घर” नावाचा एक सिनेमा आला होता, बहुदा १९७८ असावे. एक प्रेमात बुडालेले जोडपे रात्री सिनेमा बघायला जाते. सिनेमा सुटल्यावर टैक्सी मिळत नाही म्हणून पायी यायला निघते. परत येत असतांना चार लोकांचे टोळके ह्या दोघांवर हल्ला करत. नवऱ्याला बेदम मारहाण होते आणि बाईवर चौघॆ गैंगरेप करतात. त्यातून तिला सावरण्यासाठी रान करतो. हा विषय मेडिया आणि राजकारणी आपला डाव साधण्यासाठीपण वापरतात. अश्या ह्या कथेचे सोने केले आहे रेखानी. " आजकल पाव जमीन पे नही पडते मेरे" किंवा "आप कि आंखो मे कूछ मेहके हुवे से ख्वाब है" मधली भावविभोर प्रेमिका ते अत्याचार झाल्या नंतरची पत्नी. रेखानी अक्टिंगचा जो स्पेक्ट्रम दाखवला आहे या चित्रपटात त्यास तोड नाही. गुलझार साहेबांनी लिहिलेली अफाट गाणी, किशोर, लताचा आवाज आणि आर डी बर्मनच संगीत हि या चित्रपटाची अफाट बाजू आहे. या गाण्यांना रेखानी पडद्यावर खासच जिवंत केले आहे. या चित्रपटातली सगळीच गाणी खास पण माझे सर्वात आवाडते म्हणजे
फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब की
रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें
याच वर्षी अजून एक चित्रपट आला होता " मुकद्दर का सिकंदर " आउट अंड आउट बच्चन सिनेमा, दुसऱ्या कोणाला विशेष संधी नाही पण याच चित्रपटात एक गाणे आले रेखाच्या वाट्याला. सलाम-ए-इश्क़. रेखा या गाण्यात दिसली आणि नाचली आहे अफाट. प्राइममध्ये असलेल्या बच्चन समोर भाव खाणे म्हणजे चेष्टा नाही पण रेखानी हे शिवधन्युष्य लीलया उचलले आहे. साडेपाच मिनिटांचे हे गाणे बच्चन आणि रेखानी अक्षरश: जिवंत केले आहे. शेवटचे कडवे गायला बच्चन सुरु करतो आणि आपले कधीही व्यक्त न केलेले प्रेम रेखानी इथे इथे फक्त डोळ्यात दाखवते. जियो हा एकच शब्द !!!
इस के आगे की अब दासतां मुझ से सुन
सुन के तेरी नज़र डबडबा जायेगी
१९८० मध्ये आला "खुबसुरत", ऋषीकेश मुखर्जी साहेबांचा हा चित्रपट म्हणजे मास्टरपीस. रेखा, दीना पाठक आणि अशोक कुमार सारखी माणसे आणि ऋषीदांसारखे दैवी दिग्दर्शक असल्यावर अजून काय पाहिजे. अल्लड रेखा, नटखट रेखा, प्रेमात पडलेली रेखा, दिना पाठकची बोलणी खाल्लेली रेखा आणि मग कर्तव्यदक्ष रेखा. परत मोठा अक्टिंग स्पेक्ट्रम. कमीत कमी विसेक वेळा बघीतला असेल मी हा चित्रपट पण अजूनही कसा फ्रेश वाटतो. एक एक सीन म्हणजे साक्षात इन्स्टीट्युट. कुठलीही भडक प्रकाशयोजना नाही कि कोणतीही दर्दभरी प्रेमकथा नाही. एका सर्वसाधारण घरात घडणारी हि कथा अशोक कुमार, दीना पाठक आणि रेखानी अजरामर करून ठेवली आहे. आर डी बर्मन, अशोक कुमार आणि आशा भोसलेनी एक अफाट गाणे केले होते या चित्रपटात. अशोक कुमार स्वतःह किती तुफान गायक होते याचा हा नमुना आहे.
