनील गावसकरचा डावखोरा पवित्रा घेतलेला फोटो पाठवला. 'ओळखा पाहू' या प्रश्नाबरोबर सध्या तो फोटो ‘व्हॉट्सऍप’वर आणि ‘फेसबुक’वर जोरात फिरतोय. आजच्या पिढीसाठी तो आश्चर्याचा धक्का आहे. सुनील आणि डावखोरा? 'बाय द वे' तो पवित्रा किती मस्त वाटतो ना?

तो फोटो पाहिला आणि माझ्या जुन्या आठवणी उफाळून आल्या.  

तो १९८२ सालच्या रणजी मोसमातला मुंबई विरूद्ध कर्नाटक सामना होता. मुंबई संघ पराभवाच्या छायेत होता. खेळपट्टीवर चेंडू पडला की त्याचा भोवरा होत होता आणि तो वर उसळत होता. दुसऱ्या डावात सुनील चक्क सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने फलंदाजीसाठी थेट डावरा पवित्रा घेतला. कर्नाटक संघातल्या खेळाडूंबरोबर प्रेक्षकही अवाक झाले. तेव्हा डावखुरा फिरकी गोलंदाज रघुराम भट्ट गोलंदाजी टाकत होता आणि चेंडू कुरळ्या केसाचा आकार घेत होता. रघुरामने बॅटजवळ सहा क्षेत्ररक्षक लावले आणि त्याच्या भात्यातली सर्व आयुधं वापरली. फास्टर वन, आर्मर, यॉर्कर अगदी चायनामनही टाकला. ‘राऊंड द विकेट’ गोलंदाजी टाकली. पण सुनीलने कशालाही दाद दिली नाही. जवळचे क्षेत्ररक्षक हताश झाले. भट एकामागोमाग एक उर्वशी आणि मेनकासारख्या अप्सरा सूनीलकडे सोडत होता पण सूनीलचं तप काही भंग होत नव्हतं. मुख्य म्हणजे सुनील आयुष्यात प्रथमच डावखुरा खेळत होता. त्यात आणि गंमत म्हणजे ऑफस्पिनर विजयकृष्ण गोलंदाजीला आल्यावर मात्र तो उजव्या हाताने खेळायचा. असा तो एक सव्वा तास खेळला. अठरा धावा करून नाबाद राहिला आणि त्याने मॅच वाचवली. त्याच्या या खेळीबद्दल सूनीलचं कौतुकही झालं आणि त्याच्यावर टीकाही झाली.

सुनीलचं काहीतरी बिनसलं होत. मुंबईच्या काही खेळाडूंवर तो रागावला होता असं म्हणतात. त्याकाळच्या मुंबईच्या खेळाडूंना रणजी ट्रॉफी गमावणं म्हणजे सर्वस्व गमवावं लागल्यासारखं वाटायचं. मनात कुठलीतरी जखम घेऊन सुनील फलंदाजीला आला होता हे मात्र नक्की. त्यानंतर सुनीलने एक ‘Why I Batted Left-handed’ असा लेखही लिहिला. त्यात त्याने म्हटलं होतं, 'की चेंडू काटकोनात वळत होता. भटला खेळणं कठीण होतं. त्यात उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांसाठी चेंडू उसळून बाहेर जात होता. त्यामुळे मला वाटलं की डाव्या हाताने खेळावं. ज्यामुळे चेंडू उडला तर तो शरीरावर जाईल. चेंडू खूप वळत असल्यामुळे पायचीतची शक्यता कमी होती.'

त्यानंतर काही वर्षांनी आमच्या ‘षटकार’ पाक्षिकामध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने सूनीलवरच्या एका लेखात त्याच्या ह्या डावखुऱ्या फलंदाजीबद्दल टीका केली. अर्थात सुनीलला ते आवडलं नाही. मुंबईतल्या एका रणजी सामन्याच्या वेळी त्याने मला पकडलं आणि म्हणाला, "तुमच्या 'षटकार'मध्ये माझ्या डाव्या हाताने केलेल्या बॅटिंगबद्दल आलंय. मी दीड तास बॅटिंग केली हे विसरु नका. तेव्हा खेळपट्टी कशी होती हे तुला ठाऊक आहे." त्यावेळी मी ‘षटकार’चा भागीदार आणि कार्यकारी संपादक होतो. भारतीय खेळाडूंसाठी मी ‘पंचींग बॅग’ होतो. ‘षटकार’मध्ये एखाद्या खेळाडूवर टीका झाली की पहिला गुद्दा मला मारला जायचा. तो हिंसक नसायचा, प्रेमळ असायचा. पण त्यामागे भावना असायची, "तू संपादक असताना आमच्याबद्दल असं छापून कसं येतं?"

सुनीलला मी म्हटलं, "तुझ्या महान असण्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात तीळभरही शंका नाही. अशा पद्धतीने तूच खेळू शकलास. इतरांना ते जमलं नसतं. पण मला एक विचारायचंय तुला की, अनेकदा तू मोठमोठ्या डावऱ्या फिरकी गोलंदाजांना भिंगरी खेळपट्टीवर खेळला आहेस, पण तेव्हा तुला कधी डाव्या हाताने खेळावं असं का वाटलं नाही?" मला वाटलं मी त्याला अनप्लेयेबल चेंडू टाकलाय. पण भटच्या वळणाऱ्या चेंडूएवढ्याच आरामात तो माझ्या या प्रश्नाचा चेंडू खेळला. मला तो म्हणाला, "आम्ही सामना गमावलाच होता. म्हणून मी प्रयत्न केला. We had nothing to lose. एरवी मी असा कधीच खेळलो नसतो." असं म्हणून तो गेला पण त्याच्या चेहऱ्यावर असलेला राग मावळला नव्हता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा मला सुनील भेटला. मी थोडा घाबरत-घाबरत हसलो. पण त्याने मला थांबवलं आणि मला म्हणाला, "मी तुला काल असं बोलायला नको होतं." मी चकित झालो. कारण सुनील बोलताना कुठे चुकला असं मला वाटलंच नव्हतं. मी त्याला विचारलं, "काय बोलायला नको होतं?” तो म्हणाला, "मी डाव्या हाताने दीड तास खेळलो अशी शेखी मी मिरवायला नको होती. मी त्याचा गर्व केला ते चुकीचं होतं. माणसाला गर्व असू नये." आणि तो निघून गेला. 

मी अवाक झालो. कोणत्याही सेलिब्रिटीला चूक कबुल करणं कठीण जातं. अलीकडे तर उथळ पाण्याला खळखळाट किती आहे ते रोज दिसतं. इथे सुनीलची काही चूक आहे असं मला मुळीच वाटलं नव्हतं. पण सुनीलच्या मनाला मात्र ते कुठेतरी वाटत राहिलं होतं. सुनील माझ्या मनात आधीच आभाळाला भिडला होता. या प्रसंगानंतर तो आभाळ छेदून वर गेला.

No comments:

Post a Comment