*आशा भोसलेंवर सुलोचनाबाईनी लिहिलेला लेख*
माई मंगेशकरांनी माझ्यावर त्यांच्या मुलींप्रमाणेच माया करणे चालू केल्याने लतादीदींसोबत असलेली मैत्री संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या मैत्रीमध्ये रूपांतरित झाली. मला गुबगुबीत मुली विशेष आवडत असल्याने मंगेशकर भावंडांमधील आशाबाईंनी माझे विशेष लक्ष वेधून घेतले होते. आशाबाईंना मी एकतर घरकामाला जुंपून घेतलेलं पाहिले आहे किंवा अंगणामध्ये बेभान होऊन खेळताना ! आशाबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही खेळ असो त्या लहानग्या हृदयनाथांना कडेवर घेऊन खेळायच्या. अगदी लंगडी सुद्धा. लहानग्या बाळासाहेबांना न पाडता लंगडी खेळण्याचे आशाबाईंचे कसब मला अचंबित करत असे.
जेव्हा मी माई मंगेशकरांसोबत गप्पा मारायची तेव्हा त्यांची गाडी अपरिहार्यपणे आशाबाईंवर घसरायची. कारण असायचे खेळाच्या नादात रियाझ व गाण्याकडे आशाबाईंचे होणारे दुर्लक्ष व स्वतःच्या वेणी फेणी/ आंघोळीकडे होणारे दुर्लक्ष किंवा उशीर. अशावेळी आशाबाईंना खेळातून ओढून काढून घरात आणण्याचे अवघड काम माझ्यावर येत असे. हे काम दमछाक करणारे होते. पण एकदा आशाबाई हातात सापडल्या की मात्र आज्ञाधारक मुलीप्रमाणे त्या माझ्याकडून आंघोळ/वेणी फणी सगळे करून घ्यायच्या.
प्रफुल्ल चित्र (मास्टर विनायक यांची ) संस्था कोल्हापुरातून मुंबई मध्ये स्थानांतरित झाली. मंगेशकर कुटुंब पण त्यामुळे मुंबईला शिफ्ट झाले. मी मात्र कोल्हापुरातच राहिले. व जयप्रभा स्टुडियोमध्ये सामील झाले. पण कालांतराने भालजींचा जयप्रभा स्टुडियो गांधीहत्येमुळे जाळला गेला व भालजींच्या परवानगीने मी कोल्हापूरवरून पुण्याला शिफ्ट झाले. तिथेच १९५१ साली माझा संबंध परत एकदा आशाबाईंसोबत आला. निमित्त होते “बाळा जो जो रे' हा चित्रपट व या चित्रपटामधील माझ्यावर चित्रित झालेले 'बाळा जो जो रे' हे अंगाई गीत; जे आशाबाईंनी गायले होते. बहुदा त्याच साली भालजींच्या 'शिवा रामोशी' या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासाठी शांता शेळके व ती गाणी गाण्यासाठी आशा ताई कोल्हापूरला आल्या होत्या. जयप्रभा स्टुडियोमध्ये प्रथमच मी आशा भोसले या १८ वर्षांच्या धीर गंभीर गृहिणीला पाहत होते. माझ्या आठवणीतील १० वर्षांच्या अवखळ, मस्तीखोर आशा मंगेशकरच्या अगदी उलट हे व्यक्तिमत्त्व होते. आशा बाई त्यावेळी कधी कधी नऊवारी साडी देखील नेसत असत. माई मंगेशकर यांच्या सारख्या इंदौरी साड्या व मानेवर केसांचा अंबाडा घालणाऱ्या आशा बाई म्हणजे दुसर्या माईच भासायच्या.
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक बनत होता. त्यामुळे आता माझे देखील मुंबईमध्ये येणे जाणे चालू झाले. त्यावेळी ज्येष्ठ कलाकार ललिता पवार यांनी मी मुंबई मध्ये घर घ्यावे असा लकडा माझ्या मागे लावला होता. त्यांच्या मते हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कायमचे बस्तान बसविण्यासाठी मुंबईमध्ये घर आवश्यक होते. पण मला ते शक्य नव्हते. कारण त्याकाळी मराठी चित्रपटांमध्ये काम, करण्याचा मला मिळणारा मोबदला अत्यल्प होता व कर्ज काढून घर घेण्यास माझ्या आईचा सख्तविरोध होता; त्यामुळे दोन वर्षे माझा मुंबईमधील मुक्काम हा हॉटेलमध्ये असायचा (व शूटिंग
संपले की कोल्हापूरमध्ये ).