पिया बावरी पिया बावरी
पिया पिया बोले रे पिया बावरी.
उमराव जान मध्ये रेखा अक्षरशः हा चित्रपट जगली आहे. " मला माझ्यात उमराव जान दिसते " अस रेखा म्हणाली होती. " उमराव जान अदा " या मिर्झा अली रुसवाच्या कादंबरी वर मुज्जफर अलीनी चित्रपट बनवायला घेतला आणि स्क्रिप्ट तयार होतांना त्याला रेखाच दिसली. या चित्रपटात रेखा अफाट दिसली आहेच पण अभिनय पण हिमालया येवढा उत्तुंग. खय्याम साहेबांनी आयुष्यभराची पुण्याई खर्च करून उमराव जान साठी गाणी बनवली. आशाताईंनी आणि रेखानी त्या गाण्यात जीव फुंकला पडड्यावर. इतकी सारी महान लोक एकत्र आल्यावर चार राष्ट्रीय पारीतोषके तो बनता है. एकाहून एक अफाट गाणी आहेत या चित्रपटात पण माझे आवडते आहे
जिन्दगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें
ये ज़मीं चाँद से बेहतर नज़र आती है हमें
आता रेखा म्हणजे आता हात लावेन तिथे सोने अस झाले होते. रेखानी कित्येक भुक्कड सिनेमे केल्यावर रेखा, नसीर अनुराधा पटेलला घेवून गुलझार साहेबांनी एक अफाट सिनेमा बनवला " इजाजत ". अप्रतिम कथानक, तेवढाच पॉवरफुल स्क्रीनप्ले, आर डी बर्मनच शब्दांनी तारीफ करता येणार नाही अस संगीत आणि रेखा नसीरचा अभिनय. एक खास चित्रपट बनायला अजून काय लागते. आशाताई आणि गुलझार साहेबांनी राष्ट्रीय पारितोषिक पटकावले आणि बाय व्हीस्कर रेखाच गेल, पण रेखाच्या मोजक्याच खास चित्रपटात इजाजत फार वरचा. इजाजतच्या गाण्यांतून एक निवडणे कठीण पण या गाण्यात रेखा फारच खास दिसली आहे.
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
जिंदगी है, बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना.. ..
याच काळात विजेता, उत्सव, खून भरी मांग आले पण या चित्रपटात म्हणावा तसा दम नव्हता. रेखा नावाच्या अभिनेत्रीला बॉलीवूडनी एकेकाळी अक्षरशः हिणवले. तीचा रंग, तिचा बांधा, तिची हिंदी, एक ना अनेक दुर्गुण लोक काढत गेले. पण हार मानेल ती रेखा कशी. योगा आणि डायटच्या भरोश्यावर फिगरला रेखीव केले आणि हिंदी शिकून ह्या बयानी जबरदस्त पुनरागमन गेले. दहा वर्षे मग अशी गाजवली कि भारतीय सिनेमाचा इतिहास रेखाच्या नावाची सुवर्णपाने लिहिल्याशिवाय पूर्ण होणार नाहीत. थोडे अजून काळजीपूर्वक सिनेमे निवडले असते तर रेखुडी अजूनच अफाट झाली असती. उगाच नाय माझ्या वडलांच्या वयाची लोक तिच्या नावाने आज हि सुस्कारा टाकत.
एक काळ होता जेंव्हा बच्चन रेखाच्या तथाकथीत प्रेमप्रकरणाच्या कथांनी मासिके, पेपर्सचे रकानेच्या रकाने भरून जात असत. पर्पल पैच मध्ये होते अस म्हंटल तरी हरकत नाही आणि त्याच दरम्यान यश चोप्रा साहेबांनी सिलसिला नावाचा चित्रपट काढला. त्या काळात गाजलेला आणि आजची फ्रेश वाटणारा हा अफाट सिनेमा. प्रदर्शीत झाला तेंव्हा अनेकांना ह्या चित्रपटाबद्दल एक वेगळीक हुरहूर होती. नेमके काय दाखवणार, बायोपिक असेल का, शेवट काय होणार, जया कशी रीअक्ट झाली असेल, बच्चन आपल्या भावना लपवू शकेल का असे अनेक प्रश्न लोकांच्या डोक्यात भुंगा करत होते. बच्चन रेखात काय होते हे कदाचित फक्त बच्चन रेखाच सांगू शकतील पण सिनेमा म्हणून हा मास्टरपीस आहे.
