Saturday, September 26, 2020

SPBalasubrahmanyam26.09.20

#CinemaGully
#WithLoveSPB

कादल रोजावे / रोजा जानेमन

बालू सर गेले आणि पुन्हा एकदा भारतीय सिने रसीक शोकसागरात बुडून गेला. खरे तर दक्षिण सिनेमातला कुणी कलाकाराला देवाज्ञा झाली तरी ब-याच वेळेला तशी बातमीही आपल्या पर्यंत येत नाही. कारण किती म्हंटलं तर 'बाबारे.. त्यांचं सिने जग वेगळं..आपलं वेगळं' 

 आता 'सिनेमा गल्ली' सारख्या माध्यमांमुळे 'आपल्याला' दक्षिण भारत व तिथला समृद्ध सिनेमा कळायला लागलाय हे खरय. पण सामान्य भारतीयाला दक्षिण भारताबद्दल व तिथल्या  सिनेमाबद्दल वावडंच. पण साउथ सिनेमा बद्दल आपल्याला खूप आधीपासून प्रेम निर्माण करणारे तीन 'अण्णा' लोक म्हणजे रजिनीकांत, कमल हसन व  आपले लाडके बालू सर. 

एस.पी.बी व कमल हसन एक दुजे के लिये मधून हिंदीत आले आणि मग येत राहिले. या सिनेमामुळे उर्वरित भारताने  त्यांना आपल्या हृदयात कायमची जागा दिली. 'तेरे मेरे बिचमे कैसा है ये बंधन अंजाना?' अशी विचारायची वेळ भारतीय  सिनेरसिकांवर पुन्हा आली नाही इतके ते 'आपल्यातले' होउन गेले. 

खरं तर बालू सरांचे एक गाणे सिलेक्ट करुन त्यावर लिहीणे म्हणजे आम्हा एस.पी फॕन्सना पेचात टाकणारा विषय. त्यांची इतकी अफाट रेंज, अचाट कारकिर्द व अविट गाणी आहेत..त्यातून फक्त एक...? खैर..

माझं बालू सरांचं  सर्वात कर्णप्रिय गाणे म्हणजे 'रोजा जानेमन' किंवा तामीळ मधले 'कादल रोजावे'. 

मणी रत्नम या बाप माणसाच्या दिग्दर्शनातून व संतोष सिवन च्या जादुई कॕमे-यामधून साकारलेले हे गाणे म्हणजे एक अलवार मोर पीस आहे. एखाद्या विरह गीताचे चित्रीकरण किती सुंदर असावे हो..!! हे गाणे त्या अर्थाने एक बेंच-मार्क आहे. 

पण या गाण्यामागची खरी कमाल आहे ती ग्रेट रहमान आणी पडद्यामागे हे गाणे जिवंत करणारे बालू सर. कसलं जबरदस्त म्हंटलय राव हे गाणं...!! हिंदीत बघताना गाणे  'लिप सिंक' होत नसतानाही (मूळ सिनेमा तामीळ असल्याने) ते कुठेही काॕमीक किंवा अनरिलेटेड वाटत नाही. याचं सगळं श्रेय ही दोन्ही भाषेतली गाणी गाणारे बालू सर यांनाच जाते. इतक जीव ओतून ते म्हंटलय बालू सरांनी. शेवटी त्यांचे ते आर्त स्वरातलं 'रोजाsss' आपलं काळीज उसवून टाकतं..इतकं जबरदस्त आहे ते. 

अर्थात सुजाता मोहन या गायीकेने ने गाण्यातल्या कडव्यांमधे दिलेली आलापीची  ती महत्वपूर्ण साथ त्या गाण्याला 'चार चांद' लावते. 

मणी रत्नम, रहमान, बालू सर, संतोष सिवन व पडद्यावर आरविंद स्वामी व मधू...बस्स यार..!! आणि काय हवं एक कालातीत गाणे तयार होण्यासाठी..? नाही का..?

या गाण्याच्या दोन लिंक्स देतोय. 
१. मूळ तामीळ 'कादल रोजावे' हे गाणे नक्की ऐका. बालू सरांच्या आवाजात ते ऐकायला भारी वाटेल तुम्हाला. शक्य झाले तर हेड फोन्स सहीत ऐका. 

https://youtu.be/Urr36-p9e5s

२. स्वतः एस.पी.बीं नी हे गाणे स्टेजवर महालक्ष्मी अय्यर सोबत गायलय आणी तेही रहमानच्या एका काॕन्सर्टमधे. यापेक्षा दुग्धशर्करा योग तो काय? हे गाणे त्यांनी हिंदीत गायले असले तरी त्यातले एक कडवे त्यांनी बहुधा तेलुगू मधे गायलय. 
पहा व एस.पी.बीं ना live ऐकण्यातली मजा देखील  अनुभवा. 

https://youtu.be/GLWVGBBg7c0

© सुनील गोबुरे

Xxxxcccc whakahoki


"मिले सुर मेरा तुम्हारा" या गाण्याने एकेकाळी टीव्हीचा पडदा व्यापून उरत असे. समस्त भारताचे गाणे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती नसेल. साधारणपणे अशा गाण्यांमध्ये ओळखीचे चेहरे दिसतायत का हे आपण बघत असतो. त्यात एके ठिकाणी विचारमग्न कमल हासन दिसलाय. हनुवटी हातावर टेकवून बसलेला कमल, आजूबाजूला समुद्र आणि पार्श्वभूमीवर स्वयम श्रीपती पंडितराध्युल बालसुब्रह्मण्यम! एस पी च आहेत असं वाटावा इतका भन्नाट मेळ जुळून आलाय असं वाटतं. पण ते तसे नाहीये, तो आवाज एम बाला मुरलीकृष्णा यांचा. आश्चर्य वाटावे इतपत साम्य. तरीही एसपी सर्वात आधी कमल हासनचा आवाज होते.

"सुन बेलिया" मध्ये जॅकीला फार काही करायचे नव्हतेच. चेहऱ्यावर आनंद दाखवत फक्त वावरायचे होते. उरलेलं काम त्याचा भन्नाट शर्ट, माधुरी आणि एसपींच्या आवाजाने फत्ते केले! जॅकी श्रॉफ!! आर यु किडींग? पाण्याला कोणताही आकार नसतो,एसपींच्या आवाजाला कोणत्याही हिरोमध्ये बसण्याची दैवी क्लुप्ती साध्य होती. फक्त तो आवाज मध मिश्रित होता एवढाच फरक...!

सलमान खानचा अभिनयात एकंदरीतच आनंद होता, बॉडीबिल्डिंगची कल्पना आणि त्याद्वारे चित्रपट तारून नेणे हे त्याला सुचण्याआधीचा काळ. अशा काळात त्याला ओळख आणि यश मिळाले ते एसपी साहेबांमुळे. "साजन" नामक चित्रपटातील अद्वितीय अल्बम याची साक्ष देऊ शकेल. मक्ख संजय दत्तला कुमार सानु तर, कमी मक्ख सलमान खानला एसपी एकदम झकास काम झालं! "तुमसे मिलने की तमन्ना है" सर्वार्थाने "कौन है जो सपनो मे आया" ची आवृत्ती होण्यापासून वाचवले ते एसपीनी.

