*तीन ओंजळी पाणी*
मी लहान असताना माझ्या आजी-आजोबांबरोबर कर्नाटकमधल्या एका छोट्याशा गावात राहत असे.
माझी आजी कृष्णाक्का दिसायला खूप छान होती. पण ती खूप साधी राहत असे. फक्त सणासुदीला किंवा काही कार्य असेल‚ तेव्हाच ती चांगली साडी नेसायची.
एक दिवस मी शाळेतून घरी आले‚ तर ती तिची एक जुनी पेटी पुढ्यात घेऊन बसली होती. त्यात तिच्या रेशमी साड्या आणि काही महत्त्वाच्या गोष्टी असतात‚ हे मला माहीत होतं. ही पेटी आजी फारशी कधी उघडत नसे‚ त्यामुळे त्यातल्या गोष्टींविषयी मला कुतूहल होतं. त्यामुळे क्वचित कधीतरी आजीनं ती पेटी उघडली‚ की मी माझे सगळे उद्योग सोडून पळत तिच्याजवळ जाऊन तिथं बसत असे. या खेपेलाही मी तेच केलं. मी शाळेचं दप्तर दारातच टाकलं आणि आजीजवळ जाऊन बसले. आजीने ती पेटी उघडताच मी आत डोकावून पाहिलं. आत एक कुंकवाचा करंडा‚ चांदीची मूठ असलेला छोटा आरसा‚ हस्तिदंती कंगवा‚ आणि काही छोटी चांदीची भांडी होती.
‘‘हे माझ्या वडिलांनी मला लग्नात दिलं होतं‚’’ आजी अभिमानानं म्हणाली. तिच्या वडिलांना जाऊन बरीच वर्षं झाली होती.
मी तो कुंकवाचा करंडा हातात घेऊन त्याकडे बराच वेळ निरखून बघत बसले. तो करंडा म्हणजे पॅगोडाच्या आकाराची एक लहानशी डबी होती. मी फारसा काही विचार न करता त्या करंड्याचं झाकण उघडलं. त्यात तीन कप्पे होते. सर्वांत वराच्या कप्प्यात मेण होतं‚ दुसऱ्या कप्प्यात अगदी लहानसा आरसा होता आणि तळाशी कुंकू ठेवण्यासाठी जरा खोलगट कप्पा होता. ते पाहून मी मंत्रमुग्ध झाले. ‘‘अव्वा‚’’ मी जरा चाचरत म्हणाले‚ ‘‘तुझ्या या सगळ्या गोष्टींमधला हा कुंकवाचा करंडा मला सर्वांत जास्त आवडलाय. मी जेव्हा मोठी होईन‚ तेव्हा तू मला हा देशील का गं?’’ त्यावर ती हसून म्हणाली‚ ‘‘बाळा‚ मला तेरा नातवंडं आहेत. त्यातल्या प्रत्येकाला माझ्याकडचं काही ना काही मिळायलाच हवं ना? पण हा करंडा मी नक्की तुझ्यासाठी ठेवीन.’’
जरा वेळानं ती घरातल्या मोठ्या आरशासमोर जाऊन बसली. तिनं केस विंचरून केसांचा छान आंबाडा घातला‚ नाकात चमकी घातली. त्यानंतर तिनं हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली‚ पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला. कपाळाला मोठं कुंकू लावलं‚ कानात मोत्यांच्या कुड्या घातल्या‚ त्यासोबत दोन दोन सोन्याच्या बांगड्याही घातल्या. अंबाड्यावर फुलांची वेणी घातली. उत्तर कर्नाटकातील वयस्कर भारदस्त स्त्रियांप्रमाणे ती छान तयार झाली.
‘‘अव्वा‚ आज तर कुठलाच सण नाही. मग तू अशी छान साडी नेसून का तयार झाली आहेस?’’ मी विचारलं.
‘‘अगं‚ मी जेवायला चाललेय. तुला यायचंय का माझ्याबरोबर?’’ ती म्हणाली.
मी जरा वेळ विचारात पडले. मग ती हसून म्हणाली‚ ‘‘तू तुझ्या दुपारच्या वर्गाची चिंता करू नको. तुझ्या शाळेच्या बाई पण तिकडे येणार आहेत.’’
खेडेगावातल्या शाळेत अशा गोष्टी काही नवीन नव्हत्या. कधीतरी अचानक आठवड्याच्या मध्येच आम्हाला सुट्टी देण्यात यायची आणि मग पुढच्या रविवारी शाळा भरायची. तेव्हा नियम फारसे कडक नव्हते. आयुष्यं सोपं होतं. मी माझ्या स्वतःच्या विश्वात रममाण झालेली उमलणारी कळी होते.
तिचे शब्द ऐकताच मी आनंदानं तिच्या सोबत जायला तयार झाले. आपल्याला जेवायला जायचंय या कल्पनेनं मी हरखून गेले होते. मी लगेच कपडे बदलून झटपट तयार झाले. त्या वयातसुद्धा मला कपडे बदलून तयार व्हायला जास्त वेळ लागत नसे.
आमची अव्वा तशी काही फार बोलकी नव्हती. पण त्या दिवशी ती खूप खूश दिसत होती. माझ्या आजोबांना तिच्याबरोबर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना यायला मुळीच आवडत नसे. त्यामुळे ती त्यांना म्हणाली‚ ‘‘मी आज इंदिराकडे जेवायला चालले आहे. मी तुमचं पान वाढून केळीच्या पानाखाली झाकून ठेवलंय. पण वेळेत जेवून घ्या हं!’’
मी माझ्या आजोबांना प्रेमानं शिग्गाव काका म्हणत असे. त्यांनी मान हलवली आणि परत वर्तमानपत्र वाचायला सुरवात केली.
आम्ही लगेच घराबाहेर पडून इंदिरा आजीच्या घरी चालतच निघालो.
‘‘आज तिकडे काय आहे?’’ मी विचारलं.
‘‘माझी मैत्रीण इंदिरा नुकतीचं वाराणसीहून परत आली आहे‚ म्हणून तिनं आम्हा मैत्रिणींना जेवायला बोलवलं आहे. तो एक छान सोहळा असतो. त्याला ‘काशी समाराधाने’ असं म्हणतात.’’
