Thursday, October 25, 2018

पाकिजा । विवेक पुणतांबेकर

*पाकिझा ची कहाणी:*                                                

भारतीय सिनेविश्वात काही माईलस्टोन सिनेमे तयार झाले. काही खूपच रखडले.रखडलेले बहुतेक सिनेमे अपयशी ठरले याला अपवाद एकच तो म्हणजे पाकिझा. या पाकिझा च्या निर्मितीची ही कहाणी....

सय्यद हैदर उर्फ कमाल अमरोही यांचा मुंबईच्या सिनेविश्वात पटकथाकार म्हणून प्रवेश झाला तो सोहराब मोदींच्या १९३८ च्या जेलर सिनेमाने. १९४९ च्या महल पासून ते दिग्दर्शक बनले. १९५३ साली दायरा सिनेमाची निर्मिती/दिग्दर्शन/पटकथा लिहीतानाच मीनाकुमारी बरोबर विवाहबध्द झाले. कलकत्ता येथे गोहरजान नावाची गणिका होती. ती नेहमीच पैश्याच्या राशीत उभी राहून नाच करायची. व्हॉईसरॉय नंतर बग्गी वापराणारी गोहरजानच होती. व्हॉईसरॉय ने पाहिले आणि तिला दंड केला. तिने दंड भरला आणि परत बग्गी वापरायला सुरुवात केली. दुप्पट दंड झाला तो भरला. हा प्रकार आठ दिवस चालला. शेवटी व्हॉईसरॉय ने कंटाळून तिचा दंड माफ केला. गोहरजान आणि इतर गणिकांच्या ऐकलेल्या कथेवर पाकिझा ची पटकथा कमाल अमरोहींनी लिहीली.
मीनाकुमारी ला प्रमुख भुमिकेसाठी निवडले. आधी नायकाची भुमिका अमरोही स्वतः करणार होते.पण त्यांनी विचार बदलला आणि अशोककुमार ना निवडले. यात मीनाकुमारी ची आई आणि मुलगी अशी दुहेरी भुमिका होती. दुसर्‍या नायकाच्या रोल साठी धर्मेंद्र ला निवडले. संगीतकार म्हणून गुलाम महंमद ना घेतले. आधी रॉयल्टी वरुन वाद झाला पण नंतर अमरोही रॉयल्टी द्यायला तयार झाले. बाकी भुमिकांसाठी सप्रू,मेहताब ना घेऊन दादर मुंबईतील रंगमहाल स्टुडियोत १ ऑगष्ट १९५७ ला मीनाकुमारी च्या वाढदिवसाच्या दिवशी पाकिझा चा मुहूर्त झाला. त्यावेळी हजर असलेल्या चार्ली नावाच्या ज्योतिषाने भविष्य सांगितले की हा सिनेमा पुर्ण व्हायला अनेक अडचणी येतील. सिनेमाशी संबंधीत काही जण सोडून जातील. काही जण मरून जातील. काही काळ शुटिंग बंद पडेल. इतके होऊनही जर हा सिनेमा पुर्ण झाला तर मात्र सिनेमाच्या इतिहासात अमर होईल एव्हढे यश मिळेल.

