Sunday, September 8, 2019

आशा भोसले।

द्वारकानाथ संझगिरी

...के दिल अभी भरा नहीं

आज आशाताईंना ८६ वर्षे पूर्ण झाली. ८ सप्टेंबर १९३३ चा त्यांचा जन्म. शारीरिक वय कुणालाच थांबवता येत नाही. कॅलेंडरची पानं झपझप पुढे सरकतात, पण त्यांचं मनाचं आणि विचारांचं तारुण्य कुणीतरी ‘स्टॅच्यू’ खेळ खेळताना एकाच जागी थांबवून ठेवलंय. त्यांचं गाणं कधीच म्हातारं झालं नाही. कदाचित या क्षणीही त्या तरुणाईच्या सर्वांत आवडत्या गायिका असाव्यात. माझी आठ वर्षांची ऑस्ट्रेलियातली नात आजच्या कुठल्याही गायिकेपेक्षा कॉम्प्युटरमध्ये पेनड्राइव्ह टाकून आशाताईंचं ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’ ऐकत बसते. या गाण्यांबद्दल मी समजू शकतो पण तिला ‘पिया तू बावरी’ मोहित करते तेव्हा आशाताई ही जादू उमगते.
माझी एक आवडती तुलना आहे. लता मंगेशकर सर डॉन ब्रॅडमन असतील तर आशा भोसले सर गारफिल्ड सोबर्स आहेत. गाण्यातल्या अष्टपैलूत्वाचा शेवटचा शब्द!
किती वेगवेगळे मूडस्.
कधी भजन तर कधी कॅब्रे
कधी गझल, कधी कव्वाली
कधी उडतं,  खेळकर गाणं
कधी सुखी, आनंदी, कधी दु:खी
कधी लहान मुलांची गाणी तर कधी सेक्सी गाणी
कधी शास्त्रीय तर कधी रॉक अ‍ॅण्ड रोलवर आधारित गाणी
हे सर्व मूडस् एकाच गळ्याने पेलले आहेत. त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. बरं,  हे नुसतं पेलणं नाहीए तर तिथे शिखर गाठणं आहे. जे हिंदीत तेच मराठीत आणि इतर भाषांमध्ये!  त्यांच्या कारकीर्दीचा कालखंडही पहा! १९४३ पासून थेट कालपर्यंत. आणि हे सर्व गाण्याचं तारुण्य सांभाळत. त्यांचे मोठेपण विविध गाण्यांतून जाणवतं. त्यांचं ‘जिवलगा’ गाणं मी किती तरी वेळा ऐकतो. आणि प्रत्येक वेळा वासलेला आ लवकर मिटत नाही. ‘जिवलगा’ हे ५ मिनिटं २१ सेकंदांचं गाणं आहे. जवळपास एका श्वासात गायलेलं! अंतर्‍यावर  जाताना मधे जो संगीताचा पिस वाजवला जातो तो न टाकता हृदयनाथांनी बहिणीकडून सरगम गाऊन घेतली आहे.
दीनानाथ मंगेशकरांच्या नाट्यसंगीताच्या रेकॉर्डस् अस्तित्वात असतानाही आणि त्या नाट्यगीतांची जागा कुठल्या उंचीवर आहे हे जाणूनही त्यांनी वडिलांचं नाट्य संगीत गायलंय. आणि नव्या पिढीला नाट्य संगीत कसं गावं हे शिकवलं. सुरेलपणा, लयबद्धता, शब्दोच्चार आणि अर्थाप्रमाणे  भावाचा  आविष्कार ही त्यांची खासियत, वडिलांनाही अभिमान वाटावा अशी!
शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी गाण्यांमध्ये मन्ना डे हे एक वजनदार नाव आहे. पण आशाताई आणि मन्ना डेंचं ‘लाल पत्थर’मधलं ‘रे मन सूर में गा गा’ हे गाणे ऐकलंय? नक्कीच ऐकलं असेल. त्या गाण्याला १९७२ सालचं बेस्ट क्लासिकल फिल्म गाण्याचं अ‍ॅवॉर्ड मिळालं. त्यावेळी शास्त्रीय संगीतातले तज्ज्ञ जी. एन. जोशी म्हणाले होते, ‘‘अशा गाण्यात मन्ना डेंचा वकुब आहे, पण राग ‘यमन’ ज्या पद्धतीने आशाताईंनी गायलाय ते ऐकून मी स्तिमित झालो. आशाताईंच्या गळ्याचा लवचिकपणा, काही वेळा मन्ना डेंच्या तोडीचा तर काही वेळा मन्ना डेंवर मात करून गेलाय.’’
मराठीत सुधीर फडके आणि हिंदीत ओ. पी. नय्यर आणि बर्मन पिता-पुत्र यांनी आशा भोसलेंना स्वत:चं वेगळं राज्य स्थापण्यात मदत केली. ओपीने आशाताईंच्या मनातला लता फोबिया काढून टाकला. तिला सहनायिकेच्या गायिकेवरून नायिकेची गायिका बनवलं. ओपींना तिच्या संगीताच्या भक्कम पायाचं आणि बुद्धिमत्तेचं कौतुक होतं. ओपी म्हणाले, ‘‘तिला अर्धा तास आधी गाणं दिलं तरी नंतर लगेच गाणे रेकॉर्ड करता यायचे.’’ इतर संगीतकार आशाताईंना वरच्या पिचवर गायला लावत. ओपींनी त्यांना खालच्या पिचवर आणलं. ओपी सांगे, ‘‘तू खालच्या सुरात गा. तुझ्या दीर्घश्वासाचा उपयोग कर.’’ खय्यामने तिला ‘उमरावजान’मध्ये दीडसूर खाली आणलं. ओपींनी आशाताईंना विविध प्रकारची गाणी दिली. त्यातली नशिली इतकी उत्तम होती की मॉल्ट व्हिस्कीची नशाही फिकी ठरावी.
बर्मन दा तसे लतामय संगीतकार. तरीही उडत्या चालीची गाणी आशाताईंकडे आली. १९५७ साली बर्मन दा - लतामध्ये काहीतरी गैरसमज झाले. त्यानंतर थेट ‘नौ दो ग्यारह’पासून ‘बंदिनी’पर्यंत १४ चित्रपटांत बर्मन दांनी आशाताईंना ५१ गाणी दिली. ‘चलती का नाम गाडी’, ‘कालापानी’, ‘काळाबाजार’, ‘सुजाता’ वगैरे सिनेमा त्या काळातले. आशाताईंच्या आवाजातल्या खेळकरपणाचा फार सुंदर वापर बर्मन दांनी केला. कधी हुंकार, कधी कुजबुजणं, कधी गोड आलाप.
आर्डीने त्यांना ‘दम मारो दम’ हे कल्ट (ण्ल्त्ू) गाणं दिलं. तिथून लतापेक्षा वेगळं असं आशाताईंचं सार्वभौम राज्य सुरू झालं. लोकप्रियतेच्या दृष्टीने त्यानंतर लता आणि आशा समांतर धावल्या. १९७० च्या दशकात हे राज्य त्यांनी आर्डीच्या मदतीने उभं केलं. एका वेगळ्या राज्याची ती सार्वभौम राणी होती. पुढच्या प्रत्येक संगीतकाराने तिला कुर्निसात केला. मग तो बप्पी लहरी असो किंवा आणि कुणी. आशाताईंच्या साम्राज्यावरचा सूर्य अजून मावळलाय असं वाटतच नाही. त्याने थोडा रंग बदललाय. संध्याकाळचा रंग घेतलाय.
चंद्रावर दोन अंतराळवीर उतरले. पहिला आर्मस्ट्राँग, दुसरा ऑल्डरिन. लता-आशा त्यांच्याप्रमाणे आहेत. लतादीदींनी चंद्र प्रथम पाहिला. मग आशाताईंनी. पण आजही आशाताईंचा उत्साह पाहून म्हणावंसं वाटतं,  ‘...के दिल अभी भरा नहीं.’
..।।।।।।।।।।।।।।।।।।
*अष्टपैलू आशा*
                     ✍      सुहास किर्लोस्कर