बच्चन, रेखा, संजीव, शशी, खरबंदा, देवेन आणि जया अशी अफाट स्टारकास्ट आणि काश्मीरच बेफाट लोकेशन. शिव हरीची एकाहून एक सरस अशी जवळपास दहा गाणी आणि त्या काळात रिबेल वाटावी अशी कथा. बच्चन रेखा एकत्र येतात असा शेवट केला असता तर अजूनच अफाट झाला असता हा सिनेमा, अर्थात हे माझे मत. एका पाठोपाठ येणारी अप्रतिम गाणी या चित्रपटाची जान पण हा चित्रपट आहे तो रेखा बच्चनचाच. बाकी सगळे कसे या दोघांभोवती फिरत असतात. शशीनी छोट्याश्या रोल मध्ये जीव ओतला आहे. भाई मै साबुन नही उठाउंगा असो किंवा उपर गोरी का मकान असो.
प्रेम करावे आणि खुलवावे तर पहिल्या पार्ट मध्ये बच्चन रेखा सारखे. शोला है शोला, शोलो से डरना गाण्यात रेखुडी काय अफाट दिसाली आहे. सलवार कमीज मध्ये संपूर्ण कपड्यात टोटल मादक. देवेन आणि सुषमाच्या मार्फत आपले प्रेम रेखापर्यंत पोहोचवणारा बच्चन पण खास. टेप वर बच्चन रेखाला हाल ए दिल सांगत असतो आणि त्यावर रेखा जी लाजली आहे त्याला तोड नाही. देखा एक ख्वाब हे गाणे म्हणजे समस्त प्रेमवीरांची आरतीच कि हो देवा. गाणे आणि लोकेशन अफाट आणि त्यात रेखा बच्चनचा जिवंत अभिनय (?). सुभान अल्लाह !!!सगळ सुरळीत सुरु असते आणि बच्चनला टिवी फोडावा लागतो. शशीने केलेल्या पराक्रमाची किंमत चुकवण्याची वेळ बच्चनवर येते आणि इथून हा चित्रपट अजूनच वेगळी उंची गाठतो. बच्चनच्या आवाजाला इथून खरा न्याय मिळतो आणि रेखाच्या अभिनय क्षमतेला.
नीला आसमां सो गया
आसूओं में चाँद डूबा, रात मुरझाई
मग बारी येते बच्चनच्या मनातले वादळ दाखवण्याची. ते दोघे परत भेटतात चुकून आणि एका जगाला नको असलेल्या कथेचा पुनर्जन्म होतो. दोघांचेही लग्न झालेले पण दोघांचाही जीव एकमेकात अडकलेला. “ये कहां आ गये हम” हे अजून एक सुंदर गाण आहे. लताच्या आवाजात असलेल्या या गाण्यात बच्चननी आपला पार्ट अक्षरशः जीव तोडून गायला आहे.
मजबूर ये हालात, इधर भी है, उधर भी
तनहाई की एक रात, इधर भी है, उधर भी है
” दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे ” हे ऐकले कि आजही छातीत कुठे तरी चमक उठते.जावेदनी पण हे गाणे लिहितांना कुठे तरी दोन प्रेमी लपून बघितले असावे.पण या चित्रपटाच उत्तुंग शिखर आहे होळीचे गाणे. गाणे आहे रेखा बच्चनचे पण संजीव जयानी जी जीवाची घालमेल दाखवली आहे त्याला तोड नाही.
