Wednesday, September 4, 2019

उंट । विं दा करंदीकर

#  माझी आवडती कविता

उंट
वि दा करंदीकर

शास्त्रीय संगीतात राग फुलवणे म्हणून काही एक प्रकार असतो. कवितेतसुद्धा मला त्याचा अनुभव आला आहे. वारंवार त्याच अर्थाचे शब्द, वारंवार थोड्याश्या वेगळ्या अर्थछटेचे शब्द, वारंवार बर्‍यापैकी वेगळ्या अर्थाचे शब्द, वारंवार भिन्नच अर्थाचे शब्द, वारंवार पूर्णपणे विरुद्धार्थी शब्द..... कविता मनात फुलत जाण्याचा मला अनुभव येतो. राग घिसाडघाईने फुलवला तर मजा येत नाही. कवितासुद्धा आळवावी लागते. आळवण्याचा अनुभव आल्यामुळे वरील कविता आवडल्या. असो.

विंदांच्या आवडलेल्या कवितांचे रसग्रहण म्हणजे संख्येने जय्यत मोठे काम स्मित पण काही काळापूर्वी त्यांच्या 'उंट' या कवितेबद्दल काही मित्रमैत्रिणींशी चर्चा करताना जे वाटले होते ते परत इथे लिहितो. 'उंट' ही कविता बहुतेक 'गाजली' नव्हती. पण महाकवीत्व कुठेच लपून राहत नाही.

'माझ्या मना बन दगड', 'मुक्तीमधले मोल हरवले', इत्यादीसारख्या मराठीला ललामभूत लेणी कोरणार्‍या असामान्य प्रतिभेची झलक इथेसुद्धा दिसतेच.

क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'

अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.

रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.

उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.

हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.

निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

मानवीसंस्कृतीचा जन्म मेसोपोटेमिया नावाने ओळखल्या जाणार्या भूभागात झाला असे मानले जाते. त्याला सर्वात जुन्या लिखित इतिहासाचा आधार आहे. मेसोपोटेमिया म्हणजे तायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या खोर्यांमध्ये येणारा सध्याच्या इराक, इराण, सिरिया इ. मधला भाग होय. मानवाचा जन्म जरी आफ्रिकेत झाला तरी 'समाज' म्हणून जगणे जेव्हा सुरू झाले (यात शेती सुरू झाली, भटकेपणा थांबला, गावे-नगरे वसली, लिपीचा जन्म होऊन लेखन सुरू झाले इ. बाबी येतात) त्याला आपण 'मानवीसंस्कृतीचा जन्म' म्हणतो. हे जगात मुख्यत्वे ५ ठिकाणी झाले - मेसोपोटेमिया, इजिप्त, सिंधू नदीचे खोरे, चीनमधील पीतनदीचे खोरे, मेसोअमेरिका आणि अँडीज पर्वतरांगा. त्यातही उपलब्ध पुराव्यांनुसार मेसोपोटेमियामध्ये हे सर्वात पहिल्यांदा झाले म्हणून त्या भागास 'क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन' म्हणतात.

मेसोपोटेमियामध्येसुद्धा एका विशिष्ट भागात मानवी समाज उदयास आला. तोच भाग का याचे कारण अगदी स्पष्ट आहे - तो भाग अतिशय सुपीक होता. तो भाग जर नकाशात पाहिला तर चंद्रकोरीसारखा दिसतो म्हणून मेसोपोटेमियामधील त्या विशिष्ट भूभागास आता आपण 'फर्टाइल क्रिसेंट (fertile crescent)' असे नाव दिले आहे.
माझ्या मते, विंदांची उंट ही कविता या मानवीसंस्कृतीच्या उदयासंदर्भात आहे.

कवितेच्या सुरूवातीलाच धरलेली वाळवंटी भागाची कास विंदा पूर्ण कवितेत शेवटपर्यंत सोडत नाहीत. सर्व प्रतिमा मनात केवळ वाळवंटच उभे करतात. पण नक्की कुठले वाळवंट? तर -

रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.

