Wednesday, October 10, 2018

विद्यापीठ कोरी पाटी

नॉस्टॅल्जिया ...
अलीकडेच सागर तळाशीकर दिग्दर्शित 'कोरी पाटी ' ही डॉक्युमेंटरी फिल्म बघण्याची संधी मिळाली . आता तुम्ही म्हणाल की यात नवं ते काय ,कारण तुम्ही (म्हणजे मी !) आहातच कट्टर चित्रपटप्रेमी ! ते खरंही आहे म्हणा,  पण ही फिल्म होती कोल्हापूरच्या 'भक्ती सेवा ' विद्यापीठ या शाळेबद्दल ,जिथे मी तिसरीपर्यंत शिकले .माझे आईपप्पा  तेव्हा होते गोव्यात ,पोर्तुगीजांच्या राज्यात ,तेव्हा आपल्या लेकीच्या 'उच्च' शिक्षणाची आबाळ  होऊ नये म्हणून त्यांनी मला माझ्या आजोळी कोल्हापूरच्या आज्जी -आजोबाच्या ताब्यात दिलं होतं आणि पेंढारकर कुटुंबाच्या परंपरेनुसार  मला विद्यापीठात दाखल करण्यात आलं होतं.कोल्हापूर सारख्या छत्रपती असलेल्या संस्थानिक वातावरणात 'भक्ती-सेवा ' विद्यापीठ अशा एखाद्या शाळेची  स्थापना होणं  हीच मुळात एक आश्चर्याची गोष्ट होती . त्यामागे शाहूमहाराजांसारख्या परिवर्तनवादी  दृष्ट्या राजाचा रयतेच्या कल्याणाचा विचार होता ,त्याला तोफखाने यांच्या शिक्षण आणि तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टीची जोड मिळाली आणि  त्यांनी पाहिलेले ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्यासाठी  दीक्षित गुरुजींची निवड करण्यात आली .  दीक्षित गुरुजी स्वतः एका मोठ्या अध्यात्मिक  कुळात जन्मलेले होते,खरं  तर त्यांच्या आयुष्याचा ,करिअरचा मार्ग ठरलेला होता पण शाहू महाराजांचा प्रस्ताव ऐकून गुरुजींनी होकार दिला .आणि विद्यापीठातल्या ज्ञान -तंत्रज्ञान विषयक औपचारिक   शिक्षणाला जोड मिळाली ती अध्यात्माची ,भक्ती आणि सेवेतच ईश्वर आहे असं सांगणाऱ्या  विनोबाजींच्या सर्वोदयी विचाराची  ! असं जबरदस्त अधिष्ठान लाभलेली ही शाळा केवळ शाळा राहिली  नाही . सुबुद्ध ,सक्षम विध्यार्थ्यांना खऱ्याखुऱ्या अर्थी घडवणारं ते एक  संस्कार विद्यापीठ बनलं .
आज्जीच्या साखरमायेत खूप मस्त चाललं होतं माझं आणि आनंदाची गोष्ट ही होती की माझी आज्जी राहत होती तपोवनात.तपोवन म्हणजे कळंब्याच्या वाटेवर  भल्यामोठ्या माळावर थाटलेला दीक्षित गुरुजींचा सांदीपनी  आश्रम होता.म्हणायला ते वसतीगृह ,पण इथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची कामे स्वतः करावी लागत , शेतीत राबावं लगे ,गायीगुरांचा सांभाळ   ही सगळी कामे  घालून दिलेल्या शिस्तीनुसार करावी लागत म्हणून श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाचे संस्कार त्यांच्यावर आपोआपच होत जात . कल्पना करा, सगळंच 'बक्कळ 'असणाऱ्या त्यावेळच्या खानदानी मराठा घरातल्या उदयसिंगराव गायकवाड ,लाला -बाबासाहेब यादव अशा मुलांची इथे काय परिस्थिती होत असेल ? अगदी साधा पांढरा वेष आणि डोईला पांढरा फेटा  बांधून  वावरणाऱ्या दीक्षित गुरुजींची शिस्तीची मर्यादा आणि वक्तशीरपणाचे नियम सर्वानाच पाळावे लागायचे. एकीकडे दीक्षित गुरुजी आणि दुसरीकडे विद्यापीठाच्या जडणघडणीत ज्यांचा फार मोठा  हात होता ते माझे आजोबा अशा पकडीत ती सापडली होती ,सरळ घरलाच रिपोर्ट गेला असता, जमवून घेणं भागच होतं.  