रंग बरसे
हरिवंशराय साहेबांनी लिहिलेल्या ह्या अफाट गाण्याला आपल्या खास आवाजानी आणि अभिनयानी बच्चननी अजरामर केले. १९८१ नंतर किती धुळवडी आल्या आणि गेल्या पण हे गाणे वाजले नाही असे होतच नाही. बच्चन आणि रेखा या चित्रपटात अफाट दिसले आहेत. दोघांचेही तारुण्य पिकवर होते आणि त्याला साज चढवला तो चोप्रा साहेबांनी. उगाच नाही सिलसिला लागला आणि रेखुडी दिसली कि बापू हिटलर बनून रिमोट आपल्या ताब्यात घेत. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आज रेखुडीचा वाढदिवस.
आजही अनेक लोकांना प्रश्न असेल कि खरच काही सिलसिला होता का ? हि कहाणी सफल झाली असती तर काय झाले असते. पण जे होते ते चांगलेच होते असे आपण म्हणतो तेच खरे. जयानी बच्चन नावाच्या वादळाला नुसते सांभाळलेच नाही तर दिशा हि दिली !!!
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा रेखा आणि हो आमच्या आलमगीरांकडून पण बर का !!
0000000000000000000000
रेखा... जोहरा अप्रतिम होती !
रेखा... उमराव जान बेहद सुंदर !
रेखा... सिलसिला मधे चाँदनी !
रेखा... नटवरलालची शन्नो!
रेखा... सुहाग मधली बसंती!
रेखा... घरमधली आरती !
रेखा... नमक हराम मधली श्यामा !
रेखा... इजा़जत मधली सुधा !
रेखा... आस्था मधे मानसी !
रेखा... खूबसूरत मधे मंजू !
रेखा... उत्सव मधे वसंतसेना !
रेखा... झूठी मधे कल्पना !
रेखा... कलयुग मधे सुप्रिया !
रेखा... गंगा की सौगंध मधे धनिया !
रेखा... दो अंजाने मधे रेखा रॉय आणि सुनिता देवी !
रेखा... यात्रा मधे लाजवंती !
किती आठवायचं !
रेखा...
सलाम-ए-इश्क म्हणत जीव लावणारी... इन आँखो की मस्ती में म्हणत डोळ्यात विरघळवून टाकणारी... तेरे बिना जिया जाये ना अशी कबूली देणारी... आज कल पाँव जमीं पर नही पडते मेरे म्हणत आपल्यातच मश्गुल होऊन राहणारी... परदेसिया म्हणत अवखळपणे हुंदडणारी... रंग बरसे भीगे चुनरवाली म्हणल्यावर कावरीबावरी होऊन छानशी लाजणारी... दिल चीज क्या हैं आप मेरी जान लीजीये म्हणत विनंती करणारी... गुम हैं किसी के प्यार में दिल सुबह शाम म्हणत रामपूर का लक्ष्मणला खुळं करणारी... तुमने किसी से कभी प्यार किया हैं असा सवाल करणारी... सुन सुन सुन दिदी तेरे लिये इक रिश्ता आया हैं म्हणत बहिणीच्या आनंदात सामील होणारी... आज इम्तिहान हैं म्हणणारी... आणि कतरा कतरा मिलती हैं, कतरा कतरा जीने दो असं सांगणारी...
रेखा !
सिलसिलातली चाँदनी तर वेडं करतेय अजूनही... उमराव जान तर डोळे स्थिरावत नाहीत अशीच ! आणि वसंतसेना तर लाजवाब !
ही सगळी एवढी का वेडी आहेत तिच्यासाठी हे तिलाही चांगलंच ठाऊक आहे... तरीपण ही बया विचारतेच आहे...
मन क्यूँ बहका रे बहका
आधी रात को...
बेला महका रे महका आधी रात को...
कसं सांगायचं गं बै तुला की तू आमच्यासाठी काय आहेस ते ! तुला बघता बघताच आम्ही मोठे झालो... बच्चनला तुझ्याबरोबर बघितला की काळजात कळ उठायची जी आजही तशीच येते !