इथे आपल्याला कळते की कुठलाही वाळवंटी भाग अपेक्षित नसून जिथे सृजन झाले तो भाग. नुसतेच सृजन नाही, तर 'पहिले सृजन'. कुठलेही सृजन तसेही पहिलेच असते. मग 'पहिले सृजन' अशी द्विरूक्ती करून विंदा सुचवतात की इथे खुद्द सृजनाचे सृजन झाले, म्हणजेच नियमित सृजनास सुरूवात झाली. विंदांची 'वांझपणावर पहिला सृजनाचा क्षण गळणे' ही ओळ मात्र केवळ अवाक करणारी आहे. संमीलनाचा सर्वोच्च बिंदू सृजनात्मक असतो आणि क्षणैकच असतो. 'सृजनाचा क्षण गळणे' ही तीक्ष्ण अशी शारीर पातळीवरची प्रतिमा आहे आणि म्हणूनच अत्यंत प्रभावी आहे. सृजनाची शारीर प्रक्रिया इतक्या मूर्तीमंतपणे, चोखपणे आणि तरी रेखीवपणे उभी करणे...... ही प्रतिभा. इथेच आपल्याला कळते की हे चंद्रभागेचे वाळवंट नसून जिथे 'पहिले सृजन' झाले ते वाळवंट असणार. इथे 'क्रिसेंटची फर्टिलिटी' याच्या अर्थाचे अनेक पदर विंदा उलगडत आहेत.
मानवी शरीराच्या उत्क्रांतीत डोळ्यांची उत्क्रांती हा मोठा वादग्रस्त विषय आहे. मानवी डोळे असेच असणे ही तसे पहिले तर फार बुचकळ्यात पाडणारी गोष्ट आहे. ते पक्ष्यांसारखे नसून एकाच प्रतलात आहेत. दुसरे म्हणजे ते अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. असे डोळे निर्माण होणे ही खरे पाहता अवघड गोष्ट आहे. म्हणून मानेवरची अवघड जागा. पण डोळे माकडांनाही तसेच आहेत, मग मानव आणि माकडे यांत फरक तो काय? तर नजरेचा. मानवाने 'नजर' प्राप्त केली, मानवाने नुसते पाहिले नाही, तर पाहिल्या गोष्टींवर विचार सुरू केला. त्याची नजर सशक्त झाली. अश्या सशक्त नजरेतून आपल्या विरूद्ध उभ्या ठाकलेल्या निसर्गाशी लढण्याची हिंमतही आली. सर्वत्र वाळूचे साम्राज्य असताना मानवाने तिथेच सृजन घडवले आणि माणसाच्या प्रगतीचे क्षितीज रुंदावले. रुंदावले, विस्तारले, क्षितीज दूर पळाले. 'नाही नाही' करणारी वाळू 'होय' म्हणू लागली. प्रतिकूल निसर्गावर माणसाने विजय मिळवायल सुरूवात केली, तिथेच माणूसप्राण्याचा मानवीसमाज व्हायला सुरुवात झाली. मानवी संस्कृती रुजू झाली.

या संस्कृतीची प्रगती तरी केवढी? तर खरोखर अमर्याद. निर्माणाची चिंता न करता, निर्माण झालोच आहोत तर निर्मितीचा आनंद घेऊ असे म्हणत रुबाइयात लिहिणारा खय्याम निर्माण झाला एकीकडे आणि दुसरीकडे, आपले निर्माण म्हणजे काय, निर्माणाचे प्रयोजन काय यासारखे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधणारा महंमदसुद्धा जन्मला. पण संस्कृतीचा उंट मात्र तिथेच थांबला नाही. तो पुढे जातच राहिला. मानवीसमाज सर्वत्र पसरला. फोफावला. ही तहान कसली? आपलीच संख्या सर्वात जास्त करण्याची? आपल्या संस्कृतीस सर्वात महान गणले जावे याची? म्हणजे मुळात आपण एक संस्कृती होतो/आहोत हे दाखवून देण्याची? आणि ही तहान आहे तरी कशी? तर मृगजळ प्यावे तशी - न शमणारी. मानवी संस्कृती पसरण्यामागची शक्ती काय? मानवी संस्कृतीची अंतःप्रेरणा काय? निळा पिरॅमिड शोधण्याची अपरंपार ओढ. काहीतरी चिरस्थायी निर्मिण्याची अत्यावेगी सर्वोच्च ओढ. निळा रंग शांततेचा, भव्यतेचा. पिरॅमिड ही आपल्या स्मृतीची खूण. शेवटी पिरॅमिड म्हणजे दफनस्थानच ना? मानवीसमाज निळा पिरॅमीड शोधत राहतो. त्या शोधातच तो पुरला जातो, गाडला जातो, त्याचे पिरॅमीड होतात. पण गंमत अशी की असे पिरॅमिड्स जोपर्यंत बनत नाहीत तोपर्यंत कोणाच्याच लक्षात येत नाही की चिरस्थायी संस्कृतीच्या, निळ्या पिरॅमिडच्या शोधात असलेले आपण खुद्द एक संस्कृती होतो. आहोत. असतो.

No comments:

Post a Comment