Monday, May 18, 2020

#दिवेलागणीचे_श्लोक । सौ आरती अत्रे-कुलकर्णी

#दिवेलागणीचे_श्लोक

© सौ आरती अत्रे-कुलकर्णी

. लेख कुठेही शेअर करायचा असल्यास नावासहित करावा.

हे बहुतेक श्लोक मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे. काही श्लोक कधीतरी वाचलेले संग्रह केलेले आहेत. त्याचा एकत्र अर्थासहित हा संग्रह/संकलन इथे देत आहे. याशिवाय कोणाला असेच लहान, छोटे श्लोक माहिती असल्यास ते कॉमेन्टमध्ये लिहावे. त्याचा अर्थ माहिती असल्यास तो पण लिहावा.
संध्याकाळी म्हणायचे दिवेलागणीच्या श्लोक हि हिंदू संस्कृती फक्त मनाच्या नव्हे तर कुटुंबाच्या स्वास्थासाठीपण आवश्यक आहे. दिवा लावल्यावर डोळे मिटून घरातील सर्वानी एकत्र बसून हे श्लोक म्हणावे.
आम्ही श्लोक म्हणून झाल्यावर पाढे म्हणत असू. आमच्या आधीची पिढी पाढे झाल्यावर पावकी, निमकी, अडीचकी असेही म्हणत असायचे.
पण आजकाल मुलांना आणि पर्यायाने पालकांनाही 'इतका' वेळ नसतो. दिवेलागणीच्या वेळेस घरातील सर्व लोक हजर असतात, रिकामे असतात, देवासमोर येतीलच... असेही नाही. जर का हे श्लोक एकदा स्पष्ट, मोठ्याने म्हणून ऑडिओ करून ठेवला आणि स्वयंपाक करताना, मुलांना एकत्र बसवून टेबलवर ऐकले आणि म्हणाले तर ते पाठही होतील. 
हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे देव आहेत, त्यांची वेगवेगळी 'वाहने' आहेत जसे प्राणी, फुले.... वेगवेगळ्या कारणाने देवाने वेगवेगळे अवतार घेतले आहेत. विचार करा, आपणही हे सारे पाठ्यपुस्तकांमधून शिकलेलो नाहीत. गोष्टीतून, रात्रीच्या गप्पातून, आजी-आजीबाकडून आपल्याला हळूहळू हि सारी माहिती होत गेलेली आहे. 
आता कुटुंब लहान झाली, वेगवान झाली, व्यग्र झालीत. शिवाय हे सारे वाचण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा त्यांना गॅझेट्स जवळची वाटतात. रोज थोडा वेळ द्या, अगदी १० मिनिटेपण चालतील आणि मुलंबरोबर काहीतरी म्हणत जा...  
सोबत दिलेले बहुतेक श्लोक संस्कृत आणि मराठीमध्ये आहेत. तसेच ते चार ओळींचे लहान श्लोक आहेत. मोठे श्लोक मुलांना कंटाळवाणे वाटतात, ते मुलांनी म्हणावे असा आग्रह धरू नये. सोबत कुठल्या गोष्टी सांगाव्यात, माहितीही दिलेली आहेत. मुलांना अश्या गोष्टीही सांगाव्यात. मुले प्रश्न विचारतील.. का, कसे, किती, केव्हा, कशाला ...शक्यतो उत्तरे द्यायचा प्रयत्न करावा, टाळू नये.
आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. शुभम भवतु!

संध्याकाळी (तिन्हीसांजेला) देवासमोर, तुळशीसमोर तेलाचा दिवा लावून हा श्लोक म्हणावा.
शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धि-विनाशाय, दीपज्योती नमोऽस्तुते
दिव्या दिव्या दिपोत्कार, कानीं कुंडलें मोतीहार
दिव्याला देखून/पाहून नमस्कार
ये ग लक्ष्मी बैस ग बाजे, आमचे घर तुला साजे
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो सारीरात/मध्यान्हरात
दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशीं
माझा नमस्कार सर्व देवांपाशी 
घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे, भाऊ-बहीण सुखी राहू दे
(अर्थ - हे दीपज्योती,तू शुभ आहेस, कल्याणकारी आहेस. ती आरोग्य आणि धनसंपदा देतेस. शत्रुबुद्धीचा तू नाश करतेस, म्हणून तुला नमस्कार असो.
संध्याकाळची वेळ हि लक्ष्मी येण्याची वेळ. बाजे म्हणजे पलंगावर. लक्ष्मीचे स्वागत करूयात आणि तिला आपले घर 'साजे' म्हणजे आवडेल असे ठेउयात. थोडक्यात दिवेलावणीच्या आधी घर स्वच्छ आवरून, झाडून नीट ठेवावे. घरातील इडा-पीडा बाहेर जाऊ देत आणि लक्ष्मी घरामध्ये येऊ देत. तिळाचे तेलाची वात जास्त वेळ तेवत राहते, तो दिवा सारी रात्र जळू देत.दिवा देवाजवळ आणि तुळशीपाशी लावावा. घराचा धनी सुखी असला तर घरातील सर्व लोक सुखी होतात, म्हणून घरच्या धन्याला सुखी ठेव. घरातील लहान मुले सुखी राहू देत. हीच मुले मोठी झाल्यावर जेव्हा हे श्लोक म्हणतात तेव्हा त्यांना त्यांच्यातील हे बंध आठवूदेत.)