अहिंसा ,सत्य ,अपरिग्रह ,श्रम ,संयम हे संस्कार त्यांना इथे मिळत गेले .आई, मावशी तपोवनच्या छकड्यातून शाळेत जायला निघाल्या की ही सगळी टगी मुलं  सायकलवरून सोबत करत . बदल्यात त्यांच्या वाड्यातून  आलेला  'तिखट' जेवणाचा डबा  लपवून आणण्याची करामत आई,मावशीला करावी लागे ,रोज रोज त्या भाकऱ्या आणि उकडलेल्या भाज्या कोण खाणार ? ते बहीण-भावांचं नातं त्यांनी आयुष्यभर जपलं. तपोवनाने आम्हाला असे अनेक मामा - या फिल्ममधले मेजर जनरल  पित्रे उर्फ शशीमामा ,तसेच घोलकर मामा ,खाडे मामा ,कर्नाटकी मामा ...   दिले .शशीमामांनी आपली सैन्यातली करिअर तर उत्तम गाजवलीच  पण निवृत्त झाल्यावर शत्रूने पेरलेल्या माईन्स  युद्ध  संपल्यानंतर शोधून निकामी करण्याचे जीवावर बेतू शकणारे  कार्य त्याने सुरु केले ,युध्दाचा इतिहास ,त्यातले राजकारण आणि रणनीती  यावर विपुल लेखन ,व्याख्यानांचे दौरे किती केले त्याला तर गणतीच नाही . देश आणि समाजासाठी आपली सगळी हयात वेचणारे असे कितीतरी विद्यार्थी या शाळेने दिले .
माझ्या लहानपणी तपोवनातल्या निवासी  विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती तरी आजीच्या पलीकडच्या घरातल्या गबाले आणि कुलकर्णी मास्तरांच्या कुटुंबात  मुळात खूप घरोबा होता , त्या घरात इतकी मुलं  होती की या घरात मी एकटी मुलगी असूनही मला सवंगड्यांची कमी कधी भासली नाही. पण संध्याकाळी सातचा टोल  वाजला की  दिवसभर चिंचेच्या झाडांवर लटकलेली सगळी पोरं हातपाय धुवून प्रार्थनेसाठी  परमधाम आश्रमाकडे पळ  काढत .रात्री तिथून परत येताना मला अंधारात भीती वाटे म्हणून  गबाल्यांची प्रसादिनी आणि प्रसाद किंवा प्रदीप मला घरापर्यंत सोबत करत असत . हेच प्रदीप गबाले पुढे विद्यापीठचे  प्रिन्सिपल म्हणून कार्यरत झाले .
रंकाळ्यापर्यंत दृष्टी धावत नेणाऱ्या  माळावर चमचमणाऱ्या सोनेरी किरणांनी भरलेलं, सुंदर ,सुरक्षित  जग होतं  ते आमचं . पण  तिसरीत आल्यानंतर मी कितीही हातपाय आपटून भोकाड पसरलं तरी  आईपपा मला त्यांच्या सोबत मुंबईला घेऊन आले  आणि कोल्हापूर आणि विद्यापीठ दुरावलं ते दुरावलंच  . ते दुरावलेपण मला अजूनही आतून ठुसठुस करत राहतं ,म्हणून कधीही कोल्हापूरला गेले की हळूहळू पावलं उचलत विद्यापीठाच्या  व्हरांड्यातून मारलेली फेरी आणि तपोवनाला भेट हे ठरलेलं ! दीक्षित गुरुजीना भेटल्याशिवाय कोल्हापूरहून परतणं  होत नसे .आणि तेही मला कधी विसरले नाहीत . संध्याकाळी त्यांची परत यायची  वेळ झाली   की बाकीचे  सगळे पतली  गलीसे गायब होत पण मी  त्यांची वाट बघत असे. दूरवरून सायकलवरून  पेडल मारत येणाऱ्या गुरुजींना बघून जीव भांड्यात पडे आणि तेही लांबून बघत ,ओळखत आणि पायउतार होऊन दोन शब्द बोलून आईची चौकशी केल्याशिवाय पुढे जात नसत . पुढे   बससेवा सुरु झाली पण गुरुजींनी जसा आपला साध्या  माणसांचा  वेष आणि राहणी कधी सोडली नाही तशीच आपली सायकल  सवारीही कधी सोडली नाही