कमाल अमरोही परफेक्शनीस्ट होते त्यामुळे मनाप्रमाणे सेट सकट सगळे जुळून येईपर्यंत शूटींग करत नसत. मुहर्ताला अरूण अहुजा (गोविंदाचे वडील), बालन आणि अमरोही यांच्यावर कव्वाली शूट केली. लांबी वाढली म्हणून कापावी लागली. मग इन्ही लोगोने गाणे ब्लँक अँड व्हाईट मधे शूट झाले. त्याच वेळी मुगले आझम रिलीज झाला. प्रिमीयर शो पाहून आल्यावर मीनाकुमारी ने आग्रह धरला की सिनेमा रंगीत करायचा. त्यामुळे आधीचे शूटींग रद्द केले आणि कोडँक्रोम रंगीत फिल्म मागवून शूटींग परत सुरू झाले. कागज के फूल पाहिल्यावर कमाल अमरोही नीं निर्णय घेतला की सिनेमास्कोप फॉरमँट वापरायचे. यासाठी ट्वेंथीएथ सेंच्युरी फॉक्स ला रॉयल्टी दिली. त्यावेळी भारतातील अनेक थिएटर्स मध्ये सिनेमास्कोप दाखवायची सोय अजीबात नव्हती या साठी बॉश अँड लँब कंपनीला ३०० लेंन्सेसची ऑर्डर पण दिली. १९५९ साली शुटिंग गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडियोत सुरु झाले. कमाल अमरोही नां रंगसंगती चे उत्तम ज्ञान होते. कलावंतांसाठी लागणारा कपडा ते स्वतः बाजारात जाऊन खरेदी करत. सेटवर एकही खिळा बाहेर आलेला त्यांना अजीबात खपत नसे. सेट उभा राहिल्यावर भिंतीना मखमली कापड ताणून लावत. मग त्या भिंती रंगवत. यामुळे सेट खरा वाटायचा. फिल्मीस्थान मधे लावलेला मीनाबाजाराचा सेट पहायला गीतकार असद भुपाली आले आणि सेट पाहून थक्क झाले. क्षणभर त्यांना वाटले आपण खरोखरीच मीनाबाजारात आलो.

थोडेफार शूटींग झाले .तेव्हढ्यात मीनाकुमारी धर्मेंद्र यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. संतप्त अमरोहींनी धर्मेंद्रला काढून टाकले. धर्मेंद्र वर शूट झालेला एक शॉट सिनेमात आहे. सेहरा बांधून घोड्यावर बसलेला राजकुमार नाही तो धर्मेंद्र आहे. धर्मेंद्र मीनाकुमारी प्रेमप्रकरण संपले आणि पाकिझा चे शूटींग परत सुरू झाले. अनेकांनी लहरी राजकुमार ला घेऊ नका असा सल्ला अमरोहींना दिला होता. पण अमरोही खमके होते. राजकुमार चे नखरे अजिबात चालवून घेतले नाहीत. एका सीन मधे राजकुमार हिरवा कोट आपल्या घरून घेऊन आला. दुसरे दिवशी लाल कोट घालून आला. माझ्याकडे हिरवा कोटच नाही असा बहाणा करायला लागला. अमरोहींनी नोकराला पाठवून राजकुमारच्या घरून हिरवा कोट मागवला. चलो दिलदार चलो गाणे गोवा येथे शूट करायचे होते. राजकुमारला हे लोकेशन पसंत नव्हते. तो आलाच नाही. अमरोहींनी डमी वापरून गाणे शूट केले. राजकुमार पहिल्यांदा साहिबजानला (मीनाकुमारी ला) घेऊन येतो. बाजारात ठेकेदार तिला ओळखतो आणि मागे लागतो. राजकुमार आणि ठेकेदाराची मारामारी होते असा सिन महाबळेश्वरच्या बाजारात शूट व्हायचा होता. राजकुमार ठेकेदाराकडून मार खायला तयार नव्हता.  अमरोहींनी त्याचे न ऐकता १५ रिटेक्स घेतले आणि राजकुमारला चांगलाच धडा शिकवला. या नंतर राजकुमारने परत कधीच त्रास दिला नाही. तसाच त्रास मेहताब नी दिला. एका सीन मधली हिरवी ओढणी त्यांना पसंत नव्हती. मुद्दाम रिटेक्स करत बसल्या. अमरोही पण हट्टाला पेटले. रॉ स्टॉक संपेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत शूटींग सुरु ठेवले. शेवटी मेहताब नी टेक दिला. दुसरे दिवशी त्यांना काढून नादिरा ला घेतले. तिचेही नखरे वाढायला लागल्यावर तिला काढून वीणा ला घेतले. तब्येत ठिक नसताना पण सगळी गाणी गुलाम महंमदनी रंगमहाल स्टुडियोत रेकॉर्ड केली. अर्धा सिनेमा तयार झाला पण पिंजरे के पंछी च्या सेटवर सुरू झालेल्या गुलझार बरोबरच्या प्रेमसंबंधनामुळे मीनाकुमारी घर सोडून गेली आणि पाकिझा बंद पडला.