कोणत्या देवाकडे काय मागावे -
गणपती बुद्धी दे
मारुती शक्ती दे
विठोबा भक्ती दे
नारदा युक्ती दे
श्रीकृष्णा प्रेम दे
सरस्वती विद्या दे
लक्ष्मी संपत्ती दे
सूर्य प्रकाश दे
रामराया..सर्वाना सुखी ठेव 
 एखादेवेळेस मुलांना एका एका देवाची गोष्ट सांगावी

गुरूंना नमस्कार करताना म्हणावे -
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः
(अर्थ - गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच विष्णू आणि गुरु हेच महेश्वर/शंकर आहेत.गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. अश्या गुरूंना मी नमस्कार करतो. गुरु म्हणजे अशी व्यक्ती असते ज्याकडून तुम्ही काहीतरी चांगले शिकता. अशी व्यक्ती जी तुमची टीचर असेल, पालक असेल, मित्र-मैत्रिणी असतील किंवा समाजातील इतर कोणी.)

गुरूंना/ देवाला  नमस्कार करताना म्हणावे -
ज्या ज्या स्थळीं हे मन जाय माझे | 
त्या त्या स्थळीं हे निज रूप तुझे |
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ||
जय जय रघुवीर समर्थ ||

देवीस नमस्कार करताना म्हणायचा श्लोक –
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
(अर्थ - सर्व शुभ, शुभ कर्तृत्ववान, सर्व शुभ गुणांनी परिपूर्ण, जी भक्तांचे सर्व उद्देश पूर्ण करतो (पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष), जिला तीन डोळे आणि एक चमकणारा चेहरा आहे  अश्या हे  नारायणी देवी तुला माझा नमस्कार असो.)

देवीस नमस्कार करताना म्हणायचा श्लोक –
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः  
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्  ।
(अर्थ - देवीसूक्तमच्या ३० श्लोकांपैकी हा पहिला श्लोक आहे. हे देवी माझा नमस्कार असो, जी शिवाचा एक भाग आहे तसेच निसर्ग (प्रकृती)आणि भद्राला(सुस्वभावी देवीला)  प्रणाम करतो.)

शिवस्तुती -
कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी |
(अर्थ - शिवस्तुती मध्ये एकूण ३१ श्लोक आहेत, त्यातील हा पहिला श्लोक. कैलासावर राहणार 'राणा' म्हणजे कैलासाचा मालक, जी डोक्यावर चंद्र धारण करतो, ज्याच्या डोक्यावर (नागाने) फणी धरलेली आहे आणिजो सगळ्यांचे दुःख हरण करतो म्हणजे दूर नेतो अश्या शंभू/शंकराशिवाय मला कोण तारणार/मदत करणार?)

गणपतीचे श्लोक -
प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे, आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवू
हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहू तोषवी ||
(अर्थ - प्रारंभी, सुरुवातीला गणपतीला विनंती करूयात, जी विद्यांचा सागर आहे, जो आपले अज्ञान हारोनी/दूर नेऊन आपल्याला बुद्धी देतो, असा आराध्य/पहिला मोरेश्वरा, जो चिंता क्लेश दरिद्र दुःख आपल्यापासून लांब/देशांतर पाठवतो आणि हेरंब/गणाचा नायक/गज मुख असलेला तो आपल्याला तोषवतो/आनंद देतो.

गणपतीचे श्लोक -
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
(अर्थ - वक्र म्हणजे वाकडी आणि तुंड म्हणजे तोंड/सोंड, महाकाय ज्याचा शरीराचा आकार महा/मोठा आहे असा, कोटीसूर्याएव्हडे ज्याचे तेज आहे (अश्या गणपतीला माझा नमस्कार) आणि माझे सर्व कार्य निर्विघ्न, विघ्न न येत पार पडू देत.)

