सुघट
>>>> मृण्मयी सहस्रबुद्धे
आमच्या लग्नात रुखवत द्यायचं ते काय, असा प्रश्न आईनी माझ्या सासऱ्यांना विचारला तेंव्हा पपांनी सांगितलं की अगदी शकुन म्हणून एखादं भांडं द्या.आमच्याकडे खरंच खूप भांडी आहेत आणि ती बघून नंतर हवी ती घेऊ दे तिला आणि खरंच आमच्या लग्नात नसलेल्या , संसार अर्ध्यात असताना गेलेल्या सासूबाईंचा संसार बघून मी थक्क झाले.किती हौसेनं त्यांनी संसार जमवला होता.पहिल्यांदा ती भांडी बघून घाम फुटला , minimalism~ सूक्ष्मवाद ही कल्पना नसल्यानं आईकडेही खूप भांडी होती पण एकत्र कुटुंब आणि येणं जाणं खूप होतं त्यामुळे लागायचीही पण आता एवढ्या प्रचंड भांड्यांचं आमच्या छोट्या संसारात करु काय ते समजेना. मग हिय्या करुन बरीच भांडी व्यवस्थित खोक्यांमध्ये घालून ठेवली.मग बाकीची भांडी हळुहळू वापरुन हाताखालून जाऊन जाऊन सवयीची झाली. मग जेवताना कधीतरी पाणी प्यायच्या फुलपत्रांवरचं नाव वाचलं की करमणूक व्हायची.कधी नवऱ्याचं कधी दीराचं, कधी सासऱ्यांचं,कधी आजेसासऱ्यांचं. त्याबरोबर एक तारीख असायची आणि कारणही.म्हणजे १२ मे १९६५, चि राजूस मुंजीनिमित्त.असा सगळा मोकळा मामला.उगाच डोक्याला ताण नसलेला ,कार्यकारण भाव सांगितलेला.कधी नुसती तारीख मग त्या तारखेवरून चर्चा.की अमुक अमुक दिवशी काय होतं. एकंदरीत काय ह्या भांडयांच्या निमित्तानं माझ्या सासरच्या मंडळींच्या नात्यांची आणि घटनांची ओळख व्हायला लागल्या. एका डब्यावर मात्र एका बाजूला जोशी यांच्याकडून आणि दुसरीकडे मीनामावशीकडून अशी संशयास्पद हालचाल!बरं दोन्हीच्या तारखा वेगळ्या म्हणजे culprit कोण जोशी की मीनामावशी ते आजवर कळलेलं नाही पण दोघांपैकी एकानी डबा न बघता कॅरी फॉरवर्ड केला हे निश्चित जाणवून पोटभर हसलो.तर सांगायचा मुद्दा असा की सासूबाईंच्या भांडयांच्या संसारात मी रमले.मग अगदी थोडी भांडी हौसेखातर स्वतः घेतली.आमच्या लग्नाच्यावेळी कुंडा हा प्रकार 'द्यायला घ्यायला बरा' अशा विचाराने प्रचलित होता त्यामुळे अशा लग्नांमधून असे अनेक करमरे कुंडे आपोआप जमा झाले.तशा भांडयांच्या अनेक प्रचलित लाटा ~पक्षी साथी येऊन जातात.उदाहरणार्थ कॉपर बॉटमची भांडी,सपाट तळाची भांडी, टपरवेरचे डबे, त्या लाटेवरही स्वार झाले इत्यादी . राजूदादाच्या लग्नाच्यावेळी मिल्क कुकरची साथ होती.त्याला लग्नात १२मिल्क कुकर भेट म्हणून आले होते.त्या वेळी भेट देण्याचीही लाट होती हेही नोंद व्हायला हवं.असो तर अशा पध्दतीनं जेहत्ते कालाचे ठायी माझ्या सासूबाईंच्या संसाराच्या भांड्यांमध्ये आता माझ्या आवडीची, भेट म्हणून आलेली,carry forward म्हणून आलेली ,खाद्यपदार्थांची देवाण घेवाण करताना आलेली चुकून माकून परत करायची राहिलेली. काही बिन परतीच्या बोलीवरची (मला दोन ठिकाणाहून भांडी परत न करण्याच्या धमक्याही मिळाल्यात) भांड्यांची भर पडली. मुलं शाळेत जायला लागल्यावर त्यात त्यांचे डबे ,बाटल्या ,डब्या यांची भरमार झाली ,त्यात दोन्ही लेकरं वस्तू हरवण्यात तरबेज असल्यानं,जोडी आणली गेली.मग मुलं मोठी झाल्यावर त्यांना nostalgia झाला आणि मलाही स्मरणरंजन आणि संचयी वृत्तीची लागण झाली आणि मुलंही वस्तू टाकेनाशी झाली आणि मलाही त्यांच्या वस्तू टाकवेनात आणि सगळ्याचा आणखी मोठा संसार झाला.आणि सासूबाईंना एवढी कशी आवड याचं उत्तर सहजी मिळालं.पण त्या चूल बोळक्यांमध्ये मन छान रमलं.बाहेरच्या जगापासून लांब नाही तरी आपलं एक वेगळं जग तयार झालं.
