*लोभस छबीची*
*तेजस्वी तारका..!*
जायचे वय नव्हतेच हो सुषमाजी.. खूप चटका लावून निघालात. तेही असे अचानक. फार मोठी हानी आहे ही देशाची. खूप लिहिण्यासारखं आहे तुमच्यावर..पण एकाच वाक्यात तुमचे वर्णन करायचे तर, "गंगेचे पावित्र्य, दुर्गेचे शौर्य आणि सरस्वतीची विद्वत्ता याचा त्रिवेणी संगम म्हणजे सुषमा स्वराज..!"
भाषाप्रभू व्यक्तीमत्व ही तर ओळखच होती सुषमाजींची.. इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि कितीतरी भाषांवर कमालीचे प्रभुत्व. मूळ वकीली पेशा आणि कायद्याचे शिक्षण याचा संसदेत त्यांनी पुरेपूर खुबीने वापर केला. सभागृहात ज्या 'वादी' आणि 'प्रतिवादी' पक्षकाराची त्यांनी वकीली केली, तो पक्ष सदैव जिंकलाच. कारण एकच... बिनतोड युक्तिवाद! विरोधी बाकांवरून आक्रमक भाषणे करून सरकारला घाम फोडावा तर तो सुषमा स्वराज यांनीच.. आणि सत्तापक्षाचा बचाव करताना विरोधी नेत्यांच्या तोंडाला कुलूप लावावे तर तेही सुषमा स्वराज यांनीच! आपल्या अमोघ वक्तृत्वाने संसदेत विरोधकांना निरुत्तर करताना, चारी मुंड्या चित करताना देशाने सुषमा स्वराज यांना पाहिले.. आणि याच सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या होत्या तेव्हा सरकारला खिंडीत गाठून काँग्रेसच्या अख्खा मंत्रिमंडळाला गदागदा हलवतानाही देशवासियांनी त्यांना पाहिले. शस्त्र केवळ एकच.. शब्द!
"आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू।।
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन।
शब्दें वाटू धन जन लोका।।"
संतश्रेष्ठ तुकोबारायांनी केलेला शब्दांचा हा गौरव सुषमाजींसाठी अगदी चपखल आहे. अफाट वक्तृत्व आणि अद्भुत वाक्चातुर्य हेच त्यांचे शस्त्रभांडार होते. जिभेवर जणू साक्षात सरस्वतीच तळपत होती.. कधी आदळआपट नाही, संसदीय मर्यादांचे उल्लंघन नाही. प्रखर हल्ले चढवले पण विरोधकांना शत्रू मानून त्यांचा द्वेष त्यांनी कधी केला नाही.
सदैव प्रसन्नचित्त चेहरा, सौभाग्याचं लेणं असलेली कपाळावरील मोठी टिकली, भांगेत भरलेले कायम उठून दिसणारे कुंकू, परीटघडीची सुंदर साडी, त्यावर 'हाफ जॅकेट' किंवा शाल हा त्यांचा घरंदाज पेहराव देशाच्या मनात घर करून राहिला. या शालीनतेसोबतच शालीतून प्रहार करण्याचे विलक्षण 'कौशल' सुषमाजींकडे होते. अशा सर्वगुणसंपन्न आणि बुद्धिमान संसदपटूला पंतप्रधान होण्याची संधी लाभू नये हे देशाचेच दुर्देव म्हणावे लागेल. त्याची रुखरुख आजही देशवासीयांना वाटते हे मान्य करावेच लागेल. बेल्लारीत सोनिया गांधींविरुद्ध लढण्यासाठी भाजपने सुषमाजींना कर्नाटकात पाठवले तेव्हा अवघ्या १० दिवसांत कानडी भाषा शिकून कानडीतच प्रचारसभा घेऊन त्यांनी साऱ्यांना चकित केले. मनमोहनसिंग पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी सोनियांना पंतप्रधान करण्यासाठी सगळा काँग्रेस पक्ष एकवटला होता. त्यावेळी कडाडलेल्या सुषमा स्वराज मला आजही आठवतात. "विदेशी मूळ असलेल्या सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर केशवपन करून म्हणजेच