गणपतीचे श्लोक -
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
(अर्थ - मोरया, मी तुझ्यापुढे लहान बाळच आहे. माझे कोटीच्या कोटी अन्याय तू/ मोरेश्वरा / बा/बाप/वडील तुझ्या (मोठया/महाकाय) पोटात घाल.)

गणपतीचे श्लोक -
मोरया मोरया असे नाव तुझे
कृपासागर हेचि माहेर माझे
तुझी सोंड हि वाकडी असे एकदंता
मला बुद्धी दे चांगली ज्ञानवंता
(अर्थ - मोरया, तुझे नाम घेणे हेच मला माहेर आहे. (माहेरी आल्यासारखाच तुझे नाव घेऊन आनंद होतो.) तुझी सोंड वाकडी आहे, तू एकदंत आहेस. तू ज्ञानवंत आहे, मला चांगली बुद्धी दे.)

गणपतीचे श्लोक -
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे वरी वरे, दुर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे ||
(अर्थ - तुझ्या डोळ्यात जे दोन हिरे आहेत त्याचा पसरलेला प्रकाश सगळीकडे आहे, माथ्यावरून शेंदूर पाझरत आहे आणि माथ्यावर वाहिलेल्या दुर्वांचे  तुरे आहेत. याचे दर्शन घेऊन माझ्या मनातील मनोरथ पूर्ण झालेले आहे आणि चिंता हरण/दूर झाल्या आहेत. गोसावींचा मुलगा कवी वासुदेव अश्या मोरयाचे स्मरण करतो.)

गणपतीचे श्लोक -
गणपती तुझे नांव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधे! श्रीगजानना || किंवा आम्हा बुद्धी दे, बुद्धीवंदना ||
(अर्थ - हे गणपती , तुझे नाव घेता घेता माझे चित्त त्यातच रंगले आहे. हे गौरीनंदन, मी तुझी प्रार्थना करतो. हे बुध्दीवंदना, तू आम्हाला बुद्धी दे.)
गणपतीच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्यात जसे पृथ्वीप्रदक्षिणा,रावण आणि शिवलिंगाची गोष्ट

जेवताना म्हणायचे श्लोक -
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥
(अर्थ - कवळ/जेवतानाचा घास वंदन/तोंडात घास घ्यायच्या आधी श्रीहरीचे/देवाचे नाव घ्यावे. फुकाचे/फुकटचे नाव घेऊन सहज/प्रयत्नांशिवाय (अन्नाचे) हवन/पचन होते. अण्णा आपल्याला जीवन देते, म्हणून ते पूर्णब्रह्म आहे.हे केवळ उदार/पोट भरण नसून एक यज्ञकर्म आहे.)

जेवताना म्हणायचे श्लोक -
जनीं भोजनी नाम वाचे वदावे
अती आदरे गद्यघोषे म्हणावे
हरीचिंतने अन्न सेवित जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥

जेवताना म्हणायचे श्लोक -
देवा, अन्न दिलेस मज तू
तुझे आभार मानू किती
आईनेही पदार्थ सुंदर 
केले प्रयास अति ||
वाया न दडवीन अन्न कणही 
मी जेवताना कदा
देशी तूच सुबुद्धी शक्ती मजला
या अन्नरूपे सदा ||

जेवताना म्हणायचे श्लोक -
धुवा हात-पाय, चला भोजनाला
बस नीट येथे, तुम्ही मांडी घाला
नका मागू काही, अधाशीपणाने
नका टाकू काही, करा स्वच्छ पाने ||

जेवताना म्हणायचे श्लोक -
मुखी ग्रास घेता, करावा विचार
कशासाठी हे, अन्न मी सेवनार?
घडो माझिया हातुनी देशसेवा
म्हणोनि मिळावी, मला शक्ती देवा ||
ज्ञानेश्वरांची मांड्याची गोष्ट सांगावी.

सरस्वती स्तुती –
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा पूजिता
सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥
(अर्थ - अगस्ती मुनींनी केलेल्या सरस्वती स्तोत्रामधील २१ श्लोकांमधील हा पहिला श्लोक. चमेलीच्या/कुंदाच्या  फुलांसारखी पांढरेशुभ्र , मोत्याची चमक असलेली  आणि शुद्ध पांढर्या कपड्यांसह जी संरक्षित आहे,जिने एका हातात वीणा आणि दुसरा हात वरदानाचा उचलला आहे, जी पांढऱ्या शुभ्र कमळावर बसलेली आहे,  भगवान ब्रह्मा, भगवान अच्युता (विष्णू), शंकर आणि इतर देवतांनी सदैव जिचे उपासना करतात , अशी हे सरस्वती देवी, कृपया माझे रक्षण करा आणि माझे अज्ञान पूर्णपणे काढून टाक.)