‘‘म्हणजे काय गं आजी? आणि जर इंदिरा आजी गावाला जाऊन आली‚ तर आपण सगळ्यांनी एकत्र जमून सण का साजरा करायचा? आपण नाही का हुबळी किंवा गदगला जाऊन येतो! मग परत आल्यावर कुठे लोकांना जेवायला बोलवतो?’’
अव्वानं एक मोठा निःश्वास टाकला. ‘‘अगं‚ काशीला जाऊन येणं म्हणजे काही हुबळी किंवा गदगला जाऊन येण्याइतकी साधीसुधी गोष्ट नाही. _काशी हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. ते गंगा नदीच्या काठी वसलेलं आहे. असं म्हणतात‚ की या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारा विश्वनाथ हा देव काशीत राहतो. तो तिथून सर्वांचं रक्षण करतो‚ सर्वांना आशीर्वाद देतो. त्यामुळे या जगातलं काशी हे या विश्वनाथाचं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. तिथे गंगेमध्ये स्नान करण्यासाठी ऐंशी घाट आहेत. त्या शहरात हजारो संस्कृत पंडित राहतात. मी आज जी साडी नेसले आहे ना‚ ती बनारसी साडी आहे. आपल्याला जर कुणी लग्नात बनारसी साडी दिली‚ तर ते शुभ मानण्यात येतं‚ कारण काशी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ती बनते.’’_
हे सगळं मला काही फारसं पटलं नव्हतं.
‘‘हो‚ गं आजी. पण तरीही त्यांनी सगळ्या लोकांना जेवायला का बोलावलंय?’’ मी पुन्हा विचारलं. खरं म्हणजे मला तिकडे जाऊन गोडाधोडाचं जेवायची इच्छा होतीच.
‘‘एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत असली किंवा तिची काशी विश्वेश्वरावर अगदी गाढ भक्ती असली‚ तरीसुद्धा काशीला जाणं मुळीच सोपं नसतं‚ बरं का! तिकडे जाणं आणि येणं खूप कष्टांचं आहे. तो सगळा प्रवास फार खडतर आहे. बऱ्याच ट्रेन्स आणि बसेस बदलून तिकडे जावं लागतं. तिकडचे लोक आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. ते हिंदी बोलतात. शिवाय त्या गावात आपले कुणीच नातेवाईक नाहीत. कुठे आणि कसं जायचं ते सांगायला कुणीच नाही. शिवाय तिकडे हिवाळ्यात इतकी कडाक्याची थंडी असते‚ की आपण साधं पाण्यात पायही बुडवू शकत नाही. तेच उन्हाळ्यात तिथं इतकं गरम होतं‚ परिसर इतका तापून निघतो की‚ पूजा करण्यासाठी अनवाणी चालताना खूप हाल होतात. तुम्ही परक्या प्रांतातून आलेले असल्याचं तिथल्या लोकांच्या लक्षात आलं‚ तर ते तुम्हाला फसवू शकतात. पूर्वीच्या काळी कितीतरी लोक काशीयात्रेला गेले; पण पुन्हा परत घरी न आल्याची उदाहरणं आहेत‚ त्यामुळे आपल्या ओळखीतलं कुणी काशीला जाऊन सहीसलामत परत आलं‚ तर आपण ते मोठंच भाग्य समजतो. त्यामुळं ते लोक काशीयात्रा करून परत आल्याचा आनंद साजरं करण्यासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवतात. आपण त्यांना काहीतरी भेटवस्तू पण द्यायची असते.’’
‘‘मग तू काय देणार आहेस‚ अव्वा?’’ मी उत्सुकतेनं विचारलं.
अव्वानं तिच्या हातातली पिशवी उघडून माझ्यासमोर धरली. आत एक सुती साडी‚ फळं आणि गजरे होते.
‘‘आणि मग ते आपल्याला काय देणार?’’ मी म्हणाले.
‘‘त्यांनी आपल्यासाठी काशीहून गंडा आणि गंगाजल आणलं असेल. त्या दोन्ही गोष्टी पवित्र मानल्या जातात. तो गंडा तू रोज गळ्यात घालत जा किंवा मनगटावर बांधत जा. म्हणजे देव तुझं रक्षण करेल. सर्व प्रकारच्या संकटांमधून तो तुझी सुटका करेल.’’
हे तेवढं बरं होतं. माझी परीक्षा जवळ आली होती. मला सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी त्याचा उपयोग नक्की झाला असता.
माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून अव्वा म्हणाली‚ ‘‘तुला इतक्या लहान वयात काशीचा गंडा घालायला मिळणार आहे. तू खरोखर नशीबवान आहेस.’’
‘‘आजी‚ तो काशीचा गंडा कसा दिसतो गं?’’
‘‘अगं तो साधा काळ्या रंगाचा गाठी मारलेला दोरा असतो. काशी नगरामध्ये भैरवनाथ आहे. हा शिवमहादेवाचा निस्सीम भक्त. हाच काशी आणि आसपासच्या परिसराची राखण करतो. कुणी जर काशीला जाऊन तिथल्या कालभैरवाच्या मंदिरात न जाता परत आलं‚ तर त्याची काशीयात्रा अपूर्ण राहिली‚ असं मानतात. काशीमध्ये तो गंडासुद्धा त्या कालभैरवाच्या मंदिरापाशीच मिळतो. मग तो गळ्यात घालायचा किंवा मनगटावर बांधायचा. म्हणजे भैरवनाथ त्या व्यक्तीचं रक्षण करतो‚ त्याच्या प्रवासात अदृश्य स्वरूपात त्याच्याजवळ राहतो आणि त्याला सुखरूप घरी पोहोचवतो. त्यानंतरच तो त्याच्या पुढच्या भक्ताची काळजी घेण्यासाठी परत फिरतो.’’
‘‘हं‚’’ मी विचारात पडले. पण त्याला जर एकापेक्षा जास्त माणसांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला जावं लागलं‚ तर? माझ्या मनात आलं.