डोक्यावरचे संपूर्ण केस काढून संन्यस्त जीवन जगेन" अशी प्रतिज्ञा सुषमा स्वराज यांनी त्यावेळी जाहीरपणे घेतली होती. ही होती देशाप्रती त्यांची जाज्वल्य निष्ठा. मात्र दुसरीकडे गांधी घराण्याशी थेट लढूनही त्या कुटुंबाचा द्वेष त्यांनी कधी केला नाही. उलट सोनियांच्या कुटुंबाशी त्यांचे संबंध स्नेहाचे सलोख्याचेच राहिले, हे त्यांचे वेगळेपण अधोरेखित करण्यासारखे आहे. काँग्रेसच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. वैरभावना न ठेवताही राजकारण करता येते याचा आदर्श वस्तुपाठ सुषमा स्वराज यांनी घालून दिला. गोवऱ्या स्मशानात गेल्या तरी राजकारण्यांना खुर्ची व सत्तेचा मोह सुटत नाही. मात्र दुसऱ्या टर्ममध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी जाऊन मंत्रीपद स्वीकारण्याचा आग्रह करूनही त्यांनी विनम्रपणे नकार दिला. हे सगळ्यांनाच जमत नाही. त्यांच्या सात्विक तेजाची हिंदुस्थानातील तमाम स्त्रीशक्तीला तर भूरळच पडली होती. त्यामुळे सर्व स्तरांतील महिला वर्गाच्या 'रोल मॉडेल' आणि 'आयडॉल' होत्या सुषमाजी. राजकारणातील पुरूष मंडळींनाही त्यांच्या व्यक्तीमत्वात मातृशक्तीचे दर्शन घडायचे. वात्सल्यमूर्ती सुषमा स्वराज यांची छबीच अशी लोभस होती की देशातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि समस्त जनतेलाही त्यांच्याविषयी कायम एक अनामिक आत्मिय जिव्हाळा वाटत रहिला. त्या भाजपच्या भात्यातील अमोघ शस्त्र होत्या. त्यांच्या निधनाने देशाच्या संसदीय अवकाशातील ओजस्वी वाणीची तेजस्वी तारका लुप्त झाली आहे. पृथ्वीवरील मांगल्य स्वर्गस्थ झाले आहे!
।।विनम्र श्रद्धांजली।।
समई...
जन्माला येताना आपण एक चेहरा घेऊन जन्माला येतो. कळायला लागल्यावर आपण सोयीनुसार त्याच्यावर मुखवटे चढवतो, बाळगतो, वापरतो, सराईत होतो. शालीनतेचा, सोज्वळतेचा, ज्ञानाचा मुखवटा मात्र कायमस्वरूपी सांभाळता येत नाही, वागवता येत नाही. सिंहाची कातडी कधीतरी उघडी पडते आणि कोल्हा दिसू लागतो तसं होतं. सुषमा स्वराज यांचा चेहरा हा मुखवटा नव्हता. अतिशय शालीन, आपलासा वाटणारा, हसतमुख, बघितल्यावर विश्वास वाटावा असा मायाळू चेहरा असलेली ही बाई राजकारणी कधी वाटलीच नाही, आई वाटली.
राजकारण म्हणजे कोळश्याच्या खाणीत पांढरे स्वच्छ कपडे घालून डाग लागू नये याची काळजी घेत काम करण्यासारखं आहे. शालीनतेचा, सज्जनतेचा, चारित्र्याचा एक दबदबा असतो जो त्यांच्याकडे होता. आदळआपट न करता, वैर न धरता, अभ्यासपूर्ण, मार्दवतेने बोलून मुद्दा मांडणं यासाठी स्व'भाव हवा, त्वरीत यशाची अपेक्षा धरणा-या माणसाला ते शक्य नसतं. राजकारणात सगळेच गरजेचे असतात, पन्नास चेंडूत शंभर करणारा काहीवेळा गरजेचा असतोच पण सावरणारा, कठीण प्रसंगी ठाम उभा रहाणारा, संयम बाळगून प्रतिपक्षाला नामोहरम करणारा द्रविड लागतोच. स्वराज तशा होत्या, पेशन्स असलेल्या. अटलबिहारी, पर्रीकर अशी काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी सुसंस्कृत माणसं राजकारणात होती, त्यातलं एक बोट अजून कमी झालं.