कॉलेजच्या दिवसात रात्री अभ्यास सोडून बच्चन भारी की तू भारी यावर भरपूर चर्चा झाल्यात !
बच्चनची आणि तुझी केमिस्ट्री तर अफलातून मॕच झालेली... आजच्या पिढीतही तुम्हां दोघांच्याच जोडीचे दाखले समोर येतात... बॉलीवूडमधल्या परफेक्ट पेअर असं कुणीही लिहायला बसलं की बच्चन आणि रेखा यांना बाजूला करताच येत नाही !
पण जेव्हा तुला उत्सव, खूबसूरत, घर, उमराव जान, कलयुग, यात्रा, इजा़जत अशा तुझ्या आणि फक्त तुझ्याच रोलमधे बघितले तेव्हा समजून आले की रेखा म्हणजे फक्त रेखाच ! नो अॉप्शन !
आज दहा अॉक्टोबर...
तुझा वाढदिवस !
आणि
उद्या अकरा अॉक्टोबर... आपल्या शहेनशाहचा वाढदिवस !
.00000000
भानू रेखा गणेशन...........हिंदी चित्रपट सृष्टीतील एकमेव उमराव जान........!!!!!एकमेव खुबसुरत वसंतसेना......!!!!!!आज या चिरतरुण ,सदाबहार रेखाजींचा जन्मदिन...........!!!रेखाजी ,तुम्हाला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा............!!!!!!!!!!
सुंदर कांजीवरम साडी आणि मौल्यवान दागिन्यांनी सजलेले त्यांचे रूप पाहणे म्हणजे सुखद पर्वणीच.....!!!!बालकलाकार म्हणून त्यांनी प्रथम ''रंगूला रत्नम ''या तमिळ सिनेमातून चित्रसृष्टीत पदार्पण केले......!!!!!त्यानंतर १९७० मध्ये आलेल्या ''सावन भादो''या हिंदी चित्रपटातून त्या नायिका म्हणून झळकल्या आणि हिंदी चित्रपट सृष्टीची भाग्य रेखाच बदलली.....!!!!!
प्रथम दर्शनी साऊथ मधील सावळी ,साधारण अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.पण कालांतराने त्यांनी स्वत;च्या ''लुक्स ''कडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.आणि शिस्तबद्ध व्यायाम,योगाची साथ ,खाण्यावर नियंत्रण या सगळ्यामुळे त्यांचे वजन घटले....आणि जसे सुरवंटाचे सुंदर फुलपाखरू बनते तसेच त्यांचे सौंदर्य उजळून एका सौंदर्यवती कलावान अभिनेत्रीचा जन्म झाला.त्यांचे हेच नवे रूप त्यांच्या ''दो अनजाने ''या चित्रपटात झळकले प्रेक्षकांना हे नवीन रूप आणि त्यांचा अभिनय दोन्ही गोष्टी भावल्या .त्यांच्या अभिनयाची चर्चा होऊ लागली.त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.यशाची एकेक पायरी चढत त्या लोकप्रियतेच्या आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर पोचल्या.
''घर ''या चित्रपटातून नवविवाहित तरुणी ''आरती'' ही भूमिका त्यांनी साकारली.यात बलात्कार झालेली "पिडीत स्त्री" त्यांनी रंगविली.प्रेयसी,नवपरिणीता,
पत्नी,पिडीत स्त्री असे अनेक कंगोरे असणारी ही भूमिका अभिनयाचा कस लावणारी होती.रेखाजीनी ती उत्तम साकारली.आपल्या अभिनयाने त्यात विविध रंग भरले.पतीवर नितांत प्रेम असूनही भोगलेल्या भीषण भूतकाळाने अस्वस्थ होणारी पत्नी रसिकांच्या डोळ्यात पाणी आणते...!!"आरतीची" अत्यंत संवेदनशील भूमिका रेखाजींनी आपल्या सुंदर अभिनयाने जिवंत केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळविली आणि फिल्मफेअर चे पारितोषिकही. ...!!