पण मी हा प्रश्न अव्वाला विचारणार‚ इतक्याच तीच म्हणाली‚ ‘‘तुला आता नेमका कोणता प्रश्न पडलाय‚ ते आलं माझ्या लक्षात. पण भैरवनाथाला एका वेळी अनेक रूपं घेता येतात.’’
मग मी विचारलं‚ ‘‘गंगेचं पाणी कशासाठी द्यायचं लोकांना? त्याचा काय उपयोग?’’
‘‘किती वेडी मुलगी आहेस गं. गंगेच्या पवित्र तीर्थाचे उपयोग आता मी कसे काय समजावून सांगू तुला?’’ असं म्हणून तिनं माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला प्रेमानं थोपटलं. गंगेचं पाणी रोज पिण्याची खरं तर सगळ्यांचीच इच्छा असते; पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही ना. आपण तर दक्षिण भारतात राहत असल्यामुळे ते आपल्याला शक्यच नाही. म्हणून आपण घरी थोडंसं गंगेचं पाणी ठेवतो. कुणी समजा अगदी शेवटच्या घटका मोजत असेल‚ तर त्याला मुद्दाम चमचाभर गंगेचं पाणी पाजतात म्हणजे तो माणूस स्वर्गात जातो.’’
‘‘अव्वा‚ मी म्हणाले. ‘‘काशीला जाणं जर इतकं महत्त्वाचं असेल‚ तर तुझा जर एवढा विश्वास असेल‚ तर काका आणि तू काशीला का जात नाही? हवं तर मी पण येईन तुमच्याबरोबर.’’
माझं बोलणं ऐकून अव्वा विचारात पडली. ‘‘मी आजवर कधीच कर्नाटकाच्या बाहेर पडलेली नाही. तुला माहीत आहे ना‚ प्रवासात मी आणि काका बाहेरचं काही खात नाही. काशीला जायचं तर किमान दहा दिवस हवेत. शिवाय आपल्याला तिथली भाषा येत नाही‚ त्यामुळे चार लोकांच्यासोबतीनं गेलेलं बरं. पण या गावात काशीला जायला तयार होणाऱ्या लोकांचा गट तयार करणार कोण? आमचं आता वय होत चाललंय. आम्ही जर प्रवासात आजारी पडलो‚ तर उगाच इतरांनाच त्याचा त्रास होईल. त्यामुळे काशीला जाणं माझ्या दृष्टीनं तरी एखाद्या स्वप्नासारखंच आहे. ते स्वप्न पुरं होणं कठीण आहे. पण इंदिरा तिच्या भावंडांबरोबर जाऊन आली‚ याचा मला खूप आनंद झाला. आता तिच्या घरी जाऊन तिकडच्या गोष्टी ऐकायच्या आहेत मला!’’
माझ्या आजीला काशी या तीर्थक्षेत्राविषयी एवढी भक्ती का वाटत असे‚ ते मला त्या वेळी कळलं नव्हतं.
जरा वेळात आम्ही इंदिरा आजीच्या घरी पोहोचलो. तिथं सगळं समारंभाचं वातावरण होतं. घराच्या फाटकापाशी केळीचे खुंट आणि आंब्याच्या पानांची आरास केलेली होती. सगळीकडे फुलांच्या माळा आणि तोरणं होती. घराच्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळी रेखाटलेली होती. माझ्या वर्गातल्या काही मुलीसुद्धा तिथं खेळत होत्या. ते पाहून मी हरखून गेले. माझ्या वर्गशिक्षिका पण तिथं होत्या. त्या सर्वांना सरबत देत होत्या. एका बाजूला गंगाजलाच्या छोट्या छोट्या गडूंची उतरंड रचून ठेवण्यात आली होती. प्रत्येक गडूला काळा गंडा बांधण्यात आला होता. शेजारी एक मोठं केळीचं पान पसरून त्यावर मेवामिठायांनी भरलेली ताटं ठेवण्यात आली होती; पण तिथं कुणीच जेवायला बसलेलं नव्हतं. मी मनातल्या मनात त्या मिठायांचे प्रकार मोजू लागले.
त्याला लागूनच घरातली मोठी खोली होती. मी आणि अव्वा आत शिरलो. माझी आजी गावातली सर्वांत वयस्कर स्त्री होती. ती सर्वांचीच आवडती होती. त्यामुळे तिला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. अव्वा तिच्या मैत्रिणीला- इंदिरेला म्हणाली‚ ‘‘तू खरंच नशीबवान आहेस हो. तू काशीला जाऊन गंगास्नान केलंस आणि साक्षात विश्वनाथाचं जवळून दर्शन घेतलंस.’’
इंदिरा आजी गोडसं हसली. तिनं आम्हा दोघींना प्रेमानं बसवलं. तिच्याभोवती खूप मंडळी जमा झाली होती. सगळ्यांनाच तिच्या तोंडून काशीयात्रेची हकिगत ऐकायची होती.
कुणीतरी विचारलं‚ ‘‘तिकडचं अन्नपूर्णा देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे म्हणे! तुम्ही ते पाहिलंत का?’’
‘‘हो‚ ते फार सुंदर आहे.’’ इंदिरा आजी म्हणाली‚ ‘‘विश्वनाथाच्या मंदिराच्या आधीच अन्नपूर्णेचं मंदिर आहे. शंकर भगवान मंदिरात आपल्या पत्नीसमोर भिक्षापात्र धरून भिक्षा मागतात. अशा प्रकारचं हे एकमेव मंदिर आहे. असं म्हणतात की काही खास दिवसांमध्ये स्वतः शंकर भगवान इथं प्रकट होतात.’’
लोक इंदिरा आजीवर प्रश्नांचा भडिमार करत होते. जरा वेळातच मी कंटाळून गेले.
मी हळूच माझ्या आजीला कोपरानं ढोसलं. तिनं माझ्याकडे वळून पाहताच मी कुजबुजत्या स्वरात तिला विचारलं‚ ‘‘आजी‚ बाहेर बघ ना किती पानं वाढून ठेवलेली आहेत. पण तिथं कुणीच जेवायला बसलेलं नाहीये. मी जाऊन त्यातलं काहीतरी खाऊ का? मला खूप भूक लागली आहे.’’