६० च्या दशकात मीनाकुमारी चे करियर उतरायला लागले. अतिरिक्त मद्यपानामुळे झालेल्या खुणा शरीरावर दिसायला लागल्या. निर्माते तिला टाळायला लागले. अमरोहींबरोबर तिने संबंध  जुळवून घेतले. नर्गिस, सुनील दत्त, अचला सचदेव यांच्या मध्यस्थी मुळे मीनाकुमारी परत पाकिझा चे शूटींग करायला तयार झाली. जवळजवळ एक दशकाचे अंतर पडले होते. दरम्यानच्या  काळात गुलाम महमंद, कँमेरामन जोसेफ विर्शिंग यांचे निधन झाले होते. आता नवीन संगीतकार आणि कँमेरामन यांचा शोध सुरु झाला. शंकर जयकिशन सकट अनेक आघाडीचे संगीतकार  संगीत द्यायला उत्सुक होते. पण आधीची गाणी बाद करा ही त्यांची अट अमरोहींना पसंत नव्हती. शेवटी नौशादना बोलावले. त्यांचे संगीत पसंतीला आले. सहा आणखी गाणी रेकॉर्ड केली. पण लांबी वाढल्याने सिनेमात घेता आली नाहीत. पार्श्वसंगीत आणि टायटल म्युझिक नौशादनी तयार केले. के.के.महाजन या नामवंत कँमेरामन ना बोलावले. त्यांनी एक शूटींग शेड्युल केले. रशेस पाहिल्यावर सेट तिरका दिसत होता.अमरोहींनी स्टुडियोत जाऊन मुद्दाम चेक केले सेट बरोबर होता. कँमेरा तिरका लागला होता. यानंतर कँमेरामन व्ही.के.मुर्ती ना बोलावले. चलो दिलदार चलो , मौसम है आशुकाना ही दोन गाणी आणि हत्ती हल्ला करतात हा प्रसंग हे सगळे व्ही. के. मुर्ती नी शूट केले.पण फार काळ ते अमरोहींबरोबर रमले नाहीत. राजश्री पिक्चर्स चे कँमेरामन अरविंद लाड यांच्याबरोबर अमरोहींचे सूर जुळले आणि उरलेले शूटींग त्यांनी पुर्ण केले.

रात्रीच्या वेळी चुकुन राजकुमार बायकांच्या डब्यात शिरतो. तिथे त्याला मीनाकुमारीचे पाय दिसतात हा प्रसंग विरार च्या रेल्वे यार्डात शूट व्हायचा होता पहाटे चार वाजता. ऐनवेळी लक्षात आले गाडीच्या इंजिनाचे तोंड उलट्या दिशेला लागले होते. ते रिव्हर्स करायची विरार यार्डात सोय नव्हती. परत दुसरे दिवशी शूटिंग करावे लागले. साहेबजान निघून गेल्यावर रागात राजकुमार रागाने जंगल जाळतो असा सीन शूट करायचा होता. या साठी सुरत जवळ वाडी येथे एक जंगल अमरोहींनी विकत घेतले. शहा या फायनान्सर ने पाकिझा ला पैसा पुरवला होता. शूटींग च्या वेळी शॉट सुरु व्हायच्या आधी एका स्पॉटबॉय च्या चुकीने आग लागून जंगल जळून गेले. शहांनां ही गोष्ट समजली. परत पैसे द्यायची तयारी दाखवली. पण कमाल अमरोहींनी तंबू जाळतो असा सीन शूट केला. शहांना लोकांनी वेड्यात काढले. शहा म्हणाले जंगल जळले यात अमरोहींची चूक नव्हती. मी पैसे अमरोहींकडे पाहून दिले आहेत. इतर निर्माते पैसे हातात पडले की बंगला घेतात गाडी घेतात. पण हा माणूस तसा नाही. सिनेमासाठी दिलेला पैसा सिनेमातच वापरतो. अतिशय साधा आहे. मला पैसे दिल्याचा अजिबात पश्याताप होत नाही.अमरोही स्वतः लोकेशन पहायला जात. चलते चलते गाण्यात शेवटी पुलावर थांबलेल्या गाडीची शिट्टी वाजते हा सीन घेण्यासाठी वापी जवळच्या भिलाड येथे दमणगंगेच्या पुलावर एक खोटा सिग्नल उभा केला.पहिल्या दिवशी गाडी थांबलीच नाही. परत दुसरे दिवशी सीन शूट केला.