हम आपके है कौन मध्ये सर्वाधिक सुरेख गाणी असतील तर ती "पहला पहला प्यार हैं"आणि "ये मौसम का जादू है मितवा" ही दोन. दोन्हीमध्ये एसपी तुफान सुटलेत! त्यापैकी पहला पहला प्यार है एक वळणावळणाचा घाट आहे, एस पी नी त्यात आरामात आपली आलिशान आवाजाची गाडी चालवली आहे. ये मौसम का जादू अत्यंत देखणे गाणे. त्याला एसपींच्या खास हसणे किंवा "हं हं" याचे गोड कोंदण लाभले. त्याआधी "सागर" मध्ये "ओ मारिया" मध्ये एसपी चपखल बसलेत. किती गाणी, किती झकास गाणी... किती उल्लेख करावे? जागा अपुरी पडेल.

एसपी हिंदी मधील मर्यादित तळ्याइतके मर्यादित नव्हते. त्यापलीकडे भारतीय दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला त्यांच्या आवाजाची किनार लाभलेली. तिथे साक्षात येसूदास पासून ए आर रहमान पर्यंत अनेकांनी त्यांचा यथेच्छ उपयोग करून घेतला आणि अनेक गाणी निर्माण केली.त्याची आपल्याला फारशी ओळख नाही. ते साहजिकच, पण त्यामुळे त्यांचा विशाल आवाका आपण दुर्लक्षित करू शकत नाही. १६ भाषांत तब्बल ४०,००० गाणी म्हणणे हे थक्क करणारे आहे. चाळीस हजार? नाही आजकाल गाणी म्हणून जे गद्य कानावर आक्रमण करत येते त्याकाळात हे असे आकडे ऐकून गरगरायला होते. उगाच काहीतरी गायचं म्हणून म्हण असले त्यात काहीही नसणार हे खात्रीशीर सांगू शकतो. केवळ आकडे वाढवण्यासाठी टुकार पणा करणे त्यांच्याकडून होणे अशक्य.

अंदाज अपना अपना मध्ये "बॉम बॉम" नावाचे एक गाणे आहे, ते गाणे देखील श्रवणीय वाटावे ही एस पी किमया होती. दीदी तेरा देवर दिवाना हा केवळ "माधुरी शो" असताना "हुकूम आपका था" सह त्याची ग्रँड एन्ट्री झाली आहे, पुढे त्याचा आवाज "स्टोल द शो ऑफ दीदी तेरा देवर दिवाना"!

९० च्या दशकात भारतीय संघात जवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद हे दोनच वेगवान गोलंदाज होते. त्यांची १०-१० अशी २० षटके संपली की पुढे काय? हा प्रश्न कर्णधारपुढे आ वासून उभा राहायचा. तसेच उदित नारायण आणि कुमार सानू हे दोन वेगवान गोलंदाज ९० च्या दशकातील बॉलिवूड मध्ये होते.सुदैवाने त्यांना कोणतीही १०-१० षटकांची मर्यादा नव्हती, तरीही त्यांना विश्रांती लागणारच की! अशावेळी एसपी साहेबांनी ९० चे दशक आपल्या समर्थ सुरांवर पेलले. नुसते पेलले नाही तर सुरेल खांबांवर नक्षीकाम केल्यासारखे रेखीवपणे पेलले. पुढे बॉलिवूडमधील संगीत अधिक विद्रुप आणि बिभीत्स होत गेले, आणि एसपी देखील दक्षिणेतच गात राहिले. हे नुकसान प्रेक्षकांचेच म्हणावे लागेल.

रोजा जानेमन, ये रात और ये दुरी, तुमसे मिलने की तमन्ना है, पहली बार मिलें है, आ के तेरी बाहों में, साथिया ये तूने क्या किया, बहुत प्यार करते है..  अगणित गाणी आहेत.

कुठूनतरी के एस चित्राचा गूढ आवाज लांबून येतोय... समोर उंच सूचिपर्णी वृक्षांचे घनदाट वन दिसतेय! तेवढ्यात एक मधाळ "ला ला ला..." देखील ऐकू येते एस पी बालसुब्रह्मण्यमचेच ते. "ये तुने क्या किया..." ऐकू येताना आपण शिरतोय देखील त्या वनात! आवाज नव्हे जादूच ती! शांत वनात खुर्ची टाकून, त्या सूचिपर्णी वृक्षांना न्याहाळत बसलोय... कानात आवाज गुंजतोय... "बहोत प्यार करते है तुमको सनम...."

Thank you S P साहेब..

© Ashutosh Ratnaparkhi.

#cinemagully

श्रीकृष्णार्पणमस्तू

Aap aap aap aap

सतत गाणी गाणारा माणूस... 

आपल्याकडे प्रसिद्ध व्यक्ती गेली की कुठलीही गोष्ट अती करून माणसं त्यातलं गांभीर्य नाहीसं करतात. चॅनलवाले तर बोलण्यापलीकडे गेले आहेत. फेसबुकावर लोक नाटकी उमाळे काढतात त्याने मला तरी हसू येतं (उमाळा खरा की खोटा हे ठरवणारे तुम्ही कोण? तुमचा तरी खरा आहे का? याला उत्तर देऊ शकत नाही कारण ज्याचा खरा आहे तो उडता तीर घुसवून घेणार नाही). काल 'आज बहोत याद आओगे', 'विल मिस यू', 'पोकळी', 'कधीही भरून न निघणारी हानी' वगैरे शब्दालंकार असलेल्या पोस्ट वाचल्या. माहितीकरता सांगतो, ९८ नंतर त्याने २०१३ ला म्हणजे जवळपास पंधरा वर्षांनी 'चेन्नई एक्स्प्रेस'साठी हिंदी गाणं म्हटलं होतं. त्यामुळे आपल्या ज्या आठवणी आहेत त्याच्या गाण्यांच्या त्या सगळ्या बावीस वर्षांपूर्वीच्या आहेत. उगाच बोजड व्यक्त व्हायला जाऊ नका. जे वाटतं ते साध्या शब्दात लिहा, लोकांना खरी कृतज्ञता कळते. असो! तर काल एसपी गेला. अकाली गेला का? नाही, चौऱ्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात पर्वताएवढं काम करून गेलाय.