महाराष्ट्र टाइम्स - संवाद - ८ सप्टेंबर २०१९

*“तोरा मन दर्पण कहेलाए” अशा भावपूर्ण गाण्यापासून “खल्लास” पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणाऱ्या आशा भोसले यांनी भक्तीगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रविंद्र संगीत, नझरुल गीते, लोकगीते, पॉप असे अनेक संगीतप्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे.  आज ८ सप्टेंबर रोजी त्या ८७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या अष्टपैलू गायकीची झलक.*

चित्रपट संगीतामधली सिनेमातील प्रसंगाप्रमाणे असतात त्यामुळे गाणी गाताना गायक कलाकाराला स्वराइतकेच भाव व्यक्त करण्याला महत्व द्यावे लागते, आवाजामधून अभिनय करावा लागतो.  हिंदी चित्रपटामध्ये गाण्यासाठी तयार केलेल्या एकापेक्षा एक अनोख्या प्रसंगामध्ये उत्कट अभिनय स्वरामधून व्यक्त करणाऱ्या, कमावलेल्या अष्टपैलूत्वामधले वैविध्य प्रदीर्घ काळात निरंतर जपणाऱ्या एकमेव गायिका म्हणजे आशा भोसले.  स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आल्यावर आपले वेगळेपण काय याचा शोध घेताना कोणाचीही नक्कल न करता मिळतील त्या गाण्यामधील साभिनय गायन करत आपली वेगळी ओळख निर्माण करून त्यावर स्वतःचा ठसा उमटवला. त्याचा दाखला द्यायचा झाल्यास तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल इतकी त्यांच्या गाण्यांची संख्या आहे आणि तितकीच विविधता सुद्धा.  

*भक्तिगीते* 

“प्रभाती सूर नभी रंगती”, “उठा उठा सकळ जन”, “पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती” या भक्तीगीताने सकाळ प्रसन्न होण्याचे संस्कार रेडियोने केलेले आहेत.  “देवरूप होऊ सगळे”, “धागा धागा अखंड विणूया” अशा भक्तीगीतामधला आशा भोसले यांचा आवाज वेगळा जाणवतो.  “मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय” अशी मनाची अवस्था वर्णन करणा ऱ्या साहीर यांच्या शब्दाना रवी यांनी भजनाचे कोंदण दिले आणि “तोरा मन दर्पण कहेलाए” या गाण्यामधला पवित्र भाव त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. मनाचीच वेगळी अवस्था वर्णन करताना “मना तुझे मनोगत कळेल का” या गाण्यात लावलेला आवाज वेगळा आहे. 

*बालगीते*

“नाच रे मोरा”, “चंदा राणी”, “एक झोका, चुके काळजाचा ठोका” “नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू”, सारख्या गाण्यांमधून आशा भोसले यांनी बालसुलभ भाव व्यक्त केले आहेत.  “दादी हम तुमको मनाते रहेंगे” असे जेव्हा त्या “दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ” गाण्यात लहान मुलांच्या आवाजात म्हणतात तेव्हा कोणती दादी गुस्सा सोडणार नाही? 