ह्याच भांड्यांमध्ये मला एक खजिना सापडला त्याचं ऋण कसं विसरु? तो म्हणजे तांब्याच्या आणि पितळी भांड्यांचा.मला तांब्यापितळ्याची जरा जास्तच आवड आणि ह्या भांड्यांमध्ये धुंडाळताना काय काय धमाल विशेष मिळालं !एक पितळी किटली,पितळी कुकर,बोडणाला लागणारी बिन कल्हईची पितळी परात, तांब्याचं भलं मोठं पिप,पितळ्याचा पेढेघाटी डबा.मग आईकडंच एक पितळी वेडं भांडं(!) आणि लंगडी आणि आजीची डेगची(ती मध्य प्रदेशमधली होती )म्हणून.
मग छंद लागला,त्यातली काही छोटी मोठी भांडी वापरायला काढली.आई आणि सासूबाई यांच्या संसारातली पातेली ,तपेली ,घागर,चरवी, तसराळं,ठोक्याचं पातेलं, कळशी , तांब्या ,गडू ,गडवा,रोवळी अशा नावानं आजूबाजूनी वावरणारी मंडळी मला रोज साथ करायला लागली.काही मंडळी रोज वापरणं शक्य नसल्यानं माझ्या दिवाणखान्यात येऊन बसली आहेत.
अगदी गुण्यागोविंदा नांदतात, भांड्याला भांडं लागत नाही. प्रत्येक गावच्या भांड्यांचा घाट आणि जडण वेगळी असते त्यामुळे मी कुठंही गेले की बाजारात बरोबर मला अशा वस्तू दिसतात किंवा जास्त बरोबर शब्द म्हणजे ,त्यांना मी दिसते आणि लगेच मी ताकाला जाऊन भांडं न लपवता खरेदी करते आणि माझी सुहृद मंडळी माझ्या आवडी जोपासतात. मिलींदच्या मामी, मावशींनी त्याच्याजवळची जुनी गोष्ट कौतुकाने आणि असोशीनं दिली,माझी आवड लक्षात घेऊन मला कोणी कोणी त्यांच्याकडची छोटी भांडी दिली आणि सुचूनी एक नवीन कोरी तांब्याची ओंजळ दिली,मंजूनी पाणी प्यायचा नवीन सुंदर उभा जग,अरुनी दुधाचं पितळी पातेलं कल्हई करुन नाव घालून दिलं, अशा तऱ्हेनं एक छोटा आणि खूप गोड संग्रह तयार झाला.मंजूच्या सांगण्यावरुन काही भांडी buffing करुन घेतली आणि वारंवार भांडी घासायचे कष्ट कमी झाले.त्याआधी बाई गेली माहेरी आणि काम करी पीतांबरी ह्या उक्तीनुसार माझे हात मी खरखरीत करून घेतले आहेत.ह्यातल्या काही भांड्यांमधून मी पाकसिद्धी करून त्यांच्या माझ्या कुटुंबाचा हृदयाचा रस्ता माझ्यासाठी काढला आहे. मला घरी एकटी असले तरी या सगळ्यांची सोबत असते.माझ्या संग्रहाला माझ्यासोबत अनेकांचे हात आणि मनं लागली आहेत.मी एकटी त्याचं श्रेय किंवा खापर घेऊ शकत नाही.