लहानपणी मोठ्या भावाने मारल्यामुळे अमरोही घरातून पळून गेले. जाताना अम्मीला सांगून गेले इतके चांदीचे रुपये मिळवून आणीन की तुझा दुपट्टा भरून फाटेल. सिनेविश्वात यशस्वी झाल्यावर चांदीच्या रूपयांनी त्यांनी अम्मीचा दुपट्टा भरला आणि तो फाटला. त्यातलीच नाणी ठाडे रहियो गाण्यात शेवटी वापरली आहेत. परत शूटींग सुरु झाले पण मीनाकुमारी ची तब्येत बिधडत चालली. डान्सेस साठी पद्मा खन्ना ला वापरली आणि क्लोज-अप मीनाकुमारी चा वापरला. हुबेहुब तिच्या सारखी दिसणारी बिल्किस मोसम है आशुकाना गाण्यात वापरली. (याच बिल्किस बरोबर मीनाकुमारी गेल्यावर अमरोहींनी लग्न केले. पण काही दिवसातच त्यांना कफल्लक करुन ती निघून गेली) डबिंग साठी साधना खोटे या मिमिक्री आर्टीस्ट चा आवाज वापरला. आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे गाण्याचा सेट एव्हढा भव्य होता की लाईटस् विझवायला वीस मिनिटे लागत.

शेवटी झुंबराच्या फुटक्या तुकड्यांवर मीनाकुमारी नाचते आणि तिचे पाय रक्तबंबाळ होतात हा परिणाम साधण्यासाठी सफेद चादरीखाली लाल स्पंजाचे तुकडे वापरून हे गाणे शूट केले गेले. सिनेमा पुर्ण झाल्यावर आधीची सुरवात बदलून फक्त जळती मेणबत्ती पार्श्वभूमीवर दाखवून नाचणारी मीनाकुमारी दाखवून अप्रतिम परिणाम अमरोहींनी साघला. एडिटिंग मधे कापलेल्या सहा गाण्यांची खास रेकॉर्ड एच.एम.व्ही. ने काढली होती त्यात शोभा गुर्टू यांनी गायलेली गझल होती. अमेरिकेत रिलीज केलेल्या लॉंग प्लेईंग रेकॉर्ड चे कव्हर डिझाईन मोहन वाघ यांचे होते.
मुंबईच्या मराठा मंदिर सिनेमात पाकिझा चा भव्य प्रिमीयर झाला. नटवलेल्या बग्गीतून दिमाखात सिनेमाची रिळे आणली गेली. प्रिमीयर शो ला अमरोहींबरोबर आलेली मीनाकुमारी पहाताना प्रेक्षक हळहळले. यानंतर काही दिवसातच मीनाकुमारी ने जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनानंतर हा सिनेमा भारतभर तूफान यशस्वी झाला. सिनेमाच्या शेवटी साहेबजान ची डोली निघते हा प्रसंग पाहिल्यावर देशभरातील अनेक गणिकांची पत्रे अमरोहींना आली. एकीने लिहिले होते आमचे लग्न हे एक स्वप्न असते ते तुम्ही साकार केलत याबद्दल आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. पाकिझा निर्माण केल्याचे सार्थक झाले असे अमरोहींनी आपल्या आठवणीत सांगितले होते.

शब्दांकन:  विवेक पुणतांबेकर.
सौजन्य : चंद्रशेखर गद्रे

No comments:

Post a Comment