Tuesday, August 13, 2019

बगळ्यांची माळ फुले। सुधान्शु नाईक

🎷 मनात रुजलेली गाणी- क्र.५ 🎷

बगळ्यांची माळ फुले....
- सुधांशु नाईक.

मनात ठाण मांडलेल्या गाण्यांविषयी ही सिरीज लिहायला सुरुवात केली अन् संगीत रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सगळ्यांच्या मनाचे हळवे कप्पे जणू पुन्हा उघडलेत. सुरेख शब्द, सूर अन् त्याभोवतीच्या आठवणी....

पं. वसंतराव देशपांडे यांची पहिली ओळख झाली ती पुलंच्या " वसंतखां" या लेखातून. " कट्यार काळजात घुसली.." नाटकातली त्यांची सगळीच गाणी आवडणारी असली तरी प्रथम ऐकलेल्या त्यांच्या या गाण्याची मोहिनी उतरता उतरता नाही.

पूर्वी शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नव्हतं ( तसं आताही काही कळत नाहीच.. 😁),  तेव्हा कुठं कानावर रागदारीतलं काही पडलं की काय यॅ..यॅ..यॅ... करत बसलेत असं कुमारवयात म्हणणारा मी, नंतर कधी आवडीनं शास्त्रीय संगीत ऐकू लागलो हे कळलंच नाही. त्याचं नि: संशय श्रेय मन्नाडे यांच्या हिंदी क्लासिकल चित्रपट गीतांना अन् वसंतरावांना..!

वसंतरावांच्या आवाजाचा प्रभाव विलक्षण आहे. अतिशय फिरणारा त्यांचा आवाज एक देखणं पुरुषीपण सदैव मिरवत असतो.

वसंतरावांची कारकीर्द, पुल- बेगम अख्तर- कुमारजी- रामूभैय्या आदिंसोबतचे त्यांचे किस्से, मराठी संगीत नाटक अन् विशेषत: दीनानाथ मंगेशकर - बालगंधर्वांविषयी वसंतरावांना असणारा आदर सर्वाना कमी-अधिक प्रमाणात ठाऊक आहेच. त्याची पुनरावृत्ती करत नाही.

थेट गाण्याकडेच वळूया ना...

प्रथम हे गाणं ऐकलं ते रेडियोवरुन. 8 वी, 9वीत असेन. सकाळी 11 वाजता "कामगारसभा" लागायची. आम्हा मुलांची जेवून लवकर शाळेत जायची गडबड. शाळा सुरु होण्यापूर्वी खेळायला मिळावं म्हणून...

त्या दिवशी अगदी निघता निघता हे गाणं कानावर पडलं अन् थबकलो. काहीतरी वेगळं आहे हे... हे उमगलं. शब्दार्थ कळले नाहीत फारसे पण गाणं मनाला भिडलं. गाण्यात लागलेला वसंतरावांचा दुखरा सूर कुठंतरी काळजापार आत आत खोल पोचला... अन् नंतर मग हे गाणं भेडत राहिलं.

पुढं कळत्या वयात एक मित्र भेटला. हातात अनेक कला. संगीताची उत्तम जाणकारी पण व्यसनानं त्याचं माणूसपण हरपलं. कधी मूडमध्ये असला की तो स्वत: पेटी वाजवत हमखास हेच गाणं म्हणायचा. त्याचा दर्द जणू त्या सुरांतून साक्षात जिवंत होऊन समोर यायचा.

तोही आता कुठंतरी दूरदूर पण गाणं अजून तसंच चिरंतन आहे. तीच वेदना, तेच हळवेपण घेऊन पुन: पुन्हा भेटत रहातं....

वामन रामराव कांत उर्फ वा. रा. कांत या शब्दांवर अफाट प्रभुत्व असणा-या कवीची ही कविता. एकेकाळी आकाशवाणीवर 25- 26 वर्षं काम केलेल्या कांतांची ही कविता खळेकाकांच्या हाती पडली अन् तिचं अक्षरश: सोनं झालं!

तसं खळेकाकांच्या स्पर्शानं सोनं  झालेली गाणी किती शोधायची? हे त्यातलंच. पहाडी रागाची सुरावट अन् वसंतरावांचा गहिरा सूर यावर मग एक नवा स्वरमहाल उभा राहिलाय....

तिच्या विरहवेदनेत रमलेल्या त्याचं हे आक्रंदन...जुन्या आठवणींच्या रम्यतेसोबतच घुसमटलेपण व्यक्त करणारं..
----
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?

छेडिति पानात बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात.....
-

छेडिती पानात बीन अन् ऊन अभ्रकाचे...ही कल्पनाच किती रम्य. चित्रमय. आॅगस्ट- सप्टेंबर महिन्यातला ओला रानगंध देणारी.