*नाट्यगीत, शास्त्रीय संगीत*

“युवती मना दारुण रण”, “विलोपले मधु मिलनात या”, “शूरा मी वंदिले”, “रवी मी” अशी नाट्यगीते आशा यांनी गायल्यामुळे तो ठेवा प्राणपणाने जपला आहे.  त्यामधल्या ताना गाताना नाट्यगीताचा बाज राखला आहेच शिवाय काही जागा खास आशा शैलीच्या आहेत. “परवशता पाश दैवे” लाइव्ह गाताना “असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला” या ओळीचा संदर्भ देत त्या ब्रिटीश राज्याचा संदर्भ देतात ते खासच असते.  दिनानाथ मंगेशकर यांनी सिनेमामध्ये गायलेले “सुहास्य तुझे मनास मोही” आणि त्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेले रुपांतर “मी मज हरपुन बसले ग” दोन्ही गीते आशा भोसले त्या गाण्याच्या भावदर्शनासह गातात तेव्हा त्याची खुमारी वेगळीच असते.   जोग रागावर आधारित “रस बरसत अमृत वीणा” हे गाणें त्यांनी पं भीमसेन जोशी यांच्याबरोबर फार सुरेख गायले आहे. केदार रागावर आधारित "ही कुणी छेडिली तार" हा वसंतराव देशपांडे  यांच्याबरोबर केलेला असाच वेगळा अविष्कार आहे.  उ. अली अकबर खां यांनी तानसेन यांच्या पारंपारिक बंदिशी सरोद वादनासह गाण्यासाठी लिगसी आल्बम करिता आशा भोसले यांचीच निवड केली.  विलायत खान यांनी संगीतबद्ध केलेले आणि अमृता प्रीतम यांनी लिहिलेले गीत “अंबर की एक पाक सुराही, बादल का इक जाम उठाकर” शायरी, संगीत आणि गायकीचा तर त्रिवेणी संगम आहे.   दिल पडोसी ही या आल्बममधील  “झुठे तेरे नैन” हे गीत साडे आठ मात्रांमध्ये बाधलेले आहे.  हे गाण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात येते की हे शिवधनुष्य पेलणे कसे अवघड आहे परंतु आशा भोसले यांच्या आवाजात आपण गाणे ऐकतो तेव्हा त्या लीलया समेवर येतात.  बोसा नोवा रिदमवर बेतलेले हिंदी चित्रपटसृष्टीतले पहिले गाणे  “मार डालेगा दर्द ए जिगर” ऐकताना हेच वैशिष्ट्य जाणवते  राहुल देव बर्मन यांच्या “घर जाएगी तर जाएगी” या गाण्यात लग्नाची आतुरतेने वाट बघणाऱ्या नायिकेच्या मनातली चलबिचल व्यक्त करण्यासाठी प्रत्येक शब्दातल्या स्वरांचे चढउतार ऐकतानाच दमछाक होते. कारवां चित्रपटातील “दैय्या दैय्या मै कहां फसी” या गाण्यात प्रत्येक ओळीला गाण्याचे स्केल बदलते. अशी अनेक गाणी आपल्याला ऐकायला सोपी वाटतात आणि लक्षात येते की अशी गाणी कोणी म्हणण्याचा प्रयत्न का करत नाही.    

*गाण्यामधला अभिनय*

“या सुखानो या” हे सदाबहार गाणे दरवेळी पुनःप्रत्ययाचा वेगळा आनंद देते यामध्ये अर्थात संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाचे कौशल्य आहेच पण ते त्यावर आशा ही मोहोर आहे त्यामुळे आपण दिवसभर ते गाणे गुणगुणत राहतो.  “आज कुणीतरी यावे” हे गाणे ऐकल्यावर त्या येणाऱ्याला “विचारल्याविन हेतू कळावा” कारण त्या गाण्यातले भाव. जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या “जहा मे ऐसा कौन है” या गाण्यात “दिलाऊ किस तरहा यकीन, के तुमसे मै जुदा नही, मुझसे तुम जुदा नही”  या ओळीमधली “दिलाऊ” ही जागा  ऐकल्यावर खात्री पटते.  जयदेव यांच्याच “मांग मे भर ले रंग सखी री” या गाण्यात  “कोई चांदी के रथ मे आया है” या ओळी ऐकल्यावर त्यांच्या गायकीला अनोखी का म्हणायचे याचे उत्तर मिळते.  “प्यार के मोड पर छोडोगे जो बाहे मेरी” हे गाणे ऐकल्यावर कोण प्रेयसीला सोडून जाईल? लगान चित्रपटातील ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या “राधा कैसे ना जले, आग तन मन मे लगे” या शब्दात नायिकेची जलन अप्रतिमरीत्या व्यक्त झालेली आहे.  “लोगो न मारो इसे”, “रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी”  अशी खोडकर, रुसव्या फुगव्यासह अनेक भाव असलेली गाणी ऐकल्यावर आपण दुसऱ्या कोणत्याही गायिकेचा विचार करू शकत नाही. अशा गाण्यात किशोरकुमार साथीला असल्यास सोने पे सुहागा.  “मेरा नाम है शबनम” अशा बोल असलेल्या गाण्यात शब्दातील भाव आणि गायन याची कसरत करावी लागते.  “बैल तुझे हरीणावाणी” हे गाणे गात असतानाच “हे सर्जा आहा आहा”,  “हात नका लावू माझ्या साडीला” या गाण्यात  “अंगाला हात लावायचं काही कारण होत का?” किंवा “नाव सांग सांग गाव सांग” या गाण्यात “अरं जा रं” असं कोल्हापुरी ठसक्यात म्हणून पहावं म्हणजे अवघड काय आहे हे लक्षात येते.  “हाल कैसा है जनाब का” या गाण्यातला आवाज त्यांचा आहे की मधुबालाचा असा प्रश्न पडतो.  वेगवेगळ्या भाषांचा लहेजा “मै बंगाली छोकरा”, “ता थै तत थै” सारख्या गाण्यात जाणवतो.   बंगाली आणि इतर भाषातील त्यांची गाणी हा वेगळाच अभ्यासाचा विषय आहे.