‘‘अगं‚ असला काही विचारसुद्धा मनात आणू नको. तो नैवेद्य भैरवनाथासाठी वाढून ठेवलाय बरं. पण त्याला खूप काम असतं ना. शिवाय त्याला काशीला परत जायची घाई आहे. तुला हवं तर तू त्याची प्रार्थना कर.’’
पण तिथं तर कुणीच जेवायला बसलेलं दिसत नव्हतं. मग मला आठवलं‚ भैरवनाथ अदृश्य रूपात असतो. मग मी त्या नैवेद्याच्या ताटांकडे पाहून हात जोडून भैरवनाथाची प्रार्थना करत बसले.
थोड्या वेळानं आम्हाला जेवायला वाढण्यात आलं. जेवण अतिशय रुचकर होतं.
आम्ही परत घरी जायला निघालो.
रस्त्यात आजी म्हणाली‚ ‘‘इंदिरेनं तीन ओंजळी गंगाजलाचं अर्घ्य उगवत्या सूर्याला दिलं. फार छान झालं. किती सुंदर दृश्य असेल ते. कधीतरी मलाही वाटतं‚ आपणही तिकडे जावं‚ हे असं करावं. पण आपल्या घरच्या बागेतला झरा म्हणजेसुद्धा गंगेचंच रूप आहे‚ असं मी मानते. मी माझ्या बागेत वाहणाऱ्या झऱ्याची पूजा केली‚ तर ती गंगेला नक्कीच पोचेल असं माझं मन मला सांगतं.’’
आता संध्याकाळ झाली होती. दुरून आमचं घर दिसत होतं. आजोबा व्हरांड्यात येऊन बसले होते. माझे आजोबा म्हणजे काका माझे मित्रच होते. मी पळतच त्यांच्यापाशी जाऊन त्यांना दिवसभराची हकिगत सांगायला बसले.
मी जवळ जाताच ते हसून म्हणाले‚ ‘‘काय गं‚ _काशीयात्रेला जाऊन आल्यावर काहीतरी सोडायला लागतं त्याविषयी तुला तुझ्या अव्वानं सांगितलं की नाही?’’__
‘‘काका‚ तुम्ही कशाविषयी बोलताय?’’
‘‘पूर्वीच्या काळी काशीयात्रेला काही दिवस नव्हे‚ तर काही महिने लागत. आज आपल्याकडे रेल्वे आहे‚ बसेस आहेत. पण त्या काळी लोकांना जंगल पार करून जावं लागे. वाटेत वन्य पशूंचं भय असे़ अनेकांना आपल्या घरी परत पोहोचणंसुद्धा शक्य होत नसे. त्या वेळी काशी यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना जिझिया नावाचा कर भरावा लागत होता. पण अकबर राजाने हा कर रद्द केला. पुढे औरंगजेबाने तो परत आकारण्यास सुरवात केली. त्यामुळे काशीयात्रेला जाणं हे कष्टांचं तर होतंच‚ पण खर्चाचंही होतं. त्यामुळे हे सगळं पार करून एखादी व्यक्ती काशीला पोहोचलीच‚ तर तिथं जाऊन त्या व्यक्तीला एक जगावेगळा नेम करावा लागायचा. *गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळी पाण्याचं अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षाने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यामुळे ते वचन कधीच मोडाचयं नाही.’’*
मी काकांचे ते शब्द ऐकून आश्चर्यचकित झाले. काकांनी थांबून एक दीर्घ श्वास घेतला.
*‘‘त्या व्यक्तीला काही विशिष्ट नियमांचं पालन करावं लागतं.’’*
‘‘कोणते नियम?’’
*‘‘गहू‚ तांदूळ‚ दूध‚ डाळी‚ तूप आणि गूळ या गोष्टी सोडता येत नाहीत. पण तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल‚ त्या भागात मुबलक पिकणारी एखादी भाजी‚ एखादं फळ किंवा तुमचं आवडतं एखादं पक्वान्न खाणं तुम्ही कायमचं सोडू शकता.* उदाहरणार्थ तुला समजा जिलबी खायला खूप आवडत असेल‚ तर तू काशीला जाऊन जिलबी कायमची सोडू शकतेस. पण समजा तुला एखादी गोष्ट मुळातच आवडत नसेल‚ म्हणजे उदाहरणार्थ कार्ल्याची भाजी‚ तर ती काही तू काशीला जाऊन सोडू शकत नाहीस. *थोडक्यात काय‚ आपल्या आवडत्या गोष्टीचा आपण कायमचा त्याग केला‚ तर जेव्हा जेव्हा ती गोष्ट आपल्याला दिसते‚ तेव्हा तेव्हा आपल्याला काशीची आठवण होते.’’*
‘‘पण काका‚ ही गोष्ट खूपच अवघड आहे हो.’’
माझ्या आजोबांचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ते तसेच पुढे बोलत होते. *‘‘समजा जर पती-पत्नी एकत्र काशीयात्रेत गेले‚ तर ते दोघंही एकच गोष्ट सोडू शकतात. ते खूप सोपं पडतं‚ कारण घरी परत गेल्यावर दोघांसाठी वेगळा स्वयंपाक करावा लागत नाही. पण समजा असं झालं‚ की पती-पत्नी काशीयात्रेला एकत्र न जाता वेगवेगळे गेले आणि त्यांनी तिथे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी सोडल्या‚ तर मात्र दोघांनाही एकमेकांनी सोडलेल्या गोष्टी खाणंसुद्धा वर्ज्य असतं.’’*
तेवढ्यात अव्वासुद्धा व्हारांड्यात येऊन बसली.
‘‘बापरे! हे सगळं फारच गुंतागुंतीचं प्रकरण दिसतंय‚’’ माझ्या मनात आलं. मी विचारलं‚ ‘‘काका‚ *आपली आवडती गोष्ट कायमची सोडणं फार अवघड असेल ना?’’*
*‘‘ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. तुम्ही जर मनापासून एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची शपथ घेतली असेल‚ तर काही काळानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा मोह पडत नाही. त्या गोष्टीवाचून जगण्याची सवय होऊन जाते.’’*
‘‘तुम्ही जर काशीला गेलात‚ तर तुम्ही काय सोडाल?’’ मी त्यांना खोडकरपणे विचारलं.
‘‘तुझी ही अव्वा आहे ना‚ ती मला सगळ्यात जास्त आवडते. म्हणूनच मी कधीही काशीला जायचं नाही‚ असं ठरवलंय.’’ आजोबा हसून म्हणाले. त्यांचे डोळे चमकत होते.
अव्वा खरं तर इतकी म्हातारी होती. पण तरीसुद्धा आजोबांच्या बोलण्यावर ती लाजून हळूच घरात निघून गेली.
मग जरा गंभीर होत ते म्हणाले‚ ‘‘अगं‚ *काशीला जाणं आपल्या हातात कुठे असतं? सगळं तर त्या काशी विश्वनाथाच्या हाती असतं. त्याची जेव्हा मर्जी होईल‚ तेव्हा तोच बोलावणं धाडेल.’’*
असे दिवस‚ महिने‚ ऋतू लोटले. आमची अव्वा काशीला कधी गेलीच नाही. ती त्याआधीच देवाघरी गेली. तिची फार पूर्वीपासून भीष्माष्टमीला देह ठेवण्याची इच्छा होती. भीष्माचार्यांनी ज्या दिवशी देह ठेवला‚ त्याच दिवशी आजीला काळानं ओढून नेलं‚ असं म्हणतात‚ की ज्यांना भीष्माष्टमीच्या दिवशी मृत्यू येतो‚ त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं आपोआप खुली होतात. त्या वेळी मी पुण्यात होते. अव्वाच्या निधनाची बातमी ऐकून मी हुबळीला पोहोचेपर्यंत ती भिंतीवरच्या तसबिरीत जाऊन बसली होती. मला तिच्या रक्षेच्या कलशाचं तेवढं दर्शन घेता आलं. आजही माझ्या डोळ्यांपुढे हसरी‚ खेळकर स्वभावाची‚ कामसू आणि सर्वांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारी माझी अव्वा येते.
अव्वाच्या शेवटच्या इच्छेनुसार तिचा कुंकवाचा करंडा माझ्या मावशीनं माझ्या हातात ठेवला. मी तो एका जुन्या पेटीत अगदी जपून ठेवला आहे. अव्वा बऱ्याचदा त्यातलं कुंकू घेऊन लावायची. पण ती गेली तेव्हा आपल्याकडे कुंकवाच्या टिकल्यांची पाकिटं बाजारात मिळू लागली होती. त्यामुळे मी त्या कुंकवाचा फारसा वापर केला नाही.
जसे जसे दिवस लोटले तसा माझा वाचनाचा व्यासंग खूप वाढला. मी बौद्ध धर्माविषयी खूप वाचन केलं. गौतम बुद्धाच्या हृदयात जी अपार करुणा भरलेली होती‚ त्यानं माझं हृदय हेलावून गेलं. माझ्या मनात खोलवर कुठेतरी ते विचार स्पर्शून गेले. मला नक्की काय झालं‚ ते नीट सांगता येणार नाही. गौतम बुद्धानं मध्यम मार्ग का स्वीकारला होता‚ ते त्या वेळी मला समजलं. बौद्धधर्माची प्रतीकं म्हणजे चक्र आणि दोन हरणं. गौतम बुद्धाच्या आयुष्यात सारनाथ या स्थळानं खूप मोठी भूमिका बजावली आहे. बुद्धानं आपल्या आयुष्यातील पहिलं प्रवचन सारनाथ येथे दिलं. वाराणसीपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका उद्यानात त्यांनी हे प्रवचन दिलं. या उद्यानात खूप हरणं होती. मला त्या वेळीच असं कळलं की वारणा आणि अस्सी या नद्या पुढे जाऊन गंगेला मिळतात. त्यावरूनच वाराणसी शहराचं नाव पडलं. फार प्राचीन काळापासून हा परिसर पवित्र आहे‚ असं मानलं जातं. इसवी सन पूर्व ३२९मध्ये ह्यू एनत्संग हा चीन प्रवासी जेव्हा भारतात आला‚ तेव्हा त्यानं लिहिलेल्या प्रवासवर्णनांमध्ये वाराणसी शहराचं‚ तेथील मंदिरांचं‚ छोट्या छोट्या नद्यांचं‚ झऱ्यांचं आणि त्या शहराच्या वैभवाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मला एकदा तरी काशीला जाऊन येण्याची तीव्र इच्छा झाली होती. पण कामाचं दडपण आणि दैनंदिन गोष्टीमध्ये मी इतकी गुंतले होते‚ की ते जमतच नव्हतं.
१९९५ सालच्या दिवाळीत मला कुणीतरी एक भेट पाठवली. मी ती उघडून पाहिली. ते एक पुस्तक होतं. पुस्तकाचं शीर्षक होतं- ‘बनारस : प्रकाशाचं गाव.’ डायना एल. एक. या लेखिकेनं ते लिहिलं होतं. मी ते बाजूला ठेवून दिलं. दिवाळीची गडबड संपली की निवांतपणे ते वाचायचं‚ असं मी ठरवलं होतं. त्या वर्षी दिवाळीत परंपरागत आरती करायची‚ असं आम्ही कुटुंबीयांनी ठरवलं होतं. मी माझ्या खोलीत जाऊन माझी जुनी ट्रंक उघडून बसले. मला पूजेसाठी चांदीचं तबक काढायचं होतं. अचानक मला तो कुंकवाचा करंडा दिसला आणि माझ्या अव्वाची तीव्रतेनं आठवण झाली. मी त्या तबकाविषयी पूर्णपणे विसरले. मी हळुवार हातांनी तो करंडा उघडला आणि माझ्यासमोर अव्वा आली. ती करंड्यातून कुंकू घेऊन कसं लावायची‚ ते आठवलं. ती त्या दिवशी काशी समाराधनेच्या कार्यक्रमासाठी कशी तयार झाली होती‚ त्याची मला आठवण झाली. आम्ही दोघी पायी पायी चालत‚ गप्पागोष्टी करत त्या समारंभात गेलो होतो‚ ते सगळं डोळ्यांसमोर उभं राहिलं. तिनं तो कुंकवाचा करंडा मला द्यावा‚ म्हणून मी तिच्यापाशी किती लाडीगोडी लावत असे‚ तेही मला आठवलं. तिचा काशीयात्रेला जाण्यावर किती गाढ विश्वास होता. पण तिला स्वतःला कधीच काशीला जाण्याची संधी मिळाली नाही. एवढं असूनही तिला त्या गोष्टीचा कधी खेद वाटला नाही. मी स्वतःशीच म्हणाले‚ ‘‘आजकाल काशीला जाणं इतकी काही काठीण गोष्ट राहिलेली नाही. शिवाय डायनानं लिहिलेलं हे पुस्तक माझ्या सोबतीला आहे. मी जाण्यापूर्वी ते वाचलं‚ की मला ते शहर नीट कळेल. माझ्या आजीसाठी तरी मला काशीला जायलाच हवं...’’