डॉ वर्षा जोशी यांचं स्वयंपाक घरातलं विज्ञान हे पुस्तक वाचलं त्यात स्वयंपाकाला वेगवेगळ्या धातूची कोणती भांडी वापरली जातात आणि कोणती वापरावी आणि का याचा छान आढावा आहे.पुलं नी त्यांच्या "माझे खाद्यजीवनमध्ये" कोणता पदार्थ कशात काढावा हे इतकं साद्यत दिलंय.अव्वल दर्जाचा खवैय्याचं हे करु जाणे.
मला या भांड्यांची खूप मजा वाटते.चांगली जडशीळ ,चांदीची असतील तर घणसर अशी भांडी किती पिढ्या टिकली आहेत.
तांबे ,पितळ कल्हई करून वापरले की पदार्थ कळकत नाही असं आई सांगायची.. आईबरोबर जाऊन कल्हई करुन घेतली आहे भांड्याला,त्याला कल्हई करणारे काका,त्यांचा तो भाता अगदी छान आठवतोय.डोक्याला कल्हई हा वाक्प्रचार नंतर कळला आणि आधी त्या भांड्यांचं चकचकीत रूप समजलं हे फार बरं झालं.
दुर्गाबाई भागवतांनी बिन भांड्याचा स्वयंपाक असं एक लेखात लिहिलं आहे.त्यांनी तो केला आहे पण संसार मांडलेल्या मला,हे कठीण म्हणजे अशक्यच वाटलं पण तो आहे फार भारी.मार्ग काढायचा म्हणला की काढता येतोच येतो पण उत्क्रांतीमध्ये मानवानं ही केवढी उडी मारलीये. या अन्न रांधणे, साठवणे , वाढणे या सगळ्या कृतींना साजेशी भांडी दगड आणि धातूनपासून तयार केली ती विकसित केली. पिढी दर पिढी सोयीप्रमाणे साधनं उत्क्रांत होत गेली .सोयी,वेळाची बचत आणि परंपरा यानुसार प्रत्येकाच्या संसार मांडायच्या आपापल्या कल्पना असतात.भरपूर भांड्यांची रेलचेल असावी असं वाटणारी अनेक मंडळी माझ्या आसपास आहेत.कुणाला त्यांचे घाट खुणावतात तर कुणाला त्यांची वजनं. इतर कोणत्याही बाबतीत आग्रही ,आसक्त नसणारी अरु एका चौकोनी डब्याच्या इतकी प्रेमात असते की चुकूनही ती कोणाला देत नाही.किंवा चुकून दिला तर त्याचा मागोवा सतत ठेवते. हे अजब आहे सगळं.त्यावरून तिला भरपूर ऐकावं लागतं पण तो तिचा वेगळा कोपरा आहे.उज्वलानी तर भातुकलीचा अख्खा संग्रह जमा केलाय,काचेपासून ते सोन्याच्या भांड्यांपर्यंत. कोणी परंपरागत आलेला पितळी खलबत्ता तर कोणी दगडी पाटा वरवंटा,किंवा लोखंडी खलबत्ता जपलाय.तोही फार प्रेमानं.