एकदा बोलताबोलता हा घराचा विषय आशा भोसले यांच्याकडे निघाला. त्यावेळी आशाबाई माहीम कोकण नगर इथे राहत असत. त्यांच्याकडे दुसऱ्या अपत्याची चाहूल लागली होती. सोबत त्यांचा गायन क्षेत्रामध्ये देखील चांगला जम बसत होता. त्यामुळे आशाताई मोठ्या घरामध्ये जाऊ इच्छित होत्या. त्यांनी माझ्या घराची अडचण समजावून घेतली व माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला ज्या किंमतीमध्ये त्यांनी माहीमचे घर घेतले होते त्याच किंमतीमध्ये त्या मला घर द्यायला तयार होत्या; ५० टक्के रक्कम लगेच तर उरलेली ५० टक्के रक्कम माझ्या सोयीनुसार द्यायचे ठरले. त्याकाळी असलेली घराची ६००० ते ७००० रक्कम देखील माझ्यासाठी खूप मोठी होती. पण आशाबाई मुळेच मुंबईमधील माझ्या पहिल्या घराचे स्वप्न मात्र पूर्ण झाले. “नवल वर्तले ग' हे आशाबाईंच्या आवाजात.
भाऊबीज या चित्रपटामध्ये माझ्यावर ४-५ लावण्या चित्रित झाल्या होत्या त्या सर्व आशा भोसले यांनीच गायल्या होत्या. या लावण्यांवर आज देखील अनेक मुलींचे पाय थिरकतात यातच सर्व काही आले. आर के बॅनरच्या 'अब तक दिल्ली दूर नहीं' या चित्रपटाची मी नायिका होते; यातील 'ये चमन असपना हमारा है' या गाण्याला देखील आशा भोसले यांचाच आवाज होता. 'रामपूर का लक्ष्मण' या चित्रपटामध्ये माझ्यावर व रणधीर कपूर वर एक भजन चित्रित झाले आहे त्यात देखील आशा भोसले यांचा आवाज मला लाभला होता.
आशा ताई यांना गाणे व स्वयंपाक दोन्हीमध्ये सारखाच रस आहे; विशेषतः मासे त्यांना खूप आवडतात. एकदा सिटी लाईटच्या मासळी बाजारात माझ्या नातीची, इरावतीची व आशा भोसले यांची भेट झाली. तेव्हा कोणते मासे घ्यावेत, कसे पाहून घ्यावेत इत्यादी तपशील देताना त्यांनी तिथेच त्या माशांची रेसिपी देखील माझ्या नातीला सांगितली. इतक्यावर थांबतील त्या आशा ताई कसल्या; त्यांनी ती रेसिपी इरावतीकडून परत वदवून घेतली. षण्मुखानंद मधील लता मंगेशकर पुरस्कार असो की स्वतःच्या घरातील पंचाहत्तरीचा हद्य कार्यक्रम; मला पाहिले की माझी गळाभेट घेणे, माझ्या पाया पडणे; माझ्या व त्यांच्यातील जिव्हाळ्याबद्दल मीडियाला आवर्जून सांगणे हे सर्व सोपस्कार कधीच चुकले नाही. आशा भोसले म्हणजे एक अथांग व्यक्तिमत्त्व आहे;
आशा ताई यांची ७०-७२ वर्षांची गान तपश्चर्या ही खडतर व अद्भुत आहे. त्यामुळेच त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंदले गेले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या महाराष्ट्र गीतामध्ये एक पंक्ती आहे; 'आकांक्षांपुढती गगन जिथे ठेंगणे'; कोल्हटकरांची क्षमा मागून मला मात्र म्हणावेसे वाटते की 'आशापुढती गगन ठेंगणे'; माझ्या मनातील त्या वर्षांच्या आशाबाईंना ८७ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अनेक उत्तम आशीर्वाद व आभाळभर माया!
No comments:
Post a Comment