शारदा स्तुति -
नमस्ते शारदे देवी, वीणा पुस्तक धारिणी
विद्यारंभम् करिष्यामि, प्रसन्ना भावसर्वदा |
(अर्थ - हे शारदेदेवी,तुझ्या एक हातात वीणा आणि दुसऱ्या हातात पुस्तक आहे.तुझे स्मरण करून मी विद्या मिळवण्याचा आरंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमीच प्रसन्न राहा.)

पंचकन्या श्लोक -
अहल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा ।
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ॥
(अर्थ - गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता, हरिश्चंद्राची पत्नी तारामती आणि रावणाची पत्नी मंदोदरी, ह्या पाच महासतीचे जो रोज स्मरण करतो त्याच्या महापातकाचा/पापाचा नाश होतो. 
एखादेवेळेस मुलांना ह्या महासतींची गोष्ट सांगावी. https://en.wikipedia.org/wiki/Panchakanya )

वेदपठण शिकण्यापूर्वी -
गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिन् । 
पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवृत्तये ॥
(अर्थ - गणेश, सरस्वती, रवि, शुक, और बृहस्पति या पाच जणांचे स्मरण करूनच वेदपठण शिकले पाहिजे.)

पाच ज्ञानी लोक -
कृष्णो योगी शुकस्त्यागी राजानौ जनकराघवौ ।
वसिष्ठः कर्मकर्ता च पञ्चैते ज्ञानिनः स्मृताः ॥
(पार्टीच - योगी श्री कृष्ण, त्यागी शुकदेवजी, राजांमध्ये जनक आणि श्रीराम, आणि कर्मामध्ये वसिष्ठ हे पाच ज्ञानी लोक होते.)

पुण्यरुप लोक -
पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः ।
पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः ॥
(अर्थ - नल राजा, युधिष्ठिर, विदेही जनक आणि जनार्दन हे पुण्यरुपआहेत.)

ब्रह्माचे मानस/मानलेले पुत्र -
भृगुं पुलस्त्यं पुलहं क्रतुमङ्ग़िरसं तथा ।
मरीचिं दक्षमत्रिं च वसिष्ठं चैव मानसम् ॥
(अर्थ - भृगु, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अंगिरस, मरीचि, दक्ष, अत्रि, और वसिष्ठ हे नऊ ब्रह्माचे मानस/मानलेले पुत्र होय.)

अर्जुनाची नावे -
अर्जुनः फाल्गुनो जिष्णु र्किरीटी श्वेतवाहनः ।
बीभत्सु र्विजयः कृष्णः सव्यसाची धनञ्जयः ॥
(अर्थ - अर्जुन, फाल्गुन, जिष्णु, किरीटी, श्वेतवाहन, बीभत्स, विजय, कृष्ण, सव्यसाची, धनंजय हि अर्जुनाची नावे आहेत.)

कोण कश्यात श्रेष्ठ -
लक्ष्मणो लघुसन्धानः दूरपाती च राघवः ।
कर्णो दृढप्रहारी च पार्थस्यैते त्रयो गुणाः ॥
(अर्थ - लक्ष्मण लहान वस्तूचा वेध घेणार तरबेज होता, दूरच्या गोष्टीचा वेग घेण्यात श्रीराम निष्णात होते. कर्ण दृढ प्रहार करण्यात कुशल होता तर अर्जुन या तिन्ही गुणांमध्ये श्रेष्ठ होता.) अर्जुनाची 'पोपटाचा डोळा' हि गोष्ट सांगावी

नऊ कवी -
धन्वन्तरिक्षपणकामरसिंह शङ्कु
वेताल भट्ट घटकर्पर कालिदासाः ।
ख्यातो वराहमिहिरो नृपतेः सभायां
रत्नानि वै वररुचि र्नव विक्रमस्य ॥
(अर्थ - धन्वंतरि, क्षपणक, अमरसिंह, शंकु, वेतालभट्ट, घटकर्पर, कालिदास, वराह, मिहिर, और वररुचि हे महाराज विक्रमच्या नवरत्नासारखे नऊ कवी आहेत.)

