प्रसन्न बुद्धीची किमया
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी तीन मुख्य तत्वे सांगितली आहेत.
1. जगताना झुंज देणे अपरिहार्य आहे. म्हणून हताश न होता झुंज देण्यास सतत सज्ज राहावे. संकल्प चांगले असून भागात नाही. ते प्रत्यक्ष उतरविण्यासाठी झुंजावेच लागते.
2. लोकसंग्रह करीत राहण्यामागे जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. किंबहुना लोकसंग्रह हे बुद्धिमान माणसाचे कर्तव्य आहे.
3. वरील दोन तत्वे साध्य होण्यासाठी बुद्धीची स्थिरता अत्यावश्यक आहे आणि बुद्धीच्या स्थिरतेसाठी मनाची प्रसन्नता अनिवार्य आहे.
प्रसन्न बुद्धीने झुंज दे, असे परस्परविरोधी वाक्य करणे ही श्रीकृष्णाची खासियत. यातील झुंज द्यावी, लोकसंग्रह करावा हे मनाला पटते.पण पण त्यासाठी आधी बुद्धी प्रसन्न करा, असे सांगितले. हे पटत नाही. झुंज व लोकसंग्रह साधला की त्यातून यश मिळते. आणि यश मिळाले की मन प्रसन्न होते. प्रसन्नता शेवटी आहे असे आपण मानतो, तर प्रसन्नता प्रथम असे श्रीकृष्ण सांगतात. यातील खरे काय?
श्रीकृष्णाचे म्हणणे खरे आहे असे हार्वर्ड विश्वविद्यालयातील संशोधन सांगते. अर्थात श्रीकृष्णाची तत्वे तपासण्यासाठी हे संशोधन झालेले नाही. ते झाले आहे आर्थिक मंदीसारख्या जगासमोरील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी. परंतु, त्या संशोधनातून काढलेले निष्कर्ष हे गीतेतील वर उल्लेख केलेल्या तीन तत्वांशी तंतोतंत जुळतात.
शॉन अॅकोर या तरुण संशोधकाने हा विषय हाती घेतला व त्याला साधी, सोपी पण अद्भूत सामर्थ्यशाली अशी तत्वे सापडली. अमेरिका हा प्रयोगनिष्ट देश आहे. तत्वे मांडून तेथे चालत नाही. ती प्रयोगाने सिद्ध करावी लागतात. त्यासाठी डेटा जमा करावा लागतो. शॉनने तसे केले. केवळ अमेरिकेतील नव्हे तर ४२ देशातील निरीक्षणे घेतली. हजारो लोकांची परीक्षा केली. २२५ शोधनिबंधांचा अभ्यास केला. शॉनला पुन्हा पुन्हा एकाच गोष्ट दिसून आली. समस्येवर मात करण्यासाठी मनाची प्रसन्नता ही पूर्वअट आहे.
समस्येसमोर आपण चिंताग्रस्त होतो. काळजीत पडतो. मनावर ताण येतो. या प्रतिक्रिया मनाची गुंतागुंत आणखी वाढवतात. याउलट मन प्रसन्न असले की समस्या सोडविण्याचा मार्ग लवकर दिसतो. स्थिर व प्रसन्न मनाला समस्येचे आकलन चटकन होते.
विज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर चिंता, काळजी वाढली की भयाला प्रतिसाद देणारे मेंदूतील क्षेत्र उद्दीपित होते. हे केंद्र उद्दीपित झाले की मेंदूतील सर्व उर्जा या केंद्राकडे वळते. शरीराची सुरक्षा जपणारे हे केंद्र समस्या सोडविण्यासाठी निरुपयोगी असते. समस्या सोडविण्यासाठी मेंदूतील ‘प्रिफ्रन्टल कोर्टेक्स’ हा भाग उद्दीपित होणे अत्यावश्यक असते.चिंता वाढली की हा भाग उद्दीपित होत नाही व माणूस गोंधळात पडतो. मात्र मन स्थिर व प्रसन्न असेल तर हाच भाग जास्त उद्दीपित होतो. डोपामाइन व सेरोटोनिन हे स्त्राव मेंदूत वाहू लागतात आणि समस्येतून मार्ग निघतो. मेंदूत हे स्त्राव वाहात असले की उत्पादनक्षमता, सर्जनशीलता व समाधान यामध्ये लक्षणीय वाढ कशी याची विस्तृत आकडेवारी शॉनच्या शोधनिबंधात मिळते.