पूर्वसूरींची छाप नसलेले चांगले, अ-नक्कल गायक यशस्वी होतात सहसा. आवाजातलं वेगळेपण हे फार काळ यश देऊ शकत नाही पण आवाजातली सच्चाई मात्र दीर्घकाळ यश देते. नरेंद्र चंचल, बप्पी, रेश्मा, जसविंदर नरूला, अन्नू मलिक काही गाण्यांपुरतेच बरे वाटतात. उदित नारायण, शैलेंद्रसिंह यांचे आवाज स्वतःचे होते. शैलेंद्रसिंह ऋषीचा आवाज झाला आणि आटोक्यातच ठेवलं गेलं त्याला. तुम्ही कोणत्या काळात जन्माला येता हे काहीवेळा भाग्याचं आणि क्वचित दुर्दैवाचं पण लक्षण असतं. कुमार सानू किशोरच्या काळात जन्माला आला असता तर? कुणासारखा तरी आवाज आहे याचं कौतुक फार काळ टिकत नाही. (भेटा : शब्बीरकुमार, मोहम्मद अझीज) पण सानूचं नशीब दांडगं होतं. साधारण अडतीस, एकोणचाळीस वर्षांपूर्वी असाच एक स्वतःचा, छाप नसलेला आवाज आला हिंदीत. एसपी बाला. एवढं बालसुब्रम्हण्यम कोण म्हणणार त्यामुळे आम्ही त्याला एसपी बालाच म्हणायचो.

श्रीदेवी, हेमाचे हिंदी उच्चार जसे कायम दाक्षिणात्य होते, आपले वाडकर मराठीतून हिंदी गाणी गायचे तसं काही त्याच्या बाबतीत झालं नाही. कमलहासन, सलमान, जॅकीला त्याचा आवाज फिट्ट बसला. हिंदी न येणारा हा माणूस शब्द इंग्लिशमधे लिहून घ्यायचा गाणं म्हणताना. कदाचित तो अर्थ, प्रसंग पण समजून घेत असेल गायच्या आधी. जीव ओतायला लागतो ओ गाण्यात तेंव्हा कुठे ते भिडतं, टिकतं वर्षानुवर्षे. सोळा भाषेत चाळीस हजार गाणी म्हणजे खायचं काम नाही. अठरा विसे दारिद्र्य असलेला माणूस जसा सतत कामात दिसतो तसा हा माणूस अठरा विसे संगीतात बुडालेला राहिला. संख्या आणि गुणवत्ता दोन्हीत सरस असणं हे अलौकिक कर्तृत्व आहे. कन्नड, तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा चार भाषांत त्याला सहा राष्ट्रीय पारितोषिक आहेत. संगीत हे भाषेपलीकडे असते असं म्हणतात ते पटतं. किशोर हरहुन्नरी होता पण एसपी पण काय कमी नव्हता, संगीतकार, गायक, डबिंग आर्टिस्ट, निर्माता आणि अभिनेता होता तो. बघायला नगमा आणि ऐकायला रेहमान एवढ्यापुरताच चांगला असलेल्या 'कदालन'मधे तो प्रभुदेवाचा भाऊ झाला होता. त्याचा मी बघितलेला तो एकच सिनेमा.

त्याची गाणी बघाल, अजूनही सापडतील - 'हम बने', 'तुमसे मिलने की तमन्ना है', 'आते जाते', 'वाह वाह रामजी', 'तेरे मेरे बीचमें', 'मेरे जीवनसाथी', 'साथींयां, तुने क्या किया', 'बहोत प्यार करते है', 'दिल दिवाना', 'मेरे रंगमे', 'पहला पहला प्यार है'. 'मुझसे जुदा होकर', 'देखा है पहली बार', 'आज शाम होने आयी', 'रूप सुहाना लगता है', 'सच मेरे यार है', 'ओ मारिया', 'हम तुम दोनो', 'हम आपके...', 'मौसम का तकाजा है', 'रोजा जानेमन', 'आ के तेरी बाहोमें', 'मैं तुम में समा', 'कभी तू छलियां', 'इलया नीला', 'प्रेमिकाने प्यारसे'. कुठलेही हेल न काढता, मनापासून, पाट्या न टाकता म्हटलेली गाणी आहेत सगळी. किशोर जसा प्रामाणिक गायचा ना कुठलंही गाणं तसाच वारसा एसपी बालाने पण ठेवलाय.

सलमानपेक्षाही कमलहासनला त्याचा आवाज फिट्ट होता. ऐकाल कधी 'अप्पू राजा'ची गाणी. 'वो तो बना अपना', 'आया है राजा'ची गंमत एकीकडे आणि 'तूने साथी पाया अपना जगमें' एकीकडे. आपल्या 'धुंदीत, गंधित'ची छाप असलेलं 'ओ, मारिया' ऐकाल कधी आणि 'सच मेरे यार है' ऐकाल. सुरवातीचं व्हायोलिन, तुटलेली तार, लोकांचं हसणं, मग कंगवा वाजतो आणि गाणं सुरु होतं. तिघांनी काय सुंदर एक्स्प्रेशन्स दिलीयेत. 'अपनी तो हार है'च्या आधी तो हसतो ते ऐकाल. कमलहासनचं दुःखं परिणामकारकरीत्या पोचवायला एसपी पण कारणीभूत आहे. प्रेमात आता बदला आला, त्याग वगैरे हास्यास्पद गोष्टी आहेत आता. आपल्याला आवडलं ते आपल्याला मिळायला 'हवं'ची जागा 'हवंच'ने घेतली. प्रेमकथा सूडकथा होऊ लागल्या आणि अशी गाणी दुर्मिळ होत गेली. सिनेमा तंत्राने पुढे गेला खूप पण नात्यातला साधेपणा, मूक प्रेम वगैरे गोष्टी कमी झाल्यात, प्रत्येकाला एक्स्प्रेस व्हायची घाई, अनटोल्ड, अनसेड काही राहू द्याल की नाही!

बाप मुलगा, भाऊ बहीण, आई मुलगा वगैरे नाती फार फिल्मी करून टाकली या लोकांनी. अगदी त्यावर नका सिनेमे काढू पण परत कधी मुकेश ऋषीचं पदार्पण झालं तो 'गर्दीश' बघाल. 'घातक'च्या बाप लेकासारखं नातं त्यात होतं. अमरीश पुरी आणि जॅकीची एक्स्प्रेशन्स बघाल त्यातलं 'हम न समझे थे' ऐकताना. एक बजेटमधलं स्वप्नं बघितलेला बाप 'पुरुषोत्तम साठे' आणि त्याचा मुलगा 'शिवा साठे'. ते उध्वस्त होत जाणारं स्वप्नं बघून तुम्हाला गहिवरून येत असेल तर अजून माणूस आहात तुम्ही. 

संख्या आणि दर्जा याचं प्रमाण व्यस्त असतं सहसा. यांत्रिक उत्पादनात ते किमान राखणं शक्य असतं पण कलेच्या क्षेत्रात ते तसं अवघड आहे. एस.पी., भाषेच्या अडसरामुळे असेल किंवा अज्ञानामुळे असेल पण तुमच्या एकूण गाण्यांपैकी एक शतांश गाणीही ऐकली नसतील मी पण जी ऐकली ती अप्रतिम होती. तुमच्याबद्दल कधीही कुठला वाद, कुप्रसिद्धी कानावर आली नाही. सतत कामातच असाल अर्थात तुम्ही. क्रिकेट हा जसा सभ्य लोकांचा खेळ होता एकेकाळी तीच अवस्था सिनेमात पण आलीये. माणसं गुणी आहेत पण सभ्य असतीलच असं नाही. पाय जमिनीवर ठेवून इतकी वर्ष यशस्वी वावरणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी परत एकदा तुम्हांला सलाम.