यश, सुख, आनंद मिळाला तरी तो भोगण्याचं नशिबात लागतं. ज्या विचारधारेला त्यांनी आपलंसं केलं त्याचा विजय होत असताना, एकेक स्वप्नं सत्यात येत असताना ते बघण्याचा आनंद मोठा असतो. अशी अनेक अधुरी स्वप्नं उराशी बाळगून असतील त्या. ३७० चा आनंद त्यांना फार काळ साजरा करता नाही आला पण उराशी समाधान असणारच शेवटचा श्वास घेताना. 'राष्ट्र प्रथम' हे वागण्यात दाखवून देणा-या, जात, पक्ष, धर्म, देश या पलीकडे जाऊन अनोळखी माणसाच्या मदतीला धावून जायला मोठं मन लागतं, ते त्यांच्याकडे होतं. स ची बाराखडी लिहावी तसे गुण आणि नाव बाळगलेल्या सहृदयी, सन्माननीय, सोज्वळ, सुंदर, संयमी, सुसंस्कृत, सज्जन सुषमा स्वराज आज एक अभिमान वाटावा असा वारसा ठेवून घाईघाईने निघून गेल्या. नात्यागोत्यातल्या नसलेल्या, ज्यांना कधीही समक्ष पाहिलं नाही अशा माणसाच्या जाण्याने डोळ्यात अश्रू येईल अशी माणसं आता दुर्मिळ आहेत. आज मात्र परवानगी न घेता डोळे ओलावलेच. आदर्श ठेवणा-या माणसांसाठी हे झालं नाही तर आपण माणूस नाही हे नक्की.
प्रकाश काजव्यामुळे पण मिळतो, सूर्यामुळे पण मिळतो, एक क्षणिक तर एक दीपवणारा पण गरजेचा. आपल्याला या सगळ्यात भावतो, गरजेचा वाटतो तो शांत, आश्वासक प्रकाश समईचा असतो. समईची ज्योत मोठी नसते पण ती 'मी आहे' हे सांगणारी असते, आशादायी असते. अज्ञानाचा, असत्याचा, दुष्टपणाचा तम जेंव्हा अवकाश पादाक्रांत करतो तेंव्हा या ज्योतीचा उपयोग असतो. नंदादीप जाहिरात करत नसतात तर 'मी आहे, होईल सगळं नीट' असं मूक आश्वासित करत असतात. जगण्यासाठी अशा नंदादीपासारख्या तेवणा-या समया गरजेच्या असतात.
आज एक समई शांत झाली,
जयंत विद्वांस
#वाग्सरस्वतीची_एक्झिट #सुषमा_स्वराज
साधारणपणे चौदा-पंधरा वर्षांपूर्वीचा काळ असेल कदाचित त्याच्याही पुर्वीचा नागपुरात खापरीला राष्ट्र सेविका समितीचे अखिल भारतीय महाशिबिर झाले होते. समस्त भारत वर्षातून आणि विदेशातून देखील ह्या महाशिबिरासाठी उपस्थित राहायला हजारो स्वयंसेविका नागपुरात दाखल झाल्या होत्या. आता तेंव्हा आम्ही शाळेत होतो त्यामुळे सुट्ट्यांमध्ये ह्या शिबिराच्या व्यवस्थेसाठी शाखेतल्या मित्रांसोबत जवळ जवळ आठवडाभर खापरीला होतो. प्रचंड गर्दी आणि चहुबाजुला ‘स्वयंसेविका’ ह्या स्थितीत अल्पसंख्यक असलेले आम्ही जी काही ‘स्वयंसेवक’ मंडळी होतो ते पटकन ओळखू यायचो. आमच्याकडे आम्हाला आखून दिलेल्या नगरात आम्ही भोजन वितरण करत होतो. त्या धांधलीत आपण कोणाला वाढतोय ह्यापेक्षा नीट आणि वेळेत भोजन वितरण होते आहे की नाही ह्याकडे लक्ष होतं. त्यांची भोजनोत्तर बैठक झाली आणि बैठकी नंतर जमलेल्या स्वयंसेविकांच्या घोळक्यातून दोन हाका आम्हा ६-७ स्वयंसेवक प्रबंधकांना लावण्यात आल्या. त्यांच्या गणापाशी गेलो तर स्वच्छ पांढऱ्या साडीत एक आजीच्या वयाच्या स्वयंसेविका आणि फिकट केशरी साडीत माझ्या मोठ्या काकुंच्या वयातील एका स्वयंसेविकेने पुढला अर्धा तास त्यांच्या बाजुला बसवून तुम्ही जेवालात का ते अभ्यास ते घरची विचारपूस ह्या सगळ्या गप्पा आजी आणि मावशीच्या मायेने केल्या. त्या होत्या पांढऱ्या साडीतील आजी म्हणजे सुमित्रा महाजन आणि दुसऱ्या अर्थातच सौ सुषमा स्वराज!! सुषमाजींचं ते व्यक्तिमत्व प्रचंड charismatic होतं. अर्धा तास त्यांच्या बाजुला बसुन सुषमाजी आपला हात हातात घेऊन मायेने डोक्यावरून हात फिरवत विचारपूस करतायत हेच माझ्यासारख्या बाल स्वयंसेवकासाठी खुप मोठी गोष्टं होती. त्यांची अस्खलित हिंदी ठसठशीत कुंकु, सिंदूर त्यांच्या चेहऱ्यावरचा जबरदस्त आत्मविश्वास आणि तरीही प्रचंड साधी आपलीच काकु/मावशी वाटणारे व्यक्तिमत्व हे वेगळं कॉम्बिनेशन म्हणजे सुषमाजी!! मी भारावून गेलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे बघत कानात साठवता येतील इतका तो ध्वनि अनुभव संचय करत होतो. त्याच्या आधी सुषमाजींनी मी अगदीच सहा वर्षांचा असेन तेंव्हा संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस ह्यांच्या अंत्यदर्शनाला रेशीमबाग मध्ये बघितले होते. तेंव्हा अटलजी, लालजी आणि सुषमाजींना जवळुन बघण्याचा योग आला होता.
भाजप म्हणजे अमोघ वक्तृत्वाची खाण असलेल्या नररत्नांचा पक्ष. अटलजी, लालजी, प्रमोदजी ह्या ब्रह्मदेवतेच्या अंगणातील वसुंच्या रांगेतील सरस्वती म्हणजे सुषमाजी!! त्यांच्या वाणीवर शब्दशः सरस्वतीचा वास होता. विचार करा अटलजी, लालजी, प्रमोदजी संसदेत असतांना सुषमा स्वराज नावाची एक नविन खासदार आपल्या अमोघ वक्तृत्वामुळे अमिट छाप सोडायच्या. त्याकाळी संसदेत उपस्थित असणारे लोक सोडाच अगदी सोनिया गांधी देखील सुषमाजींचे भाषण एेकायच्या. अटलजी देखील वाह सुषमा म्हणत भरभरून दाद द्यायचे. माझ्या अगदी नकळत्या वयात माझ्या कानावर राजकीय भाषाणांचे संस्कार झाले तेच मुळी अटलजी, लालजी, प्रमोदजी आणि सुषमाजींच्या अमोघ वाणीचे!! सुषमाजी माझ्या दादा (आजोबा) आणि आजीच्या भयानक लाडक्या!!इतक्या की त्यांचं संसदेतील भाषण असो वा जाहीर कार्यक्रमातील अरे सुषमा बोलतेय म्हणत ही मंडळी हातातली कामं सोडुन टीव्ही समोर बसतील. आजोबा तर नाहीय आणि सध्या माझी आजी वार्धक्यातील सर्जरीमुळे आयसीयुत आहे. तिला सुषमाजींची बातमी कळली तर किती दुःख होईल ह्याचा अंदाजच नाही. अनेक लोक सुषमाजींचे अनेक दाखले देतील त्यांच्या अनेक आठवणी जागवतील पण सुषमा स्वराज ह्या माझ्यासाठी घरातील परिवारातील एक हिस्सा होत्या. अशाच काहीश्या भावना मनोहरभाईंसाठी होत्या, थोड्याबहुत अनंत कुमार ह्यांच्यासाठी ही होत्या. ह्या सगळ्या व्यक्तींना जवळून बघण्याचे त्यांच्याशी