‘‘काय गं? आतल्या खोलीत काय ध्यान वगैरे लावून बसली आहेस की काय?’’ माझी आई बाहेरून विचारत होती. ‘‘चल लवकर‚ बाहेर ये. सगळे इथे वाट बघतायत.’’
आईच्या हाकांनी मी भानावर आले.
मी घाईनं ते तबक शोधलं आणि हातात तबक आणि तो कुंकवाचा करंडा घेऊन बाहेर आले. मी त्या दोन्ही गोष्टी माझ्या आईच्या हातात ठेवल्या.
‘‘अरे वा‚ हा तर माझ्या आईचा कुंकवाचा करंडा. तिचा अत्यंत आवडता होता हा. म्हणजे या करंड्याच्या रूपानं जणू काही आईच आपल्यात आज आहे.’’ माझी आई म्हणाली.
दिवाळीचे दिवस संपल्यावर मी ते बनारस शहराबद्दलचं पुस्तक वाचायला घेतलं. ते पुस्तक अप्रतिम सुंदर होतं. खरंतर त्या लेखिकेनं हार्वर्ड विद्यापीठात सादर केलेला तो पीएच.डी.चा प्रबंध होता. ती एक परदेशी स्त्री होती ती. मुद्दाम भारतात येऊन राहिली होती. तिनं इथल्या धर्मक्षेत्रांचा खास अभ्यास केला होता आणि इथे मी काहीही न करता नुसती बसून होते. मला स्वतःचीच लाज वाटली. ते पुस्तक वाचून मला काशीला भेट देण्याची तीव्र इच्छा झाली. मला बालपणी त्या नगराविषयी जी उत्सुकता वाटली होती‚ त्याची आठवण झाली. शिवाय माझ्या आजीची अपुरी राहिलेली इच्छासुद्धा पूर्ण करायची होती.
१९९६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात मी कोणालाही बरोबर न घेता एकटीच काशीला गेले. तिथं एका हॉटेलात उतरले. शहराच्या एका टोकाला असलेल्या विश्वनाथ मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलं. मंदिरात विश्वानाथाची बिल्वपत्रांची पूजा करण्यात येत होती. तिथे दर्शनासाठी आलेल्या लोकांची मोठीच गर्दी उसळली होती. तिथे बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा पहारा होता. पलीकडच्या बाजूलाच ग्यानवापी मशीद होती. दोहोंच्या मधोमध तारेचं कुंपण होतं. माझ्या मनात या मंदिराची जी प्रतिमा होती‚ त्यापेक्षा खूपच वेगळं दृश्य होतं ते. ते पाहून माझी थोडी निराशा झाली. पण देशभरातून विविध वयाचे लोक तिथे दर्शनासाठी आले होते. त्यांची श्रद्धा व भक्ती पाहून मी आश्चर्यानं थक्क झाले.
मंदिरात दर्शन घेऊन मी बाहेर पडले‚ ती थेट मणिकर्णिका घाटावर गेले. या ठिकाणी अहोरात्र चिता पेटलेल्या असतात. मृतदेहांचं दहन करण्याचं काम सुरूच असतं. आपल्या देशात शिक्षणाचा इतका प्रसार झाला‚ संस्कृतीमध्ये इतके बदल घडून झाले तरीही काशीला देह ठेवल्यावर स्वर्गप्राप्ती होते‚ या संकल्पनेत काहीही बदल झाला नाही. त्यानंतर मी आणखीही घाटांवर जाऊन आले. या पवित्र शहरात जागोजागी घाणीचं साम्राज्य पाहून उबग आला. त्यानंतर मदन मोहन मालवीय यांनी एकट्याच्या जिवावर उभ्या केलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाला मी भेट दिली. तसेच वस्तुसंग्रहालये पाहिली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचं तैलचित्रांच्या माध्यमातून केलेलं मनोहारी चित्रण या संग्रहालयांमध्ये पाहायला मिळालं.
मी पायी चालत अनेक मंदिरांमध्ये जाऊन तिथल्या देवदेवतांचं दर्शन घेतलं. अन्नपूर्णा देवी‚ भैरवनाथ‚ संकटमोचन हनुमानाचं प्रसिद्ध मंदिर‚ असं सगळं पाहिलं. हनुमान मंदिरात भक्तांपेक्षा जास्त संख्येनं माकडं उपस्थित होती. माझ्या आजूबाजूला सर्वत्र काळे गंडे विक्रीला ठेवण्यात आले होते. पण मी मात्र एकसुद्धा खरेदी केला नाही. कारण आता माझा त्यावर विश्वास उरला नव्हता. गंगेचं पाणीसुद्धा लहान-मोठ्या कलशांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं. गंगेचं पाणी आजही पवित्र मानण्यात येतं.