एकदा पुलं मल्लिकार्जुन मन्सूरांबद्दल म्हणाले होते 'गाण्यात राहणारा माणूस' त्या चालीवर तुम्हांला 'सतत गाणी गाणारा माणूस' म्हणायला हरकत नाही. देव तुमच्या आत्म्यास सद्गती देवो, ही सदिच्छा.

जयंत विद्वांस


Wo wo tribunal

 
मुखपृष्ठ » संपादकीयअग्रलेख
दक्षिणेचा दिग्विजयी
गायनक्षमतेतून रसिकांची मने जिंकणारा हा कलावंत होता..
 

‘शंकराभरणम्’ ते ‘एक दूजे के लिए’मधील वैविध्य एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या गळ्याने सहज पेलले. गायनक्षमतेतून रसिकांची मने जिंकणारा हा कलावंत होता..

अभिजात संगीत शिकण्याची संधी मिळाली नसूनही ते गात राहिले. भावदर्शन हे पार्श्वगायनाचे मर्म त्यांनी अचूक ओळखले आणि देशव्यापी लोकप्रियता मिळवली..

सुमारे चाळीस हजार गाणी, भारतातील अनेक भाषांमधील गीते, कर्नाटक अभिजात संगीतातील नवनवे प्रयोग..एवढे सारे कर्तृत्व गाजवूनही सतत जमिनीवर पाय ठेवून स्वरांपुढे नम्र होणे हे अलीकडील समाजमाध्यमी काळात फारच अवघड. लोकप्रियतेच्या कळसावर असतानाही, श्रीपथी पंडिताराध्यलु बालसुब्रमण्यम या कलावंताने ती आपल्या अंगी लागू दिली नाही की तिला मिरवलेही नाही. ‘स्वरांपुढे नतमस्तक झाल्याशिवाय ते वश होत नाहीत,’ असे जे अनुभवाचे बोल संगीताच्या क्षेत्रात अनेक शतके सांगितले जात आहेत, ते एसपीबी ऊर्फ बालू यांनी आचरणात आणले. त्यामुळेच त्यांचा आवाज दक्षिणेकडीलच नव्हे, तर देशातील प्रत्येकाच्या कानात रुंजी घालत राहिला. शास्त्रीय रीतीने संगीताचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच अभियंता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या बालसुब्रमण्यम यांना टायफॉइडसारख्या आजाराने ग्रासले नसते, तर कदाचित भारतीय संगीत एका मोठय़ा कलावंताला मुकले असते. शिक्षण अर्धवट सोडून ते संगीताच्या प्रांतात शिरले.. पण अभिजात संगीत शिकण्याची संधीच नसल्याने, त्या काळातल्या समवयस्क तरुणांच्या संगीताच्या उपक्रमात ते गात होते. त्यांना बक्षिसेही मिळत होती. परंतु हे सारे वरच्या पायरीवर पोहोचण्यासाठी त्यांना फार वाट पाहावी लागली नाही. त्या वेळच्या मद्रास प्रेसिडेन्सीमधील म्हणजे आजच्या तमिळनाडूमधील कोनेटम्पेट या गावी जन्मलेल्या या कलावंताला वयाच्या विसाव्या वर्षीच चित्रपट संगीतात पार्श्वगायक म्हणून प्रवेश मिळाला. तेलुगू चित्रपटासाठी गायलेल्या या गीतानंतर अवघ्या आठवडाभरात कन्नड चित्रपटासाठी गाण्याची संधी  मिळाली. तिथून पुढल्या प्रवासात दक्षिणी चित्रपटगीतांचे लोकप्रिय गायक म्हणून तर त्यांनी नाव कमावलेच, परंतु त्यांच्या गायनाने देशातील चार पिढय़ा स्वरसंपन्न झाल्या.

१९३१ मध्ये भारतीय चित्रपट गाऊ लागला. ‘आलम आरा’ पहिल्याच बोलपटातील गाण्यांनी त्या काळात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्या वेळच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे गायक नट ही मराठी संगीत नाटकांतील अत्यावश्यक अट चित्रपटासाठीही लागू होती. गाता गळा असणाऱ्याकडे अभिनयाची बाजू जराशी हलकी असली, तरी तेव्हा चालत असे, याचे कारण चित्रपटाच्या पदार्पणातच त्याला घेरून टाकलेल्या संगीताचा प्रभाव. के. एल. सहगल हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. तंत्रज्ञानाच्या झपाटय़ाने चित्रफितीला स्वरफीत स्वतंत्रपणे जोडता येण्याची सोय झाली आणि भारतीय चित्रपटाच्या संगीतानेही कात टाकली. पार्श्वगायन हे एक नवे, आगळेवेगळे क्षेत्र खुले झाले. अभिनेत्याने गाण्याचे फक्त आविर्भाव करायचे आणि प्रत्यक्ष गाणे वेगळ्याच कलावंताने गायचे, ही सोय चित्रपटाच्या एकूण दर्जासाठीही उपकारक ठरली. उत्तम आवाजाला भाव व्यक्त करण्याची दर्जेदार क्षमता ही त्या काळातील चित्रपट संगीताची अत्यावश्यक गरज होती. त्यामुळे चित्रपट संगीताने तोपर्यंत त्या काळातील अभिजात संगीताचे घट्ट धरलेले बोट अलगदपणे सोडून दिले. ते मुक्तपणे विहार करू लागले. त्यातून संगीत-अभिव्यक्तीच्या शक्यतांचे अक्षरश: डोंगरच उभे राहिले.

संगीतकार, वादक, गायक अशी एक समांतर व्यवस्था भारतीय संगीतात निर्माण होत असतानाच्या काळात बालसुब्रमण्यम यांचा जन्म (१९४६) झाला. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय होत असतानाच त्यांना नव्या संधी चालून आल्या. फक्त सुरेलपणा एवढाच गुण चित्रपट संगीतासाठी पुरेसा नसतो. सुरेल आवाजातील भाव या संगीतासाठी अत्यावश्यक. चित्रपट संगीतात शब्दांचे महत्त्वही वादातीत. त्यामुळे शब्दांचे अर्थ, त्यातील भाव, त्यांचे उच्चार या सगळ्या गुणांचा समुच्चय कलावंताच्या ठायी असणे आवश्यकच. बालसुब्रमण्यम गाऊ लागले, तेव्हा चित्रपट संगीतानेही हळूहळू आपले रंगरूप बदलण्यास सुरुवात केली होती. भारतीय मातीतील स्वरसंस्कारांच्या बरोबरीने नव्याने खुले झालेल्या जगातील अन्य देशांमधील संगीताचेही आगमन तेव्हा चित्रपट संगीतात होऊ लागले होते. परिणामी संगीतकार आणि गायक कलावंतांसाठी तो आव्हानाचाच काळ होता, तर रसिकांसाठी तो नवा आविष्कार होता. बालसुब्रमण्यम यांच्या अंगी या सगळ्या गुणांचे एकत्रीकरण झाले होते. पुरुषी आवाजातील मार्दव सर्व सप्तकांत कायम ठेवणाऱ्या आणि फिरत घेण्याचा गळ्यातील गुण भावदर्शनासाठी अचूक वापरणाऱ्या त्यांच्या शैलीमुळे दक्षिणेकडील भाषांबरोबरच भारतातील अन्य भाषांमधील त्यांची गीतेही रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. हिंदी चित्रपट संगीतातील त्यांची छोटीशी कारकीर्दही त्यांचे वेगळेपण ठसवणारी ठरली. हा आवाज ‘शंकराभरणम्’ या अभिजात संगीतावर आधारलेल्या चित्रपटामुळे जागतिक पातळीवर त्यांना मिळालेली लोकप्रियता त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी.