मला आत्ता  हे लिहितानाच त्या आठवणींनी इतकं भरून येतंय ,मग त्या वास्तूत प्रत्यक्ष फिरताना काय होत असेल ? पण एक गम्मत अशी होती की त्याकाळी आम्हाला  पंचगंगेवर पोहायला घेऊन जाणाऱ्या बाबुदादा बकरे यांनी  निवृत्त झाल्यावर विद्यापीठाच्या आवारातच एक दुकान उघडलं होतं .म्हणजे एकीकडे गावाबाहेर पार कळंब्याच्या  वाटेवर  असणाऱ्या तपोवनात राहणारे आम्ही , गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या विद्यापीठातल्या मुलामुलींना  गोळा करून  दुसऱ्या टोकाला पंचगंगेच्या घाटावर पोहायला घेऊन जाणं  काय सोपी गोष्ट होती महाराजा ! आणि मुलामुलींनी एकत्र पोहणं म्हणजे, क्रांतीच होती ती  ! बाबुदादा  ते काम मोठ्या उत्साहाने करत आणि सगळ्यांना हातीपायी धड घरी पोचवून  देत. पुढे अगदी माझं लग्न झाल्यानंतरही बाबुदादांच्या दुकानाला भेट दिली की कोल्हापूरचे चणे -फुटाणे ,बरणीतल्या लिमलेटच्या गोळ्या असे येशुताईंचे  लाड होत. ते आठवणीत हरवलेले बाबुदादा मला या फिल्ममध्ये परत  भेटले. विद्यापीठातला प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांशी असा प्रत्यक्ष नातं जोडणारा होता.

'कोरी  पाटी ' बघताना या सगळ्या आठवणी मनात जाग्या होत गेल्या . विद्यापीठ आणि तपोवनचे समग्र सार यात फार चांगल्या प्रकारे दर्शवण्यात दिग्दर्शक सागर तळाशीकर  यशस्वी झाले आहेत . कोल्हापूरच्या सामाजिक इतिहासाचा एक दस्तावेजच आहे हा ! आणि डॉक्युमेंटरीचा  फॉर्म असला  तरी सुरुवातीच्या लहान मुलाच्या शॉटपासूनच  ही फिल्म   कथा सांगत  कलात्मक फीचर फिल्मच्या अंगाने उलगडत   जाते. त्यातला तो चॉकलेटी रंगाच्या खडबडीत भिंतीवरून स्पर्श करत पुढेपुढे चालेल्या हातांच्या बोटांचा  शॉट... परफेक्ट , त्यानं तर मला बेचैन करून एवढी मोठी पोस्ट लिहायला उद्युक्त केलं .अशा अनेक गोष्टी या फिल्ममध्ये आहेत ,त्याबद्दल सविस्तर लिहिता येईल.
.
आज तपोवन अस्तित्वात नाही पण विद्यापीठ मात्र प्रगतीची नवनवी शिखरं  काबीज करत वाटचाल करत आहे,आधुनिक काळाशी  जोडून घेत पुढेही करत राहील.शंभर वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या या प्रयोगाची सगळ्या पातळ्यांवरून दखल घेतली गेली पाहिजे . ही फिल्म अनेक शाळा -संस्थांमधून  दाखवली गेली पाहिजे ,हे कार्यच तितकं दिशादर्शक आहे .Thanks a lot Sagar Talashikar and all your alumnus team,really well done ! And thanks Prabhat Chitra Mandal and Santosh Gajanan Pathare for bringing such a good film for the Mumbai audience !

No comments:

Post a Comment