त्यानंतर काशीच्या गल्ल्या-बोळ्यांमधून मी पायी भटकंती केली. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. जागोजागी दुकानांमध्ये अतिशय सुंदर बनारसी साड्यांचं प्रदर्शन मांडलेलं होतं. कित्येक साड्या माझ्या नजरेत भरल्या. खरंच‚ साडी हा सुंदर शोध आहे. एक लांब कापडाचा पट्टा‚ आणि तो नेसण्याच्या किती विविध पद्धती! ग्रीक‚ रोमन आणि आपण भारतीयांनी शोधून काढलेल्या! मी अनेकदा परदेश प्रवास करते. तिथं भेटलेल्या अनेक लोकांकडून मला आपल्या भारतीय साडीचं− तिच्या काठपदराचं‚ तिच्या सौंदर्याचं वर्णन ऐकायला मिळतं. साडी नेसलेल्या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच दिमाख आणि भारदस्तपणा प्राप्त होतो. मी कित्येक लोकांना साडीच्या सौंदर्यानं भारावून गेलेलं पाहिलं आहे.
काशीमध्ये अत्यंत सुंदर आणि आगळ्यावेगळ्या बनारसी साड्या निर्माण होतात. ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. काळानुसार त्यात थोडेफार बदल घडून आलेले आहेत; पण आजही तिथे बनणाऱ्या साड्या सुंदरच असतात. मीसुद्धा स्वतःसाठी थोड्या साड्या खरेदी करायचा बेत केला होता. एक फिक्या रंगाची साडी आणि एक अव्वाकडे होती तशी हिरव्यागर्द रंगाची साडी. दुकानातील विक्रेते मला आणि रस्त्यावरच्या इतर लोकांना बोलावत होते. साड्या खरेदी करण्याच्या विचाराने मी हरखून गेले होते. पण मग मी स्वतःच्या मनाला समजावलं- ‘एवढी घाई करायची काय गरज आहे; उद्या आणखी थोड्या साड्या बघून झाल्यावर सावकाश खरेदी करता येईल.’ मग मी नुसतंच रस्त्यांमधून फेरफटका मारायचं ठरवलं.
मी चालता-चालता पुन्हा एकदा घाटांकडे गेले. अखेर मी अत्यंत गजबजलेल्या दशाश्वमेध घाटापाशी जाऊन पोहोचले. तिथे बरीच गर्दी जमली होती. आरतीची तयारी सुरू होती. मी आजूबाजूला नजर फिरवली. तिथे बरेच पर्यटक होते. ते केवळ भारतातल्या विविध राज्यांमधूनच नव्हे‚ तर जगभरातून आलेले होते. ते हसून परिसराचे फोटो काढत होते. तिथली घाण‚ तिथले गल्ल्या-बोळ‚ तिथली ती उबग आणणारी गर्दी यांपैकी कशाचाच त्यांना त्रास होताना दिसत नव्हता. तिथे ध्यानस्थ बसलेले साधू होते. काही भक्त गंगास्नानाची तयारी करता होते. ते पाहून मलासुद्धा मोह पडला. ‘आपणही गंगेच्या पाण्यात एक डुबकी घ्यायला काय हरकत आहे! आपणही तीन ओंजळी पाण्याचं अघ्र्य देऊन या काशीयात्रेची सांगता केली पाहिजे.’−माझ्या मनात आलं. मग त्या पाण्याकडे निरखून पाहिलं. त्या पाण्यात खूप घाण तरंगत होती. तिथे डुबकी मारायला माझं मन होईना. मला अचानक आठवण झाली. माझा एक जुना मित्र अजय या घाटाच्या जवळपासच कुठेतरी राहत होता. ‘गंगेच्या पाण्यात उतरण्यासाठी जवळपास कुठलं कमी गर्दीचं‚ जरा स्वच्छ ठिकाण आहे का‚ हे त्याला विचारलं पाहिजे‚’ मी स्वतःशीच म्हणाले.
मी जवळ असलेल्या पे फोनवरून त्याला फोन केला. मी काशीला येत असल्याचं अजयला आधी कळवलं नव्हतं‚ याबद्दल तो माझ्यावर चिडला. मग त्यानं मला त्याच ठिकाणी थांबायला सांगितलं. काही मिनिटांतच तो स्कूटरवरून तिथं आला.
‘‘मुळात तुझा मित्र या शहरात राहत असताना तू हॉटेलत जाऊन राहिलीसच कशी? आत्ताच्या आता सामान घेऊन माझ्या घरी चल.’’ तो म्हणाला.
त्याचं मन मोडणं माझ्या जिवावर आलं. मी त्याचं म्हणणं मान्य केलं.
मी सामानसुमान घेऊन त्याच्या हवेलीत येऊन दाखल झाले. त्या हवेलीत तीन कुटुंब राहत होती. हवेली खूपच मोठी होती. प्रत्येक कुटुंबाला स्वतःची स्वतंत्र जागा होती. अजयच्या घराच्या बाजूने गंगेचं विस्तीर्ण पात्र दिसत होतं. रात्री अंधारात दिवे चमकत होते. अत्यंत सुंदर दृश्य होतं ते.
त्याची पत्नी निशी हिनं मला आग्रहानं जेवायला वाढलं. खास बनारसी मिठाई आणि बनारसी पान असा छान बेत केला. त्यानंतर अजय मला हिंदुस्थानी संगीताच्या मैफलीला घेऊन गेला. हे शहर संगीतप्रेमींचं शहर होतं. बिसमिल्ला खान आणि रविशंकर यांच्यासारखे महान वादक याच शहरातले. हे शहर कितीही घाणीनं भरलेलं असलं‚ तरीसुद्धा ते जिवंत होतं‚ इथली संस्कृती चैतन्यपूर्ण होती.
मी पहाटे उठून घाटावर गेले. गंगेत डुबकी मारण्याची मनाची तयारी करून गेले. मी आधी पायऱ्यांवर एकटीच जाऊन बसले. नंतर पाण्यात उतरून खांद्यापर्यंत नदीच्या पात्रात शिरले. पाणी खूप थंडगार होतं. माझ्या अंगात हुडहुडी भरली. पण जरा वेळात त्याची सवय झाली.