आपल्या पाच दशकांच्या सांगीतिक कारकीर्दीत बालसुब्रमण्यम यांनी मोठय़ा संख्येचा विक्रम नोंदवला. मात्र एकाच दिवसात २१ गीते ध्वनिमुद्रित करण्याचाही विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. हे विक्रम त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा गायनक्षमतेचे. त्यांचे गायन लोकप्रिय होण्यासाठी त्यांच्याकडे असलेले कलागुणच अधिक महत्त्वाचे. पार्श्वगायक म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, बालसुब्रमण्यम यांनी चित्रपटांतून भूमिकाही केल्या. प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांच्या तमिळ चित्रपटांचे तेलुगू संस्करण करताना, बालसुब्रमण्यम यांच्याच आवाजात संवादांचे ध्वनिमुद्रण होत असे. हरहुन्नरी असल्यामुळे ही असली कामेही ते अतिशय तन्मयतेने करीत. एवढय़ा प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांच्या वाटय़ाला पुरस्कार येणे ही तर अगदीच स्वाभाविक घटना. त्यांच्या मते हे पुरस्कार म्हणजे रसिकांच्या मनात असलेल्या भावनांचे प्रतीक. कलावंत म्हणून येणाऱ्या इवल्याशा लोकप्रियतेने हुरळून जाणाऱ्या सध्याच्या कलावंतांच्या तुलनेत बालसुब्रमण्यम यांचा स्वभाव अगदीच विरळा. शांत, संयमी आणि कलासक्त. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या दक्षिणेकडील भाषांबरोबरच हिंदीसह १६ भारतीय भाषांमधून त्यांची गीते प्रसिद्ध झाली. ‘एक दूजे के लिये’ या हिंदी चित्रपटाने त्यांना आणखी वेगळ्या उंचीवर जाता आले. ते स्थान ‘सागर’मुळे पक्के झाले. परंतु त्या आधीही ते हिंदी गीते गातच होते. कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीतील कोरडा व्यवहार, व्यावसायिक गणिते, कमालीची अटीतटीची स्पर्धा.. वा अन्य कारणांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीशी त्यांची जुळलेली नाळ अल्पकाळाची ठरली. परंतु त्याबद्दल त्यांनी कधी जाहीर वाच्यताही केली नाही.

लोकप्रियता हा काळाचा महिमा असतो, तसा शापही असतो. या कलावंताने तो महिमा जाणला होता. त्यामुळेच ते फक्त कलानंद मिळवत राहिले. तटस्थ व्यवहारातील कोरडेपणापासून अलिप्त राहिले. स्वरांची निर्लेपता हेच त्यामुळे त्यांचे आनंदाचे स्थान राहिले. कलावंताने आपल्यातील कलेची सतत मशागत करायची असते. ती करत असताना परिसरातील सांस्कृतिक व्यवहारांचे, त्यातील बदलांचे भान ठेवायचे असते, याची जाणीव बालसुब्रमण्यम यांनी आयुष्यभर ठेवली. एस. पी बालसुब्रमण्यम यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केलेली स्वराराधना ५० वर्षांच्या प्रचंड कारकीर्दीनंतर थांबली. भारतीय ललित संगीतात त्यांनी केलेली दीर्घ आणि सौंदर्यपूर्ण सेवा ही त्यांच्या आवाजावर ‘दक्षिणेचा’ असा शिक्का बसूनसुद्धा दिग्विजयी ठरली. त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली.

लोकसत्ता-शनिवार;२६.०९.२०२० अग्रलेख

Hhhhhhhhhh
*जेष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले.*
*एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा अल्पपरिचय.*
जन्म. ४ जून १९४६ आंध्र प्रदेशातल्या, नेल्लोर येथील मूलपेट मेहुआ येथे.
‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख असणारे, आपल्या भारदस्त आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव संगीत क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जात असे. त्यांनी आपल्या गाण्यांनी भारताला मंत्रमुग्ध केले. बॉलिवूडमध्ये सलमान खानला आपल्या आवाजाने लोकप्रिय करणारे आणि ९० च्या दशकात एकापेक्षा एक हीट गाणे देणारे जेष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम होते. तसेच, एस.पी. बालसुब्रमण्यम यांना बालू या टोपन नावाने ओळखले जात असे. एसपीबी यांनी १६ भाषांमध्ये चाळीस हजारांपेक्षा जास्त गाणे गाण्याचा रेकॉर्ड केला होता. 
एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे वडील हरिकथा कलाकार होते. हरिकथा हा आंध्र प्रदेशातील एक पारंपरिक कला प्रकार असून, यात कथा, कविता, नृत्य, नाटक अशा सगळ्या कला यात अंतर्भूत असतात. धार्मिक कथा या कलाप्रकारातून सादर केल्या जातात. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे वडील याच नाटकांतून काम करायचे. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असून, त्यातील एक बहीण एस. पी. शैलजा यासुद्धा गायिका आहेत.
मोठे होऊन अभियंता व्हायचे ते एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे स्वप्न होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशच्या अनंतपूर येथील जवाहरलाल टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशदेखील घेतला होता. मात्र, याच कालावधीत ते प्रचंड आजारी पडले. आजार तसा गंभीर नव्हता. परंतु, त्यातून बरे होण्यासाठी त्यांना बराच कालावधी गेला. याचमुळे त्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडावे लागले. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वी आणि इतर अभ्यासक्रम शिकत असताना त्यांचे संगीत शिक्षण मात्र नित्यनियमाने सुरु ठेवले होते. १९६४ मध्ये ‘हौशी’ गायक म्हणून त्यांना एका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. यानंतर गायन क्षेत्रात करिअर करायचे असे ठरवून ते पुढे जात राहिले. सुरुवातीला त्यांनी अनेक मोठ्या दाक्षिणात्य संगीतकार आणि गायकांसोबत साहाय्यक काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी आपल्या गायकीला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणजे त्यांना पुढच्या दोन वर्षांत, १९६९ साली म्हणजेच वयाच्या २०व्या वर्षी स्वतंत्रपणे गाण्याची संधी मिळाली. त्यांचे पहिले गाणे हे त्यांच्या मातृभाषेत अर्थात तेलुगूत होते. या गाण्याच्या अगदी आठ दिवसांनी त्यांनी कन्नड भाषेतील एक गाणे रेकॉर्ड केले. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा आदी शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ९० च्या दशकामध्ये अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याकडे पाहिलं जात असे. इलिया राजा यांची सगळ्यात जास्त गाणी एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली होती. कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खानचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. तरुण असलेला सलमान आणि एस. पींचा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र, हा चित्रपट सुपरहिट झाला आणि एस. पी. बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली. यानंतर एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांना प्रसिद्धी मिळाली. याच दरम्यान तामिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक बालचंदर एका हिंदी चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी एस. पी. बालासुब्रमण्यम यांची निवड केली. चित्रपट होता ‘एक दुजे के लिये.’ विशेष म्हणजे, हा चित्रपट कमल हसन, रति अग्निहोत्री, एस. पी. बालासुब्रमण्यम या तीनही कलाकारांचा पहिला हिंदी चित्रपट होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी चित्रपटाचे संगीत तयार केले होते. मात्र, दाक्षिणात्य आवाज या चित्रपटासाठी वापरावा यावर त्यांचे दुमत होते. परंतु, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आवाजाने ते इतके भारावून गेले की त्यांनी गायक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. प्रदर्शनानंतर चित्रपट आणि गाणी दोन्हींना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘एक दुजे के लिये’ या पहिल्याच हिंदी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ८ फेब्रुवारी, १९८१ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ अशा बारा तासांत तब्बल २१ कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. या आधी त्यांनी एका दिवसांत १९ तामिळ गाणी, तर १६ हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. ते इतके व्यस्त होते की, दिवसाला १५-१६ गाणी ते रेकॉर्ड करतच! याशिवाय ते मोठ्या कलाकारांसाठी डबिंगही करत. एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एखादे गाणे कठीण वाटल्यास ते आठ-दहा दिवसांचा वेळ मागून सराव करत. मात्र, घाईचे काम असल्यास ते सहजपणे नकार देत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून ‘विश्राम’ घेतला होता. २०१३ मध्ये आलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी त्यांनी मुख्य गाणे गायले होते. देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने एस. पी. बालासुब्रमण्यम यांना गौरवण्यात आले होते. या व्यतिरिक्त त्यांनी सहा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
*सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

