Tuesday, August 13, 2019

बालकवी। दीपश्री

घनदाट, सुंदर वनात राहणारी एक वनमाला.. पाहणाऱ्याला मोहून टाकेल असं तीच सौन्दर्य ! तिचा मधूर आवाज तर त्यात आणखीनच भर घालणारा. साक्षात वनदेवता वाटावी अशी ही वनमाला. वनात राहणारी, त्यालाच आपलं घर मानणारी ही मुलगी अत्यंत आनंदात आहे, हरिणांबरोबर बागडत आहे, मैनेबरोबर गाणी गात आहे.
एकदा शिकारीला आलेल्या एका राजाच्या दृष्टीस ही वनमाला पडते. त्या मूर्तिमंत सौदर्याला अशा घनदाट वनात एकटी पाहून राजाही अचंबित होतो. वनमालेच्या स्मितहास्याने घायाळ झालेला राजा तिला आपल्याबरोबर राजमहालात येण्याची विनवणी करतो.
या विनवणीला काय उत्तर असेल बरं वनमालेच ?! वनालाच ती आपलंस करेल की मग राजा महालातल्या झगमगाटाच वर्णन करून वनमालेच मन वळवेल ?
मीही या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी पुस्तकाचं पान उलटलं आणि कळलं की ही कविता तर अधूरीच आहे ! कवी ही कविता तर अर्धवटच सोडून गेला… अशी सुंदर कविता करणारे निसर्गकवी म्हणजे बालकवी अर्थात त्र्यंबक बाबूजी ठोंबरे. बालकवींशी ओळख करून देणारी ही पहिलीच कविता.
गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधीसी या यमुनेच्या जळी ?
ती वनमाला म्हणे, “नृपाळा हे तर माझे घर.
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर.
हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा
मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा”
“रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी तुला
तू वनराणी दिसे न भुवनी तुझिया रूपा तुला
तव अधरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी ?
तव नयनी या प्रेमदेवता धार विखारी भरी
अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी
भुलले तुजला हृदय साजणी ये चल माझ्या घरी”
या कविता अशा सुंदर शब्दांनी अलगद दुसऱ्या दुनियेत घेऊन जातात. बालकवींची अशीच एक सुंदर कविता म्हणजे ‘ती फुलराणी’. हिरव्या गालिच्यावर मनसोक्त खेळणारी फुलराणी. त्या आकाशातल्या सूर्याच्या प्रेमात पडते त्याच हे मनोहारी वर्णन. फुलराणीचा निरागसपणा ते फुलराणीच व्यक्त झालेलं प्रेम याचा प्रवास !
 
हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला-
“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी !
(ती फुलराणी)
बालकवी हे निसर्गाचं हुबेहूब वर्णन आपल्या कवितेत उमटवतात. म्हणूनच त्यांना कदाचित निसर्गकवी म्हणतात. पाण्यात पाय टाकून बसलेला औदुंबर खालील कवितेत कळतो.
ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळया डोहाकडे
झाकळूनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकु नी जलात बसला असला औदुंबर
(औदुंबर)
बालकवींच्या अशा अनेक कविता आहेत. निसर्गाचं सुंदर वर्णन या कवितेत वाचायला मिळत आणि पुन्हा पुन्हा वाचत राहावं असं वाटत. माझ्या मनात वनमालेची कविता तर कायमच रेंगाळत राहते….

(C) Deepshree

No comments:

Post a Comment