यानंतर रेखाजी आपल्या भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ बनल्या.अभिनयाला वाव देणाऱ्या मोजक्याच भूमिका त्या स्वीकारू लागल्या.''खुबसूरत ''हाही रेखाजींच्या'' चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ''असलेला चित्रपट............!!!!!!विनोदी अंदाज असलेली ही "चुलबुल्या मंजूची " भूमिका त्यांनी मोठ्या दिमाखात साकारली.हृषीकेश मुखर्जी या मुरब्बी दिग्दर्शकाच्या परिस स्पर्शाने रेखाजींच्या या भूमिकेचे सोने झाले आणि रसिकांच्या मनात "खुबसुरत रेखा"जीनी "पिया बावरी" बनून अढळ स्थान मिळविले.
रेखाजीनी अनेक नायकांबरोबर काम केले.पण अमिताभ बरोबर त्यांची विशेष जोडी जमली.आणि रसिकांनाही त्या दोघांची जोडी पसंत होती."मुकद्दर का सिकंदर","मिस्टर नटवरलाल" ,"सिलसिला" अशा अनेक चित्रपटातून ही जोडी झळकली .यश चोपडा यांच्या "सिलसिला" मधून त्यांची आणि जयाजींची जुगलबंदी विशेष रंगली.असे असले तरी "सिलसिला" ने जे खूबसुरत प्रेमाचे ख्वाब रसिकांना दाखविले ते आजही रसिक मनी अमर आहे...यशजींसारख्या रोमान्स च्या बादशहाने रेखाजी आणि अमिताभ यांच्यातील प्रणय खऱ्या अर्थाने जिवंत केला...!!
रेखाजींच्या अभिनय कारकिर्दीतील शिरपेच म्हणावा असा चित्रपट म्हणजे ''उमराव जान''.......!!!!!ही "उमराव जान" रेखाजीनी रुपेरी पडद्यावर जिवंत केली.त्या भूमिकेत आपले प्राण ओतले.ही भूमिका म्हणजे त्यांच्यापुढील आव्हान होते...त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले,उर्दूचे प्रशिक्षण घेतले. खय्यामसाहेबांच्या संगीताने "उमराव जान" सजीव झाली आणि रेखाजींच्या फॅन मेल मध्ये वाढ झाली..."इन आंखो की मस्ती के मस्ताने हजारो है"....हे गीत प्रत्येकाच्या ओठी येऊ लागले..."उमराव" ची अदा, नृत्य,दु:ख,माता पित्यांपासून झालेली ताटातूट या साऱ्या भावना रेखाजींनी आपल्या अभिनयातून खुलविल्या...!!हीच उमराव जान ची भूमिका त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेली.
"खून भरी मांग" चित्रपटाची आखणी करताना राकेश रोशन यांच्यासमोर रेखाजीच होत्या...आधी साधी भोळी गृहिणी,मुलांवर जीवापाड प्रेम करणारी आणि पतिनिधनानंतर तिच्यावर झालेल्या अन्यायाची झालेली जाणीव आणि ज्या त्वेषाने ती आपल्यावरील अन्यायाचा सूड घेते तो खरच पाहण्यासारखा...!!
रेखाजींची आणखी एक अविस्मरणीय भूमिका ''इजाजत ''चित्रपटातील .......!!!भूमिकेचा बाज,समतोल साधून साकारलेली ,गुलजार या कलासक्त दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखालील उत्तम भूमिका असेच याचे वर्णन करता येईल.......!!!!''कुठ कुठ जायचा हनिमूनला''या गीतात त्यांनी आपले मराठमोळे रूप दाखवून मराठी रसिकांची मने जिंकली आहेत.