मात्र बहुतेकांच्या मेंदूत हे स्त्राव चटकन वाहात नाहीत. बहुसंख्य माणसे काळजीत पडतात. निराश होण्याचे कारण नाही. यावर सहज सोपा उपाय शॉनने दाखवून दिला आहे. न्युरोप्लास्टिसिटी या क्षेत्रातील संशोधन असे दाखवून देते की नवीन गोष्ट शिकणे हे मेंदूला कोणत्याही वयात शक्य आहे. मेंदूतील केंद्रे एकमेकांशी व शरीराच्या पंचेन्द्रियांशी जोडलेली असतात. परस्परांशी असलेल्या मेंदूतील या जोडण्यांमध्ये परिवर्तन करणे शक्य असते. त्यासाठी एक लहानसा मानसिक व शारीरिक व्यायाम शॉनने सुचविला आहे.
रोज पाच गोष्टी करा, असे शॉन सांगतो.
1. कृतज्ञता वाटण्याजोग्या तीन घटना लिहून काढा.
2. मित्र वा सहकाऱ्यांना उत्साह वाटेल अशी एखादी कृती सकाळीच करा.
3. अधूनमधून फक्त दोन मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा.
4. दिवसातील एका महत्वपूर्ण घटनेवर डायरी लिहून चिंतन करा.
5. दहा मिनिटे व्यायाम करा.
मेंदूची कार्यपद्धती लक्षात घेऊन शॉनने हे उपाय सुचविले आहेत. आसपासच्या परिस्थितीची मेंदू सतत चाळणी करीत असतो. मात्र तो एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करू शकतो. सर्वसाधारणपणे नकारात्मक गोष्टीकडे मेंदूचे लक्ष आधी जाते. सावध राहण्यासाठी ते आवश्यक असते. मात्र यामुळे फक्त नकारात्मक गोष्टीच पाहण्याची सवय मेंदूला लागते. नकारात्मक गोष्टीच मनावर ठसतात, सकारात्मक नजरेतून निसटतात. त्यातून नकारात्मक भावना निर्माण होतात. ‘टेट्रीस इफेक्ट’ असे शॉन याला म्हणतो. याचे तपशीलवार विवेचन त्याने केले आहे. मात्र नकारात्मक भावनांप्रमाणे मेंदूला ‘पॉझिटिव्ह टेट्रीस इफेक्ट’ही तयार करता येतात. ती सवय लावण्यासाठी वरील व्यायाम प्रकार उपयोगी पडतात.
व्यक्तिमत्व विकासाच्या लोकप्रिय पुस्तकामधील विवेचानासारखे हे वाटेल. पण शॉन पुराव्यानिशी बोलतो. बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापकांना वरील प्रकार सलग २१ दिवस करण्यास त्याने सांगितले. कार्यक्षमता, अचूकता व समाधान या प्रत्येक आघाडीवर प्रयोग करणाऱ्यांमध्ये तीन आठवडयात मोठा फरक दिसून आला. आश्चर्य म्हणजे चार महिन्यांनंतरही या प्रयोगाचा सकारात्मक परिणाम अनुभवास येत होता. मेंदूला सकारात्मक काम करण्याची सवय लावता येते व अशी सवय लावली तर पुढील बरेच महिने तो उत्साहात काम करतो. अर्थात सकारात्मक भावना निर्माण होतील असे वातावरणही कंपनीत असावे लागते. गुगल, व्हर्जिन, अशा कंपन्यात असे वातावरण मुद्दाम निर्माण करतात व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवितात.
गीतेमध्ये श्रीकृष्ण पंचेन्द्रीयांना वळण लावून बुद्धी स्थिर करण्यास सांगतात. शॉनच्या व्यायाम प्रकारात तेच अभिप्रेत आहे. या पाच प्रकारांपैकी दुसऱ्याशी संपर्क ठेवण्याचा सवयीचा मनाच्या प्रसन्नतेशी सर्वात घनिष्ट संबंध असतो. असे शॉनला आढळले. कुटुंबाचे, मित्राचे, समाजाचे सहकार्य आणि शरीरस्वास्थ्य याचा थेट संबंध आहे. समाजात रममाण झालेला माणूस जास्त जगतो. याउलट एकटेपणाचा शरीरावर होणारा परिणाम हा उच्च रक्तदाबाइतका घटक असतो. याबाबत खूप संशोधन अन्य समज शास्त्रज्ञांनीही केले आहे. मात्र आपलेपणाचे सुख सर्वांनाच मिळते असे नाही. बहुतेक लोक याबाबत कमनशिबी असतात. यावर उपाय म्हणजे स्वत:हून लोकांच्या संपर्कात जाणे वा त्यांना मदत करणे. शॉनच्या पाहणीनुसार स्वत:हून घेतलेल्या अशा पुढाकारामुळे मेंदूची कार्यक्षमता खूप वाढते. पुढाकार घेणारे लोक व उदासीन राहणारे लोक यांच्या कार्यक्षमतेतील फरक शॉनने प्रयोगातून दाखवून दिला आहे. लोकांशी स्वत:ला जोडून घेण्याचे फायदे अनेक आहेत. लोकसंग्रहाचा आग्रह गीतेत का धरला आहे हे यावरून लक्षात येते.