भारतीय कालगणनाची सुरुवात -
युधिष्ठिरः विक्रम शालिवाहनौ
ततो नृपः स्याद्विजयाभिनन्दनः ।
ततस्तु नागार्जुन भूपतिः कलौ
कल्किः षडेते शककारकाः स्मृताः ॥
(अर्थ - युधिष्ठिर, विक्रमादित्य, शालिवाहन, विजयाभिनंदन, नागार्जुन आणि कलियुग मध्ये कल्कि या सहा लोकांपासून शक (भारतीय कालगणना) ची सुरुवात होते.)

सात चिरंजीव -
अश्वत्थामा बलि र्व्यासो हनुमांश्च बिभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ॥
(अर्थ - अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत.)

सहा वैष्णव -
बलि र्बिभीषणो भीष्मः प्रह्लादो नारदो ध्रुवः ।
षडेते बैष्णवा ज्ञेयाः स्मरणं पापनाशनम् ॥
(अर्थ - बलि, बिभीषण, भीष्म, प्रह्लाद, नारद आणि ध्रुव या सहा वैष्णवोंच्या स्मरणाने पापाचा नाश होतो.)

सहा संगीत मधील महर्षि -
वह्नि र्वेधाः शशाङ्कश्च लक्ष्मीनाथस्तथैव च ।
नारदस्तुम्बरु श्चैव षड्जादीनां ऋषीश्वराः ॥
(अर्थ - अग्नि, ब्रह्मा, चंद्र, विष्णु, नारद, तुंबरु हे सहा संगीत मधील महर्षि आहेत.)

तीन महात्मा -
नीतितत्त्व प्रवक्तारः त्रयः सन्ति धरातले ।
शुक्रश्च विदुरश्चायं चाणक्यस्तु तृतीयकः ॥
(अर्थ - या धरतीवर नीतितत्त्व प्रवर्तन करणारे तीन महात्मा होऊन गेलेले आहेत - शुक्र, विदूर और चाणक्य.)

व्यासमुनींचा श्लोक-
अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः ।
अभाललोचनः शम्भुर्भगवान् बादरायणः ॥
(अर्थ - त्यांना चार चेहरे नाहीत, तरीही ब्रह्मा ते आहेत. ज्यांना दोन हात आहेत, तरीही हरि (विष्णू) आहे; मेंदूवर तिसरा डोळा नाही, तरीही शंभू, असे भगवान श्री बादरायण (व्यास मुनि) आहेत.)

महान लोक (आत्म-शक्तीद्वारे) कामगिरी करतात -
विजेतव्या लंका चरण-तरणीयो जलनिधिः ।
विपक्षः पौलस्त्यो रण-भुवि सहायाश्च कपयः
तथाप्येको रामः सकल-मवधीद्राक्षसकुलम् ।
क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे ॥
(अर्थ - लंकेवर विजय मिळवण्यासाठी पायाने समुद्र ओलांडून जावे लागले. पुलस्त्य ऋषि यांच्या पुत्रासी, रावणाशी शत्रुत्व(विपक्षः) असताना वानरांना मदतीला घ्यावे लागले. तरीही रामचंद्रांनी एकटाच सर्व राक्षसांचा नाश केला. महान लोक (आत्म-शक्तीद्वारे) कामगिरी करतात आणि मार्गांनी नव्हे.)

चांगल्या लोकांचा सहवास करावा -
संगः सर्वात्मना हेयः स चेत् त्यक्तुं न शक्यते ।
स सद्भिःसह कर्तव्यः साधुसंगो हि भेषजम् ॥
(अर्थ - सोबत/मोह येणे अगदी स्पष्ट आहे; परंतु जर हे शक्य नसेल तर सज्जनांमध्ये सामील व्हा.साधू/चांगल्या लोकांचा सहवास करावा .)

सत्पुरुषाची सहवास सर्वाना फायद्याचा /उपकारक असतो -
महानुभावसंसर्गः कस्य नोन्नतिकारकः ।
रथ्याम्बु जाह्नवीसंगात् त्रिदशैरपि वन्द्यते ॥
(अर्थ - सत्पुरुषाची सहवास कोणाला फायद्याचा /उपकारक नसतो? गंगेबरोबर वाहून वाईट पाणीही पुज्यनीय बनते.)

महान लोक समाजात या कारणासाठी प्रसिद्ध असतात -
वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि ।
लोकोत्तराणां चेतांसि को हि विक्षातुमर्हति ॥
(अर्थ - (बाहेरून) वज्रासारख्या कठोर (आतून) फुलासारखा मऊ असा पुरुषांचा विवेक असतो. महान लोक समाजात याच कारणासाठी प्रसिद्ध असतात.)