एकदा एक चांगला चमचा सेटमधला , कॅन्टीनच्या ताटलीतून नजरचुकीनं गेला आणि एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये तो गडप झाला ,थोडं दुःख झालं त्याचं पण नंतर अचानक काही दिवसांनी तोच चमचा बटाटेवड्याच्या ताटलीतून माझ्यासमोर आला आणि ते वाचलेलं वाक्य प्रत्यक्षात पटवून गेला if you love somebody ,set it free,if it comes back to you ,it was yours ,if it doesn't ,it was never yours.आपला ज्या गोष्टींशी ऋणानुबंध संपतो ती गोष्ट आपल्याजवळ रहात नाही असं म्हणतात तेही खरं आहे ,तसे काही लबाड डबे माझ्या हातावर तुरी देऊन पसार झालेत.असू देत बापडे! त्यांना नवीन घर मिळालं! नवीन ऋणानुबंध!विविध कारणांनी अनेकदा माझा जीव भांड्यात पडत असला तरी भांड्यांमध्ये माझा तितका जीव नाही आणि ज्या व्यक्तींकडे ती भांडी जातात त्यांच्याशी असणारी नाती मला भांड्यांपेक्षा जास्त महत्वाची वाटतात.
एकदा रविवार पेठेत हिंडताना जुन्या वस्तूंच्या दुकानाशी पाय रेंगाळले, नवऱ्याला तितकंसं आवडत नाही तसं काही आणलेलं पण पाय रेंगळाले ,ते एक विशेष काहीतरी बघून.माझ्या लहानपणी कोपऱ्यावर दाणे ,फुटाणे विकणारे काका होते.काबुलीही असायची शुक्रवारी.त्यांच्या त्या ढीगांवर एका मातीच्या मडक्यात दाणे गरम राहायला व्यवस्था असायची आणि आपल्याला द्यायला पितळी छोटी मापं असायची.ती ही मापं होती.तशी तीन मापं घेतली घरी येऊन स्वच्छ धुवून नीट बघितलं तर त्यावर 1/8 seer 1/4 seer असं लिहिलं आहे म्हणजे शेर असणार.मुंबईच्या कंपनीचं ओरिएंटल मेटल कंपनी वरळी असं नावही आहे याच्यावर.ही माझी भारी भर भांडयांच्या संसारात.विलक्षण गोड आणि जुन्या दिवसांशी बांधून ठेवणारी.
पण त्याच दिवशी आमचा व्यवहार पूर्ण होत असताना त्या दुकानात एक तरुण विवाहित मुलगी आली,कपड्यांवरुन अंदाज बांधू नये तरीही आर्थिक अडचण असावी , काही पितळी भांडी मोडीत घालायला आली होती ती. पितळी गडवे होते सहा.मन पिळवटून तिनं ते विकले आणि तिच्या त्या वेदनेनी मला आणि अरुला फार खोल खंजीर हृदयात गेला असं झालं.असं मोडीत घातल्यानी मिळणाऱ्या फारच किरकोळ पैशांनी तिची काय अडचण काय दूर होणार होती ह्या विचारानी फार निशब्द झालं.मी माझ्या दिवाणखाण्यासाठी काहीतरी शोभा म्हणून घेत होते आणि ती मीठ भाकरीची सोय बघत होती.पोटात खड्डा पडला.सतीश काळसेकर म्हणतात तसं भाकरीसाठीही पुस्तकं विकता येत नाहीत पण इथं तसं काहीसं होतं हे जाणवून अस्वस्थ वाटलं दूरवर.खूप मन मारून तिनं हा निर्णय घेतला असणार.