कलेला स्थलकालाचे ,भाषा प्रांत यांचे बंधन नसते.रेखाजीनाही वयाचे बंधन नाही .आता त्या मोजक्याच भूमिका करतात.शासनाने त्यांना ''पदमश्री ''देऊन त्यांच्या अभिनय कारकीर्दीचा गौरव केला आहे.आजही रसिक त्यांच्या चित्रपटाची आवर्जून वाट पाहतात.......!!!!!आजही रेखाजी या अभिनयाच्या तारांगणात दिमाखाने लख लखत आहेत.कधी "सुपर नानी" तर कधी "आस्था"मधील "असहाय स्त्री" जी परिस्थितीच्या जाळ्यात अलगद ओढली जाते...!!"परिणिता" मधील "कैसी पहेली जिंदगानी" म्हणणारी "मादक क्लब डान्सर" असो किंवा "नीला आसमा सो गया "म्हणत विरह वेदनेत दग्ध झालेली प्रेमिका असो,"इंकीलाब झिंदाबाद "म्हणत एकाधिकारशाहीविरुद्ध बंड पुकारणारी खूबसुरत मधील नायिका मंजू असो किंवा "आज कल पांव जमीपर नही पडते मेरे "म्हणत प्रेमातील बेहोषीची अनुभूती देणारी धुंद प्रेमिका आरती असो,रुपेरी पडद्यावरील तिचा वावर ,तिचा अभिनय नेहमीच नेत्र सुखद ठरला आहे..
प्रत्येक कलाकार आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील दु:ख बाजूला सारून रसिकांचे मनोरंजन करत असतो..तामिळ अभिनेता "जेमिनी गणेशन" आणि तेलगू अभिनेत्री "पुष्पावल्ली" यांची ही कन्या ...त्यामुळे "अभिनय" तिच्या रक्तातच होता...रुपेरी पडदा गाजविणे हे तिचे स्वप्न कधीच नव्हते.तिला आकाशात उंच भरारी घ्यायची होती हवाई सुंदरी बनून....!!!आर्थिक जबाबदारी म्हणून ही पितृ प्रेमाला बाल्यातच वंचित झालेली कन्या चंदेरी दुनियेत आली...अवघे तेरा वर्षांचे वय...साथीला कुणी नसताना मुंबईसारख्या मोहनगरीत तिने पाऊल ठेवले...तेव्हा मुंबई तिला भयानक जंगलाप्रमाणे वाटे...हिंदी भाषेचा गंध नव्हता...तिच्या हळवेपणाचा फायदा घेणारे इथे अनेक होते..पण तरीही प्राप्त परिस्थितीशी झगडत तिने मार्गक्रमण केले...इथले कडूगोड अनुभव घेत ती चालत राहिली...कुण्या एकाच्या शिस्त बद्ध दिनचर्येने,अभिनय साकारताना त्यात झोकून देण्याच्या वृत्तीने तिला बदलून टाकले...तिची कांती उजळली...तिचा बांधा योगाने सुडौल झाला,तिच्या चोखंदळ भूमिकातील अभिनयाने तिने रसिकांना जिंकून घेतले...आजही ती हवीशी वाटते,तिचा स्वर ऐकण्यास कान अतुरलेले असतात,तिने "साठी" ओलांडली आहे,ती पडद्यावर "नानी" झालीये पण रसिकमनात मात्र आजही ती "उमराव जान" आहे,"वसंत सेना" आहे...सिलसिला मधील "चांदनी" हीच तिची ओळख आहे...काळाची पाऊलखुणा तिच्या यौवनावर उमटल्याच नाहीत...उमटणार नाहीत...!!!ती रसिकांच्या जीवनातील भाग्यरेखा आहे...!!!तिच्या कारकीर्दीकडे पाहिले की अचंबित व्हायला होते...आणि तिचेच गीत आठवते...
छोटी सी कहानी से, बारिशों की पानी से
सारी वादी भर गयी
न जाने क्यों, दिल भर गया
न जाने क्यों आँख भर गयी
स्वप्रयत्नाने,स्वकष्टाने आपले कर्तृत्व उजळून टाकणाऱ्या या गुणी तारकेला देव निरामय आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो.......!!!!!रेखाजी ,तुम जियो हजारो साल......सालके दिन हो पचास हजार........!!!!!!!!!!!!!
मानसी पटवर्धन.
No comments:
Post a Comment