L all up gul top
आजा शाम होने आई...
ही लकेर कानावर पडली की सळसळायला व्हायचं! मध्येच तो ‘ओ कमॉन’ असं लाडिक हताशायचा! आम्हाला प्राथमिक शाळेतच बॉयफ्रेंड झाल्यासारखं फिलायचं!
‘पत्थर के फुल’ ची क्यासेट घेण्यासाठी पैसे जमवता जमवता ‘साजन’ यायचा आणि ‘लव’ व ‘वंश’ चे कॉम्बिनेशन घेतले की ‘सून बेलीया’ आणि ‘मुश्कील मे है कौन किसीका’ च्या ज्याकीदादाचा मान ठेवावा लागायचा. आणि मग ‘गर्दिश’ च्या गाण्याचं काय! ‘आय लव्ह यु’ चं पोस्टर देखील पाहिलं नाही पण अठरा रुपयांच्या टी सेरीज ब्ल्यांक मध्ये सगळी ‘ए’ साईड भरून घेतली. ‘बी साईडला ‘फर्स्ट लव लेटर’ चं ‘दिवानी दिवानी..’ तर हेच शब्द असलेलं ‘तेरी बाहो मे’ या मोहनीश बहल च्या टारझनचं गीत, ‘मेरा पति सिर्फ मेरा है’ मधले एकमेकांना पत्र लिहिणारे व वाचणारे जितेंद्र-रेखा, ‘धनवान’ मधला अजय-मनीषा चा ‘एक ही घोसला..’ ‘ये मझधार’ मध्ये सुतकी कपडे घालून समुद्राला त्रास देणारी राहुल रॉय-मनीषा ची जोडीचं ‘सागर से गेहरा है प्यार..’ दीपक तिजोरी सारख्याला धन्य करणारं ‘संतान’ चं ‘आ जरा करीब आ..’ कसल्या कसल्यांचे पांग फेडले त्या आवाजानं! खरं सांगू.. जादुई..रेशमी.. वगैरे विशेषणं इथं कामाची नाहीत. ती इतरत्र कुठंही वापरा. इथं फक्त एसपीबी म्हणायचं!
सलमान फक्त छान दिसायचा. बाकी मोठा शून्य. बाकीच्या विषयापैकी आवाजात एसपीनं आणि स्क्रीनवर बडजात्यानं त्याला दोनदा तारलं! ‘ये रात और ये दुरी..’ ऐकण्याच्या काळात त्याला पाहिलंही नव्हतं. तो सलमानपेक्षाही सुंदर दिसत असणार असं उगीच वाटायचं. ज्याकीदादालाही त्याचा आवाज शोभायचा. पण विवेक मुश्रनची ‘सजनी...’ ची हाळी ऐकताना मिकी माऊसला लॉयन किंगचा आवाज दिल्यासारखं वाटलं आणि बॉलीवूडातल्या सर्वात विचित्र मिसळीपैकी एक म्हणजे ‘हर जवाँ दिल को किसी से प्यार होता है’ हे गाणं देखील त्यानं भोगलं! सदरील मिसळीतले पदार्थ होते- गोविंदा, नौशाद आणि एसपीबी! नंतर एकदा अनुपम खेरला ‘देखिये ये संसार है..’ म्हणताना पाहिलं आणि पटलं.. सुनिये, ये बॉलीवूड है..
पद्मालया फिल्म्स व तत्सम गल्लाभरू दाक्षिणात्यांनी जितेंद्रसाठी त्याला बरच वापरलं. पण ‘मिलन..मौजो से मौजो का..’ या टिपिकल सौथ्थ सुरावटीतच प्रकरण जमलं. बाकी कमल हसन आणि त्याचं तर ‘एक दुजे के लिये’ चंच नातं वाटायचं!
सध्याही त्याचं ये तो कमाल हो गया मधलं ‘मै आवारा बंजारा रस्ते मे..’ ऐकतोय!
अलविदा एसपी!
#cinemagully #spbala
#abhijitbhoomkar

#मोरपिशी_आवाजचा_एसपी... !! 