अवघी सृष्टी बाकीबाबांच्या कल्पनेतल्या प्रमाणे रंगलेली असताना मन तिच्या आठवणीत गुंतणं स्वाभाविक नाही का?

छेडिति पानात वर मस्त बोलआलाप घेत वसंतराव " पावसाचे.." हा शब्द ज्या नजाकतीनं, हलकीशी मींड घेत उच्चारतात तेव्हा, तो पावसाचा थेंब अक्षरश: तळहातावर उतरलाय असं वाटू लागतं.
' मनकवडा.. घन..'  हे दुस-यांदा म्हणताना सुरांची एक अलवार लडी पुन्हा आपल्याला " हाय.. हाय.." करायला लावते.. हवीहवीशी जखम देऊन जाते...
-------
त्या गाठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात.....
--
भेटीगाठी घडल्या नसत्या तर एकवेळ त्यानं समजावलं असतं मनाला. पण इथं तर पौर्णिमेचं चांदणंच जणू सहवासात उतरलेलं. ते अमृतमय दिवस तेव्हाचे... आता मात्र विकल करुन टाकताहेत...

त्या गाठी.. त्या गोष्टी.. म्हणताना वसंतरावांचा स्वर आता खर्जात शिरतो. अधिक गहिरा होतो. तबला- पेटीच्या सुरांत मिसळून आर्त होतो... मात्र पुन्हा प्रेमाचे ते क्षण आठवणीतून भोगतानाचं सुख " पौर्णिमाच तव नयनी..." या ओळीत उधळत रहातं. किंचिंत वर चढत गेलेला सूर सुखावत रहातो...
-------
हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमलापरी मिटति दिवस उमलुनी तळ्यात....

शांत संध्याकाळी तिच्यासह सुवर्णरंगी रंगलेली सांज तिच्यासह अनुभवतानाचा आनंद दिसत रहातो इथं सुरा-सुरांतून...संध्याकाळी घरी परतताना परतणारे, शिस्तबध्द विहरत येणारे बगळ्यांचे थवे आपण असंख्य वेळा निरखले असतील पण त्यातून असं गीत जन्माला यायला कुणा कवीचं हळवं तरल मन असायला हवं. तेही दिवस मिटून जातात मग तळ्यातल्या कमळाप्रमाणे. अन् उरतं विरहवेदनेचं भळभळणारं दु: ख...

खळेकाकांनी अनेक वाद्यं सहजी हाताळली आहेत मात्र या गाण्याचं वजन ओळखून त्यांनी केवळ शब्द अन् वसंतरावांचा सूर यावरच फोकस केलंय.  सतार, बासरी, व्हायलिन्स, मेंडोलिन, क्लॅरोनेट  इ. काहीही वापरणं शक्य असूनही इथं साथीला केवळ  पेटी- तबला वाजते  तेही आपली मर्यादा सांभाळत...

त्यामुळेच गाण्याचा प्रभाव विलक्षण वाढला आहे...!
---
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?...

तिचं भेटणं जितकं अवचित असतं तसंच आयुष्यातून निसटून जाणंही.

मग घेतलेल्या शपथा, दिलेली वचनं सगळं सगळं फक्त विखरुन जातं. मंदिरांच्या भग्न अवशेषांसारखं. पाहिलेल्या स्वप्नातलं काही काही उरत नाही. तिला नातं निभावता नाही आलं म्हणावं की हेच आपलं प्राक्तन म्हणावं काहीच उमगत नाही. केवळ भरुन रहाते एक असह्य तडफड.

याच तडफडीनं कित्येक कलावंतांना व्यसनाधीन करुन आपल्यातून कायमचं दूर नेलं.  तर अशा जखमांना कुरवाळत, त्याच्यातूनच झगमगता दागिना घडवत कित्येक कलाकारांनी नवप्रतिभेचा साक्षात्कार घडवला.

म्हणूनच साहिरसारखा कवी असं म्हणतो, " है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सुर में गाते है।"

वसंतरावांना आयुष्यभर खूप सोसावं लागलं. तरीही त्यांच्यातला कलाकार वेदनांवर पाय रोवून आपल्याला स्वर्गीय गाण्याची अनुभूती देत राहिला. जेव्हा कुठं लोकमान्यता, राजमान्यता मिळू लागली तोवर मृत्यूनं कवेत घेत आपल्यापासून दूर नेलं.
मला इथं विज्ञानाचे लक्षलक्ष आभार मानावेसे वाटतात कारण तंत्रज्ञान आलं म्हणूनच हे असं स्वर्गीय गाणं चिरंतन टिकून रहाणार आहे. माझ्यासह लाखो स्वरवेड्याना पुन:पुन्हा समाधान देत रहाणार आहे....!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(९८३३२९९७९१)🌿

🎷

No comments:

Post a Comment