एकश्लोकी रामायण -
आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं
वैदेही हरणं, जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं
बाली निर्दलं, समुन्द्र तरणं, लंकापुरी दाहनं
पश्चाद्रावण-कुम्भकरण हननं, एतद्धि रामायणं
(अर्थ - हे एकश्लोकाचे रामायण आहे. राम तपोवनामध्ये गेला, त्याने कांचनमृगाची हत्या केली, वैदही/जानकीला पळवून नेले, जटायु मरण पावला, सुग्रीवाशी ओळख झाली, वालीचा वध केला, समुद्र तरून/ओलांडून लंका जाळून टाकली. नंतर रावण, कुंभकर्ण यांचाही मारले, हेच रामायण आहे.)  शूर्पणखेची गोष्ट सांगावी 

विष्णूस्तुती -
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥
(अर्थ - जो अतिशय शांत आहे, भुजंगावर झोपलेला आहे, ज्याच्या नाभीत कमळ आहे, जो सर्वाचा देव आहे, विश्वाचा आधार आहे, आकाशासारखा सर्वत्र व्याप्त आहे,मेघासारखा (निळा) रंगाचा आहे, सर्वांगाने सुंदर आहे, जो कांत म्हणजे पती अर्थात लक्ष्मीचा पती आहे, ज्याचे कमळासारखे डोळे आहेत, ध्यान करून प्राप्त होतो, अश्या विष्णूला माझे वंदन असो जो सर्वांचे भय दूर करतो आणि लोकांचा नाथ आहे.)

एकश्लोकी श्रीकृष्णालीला श्लोक -
आदौ देवकी देव गर्भ जननं, गोपी गृहे वर्धनम्।
मायापूतन जीवताप हरणं गोवर्धनो धारणं ।।
कंस छेदन कौरावादी हननं कुंती सुतापालनम् ।
एतद् भागवत पुराण कथितम् श्री कृष्ण लीलामृतम् ।।
(अर्थ - जो देवकीच्या गर्भातून जन्मला, गोपीच्या घरी वाढला, ज्याने पुतना (जी मायावती होती) तिचा जीव घेतला, गोवर्धन पर्वत धारण केला (उचलला)कंसाचा वध केला, कौरवांचा पराभव केला, कुंतीच्या मुलांचे पालन/रक्षण केले; हे सारे भागवतामध्ये आहे जे श्रीकृष्णाच्या लीला आहेत.) कंसाची/पूतनेची/गोवर्धन उचलण्याची गोष्ट सांगावी.

कृष्णाला नमस्कार करताना म्हणावे -
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्
देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्
(अर्थ - कृष्णाष्टकमचे ८ श्लोकांपैकी हा पहिला श्लोक.वासुदेवाच्या पुत्र, राजा कंसाला आणि मल्ल चाणूर याला ठार मारणारा, देवकीमातेला आनंद देणारा आणि जगाचा गुरु असलेल्या कृष्णाला माझा नमस्कार असो.)

कृष्णस्तुती -
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ॥
(अर्थ - ज्याच्या कृपेने मुका मनुष्य बोलू शकतो आणि पांगळा मनुष्य पर्वत उल्लंघून/ओलांडून जाऊ शकतो, अशी कृपा मला आठवते जी माधवच्या परम आनंदातून प्रकट होते.)

कृष्णाचे श्लोक -
हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या
हरी वाढतो ब्राह्मणा वेळोवेळा
असे ब्राह्मण जेवुनी तृप्त झाले
विडा दक्षिण देउनी बोळाविले 

कृष्णाचे श्लोक -
हरीच्या घरी मोगरा फार येतो
काळ्या तोडुनी हार गुंफीत जातो
नको हार गुंफू गळा भार होतो
नको शब्द मोडू मनी राग येतो

कृष्णाचे श्लोक -
हरीच्या हाती लाल रंगीत काठी
हरी बैसला भूवरी वाळवंटी
तुरा खोवीलं मस्तकी मंजिरीच्या
असा विठ्ठल पहिला पंढरीचा
(भक्त पुंडलिकाची गोष्ट सांगावी)

संत ज्ञानेश्वरांस नमस्कार -
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
जिथे नांदतो ज्ञानराज सुपात्र
तया आठवीत महापुण्यराशी
नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांशी |
(ज्ञानेश्वरांची रेड्याच्या तोंडून वेद म्हणाले असल्याची/भिंत चालवण्याची एखादी गोष्ट सांगावी.)