ते वय तसं आडवय होतं. मी सहावीमध्ये होते, आणि मैंने प्यार किया रिलिज झाला होता.. एक तर तुफान हॅन्डसम दिसणारा सलमान खान आणि गोड, बाहुली वाटावी अशी ती भाग्यश्री.. ! सिनेमाच्या पोस्टर्सनी वेड लावलं होतं. तेव्हा उठले आणि निघाले सिनेमाला .. असा जमाना नव्हता. थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघायचा तर त्या आधी भरमसाठ अभ्यास करावा लागायचा.. तर सिनेमाला आईबाबा घेऊन जायचे. मग तोपर्यंत मैत्रिणींकडून गाण्याच्या कॅसेट्स आणून त्या सिनेमाची गाणी ऐकायची. त्यामुळे मैत्रीणीकडून मी मैंने प्यार किया’ची कॅसेट आणून ती कितीवेळा ऐकली असतील माझं मलाही माहिती नाही. ती गाणी ऐकत असताना त्यातल्या इतर गाण्यांपेक्षा “ आते जाते...” या गाण्याने चिक्कार वेड लावलं. नंतर केव्हातरी ते गाणं आमच्य कॉलनीतल्या एका दादाला म्हणून दाखवलं तर त्याने लगेच स्टिव्ह वंडरच I just call to say… ऐकवलं. त्याच्याकडे तेव्हा इंग्रजी गाण्यांचं बरच कलेक्शन होतं. जरी ती चाल या स्टीव्ह वंडर च्या गाण्यावरून घेतली असली तरी सुद्धा.. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्या गाण्याला दिलेली ट्रीटमेंट अप्रतिम आहे. तेव्हापासून ते गाणं मनात घर करून राहिलं आहे.. आणि असं असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण लतादिदी आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा त्या गाण्याला लागलेला आवाज. किती तलम आवाज असावा एखाद्याचा!  गालावरून मोरपिस फिरवावं इतका कोमल.. तरल आवाज! तो सिनेमा पहायला जाईपर्यंत माझं हे गाणं पूर्ण पाठ झालं होतं. आणि थिएटरच्या म्हणजेच इचलकरंजीच्या पंचवटी टॉकिजच्या त्या डॉल्बी स्पिकर मध्ये ते जसं ऐकू आलं ..! मी कान, मन तृप्त झाले इतकंच म्हणू शकते. आणि तेव्हा एस पी बालसुब्रमण्यम हे नाव आवडत्या गायकांच्या यादीत जाऊन बसले. मी पाहिलेल्या सिनेमांपैकी तो पहिला सिनेमा अर्थाच हिंदी, ज्यात एस पी गायले होते. पण केव्हातरी दूरदर्शनवर रविवारी ‘एक दुजे के लिये’ लागला होता आणि त्यातले ह्म बने तुम बने ऐकताना दुसर्‍या क्षणाला मी तो आवाज एस पींचा आहे हे ओळखले होते. तीच गत अंधाकानुन सिनेमा पाहताना झाली.  अंधाकानुन या अमिताभ आणि रजनीकांत च्या सिनेमामध्ये 'मौसम का तकाजा है.." हे गाणं सुंदर आहे.. 

आणि त्यानंतर एस पी भेटतच राहिले.  मैने प्यार मधली सगळीच गाणी.. गर्दीश मधलं हम न समझे थे बात इतनी सी.. साजन मधलं बहुत प्यार करते है.. आवाजाचा पोत असा कि एखादी मोत्यांची लड उलगडावी आणि आजूबाजूला तलम रेशमी मोती विखरून जावेत.  ये मेरा दिल तो पागल हैं .. हे गर्दीश मधलं गाणं माझ्या मनाच्या अगदी जवळचं आहे. कितीवेळा ऐकावे!! त्यातलं तेरे पैरो की पायल हैं म्हणताना खर्जात गेलेला त्यांचा आवाज खूप खोल काहीतरी उलथापालथ घडवतो. अगदी खरं सांगायचं तर.. या गाण्यात त्यांच्यासोबत आशा भोसले आहेत पण या गाण्यात पर्टिक्युलरली एसपींच्या आवाजा समोर आशाताईंचा आवाज थोडा कर्कश्श वाटतो आहे.. (आशाताई माझ्या अतिशय लाडक्या गायिका आहेत.. त्यांच्याबद्दल पराकोटीचा आदर आहे तरीही मला असंच वाटतं). 

त्यानंतर आलेला १०० डेज..  या सिनेमातल्या सुन बेलिया या गाण्यामध्ये सुरुवातीला जे सून बेलिया आहे... ज्या पद्धतीने आळवले आहे.. त्याला तोड नाही. त्यांचा आवाज कितीही तार सप्तकात गेला तरी तो कधी कर्कश्श नाही वाटला.. किंवा खर्जात गेला तरी घोगरा नाही आला. यातल्या तू कहें तो.. या तो वर त्यांनी जी जागा घेतली आहे.. ती नेहमीच मनाला भुरळ घालते. 

सागर सिनेमात जाना ओ मेरी जाना.. तसेच जानी जब बोला था तुझसे शादी करेगी मुझसे ... ही गाणी नेहमीच पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात.. आणि मुख्य म्हणजे.. ही गाणी ऐकताना कधीही ती गाणी पडद्यावर साकारणाऱ्या नटाचा चेहरा डोळ्यापुढे न येता फक्त एसपींचा आवाज मन भरून उरतो. सच मेरे यार है.. हां यही प्यार है.. या गाण्यात कमल हसनच्या चेहऱ्यावरचे भाव आणि एसपींचा आवाज.. दोन्ही एकमेकाला इतकं साजेसं आहे ना.. तिथे कुणी इतर गायक मला कल्पनाही करवत नाही.

साजन सिनेमांत सलमान खानला एसपींचा आवाज दिला आहे. खरा सांगायचं तर लौकिकार्थाने सलमान खानची गाणी प्रसिद्ध करणारा हा गायक. तुमसे मिल्ने कि तमन्ना.. या गाण्यात गाणं उडत्या चालीचं असलं तरी एसपींनी उत्तम निभावलं आहे.. पहिली बार मिले है.. हे सुद्धा याच प्रकारातला. शांत तलम गाणी गाणाऱ्या एसपींनी या गाण्यांना सुद्धा योग्य न्याय दिला आहे. जिये तो जिये कैसे.. या गाण्यामध्ये बिन आप के..  तसेच बहुत प्यार करते है... यातलं तुमको... या को ची जगा.. हे गावं तर एसपींनीच.  

आके तेरी बाहों में - वंश मधलं गाणं.. आज तर या गाण्यातले नट नटी आठवतही नाहीत, पण हे गाणं लक्षात राहिलं ते एसपींच्या गाण्यामुळे . मेरे मन को मेहेकाये तेरे मन की कस्तुरी.. हे गाताना घेतलेली तान मनाला त्या सुरावटींवर झुलायला भाग पाडते. 

'रोजा' सिनेमाच्या यशामध्ये ७० टक्के यश त्यातल्या गाण्यांचं आहे.. त्यातलं रोजा जानेमान .. ये हसी वादियाँ .. हि गाणी माईलस्टोन म्हणावी इतकी सुंदर आहेत. संगीत हा भाग नक्कीच आहे.. पण ती गाणी लोकांपर्यंत त्यातल्या शब्दांच्या माध्यमातून पोचवायचं काम बरहुकूम केलं आहे एसपींनी. डब केलेली गाणी.. तरीही ती सिनेमा पाहताना गोडच वाटली. अमाप यश मिळवलं रोजा’च्या गाण्यांनी..  आणि त्या पाठोपाठ आलेला.. लव्ह... रेवती आणि सलमान खानचा. त्यातल्या साथिया तूने क्या किया... या गाण्याची चाल कोणत्या मुहूर्तावर सुचली असेल आनंद मिलिंद यांना हा एक मला कधीही न सुटलेला प्रश्न आहे. एखाद्या शब्दाचा उच्चार थोडासा हस्की करणे.. जसे इतना म्हणताना.. इदना ऐकू यावा.. अशा पद्धतीची गाण्याची पद्धत एसपींनी आणली. आणि त्यांनाच ती सूट होते. ते गाणं डोळे मिटून ऐकावं.. आणि अगदी मनापासून ऐकलं तर त्यांच्या शेवटच्या इतना करो ना मुझे प्यार'ला किंचित डोळे भरून येतात.. 