लोकसंग्रह व प्रसन्नता साधली म्हणून सर्वकाही सोपे होत नाही. आयुष्यात अनेक विपरीत गोष्टी घडतच असतात. फसवणूक, गैरसमज, द्वेष,शत्रुत्व, हेवा, असूया, अशा अनेक भावनांशी माणसाला सामना करावा लागतो. यातून ताण येतो. ताण सहन झाला नाही की माणूस स्वत:ला शक्तीहीन मानू लागतो आणि मग वेगाने एकटा पडत जातो. ताणाच्या वाईट परिणामांवर आता भरपूर संशोधन झाले आहे. पण त्यामुळे आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी. असा शॉनचा सल्ला आहे. विपरीत परीस्थीतीशी झुंज द्या. असं तो सांगतो व हा सल्लाही पुन्हा प्रयोगातून सिद्ध करून दाखवतो. आर्थिक मांडीत बँका गटांगळ्या खात होत्या व सर्वत्र नैराश्येचे वातावरण होते. तेंव्हा ‘यूबीएस’मध्ये शॉनने प्रयोग केला. ताणाचे वाईट परिणाम दाखविणारी चित्रफीत एका गटाला वारंवार दाखविली तर ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिल्यास मेंदू व शरीराला नवी शक्ती कशी मिळते हे सांगणारी चित्रफीत दुसऱ्या गटाला दाखविली. काही दिवसांनंतर दोन्ही गटांची तपासणी केली असता ताणाकडे आव्हानं म्हणून पाहणाऱ्यांची मानसिक व शारीरिक उर्जा वाढलेली आढळली. आरोग्याच्या कुरबुरी तर जवळपास नाहीशा झाल्या. कामातील आनंद व आत्मविश्वास वाढला. फायझर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शॉनने दुसरा प्रयोग केला. आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या पाच घटना आयुष्यात निवडण्यास सांगितले. तेंव्हा या पाचही वेळा हे अधिकारी खूप ताण सहन करीत होते असे दिसले. ताणामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व सुदृढ झाले. ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर माणसाची उत्पादनक्षमता कमालीची वाढते असे शॉन ठामपणे सांगतो. ताण म्हणजे सामर्थ्य वाढविण्याची संधी असे समीकरण आहे.
आयुष्यात संघर्ष टाळता येत नाही. मात्र बुद्धीची प्रसन्नता व लोकसंग्रह ही दोन आयुधे हाती असली तर संघर्ष असूनही जगण्याचा आनंद लुटता येतो. मात्र त्यासाठी मेंदूला सकारात्मक विचार करण्याची सवय मुद्धाम लावून घ्यावी लागते. सध्या आजूबाजूला सतत त्रासदायक गोष्टी कानावर येत असताना अशी सवय लावून घेणे अत्यंत कठीण असले तरी सकारात्मक विचार करणे हाच उपाय त्यावर आहे. गीतेमध्ये मांडलेल्या तत्वांचा वैज्ञानिक आधार शॉनच्या प्रयोगातून मिळतो. शॉनला भगवद्गीता माहित नाही तरीही तो श्रीकृष्णाप्रमाणेच सल्ला देतो.
शॉन म्हणतो, ‘आनंदाचा मुखवटा चढवा असे मी अजिबात सांगत नाही. समस्या नाहीच अशी स्वत:ची खोटी समजूत घालण्यासही मी सांगत नाही. प्रत्येक घटना ही सुवर्णसंधी माना असला खुळा उपदेशही मी करीत नाही. वेगळ्या सवयी लावून मेंदूमध्ये बदल घडवून आणता येतो व अशा बदलाचे फायदे प्रत्यक्ष दिसतात इतकेच मी सांगू इच्छितो. आपण बदलू शकत नाही अशी समजूत आपल्या मनात समाजाने रुजविली आहे. ती खोटी आहे असे माझे प्रयोग सांगतात. विपरीत परिस्थितीतही चांगल्या गोष्टी शोधीन प्रसन्नतेला अग्रक्रम द्या. तशी सवय मेंदूला लावा आणि त्याच्या उत्तम परिणामांचा अनुभव घ्या.’
नवीन वर्षाची सुरुवात शॉनच्या प्रयोगाने करण्यास हरकत नसावी. त्यानिमित्ताने भगवद्गीताही नव्या नजरेने तपासता येईल.
No comments:
Post a Comment