मारुती स्तुति -
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
(अर्थ - रामरक्षेमधील एकूण ३६ श्लोकांमधील हा ३३ वा श्लोक. जो मनाच्या वेगालाही मागे टाकतो, (आपल्या बुद्धीने) बुद्धीमंतांना जिंकतो,असा तो, वारा/वात याचा सूत/मुलगा, वानरसेनेचा मुख्य (सेनापती) श्रीरामाचा दूत (हनुमान) आहे.) हनुमानाची भीमाचे गर्वहरण, हि कथा सांगावी किंवा रामायणातील एखादी कथा सांगावी.

मारुती स्तुति -
सुमित्रासुता लागली शक्ति जेव्हां ।
धरी रुप अक्राळ विक्राळ तेव्हां ।
गिरी आणुनी शीघ्र तो ऊठवीला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥ 
(अर्थ - सुमित्रसुत म्हणजे लक्षणास जेव्हा मदतीची गरज होती (तो बेशुद्ध होता) तेव्हा भव्य रूप घेऊन ज्याने पर्वत (द्रोणागिरी) आणून (तिथल्या औषधी वनस्पतीने) ज्याला शुद्धीवर आणले, अश्या मारुतीस माझा नमस्कार असो.) मारुतीची द्रोणागिरी पर्वत आणल्याची कथा सांगावी.

मारुतीस नमस्कार करताना म्हणायचा श्लोक -
जगीं भीम तो मारुति ब्रह्मचारी ।
समस्तांपुढें तापसी निर्विकारी ।
नमूं जावयालागिं रे मोक्षपंथा ।
नमस्कार माझा तया हनुमंता ॥

पहिले पाच नमस्कार कोणास व का करावे?
पहिला नमस्कार करितो देवाला
घातले जन्माला ज्याने मज |
दुसरा नमस्कार जन्मभूमी तुला
वाहीन देहाला तुझ्या पायी |
तिसरा नमस्कार आईला नेमाने
वाढविले जिने प्रेमे मज |
चौथा नमस्कार वडिलांचे पायी
ठेवियले डोई नित्यनेमे |
पाचवा नमस्कार गुरुजी तूम्हाला
शिकविले मला प्रेमे तुम्ही |

आईचा श्लोक -
जयाच्या कुशी लाभला जन्म माझे
जिने पाजिले आपुलिया स्तनाते
जपून जिने देह हा वाढविला
नमस्कार माझा तया माउलीला

वडिलांचा श्लोक -
शुक्रे जायचा मम जन्म झाला
वेचितसे जी अनुप धानाला
लोकी प्रतिष्ठा मज वाढण्याला
नमस्कार माझा असो त्या पित्याला

तिरंगी ध्वजाचा श्लोक -
जयाचे शिरी केशरी रंग शोभे
जिचा पंधरा पाहता चित्त लोभे
हिरवा तिचा देई शांती मनाला
सदा ठेऊ चित्ती तिरंगी ध्वजाला 

अंघोळीच्या वेळेस म्हणायचे श्लोक -
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥
(अर्थ - गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी नद्या, कृपया मी तुमच्या पाण्याने स्नान करीत आहे, त्या तुमच्या समृद्धीस समृद्ध करा. थोडक्यात या पाण्यामध्ये या सर्व पवित्र नद्यांचे पाणी येत आहे आणि त्याने मी अंघोळ करत आहे.)

अंघोळीच्या वेळेस म्हणायचे श्लोक -
गंगा सिंधु सरस्वति च यमुना गोदावरि नर्मदा ।
कावेरि शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी ।
पूर्णा:पूर्णजलै:समुद्रसहिता:कुर्वन्तु मे मंगलम् ।।
(अर्थ - गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्रत्नय, चंबळा, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (एक नदी) मुख्यतः महासुरनाडी, जया आणि गंडकी नदी आणि समुद्रासह पवित्र होऊ शकतात. माझ्यावर कृपा करा.)

गंगा नदीचा श्लोक -
नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपाम् ।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।
(अर्थ - भगवंतांच्या विविध स्तरांनुसार सर्व सांसारिक आनंद, सुख आणि मोक्ष देणारी माता गंगा, सर्व देवता आणि राक्षस तुझ्या पवित्र चरणी पूजतात, मीसुद्धा तुझ्या पवित्र चरणी नतमस्तक होतो.)