*कव्वाली, गझल*

ये इश्क इश्क है, है अगर दुश्मन, पल दो पल का साथ हमारा, अशा कव्वालीमध्ये त्यांचे आगमन गाण्यात वेगळी जान आणते. रोशन यांच्या “निगाहे मिलाने को” या  यमन रागावर आधारित  गाजलेल्या कव्वालीमध्ये गायलेली सरगम गाण्याची रौनक वाढवते. “सलोना सा सजन है और मै हुं”, “करू न याद मगर किस तऱ्हा भूलाऊ उसे”  अशा एकापेक्षा एक सरस शायरीला आशा लाभल्यावर त्याचे सोने झाले. “युं सजा चांद के छलका तेरे अंदाज का रंग” या गझल मध्ये रंग मधली जागा ऐकावी आणि ऐकत रहावी.  मिराज ए गझल या आल्बममध्ये गुलाम अली आणि आशा भोसले यांनी गझलला वेगळे आयाम दिले आहे. ‘गये दिनो का सुराग लेकर”, “रोदाद ए मुहोब्बत क्या कहिये” या  युगुल  गझल गायनाबद्दल गुलजार यांच्या शब्दात सांगायचे झाले तर “हे दोघे दिग्गज एकत्र गायले आणि गझल अपने मिराज पर पहुची”.  खय्याम यांच्या आग्रहास्तव खालच्या स्वरामध्ये गायलेल्या उमराव जान मधल्या सर्वच गजल आपल्या परिचयाच्या आहेत. “मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है” अशा ओळी गाताना स्वराप्रमाणे त्यातले भावदर्शन अधोरेखित झाले आहे.

*मादक गाणी, दर्दभरी गाणी*

मेरे अंग लग जा बालमा, ये है रेशमी जूल्फो का अंधेरा, आईये मेहेरबा, रात अकेली ही`है, हुस्न के लाख रंग अशी एकापेक्षा एक मादक गाणी फक्त आशा भोसले यांच्यासाठीच बनवली आहेत की काय असे वाटते. “असेल कोठे रुतला काटा” अशा ठसकेबाज लावण्या ही तर त्यांची खासियत होतीच.  पिया तू अब तो आजा किंवा प्रत्येक वेळी सलग ८ वेळा “आह आह आजा” असे दमश्वासासह गायलेले तिसरी मंझील मधले गाणे, एक तू है पिया, आओ हुजूर तुमको अशी नशा चढलेली गाणी (उचकीसह), पाश्चात्य शैलीमधले  दम मारो दम असे अनेक पैलू सांगता येतात. “एक तू ही है पिया”, “नाजनी बडा रंगीन है वादा तेरा” अशा ओ पी नय्यर यांच्या एकाच गाण्यात तीन चाली आहेत. “खाली हाथ शाम आई है, खाली हाथ जाएगी, आजभी ना आया कोई”, “चैन से हमको कभी, आपने जिने ना दिया”, “दर्द जब तेरी अता है” अशा गाण्यांमधून “भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले” असा दर्द आशा व्यक्त करतात तेव्हा त्याचे गहिरेपण आपल्याला भिडते.