असेच एसपी भेटच राहिले.. आणि मग आला हम आपके हैं कौन.. खूप जणांनी त्या सिनेमाला लग्नाची कॅसेट म्हटले.. अखंड गाण्यांचा मारा आहे म्हटलं.. पण मला आवडला होताच तेव्हाही आणि आताही आवडतोच. त्यातल्या प्रत्येक गाण्याचं एसपींनी सोनं केलं आहे. अगदी जुते दो पैसे लो.. या सारख्या गाण्यात सुद्धा आपली अशी खास गायकी दाखवली आहेच. पहला पहला प्यार है.. ये मौसम का जादू है.. ही गाणी खास एसपींसाठी ऐकावीत. 

ही गाणी त्यांच्याशिवाय इतर कोणी गाऊ शकले असते असा विचारही करवत नाही.  प्रत्येक शब्द श्रोत्यांच्या हृदयापर्यंत खोल उतावरण्याचे कसब त्यांच्या आवाजात होते. रोमँटिक सलमान खान, एसपींच्या आवाजाशिवाय डोळ्यापुंढे येतच नाही.  सलमान चा गाणारा आवाज हरवला, हे मात्र नक्की!

अगदी चेन्नई एक्सप्रेस मधले सुद्धा टायटल सॉंग त्यांनी उत्तम रीतीने निभावलं आहे..! 

आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि माझं बालपण.. टीनएज आठवलं..   जेव्हा सिनेमातल्या  प्रसंगात आपण स्वतःला हरवून बसतो, एखादं गाणं मनाचा कोपरा न् कोपरा व्यापून बसतं .. त्या गाण्याच्या सुरावटीतून बाहेर पडणं हे तितकच सुंदर दुसरं गाणं समोर आल्याशिवाय शक्य होत नाही. .. अशा काळात एसपींनी मनावर कधी हळुवार मोरपीस फिरवलं, कधी फुंकर घातली कधी नाचायला लावलं.  त्यांच्या आवाजाची जादू अशी की आजही त्या गाण्यांमध्ये मी गुंतून जाते. 

एक कोमल, मोरपिशी तलम, हळव्या आवाजाचा गायक पंचत्वात विलीन झाला..  कोण होता तो माझ्यासाठी? कुणीच नव्हता पण.. खूप कुणीतरी होता. माझ्या तेव्हाच्या अल्लड वयाला नाचायला लावणारा, स्वप्नातल्या राजकुमाराची  स्वप्नं बघताना बॅकग्राउंडला गाणारा.. रात्री झोपताना नितळ आवाजाने शांत झोपायला मदत करणारा..  काहीतरी नक्कीच तुटतंय आत...! नक्की सांगता येत नाहीये. समजून घ्याल ही आशा आहे. 

 

#प्राजक्ता_पटवर्धन

Tv वर सारख्या लागणार्‍या 'इंद्र द टायगर' सिनेमात सुरुवातीलाच एक गमतीदार सीन आहे. एका सिंगिंग कॉम्पिटिशनला  #spbalasubramaniam परीक्षक आहेत. गाणारी स्पर्धक 'महागणपतीम मनसा स्मरामि' हे कर्नाटिक संगीत गातेय.. पण ती गाऊच शकत नाही. मग प्रेक्षकांत बसलेला तिचा मामा 'मेगास्टार चिरंजीवी' उठून स्टेजवर येत ते अप्रतिम शास्त्रीय गीत गातो आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन टाळ्या वाजवतात... परीक्षकसुद्धा त्याच्या स्वराने भारावून जातात... गंमत म्हणजे भारावलेल्या परीक्षकाच्या भूमिकेत आहेत #spbalasubramaniam आणि त्यांच्यसमक्ष स्टेजवर येऊन गाणार्‍या चिरंजीवीच्या गाण्याचा प्लेबॅकही गायलाय स्वतः #spbalasubramaniam यांनीच... स्वतःच्याच आवाजाचे परीक्षण करून त्यावर भारावून जाण्याची अशी संधी मिळालेले spb विरळेच आणि अफाटच... ४०००० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा विश्वविक्रम तेच करू जाणेत... 

लहानपणी रफी, किशोर सोबत कुमार सानूच्या आशिकीने प्रवेश केला होता. आमिर खानचा आवाज बनलेल्या उदितचं 'पापा कहते है' पण आवडत होतं. पण सलमानची 'मैने प्यार किया' पासून ते 'हम आपके है कौन?' पर्यंतची सगळी गाणी फारच आवडत होती... सलमानपेक्षाही जास्त... विशेषतः गाण्यांच्या मध्ये खुदकन हसणं, धत्त तेरेकी, ओह नो कम ऑन वगैरे शब्दांनी मजा यायची... मात्र गर्दिश सिनेमातल्या' हम न समझे थे बात इतनी सी' या गाण्याने भलतीच जादू केली. ते गाणं लहानपणी spb च्या स्टाईलमध्ये जमेल तसं, जमेल तिथे गात सुटलो... त्यात 'रोजा'च्या गाण्यांनी कहर केला...  #spbalasubramaniam काय ताकदीचे आहेत हे समजण्यासाठी आपसूकच दक्षिणेकडची गाणी ऐकू लागलो आणि ते व्यसन बनलं... Duet सिनेमातलं 'अंजली अंजली पुष्पांजली' असो, 'शंकराभरणम' ची गीतं असोत, की कन्नड 'जीवज्योतिये'पासून ते अगदी 'नाणयम' मधले 'नान पोगिरन मेले मेले' असो... प्रत्येक गाणं भिडतं.. अजूनही रोज 'शिवोहम शिवोहम' मी रोज ऐकतो ते spb चंच... 'नाद विनोदम' हे 'सागरसंगमम' मधलं गाणं पाहिल्यावर तर SPB चा आवाज ग्रेट आहे की कमल हासनचा डान्स असा प्रश्न पडला. कमलला एसपीबीचा आवाज विशेष सुट होतो, हे खरंच आहे. म्हणून तर कमल हासनच्या तामिळ सिनेमांच्या तेलुगू डबिंगमध्ये कायम #spbalasubramaniam कमल हासनला आवाज देत... लहानपणी फेवरेट बनलेल्या प्रभूदेवासोबत 'प्रेमिकाने प्यारसे...' मध्ये spb ने केलेला कॉमेडी डान्स पाहून आर्त स्वर लावणारा गायक हाच का, असा प्रश्न पडला... सरस्वतीपुत्र आणि लक्ष्मीपती म्हणून ओळख बनलेले #spbalasubramaniam हे भूलोकीचे गंधर्व आज गंधर्वलोकांत निघून गेले.. २०२० मधील हा आणखी १ दुर्दैवी क्षण आहे... #ripspbalasubramaniyam

 - आदित्य नीला दिलीप निमकर












No comments:

Post a Comment