गंगा नदीचा श्लोक -
गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि ।
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति ।।
तीर्थराजाय नमः ।
(अर्थ - जो तिच्यापासून शेकडो मैलांच्या अंतरावर असूनही तीन वेळा ‘गंगा’ ची पुनरावृत्ती करतो तो आपल्या सर्व पापांपासून शुद्ध होतो आणि मरणानंतर विष्णुलोककडे जातो.)

गंगा नदीचा श्लोक -
पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभवः ।
त्राहि मां कृपया गंगे सर्वपापहरा भव ।।
(अर्थ - मी चुकीची कर्मे केली आहेत. मी पापी व्यक्ती आहे आणि वाईट वरून तयार केले गेले आहे. हे आई गंगा, कृपया माझ्या पापांपासून मला शुद्ध कर आणि माझे रक्षण करा.)

हरवलेली वस्तू शोधताना म्हणायचा मंत्र -
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बहुसहस्रवान 
तस्य स्मरणमात्रेंण गतम् नष्टयं च लभ्यते 
(अर्थ - कार्तवीर्य द्वादशनामस्तोत्रम् या स्तोत्रातील ८ श्लोकांपैकी हा पहिला श्लोक. हरवलेले शोधात असताना हा मंत्र म्हणल्यास/ स्मरण केल्यास, हजार हात असलेला (सहस्त्र बाहू) कार्तवीर्य राजाचा मुलगा अर्जुन, आपल्याला त्याच्या हजार हातानी वस्तू शोधायला मदत करतो आणि हरवलेले सापडते.)

सकाळी उठल्यावर अंथुरणामध्ये बसून म्हणायचा श्लोक -
कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
(अर्थ - हाताची ओंजळ करून हा श्लोक म्हणायचा असतो. कर म्हणजे हात. अग्र म्हणजे पुढचे टोक. हाताच्या टोकावर जिथे लक्ष्मी राहते, मध्यभागी सरस्वती, मुळाशी गोविंद(विष्णू); अश्या हाताचे प्रभातवेळी (सकाळी) दर्शन घेतो.)

सकाळी उठल्यावर पहिले पाऊल जमिनीवर ठेवायच्या आधी म्हणायचा श्लोक -
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
(अर्थ - समुद्र जी वसने(वस्त्रे) म्हणून वापरते आणि जिचे स्तन(छाती) म्हणजे पर्वतशिखरे आहेत अश्या विष्णूच्या पत्नीला (पृथ्वी) माझा नमस्कार असो. मी तिला पायाने स्पर्श करत आहे, म्हणून तिची क्षमा मागतो.

उगवत्या सूर्याला पाहून म्हणायचा श्लोक -
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते ॥१॥
(अर्थ - हे आदिदेव सूर्यनारायण, मी तुला नमस्कार करतो. हे भास्कर, तू प्रसन्ना हो. हे दिवाकर, मी तुला नमस्कार करतो. हे प्रभाकर, माझा तुला नमस्कार असो.)

उगवत्या सूर्याला पाहून म्हणायचा श्लोक -
आदित्यस्य नमस्कारं, ये कुर्वन्ति दिने दिने
जन्मान्तर सहस्रेषु, दारिद्र्यं नोपजायते
(अर्थ - जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मात दारिद्र्य प्राप्त होत नाही.)

गायत्री/सावित्री मंत्र -
ॐ भूर् भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
(अर्थ - ऋग्वेदामधिं हा मंत्र सावित्रीसाठी लिहिलेला आहे.
जो मानसला जीवन देतो, दुःखाचा नाश करतो आणि सुख देतो असा सूर्य, जो उत्तम रक्षणकर्ता आहे आणि आत्मचिंतन करण्यास योग्य आहे, आम्हाला बुद्धी आणि शक्ती दे.
ॐ = प्रणव , भूर = माणसाला जीवन देणारा, भुवः - दुःखाचा नाश करणारा, स्वः = सुख़ देणारा, तत = तो , सवितुर = सूर्यासारखा उज्ज्वल , वरेण- ्यं = सर्वात उत्तम, भर्गो = रक्षणकर्ता, देवस्य = देवा, धीमहि = आत्म चिंतन करण्यास योग्य, धियो = बुद्धि, यो = जी , नः = आम्हाला  , प्रचो- दयात् = शक्ति दे )
----------------------------------------------------------------------------------
एखाद्या वेळेस देवाच्या आरत्या, मंत्रपुष्पांजली म्हणावी. हळूहळू ऐकून आणि म्हणून, मुलांचे पाठ व्हायला लागेल.

No comments:

Post a Comment