खरंतर ही भांडी म्हणजे इतिहास असतो एका कालखंडाचा.हडप्पा आणि मोहेंजोदादोच्य चित्रातही भांडी दिसतात.त्यामुळे संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो त्यामुळे तो फार गोड असतो.बायकांनाच नाही तर पुरुषांना भांड्यांची आवड असते हे मला जाणवलंय,नवरा वडिल भाऊ यासगळ्यांना पाहिलंय मी पण हे लोक आधुनिक वस्तू घेतात किंवा नवीन कल्पना असलेल्या वस्तू.संजयनी तर मोठे मोठे वोक आणि झारेही आणले होते त्याच्या पाकसिद्धीचीची आवड जोपासायला.पण नाहीतर कुठं कांदे कापायचं मशीन,कुठं फ्रेंच fries करण्याचं तर कुठं लसूण सोलायचं मशीन.ज्याचा उपयोग दहा दिवस होतो धडाकून मग मामला थंडावतो. पण यथास्थित चेष्टा मात्र बायकांच्या संचयी वृत्तीची असते.अशाच एका खूप मोठ्या माणसाला त्यातलं गम्य किती तरलरीत्या कळलं आहे.कुसुमाग्रजांची चमच्यांवरची कविता आठवली?,स्टँडवरच्या सात चमच्यापैकी एक हरवतो तेंव्हा बाकीचे म्हणतात "ती"असती तर तो हरवला नसता आणि मी कुसुमाग्रज म्हणतात की ती असती तर मीही हरवलो नसतो. तसंच हरवून न जाण्यासाठी जे भावनिक आपलेपण लागतं ते अशाच गोष्टीतून सापडत राहतं.कवडसे असतात पूर्वसूरींचे, पुण्याईचे..
चक्र वर खाली होत असतं तसं जुनं जाऊ दे स्मरणालागूनी असं म्हणता म्हणता ते पुन्हा लख्खपणे समोर येतं.प्रत्येक जण आपल्या वेळेला आपापली चूल बोळकी मांडतो, यथाशक्ती ती सांभाळतो,त्यात भर घालतो आणि पुढं करतो. भांडयांवरच्या नावाचे धनी बनतो.माझ्या एका मैत्रिणीनं सगळ्या जुन्या भांड्यांवरही तुझी नावं घालून घे असा अत्यंत व्यावहारिक सल्ला दिला होता आणि तोही मला. मला तो सल्ला फार दुष्ट वाटला,एखादी गोष्ट मी नवीन घेतली असेन तर त्यावर नाव, दिनांक घालणं वेगळं ,तेसुद्धा अगदी गंमत म्हणून ,एक आठवणींचा कवडसा तयार करायचा म्हणून आणि जुन्या गोष्टीवर केवळ हक्क म्हणून नाव घालणं ह्या दोन अगदी टोकाच्या गोष्टी आहेत.मूलतः मालकी हक्क दाखवायचा स्वभाव नसल्यामुळे मी तो सल्ला शिरोधार्य मानला नाही आणि घरीही तसं कोणी पक्के मडकं नाही हे मानणारे.तसंही आपल्या हे मनाशी पक्कं आहे की आपण सगळेच पांथस्थ आहोत या जगात,वाटेवरचे वाटसरू,आखून दिलेली वाट आणि मोजून मिळालेले श्वास घेऊन चालणारे आहोत ,ही खूणगाठ बांधूनच वाट चालयची आहे.या वाटेत काही खर्च होणार आहे आणि काही जमा होणार आहे,काही खर्च होताना , काही जमा होणार आहे आणि काही जमा करताना काही खर्च होणारे ,मग कशाची मालकी.कशाचं स्वामित्व! ह्यातून आणखी एक कळलं की तसं बघितलं तर आपण सगळेच या भांड्यांसारखेच असतो. भांडं देताना कधी रिकामं द्यायचं नाही हे आईनं शिकवलं. त्यामुळे आपणही रिकामं राहायचं नाही हे मनात रुजलं.आपणही चांगल्या भावनांनी कायम भरलेलं असावं ही मनीषा बाळगून आहे. कारण मुळात भांड्यांचा तो गुण आहे साठवणे.आपणही ह्या भांड्यांसारखं विविध नावानी वावरतो,वेगवेगळी नियती बाळगतो ,पण कल्हई केल्यासारखं चकचकीत राहायचं, आतलं कळकू द्यायचं नाही आणि एक गोष्ट खरी की जे सणसणीत खरं असतं जे चांगलं असतं, ते वापरलं जातं, उपयोगी पडतं ,टिकतं आणि नंतरही इतिहास बनून राहतं एका काळाचे साक्षीदार बनून.
अशी ही साठा उत्तराची कहाणी सुघट संपूर्ण!
No comments:
Post a Comment