*एकाच गाण्यात दोन भाव*

आशा भोसले यांची गाणी ऐकली की अष्टपैलुत्व म्हणजे काय याचा अर्थ समजतो. वेगेवगळ्या भावना स्वरातून त्या अशा काही व्यक्त करतात की गाण्यातले भाव आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचतात, मनाला भिडतात, आपण त्या माहोलमधें जातो. कारवां चित्रपटातील एकाच गाण्यात अरुणा इराणी यांचा मादक मूड आणि शेवटच्या कडव्यामधें आशा पारेख यांचा कैफियत मांडण्याचा मुड़ त्यांनी लिलया पेलला आहे.  “अब जो मिले हैं तो, बाहों को बाहों में रहने दे ए साजना” या उन्मादक गाण्याचे शेवटचे कडवे  “अब जो मिले हैं तो, मुझको निगाहों में रहने दे ए साजना” असे विरह गीत होते.  द बर्निंग ट्रेन या सिनेमातले श्रवणीय गीत भारतीय आणि पाश्चात्य अशी टिपिकल फिल्मी जुगलबंदी आहे. पाश्चात्य ढंगात  “मेरी नजर है तुझपे” आणि शास्त्रीय रंगात  “तेरे बिना जियरा मने ना”  त्याला साजेसा बदल आशा भोसले आलटुन पालटून पण लिलया करतात. “नको रे नंदलाला” हे नाव मोठे लक्षण खोटे चित्रपटातील गीत याच जातकुळीचे.

*एव्हरग्रीन*

बदलत्या काळाशी आणि तंत्राशी जुळवून घेण्यात त्या नेहेमीच पुढे असतात. इजाजत मधल्या नायिकेला पती तुकड्या तुकड्यामध्ये मिळत असतो. “कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जिने दो” या गुलजार यांनी लिहिलेल्या या शब्दाला चाल देताना राहुल देव बर्मन यांनी तुकड्या तुकड्यात गाणे रेकोर्ड केले आणि व्होईसओव्हर तंत्र वापरून गाणे जोडले.  या गाण्याला आशा भोसले यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.  सुधीर फडके ते आनंद मोडक, सचिनदेव बर्मन – ओ पी नय्यर यांच्यापासून ए आर रेहमान पर्यंत सर्वांच्या संगीताचा अविभाज्य भाग बनलेल्या, नलिनी जयवंत, मधुबाला, नूतन, तनुजा पासून काजोल, उर्मिला मातोंडकर, तब्बू यांच्यापर्यंत अनेक अभिनेत्रीना आवाज दिलेल्या आशा यांनी “बचके तू रहेना”  या संदीप चौटा यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात वयाच्या ६९ व्या वर्षी “खल्लास” असे काही गायले आहे की आपण या वयात असे युवावर्गाच्या संगीताशी जुळवून घेऊन त्याला आपला वेगळा रंग देऊ शकू का हा प्रश्न पडतो. अशी गाणी त्या ढंगाने गाण्याऱ्या कलाकाराला जनरेशन गॅप वगैरे माहित नसते, असे कलाकार जीवनाच्या चांगल्या बाजूकडे बघत असतात.  गायिका आशा भोसले  यांच्याकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणुन पहावे. विपरीत परिस्थितीमधे न खचता स्वतःची ओळख बनवणे आणि इतके वर्षे काल सुसंगत राहणे हे केवळ "आशा" च करू शकते.  सुधीर मोघे यांच्या शब्दात

*इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे*
*हे जीवन सुंदर आहे*

सुहास किर्लोस्कर
9422514910

No comments:

Post a Comment