मी हातांच्या ओंजळीत पाणी घेतलं आणि मला अव्वाची आठवण झाली. माझ्या नजरेसमोर ती उभी राहिली. हिरवीकंच साडी आणि पिवळा ब्लाऊज घालून ती उभी होती. ती प्रेमानं माझ्याकडे पाहत होती. गंगेच्या पाण्याच्या तीन ओंजळींविषयी मला सांगत होती. मला त्या उन्हाळ्यात व्हरांड्यात बसलेल्या माझ्या आजोबांची-काकांची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर तरळली. कुणी‚ कधी काशीला जायचं‚ हे स्वतः काशीचा विश्वनाथच ठरवतो‚ असं त्यांनी मला सांगितलं होतं. माझ्या आजी-आजोबांना या काशी शहराविषयी‚ गंगा नदीविषयी केवढं प्रेम होतं! माझे डोळे पाण्यानं भरून आले. किती तृप्त आणि समाधानी होते माझे आजी-आजोबा. त्यांची ईश्वरावर किती गाढ श्रद्धा होती. असे आजी-आजोबा मला लाभले हे माझं केवढं भाग्य!
‘‘आजकाल काशीला जाणं किती सोपं झालंय‚’’ माझ्या मनात आलं. ‘‘मी बंगळूरहून विमानानं दिल्लीला आणि तिथून वाराणसीला आले. मी केवळ पाच तासांत इथे येऊन पोहोचले. आता परत गेल्यावर काशी समाराधने नव्हतं‚ जेवणावळी नव्हत्या. लोकांना काळे गंडे आणि गंगाजळ वाटायचं नव्हतं. या सगळ्या गोष्टींसाठी कुणाकडे वेळही नव्हता आणि कुणाची इच्छाही नव्हती.’’
मी उगवत्या सूर्याकडे पाहिलं आणि वर्तमानात परत आले. मी हातांत गंगेच्या पाण्याची ओंजळ घेऊन म्हणाले‚ ‘‘हे गंगामाते‚ आज मी इथे या उगवत्या सूर्याच्या साक्षीने ही पहिली ओंजळ माझ्या आजी-आजोबांच्या वतीने तुला अर्पण करत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. ते जिथे कुठे असतील‚ तिथे सुखात राहू देत.’’
मला त्यानंतर खूप मोकळं झाल्यासारखं‚ खूप हलकं वाटलं. माझ्या आजोबांनी मला काहीही सांगितलं नव्हतं. पण तरीसुद्धा काशीयात्रा करण्याची त्यांची इच्छा मी आज पूर्ण केली होती.
त्यानंतर मी आणखी एक ओंजळभर पाणी घेऊन मोठ्यांदा म्हणाले‚ ‘‘हे गंगामाते‚ या सूर्याच्या साक्षीने तू सातत्याने आमच्या देशाची जीवनधारा बनून राहिली आहेस. तू तुझ्या या काठावर अनेक साम्राज्ये उदयास येताना आणि जमीनदोस्त होताना पाहिली आहेस. मी या देशात जन्माला आल्याबद्दल कृतज्ञ आहे आणि या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान वाटतो. तुझा असाच उत्कर्ष होऊ देत; मी या ओंजळभर पाण्याशिवाय तुला दुसरं काय देऊ शकणार?’’
पाण्याची तिसरी ओंजळ भरून घेत असताना मला माझ्या आजोबांचे शब्द आठवले. *‘‘तुला जी गोष्ट सर्वांत प्रिय आहे‚ ती सोड.’’*
‘‘मी कुठल्या गोष्टीचा त्याग करू?’’ मी विचारात पडले. हे जीवन‚ विविधरंग‚ आकार‚ निसर्ग‚ संगीत‚ कलाकृती‚ वाचन आणि खरेदी हे सर्वच अत्यंत प्रिय होतं. साडी खरेदी ही माझी अतिशय आवडती गोष्ट होती. मला निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगाच्या साड्या आवडायच्या. दर वर्षी बदलत चाललेल्या साड्यांच्या विविध डिझाईन्सची मला नेहमीच भुरळ पडायची. ‘‘ठरलं तर मग. मला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट मी सोडली पाहिजे‚ असं या काशी शहराचंच म्हणणं आहे तर *आज इथे‚ या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं मी आजपासून मी सर्व प्रकारच्या खरेदीवर पाणी सोडत आहे. अन्न‚ औषधपाणी‚ प्रवास‚ पुस्तके व संगीत याचा अपवाद वगळता‚ मी इथून पुढे कोणत्याही प्रकारची खरेदी करणार नाही. मी आजपासून हा नेम करत असून‚ माझ्या जीवनाच्या शेवटापर्यंत मी या गोष्टीचं पालन करेन‚’’ असं म्हणून मी ओंजळीतील पाणी गंगा नदीच्या प्रवाहात सोडलं.*
दूरवर कुठेतरी माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुटल्यासारखं मला वाटलं. काही क्षणांनंतर मी पाण्यातून चालत बाहेर आले आणि टॉवेल पांघरून घाटाच्या पायऱ्यांवर जरा वेळ बसले.
मग अजयच्या घरी परत येऊन मी कपडे बदलले आणि अव्वाच्या कुंकवाच्या करंड्यातून चिमूटभर कुंकू घेऊन स्वतःच्या कपाळाला लावलं.
ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची आहे.
खरं सांगायचं‚ तर मी तो नेम केला आणि मला एक नवीन स्वातंत्र्य प्राप्त झालं. *आता स्वतःसाठी कशाचाही संचय करण्याची इच्छाच मनातून नाहीशी झाली आहे.* वर्षातून एकदा माझ्या काही जवळच्या मैत्रिणी‚ बहिणी मला त्यांच्या पसंतीच्या साड्या भेट म्हणून देतात. त्या साड्या मी नंतरचे कित्येक दिवस वापरते. पण जसजशी वर्षं गेली‚ तेव्हा हळूहळू मला त्या भेटी स्वीकारणंही नकोस वाटू लागलं. मला आता कुणीही काही देऊ नका‚ असं मी आता सर्वांना सांगितलं आहे.
*त्या शेवटच्या ओंजळभर पाण्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं आहे.*
♦️ *सुधा मूर्ती* ♦️
No comments:
Post a Comment