बोलण्याचे भाग्य मिळाले त्यामुळे एक नकळत नातं ह्या व्यक्तीमत्वांशी निर्माण झालं होतं आणि त्यांच्या अकाली एक्जिटमुळे एक भयंकर पोकळी निर्माण झाली जी कधीच भरून निघणार नाही. इथे अंगात ताप भरल्यावर मॅनेजरला ईमेल लिहून आज येणार नाही, अप्प्रेज़ल मिळाले नाही तर पेपर टाकण्याच्या धमक्या ह्या उपर विचार न करू शकणारी माझी पिढी बघितली की किडनी फेल असतांना सतत कार्यमग्न राहणाऱ्या सुषमाजींना वीजामाता म्हणुन ट्रोल करणारे माझ्याच पिढीतले भक्त आणि कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्येही अहोरात्र काम करणाऱ्या मनोहर पर्रिकरांना मानसिक यातना देणारे राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते बघितले की माणुसकी ह्या शब्दाचा गळा आवळून खून करावासा वाटायचा कारण ह्या प्रवृत्ती माणुस असुच शकत नाही.
सुषमाजी ह्या कायम त्यांच्या अमोघ वाणीसाठी, जादुई आकर्षक वक्तृत्वासाठी, त्यांच्या आश्वासक हास्यासाठी, सोनिया गांधींशी लढणाऱ्या नेत्या म्हणुन, परराष्ट्रमंत्री म्हणुन सदैव बाळगलेल्या कार्यतत्परतेसाठी, मोदी २.० साठी महत्वपूर्ण असलेले आंतराष्ट्रीय संबंधाचा बेस तयार करतांना खंबीरतेने मोदींना कायम भक्कम साथ देणाऱ्या आधारासाठी, युनोत आणि ओयसी सारख्या मंचावर भाषणात थेट पाकिस्तानचे कपडे उतरविण्यासाठी कायम लक्षात राहतील. भाजपला हा शापच आहे की कुठेतरी काहीतरी चांगलं झालं की त्याला दुःखाची काळी किनार ही असलीच पाहिजे. त्यांच्या शेवटच्या ट्विटने मी पार आतुन हाललोय. ह्या बाई शब्दशः ३७० निकालात निघायला बघायला जिवंत असल्यासारख्या होत्या जणु. आणि आता ही आनंदाची बातमी सांगायला त्या थेट स्वर्गात त्यांच्या लाडक्या अटलजींना भेटायला गेल्या. सुषमाजी तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, श्यामाप्रसाद मुखर्जी, टिकालाल टपलू (पहिले हुतात्मा काश्मीरी पंडित) भेटलेत तर त्यांना पण ही आनंदाची वार्ता सांगा. कुठेतरी माझे आजोबा भेटलेत तर त्यांनाही सांगा. सुषमाजींच्या जाण्याने आज माझ्यासाठी अटलजींचा काळ एक ह्रदय आठवण मागे सोडुन गेला. मनोहरभाई गेल्यावर मी खुप रडलो होतो आज का कोण जाणे अश्रुंच थिजले. वैयक्तिक कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. पुढील सात दिवस सुषमाजींना श्रद्धांजली म्हणुन सोशल मीडियावरून कुठलीही पोस्ट करणार नाही. Sushmaji your exit was not fair, not at all fair!! We will miss you!!
तुम्हे वफ़ा याद नहीं
हमें जफा याद नहीं |
ज़िन्दगी और मौत के
तो दो ही तराने हैं |
एक तुम्हें याद नहीं
एक हमें याद नहीं ||
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻 #विद्युल्लता #SushmaSwaraj 😢🙏🏻
✍🏻 प्रसाद देशपांडे
No comments:
Post a Comment